गुरू.. एक कोडे

गुरू : एक कोडे भाग १.
( भाग १. भारतात गुरूभक्ती का रुजली असावी ? थोडा इतिहास.
भागे २.. मला वाटते.)
गुरू ही भारतीय संस्कृतीतली एक महत्वाची संकल्पना आहे. अध्यात्म तर सोडाच पण संगीत, नृत्य अशा ललित कलांमध्येही ही गुरूभक्ती म्हणजे टोकाची, अंतीम श्रद्धेची, भावना आहे/ होती असे आढळून येते. भावूक, श्रद्धाळू शिष्याचे सोडा, तुम्ही त्याच्याकडे कणवेने, गरीब बिचारा, त्याला अक्कल नाही, अशा विविध दृष्टीकोनातून पाहू शकता. विषेशत: त्या विषयातले खोल ज्ञान आपणास नसेल तर अशी भुमिका घेणे सोपे जाते. पण ज्याने शास्त्रीय नृत्य शिकण्याकरिता १० वर्षे खर्च केली आहेत तो बिर्जू महाराजांवर त्यांच्या शिष्य वर्गाची असीम भक्ती का असते यावर उथळ टीका करण्याचे नकीच टाळेल. पण प्रखर बुद्धिमत्तेचे, प्रकांड पंडित, ज्यांच्या पायापाशी बसावयाचे भाग्य लाभावे असे वाटते, असेही जेव्हा असीम लीनतेने गुरूमहिमा आळवतात तेव्हा खरा प्रश्न उभा रहातो. यांच्या गुरूने यांना नक्की काय दिले की जे यांना स्वत: मिळवता आले नसते ? इथेच एक गोष्ट स्पष्ट केलेली बरी इतिहास-भुगोल, गणित शिकवतात ते शिक्षक व ज्या विद्येत-विषयात तुमच्या आंतर्मनाचा संबंध येतो, जेथे आंतर्ज्ञान मिळवावयाचे असते, त्यात मार्गदर्शन करतात ते गुरू. ही स्वैर व्याख्या पटली नाही तर सोडून द्या. संकल्पनेच्या जवळ जाण्याचा माझा प्रयत्न समजा. उदाहरणे येतील ती या संदर्भातच.
जेव्हा संत वाङ्मय, उपनिषदे, संगीत नृत्य आदींवरची पुस्तके वाचावयास सुरवात केली तेव्हा प्रथम लक्षातच येईना की ज्ञानीयांचा राजा, महाविष्णूचा अवतार असलेला ज्ञानेश्वर आपले सर्व कर्तुत्व केवळ दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या भावावर ओवाळून मोकळा कसा काय होतो ? एकनाथ म्हणजे संस्कृत पंडित, असाधारण लेखक, कळकळीचा समाजसेवक,अनन्य ईश्वरभक्त, थोडक्यात एक परिपूर्ण महामानव. तो का आपल्या गुरूला " ॐकारस्वरुपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा, तुज नमो,तुज नमो, तुज नमो " असे त्रिवार वंदन करतो ? एकनाथ अनाथ तर नाथ तरी कोण ?
उपनिषदांमध्ये तर ज्ञान मिळवावयाचा एकच मार्ग दाखवला आहे. हातात समिधा घेऊन नम्रपणे गुरूजींकडे जावयाचे व आपल्याला पडलेला प्रश्न विचारावयाचा. या मार्गालाच तर उपनिषद म्हणावयाचे ! वेदांना "फुटक्या नौका " म्हणणारी व लाभाचे श्रेय व प्रेय असे दोन भाग पाडून ऐहिक संपत्तीला प्रेय-श्रेय नव्हे- म्हणून झिडकारणारी, केवळ ज्ञानलालसी, निधडी माणसे जर गुरूला एवढे महत्व देत असतील, "अप्राप्य मनसा सह "असे "जे" काही, "ते" फक्त गुरूच देऊ शकतो असे म्हणत असतील तर एक नक्कीच की गुरू म्हणजे चालता बोलता माणुस नव्हे. म्हटले चला, सद्गुरू काही भेटण्याची शक्यता नाही, निदान त्या संबंधी माहिती काय मिळते ते तरी पाहू. प्रथम "गुरूगीता " पैदा केली व मग जेथे जेथे गुरू बद्दल उल्लेख असेल तो टिपून ठेवावयाचे असे ठरविले. हे अशक्य आहे हे लगेचच लक्षात आले. अहो, ज्ञानेश्वरी व
अनुभवामृत या दोन ग्रंथांतील जवळजवळ १० % भाग गुरूवंदना आहे. काय काय लिहून ठेवणार ? तरीही आज या शोधयात्रेतला काही भाग देत आहे. पहिल्या भागात अनेकांनी काय काय लिहले त्याची (त्यातल्या अतिअल्प भागाची) ओळख करून घेऊ व दुसर्‍या भागात या संकल्पनेबद्दल माझे मत काय ते पाहू.
प्राचीन भारतात विद्या शिकावयाची म्हणजे गुरूघरी जाणे भाग होते. २४ तास त्याच्या सान्निध्यात राहून, तो सांगेल ती सेवा करून,तो देईल ती विद्या प्राप्त करून घावी लागे. बारा एक वर्षे ही तपस्या केली की गुरू शिष्याला सांगे की " आता घरी जाऊन, गृहस्थाश्रम स्विकारून मी दिलेली विद्या तू तुझ्या विद्यार्थ्यांना दे." या प्रदीर्घ संगतीने विद्यार्थ्याला गुरूबद्दल आदर निर्माण होत असणारच. पण हे ही पुरेसे नव्हते.
छांदोग्यउपनिषदात वडील आपल्या शिक्षण घेऊन आलेल्या मुलाला विचारतात " तूला ह्याबद्दल महिती गुरूजींनी दिली का?' मुलगा म्हणतो "नाही.आता तुम्ही द्या." म्हणजे वडील हे दुसरे गुरू. तुम्ही आचार्य पदवीला पोचलात तरीही ज्ञान मिळवावयाचे असेल तर तुम्हाला तुमच्यापेक्षा श्रेष्ट माणसाकडे जावेच लागे. प्रश्नोपनिषदात पाच आचार्य गुरूकडे आपापले प्रश्न घेऊन गेले व गुरूजींनी त्यांना आपल्या आश्रमात एक वर्ष ठेऊन घेतले व मगच प्रश्न विचारावयास सांगितले ! अशा खडतर तपश्चर्येने मिळणार्‍या ज्ञानाची किंमत व ते देणार्‍या गुरूबद्दलची भक्ती शिष्याला अमोलिक वाटणारच. गुरूदक्षिणा द्यावी ही आंस त्यामुळेच. या काळातील एक गंमत म्हणून काही गुरू-शिष्यांच्या जोड्या बघा.
आचार्य-आचार्य , शिष्य-आचार्य. पिप्पलाद- कबंधिन,कात्यायन,वैदर्भी,कौसात्व, सौर्यायणी, ( हे पाच आचार्य आपल्याला न सुटलेले प्रश्न घेऊन पिप्पलादांकडे आले.)
आचार्य- देव, शिष्य-माणुस.... यम - नचिकेत. (कठोपनिषद) वरुण-भृगु (तैतरीय उपनिषद)
आचार्य-ऋषी , शिष्य-राजा ...याज्ञवल्क्य-जनक ( बृहदारण्यकोपनिषद)
आचार्य-प्रजापती, शिष्य-देव (व असूर) आचार्य-प्रजापती, शिष्य -इंद्र व बली.
आचार्य-राजा(क्षत्रीय), शिष्य-आचार्य(ब्राह्मण) आचार्य-प्रवाहण, शिष्य-आरुणि
ही यादी द्यावयाचे कारण हे की ज्ञान देणारा गुरू हा श्रेष्ट; तेथे वर्ण - योनी यांचा संबंध नाही, हे सर्वांना मान्य होते.

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ! द्वंदातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् !!
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् ! भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामी !!

असे गुरूचे वर्णन करणारी "गुरूगीता" ही गुरूचे महत्व सांगणारी रचना. बहुदा संग्रह असावा. काल अंदाजे उपनिषदांनंतर. स्कंदप्रुराणांत आहे ही सांगावयाची पद्धत.( सर्वसाधारणपणे कुठलाही धार्मीक संस्कृत ग्रंथ पूरातन आहे असे भासवावयाचे असेल तर तो स्कंदपुराणात आहे असे ठोकून दिले जाते!) भगवान शंकरांनी माता पार्वतीला गुरूचे महात्म्य सांगितले, ती ही गुरूगीता.

गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वर: !
गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूवे नम:!!

या सर्वांनी शाळेत शिकलेल्या श्लोकात गुरूला ब्रह्मा-विष्णू-महेश म्हटले असले तरी शिष्याची भुमिका ती नाही. पहिले उदाहरण कबीराचे घेऊ. कबीरच का ? तर तो इतर भक्तांसारखा श्रद्धाळू वगैरे दिसत नाही. आपले विचार तपासून घेऊन, तर्काला पटणारे खणखणीत नाणेच बाजारात आणणारा . "ना मै मसजिद, ना मै काबा" हे परमेश्वराचे बोल असे म्हणतांना तो कोणाची भीड बाळगत नाही. तर असा हा कबीर काय म्हणतो ?

गुरू गोविंद दोनो खडे, किसके लागो पांय !
बलिहारी गुरू आपने,गोविंद दिया बताय !!

गुरू आणि परमेश्वर समोर आले तर प्रथम वंदन कोणाला ? कबीर निस्संदिग्धपणे सांगतो "प्रथम गुरूला" आणि त्याचे कारणही देतो.

कबीरा हरिके रुठते, गुरूके शरने जाय !
कहै कबीर गुरू रुठते, हरि नही होत सहाय !!

कबीराचे सद्गुरू, त्याची पारख, त्याचे शिष्याशी असलेले संबंध यावरचे अनेक मनोहर दोहे आहेत.
आता संस्कृत, हिंदी सोडून थोडे महाराष्ट्रात डोकावू.सद्गुरूची दीर्घ संगत लाभलेले भाग्यवान दोघेच. ज्ञानेश्वर व एकनाथ.पहिला गुरूगृहीच रहात होता व जीवनाच्या अंतीम क्षणीही गुरूच्या हातात हात घालून चालण्याचे भाग्य त्याला लाभले. दुसरा लहानपणापासून गुरूकडेच वाढला, गृहस्थाश्रम स्विकारेपर्यंत गुरूचे प्रेमळ मार्गदर्शन त्याला मिळाले. इतर तेवढे नशिबवान नव्हते. तुकारामाला गुरू स्वप्नात भेटले. वामनपंडिताला विजनवासात अल्पकाळ तर निळोबारायांना .. त्यांचे गुरू, तुकाराममहाराज तर निळोबांच्या जन्माआधीच वारले होते !
तर या दोघांनी गुरूमहिमा गातांना कुठलेही बंधन पाळले नाही. सर्वारंभी गणपतीनमन ही परंपरासुद्धा मोडीत काढली.अनुभवामृताची पहिली ओवी आहे

यदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् !
श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये !!

अक्षर, अनाख्येय, आनंद, अज,अव्यय ही सर्व "ब्रह्मा"ची विशेषणे निवृत्तिनाथांना लावून त्यांनी गुरू व ब्रह्म यांची एकरुपता वर्णन केली व या अशा देवतेचा मी आश्रय घेतो हे मोठ्या अभिमानाने सांगितले. नाथपंथाचा आदीदेव श्रीशिव हाही दुसर्‍या ओवीत ! ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाची सुरवात गुरूवंदनेने होते व इतरत्र वाव मिळेल तेथे (व नसला तर ओढून ताणून आणून) श्रीनिवृत्तिनाथांना नमस्कार केला जातो.
हा ग्रंथ लिहून झाल्यावर कोणीही कृतार्थ होईल पण तेथेही ही गुरूकृपा व श्रोत्यांचे आशिर्वाद असे म्हणून ते नामानिराळे होतात.
चांगदेवपासष्टी सारख्या एका मित्राला लिहलेल्या पत्रातही

चांगदेवा तुझेनि व्याजे ! माउलिया श्रीनिवृत्तिराजे !
स्वानुभाव रसाळ खाजे ! दिधले लोभे !!

या शब्दात, "मी बापडा तुला काय नवीन सांगणार ? हा तर निवृत्तिमाऊलीने दिलेला गोड खाऊ आहे", असे म्हणत त्यांनी सर्व श्रेय गुरूला दिले.

" ॐ कार स्वरुपा सद्गुरू समर्था " सारखा एकनाथांचा आणखी एक अभंग पाहू.

गुरू परमात्मा परेशु ! ऐसा ज्याचा धृढ विश्वासु !
देव तयाचा अंकिला ! स्वये संचला त्याचे घरा !
एकाजनार्दनी गुरूदेव ! येथे नाही बा संशय !!

एकनाथ म्हणतात, "गुरूवर धृढ विश्वास ठेवा, देव तुमच्या घरी काम करावयास येईल. गुरूभक्ती असेल तर देवाच्या भक्तीची गरज नाही "

मराठी संतांनी, नव्हे, सर्व भारतीय संतांनी, आपल्याला जे काही मिळाले ते सर्व केवळ गुरूकृपेने असेच म्हटले आहे. अगदी मनापासून, निष्टेने, वरवरचे नव्हे. तर ही भक्ती कशापासून उपजली ? उत्तर शोधावयाचा एक प्रयत्न पुढील भागात.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

गुरू संकल्पना

फिजिक्सच्या तासाला पोटेन्शियल डिफरन्स समजावून सांगताना आमच्या बाईंनी 'गुरू आणि शिष्य हे पोटेन्शियल डिफरन्स चे उदाहरण आहे कारण ऊर्जा नेहमी जास्त पोटेन्शियल कडून कमी पोटेन्शियल कडे वाहते, तसे ज्ञान गुरूकडून शिष्याकडे म्हणजेच जास्त पातळीकडून कमी पातळीकडे वाहते. याच कारणासाठी गुरूच्या चरणांजवळ बसून विद्यार्थी विद्या ग्रहण करीत असत' असे सांगितल्याचे आठवते. उपनिषद = उप् + नि + सद् म्हणजे ढोबळ अर्थाने गुरूच्या पायाशी बसणे हा शब्द ऐकला की मला या वाक्याची आठवण होते.

या लेखातील अवतरणे ज्ञानदान करणार्‍या गुरूंबद्दल नसून आध्यात्मिक गुरूंबद्दल आहेत असे वाटते. आध्यात्मिक गुरूंजवळ शिष्याची संपूर्ण आध्यात्मिक उन्नती करण्याचे सामर्थ्य असते असे म्हणतात. असा सद्गुरू लाभण्यासाठी शिष्याची अनेक जन्मांची पुण्याई लागते असेही म्हणतात. भारतीय तत्वज्ञानामधे माणसाची ऐहिक आंणि पारलौकिक अशा द्प्न्ही प्रकारची उन्नती होणे महत्त्वाचे मानले आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ आपल्याकडे मानलेले आहेत. यातील मोक्षसंकल्पनेचा प्रवास खूप व्यापक आणि मोठा पल्ला गाठणारा आहे असे दिसते. या संकल्पनेची उत्क्रांती होण्यासाठी तत्वज्ञानाची आणि तत्वचिंतनाची खूपच मदत झाली आहे असे वाटते. नंतरच्या काळात तर हा शेवटचा पुरुषार्थ इतरांपेक्षा जास्त महत्त्वाचा मानला गेला असावा.
ऐहिक गोष्टींमधे गुंतलेले शिष्याचे मन त्या जंजाळातून सोडवून त्याला भवसागरातून पार नेणारे आध्यात्मिक गुरूच असतात आणि अशा या परमकल्याणाची प्राप्ती गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय होऊ शकत नाही असे म्हणतात. एक आई आपल्या तान्ह्या बाळाची जशी काळजी घेते तशीच हे गुरू आपल्या शिष्याची सर्वतोपरी काळजी घेतात म्हणूनच त्यांना गुरूमाउली असे म्हणण्याची प्रथा आहे.

यामुळेच जन्म देणारे माता पिता हे प्रथम गुरू असतात आणि त्यांच्यानंतर मात्र आध्यात्मिक गुरूच आयुष्यात महत्त्वाचे मानले जातात असे वाटते. या विषयावर अनेक ठिकाणी लिहिलेली माहिती माझ्या समजुतीप्रमाणे मी इथे टंकली आहे. शरदरावांची या विषयावरील मते जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची वाट पहात आहे.

--अदिती

-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने

फिजिक्स?

फिजिक्सच्या तासाला पोटेन्शियल डिफरन्स समजावून सांगताना आमच्या बाईंनी 'गुरू आणि शिष्य हे पोटेन्शियल डिफरन्स चे उदाहरण आहे कारण ऊर्जा नेहमी जास्त पोटेन्शियल कडून कमी पोटेन्शियल कडे वाहते, तसे ज्ञान गुरूकडून शिष्याकडे म्हणजेच जास्त पातळीकडून कमी पातळीकडे वाहते. याच कारणासाठी गुरूच्या चरणांजवळ बसून विद्यार्थी विद्या ग्रहण करीत असत' असे सांगितल्याचे आठवते. उपनिषद = उप् + नि + सद् म्हणजे ढोबळ अर्थाने गुरूच्या पायाशी बसणे हा शब्द ऐकला की मला या वाक्याची आठवण होते.

ह्या बाईंना फिजिक्स सारखा विषय शिकवायला देणे ही आपल्या शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका आहे.

गुरुच्या चरणांजवळ बसून ज्ञान प्राप्त करायला, ज्ञान हे काय गुरुत्वाकर्षणाने वाहणारे पाणी आहे का? तसे असेल तर पुस्तकातुन ज्ञान मिळवायला ते डोळ्यासमोर न धरता डोक्यावर ठेवले पाहिजे का?

बाकी अध्यात्म चालू दे, पण अशा बाईंनी देवळात प्रवचने द्यायचे सोडून फिजिक्स शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांवर घोर अन्याय आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

याउलट..

त्या बाईंनी उत्तम गुरू कसा असावा हे कृतीतून दा़खवलं. असे समर्थ गुरू प्रत्येक वर्गात दिसत नाहीत ही आपल्या शिक्षणव्यवस्थेची खरी शोकांतिका आहे. ते वाक्य, त्यातील ज्ञान, व संकल्पना इतक्या वर्षांनी स्पष्ट आठवते यातच त्यांचा विजय आहे...

तसे असेल तर पुस्तकातुन ज्ञान मिळवायला ते डोळ्यासमोर न धरता डोक्यावर ठेवले पाहिजे का?

त्यांनी दिलेला पातळीचा सिद्धांत इतक्या शब्दशः घेतला तर एका उत्तम गुरूने दिलेलं ज्ञान हे "पालथ्या घड्यावर पाणी" झाले असे म्हणावे लागेल. (पुन्हा ते पाणी, आणि त्याचे पडणे आले. शेवटी "गुरुत्व"-आकर्षण पुन्हा पुन्हा या गुरु विषयीच्या चर्चेत शिरतेय!)

राजेश

समर्थ गुरू?

राजेश,

फिजिक्सच्या तासाला पोटेन्शियल डिफरन्स समजावून सांगताना आमच्या बाईंनी 'गुरू आणि शिष्य हे पोटेन्शियल डिफरन्स चे उदाहरण आहे कारण ऊर्जा नेहमी जास्त पोटेन्शियल कडून कमी पोटेन्शियल कडे वाहते, तसे ज्ञान गुरूकडून शिष्याकडे म्हणजेच जास्त पातळीकडून कमी पातळीकडे वाहते.

इथपर्यंतच बाई बोलल्या असत्या तर मी तुमच्या प्रतिसादाशी सहमत असतो. पण,

याच कारणासाठी गुरूच्या चरणांजवळ बसून विद्यार्थी विद्या ग्रहण करीत असत'

हे फिजिक्स शिकवणार्‍याने सांगावे म्हणजे मला तरी त्या शास्त्राचा अपमान वाटतो. गुरूच्या चरणाजवळ बसल्याने ज्ञानग्रहण अधिक सुलभ होते असे इथल्या कोणत्याही भौतिकशास्त्र अभ्यासकाने सांगितल्यास मी माझे म्हणणे बिनशर्त मागे घेईन. हे म्हणजे जीवशास्त्र शिकवणार्‍या प्राध्यापकाने उत्क्रांतीचा सिद्धांत व्यवस्थित शिकवून सांगताना मधेच पृथ्वीचे वय साडे सहा हजार वर्षे सांगण्यासारखे आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

चुकीची चित्रं

माझा रोख चित्रनिर्मितीच्या प्रभावाबद्दल होता... कधी कधी अपुरी किंवा अगदी ठार चुकीची चित्रंही ज्ञान मिळवायला मदत करतात. आम्हाला शाळेत शिकवलं होतं की सूर्याभोवती ग्रह फिरतात त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती फिरतात (चित्रही होतं बहुतेक). हे चुकीचं आहे हे पुस्तक लेखकाला माहीत असलं तरी त्या चित्राचा उपयोग होतो.

असो. तुमचा मुद्दा मला मान्य आहे - शिक्षणात चुकीची माहिती येता कामा नये... पण योग्य माहिती जगात खूप ठिकाणी आहे, ती प्रभावीपणे (चुकीचे दाखले देऊन का होईना) मुलांमध्ये ठसवण्याची क्षमता असलेले शिक्षक खूप कमी आहेत. ही कला आहे, आणि ती कुठेही शिकवत नाहीत. त्या बाईंकडे ती होती असं दिसतंय. त्यांनी ते शेवटचं वाक्य न वापरता तितक्याच प्रभावीपणे शिकवलं असतं तर सोन्याहून पिवळं झालं असतं. पण बावीस कॅरट तर बावीस कॅरट!

राजेश

पृथ्वीचे वय

पाच अब्ज वर्षे आहे हे शास्त्रीय सत्य आहे आणि ते उत्क्रांतीच्या विरुद्ध नाही. मुळात उत्क्रांतीचा सिद्धांत सांगताना पृथ्वीचे वय, उत्क्रांतीचे विविध टप्पे आणि पृथ्वीचा निर्मितीपासून नेमक्या / अंदाजे / ढोबळमानाने (इ.इ.) किती वर्षांनंतर हे विशिष्ट टप्पे दिसून आले हे सांगणे हा उत्क्रांतीच्या सिद्धांताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे असे वाटते.

ज्ञान मिळवण्यासाठी ते ज्ञान मिळवण्याची मनापासून इच्छा (जिज्ञासा) आणि कुतूहल यांची सगळ्यात जास्त आवश्यकता असली तरी गुरूच्या चरणाजवळ बसणे म्हणजेच गुरूबद्दल नम्रता असणे हेही आवश्यक असते. तसेही केवळ गुरूच्या चरणाजवळ बसल्याने ज्ञानप्राप्ती होतच नाही. पण विद्या ग्रहण करत असताना नम्रतेने गुरूच्या चरणाजवळ बसल्याने ज्ञानप्राप्तीस मदत होत नाही असे कोणताही ज्ञानी प्राध्यापक म्हणणार नाही.

ऐतिहासिक दाखले दिल्याने अपमान होण्याइतके फिजिक्स कवडीमोलाचे नाही असे वाटते. अशा प्रकारे फक्त आजच्या राजकारणी पुढार्‍यांचा अपमान होऊ शकतो. फिजिक्स सर्व मानवजातीपेक्षाही श्रेष्ठ आहे त्यामुळे त्याचा असा एवढ्यातेवढ्याने अपमान होत नाही तेंव्हा काळजी नसावी. उलट फिजिक्सचे नियम कितीही ठामपणे मांडलेले असले तरीही त्या नियमांच्यातही परिस्थितीनुसार बदल होतात यावर विश्वास ठेवणारे आणि अशा बदलांबद्दल अतिशय जातिवंत कुतूहलाने माहिती करून घेणारे हे शास्त्र आहे. उदा. कृष्ण विवर आणि त्याच्या आसपास होणारे प्रकाश किरणांचे वक्रीकरण. प्रकाशकिरण सरळ रेषेतच प्रवास करत असले तरी गुरुत्त्वाकर्षण जेंव्हा अतिशय तीव्र असते तेंव्हा त्यांचेही वक्रीकरण होते हे फिजिक्सने गौरवाने मान्य केले.

--अदिती

-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने

:)

(पुन्हा ते पाणी, आणि त्याचे पडणे आले. शेवटी "गुरुत्व"-आकर्षण पुन्हा पुन्हा या गुरु विषयीच्या चर्चेत शिरतेय!)
हे खूप आवडले.

--अदिती

-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने

उदाहरण

दोन संकल्पनांमधील साधर्म्य दाखवणारे उदाहरण दिल्यामुळे संकल्पना मनावर ठसतात आणि सहसा पुढील आयुष्यात विसरल्या जात नाहीत असा अनुभव आहे. आणि आमच्या बाईंसारखे शिक्षक आता दुर्मिळ झाल्यामुळेच सध्याच्या शिक्षणपद्धतीची शोकांतिका झाली आहे असाही अनुभव आहे.
शिवाय गुरूच्या पायाशी बसणे हा उल्लेख उपनिषद् या शब्दाच्या व्युत्पत्तीशी संबंधित होता ज्याचा शब्दश: अर्थ गुरूजवळ (खाली) बसणे असा होतो. बाई म्हणाल्या त्यात चुकीचे काहीच नाही कारण पूर्वी गुरू उच्चासनावर बसत असत आणि शिष्य त्यांच्यापेक्षा कमी उंचीच्या आसनावर किंवा जमिनीवर बसत असत ही सर्वश्रुत आणि सर्वमान्य गोष्ट आहे. या प्रथेमागे गुरूला मान देण्याचीच भावना होती. आणि याउलट वर्तणूक हा गुरूचा अपमान मानला जात असे. शालेय फिजिक्स मधे इतर शालेय विषयांचे दाखले देणे म्हणजे देवळात प्रवचने देणे नव्हे.

मजकूर संपादित. वैयक्तिक प्रतिसादासाठी खरडवहीचा वापर करावा.

--अदिती

-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने

शोकांतिका

तुमच्या बाईंनी "अवांतर" म्हणून उपनिषदातल्या गोष्टी फिजिक्सच्या तासाला सांगितल्या तर एकवेळ ते चालून जाईल (जरी ते विद्यार्थी म्हणून मला रुचणार नाही), पण त्यातल्य गोष्टींचा संबंध पोटेंशियल डिफरंस वगैरे संकल्पनांशी जोडणे हे साफ नामंजुर! गुरू आणि शिष्यातल्या पोटेन्शिअल डिफरन्स मुळे शिष्य गुरूच्या चरणी बसतो (ज्ञानग्रहण हे जास्त पातळीकडून कमीपातळीकडे सुलभ होण्यासाठी) हीच ती शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका.

गुरूला 'मान देण्यासाठी' वगैरे शिष्य चरणाशी बसतो ही तुम्ही केलेली सारवासारवी आहे, बाईंचा मुद्दा तो नव्हता.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

प्रतिसाद संपादित. वैयक्तिक रोखाच्या प्रतिसादासाठी खरडवहीचा वापर करावा.

व्याख्या

तुम्ही म्हटले आहेतच, पण शिक्षक वेगळा आणि गुरू वेगळा अशी व्याख्या करू नये असे वाटते.
किंबहुना जगात राहण्याचे ज्ञान ज्याच्याकडून मिळेल, तो तेवढ्यापुरता आपला गुरू आहे हे समजणे मी अधिक योग्य समजते. जगात राहण्याच्या ज्ञानात भौतिकासहित आत्मिक बळ, उन्नती, हे सर्व आलेच (आत्मिक शब्द आवडत नसला, तर मानसिक म्हणू).

पण तेवढा भाग वेगळा काढला तरी लेख वाचनीय आहे. पुढे काय येत आहे त्याबद्दल उत्सुकता आहे.

+१ आणि +१

शिक्षक/गुरू यांच्यातला फरक या मुद्द्याबद्दल +१. लेख वाचनीय आहे, +१.

"भारतातील आध्यात्मिक गुरुभक्तीचा ऐतिहासिक आढावा" असे काही शीर्षकही समर्पक वाटले असते.

गुरुभक्ती (आणि आध्यात्मिक गुरुभक्ती) ही जगात सार्वत्रिक आणि अतिशय प्राचीन असावी, असे वाटते. म्हणून सध्याचे शीर्षक ("का" अशी कारणमीमांसा) या चांगल्या लेखासाठी तितकेसे पटत नाही.

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे.

चांगला आढावा

चित्रा व धनंजय यांच्याशी व्याख्या, वाचनीयता व शीर्षकाबद्दल सहमत.

पण प्रखर बुद्धिमत्तेचे, प्रकांड पंडित, ज्यांच्या पायापाशी बसावयाचे भाग्य लाभावे असे वाटते, असेही जेव्हा असीम लीनतेने गुरूमहिमा आळवतात तेव्हा खरा प्रश्न उभा रहातो. यांच्या गुरूने यांना नक्की काय दिले की जे यांना स्वत: मिळवता आले नसते ?

यावरच पुढच्या भागात प्रकाश टाकला असेल अशी आशा (शेवटच्या वाक्यामुळे) आहे. त्याची वाट पाहतो आहे.

राजेश

गुरू-शिष्य

सर्वप्रथम यामुळे माझ्या आवडीच्या एकनाथांच्या ओळी परत एकदा आठवल्या:

जो जो जयाचा घेतला म्या गूण, तो तो म्या गुरू केला जाण |
गुरूसी झाले अपारपण, जग संपूर्ण गुरू दिसे ||

कदाचीत एकाच गुरूच्या मागे लागल्याने गुरूचा बुवा होऊ शकतो असे एकनाथांना वाटले असले तर त्यात नवल नाही.

आई-वडीलांमधे देखील आईला आद्यगुरू म्हणले जाते कारण सरळ आहे... वर अदितीने म्हणल्याप्रमाणे वरील लेखात जास्त करून अध्यात्मिक गुरूंचाच संदर्भ जास्त दिसला. आपल्याकडे गुरूशी आदरानेच वागण्याची पद्धत होती. आजही तशीच अपेक्षा आहे. पण तो आदर न सोडता देखील जिथे गरज असेल तेथे गुरूची विद्या गुरूला देण्याचे प्रकार पण झालेत ते आठवले:

सगळ्यात पहीला आठवणारा प्रकार म्हणजे: कच आणि शुक्राचार्य कथा.

दुसरा प्रकारः एकलव्य आणि द्रोणाचार्य. जरी द्रोणाचार्यांनी अंगठा घेतला तरी अंगठ्यावीनादेखील गुरूच्या विद्येने उत्तम धनुर्धारी होता येऊ शकते हे एकलव्याने गुरूचा मान राखत सिद्ध केले.

मात्र त्याच बरोबर खरा गुरू हा खर्‍या शिष्याच्या शोधात असतो याची देखील अनेक उदाहरणे आहेत. परत अध्यात्मिक होईल, पण त्यावरून रामकृष्ण-विवेकानंदांचे उदाहरण आठवते. "किती वाट पहायला लावलीस" असे पहील्या भेटीतच रामकृष्ण, विवेकानंदांना म्हणाले होते...

या सर्वांनी शाळेत शिकलेल्या श्लोकात गुरूला ब्रह्मा-विष्णू-महेश म्हटले असले तरी शिष्याची भुमिका ती नाही.

"गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वर:", या ओळींचा अर्थ मी माझ्यापुरता वेगळा लावतो - गुरू हा शिष्याच्या मनात विचार निर्मिती करू शकतो म्हणून ब्रम्ह आहे, त्या विचारांना आचारांची दिशा देऊन त्यातून चांगले घडवू शकतो म्हणून विष्णू आहे आणि असे होत असताना जे (कृत्यातून)घडण्याऐवजी बिघडू शकते त्या विचारांचा नाश करू शकतो म्हणून तो शिवशंकरही आहे, म्हणूनच तो या तिन्हीचे एकरूप असलेले परब्रम्ह आहे. इंग्रजीत थोड्याफार याच अर्थाने प्राध्यापकास "फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड" असे म्हणतात...
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

रोचक

लेख वाचून उत्सुकता वाढली.

गुरु शिष्याच्या नात्यात एक महत्त्वाचे नाते राहून गेलेले दिसते. :-)

आचार्य - मित्र/ भाऊ , शिष्य-मित्र/ भाऊ - कृष्णार्जुन

विकास यांनी म्हटल्याप्रमाणे कच-शुक्राचार्य आणि एकलव्य-द्रोण अशा वेगळ्या जोड्याही आहेत. परंतु , वर म्हटल्याप्रमाणे शिक्षक आणि गुरु वेगळा असे म्हटल्याने दादोजी आणि शिवाजीची आठवणही झाली. :-)

असो.

छान विषय!

पण प्रखर बुद्धिमत्तेचे, प्रकांड पंडित, ज्यांच्या पायापाशी बसावयाचे भाग्य लाभावे असे वाटते, असेही जेव्हा असीम लीनतेने गुरूमहिमा आळवतात तेव्हा खरा प्रश्न उभा रहातो. यांच्या गुरूने यांना नक्की काय दिले की जे यांना स्वत: मिळवता आले नसते ?

वर विकासने म्हणल्याप्रमाणे इथे रामकृष्ण-विवेकानंदांचे उदा. ठळकपणे आठवते. पुस्तकी द्न्यानाच्या बाबतीत नरेंद्रनाथ दत्त हे नि:संशय प्रगल्भ होते. संस्कृत, इंग्लिशच्या ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन भरपूर होते तरीही समाधान नव्हते. मनाला शांतता नव्हती. जी जी मोठी आणि अधिकारी व्यक्ती भेटेल त्याला/तिला ते एकच प्रश्न विचारायचे "तुम्ही देव बघितला आहे का?" वेगवेगळ्या प्रकारे युक्तिवाद करुन बहुतेकांनी हा प्रश्न टाळला. एक् रामकृष्णच असे होते जे म्हणाले "होय मी पाहिला आहे आणि तुलाही दाखवू शकतो!" लिहिता वाचताही येत नसलेला हा पुजारी एकतर वेडा असावा किंवा भोंदू असावा असा नरेंद्रनाथांचा समज पहिल्या भेटीत झाला!
पण त्याच रूढार्थाने अशिक्षित पुजार्‍याने नरेंद्रला आत्मसाक्षात्काराच्या वाटेनं नेलं. त्याला आत्मद्न्यान घडवलं हे मिळवण्यासाठी नरेंद्र त्यांच्या शब्दशः पायाशी बसला आणि त्यांचे चरण शब्दशः मस्तकी लावले! हा गुरु महिमा आहे. लीनता आणि नम्रतेनं तुमच्यातला बुद्धीचा अहंकार संपतो आणि तो संपल्याशिवाय खरं शिक्षण सुरु होत नाही आणि हे गुरुच करु शकतो म्हणून गुरुचं महत्त्व!

चतुरंग

देव बघितला आहे का?

कशावरही अंधविश्वास ठेवणे हे कसे धोक्याचे ते पाहा. परमहंसांनी देव दाखवला म्हणजे काय? त्याची चिकित्सा का झाली नाही? आमचा विश्वास आहे ह्या नावाखाली दडपून टाकले की झाले का? विज्ञानाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे खचितच माहित नाहीत पण म्हणून असलेल्या मोकळ्या जागा मनाला वाटेल त्या गोष्टीभरून 'विश्वास/फेथ' हे लेबल चिकटवले की झाले असे नाही.

नुसतेच देव भेटला आणि साक्षात्कार झाला असे सांगणे म्हणजे ह्या विडियोतल्या सारखे वाटते. सदर व्यक्तिलाही खरंच देव भेटला असे मानायचे का? त्याच्यात आणि विवेकानंदांच्या साक्षात्कारात फरक काय?

रामकृष्ण परमहंस कोण होते? त्यांचे महिलांविषयी, प्रजननाच्या प्रक्रिये विषयी काय मत काय होते? ह्याचा अभ्यास केला आहेत का? लिंगपूजा पवित्र मानून स्वतःच्या लिंगाशी सफेद द्रव पाझरेपर्यंत पूजा करायचे,स्त्रियांचा उल्लेख ते कुत्री आणि वैश्या असे करायचे असे अनेक दाखले त्यांच्याविषयी वाचलेले आहेत? उदा. हा परिच्छेद पाहा..

Ramakrishna greatly admired the young men, particularly Swami Vivekananda whom he named Kamalaksa (lotus eyed). The master exhibited a "strange and strong attraction" for the Swami. Ramakrishna's infatuation for the Swami was expressed frequently in his petting the young man's face and body, shedding tears while seeing him, gazing at him intently for a long stretch of time, and above all, becoming rigid in samadhi.Once, he worshiped the penises of young boys. Pratapcandra Hazra, another devotee of Ramakrishna once reprimanded his master and has reported to have observed that his master was especially fond of good looking and wealthy boys.

टीप: हे माझे मत नसून शिकागो प्रेसने प्रकाशित केलेल्या 'कालीज चाइल्ड' ह्या पुस्तकातील आहे. अधिक माहितीसाठी संदर्भ
http://www.press.uchicago.edu/presssite/metadata.epl?mode=synopsis&bookk...

ह्या सगळ्याची चिकित्सा झाली पाहिजे असे तुम्हाला वाटत नाही का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

भक्तमंडळी चिकित्सेला का घाबरतात?

परमहंसांनी देव दाखवला म्हणजे काय? त्याची चिकित्सा का झाली नाही? आमचा विश्वास आहे ह्या नावाखाली दडपून टाकले की झाले का? विज्ञानाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे खचितच माहित नाहीत पण म्हणून असलेल्या मोकळ्या जागा मनाला वाटेल त्या गोष्टीभरून 'विश्वास/फेथ' हे लेबल चिकटवले की झाले असे नाही.

१०० टक्के पटले. ही भक्तमंडळी चिकित्सेला का घाबरतात कळत नाही. बहुधा आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्या किती फोल, तकलादू आहेत हे त्यांना मनोमन ठाऊक असावे. श्रद्धेमुळे त्यांच्या जगण्याला बळ येतं. श्रद्धेच्या, विश्वासाच्या फुग्याला कुणी टाचणी लावल्यास त्यांना कसे आवडेल? त्यामुळे त्यांच्या भावना मी समजू शकतो.

वर चतुरंग ह्यांनी दिलेला प्रतिसाद वाचून मी भलत्याच संकेतस्थळावर वावरतो आहे की काय असे वाटायला लागले. उत्क्रांतिवादाचे उत्तर वाचायचे सोडून , फाइनमन, आइनस्टाइन सगळ्यांना विसरून मी क्षणभर आध्यात्माच्या लहरींवर तरंगायला लागलो. असे प्रतिसाद उपक्रमावर शोभत नाहीत. ह्याचा अर्थ असे प्रतिसाद काढून टाकावेत, असे प्रतिसाद कुणी लिहूच नयेत, असा होता नाही. मी माझे फक्त मत मांडले. मला जे बौद्धिक दारिद्र्य वाटतं ते इतरांना वैचारिकही वाटू शकतं.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

सहमत.

मे पुं रेगे यांचे एक विधान या निमित्ताने आठवले.
अमुक व्यक्तीला त्याला देव भेटला हे आपण पाहिलेले नसते. त्यामुळे त्याला देव भेटला म्हणून आपण त्याला थोर समजत आहोत? की आपण आधीच त्याला थोर मानले आहे त्यामुळे त्याला 'देव भेटला' हे त्याचे सांगणे आपण खरे मानत आहोत?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

वसुलि साहेब

आपण दिलेली लिंन्क उघडत नाही. हे कालीज चाइल्ड कोणाचे पुस्तक आहे. माहिती दिलीत तर चाळता व वाचता येईल.

दुसरा दुवा

विवेकानंद आणि रामकृष्ण येथेही तोच परिच्छेद सापडला.
जेफ्री कृपाल यांचे पुस्तकः कालीज चाईल्ड.

गुगला म्हणजे सापडेल

कालीज़ चाइल्ड 1
कालीज़ चाइल्ड 2

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कालीज चाइल्ड

लेखक क्रिपालाने जे शब्दार्थ लावले आहेत (विकीपिडीया) त्याने समजून येते ह्या इसमाची भाषेची उपज व समज.

चितळे काका,

सुमारे २-३ महिने, मी रोज ८-१० याप्रमाणे उपक्रमाचे पहिल्यापासून सर्व धागे वाचून काढलेत. ते तुम्हीही करा, म्हणजे मग असले उत्खनन बंद होइल ;)

उपक्रम व्यवस्थापनाला

एक विनंती आहे की कृपया माझा वरील प्रतिसाद काढून टाकावा आणि माझे उपक्रमाचे सदस्यत्त्व रद्द करावे.
कळावे. धन्यवाद!

चतुरंग

अरेरे...

चतुरंग,

असा आतातायीपणा करू नका. वैचारीक नैराश्य आले असेल तर काही दिवस इथून सक्तिची विश्रांती घ्या. अध्यात्माची वगैरे आवड असेल तर ध्यान करा, मनन करा, नामस्मरण करा.
पुन्हा फ्रेश वाटले की नक्की यावेसे वाटेल.

पुन्हा एकदा विचार करुन पाहा!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

सामाजिक व्यवस्था आणि गुरू

श्री शरद, लेख वाचनीय तसेच माहितीपूर्ण आहे. लेखाबद्दल अनेक धन्यवाद.

भाग १. भारतात गुरूभक्ती का रुजली असावी ? थोडा इतिहास.

हा भाग १ आहे, असे वाटते. गुरूभक्ति का रुजली असावी? याचे उत्तर मात्र लेखात मिळाले नाही. भारतीय इतिहासाच्या सामाजिक, आर्थिक, राजकिय अंगांना विचारात घेऊन मांडणी करता येईल असे वाटते. ज्ञानावर अढळ श्रद्धा असणे हे योग्यच आहे पण गुरूंनी (शिष्यांनी नाही) त्यावर यथेच्छ प्रिमियम (उदा. एकलव्य) लादणे, त्यास अनन्य (एक्सक्लुजिव) ठेवण्याचा प्रयत्न करणे हे ज्ञानाचे काही प्रमाणात वस्तुकरण करणे नाही का? असे होत असल्यास गुरूंनी त्यासंदर्भात काही मार्गदर्शन अथवा स्पष्टीकरण दिले आहे का?

गुरु कसा असावा/नसावा

गुरुवर श्रद्धा ठेवताना/ गुरुची चिकित्सा करताना नेमके शिष्याचे काय काय होते? आम्हाला शरद यांचाच महाराज बुवा संत हा लेख आठवला.आध्यात्मिक गुरु हे महाराज, संत, बुवा बनतात. बाकी काहीही असो समाजाची ती गरज असते हेच खरे.
मंगेश पाडगावकरांच्या उदास बोध मध्ये बुवा शक्ती बाबत लिहिलेले पंक्ती बुवाबाजीच्या मानसिकतेचे विश्लेषण करतात.
"माणसे खपाट खंगलेली, आतुन आतुन भंगलेली
अदृष्य्य दहशतीने तंगलेली , आधार नाही
प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा,
जो काढील सार्‍या उवा, मनातल्या चिंतेच्या
आधि म्हणे 'जय साई' मगच अधिकारी लाच खाई
अजुन पकडला गेला नाही,कृपा म्हणे बाबांची
आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही
आपण भिडायचे नाही, आयुष्याला
कणा झिजुन गेला पार, शिरजोरापुढे सर्व लाचार
बुवा नाम जपाचा उच्चार, नशा देई
प्रकाश घाटपांडे

इंडस्ट्री

शरदकाका,

अहो या गुरुभक्तीत चार मोठी धेंडे जमून कोणाला तरी गुरु बनवतात. लोक त्याच्या भजनी लागतात आणि गुरुचा महिमा वाढत जातो. हा वाचा लोकप्रभेतील ताजा लेख. भंपकपणाचा कळस आहे. भक्त व शिष्य हे एका बाहुल्याच्या शोधात असतात. त्यातून त्यांना आपले उखळ पांढरे करून घ्यायचे असते किंवा आपला स्वार्थ पूर्ण करून घ्यायचा असतो. नेटवर्किंगसाठी उपयोग होतो, ओळखीपाळखी होतात. व्यवसायात मदत होते. ही आजकाल मोठी इंडस्ट्री झाली आहे. गुरु हे भक्तांच्या, शिष्यांच्या हातचे बाहुले बनते अश्यामुळे.

एकनाथ, ज्ञानेश्वर आणि इतर संतांना आणि गजानन महाराज आणि इतर बाबा-बुवांना एकाच गुरु तागडीत तोलत नाही ना इथले भक्त?

-राजीव.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही गाजलेली चर्चा पुन्हा वाचली. शरदरावांनी घाललेल्या भूलभुल्लैय्यात हरवून बसलो. पण कोडे काही सुटले नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

गुरुद्वारा

परवा पहाटे अतिशय सुंदर स्वप्न पडले. आणि त्याच दिवशी ध्यानी-मनी नसताना आयुष्यात प्रथमच "गुरुद्वारा" मध्ये जाण्याचा योग आला. एक उत्तम प्रवचन ऐकावयास मिळाले, कीर्तन आणि गुरु ग्रंथसाहीब यांच्यासमोर माथा टेकविण्याची संधी मिळाली. असे संकेत (मग कोणी कितीही स्वप्न = मेंदूमधील रासायनिक बदल वगैरे चिकीत्सा करो) हे भक्ती दृढ करतात.
स्वप्नांचा अनुभव बरेचदा येतो.

 
^ वर