व्यायामी वळवा शरीरे

'योग-एक जीवनशैली'

'योग-एक जीवनशैली' हे नाव आहे एका पुस्तकाचे ज्याचे लेखक आहेत डॉ.नंदकुमार गोळे. मात्र 'तो' मी नव्हेच. ते मात्र स्वतः डॉक्टर असण्यासोबत योगशिक्षकही आहेत. मी जेव्हा योगाची माहिती शोधत होतो, तेव्हा योगाबाबत शास्त्रीय माहिती असलेली अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यातील दोन पुस्तके निकम गुरूजींच्या अंबिका योग कुटिरची आणि दोन जनार्दनस्वामींच्या योगाभ्यासी मंडळाची होती. ही पुस्तके योगाभ्यासी गुरूकुलांची होती. मात्र, डॉक्टर असून योगशिक्षक झालेल्या गोळ्यांच्या पुस्तकाबद्दल मला कुतूहल निर्माण झाले. मी ते वाचले आणि मला जाणवले ते हे, की मला हवी तशी शास्त्रीय माहिती त्यात उत्तम रीतीने दिलेली आहे. आपणही ती अवश्य वाचा. योग आणि व्यायाम एकच नाहीत. योगात रक्तदाब कमी होतो तर तो व्यायामात वाढतो. ह्याचे सविस्तर निरुपण त्यांनी ह्या पुस्तकात केलेले आहे. अवश्य वाचावे.

हठयोग म्हणजे काय? माझा तर आता आतापर्यंत असाच समज होता की कुठे अंगठ्यावर उभे राहून तपश्चर्या कर, कुठे वायू भक्षण करून जग, असली खडतर व्रते म्हणजेच हठयोग असावा. मात्र, 'ह' म्हणजे सूर्य आणि 'ठ' म्हणजे चंद्र. सूर्य-चंद्र, दिवस-रात्र, प्राण-अपान, धन-ऋण इत्यादी द्विस्तरीय प्रणालींमध्ये जग वाटले गेलेले असते. त्या दोन्ही स्तरांतील संतुलन साधणे म्हणजे 'हठयोग' असे निकम गुरूजींच्या पुस्तकात सांगितलेले आहे. जीवनातील द्वैतात, अद्वैत शोधण्याचे काम निकम गुरूजींनी फारच सोपे करून सांगितलेले आहे. ते पुस्तक आपण मुळातच वाचावे.

प.पू‍.जनार्दनस्वामींच्या पुस्तकातील सूर्यनमस्कार मला सर्वात शास्त्रशुद्ध वाटले. त्यातील इतरही सांघिक आसने करून पाहण्यासारखी आहेत. लहानपणी स्वतः जनार्दनस्वामींच्या मार्गदर्शनाखाली सांघिक आसने करण्याचे सौभाग्य मला अनेकदा लाभले. मात्र त्यावेळी मला तो जुलुमाचा रामराम वाटे. झडझडून धावपळ करण्याच्या अवखळ वयात, सावकाश हातवारे करण्याने काही साध्य होईल असे मला मुळीच वाटे ना. पुढे त्यांचे 'योगस्वरूप' नावाचे पुस्तक मोठेपणी वाचल्यावर मात्र माझी मते बदलली.

ज्या 'सम्यक जीवनशैली परिवर्तना' बाबत मी सतत लिहीत आहे, त्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे योगसाधना. हृदयविकारनिवारणार्थ आजकाल प्रत्येक प्रगत उपचाऱप्रणाली मग ती उपखंडीय असो वा अपूर्व (पाश्चिमात्य), योगास उच्च कोटीचे साधन मानते. हृदयोपचाराचा एक भाग म्हणून त्याचा उपयोग करण्याआधी योग स्वतःहून काय आहे ते जाणून घेणे आवश्यक वाटल्याने हा योगाच्या समर्थनाचा प्रपंच केला आहे. योग म्हणजे आपल्या संस्कृतीची संपत्ती आहे. आपल्याकडे पुस्तक प्रदर्शनांमध्ये योगावरील पुस्तकांचे ढीग सापडतात. जरूर वाचावेत. आपण योगाच्या पालनासाठी आणि संवर्धनासाठी वेळ खर्च केल्यास आपले आयुरारोग्य वाढेल ह्यात काय संशय?

व्यायामातील प्रकारांची सुयोग्य निवड

विहाराकरता चालायला हवेच. पण व्यायाम म्हणजे विशेष आयाम. ज्यासाठी विशेष प्रयत्न करायला लागतात असे. श्वसनशक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम, स्वस्थता साधण्यासाठी योगासने, दमश्वासासाठी हळू हळू धावणे, वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणे, कर्तबक्षमता वाढवण्यासाठी मल्लखांबावरचा व्यायाम, स्नायुंच्या सबलीकरणासाठी वजने उचलणे, दंड-बैठका इत्यादी व्यायाम करावेत. सूर्यनमस्कार, सायकल चालवणे आणि पोहोणे हे सर्वंकष व्यायाम आहेत. त्यामुळे मानवी शरीराच्या स्वायत्ततेवरील मानसिक अडसरही (inhibitions) दूर होऊ शकतात.

दीर्घकालीन आजारातून उठलेल्या (कावीळ, हिवताप इत्यादी), वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक रोगांनी संत्रस्त आणि अतिशयच थकवा वाटत असणार्‍या लोकांनी सुरूवातीसच अवघड व्यायाम करू नयेत. आधी त्यांनी लवचिकतेसाठीच्या व्यायामांपासून सुरूवात करावी. झेपेल तसतसे, ते ते उत्तरोत्तर अवघड होत जाणारे व्यायाम क्रमशः अंगिकारावेत. आधी योगासने, मग प्राणायाम, सूर्यनमस्कार, जलद चालणे, संगीतासोबत केलेले सतत-संजीवित हालचालींचे व्यायाम (aerobics), धावणे, दोरीवरच्या उड्या, सायकल चालवणे, पोहोणे, जोर-बैठका, वजने उचलणे इत्यादी इत्यादी.

दैनंदिन सांघिक योगासने

समाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने । योगमेवाभ्यसेत्‌ प्राज्ञः यथाशक्ति निरंतरम्‌ ॥

हा डॉ.श्री.भा.वर्णेकरांनी लिहिलेला श्लोक ज्या संस्थेचे घोषवाक्य आहे त्या, नागपूरच्या जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या संकेतस्थळावर दैनंदिन योग प्रात्यक्षिके (http://www.jsyog.org/online%20yoga.htm) या दुव्यावर अनेक आसनांची सुबक संगणकीकृत प्रात्यक्षिके दिलेली आहेत. त्यातील पवनमुक्तासन सगळ्यांनी नियमित करावेच असे आहे. इतरही शक्य ती सर्व आसने नेहमीच करत असावे. सकाळी उठून सांघिक रीत्या योगासने करण्याला जनार्दनस्वामी खूप महत्त्व देत असत.

लवचिकतेकरता करावयाच्या कसरती

शरीर लवचिक राहावे ह्याकरता नियमित व्यायाम करण्याची गरज असते. शरीराची स्वस्थता शारीरिक हालचालींवरच कायम टिकते. शरीराची स्वस्थता वाढविणेही नियमित व्यायामाच्या आधारेच शक्य असते. उपजीविकेसाठी शाऱीरिकदृष्ट्या अहोरात्र कार्यरत राहण्याची गरज पडत असते, अशा लोकांना कृत्रिमरीत्या व्यायाम करत बसण्याची मुळीच गरज नसते. मात्र आपल्या आजच्या जीवनात, उपजीविकेसाठी शाऱीरिकदृष्ट्या अहोरात्र कार्यरत राहण्याची गरज मुळात राहूच नये अशा प्रेरणेने आपले सर्व नियोजन चाललेले असते. म्हणूनच कृत्रिमरीत्या व्यायाम करण्याची गरज अपरिहार्य होते. हात, पाय, मान इत्यादी मोठ्या स्नायूंच्या किमान हालचाली दररोज व्हायलाच हव्यात. त्याकरता उभे राहून, बसून आणि शवासनस्थितीत असतांना पर्वतासन अवश्य करावे. म्हणजे हातापायांचे स्नायू ताणल्या जातात. दररोज किमान शंभर पावले टाचांवर आणि तेवढीच पावले चवड्यांवर अवश्य चालावित. त्याने पावलांचे स्नायू ताणल्या जातात. पाय जुळवून उभे राहून, हात शरीरास चिकटून ठेवावेत आणि एका वेळी एक एक पाय सरळ ताठ वर उचलावा व तसाच मागेही नेण्याचा प्रयत्न करावा. हात समोर जमिनीसमांतर ठेवून एका वेळी एक एक पाय सरळ ताठ वर उचलून हाताच्या तळव्यास टेकविण्याचा प्रयत्न करावा. तसेच पाय बाजूला ताठ वर करून, विमानाच्या पंखांप्रमाणे जमिनीसमांतर पसरलेल्या हाताच्या तळव्यास टेकविण्याचा प्रयत्न करावा.

मग सरळ उभे राहून, हात सरळ समोर ताठ जमिनीसमांतर ठेवून, तळवे जमिनीकडे करून, चवड्यांवर, श्वास सोडत उकिडवे बसावे आणि नंतर श्वास घेत पूर्ववत उभे राहावे. पद्मासनात बसून ब्रह्ममुद्रा कराव्यात. म्हणजे मान दोन्ही बाजूंस, समोर मागे सावकाश वाकवून पाहावी. कुठल्याही एका खांद्यावर कान टेकवून मग हनुवटी छातीला टेकवत दुसरा कान दुसर्‍या खांद्यावर आणावा. असेच विरुद्ध बाजूनेही सावकाश करावे. उजव्या तळव्याने डाव्या खांद्यावर आणि डाव्या तळव्याने उजव्या खांद्यावर एकाच वेळी थोपटावे. भीमरूपी म्हणतांना जसा समोर नमस्कार करतो, तसा नमस्कार हात मागे नेऊन, तळवे एकमेकांस पूर्णपणे चिकटवून करावा. वरील सर्व हालचाली सावकाश कराव्यात आणि अंतिम अवस्थेत काही क्षण स्थिर राहावे. ह्या हालचाली दिवसातून किमान दोनदा केल्यास लवचिकता सांभाळता येते.

प्रतीक्षेत राहिल्याने, उत्सुकता ताणल्या गेल्याने, अनिश्चिततेने, भीतीने आणि तासचे तास अवघडून उभे अगर बसून राहिल्याने शरीरात ताण निर्माण होतात. ते ताण साठविण्याच्या विवक्षित जागा शरीरात ठरलेल्या आहेत. त्या म्हणजे मान, खांदे, पाठ, कंबर गुडघे आणि घोटे. लवचिकतेसाठी केलेले व्यायाम ह्या सहाही जागा मोकळ्या करण्यात मदत करतात.

लवचिकतेसाठी सूर्यनमस्काराचा व्यायाम खूपच छान आहे. तो सगळ्यांकरता सारखाच उपयुक्त आहे. आबालवृद्ध, स्त्री-पुरूष, गरीब-श्रीमंत. पुण्याच्या क्रीडाभारतीचे संकेतस्थळ, त्यांची डॉक्युमेंटरी अवश्यपाहावी. आचरणात आणावी.

चढ-उतार

शरीराची स्वस्थता टिकवून ठेवण्याचा हल्लीच्या परिसरांमधील उत्तम व्यायाम म्हणजे जिने चढणे आणि उतरणे. 'ताठ कणा' ह्या आपल्या आत्मचरित्रात सायन शुश्रुषालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. रामाणी स्वतःचे स्वास्थ्य टिकवून धरण्याचे रहस्य म्हणून जिने चढणे आणि उतरणे ह्या व्यायामाचा दाखला देतात. ते स्वतः हा व्यायाम दररोज अनेकदा स्वखुशीने करतात. चढतांना गुडघ्यांवर शरीराच्या वजनाच्या सहापट भार पडत असल्याने, खूप सारी ऊर्जा खर्च होतेच शिवाय म्हातारपणी लवकर सांधेदुखी होत नाही. चार-पाच मजले दररोज चार-पाचदा चढ उतार केल्यास प्रकृती निरोगी राहते ह्या कारणामुळे पाचव्या मजल्यावर गच्चीसकट घरे घेणारे अनेकजण मी खरोखरीच आरोग्यपूर्ण जीवन जगतांना पाहिलेले आहेत. यामुळे असेल तिथेही, उद्वाहकाचा उपयोग न केल्यास जास्त ऊर्जस्वल वाटतेच आणि उत्साहही कायम राहतो.

अवघड व्यायाम

मात्र, स्वस्थतेत वाढ करायची असेल तर ह्याहूनही जास्त आणि अवघड व्यायाम करण्याची गरज भासते. मैदानी खेळ खेळणे, सायकल चालविणे, पोहोणे, धावणे, वजने उचलणे इत्यादी. डॉ. अभय बंग ह्यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' ह्या पुस्तकात, त्यांनी त्यांची हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया झाल्यानंतर, स्वस्थता कशी कशी वाढवत नेली ते सविस्तर लिहीले आहे. ते अवश्य वाचावे. ह्या सर्व व्यायामाचे उद्दिष्ट विश्रांत हृदयस्पंदनदर कमी करणे, परिश्रमापश्चात वाढलेला हृदयस्पंदनदर, कमीत कमी वेळात विश्रांत हृदयस्पंदनदरापर्यंत पूर्वपदी येण्याची क्षमता निर्माण करणे आणि एकूण जास्तीत जास्त अवघड काम लवकरात लवकर साधण्याची हातोटी कमावणे ह्या तीन निकषांवर आधारलेले असायला हवे. हे तीनही निकष सहज समजता येण्याजोगे, सहज मोजता येण्याजोगे आणि कष्टसाध्य आहेत.

वेळ मिळेल तसा उपयोगात आणा

स्वस्थता वाढविण्याच्या नादात, त्यासाठी दिवसाकाठी किती वेळ आपण देत आहोत ह्याचे भान अवश्य ठेवायला हवे. शरीरश्रमांवर आधारित व्यवसाय करणारे, जसे की व्यावसायिक खेळाडू, मजूर, कुस्तीगीर इत्यादिकांना त्याखातर जास्त वेळ देणे आवश्यकच असते आणि तसा तो उपलब्धही असतो. सामान्य माणसांनी स्वस्थतासाधनेत दिवसाकाठी दोन तासांहून अधिक वेळ दिल्यास त्या प्रमाणात लाभ वाढतोच असे नाही. मात्र एक ते दोन तास शारीरिक स्वस्थता आणि आरोग्याकरता आपण वेचावे. अर्थातच सलग दोन तास असा वेळ मिळणे अवघड असते. जसा मिळेल तसा, जेव्हा मिळेल तेव्हा, उपयोगात आणावा आणि जे जे त्या वेळी शक्य असेल, ते ते तेव्हा तेव्हा साधून घ्यावे असे केल्यास आपले जीवन, नैसर्गिक राहणीच्या सर्वात जवळ पोहोचू शकेल. स्वस्थ होऊ शकेल.

नियमितता महत्त्वाची असते

अमेरिकन विचारसरणीत सप्ताहात अमुक इतक्या कॅलरी खर्च व्हाव्यात असे मानले जाते. http://urjasval.blogspot.com/2010/05/blog-post_4883.html#links दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक ऊर्जा गरज, या दुव्यावर निरनिराळ्या शारीरिक कर्तबांकरता लागणार्‍या ऊर्जांची सारणी दिलेली आहे. सप्ताहात पाचच दिवस व्यायाम केला तरीही पुरते असे मानले जाते. अर्थातच सप्ताहांतर्गत सवलत दिली तरी ती विचारसरणीही, त्यापश्चात सातत्याचाच पुरस्कार करते. आहार, विहार, व्यायाम, प्राणायाम ह्याबाबतीत भारतीय संस्कृतीत धरसोडीची वृत्ती क्षम्य समजली जात नाही. सातत्य आणि कर्मठपणाचे गोडवे आपली सारी शास्त्रे गातात. अनुभवांती मला तेच बरोबर वाटत आहे.

याशिवाय,
http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Comments

सुर्यनमस्कार

मात्र, 'ह' म्हणजे सूर्य आणि 'ठ' म्हणजे चंद्र.

नवीन माहिती!

प.पू‍.जनार्दनस्वामींच्या पुस्तकातील सूर्यनमस्कार मला सर्वात शास्त्रशुद्ध वाटले.

सुर्यनमस्काराचेही वेगवेगळे प्रकार आहेत काय?
अत्र्यांचे साष्टांग नमस्कार आठवले.

प्रकाश घाटपांडे

मात्र, 'ह' म्हणजे सूर्य आणि 'ठ' म्हणजे चंद्र.

>>> ठ हे अक्षर चंद्राप्रमाणेच गोल दिसते त्यामुळे ठ म्हणजे चंद्र हे पटते.
ह चे काय स्पष्टिकरण??

थाप मारणे हि कला आहे.


मात्र, 'ह' म्हणजे सूर्य आणि 'ठ' म्हणजे चंद्र.
ठ हे अक्षर चंद्राप्रमाणेच गोल दिसते त्यामुळे ठ म्हणजे चंद्र हे पटते.
ह चे काय स्पष्टिकरण??

'ठ' म्हणजे 'पूर्ण चंद्र' आणि 'ढ' म्हणजे 'अर्धा चंद्र' किंवा 'चंद्राची कोर' आपल्याला हे पटले का?
जर हो असेल तर...
सुंदर मुलींना 'चंद्राची कोर' असे काही गाण्यांमध्ये म्हटलेले आहे, म्हटले जाते, ते याचसाठी का?

हॅहॅहॅ

छान.

एक्स्क्यूज्

ढ हा अर्धा चंद्र कुठल्या अँगलने दिसतो तुम्हाला? त्यात एक अंतर्भूत छोटा गोल दिसतोय कि!
ट हा अर्धा चंद्र आहे.

'ठ' म्हणजे 'पूर्ण चंद्र' आणि 'ढ' म्हणजे 'अर्धा चंद्र' किंवा 'चंद्राची कोर' आपल्याला हे पटले का?
जर हो असेल तर...
सुंदर मुलींना 'चंद्राची कोर' असे काही गाण्यांमध्ये म्हटलेले आहे, म्हटले जाते, ते याचसाठी का?

अरे हो याचसाठी हँडसम पुरुषांना ठग म्हणत असावे का??

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

अजाणतेने थट्टा केल्याबद्दल माफी मागतो

ब्राह्मी लिपीचा अभ्यास करताना असे कळले की त्याकाळात प्रत्येक वर्णाला स्वतंत्र नांव देण्यात आले होते.
'ह' ह्या वर्णाचे नांव 'सूर्य',
'ट' ह्या वर्णाचे नांव 'चंद्र', - (सुवर्णा...तुमचा युक्तीवाद अचूक आहे.)
'ठ' ह्या वर्णाचे नांव 'कौस्तुम', 'तोमर', 'नेमि', 'धाराधर', 'मेघी' असे होते.
गंमत म्हणजे,
'ढ' ह्या वर्णाचे, (ज्यात ब्राह्मी लिपीतील काळापासून आत्तापर्यंत कोणतीच सुधारणा, विकास, प्रगती झाली नाही अशा वर्णाचे) नांव काय होते माहित आहे कां?
'पुश्पभद्र' (इं.: 'फ्लॉअर शेप्ड') - मराठीत याला फुलासमान असे म्हणाता येईल कां?

'हट योगा' चे नांव 'हठ योग' असे नांव, चूकीच्या उच्चारांमुळे झाले कि काय?

सूर्यनमस्कार - सर्वांगसुंदर व्यायाम

नरेंद्रजी,
आपल्या प्रतिपादनाशी सहमत.
सूर्यनमस्कार हा एकच व्यायाम इतका परिपूर्ण व सर्वांगसुंदर आहे, की प्रत्येकाने रोज किमान १२ आणि पुढे त्या पटीत शक्य तेवढे नमस्कार घातले तर सध्या भेडसावणार्‍या शारीरिक समस्या अल्पावधीत दूर होऊ शकतात. त्याचा कुणीही अनुभव घेऊ शकते.

@ प्रकाश घाटपांडे
१२ सूर्यनमस्कारातील एक स्थिती 'साष्टांग नमस्कार' हीच आहे.

नरेंद्रजी की नरेंद्रदेव बाबा

नरेंद्रजी मला क्षमा करा पण हे फार होते आहे हो. अहो सर्व उपक्रमी निरनिराळ्या शारिरिक व मानसिक व्याधींनी पिडीत आहेत की काय? असे आपले लेख वाचून मला वाटू लागले आहे. आपल्याला नरेंद्रदेव बाबा म्हणून संबोधित करावे असे वाटते आहे. व्यायाम करा, विहार करा, अमुक आहार करा, रक्तदाब व हृदयविकार टाळा, आता हे पुरे झाले. दुसर्‍या कोणत्या तरी विषयावर लिहा की. आपली लेखन शैली सुरेख आहे. ती वापरून फक्त वाचकांचे आरोग्यच सुधारण्याचे ब्रीद घेतले पाहिजे असे काही नाही. जरा काही हलके फुलके पण लिहा हो. प्लीज

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

लिहितात की

नरेंद्रजी मला क्षमा करा पण हे फार होते आहे हो.

याच्याशी सहमत आहे. :-) कोणत्याही गोष्टीचा "ओवरडोस" लोकांना नको असतोच. ब्रेनवॉशिंग केल्यासारखे होते. पण उपक्रमावर इतरही आहे की वाचण्यासारखे आणि ब्रेनवॉशिंग केल्यासारखे लेख.

आपली लेखन शैली सुरेख आहे. ती वापरून फक्त वाचकांचे आरोग्यच सुधारण्याचे ब्रीद घेतले पाहिजे असे काही नाही. जरा काही हलके फुलके पण लिहा हो. प्लीज

ते लिहित आहेतच की. कोकण प्रवासाचा लेख टाकला होता, पुस्तकांची परीक्षणेही आहेत.

मला वाटते की विरोध लेखांच्या वारंवारितेला होत असावा. गोळेकाका बहुधा आपल्या अनुदिनीवरले लेख येथे चोप्य्-पस्ते करत आहेत. तसे करण्यात वावगे काहीच नाही परंतु त्यांनी वारंवारितेचा विचार करावा हे खरेच.

बाकी, योगासनांनी शरीर लवचिक राहते याच्याशी सहमत आहे. ओणवे उभे राहून पायाचे अंगठे न पकडू शकणारी, मांडी ठोकून बसले की नंतर उठायला त्रास होणारी, शरीर वाकवणे शक्य नसणारी तरुण माणसे पाहिली की खेद होतो.

नको आहेत त्यांना ते उगाचच वाचावे लागणे मलाही चुकीचेच वाटते!

नमस्कार प्रशासक महोदय,

आरोग्य आणि स्वस्थता या विषयावर मी अलीकडे लिहीत असलेले लेख या संकेतस्थळाच्या धोरणाशी विसंगत आहेत काय?
तसे असल्यास ते ताबडतोब नाहीसे करावेत.

चंद्रशेखर यांचा सर्वात ताजा अभिप्राय पाहता, त्यांना ते आवडत नाहीत असे दिसते.

आपल्याला तरीही ते इथे असलेले चालत असतील,
तर "आरोग्य आणि स्वस्थता" नावाच्या समुदायात स्थलांतरित करून
हवे त्यासच दिसावेत अशी काही सोय करता येईल काय?

ज्यांना ते नको आहेत त्यांना ते उगाचच वाचावे लागणे मलाही चुकीचेच वाटते.

आपणास इष्ट वाटेल तो निर्णय करा. मला कळवा. मी त्यावर नक्कीच अंमल करेन.

तोपर्यंत मी या लेखमालिकेतील पुढील लेखांचे इथे लेखन करणे थांबवत आहे.

आपला स्नेहाकांक्षी
नरेंद्र गोळे

सोय नाही

आपल्याला तरीही ते इथे असलेले चालत असतील,
तर "आरोग्य आणि स्वस्थता" नावाच्या समुदायात स्थलांतरित करून
हवे त्यासच दिसावेत अशी काही सोय करता येईल काय?

अशी सोय उपक्रमावर नाही.

तोपर्यंत मी या लेखमालिकेतील पुढील लेखांचे इथे लेखन करणे थांबवत आहे.

या लेखमालेतील लेखांबाबत खंड पडणार असल्यास हरकत नाही परंतु इतर विषयांवर अवश्य लिहा.

आपले लेख

आपले लेख मला आवडत नाहीत असे मी कधीच म्हणणार नाही. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की जरा नकोसे वाटते इतकेच. श्रीखंड मला खूप आवडते म्हणून मला कोणी ते सकाळ संध्याकाळ सतत खात रहा म्हणून सांगितले तर नकोसे वाटेल की नाही. त्यातलाच प्रकार. (अर्थात तुमच्या लेखाप्रमाणे श्रीखंड हे विष समानच आहे ही गोष्ट वेगळी)तुमच्याकडून लेख येत राहूदेत. मला वाचायला ते नक्कीच आवडतील फक्त जरा विविधता येऊदे एवढीच विनंती.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सहमत

सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

शैली पेक्षा सल्ला जाचक

आरोग्य सुधार वा आरोग्य कायम ठेवण्यासाठी औषधोपचार (लागेल तसा), आहार नियंत्रण (लागेल तसे), व्यायाम (लागेल तसा) गरजेचा आहे याबाबत कुणाचेही दुमत असणार नाही.
यातील हृद्रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत काय करावे याबाबत तुम्ही लिहिता. तुमच्या हृद्रोगामुळे तुम्ही भरपूर अभ्यास केला, स्वत:ची मते बनवलीत हे योग्यच आहे. इतरांनाही तुमच्यासारखे सोसावे लागू नये यासाठी तुम्ही लिहीता हे पण योग्यच आहे. तुमची लिखाणशैली, वापरलेले अप्रिचित शब्द हे देखिल उत्तम आहेत.

मला जाणवणारा एकमेव दोष म्हणजे तुम्ही काही ठाम मते करून घेतली आहेत. (कदाचित तेवढा तुमचा अभ्यास असेल.) तुम्हाला तुमच्या विचारात काही शंकास्पद वाटत नाही. याशिवाय ज्यांना यात शंका येतात त्यांच्या शंकाही तुम्हाला भिडत नाहीत. त्यांचे शंकासमाधान न करता एकतर्फी भाषणे देण्यासारखे तुमचे कार्य चालू आहे. त्यामुळे तुमची सल्लामसलत 'हवी असल्यास घ्या नको असल्यास टाकून द्या' या पद्धतीची आहे. या कारणाने ती केवळ प्रचारात्मक वाटते. (पॅम्फ्लेट वाटल्यासारखी.) तुमच्या एवढा या विषयांचा अभ्यास नसूनही मला असे वाटते की तुमचे लिखाण कित्येक मुद्यांमधे पुराव्यावर आधारित नाही आणि अपुर्‍या माहितीवर आधारित आहे.

या संस्थळावर आम्हाला थोडी काटेकोरपणाची सवय लागली आहे. दुसरी एक सवय म्हणजे वादविवादाची. तुमच्या लेखनाच्या निमित्ताने हे घडत नाही असे वाटते. याचा थोडा जाच होतो.
या लेखात तुम्ही ठिकठिकाणी संदर्भ दिले आहेत त्यांचे मी स्वागत करतो. तसेच आपले म्हणणे ठासून सांगण्यासाठी घेतलेल्या आक्षेपांना उत्तरे दिलीत (मग प्रत्युत्तरे येतील आणि बघ्यांची थोडी करमणूक होईल) तर मी अधिक स्वागत करीन.

वानगी दाखल तुम्ही लेखात उल्लेख केलेल्या जनार्दन स्वामींना मी पाहिले आहे. (चुकून जेवताना.) तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्व स्थुल शरिरयष्टीयुक्त होते. जेवणही फारसे नियंत्रणात नव्हते (लग्नाचे जेवण होते.) कदाचित तुम्ही उल्लेखलेली लवचिकता त्यांचापाशी असेल (मांडी घालून बसले होते). पण इतर प्रकृतीची काळजी ते फारसे घेत नसावेत असे वाटले.

प्रमोद

असेच

कोणी लेख थांबवावेत कोणी काय वाचावे हे मी सांगणे योग्य नाही. मी ते वाचणे थांबवावे हे माझ्या हातात आहे. संदर्भहीन लेख वाचणे आणि त्याचा दैनंदिन आयुष्यात वापर करणे अशक्य आहे. मग बुवाबाबा आणि लेखकात काय फरक राहीला. गणपती दूध पितो पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या टाईप.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

हा हा

>>>दुसरी एक सवय म्हणजे वादविवादाची. तुमच्या लेखनाच्या निमित्ताने हे घडत नाही असे वाटते. याचा थोडा जाच होतो.

हे मात्र पटण्यासारखं आहे. समजा एखाद्याच्या धाग्यात आपण प्रतिसाद लिहून काही प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर आले नाही की त्रास होतो ही गोष्ट मात्र खरी आहे. :)

-दिलीप बिरुटे

मला आपले लेख आवडतात

मी ही लेखमाला आपल्या अनुदिनीवर वाचत जाईन. आपली अनुदिनी मी या लेखमालेकरता माझ्या "फेव्हरेटस्" मध्ये घातली होती त्याचा आता खरा फायदा होईल.
खूप नवीन माहीती मिळाली, मोटीव्हेशन मिळाले . अपरिचीत शब्द कळले.
माझे मत असे आहे - हिमवर्षाव अथवा पाऊस हा सातत्यानेच आणि थोडाथोडा होत राहीला तर जमीनीमध्ये पाणी छान मुरते.
आपले लेख हे मला तसे वाटत. सातत्याने , कणाकणाने मिळणारे सकारात्मक द्न्यान.
आय विल मिस देम!!!!

आपल्याला वाटतं ना..मग लिहित राहावे.

एक उपक्रमी वाचक म्हणून मला आपली लेखमाला आवडत आहे. कोणी उपक्रमी जर आपल्या आरोग्य विषयक येणा-या लेखांबाबत कुरकुर करत असेल तर आपण सरळ त्याकडे दुर्लक्ष करावे असा माझा एक वाचक उपक्रमी म्हणून सल्ला आहे. आपण आपले लेख टाकत राहावे.

आपले लेखन वाचून आरोग्यविषयक पुस्तके वाचावे वाटत आहे. नुकतेच 'मधुमेह एक आव्हान' हे डॉ.अरुणा जैन आणि डॉ.अशोक जैन यांचे पुस्तक वाचायला सुरुवात केली आहे. आपल्या लेखन मालिकेत आपल्याला जेव्हा 'ब्रेक' घ्यावा वाटेल तेव्हा कळवा. त्या 'ब्रेक' मधे मी पुस्तक परिचय टाकतो. च्यायला, हाय काय आन नाय काय.....!

-दिलीप बिरुटे

ब्रेक?

आपल्याला जेव्हा 'ब्रेक' घ्यावा वाटेल तेव्हा कळवा. त्या 'ब्रेक' मधे मी पुस्तक परिचय टाकतो. च्यायला, हाय काय आन नाय काय.....!

ऐला..........! त्यासाठी ब्रेक कशाला पायजे? टाकून द्या कि तुमीपण! होऊन जाव द्या...... परिचयच् वाचतो... पुस्तकाची काय गरज्?
____________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

चांगली लेखमाला

लेखमाला निश्चितच उपयोगि आहे . ज्याना रुची वाटत नसेल त्याना न उघडण्याचा पर्याय उपलब्ध आहेच.

?

गोळे यांनी मान्य केले असतानाही तुम्ही त्यांची वकिली का करीत आहात?
ज्यांना आवडत नसेल त्यांना टीका करण्याचा पर्याय का नाकारीत आहात?

किंचित असहमत

ज्यांना आवडत नसेल त्यांनी ते उघडू नये असे आवाहन करण्याचे स्वातंत्र्य निश्चितच सदस्यांना असावे पण तशी सक्ती किंवा संकेतस्थळाचा कायदा नसावा. ज्यांना हे आवडत नाही त्यांना तसे स्पष्टपणे सांगण्याचा अधिकारही हवा. कधीकधी 'तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही वाचू नका' हे खोडसाळपणे सांगणे आणि कंपूबाजी करून एखाद्याचे लेख आवडत नाही असे खोडसाळपणे सांगणे होऊ शकते तेव्हा तारतम्याने वागणे बरे.

अशाचप्रकारे यनावाला आणि नानावटी यांनाही एकाच प्रकारचे लेख टाकत जाऊ नका (पक्षी: मऊ माती खणत राहू नका) असे सांगितले गेले आहे परंतु गोळ्यांनी आपल्या लेखांत तोचतोचपणा असतो हे मोठ्या मनाने मान्य केले तसे काही यना आणि नानावटी यांनी केल्याचे आठवत नाही. करावे अशी सक्ती त्यांच्यावर कुणी करू शकत नाही. तसेच हे आहे. गोळे आणि नानावटी यांचे लेख आवडणारे जे "चाहते" आहेत ते अशी वकीली करणे शक्य आहे आणि त्यात अयोग्य असेही काही नाही. असो.

वकीलि ?

एका साध्याश्या प्रतिक्रियेला "वकीलि" वगैरे विशेषण देण्याचे कारण काय् ?

खरोखर

आणि तेसुद्धा तुम्ही टिका करण्याचा पर्याय नाकारलेला नसताना.
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

नाही

"ज्याना रुची वाटत नसेल त्याना न उघडण्याचा पर्याय उपलब्ध आहेच." हे विधान टीका करण्याचा पर्याय नाकारते.

मऊ माती खणत राहू नका

अशाचप्रकारे यनावाला आणि नानावटी यांनाही एकाच प्रकारचे लेख टाकत जाऊ नका (पक्षी: मऊ माती खणत राहू नका) असे सांगितले गेले आहे परंतु गोळ्यांनी आपल्या लेखांत तोचतोचपणा असतो हे मोठ्या मनाने मान्य केले तसे काही यना आणि नानावटी यांनी केल्याचे आठवत नाही. करावे अशी सक्ती त्यांच्यावर कुणी करू शकत नाही. तसेच हे आहे. गोळे आणि नानावटी यांचे लेख आवडणारे जे "चाहते" आहेत ते अशी वकीली करणे शक्य आहे आणि त्यात अयोग्य असेही काही नाही. असो.
प्रियाली यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे मला अशा प्रकारे सल्ला दिलेले आठवत नाही. नजरचुकीने वाचायचे राहूनही गेलेही असेल. संदर्भ दिल्यास चूक खात्रीने सुधारता येईल. चूक मान्यही केले असते व corrective action ही घेतले असते.
'उपक्रम'वर लेख अपलोड करण्यामागे 'स्वांत सुखाय' बरोबरच इतर समविचारी चिकित्सकांशी संवाद साधण्याचा माफक उद्देश असतो. तो कितपत साध्य होत आहे याचा अंदाज न आल्यामुळे असे झाले असावे. यात कुठलाही अट्टाहास नाही.

प्रतिसाद

सर्वप्रथम आपण किंवा यना किंवा गोळे यांनी उपक्रमावर लिहूच नये असे मला आडूनही सुचवायचे नाही. आपण तिघेही चांगले लेखक असून आपले लेखन उत्तम शब्दांत, भाषेत मांडता त्यामुळे उपक्रमाला आपली गरज आहे असे म्हणेन. तेव्हा असे लेख टाकू नये असे आपल्याला सरळसोट मी सुचवले नसावे. शिवाय अशाप्रकारे लिहिणार्‍या एका लेखकाकडे (यनांकडे) नापसंती व्यक्त केल्यावर दुसर्‍यासाठीही तेच लागू आहे. नापसंती लेखकाबद्दल नसून लेखनाबद्दल किंवा लेखनविषयाबद्दल आहे.

प्रियाली यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे मला अशा प्रकारे सल्ला दिलेले आठवत नाही.

मला वाटते मागे मी आपल्याला प्रत्येक लेखात बाबा-बुवा यायलाच हवेत का असे विचारले आहे. आणखीही असावे पण आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही किंवा चर्चेत भाग घेत नाही तेव्हा विषय वाढला नसावा. :-)

'उपक्रम'वर लेख अपलोड करण्यामागे 'स्वांत सुखाय' बरोबरच इतर समविचारी चिकित्सकांशी संवाद साधण्याचा माफक उद्देश असतो. तो कितपत साध्य होत आहे याचा अंदाज न आल्यामुळे असे झाले असावे. यात कुठलाही अट्टाहास नाही.

आपले म्हणणे योग्य आहे आणि याच्याशी माझी सहमतीच आहे म्हणूनच मी रिटेंच्या म्हणण्याला किंचित असहमती दर्शवली पण जसे हे आपल्याला लागू आहे तसेच गोळ्यांनाही लागू आहे आणि ठणठणपाळ यांनाही लागू आहे एवढेच सुचवायचे होते.

फरक

कंपूच्या 'नावडीचा विषय' या कारणाने कोणीच लेखन थांबवू नये असे मला वाटते. गोळे आणि यनावाला/नानावटी यांच्यात महत्वाचा फरक असा की गोळे "पटले नाही तर सोडून द्या" असा पवित्रा घेतात (समर्थन करीत नाहीत) तर यनावाला/नानावटींच्या बहुतेक लेखांतील मतांचे समर्थन करण्यास ते स्वतः (कमी प्रसंग) किंवा इतर काहीजण (अनेक) येतात. काही प्रसंगी मात्र यनावाला/नानावटींचे विचार हे जे 'इतर' आहेत त्यांनाच पटत नाहीत आणि धागाप्रवर्तकही आक्षेपांकडे दुर्लक्ष करतात. केवळ अशाच प्रसंगांमध्ये गोळ्यांशी त्यांची तुलना योग्य ठरेल. ठठपा यांनी आक्षेपांकडे दुर्लक्ष केल्याचे काही उदाहरण आहे काय?

:-)

गोळे "पटले नाही तर सोडून द्या" असा पवित्रा घेतात (समर्थन करीत नाहीत) तर यनावाला/नानावटींच्या बहुतेक लेखांतील मतांचे समर्थन करण्यास ते स्वतः (कमी प्रसंग) किंवा इतर काहीजण (अनेक) येतात.

हा फरक नाही मला तर साम्य दिसते फक्त सांगण्यात फरक आहे. यनांवर सिलेक्टिव रिडींगचा आक्षेप यापूर्वीही घेण्यात आला आहे. नानावटीही फक्त त्यांच्या समविचारी लोकांनाच उत्तरे देतात असे दिसते. म्हणजे गोळे "पटले नाही तर सोडून द्या" म्हणतात आणि नानावटी "पटत नसेल तर हू केअर्स?" म्हणतात. ;-)

असो. गोळे यांच्या "पटले नाही तर सोडून द्या" या वाक्याचे समर्थन अजिबात करायचे नाही हे नमूद करते.

ठठपा यांनी आक्षेपांकडे दुर्लक्ष केल्याचे काही उदाहरण आहे काय?

ठठपांचे नाव आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यासंदर्भात घेतलेले नाही. 'मी समिविचारी लोकांना माझे विचार सांगण्यास येथे येतो' असे वक्तव्य ठठपाही करू शकतात एवढेच म्हटले.

;)

लेखापेक्षा प्रतिसाद वाचुन मौज वाटली :)

- टारेंद्र मौजे

 
^ वर