पंडित नेहरू

स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेली नावे म्हणजे निर्विवादपणे महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरु. भारतात दोन्ही नावे जितकी प्रसिद्ध तितकीच कधी कधी विवादास्पद (विशेषतः काही विशीष्ठ विचारसरणीच्या लोकांमध्ये) दिसतात. गांधी नेहरु म्हंटल की वितंडवाद घालणार्‍यांना जणू चेवच चढतो. त्यातही गांधीजींच्या विषयी बोलताना बरेच 'कॉग्रेस विरोधी' देखिल त्यांच्यातील गुणांविषयी टिप्पणी करताना सावध असतात. 'माणूस अतीशय तत्वनिष्ठ, सत्यप्रिय पण भारताची वाट लावली हो!' असे काहीसे ऐकायला मिळते. पण नेहरुंच्या बाबतीत मात्र 'एक नम्बरचा *** माणूस! इंग्रजांना देशविकलेला बदफैली माणूस' वगैरे वगैरे मुक्ताफळे उधळत विचारांचा अबलख घोडा चौफेर उधळतो. नेहरुंविषयी माझा काही फारसा अभ्यास नाही पण (वरती उल्लेखलेलं) 'असं का होत असावं?' ह्या कुतुहुलातुन नेहरुंविषयी थोडी माहिती वाचली काही जुने वाचलेले होतेच त्यातुन थोडासा विचारांचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला.

नेहरुंचे कर्तुत्व :

नेहरूंची माझ्या मनातील प्रतिमातरी अतीशय हुशार, विद्वान आणि पंडित उपाधीला साजेसे व्यक्तिमत्व अशीच आहे. 'डिस्कवरी ऑफ इंडीया' सारखा ग्रंथ लिहिणे हे काही येर्‍या गबाळ्याचे काम नाही. त्यांची पंतप्रधानपदाची कारकिर्द देखिल मला उल्लेखनीयच वाटते. प्रचंड लोकसंख्या असलेला परकिय राजवटीने दरिद्री झालेला हा देश सांभाळणे अतीशय अवघड काम होते. आज भारताची जी काय प्रगती सुरु आहे त्यात नेहरुंचा वाटा मला तरी खूप मोठा वाटतो. त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नेहरुंनी ओळखलेले शिक्षणाचे महत्व. आय.आय.टी. ,AIMS (एम्स) ह्या अत्युच्च दर्जाच्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संस्था उभारण्यात त्यांचा वाटा होताच पण त्यांनी सुरु केलेल्या पंच वार्षीक योजनांमधुन खेड्यापाड्यात प्राथमिक शिक्षण पोहचण्यास सुद्धा बरीच मदत झाली.

अभियांत्रिकी शिक्षण देणार्‍या आय आय टी सारख्या संस्था तर आज जग विख्यात आहेत. अमेरिकेतल्या निवड विद्यापीठानंतर दर्जाच्या बाबतीत आय आय टी येतात असे वाचल्याचे आठवते. आजच्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात चीनने जगाच्या मजुरीचा मक्ता घेतला तर भारताने माहिती तंत्रज्ञानाचा मक्ता (पांढरपेषा कामे) घेतला ह्यात मला नेहरूंनी रुजवलेले उच्चशिक्षणाचे महत्व दिसते.भारतातुन जितक्या प्रमाणात गुणवत्ता असणारे अभियंते आज जगभर पुरवले जातात तेवढे इतर कुठल्या देशातुन जात नसावेत असं मला तरी वाटतं.

नेहरुंच्या दुरदृष्टी बाबतीत मला त्यांचे दुसरे एक आठवणारे उदाहरण म्हणजे बाँबे हाय. भारतात तेलसाठे शोधण्यासाठी भारतीय तंत्रज्ञांनी मुंबईजवळ समुद्रात खोदण्यास सांगीतले होते. त्याचवेळेस जर्मनीहुन बोलावलेल्या आणखी एका तज्ञांच्या गटाने इथे तेलसाठे मिळणार नाहीत असे सुचवले होते. अश्यावेळेस नेहरूंनी आपल्या तंत्रज्ञांवर अधिक विश्वास दाखवला आणि मुंबई जवळ समुद्रात खोदकाम केले. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत तिथे खनिज तेलाचे विपुल साठे मिळाले ज्याचे महत्व आनन्यसाधारण आहे. अशी अनेक छोटी छोटी उदाहरणे शोध घेतल्यास सापडतील.

नेहरूंविषयी रोष का ह्याचा शोध घेताना वरचेवर मिळणारे मुद्दे म्हणजे,

१) नेहरुंची लायकी नसताना गांधीजींनी त्यांना बहुमतास धुडकावुन काँग्रेसचे अध्यक्षपद दिले.
२) त्यांचे ऍडविना माउंटबॅटन ह्यांच्याशी असलेले (कथित) प्रकरण
३) त्यांनी आणलेला समाजवाद

१) नेहरुंची लायकी नसताना गांधीजींनी त्यांना बहुमतास धुडकावुन काँग्रेसचे अध्यक्षपद दिले.

बहुमताने सरदार पटेलांना निवडुन दिले होते. पण गांधींजींना पटेल गृहमंत्री म्हणून हवे होते. इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा म्हणजे, गांधीजींनी परस्पर बहुमत धुडकावुन लावले नाही की पटेलांवर कसलीही सक्ति केली नाही. पटेलांना विश्वासात घेउन त्यांच्या संमतीने त्यांना बाजुला केले. अंतिम निर्णय हा पटेलांचा होता (गांधीजी किंवा नेहरूंचा नाही) तसेच त्यावेळचे राजकिय संदर्भ देखिल वेगळे होते. मला पाठींबा असुनही अध्यक्षपद का नाही? असे म्हणत आजच्या राजकारण्यांसारखा पटेलांनी फुटुन स्वतंत्र पक्ष स्थापन केला नाही. ह्यावरुन मलातरी पटेलांना गांधीजींचे म्हणणे पटले असावे असे वाटते.

२) त्यांचे एडविना माउंटबॅटन ह्यांच्याशी असलेले (कथित)प्रेम प्रकरण

अजुनही हे सिद्ध करणारा ठोस पुरावा नाही. एडविना ह्यांच्या कन्येने लिहिलेल्या पुस्तकावरुन वगैरे असे घडले होते असे मानण्यास बरीच जागा असली तरी ह्याला पुराव्यांची पुष्टी नाही. आणि समजा जरी असले प्रेमप्रकरण तर त्यावरुन नेहरूंचे सर्व कर्तॄत्व धुळिला मिळते का? शेवटी नेहरू देखिल माणूस होते आणि अश्या गोष्टी/चुका माणसाकडुन घडतच असतात. त्याचबरोबर ह्या प्रकरणाचे मला समर्थन करायचे नसले तरी ती एक खाजगी बाब असल्याने मला तरी त्यावरुन एखाद्याचे कर्तृत्व धुळीला मिळवणे पटत नाही.

३) त्यांनी आणलेला समाजवाद

भारत स्वतंत्र झाल्यावर भारतासमोर महासत्ता म्हणून दोन उदाहरणे होती. भांडवलवादी अमेरिका आणि साम्यवादी रशिया. आजच्या सारखा साम्यवादाचा पाडाव तेव्हा झालेला नव्हता. रशिया आणि भारत नेहेमीच मैत्रीपूर्ण संबध होते आणि दोन्ही देश भौगोलिक दृष्ट्या देखिल जवळ होते. अश्या वातावरणात पुर्णपणे साम्यवादी विचारसरणीवर देशाची उभारणी करण्याचा मोह कुणालाही झाला असता पण अश्यावेळेस नेहरूंनी केलेला लोकशाही आणि समजावादाचा पुरस्कार मला अधिक भावला. माओने केलेल्या साम्यवादाच्या पुरस्काराने चीनमधील सामान्यजनतेला वेठबिगारी मजुर बनवले त्यापेक्षा आपली परिस्थीती बरीच बरी असे मला तरी वाटते.

शेवटी :

नेहरुंनी केलेल्या राज्य कारभारात अनेक त्रुटी, चुकिची धोरणे असतील हे मला मान्य आहे. पण इतक्या मोठ्या देशाचा पसारा सांभाळताना १००% बरोबर कुणीच राहु शकले नसते. तेव्हा नेहरुंना खलनायक ठरवण्याइतके नेमके त्यांनी देशाचे काय वाकडे केले ते ज्ञानी लोकांकडुन जाणुन घ्यायला आवडेल.

---
वरील मुद्द्यांवर किंवा त्याबाहेर देखिल नेहरुंविषयी उपक्रमींकडुन नविन माहिती मिळवण्यासाठी हा लेख लिहित आहे.

Comments

चांगला हेतु आणि प्रयत्न.

आपला हेतु आणि प्रयत्न स्तुत्य आहे.

भारतातील नद्यांचा प्रश्न सोडवण्याचाही नेहरु यांनी प्रयत्न केला होता. त्यासाठी विश्वशरैया यांना ९२ व्या वर्षी पूर्ण भारताचा दौरा करावयाला सांगितलेला होता.

नेहरुंच्या बाबतीतले मोठे अपयश म्हणजे चिनकडुन झालेला पराभव.

बाकी जसे आठवेल तशी भर टाकण्यात येईल.

चांगला चर्चा विषय

पटेल व नेहरू यांच्यात वाद पंतप्रधानपदावरून कधीच झाला नाहि. पटेल हे आपखुशीने व समंजसपणे त्यापदापासून दूर राहिले. मात्र त्यांच्यात वाद स्वातंत्र्यानंतर साडेपाच पहिन्यांनी ऊफाळून आला ते नेहरू व पटेल माऊंटबॅटनकडे राज्य परत तुम्हिच चालवा सांगायला गेले तेव्हा. आपल्या नशीबाने माऊंटबॅटन यांनी या गोष्टीला नकार दिला.
हे जेव्हा गांधींना कळले तेव्हा ते फार अस्वस्थ झाले व त्यांनी पटेल अथवा नेहरू यांपैकी एकाला मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागेल असे सांगितले. तेव्हा मात्र् दोघांमधील वाद पराकोटीला पोचला
इथे
गांधीहत्येच्या दिवशी प्रार्थनेपूर्वी गांधीजींनी पटेलांना निर्वाणीचा इशारा दिला. न जाणो जर गांधी हत्या झाली नसती तर कदाचित काँग्रेस फुटलेली दिसली असती. (संदर्भ: महात्मा गांधी: द लास्ट फेज: खंड २ -- प्यारेलाल)

तेव्हा गांधीकडून नेहरूंबाबत "क्लीयर पार्शिआलिटी" होती खरेच. काँग्रेस कार्यकारिणीच्या भाषणात नि:संदिग्धपणे गांधीजी म्हणतात "चळवळीच्या निमित्ताने आम्हि एकमेकंचे सहकारी बनलो, त्या क्षणापासून जवाहरलालशी माझे अनेक बाबतीत मतभेद आहेत, हे मी पुर्वीहि बोललो होतो आणि आताहि बोलत आहे. तरिही माझा राजकीय वारस जवाहरलाल आहे. राजाजी नव्हेत" (संदर्भः महात्म्याची अखेरः जगन फडणीस)

माझ्याकडे एक "पत्रगुच्छ" नावाची (संकलक दा. न. शिखरे, प्रकाशन गांधीभवन कोथरूड) एक गांधींनी लिहिलेल्या पत्रांची पुस्तिका आहे त्यात अनेक पत्रांबरोबर गांधीजीनी नेहरू यांना लिहिलेली अनेक पत्र आहेत. त्यातून नवे नेहरू उलगडत जातात. त्यातील एक पत्र अतिशय सुंदर आहे व गांधीच्या स्वप्नातील भारत ते नेहरूंना सांगत आहेत आपले मतभेद मांडत आहे (वेळ मिळताच ते इथे टंकेन) त्यातील समारोपात ते म्हणतातः
"आपणा उभयतांतील स्नेहबंधन केवळ राजकीय नाहि त्याहून खोल आहे. आपण स्वातंत्र्यासाठी जगत आहोत आणि आनंदाने मरूहि. भारताच्या सेवेसाठी मला १२५ वर्षे जगायचे आहे. पताता मी वृद्ध झालो आहे हे हि कबूल केले पाहिजे. माझ्या मानाने तुम्हि नक्कीच तरूण आहात, म्हणून मी तुम्हाला माझा "वारस" संबोधले. तथापि माझ्या वारसा मी समजावून घेतले पाहिजे आणि माझ्या वारसाने मला समजावून घेतले पाहिजे, तरच मला संतोष होईल आणि यासाठीच हा पत्रप्रपंच"

तर असे अनेक संदर्भ मिळतात की नेहेरूंच्यासाठी गांधीजी आग्रहि होते. मात्र यांत "नेहेरूंची लायकी नसतांना" हा जो काहि आरोप आहे त्याला काहिहि संदर्भ आहेत असे वाटत नाहि. नेहरूंचे चरित्र मी काहि फारसे अभ्यासले नाहि. मात्र जितके वाचले आहे त्यावरून ते एक देशभक्त, उत्तम प्रशासक व दुरदृष्टी असलेले नेते होते हे नक्की.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

प्रतिसाद आवडला

मस्त प्रतिसाद ऋषीकेश! हा लेख उपक्रमावर टाकल्याचे सार्थक झाले.

त्यातील एक पत्र अतिशय सुंदर आहे व गांधीच्या स्वप्नातील भारत ते नेहरूंना सांगत आहेत आपले मतभेद मांडत आहे (वेळ मिळताच ते इथे टंकेन)

अगदी अवश्य टाका. वाट पहात आहे.

उत्तम प्रतिसाद

तर असे अनेक संदर्भ मिळतात की नेहेरूंच्यासाठी गांधीजी आग्रहि होते. मात्र यांत "नेहेरूंची लायकी नसतांना" हा जो काहि आरोप आहे त्याला काहिहि संदर्भ आहेत असे वाटत नाहि. नेहरूंचे चरित्र मी काहि फारसे अभ्यासले नाहि. मात्र जितके वाचले आहे त्यावरून ते एक देशभक्त, उत्तम प्रशासक व दुरदृष्टी असलेले नेते होते हे नक्की.

माझेही हेच मत आहे. किंबहुना स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या विलीनीकरणाच्या वेळी (ज्याचे संपूर्ण श्रेय केवळ वल्लभभाईंना देण्यास काही लोक विसरत नाहीत व त्याचा सूर अनेकदा 'पटेल होते म्हणूनच हे झाले, नेहरु असते तर झाले नसते'. किंवा 'नेहरु असूनही पटेलांनी कणखरपणा दाखवला' असा असतो) नेहरुंनी अभूतपूर्व निग्रहाने संस्थानिकांना भारतात सामील होण्यासाठी प्रयत्न केले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संध नायक

स्वातंत्र्याचा लढा हा एक संघटीत लढा बनत गेला. त्या लढ्याचे शेवटचे संघनायक गांधीजी ठरले आणि स्वातंत्र्यानंतर घडी बसवायच्या संघाचे नायक नेहरु. संघाच्या विजयाचे श्रेय हे संघाचे असते. मला वाटते की प्रत्येक जबाबदारी संघनायकाची असु शकत नाही तसेच विजय अथवा पराभवाला संघनायक सर्वस्वी जबाबदार नसतो. पण संघनायक म्हणून जबाबदारी घेणे हे संघनायकाचे कर्तव्य असते. संघनायकाला/संघातल्या घटकाला सर्वस्वी नायक/खलनायक बनवणे चुकीचे आहे. भारतात व्यक्तिपुजेचे स्तोम आहे हे सत्य आहे आणि त्यातुन हे प्रकार अस्तित्वात आहेत. नेहरुंनी सही केली म्हणजे विधेयक नेहरुंनीच हाताने लिहुन स्वतःच्या हाताने बनवले असे नाही. पण भारतीय मानसिकतेमध्ये यश आणि अपयशाची दोन टोकांची जी जुगलबंदी आहे त्यातुन माझंच घोड आणि जाउदे पुढं हे दिसते. त्यामुळे नेहरु एकतर सर्वस्वी ग्रेट अथवा नालायक हे मत प्रवाह दिसुन येतात.





हेच तर म्हणणे आहे

संघनायक म्हणून जबाबदारी घेणे हे संघनायकाचे कर्तव्य असते.

हेच तर म्हणणे आहे. नेहरु संघनायक असतानाही विलीनीकरणाचे श्रेय (एकट्या) पटेलांना व चीन-काश्मीर वगैरे अपयशाचे धनी (एकटे) नेहरु हा विरोधाभास पटत नाही. किंबहुना विलीनीकरणाची जबाबदारीही नेहरुंचीच होती असे म्हणावेसे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बरोबर

मुळातच खोलवर अभ्यास केल्यास असे नक्कीच जाणवते की शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आणि समाजातली विषमता यामुळे भारतीयांची राजकारणातली उदासिनता ही सुद्धा या प्रकारांना तेंव्हा पासून खतपाणी घालत आली आहे. आजचे भारतीय राजकारणाला गलिच्छ - अस्पृष्य मानतात याचे कारण काय? याला जबाबदार कोण?
तसेच जबाबदारी संघनायकाची असली तरी मॅन ऑफ द मॅच हा सुद्धा अस्तित्वात आहेच. थोडक्यात संघाचा विजय महत्वाचा आहेच. पण त्याच सोबत उठावदार कामगीरी सुद्धा असतेच. पटेलांना समर्थन म्हणून हा मुद्दा लिहित नाही. पण जर घटनेचे श्रेय फक्त आंबेडकरांना जाऊ शकते तर मग विलिनीकरणाचे श्रेय पटेलांना द्यायला विरोध का होतो? हे सगळे मुद्दे बाजुला ठेवु. नेहरुंने हे हे निर्णय चुकले हे काँग्रेसने आजवर मान्य केले आहे का? प्रगल्भतेचा वसा सगळ्यांनीच घ्यायला हवा आणि ज्यांना समाज आदर्श समजतो त्यांनी आदर्श ठेवायला हवा. जसा आता सोनिया गांधींनी पंतप्रधान पदाची खुर्ची त्याग करुन ठेवला आहे तसा. बरोबर ना?





सहमत

भारतात व्यक्तिपुजेचे स्तोम आहे हे सत्य आहे आणि त्यातुन हे प्रकार अस्तित्वात आहेत. नेहरुंनी सही केली म्हणजे विधेयक नेहरुंनीच हाताने लिहुन स्वतःच्या हाताने बनवले असे नाही. पण भारतीय मानसिकतेमध्ये यश आणि अपयशाची दोन टोकांची जी जुगलबंदी आहे त्यातुन माझंच घोड आणि जाउदे पुढं हे दिसते. त्यामुळे नेहरु एकतर सर्वस्वी ग्रेट अथवा नालायक हे मत प्रवाह दिसुन येतात.

सहमत आहे. भारतात व्यक्तीपूजा सर्वोच्च प्रतीची आहे असे वाटते. इथे नेहरू सर्वस्वी ग्रेट असे अजिबात म्हणायचे नाही. त्यांनी चुका केल्या आणि त्या चुकांवर पांघरूणही घालायचे नाही. मुद्दा असा की त्यांनी आणि त्याकाळच्या चळवळीतील सर्व नेत्यांनी बर्‍याच गोष्टींचा त्याग करून स्वातंत्र्य मिळवले. त्यांच्याविषयी बोलताना ही जाणीव असली तर बरे असे वाटते. हा अप्रोच कदाचित अति-रोमँटिक असेलही, पण जेव्हा स्वतःला त्या जागी ठेवून बघतो तेव्हा त्यांच्या त्यागाचे, निष्ठेचे दर्शन होते. मला आत्ता नोकरी, करियर सोडून देशासाठी आपले आयुष्य दे असे म्हटले तर तसे करता येईल की नाही याबद्दल शंका वाटते. बहुधा नाहीच म्हणेन आणि त्यासाठी काहीतरी रॅशनलायझेशन शोधून काढीन.

ही सर्व माणसेच होती, चुका त्यांच्याकडून झाल्याच. आणि त्या चुकांकडे डोळसपणे पहाणेही योग्यच आहे. पण म्हणून मी काहीही न करता, त्यांच्या त्यागाची किंचितशी जाणीवही न ठेवता मनाला येईल तसे त्यांना झोडणे हे कुठेतरी मनाला खटकते.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

जर तर

जर तरच्या गोष्टी इतिहासाबद्दल बोलणे योग्य नाही. या नेत्यांनी जे काही चांगले वाईट केले त्याची चांगली वाईट फळे आज आम्ही भोगत आहोत. चुका सर्वांकडुन होतात हे ही मान्य आहे. पण गेल्या सहा दशकांमध्ये आम्ही भारतीयांनी अशा कोणत्या चुका केल्या कि त्याची फळे आज सुद्धा आम्ही विकसनशील देश म्हणून भोगतो आहोत? येथे परत विकासाची व्याख्या हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. सध्या करिता जगमान्य व्याख्याच मान्य करु. चर्चेत आले आहे त्या प्रमाणे पायाभुत सुविधांचा सुकाळ असलेल्या देशांमध्ये नेहरु गांधी घराण्याने आपले तारुण्य घालवले आहे. भारता बद्दल त्यांना असे कधी का वाटले नाही की येथे पायाभुत सुविधा करणे ही प्राथमिकता आहे. जाती गाडणे हि प्राथमिकता आहे? या घराण्याकडे हि सत्ता नेहरुंमुळेच आली हे तरी आपल्याला मान्य करावे लागेल. मग हे प्रश्न त्यांच्यामुळेच सुरु झाले आहेत. मनात जाणीव आहे म्हणून न झोडणे उमगले नाही. याच नात्याने प्रत्येक घरात डोकावून पाहिले तर जाणीवांचा अतिरेके/दुष्काळ अथवा आणखी काही पहायला मिळाले तर नवल नाही. तेथे तर खुद्द आपल्यावर केलेले उपकार असतात. मला हा मुद्दा या चर्चेत गैरलागु वाटतो.

जेव्हा स्वतःला त्या जागी ठेवून बघतो तेव्हा त्यांच्या त्यागाचे, निष्ठेचे दर्शन होते. मला आत्ता नोकरी, करियर सोडून देशासाठी आपले आयुष्य दे असे म्हटले तर तसे करता येईल की नाही याबद्दल शंका वाटते. बहुधा नाहीच म्हणेन आणि त्यासाठी काहीतरी रॅशनलायझेशन शोधून काढीन.

इथेच तर भारतीयांची खुबी आहे. मनातुन लढा प्रत्येकाला द्यायचा असतो. पण सालं मन काही ऐकत नाही. त्याला साप भी मरे और लाठी भी न टुटे हवे असते. जे शक्य नसते. करा अथवा करु नका. करायचे आहे पन जमणार नाही याला काहीच अर्थ नाही. आज भारताल्या नव्या राज्यक्रांतीची गरज आहे. पण क्रांती करणार कोण? अनिवासी भारतीय? राजकारणारा गलिच्छ मानणारे मध्यमवर्गीय? नक्की कोण? या मानसिकतेची बीजे कोणी रोवली? लोकशाहीत निर्णय लोकांच्या हिताचा घ्यायचा असतो भावनेने नाही. इथे तर हळव्या चाचा नेहरुंचे भावबंध प्रत्येक निर्णयात दिसतात. मग त्यांचे सगळेच निर्णय योग्य होते अथवा चुकलेले द्या हो सोडून म्हणणे मला तरी पटत नाही. अहो साधे संकेतस्थळावरच्या प्रतिसादात जर कोणी संपादकाने भावना आडवी आणली तर सदस्य हलकल्लोळ करतात असे वाटते. (मी संपादक नाही.) मग एवढ्या महत्वाच्या निर्णयांमध्ये भावना?
कोलबेरने वर लिहिले आही कि शिक्षणसंस्था हा एक त्यांचा सर्वात मोठा दुरदर्शी निर्णय आहे. मान्य, पण आज त्या संस्थांमधुन भारतासाठी नक्की कितपत संशोधन अथवा भारतप्रेम व्यक्त होते हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. बाकी जर-तर चे अनेक मुद्दे निघतील. पण घडलेल्या गोष्टींना जर-तर लावण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून चुकले कुठे आणि त्यातुन काय धडा घ्यावा असा विचार करणे योग्य. चुका दिसल्या तर त्या दाखवल्याने भावना दुखावण्याचे काही कारण नसावे.
शेवटी एक सांगावेसे वाटते की चुका नेहरुंच्या असा सुर दिसत असला तरी त्या आहेत भारतीयांच्या. व्यक्तिपुजा करुन, आंधळेपणाने एकाच घराण्याच्या हातात दशकानुदशके सत्ता देणे हि चुक नेहरुंची नक्कीच नाही.





गैरसमज

गैरसमज होतो आहे.

मग त्यांचे सगळेच निर्णय योग्य होते अथवा चुकलेले द्या हो सोडून म्हणणे मला तरी पटत नाही.
सोडून द्या असे मी कुठेच म्हटलेले नाही. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत हे ही मान्य. मी कुठेही त्यांच्या चुकांचे समर्थन केलेले नाही.

माझी विनंती फारच किरकोळ आहे. चुका सोडून द्या, पांघरूण घाला असे मी कुठेही म्हणत नाही. चर्चा जरूर करा. आपल्यासाठी कुणी साधे, छोटेसे काम केले तर आपण त्याची जाणीव ठेवतो. मग ज्यांनी आपला देश स्वतंत्र केला त्यांच्याबद्दल बोलताना थोडा आदर बाळगला तर काहीच हरकत नसावी. आणि ही भावना फक्त नेहरूंसाठी नसून त्या काळातील सर्व स्वातंत्र्यवीरांसाठी आहे हे लक्षात घ्यावे.

आता वाटते की कदाचित हे म्हणणे फारच वैयक्तिक होते आहे त्यामुळे सोडून दिले तरी चालेल.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

गैरसमज अजिबात नाही

गैर समज अजिबात नाही झालेला. तु चुकांचे समर्थन करा म्हणतो आहेस असेही म्हणायचे नाही. प्रश्न वृत्तीचा आहे. तु जो मुद्दा मांडला आहेस त्याच सगळ्यांनीच विचार करायला हवा.

ही भावना फक्त नेहरूंसाठी नसून त्या काळातील सर्व स्वातंत्र्यवीरांसाठी आहे हे लक्षात घ्यावे.

या भावनेचा विसरच खास करुन नेहरु अनुयायांना पडतो. त्यांच्या कडुन फक्त नेहरु गांधी होते म्हणून स्वातंत्र्य मिळाले ही भावना पेरली जाते. हि भावना काँग्रेसनेच वाढीला लावली तर? पण नाही. सावरकर/बोस सोडाच हो, टिळकांचेही नाव फारसे नसते काँग्रेसकडे.
मध्ये एकदा काँग्रेसकडून एक वक्तव्य झाले होते. भाजपाने स्वातंत्र्य लढ्यातला त्यांचा सहभाग अथवा सहभाग असलेले नेते दाखवावेत. काँग्रेसकडून असे वक्तव्य होणेच हास्यास्पद आहे. याचा अर्थ मी भाजपाची बाजू घेतो आहे असा मुळीच नाही. पण प्रश्नाचे मुळ कोठे आहे ते दाखवायचा प्रयत्न आहे. तसेच सोनिया गांधींनी वेळोवेळी नेहरु ते राजीव यांचा सहभाग-बलिदाने(?) प्रत्येक सभेत बोलणे गरजेचे आहे का? याचे ही उत्तर मिळावे असे वाटते. कारण शेवटी त्या नेहरुंशी संबंधीत आहेत. असो.





परफेक्ट!

त्यांच्या कडुन फक्त नेहरु गांधी होते म्हणून स्वातंत्र्य मिळाले ही भावना पेरली जाते. हि भावना काँग्रेसनेच वाढीला लावली तर? पण नाही. सावरकर/बोस सोडाच हो, टिळकांचेही नाव फारसे नसते काँग्रेसकडे.

व्यक्तिपूजा ही काँग्रेसची जुनी खोड आहे. गांधीजी आणि पं. नेहरू महान होते, त्यांचे भारतीय स्वातंत्र्य-संग्रामाला मोठे योगदान लाभलेले आहे यात शंकाच नाही. पण बाकी कोणी स्वातंत्र्यासाठी त्याग केला आहे, अनेकांनी बलिदाने दिली आहेत, याचा त्यांना सोईस्कररित्या विसर पडतो.(मग ते काँग्रेसचेच लोकमान्य टिळक असोत किंवा त्यांच्याशी मतभेद् असलेले सशस्त्र क्रांतिकारक असोत.)
अगदी आजच्या काळातही नेहरू घराण्यातील सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद न स्विकारून किती मोठा 'त्याग' केला आहे, हे काँग्रेसकडून वारंवार अधोरेखित केले जाते. मग सध्याचे बाकीचे काँग्रेस नेते काहीच नाहीत का?

नेहरू - पटेल

माझेही हेच मत आहे. किंबहुना स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या विलीनीकरणाच्या वेळी (ज्याचे संपूर्ण श्रेय केवळ वल्लभभाईंना देण्यास काही लोक विसरत नाहीत व त्याचा सूर अनेकदा 'पटेल होते म्हणूनच हे झाले, नेहरु असते तर झाले नसते'. किंवा 'नेहरु असूनही पटेलांनी कणखरपणा दाखवला' असा असतो) नेहरुंनी अभूतपूर्व निग्रहाने संस्थानिकांना भारतात सामील होण्यासाठी प्रयत्न केले.

वरकरणी, तत्वतः मान्य होऊ शकेल असा मुद्दा आहे, जर सनावळ्या पाहील्या नाहीत तर. -

भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला, ब्रिटीशांनी जशी फाळणी निश्चित केली, तसेच सुमारे सहाशे संस्थानिकांना निर्णयस्वातंत्र्य (भारत-पाकीस्तानात रहायचे का स्वतंत्र संस्थान म्हणून रहायचे) हे देण्यात आले. लगोलग, काँग्रेस वर्कींग कमिटीने (स्वातंत्र्याच्या आधी) संस्थानिकांशी बोलण्याचे काम हे पटेलांवर सोपवले. पटेलांनी मे १९४७ मधे काम सुरू केले आणि १५ ऑगस्ट १९४७ च्या आधीच भारताच्या हद्दीतील तीघांचा अपवाद सोडल्यास सर्व संस्थानिकांना नव्याने तयार झालेल्या देशात सामिल करून घेतले. हे काम त्यांच्यावर विशेष जबाबदारी म्हणून दिले होते, त्यात नेहरूंचा पंतप्रधान असण्याचा आणि सरदार पटेलांनी उपपंतप्रधान/गृहमंत्री असण्याचा संबंध येत नाही कारण सगळेच १५ ऑगस्ट १९४७ च्या आधी झाले होते.

यात अपवाद होता तो तीन संस्थांनांचा - जुनागड, हैद्राबाद आणि काश्मिर. यातील काश्मिर प्रकरणी, नेहरू स्वतः काश्मिरी पंडीत असल्याने म्हणा अथवा अजून काही कारण असेल, पण त्यांनी पटेलांना अजिबात पडून दिले नाही आणि संयुक्त राष्ट्रसंघात हा प्रश्न (पहील्या युद्धानंतर) नेण्याचा निर्णय पण स्वतःच घेतला. परीणाम माहीत आहेतच. त्यावरून धडा शिकून पटेलांनी निजामाच्या विरुद्ध हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचा फायदा घेऊन "पोलीस ऍक्शन" (जी गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत असते) ही स्वतःच्या अधिकारांतर्गत घेतली आणि हैद्राबाद भारतात सामील झाल्याचेच नेहरूंना सांगितले...

हे श्रेय संपूर्ण पटेलांच्या कणखरपणाचे आणि मुत्सदेगिरीचे का आहे हे या वरून समजेल...

या उलट नेहरूंनी काय केले? १९६२ च्या चीनकडून झालेल्या पराभवाचा ठपका कृष्णमेनन वर ठेवला आणि त्यांचा राजीनामा घेतला. "buck stopped earlier in hierarchy..."

विकीपीडियावरुन साभार

विकीपीडियातील परिच्छेदाचे मराठीत स्वैर भाषांतरः

काँग्रेसने (स्वातंत्र्याच्यावेळी) अशी भूमिका घेतली की ब्रिटिश निघून जाताना स्वतंत्र होणारी संस्थाने ही सार्वभौम नाहीत. त्यामुळे ती वेगळे राहण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. या संस्थानांनी भारत किंवा पाकिस्तानात सामील व्हावे. जुलै १९४६ मध्ये नेहरुंनी असे मत व्यक्त केले की स्वतंत्र भारताच्या सैन्याचा मुकाबला करणे कोणत्याही वेगळ्या राहिलेल्या संस्थानाला शक्य होणार नाही. जानेवारी १९४७ मध्ये त्यांनी सांगितले की स्वतंत्र भारतामध्ये संस्थानिकांच्या (यापूर्वीच्या) हक्कांना मान्यता मिळणार नाही. मे १९४७ मध्ये नेहरुंनी असे सांगितले की जे संस्थान भारतात सामील होण्यास विरोध करेल त्यांना भारताचे शत्रू मानण्यात येईल.

याउलट संस्थानांचे सामीलीकरण करणाऱ्या वल्लभभाई पटेल आणि व्ही. पी. मेनन यांनी थोडी सामंजस्याची, तडजोडीची आणि समजूतदारपणाची भूमिका घेतली (मूळ शब्द conciliatory असा आहे. त्याचा अर्थ पाहावा)

आपला,
(विकीपंडित) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अजून विकीपिडीया

माझे मूळ उत्तर हे आपल्या, "किंबहुना स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या विलीनीकरणाच्या वेळी ... नेहरुंनी अभूतपूर्व निग्रहाने संस्थानिकांना भारतात सामील होण्यासाठी प्रयत्न केले" या वाक्याच्या संदर्भात होते. पटेलांचा हा इतिहास विकीपिडीयावर नव्याने तयार झालेला नाही, जरी संकलीत केला गेला असला तरी.

आपण सांगितल्यावर विकीवरील पटेलांचे पान पाहीले - कदाचीत आपण संदर्भ दिला त्याचा दुवा हा असावा. (चु,भू. द्या.घ्या.) यात असेही म्हणले आहे: Gandhi had said to Patel "the problem of the States is so difficult that you alone can solve it"...He proposed favourable terms for the merger, including creation of privy purses for the descendants of the rulers. While encouraging the rulers to act with patriotism, Patel did not rule out force, setting a deadline of 15 August 1947 for them to sign the instrument of accession document.

गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल-गांधी-नेहरू-पटेल

बदल

माझी चूक लक्षात आली आहे.

कृपया माझे वाक्य असे वाचावे.

"किंबहुना स्वातंत्र्यापूर्वी संस्थानांच्या विलीनीकरणाच्या वेळी ... नेहरुंनी अभूतपूर्व निग्रहाने संस्थानिकांना भारतात सामील होण्यासाठी प्रयत्न केले.

आपला,
(शुद्धिकारक) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उत्तम

उत्तम चर्चाविषय. यासंदर्भात बरेच लिहावेसे वाटते पण थोडा विचार केल्यानंतर माझ्या मतांची लायकी काय असा प्रश्न पडतो. एकतर स्वातंत्र्यचळवळीबद्दल जी काही माहिती आहे ती सर्व वाचून, ऐकून आणि चित्रपट पाहून मिळालेली आहे. पारतंत्र्यात जगणे म्हणजे नेमके काय याचा अनुभव कधीही आला नाही. अशा वेळी जेव्हा या स्वातंत्र्यवीरांच्या लढ्याच्या कथा वाचतो तेव्हा विश्वरूपदर्शन झाल्यासारखे वाटते. गांधीजींचे विचार वाचले तर ते आचरणात आणणे सोडाच त्यातील एकतरी गोष्ट कन्सिस्टंटली करून दाखवता येईल की नाही याबद्दल शंका वाटते. अशा वेळी त्यांच्या कारकीर्दीतील काही (मला वाटणार्‍या) चुका काढून त्यांची विचारसरणीच कशी चुकीची होती हे म्हणण्याचा नैतिक अधिकार मला पोचतो का? अर्थातच लोकशाहीमध्ये सर्वांना आपापल्या मताचा अधिकार आहे म्हणूनच इथे नैतिक अधिकार म्हटले आहे.

नेहरूंबद्दल चर्चा होतात तेव्हा चीनबद्दल त्यांचे धोरण ही त्यांची मोठी चूक मानली जाते. जे वाचले आहे त्यावरून ही चूक होती असे वाटते. दुसरे म्हणजे लेडी माउंटबॅटन बरोबर त्यांचे संबंध. हे केवळ प्लॅटोनिक होते असे काहींचे म्हणणे आहे. माझ्या मते ते कसेही असले तरी काहीही फरक पडत नाही. ही त्यांची वैयक्तिक बाब होती. भारत अणुशक्तीमध्ये इतका अग्रेसर असण्याची सुरूवात नेहरूंनी भाभा यांना अणुशक्ती कार्यक्रमाचे प्रमुख नेमण्यापासून झाली. भाभा अणुशक्ती केंद्राचा जन्म इथेच झाला. बाकीच्या धोरणातही भारताला सर्व दृष्टीने स्वयंपूर्ण बनवण्याची दूरदृष्टी दिसून येते. डिस्कव्हरी ऑफ इंडियमधले सर्व मुद्दे पटत नसले तरी यावरून त्यांचे चौफेर वाचन दिसून येते.

पहिल्या परिच्छेदातून हे म्हणायचे आहे की मला अशा चौफेर कारकीर्दीवर (फक्त नेहरूच नव्हेत तर त्या काळातील बरेचसे नेते) त्यांनी केलेल्या चुका पाहून त्यांच्यावर एक लेबल लावणे नको वाटते. परत स्पष्ट करतो की लोकशाहीमध्ये अर्थातच सर्वांना असे करण्याची पुरेपूर मुभा आहे.

नेहरूंची माझ्या मनातील प्रतिमा हुषार, चार्मिंग, चौफेर वाचन असलेले आणि दूरदृष्टी असणारे नेते अशी आहे.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

सहमत

नेहरूंबद्दल चर्चा होतात तेव्हा चीनबद्दल त्यांचे धोरण ही त्यांची मोठी चूक मानली जाते.

बरोबर.चीन बद्दल धोरण आणि पाकिस्तान युद्धात युनोत नेलेला प्रश्न हे दोन मुद्दे वरती टाकायचे विसरलो. त्याविषयी पण आणखी कुणी माहिती टाकलीतर आवडेल.

फ्रंटलाईन

काश्मीरच्या विलीनीकरणानंतर शेख अब्दुंलाचा नेहरूंनी विश्वासघात केला अशा आशयाचा हा लेख रोचक ठरावा.

एडविनाशी प्रेमप्रकरण

चांगला लेख. चांगले प्रतिसाद. ही सर्व चर्चा अशीच सुरु राहो. सर्व प्रकरणांतून एक हास्यास्पद वाटणारी घटना नेहमी लिहाविशी वाटते ती अशी की -

एडविना माउंटबॅटन ह्यांच्याशी असलेले (कथित)प्रेम प्रकरण. यामुळे नेमके काय झाले हे मला अजूनही उमगलेले नाही. प्रेमप्रकरणे करणे हा गुन्हा नाही आणि चारित्र्याचे धडे फक्त प्रभू रामांनीच द्यावेत. ;-) माणसाचे व्यक्तिगत आयुष्य आणि राजकारण यांचा ताळमेळ मला कळलेला नाही. हा संबंध कसा लागतो ते कोणाला माहित आहे का?

मोतीलाल नेहरुंचे संपूर्ण कुटुंब हे पाश्चिमात्य रितीरिवाजांना सरावलेले होते. नेहरुंच्या दोन्ही बहिणींचे प्रेमविवाह झाल्याचे स्मरते. नेहरुंचे ठरवून लग्न का झाले याबाबत विशेष माहिती नाही पण अनेक कारणे असू शकतील. तरीही, कमला नेहरुंचे वागणे, बोलणे, राहणे जवाहरलाल नेहरुंना पसंत नव्हते, स्वतःला साजेसे वाटत नव्हते असे अनेक प्रसंगांतून दिसले आहे. खुद्द इंदिरेला आपल्या आईला अशी वागणूक दिल्याबद्दल वाईट वाटत होते. रुढी, रिती-रिवाज यांच्या बंधनांत बहुधा, जवाहरलाल आणि कमला यांची मने जुळली नसावीतही. कमला नेहरु टिबीने बरीच वर्षे आजारीही होत्या म्हणजे सांसारीक सुख फारसे वाट्याला आले नसावे. त्यात जर एडविनासारखी मैत्रीण त्यांना मिळाली असेल तर कोणाचे काय बिघडले कोण जाणे आणि नेहरुंचा इतर इतिहास वगळून प्रेमप्रकरण लक्षात राहावे हे अतिच वाटते.

संबंध

माणसाचे व्यक्तिगत आयुष्य आणि राजकारण यांचा ताळमेळ मला कळलेला नाही. हा संबंध कसा लागतो ते कोणाला माहित आहे का?

यावर माझे मत (जे सरसकट आहे. नेहेरू अथवा एका व्यक्तीसाठी नव्हे):
एखाद्याचे राजकीय आयुष्य वेगळे असले तरी ती व्यक्ती राजकारणात असते ती लोकांचा नेता म्हणून. बहुसंख्य जनता त्या व्यक्तीला आपला "नेता" समजते. जो आपल्या सारखा आहे, आपले प्रश्न समजतो व ते मांडू शकतो. जर अश्या एखाद्या वागणूकीतून तो जर आपल्यापेक्षा वेगळा आहे, आपण करतो, आहोत, वागतो त्यापेक्षा तो वेगळे करतो/आहे/वागतो असे जनतेला वाटले तर लोकांमधील त्याची प्रतिमा बदलते व अर्थातच त्याचा परिणाम राजकीय प्रतिमेवर होतो.

जर नेहेरूंच्या काळात सामान्य जनतेमधेहि बायकोशी पटत नसताना/नसल्याने किमान मैत्रीण असणे समाजमान्य असते तर याचा इतका बाऊ झाला नसता असे वाटते.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

हम्म!

नेहेरूंच्या काळात सामान्य जनतेमधेहि बायकोशी पटत नसताना/नसल्याने किमान मैत्रीण असणे समाजमान्य असते तर याचा इतका बाऊ झाला नसता असे वाटते.

तुझे म्हणणे बरोबरच आहे. त्याकाळी नेहरुंकडे लोकांनी बोट दाखवले असेल तर त्यात गैर नाही. तसेही अशा गॉसिप्स सुरु झाल्या की त्याला चेव चढतोच परंतु माझा प्रश्न असा आहे की आज इतक्या काळानंतरही बर्‍याच लोकांना कारण नसताना, ती जागा नसताना फक्त अफेअरसाठीच नेहरू आठवावेत. :-) (आचार्य अत्र्यांबद्दल होते का प्रत्येक ठिकाणी असे? ते आपले आवडते आहेत म्हणून असावे. :-) )

बाकी, नेहरुंच्या काळातही बायकोखेरीज अनेक लफडी करणारे अनेकजण होते फक्त आपली कॉलर पांढरी कशी हे दाखवण्यात प्रत्येकजण पुढे होता.

काळ

बाकी, नेहरुंच्या काळातही बायकोखेरीज अनेक लफडी करणारे अनेकजण होते फक्त आपली कॉलर पांढरी कशी हे दाखवण्यात प्रत्येकजण पुढे होता.

:)
नेहरुंच्या काळात होते, त्या आधीच्या काळात होते आणि नंतरच्या काळात सुद्धा. शेवटी मैत्री, प्रेम अजरामर असते :)





दुर्दैवी

आज इतक्या काळानंतरही बर्‍याच लोकांना कारण नसताना, ती जागा नसताना फक्त अफेअरसाठीच नेहरू आठवावेत.

ही खरोखरीच दुर्दैवी गोष्ट आहे.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

नेहरू - एडविना

एडविना माउंटबॅटन ह्यांच्याशी असलेले (कथित)प्रेम प्रकरण. यामुळे नेमके काय झाले हे मला अजूनही उमगलेले नाही.

नेहरू आणि एडविना यांच्यात अगदी छान फुलत गेलेलं प्रेम होतंच. एडविनाची धाकटी मुलगी पामेला भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारास पंधरा महिने इथेच वास्तव्यास होती आणि या काळात तिनं तिच्या दैनंदिनीत रोजच्या घटनांच्या नोंदी करून ठेवल्या होत्या. या नोंदींवर आधारित "इंडिया रिमेंबर्ड : अ पर्सनल अकौंट ऑफ माउंटबॅटन्स ड्यूरिंग द ट्रान्सफर ऑफ पॉवर" अशा नावाचं पुस्तक लिहिलंय. स्वातंत्र्यानंतर एडविना परत गेल्यावर नेहरूंचा व तिचा नियमित पत्रव्यवहार होता. ही सारी पत्र पामेलानं वाचली होती यांचाच संदर्भ देऊन तिनं तिच्या आईचं आणि नेहरुंचं एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं असं या पुस्तकात प्रतिपादित केलंय.

एका पत्रात तर नेहरूंनी एडविनाला असं लिहिलंय की ""Suddenly I realised (and perhaps you also did) that there was a deeper attachment between us, that some uncontrollable force, of which I was dimly aware, drew us to one another, I was overwhelmed and at the same time exhilarated by this new discovery. We talked more intimately as if some veil had been removed and we could look into each other's eyes without fear or embarrassment." अर्थात असं असूनही पामेलाचं म्हणणं आहे की हे प्रेम फक्त भावनिकच (प्लेटॉनिक) होतं आणि ते कधीच शारीरिक पातळीपर्यंत गेलं नाही (वरचा उतारा वाचल्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे!)...

अर्थात इथे महत्त्वाचा मुद्दा वर प्रियालीनं म्हटलेला 'त्यामुळे नेमकं काय झालं' हा आहे. हे प्रेम या प्रेमाच्याच पातळीवर राहिलं असतं (भावनिक, शारीरिक जे असेल ते) तर ठीक होतं पण पामेला बाईंचं असंही म्हणणं आहे की तिच्या वडिलांचा या प्रेम प्रकरणाला पूर्ण पाठिंबा (आश्चर्य आहे बुवा!) तर होताच पण इतकंच काय या सत्तांतराच्या काळात कित्येक नाजूक प्रश्नांवर नेहरूंची संमत्ती मिळवायचं काम लॉर्ड माउंटबॅटन एडविनावर सोपवायचे. त्यामुळे या प्रेमप्रकरणानं काही महत्वाच्या निर्णयांमधे महत्त्वाची कामगिरी बजावली असणार हे नक्की.

अवांतर - नेहरू एडविना यांच्या प्रणय कथेवर आधारित लवकरच एक चित्रपटही तयार होतोय असं कळतं . http://entertainment.merinews.com/catFull.jsp?articleID=136813 हा दुवा त्यासाठी वाचा.

- मिलिंद

नॉन सेक्विटूर...

'विश्वास ठेवण्यास अवघड आहे 'याचा अर्थ अमुक निष्कर्षच काढला असं कसा होईल हे कळलं नाही.

मिलिंद

चांगला विषय

हा विषय नक्कीच नवीन आहे आणि नविन माहीती मिळेल असे वाटते. माझे काही मुद्दे वगैरे...

नेहरूंचे आवडलेले कामः
अधुनिक तिर्थक्षेत्रे - भारताच्या अधुनिकीकरणास दिलेली दिशा. त्यात धरणे आली, सार्वजनीक बांधकामे आली, पंचवार्षिक योजना आल्या, आय आय टी, अणुशक्ती, वगैरे बरेच काही.... (जरी यात नंतर भ्रष्टाचार शिरला असला तरी त्यास काही नेहरू जबाबदार होत नाहीत अथवा अशी दिशा देणे चुकीचे ठरत नाही.)

नेहरू चुकीचे कोठे ठरले?

  1. डिसकव्हरी ऑफ इंडीया का "ग्लिंप्सेस ऑफ वर्ल्र्ड हिस्टरी" यातील एका पुस्तकाच्या पहील्या प्रतित (१९४०च्या सुमारास) त्यांनी शिवाजीबद्दल लिहीताना हात मोकळा सोडला होता. कधी काळी ऐकल्याप्रमाणे इतिहासाचार्य राजवाड्यांनी त्यांना पुराव्यानिशी शिवाजी कोण होता हे सांगितले. नंतरच्या प्रतिंमधे अर्थात त्यांनी योग्य बदल केले. मात्र त्यातून एक गोष्ट जाणवली की त्यांचे विचार आणि लेखन हे कुणाच्या (अर्थात त्या संदर्भात ब्रिटीशांच्या) प्रभावाखाली होते.
  2. देशाचा कारभार हा प्रांतिक सरकारे चालवणार हे ठरले असताना आणि भाषावार प्रांतरचना करायची नाही हे ठरलेले असताना, पोट्टी श्रीमालूंच्या आमरण उपोषण आणि त्यातून आलेल्या मृत्यूस पाहून त्यांनी निर्णय बदलला आणि आंध्रप्रदेश हे तेलगू राज्य तयार झाले. नंतरच्या काळात तसे राज्य देण्यास - मुंबई बरोबर अथवा मुंबईवीना, ते महाराष्ट्रासाठी, गुजराथसाठी आणि कर्नाटकासाठी तयार नव्हते. थोडे अवांतर - त्या संदर्भातील मराठी लढा हा आता एक इतिहास आहे, पण त्या संदर्भात नेहरू महाराष्ट्राशी सापत्न वागणूक करू लागले असे लक्षात येताच, "तुम्हाला महाराष्ट्राबद्दल आकस आहे" असे लोकसभेत म्हणत अर्थमंत्री चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिला. नेहरूंनी पुन्हा पुन्हा केलेली विनंती देखील त्यांनी मान्य केली नाही. तरी देखील नेहरूंच्यातील एक गूण म्हणजे चांगले गूण असलेल्या सोडायचे नाही. त्यांनी देशमुखांना त्याच वर्षी स्थापना होत असलेल्या "युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन" चे अध्यक्षपद देऊ केले आणि विनंती केली की ते (देशमुखच) ह्यासाठी योग्य आहेत म्हणून. चिंतामणरावांनी ते मान्य केले मात्र वार्षिक १रुपया मानधनावरच - देशकार्य म्हणून...
  3. वरील सर्व प्रतिसादात आलेला प्रमुख मुद्दा म्हणजे "हिंदी चिनी भाई भाई" म्हणत स्वतःच्या सैनिकांना हिमालयातील बर्फात साधे बूटपण व्यवस्थित न देता ठेवले. त्या संदर्भात येथे (उपक्रमावरील) या चर्चेतील बातमी आणि वाक्ये वाचा...६२चे युद्ध हे त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे लादले गेले. तरी देखील अक्साई चीनचा भाग घेतला म्हणून काय बिघडले तेथे काहीच उगवत नाही असले उद्गार संसदेत काढायला त्यांनी कमी केले नव्हते. अर्थात तरीही नेहरूंचा या सर्व प्रकरणात भ्रमनिरास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
  4. जशी चिनसंदर्भात मोठी चूक केली... तशीच आणि त्याहूनही मोठी चूक ही काश्मिरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याची केली. त्यावर वेगळे लिहावे लागेल. मात्र या दोन चुका अक्षम्य होत्या असे मला वाटते.
  5. सामाजीक क्षेत्रात आंबेडकरांना हवा असलेला हिंदू स्त्री संदर्भातील कायदा त्यांनी मान्य करतो असे सांगितले खरे पण जेंव्हा वेळ आली तेंव्हा राजकीय दिग्गज (राजेंद्र प्रसादांसकट सरोजिनी नायडूंपर्यंत) विरोधात आहेत म्हणल्यावर माघार घेतली. अर्थात नेहरूंचा त्या कायद्याला विरोध होता असे वाटत नाही मात्र निर्विवाद नेतृत्व असताना पण कणखर निर्णय घेण्यात नको तिथे लोकांच्या दबावाला बळी पडले आणि जेथे ऐकायला हवे होते (चीन आणि काश्मिर) तेथे मात्र स्वतःचे नैतिक वजन वापरत रेटले ज्याचे आजही आपण परीणाम भोगत आहोत.

आता काही वर मांडलेल्या मुद्यांसंदर्भात:

नेहरुंची लायकी नसताना गांधीजींनी त्यांना बहुमतास धुडकावुन काँग्रेसचे अध्यक्षपद दिले.
काँग्रेसचे अध्यक्षपद का स्वतंत्र भारताचे पहीले पंतप्रधान म्हणून? मला पंतप्रधान वाटते. पण माहीती असल्यास अवश्य सांगा. येथे माझ्यालेखी प्रश्न नेहरूंच्या लायकीचा नाही तर लोकशाहीची सुरवात करत असतानाच निर्णय घेताना लोकशाही पाळली गेली नाही हा आहे. सर्वात जास्त प्रांतिक कमिट्यांनी पटेलांना निवडले तर इतरांनी (एक एक) आचार्य कृपलानी आणि पट्टाभीसीतारामय्यांना निवडले. अर्थात नेहरूंना निवडले नव्हते. तरी देखील त्यांचे नाव वर्कींग कमिटीत आणून पटेलांना माघार घेयला लावणे हे अयोग्य वाटते - लोकशाही म्हणून. त्या एका चुकीमुळे आजही आपण तेच करत आहोत. आपण कुणालाही निवडून दिले तरी निर्णय दिल्ली घेते. असला प्रकार करणे आणि त्याला लोकशाही म्हणणे हे त्या लोकशाहीची थट्टा आहे.

त्यांनी आणलेला समाजवाद

ह्यात मला काहीच चूक वाटत नाही. किंबहूना आपण त्या वेळेस त्या मार्गाने जाण्याऐवजी भांडवलशाहीच्या मार्गाने त्याच वेळेस गेलो असतो तर आज आपला साउथ अमेरिका झाला असता.

त्यांचे एडविना माउंटबॅटन ह्यांच्याशी असलेले (कथित)प्रेम प्रकरण. अजुनही हे सिद्ध करणारा ठोस पुरावा नाही.

ठोस पुरावा नसलेल्याच काय पण कोर्टात सिद्ध न झालेल्या गोष्टींना पण गुन्हेगार धरण्याचे प्रकार होतात. ते या संदर्भात झाले म्हणून आश्चर्य वाटायचे कारण नाही. त्यांचे कोणाशी प्रेम प्रकरण होते हा त्यांचा एका अर्थी खाजगी मामला आहे. त्यात इतरांनी पडायचा प्रश्न येत नाही. मात्र जेंव्हा असे संबंध असणारी व्यक्ती ही एका नव्याने स्थापलेल्या राष्ट्राचे नेतृत्व असते आणि ज्या स्त्रीवरून हे बोलले जाते ती त्या नवीन राष्ट्रावर दिडशे वर्षे राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांच्या शेवटच्या धाग्याची अर्थात माउंटबॅटनची पत्नी असते, तेंव्हा हे संबंध केवळ त्या दोघांपुरते मर्यादीत रहात नाहीत तर त्याचे परीणाम हे या नवीन राष्ट्राच्या तत्कालीन ऐतोहासीक निर्णयाला पण जोडले जाऊ शकतात. म्हणून ते अयोग्य होते. या संदर्भात आठवते की दुसर्‍या महायुद्धात जेंव्हा ब्रिटन हिटलरच्या विरुद्ध "यशस्वी माघार" घेत होता आणि मार खात होता तेंव्हा चर्चीलने ब्रिटनच्या राणीच्या मागेपण हेर ठेवायला कमी केले नाही कारण काही झाले तरी ती जर्मनवंशीय होती. जेंव्हा देशाचा आणि राज्यकारभाराचा विषय येतो तेंव्हा त्याला व्यक्तीगत चारीत्र्य हे त्या एका गोष्टीला बांधून ठेवावे लागते. ते ही विशेष करून जेंव्हा जे आपले राज्यकर्ते होते त्या परकीय देशातील व्यक्तीशी संबंध ठेवताना असे वाटते. तिथे नेहरूच काय इतर कोणी कुठल्याही देशात चूकच ठरवला जाईल असे वाटते.

....तेव्हा नेहरुंना खलनायक ठरवण्याइतके नेमके त्यांनी देशाचे काय वाकडे केले...

नेहरू खलनायक नव्हते कारण त्यांच्या डोक्यात देशाच्या विरोधात खल नव्हता. त्यांचे देशप्रेम हे पोकळ नव्हते. मात्र मला नेहरू हे समर्थ नेतृत्व देणारे १००% नायक होते असे देखील म्हणावेसे वाटत नाही कारण त्यांनी केलेल्या चुका या त्यांच्या देशप्रेम आणि प्रगतीसंदर्भातील दूरदृष्टीच्या पेक्षा कितीतरी पटीने मोठ्या आहेत असे वाटते.

भाषिक राज्ये

देशाचा कारभार हा प्रांतिक सरकारे चालवणार हे ठरले असताना आणि भाषावार प्रांतरचना करायची नाही हे ठरलेले असताना, पोट्टी श्रीमालूंच्या आमरण उपोषण आणि त्यातून आलेल्या मृत्यूस पाहून त्यांनी निर्णय बदलला आणि आंध्रप्रदेश हे तेलगू राज्य तयार झाले. नंतरच्या काळात तसे राज्य देण्यास - मुंबई बरोबर अथवा मुंबईवीना, ते महाराष्ट्रासाठी, गुजराथसाठी आणि कर्नाटकासाठी तयार नव्हते

यामध्ये नक्की काय चुकीचे आहे? तेलगू राज्य होऊ देणे की मराठी/गुजराथी/कानडी राज्ये तयार न होऊ देणे?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मला वाटतं

मला वाटतं की या उदाहरणातुन एकाच अत्यंत उच्चपदस्थ व्यक्तिच्या निर्णयांमधला विरोधाभास दाखवायचा आहे. अथवा नियमाला स्वतःच अपवाद तयार करण्याचा. विकास उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. बाकी लहानपणी शाळेत चाचा नेहरुंचा जन्मदिन १४ नोव्हेंबर हा बालदिन असे शिकलो होतो. पण तरुण झाल्यावर बालदिन हा व्हॅलेंटाईन दिनानंतर बरोबर ९ महिन्यांनी येतो म्हणून तो बालदिन असे शिकलो :). असो. प्रेम दोन्हीमध्ये सामायिक आहे हा योगायोग आहे.





नेतृत्व

यामध्ये नक्की काय चुकीचे आहे? तेलगू राज्य होऊ देणे की मराठी/गुजराथी/कानडी राज्ये तयार न होऊ देणे?

सर्वप्रथम, भाषिक राज्ये करणे चांगले होते का नाही, याचे मला उत्तर माहीत नाही. ती झाल्यामुळे फार काही बिघडले असे नाही. नसती झाली तर काय विचार होता या संदर्भात माझे वाचन नाही.

चाणक्यकनी म्हणल्याप्रमाणे यात विरोधाभास आहे. पण त्याहूनही अधिक काय दिसते (या निर्णयाशी संबंधात तसेच हिंदू कायदा बदलाच्या संदर्भात घेतलेल्या माघारीत) तर नेतृत्व म्हणून स्वतः निर्णय घेण्याची आणि ते निभावण्याची शक्ती यातील अभाव. बरं यावरून नेहरू हे मृदू असल्याने असे वागले म्हणावे तर काश्मीर आणि चीन संदर्भात तसे दिसत नाही. त्यांना चीन संदर्भात तिबेटवरील हल्ल्यांपासून ते वल्लभभाईंच्या पत्रापर्यंत धोक्याच्या सुचना मिळत असूनही दुर्लक्ष केले, किंबहूना हट्टाग्रहाने उलटच वागले. या संदर्भात माझे म्हणणे होते.

या

जेंव्हा असे संबंध असणारी व्यक्ती ही एका नव्याने स्थापलेल्या राष्ट्राचे नेतृत्व असते आणि ज्या स्त्रीवरून हे बोलले जाते ती त्या नवीन राष्ट्रावर दिडशे वर्षे राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांच्या शेवटच्या धाग्याची अर्थात माउंटबॅटनची पत्नी असते, तेंव्हा हे संबंध केवळ त्या दोघांपुरते मर्यादीत रहात नाहीत तर त्याचे परीणाम हे या नवीन राष्ट्राच्या तत्कालीन ऐतोहासीक निर्णयाला पण जोडले जाऊ शकतात.

या बाबतीत असे म्हणता येऊ शकते. पण एडविनाच्या जागी एखादी भारतीय स्त्री असती तरी असेच झाले असते असे वाटते.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

अंगवस्त्रे

या बाबतीत असे म्हणता येऊ शकते. पण एडविनाच्या जागी एखादी भारतीय स्त्री असती तरी असेच झाले असते असे वाटते.

वास्तवीक आजच्या काळापेक्षा त्या काळात असे संबंध असणे हे जास्त राजरोस होते असे वाटते. म्हणूनच "अंगवस्त्र" हा शब्द प्रचलात आणून एका अर्थी उदात्तीकरण नाही पण समाजमान्यता आणून ठेवली होती. नेहरूंचे अगदी प्रेमप्रकरण असले तरी त्यावेळेस कमला नेहरूं हयात नव्हत्या पण असे अनेक नेते/पुढारी/समाजधुरीण असतील (त्याही काळात आणि आत्ताही) ज्यांचे असे संबंध होते/आहेत आणि जनतेला काही पडले नसते....

अवांतर - बिल क्लिंटन - मोनिका लुइंन्स्कीची कथा बरीच चघळली गेली. पण त्याही बरोबर त्याच कथेतील अनैतिकचे मार्केटींग करत रिपब्लिकन्स आणि जॉर्ज बूशला येणे सोपे गेले... पण बूशच्या ५-६ वर्षाच्या "कारभारा" नंतर एक बोलके बंपर स्टिकर एका गाडीच्या मागे पाहीले - "No One Died When Clinton Lied" :-)

लेखनावर प्रभाव

एखाद्याचा प्रभाव लेखनावर असणे ही मला चुकीची गोष्ट वाटत नाही. त्यातून जर, पुढे आलेले संदर्भ ब्रिटिशांचेच वापरले असतील तर अपुर्‍या संदर्भांवर लेखन केले असे म्हणता येईल. ती चूक नाही. चुकीची गोष्ट तेव्हा ठरती जेव्हा अधिक संदर्भ, पुरावे देऊनही नेहरू शिवाजीला योग्य तो मान न देण्याचा आपलेच बरोबर हा हट्ट पुढे रेटते पण त्यांनी बदल केले हे स्पष्टच आहे.

प्रभाव

>>>एखाद्याचा प्रभाव लेखनावर असणे ही मला चुकीची गोष्ट वाटत नाही.

मी माझ्या प्रतिसादात नेहरूंना या संदर्भात चूक म्हणले असे मला वाटत नाही. किंबहूना या संदर्भात तसेच चिंतामणराव देशमुखांच्या संदर्भात त्यांनी चूक दुरूस्त करायचा आणि योग्य गुणांच्या व्यक्तींना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला असेच म्हणले. (तेच कदाचीत आंबेडकरांच्या बाबतीतही - हिंदू कोड बिलाच्या प्रकरणानंतर आंबेडकराने वैतागून मंत्रीमंडळाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला आणि नंतर रिपब्लीकन पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढले. पण त्यात ते हरले. नंतर तात्काळ त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून नेमणूक केली गेली - हे अर्थातच नेहरूंमुळे झाले असे म्हणता येईल आणि ते सत्यही आहे.)

माझे म्हणणे त्यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे हे समजले तर त्यातून त्यांच्या निर्णयाचे विश्लेषण करता येऊ शकते असे आहे.

मात्र एखाद्या परतंत्र राष्ट्राचा स्वातंत्र्याच्या पहाटे जो प्रमुख नेता होतो तो जेंव्हा ज्यांच्या अधिपत्याखाली आपण परतंत्र राहीलो त्या सत्ताधिशांच्या म्हणजे येथे ब्रिटीशांच्या विचाराच्या प्रभावातच राहतो तेंव्हा ते नेतृत्व म्हणून योग्य वाटत नाही... ब्रिटीशांकडून शिक्षण आणि त्यांचे वागणे तत्कालीन अनेक ज्येष्ठ नेत्यांनी घेतले होते - त्यात जसे लोकमान्य टिळक, आगरकर, आदी होते तसेच विवेकानंद होते, अरविंद घोष होते, सावरकर होते, सरदार पटेल होते, आंबेडकर, वर म्हणलेले आय सी एस - सी डी देशमुख होते, आणि अर्थातच महात्मा गांधी पण होते... मात्र यातील प्रत्येकाने त्यांच्याकडून जरी शिक्षण घेतले तरी ते त्या प्रभावाखाली येऊन आधी स्वातंत्र्यलढ्याचा आणि नंतर राष्ट्रनिर्मितीचा विचार करत बसले नाहीत. त्यांनी देशहिताचा विचार हा देशाच्या संस्कृती आणि स्वभावाला धरून केला. त्यात आवश्यक बदल करायचे तर आहेत पण ते हळू हळू आणि समाजाला पचतील असेच होणे महत्वाचे आहे असेच थोड्याफार फरकाने होते...

नेहरूंची मूळ चूक ही अशा परकीय प्रभावाखाली येण्यात आहे, असे वाटते. जशी ब्रिटीशांबरोबर केली तशीच नंतर साम्यवादी चीन बरोबर केली. साम्यवादाच्या प्रभावाखाली खूप आले. नशिबाने साम्यवाद आला नाही पण समाजवाद घेत असताना अलिप्ततावादी म्हणत, साम्यवादी राष्ट्रांना नको इतके जवळ केले. पण जेंव्हा चीन ने हल्ला केला तेंव्हा रशियाने आपल्याला साथ दिली नाही.

त्याही आधी, याला आंधळे प्रेम म्हणावे का काय ते तुम्हीच ठरवा, पण भारताला संयुक्त राष्ट्रात कायमस्वरूपी स्थान (व्हेटो सकट) - परमनंट सिक्युरीटी कौन्सिलमधे मिळत होते. पण यांनी ते चीन ला पण मिळावे म्हणून नाकारले. चीन ला तर ते मिळालेच आणि आजही आपण त्यासाठी लॉबिंग करत हिंडतोय...आता कदाचीत मिळाले तरी व्हेटोशिवाय मिळणार... त्याने काय फरक पडला आणि नाही पडला, हा एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकतो, पण त्यातून विचार करण्याची पद्धत दिसते.

ब्रिटिशांच्या विचारांच्या प्रभावात म्हणजे काय

वर दिलेले शिवाजी महाराजांबाबतचे गैरसमजाचे उदाहरण वगळता, नेहरु ब्रिटिशांच्या (वाईट) प्रभावाखाली कसे होते हे समजले नाही. किंबहुना इतिहासात वाचल्याप्रमाणे माउंटबॅटन वगैरेंनी संस्थानांच्या एकीकरणासंदर्भात बरीच मदत केली आहे. नेहरुंनी देशाची संस्कृती व स्वभाव न समजता देशहिताचा विचार कसा केला हे समजून घ्यायला आवडेल.

पुढल्या ५० वर्षांनंतर 'नरसिंहरावांची चूक ही की त्यांनी अर्थव्यवस्था खुली केली व भांडवलशाहीच्या प्रभावाखाली खूप आले'. असे म्हणता येऊ शकते. मात्र तत्कालीन परिस्थितीनुसार नेहरुंचा व नरसिंहरावांचा निर्णय कदाचित योग्य असावा.

साम्यवादी राष्ट्रांना नको इतके जवळ केले हे पटत नाही. अलिप्ततावादी चळवळीनुसार भारताने घेतलेली भूमिका योग्यच होती. (त्यावेळी) अर्थव्यवस्था पूर्ण खिळखिळी झालेल्या, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नसणाऱ्या राष्ट्राने दोन मोठ्या बोक्यांच्या भांडणात गप्प राहावे हे योग्य वाटते.

आणि हो.. साम्यवादी विचारसरणीचे अपयश हे थोडे अलीकडच्या काळात दिसू लागले आहे. किंबहुना भारतातील साम्यवादी हे कदाचित एकमेव उदाहरण असावे की ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चांगला विषय

चांगला विषय. मुख्य म्हणजे गांधींवरुन नेहरुंकडे वळल्याने जरा विषय बदल झाला. असो, आता मुख्य विषयाकडे. गांधीजी नेहमीच नेहरुंकडे झुकलेले असायचे हे माझे मत वरच्या प्रतिसादांसोबतच जे काही थोडेफार वाचन होते त्यातुन झाले आहे. पण नेहरुंकडेच का? हा प्रश्न मी एका गांधी अभ्यासकांना (गांधीवादी नाही. तसे तर गांधी या विषयावरुन वाद घालणारे सगळेच गांधीवादी होतात :) ) विचारला होता. त्यावेळी त्यांचे उत्तर होते - कोणतीही राजकीय चळवळ चालवायची म्हणजे पैसा हा आलाच आणि त्याकाळात स्वातंत्र्याचा कारणासाठी नेहरु घराण्याने सुद्धा पैसा ओतल. सहाजिकच आहे की त्यांचा प्रभाव असणार. रोष असण्या बद्दलच्या पहिल्या कारणाचे हे एक समर्थन असावे.

दुसरा मुद्दा आहे प्रेम प्रकरणाचा. प्रियालीने लिहिलेला मुद्दा योग्य वाटला की पाश्चिमात्य रितीरिवाजांना सरावलेले कुटुंब आज सुद्धा तेच करते आहे. भारतीय समाज आणि अभारतीय प्रेम प्रकरणे हे त्यांच्या रक्तात आहे. त्यावर इतरांनी आक्षेप का घ्यावा हे कळत नाही. पण याच वेळी अमेरिकेत त्यांच्या अध्यक्षांची आणि अगदी अलिकडे भारतात फ्रान्सच्या अध्यक्षांना बोलवताना त्यांच्या सुद्धा प्रेम प्रकरणांची एवढी चर्चा व्हायचे काय कारण हे सुद्धा नाही कळत.

समाजवाद नेहरुंना त्यावेळी योग्य वाटला असावा. पण त्यांचे अलिप्ततावादी धोरण आज सुद्धा फारसे योग्य वाटत नाही.

इतर मुद्दे काही मांडावेसे वाटतात ते म्हणजे, नेहरुच एवढे जवळचे वाटायचे कारण एकवेळ पटते. पण एकाच ध्येयाने प्रेरीत समकालीन नेते, खास करुन सुभाषचंद्र बोस ज्यांच्या मृत्युचे गुढ आज देखील उकलेले नाही आणि सावरकर ज्यांना गांधी हत्येत सहभागी असल्याचा आरोप सहन करावा लागला त्यांची स्वातंत्र्यानंतरची अस्तित्वे आणि जनमानसातला मानसन्मान संशयास्पदरित्या रोखला गेला. हे माझे वैयक्तिक मत आहे. हे दोन नेते खास करुन यासाठी म्हणतो आहे कारण स्वातंत्र्यप्राप्ती नंतरचा भारत या बद्दल यांची मते सुद्धा उल्लेखनीय आहेत. थोडक्यात नेहरुंचे स्पर्धक (विरोधक नाही) ज्या प्रकारे लोप पावले त्यामुळे नेहरुंबद्दल मला स्वतःला तरी खुप अभिमान वगैरे वाटत नाही. उलट संशयच वाटतो.
तसेच गांधीजींनी सांगितले होते की काँग्रेसचे विसर्जन करा. पण गांधीजींचे राजकिय वारस असणार्‍या नेहरुंनी आणि त्यांच्या घराण्याने हा पक्ष स्वतःची जहागीर आणि भारत म्हणजे खाजगी मालमत्ता, हा प्रकार चालवला तो पटत नाही. नेहरुंनी गांधीचे ते मत का आचरणात आणले नाही? लोकप्रियता आणि जनतेचे अमाप प्रेम असलेल्या या नेत्याने असे का केले ते समजत नाही.
इंदिरा नेहरु ची इंदिरा गांधी कशी झाली या बद्दल सुद्धा अनेक कहाण्या आहेत. पण तो विषय येथे योग्य नाही. नेहरु म्हटले की गांधी - नेहरु - गांधी असेच डोक्यात येते. कदाचित माझ्या बुद्धीला पटत नसेल पण जवाहरलाल नेहरुंमध्ये इतके जबरदस्त नेतृत्वगुण असावेत की ते आज त्यांच्या पणतुमध्ये सुद्धा तेवढेच रक्तातुन आले असावेत. कदाचित नेहरु नसते तर भारत आज भारता ऐवजी पाकिस्तान आणि चीन यांचा भाग झाला असता.
शेवटी, कोट्यावधी अशिक्षितांमध्ये काही उच्चशिक्षीत लोकं होती म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आम्ही हे सुवर्णदिन पाहतो आहोत. बाकी देशप्रेमी लोकांकडे लढ्याची इच्छा असली तरी नेहरुंसारखे गुण नव्हते. नेहरुंमध्ये नक्कीच असे काही तरी गुण होते कि ज्यामुळे आज सुद्धा त्यांचे घराणे सर्वस्व विसरुन फक्त देशाच्या विकासाचा - प्रगतीचा विचार करतात.





काही प्रवाद..

नेहरुंबाबतचे जे अनेक प्रवाद आहेत ते अजूनतरी चर्चेत कुठेच आलेले नाहीत.

परदेशातून कपडे धुऊन येणे वगैरे वगैरे.....

-सौरभ.

==================

सर्व आयांनी जर आपापल्या मुलांना लहानपणीच योग्य शिकवण दिली, तर जगात युद्धं कशाला होतील? सर्व संस्कृती आयांच्याच हातात नसते काय?

नेहरुंचा समाजवाद !

पं. नेहरुंबद्दल चर्चेत भर्पूर चांगले प्रतिसाद आलेले आहेत. सांगण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नाही. पण आमचेही दोन शब्द !

काही तत्त्कालीन नेत्यांचे प. नेहरुबद्दलची मते- सुभाषचंद्रबोस असे म्हणायचे की, नेहरु अतिशय स्वार्थी माणूस होता जो दुसर्‍याचा विचार नंतर करायचा; पण त्यावेळी स्वत:ची स्थितीचा अंदाज घेत असायचे. ( चांगलाच गूण आहे ) सरदार पटेल तर म्हणायचे की, त्यांचे अनेक निर्णय भावनिक स्वरुपाचे होते, त्याला ते वेड्यापणाने निर्णय घेणारा माणूस म्हणायचे. तर जिन्हा जेव्हा होमरुल लीग चे अध्यक्ष होते तेव्हा त्याचे पं नेहरु हे सचिव होते, त्यांच्या म्हणन्यानुसार नेहरुत असा कोणताही गूण नाही की नेहरु उच्च नेतृत्व सांभाळू शकतील. ( अर्थात सांभाळले तो भाग वेगळा )

मोतीलाल नेहरुंचे आणि म. गांधीचे कधी जमले नाही म्हणतात पण त्यांच्यात कधी कोणत्या कानगोष्टी झाल्या कोणास ठाऊक. त्यामुळे मोतीलाल नेहरुंनी आपल्या मुलाला गांधीजींचे धरलेले बोट कधी सोडू नको असाच सल्ला दिल्यामुळे, नेहरु राजकारणात यशस्वी झाले असे म्हणावे लागेल. कारण म. गांधीजी तर लोकाभिमुख झालेला माणूस आणि तेवढाच चलाख माणूस. हा माणूस सुभाषचंद्रबोसला 'बेटा' म्हणायचे.जयप्रकाश नारायण यांना 'लेनिन'तर डॉ. लोहिया यांना ' बुद्धिवादी राजकीय तज्ञ ' म्हणायचे, पण या पैकी एकालाही त्यांनी राजसत्तेच्या जवळ येऊ दिले नाही. त्यांनी नेहरु परिवाराला इतकं राजकीय पाठबळ दिलं की तो भारताचा राजकीय वंश बनला. नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी बाकी कोणत्याही पक्षात ( अपवाद सोडले आहेत) ती त्यांच्याइतकी राजकीय कार्यकुशलता नाही. नसावी ?

पं. नेहरुंचा विचार करतांना स्वातंत्र्यपूर्व आणिस्वातंत्र्योत्तर असा केला पाहिजे म्हणजे हे देशाचं उमदं व्यक्तिमत्व समजून घेण्यास मदत होईल. स्वातंत्र्यपूर्वीचे काँग्रेसच्या स्वरुपाला अनेक पदर होते. काँग्रेसमधे जमीनदार होते, भाडंवलदार होते, विद्वान होते, मध्यवर्गीय होते, मजूर होते, गरीब होते, उजवे होते, डावे होते, जातीयवादी होते, धर्मनिरपेक्ष होते आणि क्रांतिकारकही होते. नेहरु जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी समाजवादाचा आग्रह धरला (राजकीय पक्कडीसाठी हे आवश्यक असावे) पण दुर्दैवाने काँग्रेसमधे समाजवादी विरोधी गटाचे वर्चस्व होते, पुढे हा गट काँग्रेसमधून बाहेर पडला आणि नेहरुंना आपला समाजवाद पुढे रेटता आला.

बाकी ऍडविना माउंटबॅटनचे नेहरुंवर प्रेम होते वगैरे किस्से अनेक सांगतात. नेहरुंची मित्रमंडळ श्रीमंत होते तेव्हा ते अनेक सुंदर स्त्रियांमधे रमत असत असेही म्हणतात. नेहरुंचे हे उघडपणे तर म. गांधीचे त्याला ब्रह्मचर्य असे नाव असावे !

काश्मिरच्या बाबतीतही स्वातंत्र्यानंतर महाराजा हरिसिंगावर दबाव आणून जर तेव्हाच विलनीकरण केले असते तर तो प्रश्न निकालात निघाला असता ? दुसरी चूक शे. अब्दुल्ला यांना तुरुंगात पाठवले व पुढे शेरे-काश्मिर' म्हणून त्यांचा गौरवही केला. जम्मु काश्मिर भारताचे अंग म्हणून वेगळे राज्य केलेच पण ३७० कलमामुळे गुंतागुंत वाढवुन ठेवली. असे अनेक भले-बुरे विचार पं. नेहरुंबद्दल बोलले जातात.

-दिलीप बिरुटे

संदर्भ

काही तत्त्कालीन नेत्यांचे प. नेहरुबद्दलची मते- सुभाषचंद्रबोस असे म्हणायचे की, नेहरु अतिशय स्वार्थी माणूस होता जो दुसर्‍याचा विचार नंतर करायचा; पण त्यावेळी स्वत:ची स्थितीचा अंदाज घेत असायचे. ( चांगलाच गूण आहे ) सरदार पटेल तर म्हणायचे की, त्यांचे अनेक निर्णय भावनिक स्वरुपाचे होते, त्याला ते वेड्यापणाने निर्णय घेणारा माणूस म्हणायचे. तर जिन्हा जेव्हा होमरुल लीग चे अध्यक्ष होते तेव्हा त्याचे पं नेहरु हे सचिव होते, त्यांच्या म्हणन्यानुसार नेहरुत असा कोणताही गूण नाही की नेहरु उच्च नेतृत्व सांभाळू शकतील.
बाकी ऍडविना माउंटबॅटनचे नेहरुंवर प्रेम होते वगैरे किस्से अनेक सांगतात. नेहरुंची मित्रमंडळ श्रीमंत होते तेव्हा ते अनेक सुंदर स्त्रियांमधे रमत असत असेही म्हणतात.

याबद्दल संदर्भ दिल्यास बरे होईल. आमच्याही ज्ञानकणांमध्ये थोडी भर पडेल. किंवा हे सर्व नेते आपल्यालाच असे म्हणाले असतील तर तसे सांगा.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

मिळाले तर टाकीन

संदर्भ आता उपलब्ध नाहीत. 'क्या महात्मा गांधी थे ? या एल. आर. बालीच्या पुस्तकात असे वाचल्याचे आठवते. संदर्भ नसल्यामुळे जर मत म्हणून ते योग्य नसेल तर संपादकांनी ते काढून टाकावे.

किंवा हे सर्व नेते आपल्यालाच असे म्हणाले असतील तर तसे सांगा.

हे जरा अतिशहाणपणाने लिहिलेले वाक्य वाटते !

-दिलीप बिरुटे

संदर्भ

संदर्भ नसले (आणि असले तरीही) तर एखाद्या स्वातंत्रकाळातील नेत्याविषयी तो स्वार्थी होता, वेडा होता, अजून काय काय होता असे लिहीणे बरे दिसते का? आणि यामुळे चर्चेत कुठली भर पडते आहे? हे एका प्राध्यापकांना सांगावे लागते हे आमचे दुर्दैव.
हा प्रतिसाद व्यक्तिगत वाटत असल्यास काढून टाकावा.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

सुधारणा

संदर्भ नसले (आणि असले तरीही) तर एखाद्या स्वातंत्रकाळातील नेत्याविषयी तो स्वार्थी होता, वेडा होता, अजून काय काय होता असे लिहीणे बरे दिसते का?

चर्चेच्या ओघात अयोग्य वा अस्थानी वाटत नाही. ओघ तोडुन जर वेगळे बाजुला काढले तर ते बरे दिसत नाही.

हा प्रतिसाद व्यक्तिगत वाटत असल्यास काढून टाकावा.

त्याच्या ऐवजी ह.घ्या म्हन्ले कि झालं
चालुं द्या चर्चा.( होउन जाउं द्या)
नारद घाटपांडे

संदर्भ/ मत

संदर्भ नसला म्हणून प्रत्येक लेखन खोटे आहे असे नाही आणि प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देता येईल असेही नाही परंतु, याचबरोबर संदर्भाशिवाय केलेले लेखन हे मतही ठरते असे नाही कदाचित त्याला वावडी म्हणता यावी.

एखाद्याच्या जीवनाबद्दल किंवा प्रत्यक्ष घटनेबद्दल काही लिहिले तर ते मत होत नाही.

वावडी उठवणारे अमिताभ बच्चन हा तेजी आणि नेहरुंचा मुलगा असेही म्हणतात.

वावडी उठवणारे अमिताभ बच्चन हा.............

बाकी गॉसिपिंग करायला चांगली माहिती(?) दिलीत. ;-)

तसेच

वावडी उठवणारे अमिताभ बच्चन हा तेजी आणि नेहरुंचा मुलगा असेही म्हणतात.

तसेच नेहरू आणि नर्गीस हे "हाफ ब्रदर-सिस्टर" होते असे ही म्हणले गेले आहे. तेचे शेख अब्दुल्ला आणि नेहरू. (सांगणारे त्यांच्यात कसे साम्य आहे, हे पण दाखवायला विसरत नाहीत!) पण असल्या गोष्टी वावड्या म्हणूनच दुर्लक्षीत करण्याजोग्या आहेत. फारतर फार एखादे नात्यांवरून कोडे तयार करता येईल इतकेच :-)

मस्त

चर्चा प्रस्ताव आणि प्रतिसाद लवकरच वाचतो. खूप लेखन झाले आहे त्यामुळे वाचायला वेळ लागणार. माझ्या कडून भर घालण्यासारखे काही नाही. चांगली चर्चा पाहून बरे वाटले.
--लिखाळ.

एक वेगळा मापदंड.

मध्ये असिफ झरदारीचे एक वक्तव्य वाचण्यात आले होते, " मला पाकिस्तानचा सोनिया गांधी व्ह्यायचे आहे."

भुत्तो यांना नेहरु व्ह्यायचे होते, बेनझिरबाईला इंदिराजी व्हायचे होते, आता बेनझिरबाईच्या मुलाला राहुल अथवा प्रियांका व्हावेसे वाटेल.

लगे रहो,

 
^ वर