"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"(यु.आय.डी.ए.आय.-भारतीय विशेष ओळख [परीचय]प्राधिकरण)

"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल."
कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे. यासाठी प्रत्येक योजनेच्या खर्चाची पडताळणी सरकारने करावी...
इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी योजना अस्तित्वात असताना सामान्य माणसाची प्रगती का होत नाही?
आठवड्याला आता सहा दिवसांएवजी आता पाचच दिवस कामाचे आहेत...सहाव्या वेतन आयोगात सर्वांचे बोनस,पगार वाढलेत...तसेच करातही सुट मिळत आहे.
भ्रष्टाचार्‍यांना मिळणार्‍या ढील मुळे सर्व यंत्रणा झपाट्याने पोखरल्या जात आहेत....
आपल्या यंत्रणेतील नोकरशाहीच्या कार्यपध्दतीत आणि मानसिकतेत बदल घडवुन आणणे हे एक मोठे आव्हान आहे.

मागील १५ वर्षात सरकारी सामाजिक खर्च १५ पट वाढला जरुर, पण त्याचा फायदा सामान्य माणसांपर्यंत कितपत पोहोचतो?
पाच वर्षांपुर्वी रुपयाचे १० पैसे सामान्य माणसापर्यंत पोहोचत असत. परंतु आता ७ पैसेच सामान्य माणसापर्यंत पोहोचतात...
सरकार सामाजिक क्षेत्रासाठी सर्वाधिक खर्च करत असल्याचा दावा करते; याला ते सर्वसमावेशक विकासाचा वाहक पण म्हणते...
पण ह्या अमाप/अवाढव्य खर्चाचा जर खरंच उपयोग होत असता तर ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या संख्येत ४१.८% वाढ झालीच नसती.
२००५-२००६ पासुन आजपर्यंत केंद्रसरकारने खर्च केलेल्या ४,९९,००,७२१ करोड रुपयांपैकी [९३%] ४,६४,०७,६७१ करोड हे वाया गेले....
खरंतर भारतात यासाठी कोणत्याही प्रकारची सामाजिक ऑडिट सुविधा नाहीये....कॅग[Comptroller And General of India] अंतर्गत होणार्‍या ऑडिटकडे विशेष लक्ष्य दिले जात नाही...
उशिरा का होईना पण या समस्येवर उपाय शोधण्याच्या मार्गावर एक पाउल उचलले गेले आहे ते "युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ ईंडिया[UAIDI]" च्या स्वरुपात.
पण फक्त 'युआयडीआय' ने हेतु साध्य होणार नाही, त्यासाठी सर्व सरकारी योजनांवर होणार्‍या खर्चाचे सामाजिक ऑडिट करावे लागेल. यानंतरच आपण रुपयाचा पूर्ण फायदा....मिळण्याची अपेक्षा ठेवु शकतो.
रेशन कार्ड,वाहन चालविण्याचा परवाना आदिं सारखे अनेक ओळखपत्र असुनही नागरिकांस ओळख देणे अनेकदा कठीण होतं.
१)ओळख दाखवण्यास जास्त कशाचा उपयोग होतो?

२)यापैकी कोणती सरकारी सेवा घेण्यात सर्वात जास्त त्रास होतो?
[आकृत्यांना दिलेल्या क्रमांकानुसार प्रश्नांचे क्रमांक आहेत.....]

(एका प्रसिध्दी माध्यमाच्या सर्वेक्षणावरुन)

सार्वजनिक वितरण प्रणाली (पी.डी.एस.) एक समस्या..

रेशन दुकानातील ४२ टक्केच धान्य खर्‍या गरजुंपर्यंत पोहोचते....तसेच सरकार जर विविध योजनांवर ४ रुपये खर्च करत असेल तर त्यापैकी फक्त १ रुपयाच गरिबांपर्यंत पोहोचतो...
बी.पी.एल. कार्ड हे दारिद्र्य रेषेखालील लोकांना मिळावयास हवे पण हे कार्ड चुकीच्या हातात जाते.. ४०% घरांत चुकीचे बी.पी.एल. कार्ड आहे...
सार्वजनिक वितरण प्रणाली (पी.डी.एस.) योजनेचा हेतु विफल ठरण्याचे मुख्य कारण हे आहे.
यातही यु.आय.डी.आय. निश्चितच सहाय्यक ठरु शकेल.

सरकारी अनुदान...
केंद्र सरकारचे अनुदानावरील बील एक लाख करोड पेक्षा जास्त आहे...परंतु ते वितरण पध्दतीतुन कितपत हक्कदारांपर्यंत पोहोचते?
२००६ नंतर एकट्या बंगालमध्ये ५३ लाख नकली/बनावट रेशन कार्ड सापडले..
सामाजिक क्षेत्रात भलेही मागील १५ वर्षांपेक्षा खर्च १५ पट वाढला असेल....परंतु मानव विकासाचा निर्देशांक पहिल्यासारखाच निराशाजनक आहे.
या समस्येच्या तळाशी नागरिकांच्या जबाबदारीची सरकारची अनिश्चित भुमिका असुन भ्रष्टाचारालाही यानेच खत-पाणी मिळत आहे.
उदा.
२००९ मध्ये १.११ लाख करोड अनुदानाचे बिल...
परंतु नकली रेशनकार्डामुळे खर्‍या हक्कदाराकडे अनुदान पोहोचत नाही.
तसेच अनुदान वाटप यंत्रणेत असणारा पारदर्शकतेचा अभाव देखील या गोष्टीस तितकाच जबाबदार आहे......
गरीब नेहमी स्वतःला यंत्रणे बाहेर उभे मानतात...

"सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत येणार्‍या या सेवांची पहिली अटच अशी आहे; की मदत आपल्या उद्दिष्टापर्यंत/लक्ष्यापर्यंत वेळेवरच पोहोचली पाहिजे...."

यु.आय.डी.आय. मध्ये ही क्षमता आहे...

अनेक सर्वेक्षणाच्या आकड्यांची सत्यताही पडताळुन पाहण्यास सहाय्यकारी ठरेल..आणि व्यवहार अतिपारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त होण्यास मदत होईल.

संधी दृष्टीकोन बदलण्याची....

समुहाची नाही तर व्यक्तीची ओळख...
लोकांची मोजदाद आणि माहिती गोळा करण्याची म्हणजेच जनगणनेची प्रक्रिया नवी नाही.
जनगणना हे यु.आय.डी.आय. चे प्राथमिक रुप आहे. पण आपली जनगणना पध्द्ती ही व्यक्तीसापेक्ष नसुन समुहाशी निगडीत आहे.
हा प्रमुख निदर्शनास येणारा फरक होय.
१८८१ च्या जनगणनेसमयी लोकांची नोंदणी जाती-समुदायाच्या आधारावर होऊन ते विशिष्ट वर्गांमध्ये विभागले गेले.
या काळात शिक्षण्, पेशा, उत्पन्न ई. धर्मनिरपेक्ष मुल्यांच्या आधाराने अंतर्गत भिन्नता वाढत होती. याच काळात जातीवादाने बाळसे धरले.
पहिल्या काळात कनिष्ठ जातीं स्वतःस क्षत्रिय म्हणुन नोंदणी करण्याचा प्रयत्न करत......पण ह्यावेळी जर अशी नोंदणी झाली तर कनिष्ठ जातीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. कारण या जातींशी सरकारी लाभ जुळले आहेत.
जिथे समाज आर्थिक विकास, व्यक्तिगत क्षमता व सुविधांना प्रोत्साहित करतो, तिथेच राजकारणाने व्यक्तीसापेक्षता दुर्लक्षित केली जाउन जाति व समुदायावर जोर दिला आहे.
आज आपणास संधी आहे.....
यु.आय.डी.ए.आय. प्रकल्पाद्वारे, समुहाऐवजी व्यक्तिस ओळख देण्याचा मानस आहे, ही परियोजना भारतीयांप्रती ईतर राष्ट्रांचा दृष्टिकोन बदलण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे पाउल आहे.

पण हा प्रकल्प नक्की आहे तरी काय?

यु.आय.डी.ए.आय.>युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ ईंडिया
"भारतीय विशेष ओळख [परीचय]प्राधिकरण"


श्री नंदन निलेकणी

केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीयपातळीवर राबविण्यात येणारा स्तुत्य उपक्रम... ज्या उपक्रमाच्या प्रमुख पदी ईंफोसिस या भारतातील अग्रगण्य आयटी उद्योगाचे सहसंस्थापक श्री नंदन निलेकणी नियुक्त केले गेले आहेत. त्यांना यासाठी भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
"भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाचा हेतु सरळ आहे...
या अंतर्गत देशात राहणार्‍या प्रत्येक नागरिकांस एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल...जो अतिशय विश्वासार्ह असेल..ज्याची नक्कल करणे केवळ अशक्य असेल.
प्रत्येक कामात भारतीय नागरिकास आपली ओळख सिध्द करण्यास असंख्य अडचणी येतात.. अनेक वेळेस कागद-पत्रांच्या अभावी काम होत नाही..
यु.आय.डी. हा असा नंबर आहे की याद्वारे कोणाचेही ओळखी अभावी कोणतेही काम अडुन राहणार नाही..असंख्य कागदपत्रांच्या ऐवजी फक्त हा नंबर[card] ते काम करणार आहे....
मध्यम वर्गीयांकडे जन्म दाखला तसेच शिक्षण प्रमाणपत्र [डिग्री सर्टिफिकेट],ड्रायव्हिंग लायसन्स,पॅन कार्ड [स्थायी खाते संख्या] ई. असल्याने त्यांना जास्त अडचणी येत नाहीत्,परंतु गरीबांची परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे.
याचा परिणाम म्हणजे भारतातील अत्यावश्यक सेवा फारच कमी गरजुंपर्यंत पोहोचु शकतात.

सेंट्रल यु.आय.डी. डाटाबेस...
राष्ट्रीय स्तरावरील भारतीय नागरिकांच्या माहितीचा पहीला संग्रह.
जेव्हा "यु.आय.डी.ए.आय- भारतीय विशेष ओळख प्राधिकरण" हे कोणत्याही भारतीय नागरिकास त्याचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देईल तेव्हा, तो देण्याआधी त्या व्यक्तीची बायोमेट्रीक चाचणी घेतली जाईल म्हणजे त्या व्यक्तीची नोंदणी एकदाच होत आहे याची खात्री होईल.
ही ओळख सेंट्रल सर्वरवर कार्यान्वित असल्याने भारतातील नागरिक भारतात कुठेही आपली ओळख सिद्ध करु शकेल व त्याद्वारे मिळणारे लाभ उठवु शकेल.
याचे अनेक फायदे आहेत...
यु.आय.डी.नंबर हा अर्थव्यवस्थेस वरदान ठरु शकेल.
हा नंबर कल्याणकारी व सामाजिक योजना सर्वसमावेशक होण्यास मदतगार सिद्ध होईल, तर विकासाच्या दिशेने एक झेप घ्यायला भारतीय सामाजिक व आर्थिक पंखास बळकटी येईल.

>देशाच्या प्रत्येक व्यक्तीस नवीन ओळख देणारा एक नंबर- युनिक आयडेंटिफि़केशन अथॉरिटी ऑफ ईंडिया.[यु.आय.डी.ए.आय]
>देशातील नवजात बालकापासुन तर वयोवृद्धास एक विशिष्ट ओळख...
>सार्वजनिक वितरण प्रणाली [पी.डी.एस.] पासुन, आर्थिक देवाण-घेवाणीस सुलभ बनवेल.
>ही योजना मध्यवर्ती सर्वरवर काम करेल.
>याच्याशी जुळलेली प्रत्येक व्यक्ती देशाच्या कोणत्याही कोपर्‍यात याचा लाभ घेऊ शकेल.

बायोमेट्रिक तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय?
ह्या कार्डाचे प्रमुख वैशिष्ठ्य आणि विश्वासार्हता ही या तंत्रज्ञानात सामावलेली आहे.
या अंतर्गत....
१] हाताच्या १० बोटांचे ठसे [फिंगर प्रिंटस]
२] दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांच्या पृथ्थकरणाचा अहवाल् [आय बॉल स्कॅनिंग]
३] व्यक्तीचे छायाचित्र..
४] व्यक्तीचे वैशिष्ट्यपुर्ण/युनिक हस्ताक्षर
या आधारे हे कार्ड बनवण्यात येईल.

यापासुन होणारे काही प्रमुख फायदे:
१] भ्रष्टाचारावर नियंत्रण आणणे शक्य होईल.
२] एकच व्यक्ती वेगवेगळ्या अनेक नावांनी एका योजनेचे अनेकवेळा फायदे घेऊ शकणार नाही.
३] भारतीय नागरिकास ओळखी अभावी ज्या लाभांपसुन वंचित रहावे लागत होते ते अगदी सहजगत्या
मिळतील.
४]यु.आय.डी.नंबर हा अर्थव्यवस्थेस वरदान ठरु शकेल.
५]अनेक सोयी सुविधा विनाअडथळा गरजुपर्यंत पोहोचु शकतील....व्यवहार अतिपारदर्शक होतील.
६]संरक्षण यंत्रणेलाही मोलाची मदत....
यामुळे भारतात बाहेरुन होणार्‍या बेकायदेशीर घुसखोरीस आट्काव होउ शकेल आणि दहशतवादी कारवायांना आळा बसु शकेल.

प्रमुख वैशिष्ट्ये:
१]हा नंबर व्ही.आय.पी. नसेल.
म्हणजे पहीला नंबर कोणालाही मिळु शकतो...
[जसे जनगणनेसमयी भारताच्या प्रथम नागरीकाचा मान राष्ट्रपतीस मिळतो.....तसे यात काही नसुन भारतातील कोणत्याही नागरीकास हा क्रमांक मिळु शकतो.]
२] हा नंबर सर्वसमानतेचं प्रतीक असेल....सर्वसामान्य व खास माणसांमध्ये समान असेल.
३] हा क्रमांक १२ आकडी असेल....यात एकही अक्षर नसेल.
४] पुढील २०० वर्षांच्या लोकसंख्येस ध्यानात ठेवुन ही योजना बनवली गेली आहे. यांत १०० अब्ज क्रमांक बनवण्याची तरतुद असुन सर्व क्रमांक एका 'सॉफ्टवेअर रँडंम जनरेटर' वर बनवले जातील.
५]आपल्याला पैसे काढण्यासाठी बँकेतच जाण्याची आवश्यकता नाही.[अगदी किराणादुकानातुनही पैसे काढता येईल....हे शक्य होईल मायक्रो अ‍ॅटोमेटेड टेलरिंग मशीन यंत्रणे द्वारे....]
येत्या काळात रेल्वे तिकिट/सिनेमा तिकिट ही मिळु शकेल.

या प्रकल्पाच्या खर्चावर कोणत्याही मर्यादा लादण्यात आलेल्या नाहीत.....तसेच कोणतीही राजकीय व्यक्ती किंवा राजकीय पक्ष या प्रकल्पात हस्तक्षेप करु शकणार नाही.

demo card

कार्डची संकल्पना [सांकेतिक खुणा - त्यांचे अर्थ]::

# : भारतीय यु.आय.डी. कार्ड धारक
* : अनिवासी भारतीय [NRI]
// : भारतातील परदेशी दुतावासात असलेल्या कर्मचार्‍यांसाठी
= : परदेशी पर्यटक्/तात्पुरता भारतात आलेले
*/ : भारतीय उद्योगांत नोकरीत असलेल्या परकीयांसाठी

0091 : भारताची आंतरराष्ट्रीय निर्देशक संख्या
0011 : राज्य निर्देशक संख्या
0000 : जिल्हा निर्देशक संख्या

कार्ड वर कोड कशाप्रकारे असेल...

# 0091 0011 0000 **** **** **** : भारतीय नागरीक
* 0001 0212 0000 **** **** **** : अनिवासी भारतीय
// 0001 0212 0000 **** **** **** : दुतावासातील परदेशी कर्मचारी
= 0001 0011 0000 **** **** **** : परदेशी पर्यटक्/तात्पुरता भारतात आलेले
*/ 0001 0032 0000 **** **** **** : भारतीय उद्योगांत नोकरीत असलेल्या परकीयांसाठी

------------------------------------------------------------------------------------------------
0001 : अनिवासी भारतीयांस त्यांच्या देशाचा निर्देशांक
0000 : भारताच्या राज्याचा निर्देशांक [अनिवासी भारतीयांसाठी]

भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाद्वारे मिळणारे हे कार्ड बहूउद्देशीय आहे...ते कसे?

१]डेबिट्/क्रेडिट कार्डाप्रमाणे वापर....
२] भारतीय्/परकीय कोणत्याही प्रकारचे चलन बाळगण्याची आवश्यकता नाही...[भारतात]
३]फक्त जामिनदार्[गॅरंटर] आणि स्वतःचे कार्ड स्वाईप करुन बँकेत खाते ऊघडु शकाल...[कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता नाही.]
४]राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या पगारासाठी कंत्राटदारावर अवलंबुन रहायची गरज उरणार नाही...कंत्राटदाराकडे फक्त यु.आय.डी. नंबर नोंदवा आणि पगार बँकेत जमा होईल.
५]नोकरीवर हजर होताना फक्त यु.आय.डी.कोड टाकल्यावर त्या व्यक्तीचे पुर्ण रेकॉर्ड तिथे अद्ययावत होईल.
६]प्राप्ती कर भरताना होणारा जाच टळुन फक्त यु.आय.डी. कोड च्या सहाय्याने एल.आय.सी.,८०-जी आणि ईतर करसवलती कापुन कराची रक्कम आपोआप आपल्या खात्यातुन वळती[डिडक्शन] होईल.
यामुळे सरकारचे हजारो कोटी रुपये व्याज वाचेल...तो फायदा फिरुन आपल्यालाच होईल.
७]या कार्डावरच ड्रायव्हिंग लायसन्स चेही काम होईल....त्यासाठी गाड्यांचे चिह्न वापरले जातील.
उदा.पांढरी कार-खासगी वाहन चालक परवाना
पिवळी कार-भाडेतत्वावरील्[टॅक्सी] चालक परवाना...
८]सर्वात महत्वाचे.....निवड्णुकीच्या काळात कार्डधारक भारतात कुठेही असला,तरीही तो मतदान करु शकतो...त्याला त्याच्या कार्डच्या सहाय्याने त्याच्या भागातील सर्व उमेदवारांची यादी कोणत्याही वोटिंग मशीन वर दिसु शकतील व याद्वारे तो मतदान करु शकेल..
९]यु.आय.डी. कार्डशिवाय कुठ्ल्याही प्रकारचे मिळकतीचे [प्रॉपर्टीचे] व्यवहार होऊ शकणार नाहीत...यामुळे काळा पैसा दडवणे अशक्य होईल.
१०]प्रॉपर्टी नसलेल्यास अनुदान...व असलेल्यास विशेष कर आकारण्यात येतील.
११]वीजबिल्,पाणीपट्टी,घरपट्टी ई. आपोआप आपल्या खात्यातुन वळते करण्यात येतील.

baba

२०११ पासुन ह्या कार्डाच्या वितरणास सुरवात होईल आणि २०१२ पर्यंत २००० गावांत ही योजना अंमलात येईल...
या योजनेसाठी जुलै २००९च्या बजेट मध्ये १२० कोटी तर सध्याच्या बजेट मध्ये १९०० कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे.(यापुर्वी मिपा वर प्रकाशित)

Comments

स्तुत्य

अत्यंत स्तुत्य उपक्रम. निलेकणी यांची नियुक्ती हा योग्य निर्णय आहे हेच यावरून सिद्ध होते.

नेहेमी प्रशासनाच्या नावाने खडे फोडणे चालूच असते त्यात नवीन काही नाही. कधीकधी अशी एखादी बातमी म्हणजे ४०-४२ तपमानात एखादी थंड हवेची झुळूक वाटते.

--

अतिशय चांगली योजना

योजना अतिशय चांगली आहे. या योजनेची ओळख करुन देणारा लेखही चांगला झाला आहे.

या योजनेला खर्चाची मर्यादा नाही. यात राजकीय हस्तक्षेपाला वाव नाही. आणि नंदन नीलकेणी सारखी व्यक्ती ह्या प्रकल्पाचे संचालन करते आहे. या गोष्टी या योजनेच्या जमेच्या बाजू ठराव्यात.

??

हा लेख माहितीपूर्ण आहे. आतापर्यंत या प्रयत्वाबद्दल मी उदासिन होतो. पण हे वाचताच उत्सुकता चाळवली.
दिलेल्या माहितीचा संदर्भ दिसत नाही. http://uidai.gov.in/ या ठिकाणी जाऊन पाहिले तर लेखात दिलेली माहिती पटकन नजरेस पडली नाही.

पूर्वी असे वाचले होते (वर्तमानपत्रात, नेमका संदर्भ नाही) की हे कार्ड लोकांना पुरावा म्हणून वापरता येणार नाही. वोटर्स आयडेंटी कार्डचेही असेच काहीसे म्हणणे होते. तेव्हा तसलाच एक प्रयत्न असणार असे वाटले होते. नंदन निलेकणी यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नच नाही पण याचे भविष्य केवळ त्यांच्या कार्यक्षमतेवर राहणार नाही हे देखिल नक्की.

युरोपात/अमेरिकेत अशा पद्धतीचे बायोमेट्रिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न नागरिकांनी विरोध केल्यामुळे मोडले होते. भारतात विरोधाचा वासही अजून येत नाही. पण तो कधी ही अचानक उफळून येऊ शकतो. (उदा. 'बाहेरच्यांचे' कार्ड बनता कामा नये. बनवल्यास आम्ही अधिकार्‍यांना मारहाण करू. अशी भूमिका सहज घेता येते.).

एकंदर दिलेले पैसे १९०० (कोटी) + हे यासाठी तोकडे वाटतात. (दर डोई १९ रु.) काही जण अंदाज करत होती की याची किंमत दर डोई १५०० रु. पर्यंत जाईल. (परत आठवणीवर आधारलेले वाचन हाच संदर्भ.) माझ्या मते हा आकडा कदाचित थोडा कमी असेल पण फार नाही. भारतात जन्म दर १००० तिसाच्या घरात आहे. त्यामुळे ३ कोटी कार्डे दरवर्षी म्हणजे साधारण ३००० कोटी वर्षाला खर्च करत रहावे लागणार आहेत.

आता त्यासोबतीची माहिती. ही माहिती जर जात/उत्मन्न यासंबधीची असेल तर त्यासाठी योग्य पुराव्यांशिवाय करता येणार नाही. लोकांचे हितसंबंध लक्षात घेता त्यांचा खोटी माहिती देण्याचा कल कमी असणार नाही. वरील लेखात यावर कशी मात केली जाईल यावर चर्चा नाही. संकेत स्थळात तर नाहीच नाही.

याशिवाय एका माणसाने दोन कार्ड काढणे (काही सवलती मिळवण्यासाठी, थोडेसे नाव बदलून), काही जणांनी ही न काढणे व त्याचा फायदा घेऊन तिसर्‍यानेच ती काढणे व सवलती मिळवणे. हे गैरप्रकारही रोखण्याची खर्चिक यंत्रणा राहिली पाहिजे. संगणक वापरून बायोमेट्रीच्या माहितीचा वापर करून हे सैद्धांतिक पातळीवर शक्य असले तरी सध्याचे उपलब्ध तंत्रज्ञान बघता अशक्य वाटते. यासाती हे काय करणार आहेत याबद्दल वाचता आले नाही.

हे कार्ड दाखवल्यावर नोकरी देणार्‍या कंपनीला सर्व माहिती मिळणार असेल तर माहिती खाजगी राहण्याचा प्रश्नच राहत नाही. हे रास्त आहे का?

प्यान दिल्यावरही म्यापिन लागणार्‍या सरकारी यंत्रणेस हे कितपत भावेल? (का एकाच वेळी पुरावा म्हणून हे कार्ड, विजेचे वा टेलिफोनचे बिल, पासपोर्ट, प्यान, रेशनकार्ड असे सगळेच मागतील?).

लेखात दिलेली वैशिष्टे ही क्रेडिट कार्ड मोबाईल कंपनीच्या जाहिरातीतून आल्यासारखी वाटतात.

इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन मधून कुठच्याही ठिकाणाहून मतदान करता येणे हे जरा अतीच झाले.

भारतातील एकंदर व्यवस्था पाहिल्यावर एवढी मोठी उडी घेणे मला अती वाटते. बायोमेट्रीत कुठेतरी गैर आहे असेही वाटते.

बघुया काय होते ते.

प्रमोद

धन्यवाद...प्रमोदजी,,,!!

आपल्या शंकांचे निरसन् करायचा प्रयत्न...

प्रमोद सहस्त्रबुद्धे जी आपल्या प्रतिसादाचा विचार् केला...
तसेच मी ह्या लेखात अधिकृत रित्या जाहीर् झालेली माहीती दिली आहे..
निलेकणीजी यानी दिलेल्या माहितीवर आधारितच हा लेखप्रपंच आहे.
[हे संकेतस्थळावर नाही म्हणुन ह्या माहितीला आपण संदर्भहीन किंवा अविश्वसनीय समजु नये.].

ह्या कार्डात जातीचा उल्लेख नाहीच मुळी...त्यामुळे ती चिंता नाही...आणि ही खरच अभिनंदनीय् बाब आहे..
उत्पन्नाच्या बाबतीत् म्हणाल् तर त्याबाबत मलाही प्रश्न् आहेच...पण त्यावर पर्याय् काढण्याची क्षमता निलेकणींत् आहे...

याशिवाय एका माणसाने दोन कार्ड काढणे (काही सवलती मिळवण्यासाठी, थोडेसे नाव बदलून), काही जणांनी ही न काढणे व त्याचा फायदा घेऊन तिसर्‍यानेच ती काढणे व सवलती मिळवणे. हे गैरप्रकारही रोखण्याची खर्चिक यंत्रणा राहिली पाहिजे. संगणक वापरून बायोमेट्रीच्या माहितीचा वापर करून हे सैद्धांतिक पातळीवर शक्य असले तरी सध्याचे उपलब्ध तंत्रज्ञान बघता अशक्य वाटते. यासाती हे काय करणार आहेत याबद्दल वाचता आले नाही.(ईति प्रमोद्जी)

हे कार्ड न काढण्याचे काही कारण मला दिसत् नाही...कारण् जर एवढ्या सुविधा मिळ्नार असतील...आणि त्या कार्ड मुळे अनेक डोकेदुखी जाउन अनेक् व्यवहार सुरळीत होणार आहेत..

आणि आपण वाचलेच आहे कि ह्या प्रकल्पावर कोणाचेही(राजकीय पुढारी)वर्चस्व राहनार नाही...तसेच खर्चावरही बंधन नाही...आणि निलेकणींवर् माझ्यासारखा आपलाही विश्वास सदर् प्रतिसादातुन प्रकट झालायच. आणि हा प्रकल्प बायोमॅट्रिक पद्धतीचा वापर करुन यशस्वी करुन् दाखवण्यासाठीच एका आयटी दिग्गजाची नेमणुक् करण्यात आली आहे...आपण् त्यांच्यावर् टा़कलेला विश्वास ते नक्कि सार्थ करतील्...
आणि निश्चितच बायोमॅट्रिक पद्धतीचा वापर असल्याने एका माणसाने नाव बदलुन किंवा एकाच्या जागी दुसर्‍याने कार्ड बनवुन दोन कार्डांचा लाभ एकट्याने घेणे ही केवळ् अशक्य गोष्ट् वाटते...कारण बायोमेट्रिक माहितीचे वैशिष्ठ्य तिच्या एकमेवाद्वितीयतेत् आहे...

इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन मधून कुठच्याही ठिकाणाहून मतदान करता येणे हे जरा अतीच झाले.(ईति प्रमोद्जी)

आपण् आजकाल बँकेच्या एटीएम चा वापर सर्रास् करु लागलोय....ऑनलाईन व्यवहार् करु लागलोय्..त्याच् धर्तीवर् ही संकल्पना अस्तित्वात् येईल्.
ह्या काळात मला ह्या शंकेत काही तथ्य जाणवत् नाही...

असो मी पण् ह्या सर्व स्वप्नवत वाटणार्‍या सुविधा देणार्‍या कार्डची वाट पाहतोय..

आणि पहिल्या काही पॅरा मधे वाचलत् त्याप्रमाणे ९३% रक्कम वाया जात आहे त्यावर निर्बंध बसायला निश्चितच मदत होईल मग आपण नक्किच कलामांच्या स्वप्नातील भारत घडवु आणि एक दिवस अमेरिकेला आपल्या ऋणातळी बुडवु....अशी अपेक्षा..

प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी आहे..आपल्या सारख्या सुजाण सहभागातुन तो फुलणार आहे...
या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी मनःपुर्वक शुभेच्छा....!!!!

तुच तुझ्या जिवनाचा शिल्पकार....

शुभेच्छा

तुमच्या तोंडात साखर पडो.
प्रमोद

धन्यवाद...!!!

प्रमोदजी पुनश्च एकवार धन्यवाद...!!!

तुच तुझ्या जिवनाचा शिल्पकार....

माहितीपूर्ण लेख

माहितीपूर्ण लेख, धन्यवाद.

सुंदर लेख.. नीट माहिती..

सुंदर लेख.. नीट माहिती.. बरीच नवी माहिती कळली.
तरीही भारतातील विविध आव्हाने पाहता (सरकारी दिरंगाई, कमी मनुष्यबळ, पोहोचण्यास कठीण असे नागरीक वगैरे) साधारण पुढच्या १० वर्षात हा प्रकल्प पूर्ण झाला तरी हा प्रचंड मोठ बदल असेल असे म्हणावेसे वाटते..
फक्त या मोठ्या काळात अचानक या प्रकल्पाला बस्त्यात न गुंडाळता पोसत रहाण्याची बुद्धी दरम्यानच्या सगळ्या सरकारांना होवो ही सदिच्छा.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर