‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स हा वर मी गणराया मागितला आहे.

कालच मिस्टर इंडिया! हा जाला वरील लेख वाचला . अदृश होवून इतरांच्या खाजगी जीवनात डोकावण्याची इच्छा , जादूची अंगठी, बाबा , बुवा , महाराज त्याच्या मनात आलेल्या सर्व कल्पना वा विचार अत्यंत घाणेरड्या, अश्लील, वात्रट या सदरात मोडणार्‍या होत्या.परंतु हेमंतला अशा वाईट गोष्टीपासून चार हात दूरच रहायचे होते . हे वाचत प्रतिक्रिया देतच झोप कधी लागली समजलेच नाही.
सकाळी उठल्या बरोबर वर्तमान पत्र लोकसत्ता वाचणे हा प्रमुख कार्यक्रम.प्रथम गजलीयत गझलीयत भीमराव पांचाळे यांचे उर्दू शेरोशायारीचे लहानसे पण मन प्रसन्न करणारे सदर वाचून अग्रलेखा कडे वळलो .शीर्षक वाचून अगं बाई,अरे बापरे !! वाटल हे काय आज संपादकांना विषय मिळाला नाही बाई, बाप असा अग्रलेख. लिंक पुढे दिली आहे .अवश्य वाचणे. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=998...
लेख वाचल्या वर उपक्रमा वरील चर्चा आठवली आणि आश्चर्य वाटले. असे कांही घडले तर मज्जा येईल. परंतु संपादक म्हणतात, आता या शास्त्रज्ञांनी माणसाचे जगणेच मुश्कील करण्याचा चंग बांधला आहे. मनुष्याला सुखाने जगता यावे म्हणून आपण विज्ञानाला प्रोत्साहन दिले; परंतु विज्ञानाने आता माणसाच्या प्राथमिक स्वातंत्र्यावरच घाला घालण्याची पूर्ण तयारी केली आहे. माणसाच्या जगण्यातली गंमत, जगातल्या नव्वद टक्के साहित्यातली गंमत आणि एकूणच मानवी व्यवहाराचा पाया उद्ध्वस्त करण्यास विज्ञान सज्ज झाले आहे. तेव्हा एक व्हा, एकत्र या आणि एका स्वरात विज्ञानाचा निषेध करा. माणसाच्या मनातले भाव वाचून त्याचे शब्दांत रूपांतर करणारे यंत्र येऊ घातले आहे. सत्य दडवणे, खोटे बोलणे, थापा मारणे, वेळ मारून नेणे या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. केवळ प्राथमिक गरजाच नव्हे तर माणूस स्वतंत्र असल्याचे ते पहिले लक्षण आहे. एक वेळ माणसाकडे अन्न, वस्त्र, निवारा याची सोय नसेल तर चालून जाईल; परंतु हवे तेव्हा खोटे बोलण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्याने जगायचे कसे?थोडक्यात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हे आपण जणू सामान्य गोष्ट समजून चालत असतो. घरात, बाहेर, कार्यालयात प्रत्येक व्यवहारात माणूस खोटे बोलत असतो. जग सुरक्षित चालले आहे ते माणसाला खोटे बोलता येते म्हणून. तेव्हा ही सोय संपली तर जगात हाहाकार उडेल. लंडन येथील काही शास्त्रज्ञांनी प्रयोग करून असे यंत्र तयार केले असून, ते दोन ते तीन वर्षांत प्रत्यक्ष उत्पादनाच्या पातळीवर येण्याची शक्यता आहे. माणसाच्या मेंदूतील ‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स जोडले तर त्याच्या मनातील विचारांचे लहरींमध्ये रूपांतर होईल आणि त्या लहरींची उकल करून, त्याच्या विचारांना शब्दरूप देता येईल. ज्यांची वाचा गेली आहे, काही कारणाने बोलता येत नाही, अशा रूग्णांना आपल्या भावना त्यांच्या सुहृदांपर्यंत पोहोचविता याव्यात म्हणून आपण हे संशोधन केले....
कमाल आहे इतके दीवस विज्ञानाचा उदो उदो करणारे संपादक यांनी आज चक्क या यंत्राचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञां विरुद्ध स्वातंत्र्यासाठी बेण्डबाजा वाजवत आहेत. आता हे शास्त्रज्ञ मानवाच्या खाजगी आयुष्यात ही हस्तक्षेप करत आहे म्हणत खाजगी स्वातंत्र्य जपणे आवश्यक आहे, अशी मागणी करत आहे.त्यातही अखिल मानवी व्यवहाराच्या केंद्रस्थानी असलेले खोटे बोलण्याचे अथवा सत्य दडविण्याचे स्वातंत्र्य हिरावले जाण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा ते महास्फोटापेक्षाही महाभयंकर असते. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे ते जाणून घेणे उद्या सहज शक्य झाले तर जगण्याची कशी ‘वाट लागेल’ याची कल्पनाच करून बघा. ‘मी आज जेवणार नाही, जरा पोटात दुखत आहे’ असे एखादा नवरा त्याच्या बायकोला सांगेल. त्याच वेळी तिच्या हाती असलेल्या यंत्राच्या पडद्यावर उमटेल, ‘च्यायला मित्रांसोबत जरा जास्तच जेवलो, आता खरे सांगितले तर ही बया बोंब मारणार!
मला तर ही कल्पना फार आवडली. माणसाच्या मेंदूतील ‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स जोडले तर बेईमान भ्रष्ट्राचारी , देशद्रोही, सरकारी नोकरशहा , पांढऱ्या,हिरव्या, भगव्या राजकारणी दहाषदवाद्यांना जनता सहज ओळखेल. भारतात हे संशोधन लवकरात लवकर येवो !! हा वर मी गणराया मागितला आहे. आपण............

Comments

उलटही शक्य

खोटे बोलण्याचा शोधच लागला नसेल तर कसा समाज असेल याचे छान कल्पनाचित्र इन्वेन्शन ऑफ लाइंग या चित्रपटात आहे. त्यातील कथानायकाला 'खोटे बोलणे' या कृतीचा शोध लागतो आणि...

ह्या यंत्राला अजिबात विरोध नाही.

सर्वसाधारणपणे माणसांच्या वागण्यात ४ प्रकार असतात
१) मनात चांगले आणि मुखात देखील चांगले : ह्या प्रकारातील लोकांना ह्या यंत्राचे काही भय असणार नाही.
२) मनात चांगले पण मुखात कठोर : ह्या प्रकारातील लोकांना ह्या यंत्राचा फारसा उपयोग होणार नाही आणि ह्या यंत्र मुळे त्यांचा काही तोटाही होणार नाही. त्यमुळे हि लोक सुद्धा काही विरोध करण्याचे कारण नाही.
३) मनात वाईट आणि मुखात पण वाईट. : हि लोक अगोदरच बाजूला ढकली जातात. ह्या लोकंच्या हातात जास्त सत्ता हि नसल्याने हि लोक विरोध करून पण काय फायदा नाही.
४) मनात वाईट पण मुखात मध : हा. हाय प्रकारातील लोकांना फक्त ह्या यंत्राच धोका संभावितो. त्यामुळे ह्याच प्रकारातील लोक ह्या यंत्राला विरोध करताना दिसतील.

आपला ह्या यंत्राला अजिबात विरोध नाही. कारण माझे जीवन हे असले मुखात एक आणि मनात एक ह्यावर अवलंबून नाही.
(कदाचित हे यंत्र लाऊन मी प्रतिसाद टंकायला बसलो तर माझे सदस्यनाम 'गांधीवादी' बदलून वेगळे लिहिले जाईल ते मला माहित आहे आणि मी त्यासाठी सुद्धा तयार आहे.)

हा लेख ज्या मूळ लेखावरून thanthanpal ह्यांना सुचला त्याच लेखावरची हि प्रतिक्रिया अगदी जशीच्या तशी इथे लागू पडेल. ती मी इथे देत आहे.
http://www.mr.upakram.org/node/2817#comment-45798

पण, मेदुतील काही रसायने ते मन ओळखण्याचे रहस्य इतके सहजसहजी ते मानवाच्या हातात देतील असे वाटत नाही.

नवीन यंत्र

कमाल आहे इतके दीवस विज्ञानाचा उदो उदो करणारे संपादक यांनी आज चक्क या यंत्राचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञां विरुद्ध स्वातंत्र्यासाठी बेण्डबाजा वाजवत आहेत.

एकंदरीत नवीन गोष्ट दिसली की त्यापासून धोका कसा आहे हे सांगणारे खूप असतात. नव्याची भीती (निओफोबिया) हा प्रकार आता काही नवीन राहिला नाही. दुर्दैवाने अशी नकारात्मक भूमिका ही कुठल्यातरी आंतरिक भीतीतून उत्पन्न होते. व ती व्यक्त केली की इतरांच्या आंतरिक भीतीला उसळून वर आणते. त्यामुळे माध्यमं अशा भीती-कल्पना अधिक प्रमाणात छापतात.

च्यायला मित्रांसोबत जरा जास्तच जेवलो, आता खरे सांगितले तर ही बया बोंब मारणार!

असल्या गोष्टी कळण्यासाठी बहुतेक बायकांकडे ऑलरेडी यंत्रं असतात. नवऱ्यांनाच आपल्या यंत्रावरून 'अरे, मी थापा मारतोय हे तिला कळतंय बरं का' असं कळेल. :)

मला वाटतं ते यंत्र चालू ठेवायचं की नाही याबाबत मला स्वातंत्र्य असेल. अशा यंत्राचा वापर करून अतिशय सुंदर कला निर्माण होऊ शकेल - अनेक लेखकांनी संज्ञाप्रवाह शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच एखाद्या मुखदुर्बळ माणसाला देखील आपल्या भावना व्यक्त करायला मदत होईल. एखादी व्यक्ती आतून कशी आहे हेही दिसायला मदत होईल. पोलिसांना गुन्हेगाराची उलटतपासणी घ्यायला मदत होईल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

यंत्र

मला तरी असले यंत्र दुरापास्त वाटते.
अजून बोललेले (तोंडानी) हमखास लिहिणे जमत नाही. तिकडे अशा इलेक्ट्रिकल सिग्नलची काय कथा.
मूळ दुवा कुठे मिळाला नाही. कुठला इलेक्ट्रिक सिग्नल मनात बोललेल्याशी संबंधीत असतो यावर पहिल्यांदा माहिती येणे. त्याचा तपास होणे. मग पुढची पायरी म्हणजे कोणा एकावर(वा काहीजणांवर) प्रयोग. तो यशस्वी झाल्याची माहिती येणे. नंतर याचे धंदेवाईक उत्पादन (जशी याची मागणी भरपूर आहे असे धरून.) अशा पायर्‍या दिसल्या नाही की संशय बळावतो.

शेवटचा प्रश्न म्हणजे मनात असलेले आणि मनात बोललेले विचार यात गल्लत केली जात आहे. मनात बोललेले विचार हे खोटे बोलण्याइतकेच लीलया भिन्नपणे व्यक्त होऊ शकतात.

प्रमोद

 
^ वर