कालगणना भाग ३

कालगणना भाग ३
या पुर्वी प्रियाली यांनी दीलेल्या चर्चा प्रस्ताव :-मराठी भाषेतील वारांची नावे आणि त्यांची निवड कशी आणि केव्हा केली. (दि. १५०४.२००७)
व त्यावर आलेल्या प्रतिक्रीया मी वाचलेल्या आहेत. त्याच लेखा मुळे मला हया लेखाची प्रेरणा मिळाली आहे.असो या पुर्वी काही लेख कविता मासिकात दीले आहेत,त्या ऎवजी हा उपक्रमचा पर्याय आवडला. कारण अर्थात थेट येण्यारया प्रतीक्रीया व सुचना.असो.आता लेखाकडे वळतो.

वैदीक पध्दत:-

वैदीक काळापासुन ग्रहांच्या गतींचा आभ्यास असावा.श्रीमदभागवातात राजा परीक्षीत शुकांना प्रस्न विचारतात:

काळ म्हणजे काय? त्याचे सूक्ष्मतम आणि महत्तम रुप काय?

शुक सांगतात- काळ हे एक अमूर्त तत्व आहे .विषयांचे रुपंतर(बदलणे) हेच काळाचे स्वरुप आहे, त्याचे निमित्त होणारे कालतत्व स्वत:ला प्रकट करते.ते अव्यत्कातून प्रकट होते.या काळाचा सूक्ष्मतम अंश परमाणू आणि महत्तम अंश ब्रह्माचे आयु(वय)आहे.त्यातील परीमाणे अशी आहेत..
२ परमाणु --१ अणु , ३ अणु--१ त्रसरेणु , ३ त्रसरेणु--१ त्रुटि , १०० त्रुटि--१ वेध , ३ वेध--१ लव ,३ लव-- १ निमेष , ३ निमेष-- १ क्षण ,
५ क्षण--१ काष्टा , १५ काष्टा-- १ लघु , १५ लघु -- १ नाडिका , २ नाडिका-- १ मुहूर्त , ३० मुहूर्त-- १ दिवसरात्र (१५ मुहूर्त- दिवस/रात्र) ,
७ दिवसरात्र-- १ सप्ताह , २ सप्ताह-- १ पक्ष , २ पक्ष-- १ मास , २ मास-- १ ॠतु , ३ ॠतु-- १ अयन , २ अयन--१ वर्ष.
शुकांच्या कालगणने नुसार-एका दिवसरात्र = ३२८०५००००० परमाणु.=८६४०० सेकंद.
(महाभारताच्या मोक्ष पर्वात अध्याय २३१ कालगणना आहे.१५ निमेष--१ काष्टा ,३० काष्टा--१ कला , ३० कला-- १ मुहूर्त , ३० मुहूर्त-- १ दिवसरात्र मात्र दोन्ही गणनेत फ़रक आहे.)
दिवस/वार:-
दिवसाचे होरे २४ असतात. पॄथ्वीचा जो भाग १२ होरा (१२ तास) सूर्यासमोर असतो तो अह आणि पाठी मागे असतो ती रात्र ( अहो/ रात्र)
आता आपणाला माहीत आहे पॄथ्वी आपल्या आसा भोवती दर तासाला १६०० की.मी. या गतीने फ़िरते त्यासाठी तीला २४ तास लागतात. पॄथ्वी दर तासाला १ लक्ष कि.मी.वेगाने सूर्याभोवती फ़ेरी पुर्ण करते. पॄथ्वीचे १ अंश भ्रमण सौर दिन.
पॄथ्वीपासुनच्या ग्रहांच्या अंतरानुसार ग्रहांचे स्थानक्रम असावेत. जसे शनि,गुरु,मंगळ,सुर्य,शुक्र,बुध,चंद्र यात चंद्र सर्वात जवळ तर शनि सर्वात दूर आहे.या मध्ये सातही ग्रह एकेका होराचे(तासाचे)अधीपती असतात असे मानले जाते. नंतरच्या दिवसाला पहिल्या तासाच्या अधिपतीचे नांव दिले आहे.सॄष्टीची सुर्या बद्दलची महत्त्ता लक्षात घेउन सूर्यवार/भोमवार/रविवार पहीला दिवस मानला.
(धोंडोपंत यांनी १६/०४/२००७ वारांची नांवे वरील पद्धतीने EXPLAIN केली आहेत.ती अशी:-
शनीवारी पहिला होरा (एक तास) शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रविचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन् वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा.इथे २४ तास पूर्ण झाले.आता दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील म्हणजे रविच्या होर्‍याने. म्हणून शनिवार नंतर रविवार येतो)
तिथी:-
चांद्र दिवसाला तिथी म्हणतात. जसे एकादशी,पोर्णिमा,चतुर्थी,अमावस्या.आजच्या परीभाषेत पृथ्वी भोवती चंद्राचे १२ अंश भ्रमणाला तिथी म्हणता येइल.
पक्ष:-
आजच्या परीभाषेत चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो तेव्हा अमवस्या असते. या स्थितीला शून्य अंश मानून येथुन १२ अंशाच्या गतीने प्रवास करत जेव्हा चंद्र हा १८० अंश प्रवास करतो तेव्हा पौर्णिमा येते. अश्या प्रकारे प्रतिपदे पासुन पौर्णिमे पर्यंत शुक्ल पक्ष व प्रतिपदे पासुन अमवस्येपर्यंत कृष्णपक्ष असे वैदिक काळापासुन सुरु आहे.
मास:-
२७ नक्षत्रांचे -१ अश्विनी २भरणी ३कॄतिका,रोहीणी,मृग,आर्द्रा,पुनर्वसू,पुष्य,आष्लेशा,मघा,पुर्वाफ़ाल्गुनी,उत्तराफ़ाल्गुनी,हस्त,चित्रा,स्वाती,विशाखा,अनुराधा, ज्येष्टा,मुळ,पूर्वाषाढा,उत्तराषाढा,श्रवण,धनिष्टा,शततारका, पुर्वाभाद्रपदा,२६ उत्तराभाद्रपदा,२७ रेवती. या २७ नक्षत्रांचे प्रत्येकी ४ चरण. (२७*४=१०८) ह्या १०८ भागात ९ भागांची एक या प्रमाणात १२ आकॄतीत (म्हणजे राशीत) रुपांतर केलेली दिसतात. मेष,वृषभ,मिथुन,कर्क,सिंह,कन्या,तुळ,वृश्र्चिक,धनु,मकर,कुंभ,मिन.
या राशींच्या रेखा निश्र्चित केल्या आहेत,त्यांना क्रांती म्हणतात.या क्रांतीरेखा विषववृत्ताच्या उत्तरेस २४ आणि दक्षिणेस २४ असे मानले गेले.या प्रकारे सूर्य ज्या राशीचक्रात येतो त्या क्रांतीचे नांव सौर मासाला दिले जाते.तसेच जे नक्षत्र संपूर्ण महीनाभर सायंकाळापासून प्रात:काळा पर्यंत दिसते तसेच चंद्रमा ज्यांची पुर्णता प्राप्त करतो, त्या नक्षत्राच्या नावाने चांद्रमास ओळखला जातो.ते असे
चित्रा-चैत्र,विशाखा-वैशाख,ज्येष्टा-ज्येष्ट,आषाढा-आषाढ,श्रवण-श्रावण,भाद्रपद-भाद्रपद,अश्विनी-अश्विन,कृतीका-कार्तिक,मृग-मार्गशीर्ष,पुश्य-पौष,मघा-माघ, फ़ाल्गुनी-फ़ाल्गुन.

संर्दभ:-
पंचाग-
कालयात्रा-
भारतीय कालगणना का वैज्ञानिक व वैश्विक स्वरुप- डा. रविप्रकाश आर्य
भारत मे विज्ञान की परंपरा- सुरेश सोनी
क्रमश:
शैलु.

Comments

परमाणू

कालाच्या एककांविषयी डिटेलवार चर्चा आहे.

शुकांच्या कालगणने नुसार-एका दिवसरात्र = ३२८०५००००० परमाणु.=८६४०० सेकंद.

मी खूप लहानपणी याविषयी वाचलं होतं, प्रत्यक्ष एककं दिल्याबद्दल धन्यवाद. एक परमाणु म्हणजे सुमारे २६ मायक्रोसेकंद इतके येतात. अणु म्हणजे ५२. इतके बारीक विभाग करण्याचं कारण काही माहीत आहे का? त्या काळी अणु आणि परमाणुमध्ये फरक करावा लागावा अशी मोजमापं केली गेली होती का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

छान

वा! काळाची बरीचशी एकके माहित नव्हती. साठवून ठेवण्यालायक माहिती.

लहानपणी पाठकरताना रेवती नंतर "अभिजित" नावाचं नक्षत्र पाठ केलं होतं ते हल्ली कुठे दिसत नाहि. लहापणीची जुनी जीर्ण अंकलिपी शोधून काढली त्यातही अभिजीत आहे हल्लीच्या नव्या अंकलिपीत ते गायब आहे. असे का?
शिवाय पुर्वा फाल्गूनी / उत्तरा फाल्गूनीला आम्ही लहानपणी फक्त पुर्वा, उत्तरा असे पाठ केले आहे. नक्की बरोबर काय?

बाकी कालगणनेतील "तृटी, वेध" आदी गोष्टी मराठीत कालगणने साठी न वापरता अन्यत्र वापरली जातात ते केवळ नामसाधर्म्य की अजून काहि?

उपक्रमराव, तेवढं वाचनखुणांच पहा हो. प्लीज
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

फाल्गुनी

पूर्वा फाल्गुनी आनि उत्तरा फल्गुनी हे बरोबर असावे. कारण त्याखेरीज पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा ही पण नक्षत्रे आहेत.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

+१.. मात्र

पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा ही पण नक्षत्रे आहेत.

+१
त्याच बरोबर पुर्वाषाढा / उत्तराषाढा पण आहेत.. मात्र पुर्वा/उत्तरा असे पाठ केलेले आहे. पुर्वाफाल्गुनी वगैरे असे ऐकलेले /पाठ केलेले नाहि म्हणून उत्सुकता आहे
===

नुकतेच काल निर्णय /दाते पंचांग / निर्णयसागर तिन्ही बघितले.. तिघांमधेही पूर्वा/उत्तरा हीच नक्षत्रे दिली आहेत

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

एक गोष्ट कळली नाही

होरा हा शब्द हॉरो या मूळ ग्रीक शब्दावरून आला. त्यानुसार जे १२ होरे केले गेले आणि पुढील कालगणना ही खाल्डियन वगैरे संस्कृतीतून येथे आली. म्हणजे महाभारतकालीन कालगणना आणि आताचे दिवस/वार/ तिथी/पक्ष यांचा आपापसात संबंध नाही असे आहे का?

अजुन थोडी माहिती -

'अभिजित' हे २८वे नक्षत्र मानले जाते, विकीपेडीयावर दिलेल्या माहितीनुसार अभिजित नक्षत्राचा उल्लेख 'अथर्ववेद, तैत्तिरीय संहिता, शतपथ ब्राह्मण' यांत आहे. पंचांगात अभिजित नक्षत्र का नाही याचे स्पष्टिकरण येथे पहा.

माझ्या जुन्या नोंदवहीत मिळालेली राशी + चरण + नक्षत्र यांची एक यादी -

राशी - (चरण) नक्षत्र
------------------------------
मेष - ४ अश्विनी, ४ भरणी, १ कृत्तिका
वृषभ - ३ कृत्तिका, ४ रोहिणी, २ मृगशीर्ष
मिथुन - २ मृगशीर्ष, ४ आर्द्रा, ३ पुनर्वसू
कर्क - १ पुनर्वसू, ४ पुष्य, ४ आश्लेषा
सिंह - ४ मघा, ४ पूर्वा फाल्गुनी, १ उत्तरा फाल्गुनी
कन्या - ३ उत्तरा फाल्गुनी, ४ हस्त, २ चित्रा
तूळ - २ चित्रा, ४ स्वाती, ३ विशाखा
वृश्चिक - १ विशाखा, ४ अनुराधा, ४ ज्येष्ठा
धनू - ४ मूळ, ४ पूर्वाषाढा, १ उत्तराषाढा
मकर - ३ उत्तराषाढा, ४ श्रवण, २ धनिष्ठा
कुंभ - २ धनिष्ठा, ४ शततारका, ३ पूर्वा भाद्रपदा
मीन - १ पूर्वा भाद्रपदा, ४ उत्तर भाद्रपदा, ४ रेवती

अभिजित तारा/नक्षत्र स्थानानुसार धनू राशीत आहे.

ही माहिती कितपत अचूक आहे याविषयी मला थोडी शंका आहे, जर कोणाकडे गो. रा. परांजपे याचे "आकाशदर्शन अ‍ॅटलास" पुस्तक असेल तर त्यातून खात्री करुन् घेता येईल.

शिपाईगडी

वा!

वा! छान माहिती.. अनेक आभार शिपाईगडी

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

३ भाग वाचले.

तिन्ही भाग वाचले.
आवडत आहे हा विषय जरा पुढील भाग लवकर लिहा प्लीज्...

* थोडी वाट पाहण्याची सवय जास्त नाही आहे त्यामुळे असे होत आहे.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

कालगणना -भाग ३

सर्व प्रतीक्रीयांना सोबत उत्तरे देत आहे(माफ़ी मागुन)

श्री राजेशघासकडवी

एक परमाणु म्हणजे सुमारे २६ मायक्रोसेकंद इतके येतात. अणु म्हणजे ५२. इतके बारीक विभाग करण्याचं कारण काही माहीत आहे का?

--धन्यवाद. माझे गणित कच्चे आहे कदाचित जास्त येतील.

त्या काळी अणु आणि परमाणुमध्ये फरक करावा लागावा अशी मोजमापं केली गेली होती का?

--अणु आणि परमाणु हे या लेखात काळाशी संबघीत आहे.(atom- proton, neutron, electron बद्दल आपण म्हणता आहात का? बरयाचदा एकच शब्द वेगळ्या संर्दभात वेगवेगळया अर्थाचा आढळतो.)

ऋषिकेश
लहानपणी पाठकरताना रेवती नंतर "अभिजित"...
(शिपाईगडी यांचे उत्तराशी
+१)

अभिजित' हे २८वे नक्षत्र मानले जाते, विकीपेडीयावर दिलेल्या माहितीनुसार अभिजित नक्षत्राचा उल्लेख 'अथर्ववेद, तैत्तिरीय संहिता, शतपथ ब्राह्मण' यांत आहे. पंचांगात अभिजित नक्षत्र का नाही ?
+१.
--अभिजित' हे मी पण पाठ केल्याचे स्मरते.

बाकी कालगणनेतील "तृटी, वेध" आदी गोष्टी मराठीत कालगणने साठी न वापरता अन्यत्र वापरली जातात ते केवळ नामसाधर्म्य की अजून काहि?

--लेखात मांडतो.

प्रियाली

होरा हा शब्द हॉरो या मूळ ग्रीक शब्दावरून आला का?

--होरा हा शब्द अह-रात्र पासुन आहे.हॉरो या मूळ ग्रीक शब्दा(व होरास्कोप)बद्दल माझी माहीती अपुर्ण आहे हा शब्द पुर्वीच्या चर्चेतही आहेच.

राजे

तिन्ही भाग वाचले

--ध्यन्यवाद.पुढील भाग लवकर लीहतो.पोट्यापाण्याच्या सोइतुन थोडी शांतता मिळायला हवी.

शैलु.

अहोरात्र

अहोरात्र शब्दाचा आणि होरा या शब्दाचा काहीएक परस्परसंबंध नाही. वारांची नावे या चर्चेतही हे स्पष्ट झाले आहे.

काळाचं एकक

--अणु आणि परमाणु हे या लेखात काळाशी संबघीत आहे.
मी काळ या अर्थानेच म्हणत होतो. म्हणूनच मला आश्चर्य वाटलं की इतक्या लहान एककाची (२६ मायक्रोसेकंदांची) गरज कशी पडली? आपल्या दैनंदिन जीवनात साधारण सेकंद हे एकक पुरेसं लहान होतं. शास्त्रज्ञांना अधिक बारीक एककांची गरज पडते - ती त्या काळांनी मोजण्याइतक्या जलद घटना मोजण्यासाठी. म्हणून मूळ प्रश्न विचारला होता.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

काळाचं एकक

मी काळ या अर्थानेच म्हणत होतो. म्हणूनच मला आश्चर्य वाटलं की इतक्या लहान एककाची (२६ मायक्रोसेकंदांची) गरज कशी पडली?

-होय, तसेच मी पुढील लेखात कोटी, अज्ब ,.... खर्व इ. देणार आहे. त्या ही बाबतीत हा प्रश्न येउ शकतो.ही गरज होती की प्रवॄती आपल्याकडे जाणणे हे साधकाची साधनेचा भाग मानतात अणु-पासुन-ब्रम्हांड जाणणे.(अनंत कोटी ब्रम्हांड नायक) यात मी चुकू शकतो

आकडेवारी

आकडेवारी चांगली. वाचतो आहे.

("वैदिक" आणि "श्रीमद्भागवत" यांच्यामध्ये फरक करावा असे वाटते. विशेषतः ऐतिहासिक संदर्भचर्चेमध्ये. नाहीतर कुठला काळ? अशी शंका उत्पन्न होते.)

आकडेवारी

("वैदिक" आणि "श्रीमद्भागवत" यांच्यामध्ये फरक करावा असे वाटते. विशेषतः ऐतिहासिक संदर्भचर्चेमध्ये. नाहीतर कुठला काळ? अशी शंका उत्पन्न होते.)

४ वेद, ६ उपवेद व यावर आधारीत उपनिषद, दार्शनिक, पुराणे (श्रीमद्भागवत..) असे म्हणणे सयुक्त वाटते. . चु.भू.द्या.घ्या

विज्ञान आणि सायन्स

गीता वगैरे संस्कृत ग्रंथात 'विज्ञान' या शब्दाचा कदाचित वेगळा अर्थ होत असावा, पण आजकाल रूढ असलेल्या मराठी भाषेत 'विज्ञान' हा शब्द 'सायन्स' या अर्थाने उपयोगात आणला जातो. आपल्याला हाच अर्थ अभिप्रेत असेल तर एक सूचना करावीशी वाटते.
स्टीफन हॉकिंग आणि सुरेश सोनी या दोघांचा एकत्र केलेला उल्लेख मला पहिल्या भागातच खटकला होता. आता आपण ती चूक सुधारली आहे. "आमच्या पूर्वजांना सग्गळं कांही ठाऊक होतं" अशा हट्टाग्रहाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या सुरेश सोनी यांच्या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग करणे हा सायन्सवर अन्याय आहे. उद्या कोणीतरी या लेखाचासुध्दा संदर्भ देईल. तेंव्हा 'विज्ञान' हा विषय कृपया मथळ्यातून काढून टाकून 'धर्म', 'माहिती', 'इतिहास', 'अनुभव' वगैरे शिल्लक ठेवावे. या लेखमालिकेत विस्तारपूर्वक आणि उपयुक्त माहिती दिली आहे यात शंका नाही. पण विज्ञानाचा (सायन्सचा) अभ्यासक या दृष्टीकोनातून पाहतांना मला तरी या लेखमालिकेत कोठे तर्काधिष्ठित विज्ञान(सायन्स) दिसत नाही. वाटल्यास मनोरंजन, कल्पनाविलास वगैरे विषय मथळ्याला जोडायला हरकत नाही.

उपक्रम ने या बाबतीत आपले स्पष्ट धोरण ठरवावे अशी विनंती आहे. प्राचीन काळातील तथाकथित महान वैज्ञानिक प्रगतीचे गोडवे गाता गाता आपण वर्तमानकाळातील पिढीची दिशाभूल करू नये एवढीच इच्छा आहे.

कालगणना -भाग ३

श्री राजेशघासकडवी

मी काळ या अर्थानेच म्हणत होतो. म्हणूनच मला आश्चर्य वाटलं की इतक्या लहान एककाची (२६ मायक्रोसेकंदांची) गरज कशी पडली?

-होय, तसेच मी पुढील लेखात कोटी, अज्ब ,.... खर्व इ. देणार आहे. त्या ही बाबतीत हा प्रश्न येउ शकतो.ही गरज होती की प्रवॄती आपल्याकडे जाणणे हे साधकाची साधनेचा भाग मानतात अणु-पासुन-ब्रम्हांड जाणणे.(अनंत कोटी ब्रम्हांड नायक) यात मी चुकू शकतो.

श्री.धनंजय

("वैदिक" आणि "श्रीमद्भागवत" यांच्यामध्ये फरक करावा असे वाटते.

४ वेद, ६ उपवेद व यावर आधारीत उपनिषद, दार्शनिक, पुराणे (श्रीमद्भागवत..) असे म्हणणे सयुक्त वाटते.

श्री आनंद घारे

गीता वगैरे संस्कृत ग्रंथात 'विज्ञान' या शब्दाचा कदाचित वेगळा अर्थ होत असावा.
स्टीफन हॉकिंग आणि सुरेश सोनी या दोघांचा एकत्र केलेला उल्लेख मला पहिल्या भागातच खटकला होतातेंव्हा 'विज्ञान' हा विषय कृपया मथळ्यातून काढून टाकून 'धर्म', 'माहिती', 'इतिहास', 'अनुभव' वगैरे शिल्लक ठेवावे. या लेखमालिकेत विस्तारपूर्वक आणि उपयुक्त माहिती दिली आहे यात शंका नाही. पण विज्ञानाचा (सायन्सचा) अभ्यासक या दृष्टीकोनातून पाहतांना मला तरी या लेखमालिकेत कोठे तर्काधिष्ठित विज्ञान(सायन्स) दिसत नाही. वाटल्यास मनोरंजन, कल्पनाविलास वगैरे विषय मथळ्याला जोडायला हरकत नाही.
उपक्रम ने या बाबतीत आपले स्पष्ट धोरण ठरवावे अशी विनंती आहे. प्राचीन काळातील तथाकथित महान वैज्ञानिक प्रगतीचे गोडवे गाता गाता आपण वर्तमानकाळातील पिढीची दिशाभूल करू नये एवढीच इच्छा आहे.

आपण विज्ञानाचे (सायन्सचा) अभ्यासक आहात.लेख वाचत आहत.आपण तसेच अनेक विद्वान वाचत आहेत व प्रतीक्रीया देत आहेत. हे मी भाग्य समजतो. धन्यवाद २ उपक्रम.सर्वांच्या प्रतीक्रीया मी नेहमी गांर्भीयाने घेत आहे.

१)गीता वगैरे संस्कृत ग्रंथात 'विज्ञान' या शब्दाचा कदाचित वेगळा अर्थ होत असावा.

-लेखात गीता, विज्ञान इ..चा.मी अत्यंत जाणिव पुर्वक उल्लेख केलेला नाही.

२)विज्ञान' हा विषय कृपया मथळ्यातून काढून टाकून 'धर्म', 'माहिती', 'इतिहास', 'अनुभव' वगैरे शिल्लक ठेवावे

-हरकत नाही.मी आग्रही नाही.हा विषय गणणा आहे,पुढे बिजगणित हा विस्तार आहेच.

३)विज्ञानाचा (सायन्सचा) अभ्यासक या दृष्टीकोनातून पाहतांना मला तरी या लेखमालिकेत कोठे तर्काधिष्ठित विज्ञान(सायन्स) दिसत नाही.

-पुढील लेखात मी देण्यारया संर्दभाचे अवतरण देत आहे--प्रसिद्ध वैज्ञानिक जन्म १९३४ मृत्यु १९९६ U.S.
कार्ल सेगन यांनी आपल्या COSMOS पुस्तकात(पृ. २१४) म्हटले आहे- विश्वा मधे प्राचिन भारतीय हींदु धर्म असा आहे की , ज्याने काळाचे सूक्ष्मतमा पासुन बृहत्तमापर्यंत मापन केलेले आहे.सामान्य दिवस रात्र धरुन ८ अब्ज ६४ कोटी वर्षांच्या ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीची गणणा केली आहे.ही गणना अधुनिक खगोल मापनाच्या अगदी जवळ पर्य़त पोहचते.

ही गणणा ग्रहीय गणणे वर आधारीत नसावी का?यात तर्काधिष्ठित विज्ञान(सायन्स) दिसत नाही?

४)वाटल्यास मनोरंजन, कल्पनाविलास वगैरे विषय मथळ्याला जोडायला हरकत नाही.

-मनोरंजन, कल्पनाविलास वगैरे . मी स्वत: यापुर्विचे व आताचेही लेख चर्चा मनोरंजन, कल्पनाविलास वगैरे. मानत नाही .

वाचकांना विनंती आहे की अशी धारणा असल्यास अगोदरच कळवावे.

५)उपक्रम ने या बाबतीत आपले स्पष्ट धोरण ठरवावे अशी विनंती आहे. प्राचीन काळातील तथाकथित महान वैज्ञानिक प्रगतीचे गोडवे गाता गाता आपण वर्तमानकाळातील पिढीची दिशाभूल करू नये एवढीच इच्छा आहे.

लेखात कोणाचेही गोडवे गायलेले नाही. प्राचीन काळातील तसेच आत्ताच्या वैज्ञानिकांचे.लेखातुन दिशभूल होउ नये ही माझीपण इच्छा आहे.

मला प्राचीन काळातील तसेच आत्ताच्या वैज्ञानिकांचे एकमेकांशी पुरकत्व अपेक्षीत आहे. ते देता येते का ते पाहतो.

वाचकांना विनंती आहे की,मार्गदर्शन करत राहवे. मी आगही नसुन अभ्यासक/साधक/जिज्ञासु आहे.

शैलु.

मुळीसुध्दा नाही

विज्ञानाचा (सायन्सचा) अभ्यासक या दृष्टीकोनातून पाहतांना मला तरी या लेखमालिकेत कोठे तर्काधिष्ठित विज्ञान(सायन्स) दिसत नाही.

-पुढील लेखात मी देण्यारया संर्दभाचे अवतरण देत आहे--प्रसिद्ध वैज्ञानिक जन्म १९३४ मृत्यु १९९६ U.S.
कार्ल सेगन यांनी आपल्या COSMOS पुस्तकात(पृ. २१४) म्हटले आहे- विश्वा मधे प्राचिन भारतीय हींदु धर्म असा आहे की , ज्याने काळाचे सूक्ष्मतमा पासुन बृहत्तमापर्यंत मापन केलेले आहे.सामान्य दिवस रात्र धरुन ८ अब्ज ६४ कोटी वर्षांच्या ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीची गणणा केली आहे.ही गणना अधुनिक खगोल मापनाच्या अगदी जवळ पर्य़त पोहचते.

ही गणणा ग्रहीय गणणे वर आधारीत नसावी का?यात तर्काधिष्ठित विज्ञान(सायन्स) दिसत नाही?

अमक्यातमक्याने काय म्हंटले याला सायन्सच्या जगात महत्व नसते. धर्म, संस्कृती वगैरेमध्ये ते चालते. कार्ल सेगनच्या नावाने जे काही आपण उध्दृत केले आहे ते त्याने कोणत्या संदर्भात लिहिले आहे? त्याने स्वतः तरी ते मान्य केले होते का आणि कशाच्या आधारावर ते मान्य केले होते? त्याने केलेल्या कोणत्याही वैज्ञानिक संशोधनात या आकडेवारीचा आधार त्याने घेतला आहे का? ते विधान आपल्याला स्वतःला सयुक्तिक वाटते का? आपण या ८ अब्ज ६४ कोटीचा हिशोब सांगू शकता का? त्याच्या मागचे गणित आपल्याला ठाऊक आहे का? असल्यास पुढील लेखात ते विशद करून सांगावे.
आपल्या तीनही लेखात मला असे काही दिसलेले नाही. त्यात खूप चांगली माहिती आहे, पण त्याच्यामागची तत्वे आणि तर्कसंगती नाही. म्हणून असल्या लेखाला विज्ञान म्हणता येणार नाही असे माझे मत आहे.
माझ्या माहितीनुसार कार्ल सेगन याचे कॉसमॉस हे पुस्तक साहित्यप्रकारात मोडते. तो वैज्ञानिक शोधनिबंध नाही. त्यातला एकादा उतारा पुरावा म्हणून दाखवणे हे जयंत नारळीकरांनी लिहिलेल्या विज्ञानकथा वाचून त्या सत्यकथा आहेत असे म्हणण्यासारखे आहे, किंवा श्रीमान योगी कादंबरीमधला एकादा संवाद वाचून तो संवाद प्रत्यक्ष घडला होता असे ठामपणे प्रतिपादन केल्यासारखे आहे.

ही गणणा ग्रहीय गणणे वर आधारीत नसावी का?

अमक्यातमक्याने काय म्हंटले याला सायन्सच्या जगात महत्व नसते......

तरीही मुख्य प्रश्न राहतोच की?

ही गणणा ग्रहीय गणणे वर आधारीत नसावी का? असो खाली माझ्या पद्धतीने खुलासा देत आहे.

मी पुन्हा सांगतो लेख कोणत्याही मथळ्याखाली देण्यास हरकत नाही.मी आग्रही नाही.

माझ्या माहितीनुसार कार्ल सेगन याचे कॉसमॉस हे पुस्तक साहित्यप्रकारात मोडते. तो वैज्ञानिक शोधनिबंध नाही.

यालाही माझी हरकत नाही व अधिकार पण नाही.कार्ल सेगनची आहे की नाही हा त्याचा व तुमचा प्रश्न-

कार्ल सेगनच्या पुस्तकातील अवतरण देण्याचे कारण व लेखा संर्दभात--

कार्ल सेगनच्या पुस्तकातील अवतरण पुढील लेखात तसेच वरील प्रतीक्रीयेत मी पुरावा म्हणुन दीलेला नाही.( हे आपणास अगोदर सांगायला हवे होते, त्याबद्दल क्षमस्व.)

लेखातील १ दिवसरात्र (१५ मुहूर्त- दिवस/रात्र) , ७ दिवसरात्र-- १ सप्ताह , २ सप्ताह-- १ पक्ष , २ पक्ष-- १ मास , २ मास-- १ ॠतु , ३ ॠतु-- १ अयन , २ अयन--१ वर्ष.चित्रा-चैत्र,विशाखा-वैशाख,ज्येष्टा-ज्येष्ट,आषाढा-आषाढ,श्रवण-श्रावण,भाद्रपद-भाद्रपद,अश्विनी-अश्विन,कृतीका-कार्तिक,मृग-मार्गशीर्ष,पुश्य-पौष,मघा-माघ, फ़ाल्गुनी-फ़ाल्गुन ही गणणा वैदीक कालखंडा पासुन असुन ती वापरण्याची परंपरा आपल्याकडे दिसते.{आपण उल्लेख केलेल्या गिता (हा सर्वमान्य ग्रंथ आहे यामताशी अनेक विचारवंत/तत्वज्ञ सहमत आहेत.) ह्या ग्रंथात अघ्याय १० श्लोक ३५ यात मार्गशीर्ष महीन्याचा उल्लेख आहे.)}ही गणना अधुनिक खगोल मापनाच्या अगदी जवळ पर्य़त पोहचते. हे सत्य आपण का नाकारावे.(आपण नाकारत आहात असे मला प्रतिक्रीये वरुन वाटते. चु.भू.द्या.घ्या) कार्ल सेगन कोण हे काही काळ विसरुन

ही गणणा ग्रहीय गणणे वर आधारीत नसावी का? ती अचुकतेच्या जवळ पोहचते की नाही?(प्राचीन काळातील तसेच आत्ताच्या वैज्ञानिकांचे प्रवास/अभ्यास कसा झाला) तो योगायोग होता तर इतका तंतोतत व बरयाच बाबतीत कसा?असे काही उत्तरीत काही उनुत्तरीत शंका माझ्या सारख्याला पडल्या ,

तसे आपणास वाटेल असे मला वाटले,{कारण आपण विज्ञानाचे (सायन्सचे) अभ्यासक आहात}

पण तसे नाही झाले माझ्या कडून योग्य मांडणी झाली नसावी.हा माझा दोष असावा.आपण मात्र कार्ल सेगन व त्याचे कॉसमॉस हे पुस्तक यावरच माझे पार विच्छेदन केले असो.

प्राचीन काळातील वैज्ञानिकांना सर्व माहीत होते असा अट्टहास माझा नाही, तो कोणाचाही असावा असा आग्रह नाही.

पण काहीच माहीत नव्हते सर्व थोतांड असावे/आहे. ही भुमीका सुद्धा (दुराग्रही भुमीका) योग्य नाही.भारतातील अनेकांनी तुलनेने, संशोधनाने ,काहींनी प्रयोगाने अनेक गोष्टी साधार मांडल्या आहेत.त्यातुन येणारे निष्कर्ष सुद्धा अचंबीत करणारे आहेत.हे आपण सर्वांनी मान्य करायला हवे.काही गोष्टी नाही जुळत अपुर्णता आहे, ही गोष्ट सुद्धा मांडणारे मान्य करतात.वैज्ञानिक पण ज्ञानाच्या कक्षा अपुर्ण असुन त्यात मानव प्रगती करत राहील असेच म्हणतात असे मला वाटते.

मला प्राचीन काळातील तसेच आत्ताच्या वैज्ञानिकांचे एकमेकांशी पुरकत्व अपेक्षीत आहे.ते देता येते का ते पाहतो.

मला पडलेले तसेच प्रतिक्रीयेच्या माध्यमातुन पडण्यारया प्रश्नांची मांडणी जमवता येते का ते ती जुळवण्यासाठी अगोदर काही प्रयत्न होते का पाहण्याचा प्रयत्न आहे.व तेच माहीतीच्या रुपात देण्याचा प्रयत्न आहे. इती...

वाचकांना विनंती आहे की,मार्गदर्शन करत राहवे. मी आगही नसुन अभ्यासक/साधक/जिज्ञासु आहे.जास्तीत जास्त प्रतीक्रीया द्याव्यात जेणे करुन प्रेरणा मिळत राहील.

ध्यन्यवाद.पुढील भाग लवकर लीहतो.पोट्यापाण्याच्या सोइतुन थोडी शांतता मिळायला हवी.

शैलु

अभिजित

लहानपणी पाठकरताना रेवती नंतर "अभिजित" नावाचं नक्षत्र पाठ केलं होतं ते हल्ली कुठे दिसत नाहि.

आपल्या कालगणनेमध्ये सूर्याच्या मार्गावरील तारकासमूहांना नावे दिली आहेत्. ती नावे म्हणजे नक्षत्रे. यात अभिजित येत नाही, कारण तो या मार्गावर नाही.

तृटी

जितेंद्रिय पुरुषाच्या पापण्यांच्या उघडझापीला लागणारा वेळ म्हणजे निमिष. निमिषाच्या अर्ध्या भागाला तृटी म्हणतात.
संदर्भः लीलावती पुनर्दशन

नितीन

छान, उत्तम

आपण लिहिल्याप्रमाणे"सामान्य दिवस रात्र धरुन ८ अब्ज ६४ कोटी वर्षांच्या ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीची गणणा केली आहे.ही गणना अधुनिक खगोल मापनाच्या अगदी जवळ पर्य़त पोहचते. ही गणणा ग्रहीय गणणे वर आधारीत नसावी का?यात तर्काधिष्ठित विज्ञान(सायन्स) दिसत नाही?
लेखातील १ दिवसरात्र (१५ मुहूर्त- दिवस/रात्र) , ७ दिवसरात्र-- १ सप्ताह , २ सप्ताह-- १ पक्ष , २ पक्ष-- १ मास , २ मास-- १ ॠतु , ३ ॠतु-- १ अयन , २ अयन--१ वर्ष.चित्रा-चैत्र,विशाखा-वैशाख,ज्येष्टा-ज्येष्ट,आषाढा-आषाढ,श्रवण-श्रावण,भाद्रपद-भाद्रपद,अश्विनी-अश्विन,कृतीका-कार्तिक,मृग-मार्गशीर्ष,पुश्य-पौष,मघा-माघ, फ़ाल्गुनी-फ़ाल्गुन ही गणणा वैदीक कालखंडा पासुन असुन ती वापरण्याची परंपरा आपल्याकडे दिसते.{आपण उल्लेख केलेल्या गिता (हा सर्वमान्य ग्रंथ आहे यामताशी अनेक विचारवंत/तत्वज्ञ सहमत आहेत.) ह्या ग्रंथात अघ्याय १० श्लोक ३५ यात मार्गशीर्ष महीन्याचा उल्लेख आहे.)}ही गणना अधुनिक खगोल मापनाच्या अगदी जवळ पर्य़त पोहचते. हे सत्य आपण का नाकारावे
ही गणणा ग्रहीय गणणे वर आधारीत नसावी का? ती अचुकतेच्या जवळ पोहचते की नाही?"

क्षमा असावी . यात कशाच्या जवळपास काय दिसते हे कोणी तरी मला सांगेल का? माझे अंकगणीत फार म्हणजे फारच कच्चे आहे.

ही गणणा ग्रहीय गणणे वर आधारीत नसावी का?

आज आपण वापरत असलीली सेकंद, मिनीट , तास दिवस, सप्ताह , महीना , वर्ष. हे वैज्ञानिकांच्या निकर्षतुन आहेत.

आपल्या कडील प्राचिन गणना ही त्या गणनेशी जुळते की नाही ?

शैलु

काहीतरीच!

आज आपण वापरत असलीली सेकंद, मिनीट , तास दिवस, सप्ताह , महीना , वर्ष. हे वैज्ञानिकांच्या निकर्षतुन आहेत.

काहीतरीच! ही कालगणनेची एकके आहेत, यांच्यात वैज्ञानिक निष्कर्ष असे काय आहे?

वीत-पुरुष-योजन;
इंच-फूट-मैल;
सेमि-मीटर-किमि;
ही सर्व अंतर मोजायची एकके आहेत. त्यांच्यापैकी कोणत्याही पद्धतीत "वैज्ञानिक निष्कर्ष" असे काय आहे? गुणोत्तर (कन्व्हर्शन फॅक्टर) माहीत असले तर कुठल्याही एककात न्यूटनने शिकवलेली गणिते करता येतात.

आणि न्यूटनची गणितपद्धती माहीत नसली, सिद्धांत माहीत नसले, प्रयोग माहीत नसले, तर पैकी कुठल्याही एककाने तो वैज्ञानिक निष्कर्ष कळत नाही.

एककांचा आणि वैज्ञानिक निष्कर्षांच्या पद्धतीचा निकटचा संबंध तर मुळीच नाही. दूरान्वये काहीतरी संबंध असेल, मला माहीत नाही.

वर तुम्ही म्हणता,

ही गणना वैदीक कालखंडा पासुन असुन ती वापरण्याची परंपरा आपल्याकडे दिसते.

हा "वैदिक कालखंड" कुठला?
[वैदिक परंपरेत तुम्ही महाकाव्ये-पुराणेही घेता. हे ठीक आहे. पुराणे येतात, म्हणजे स्कंदपुराणात गेल्या ५०-१०० वर्षांपूर्वी जोडलेली सत्यनारायणाची कथा येते. म्हणजे वैदिक कालखंड काही हजार वर्षांपूर्वीपासून अगदी हल्लीपर्यंत आहे. अशा प्रकारची संदिग्धता येऊ नये, म्हणून वेदवाङ्मय, उपनिषदे, महाकाव्ये, पुराणे वगैरे वेगळी-वेगळी मानणे सोयीचे पडेल.]

असो. माहिती सांगत आहात, चर्चा घडवत आहात. लेखमाला चालू ठेवण्याबाबत माझे प्रोत्साहन आहे.

ही गणणा ग्रहीय गणणे वर आधारीत नसावी का?

एकंदरीत मथळ्यात् (ह्या श्री आनंद घारेसरांच्या सुचनेला मान देवुन)वैज्ञानिक नसावे हे तुर्तास मान्य करुन पुढचे लीखाण करतो.ते लेख/माहीती कोणत्या मथळ्यात द्यावी. ते आपण ठरवावे.

प्राचीन काळातील वैज्ञानिकांना सर्व माहीत होते असा अट्टहास माझा नाही, तो कोणाचाही असावा असा आग्रह नाही.

पण काहीच माहीत नव्हते सर्व थोतांड असावे/आहे. ही भुमीका सुद्धा (दुराग्रही भुमीका) योग्य नाही.भारतातील अनेकांनी तुलनेने, संशोधनाने ,काहींनी प्रयोगाने अनेक गोष्टी साधार मांडल्या आहेत.त्यातुन येणारे निष्कर्ष सुद्धा अचंबीत करणारे आहेत.हे आपण सर्वांनी मान्य करायला हवे.काही गोष्टी नाही जुळत अपुर्णता आहे, ही गोष्ट सुद्धा मांडणारे मान्य करतात.वैज्ञानिक पण ज्ञानाच्या कक्षा अपुर्ण असुन त्यात मानव प्रगती करत राहील असेच म्हणतात असे मला वाटते.

मला पडलेले तसेच प्रतिक्रीयेच्या माध्यमातुन पडण्यारया प्रश्नांची मांडणी जमवता येते का ते ती जुळवण्यासाठी अगोदर काही प्रयत्न होते का पाहण्याचा प्रयत्न आहे.व तेच माहीतीच्या रुपात देण्याचा प्रयत्न आहे. इती...

शैलु

 
^ वर