चीन : एक अपूर्व अनुभव

    गंगाधर गाडगीळांनी मराठीत अनेक उत्तमोत्तम प्रवासवर्णने लिहलेली आहेत. 'गोपुरांच्या प्रदेशात', 'चीन-एक अपूर्व अनुभव', 'नायगाराचे नादब्रम्ह', 'रॉकी-अमेरिकेचा हिमालय', 'सातासमुद्रापलीकडे' इत्यादी इत्यादी.... त्यातले 'गोपुरांच्या प्रदेशात' हे गंगाधर गाडगीळांचे पहिले प्रवासवर्णन. पुढे त्यांना रॉकफेलर फाऊंडेशनची अभ्यासवृत्ती मिळाली तेव्हा त्यांनी युरोप, इंग्लंड, अमेरिका, हवाई, जपान, बॅंकॉक, सिंगापूर असा भरभक्कम प्रवास केला. या प्रवासावरच त्यांनी बहुतेक प्रवासवर्णने लिहलेली आहेत. (अर्थात प्रत्येक प्रवासावर पुस्तक लिहलेले नाही. :-(

    तर गंगाधर गाडगीळांनी लिहलेले ’चीन:एक अपूर्व अनुभव’ हे प्रवासवर्णन नुकतेच वाचले. लेखकांच्या प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून त्यांना नोव्हेंबर १९९१ मध्ये चीनला जाण्याची संधी मिळाली. त्यातल्या अनुभवांवर हे पुस्तक बेतलेले आहे. तसे रुढार्थाने याला प्रवासवर्णन म्हणता येणार नाही. कारण प्रवासाची सुरुवात कशी झाली, कोणती ठिकाणे बघितली, त्यांचा इतिहास, त्या देशातल्या लोकांचे राहणीमान, आलेले अनुभव, घडलेले प्रसंग अशा वळणाने जाणारे हे पुस्तक नाही. गाडगीळांच्या आधीच्या प्रवासवर्णनपर पुस्तकांपेक्षा हे थोडे वेगळे आहे.

    पण मग वेगळे म्हणजे कसे? गाडगीळ प्रस्तावनेत म्हणतात, "चीनचे प्रवासवर्णन हे अनुभवांचं प्रवासचित्रण असलं तरी प्राधान्यानं कलात्मक निर्मिती नव्हती. माहिती देणं, अनुभवांचा अन्वयार्थ लावणं हा या लेखनामागचा हेतू होता. त्यामुळे सातासमुद्रापलीकडे या पुस्तकातील लेख लिहताना जी पद्धती मी वापरली ती येथे वापरणं शक्य नव्हतं. चीनचं प्रवासवर्णन लिहताना काहीशी वेगळी पद्धती मी अनुसरली आहे. साहित्य, आर्थिक स्थिती, समाजजीवन इत्यादींबद्दलची प्रवासभर विखुरलेली निवेदनं मी एकत्र केली आहे. त्याचं विश्लेषण करुन अन्वयार्थ लावला आहे."

    स्वत: गाडगीळ अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळे साम्यवादाने वाटचाल करणार्‍या चीनचे त्यांनी बारीक निरीक्षण केले आहे. शहरांमधील मॉलमध्ये असणार्‍या गर्दीवरुन लोकांच्या क्रयशक्तीबद्दल, झोपडपट्ट्यांच्या प्रमाणावरुन साम्यवादाच्या उपयुक्ततेबद्दल अशा छोट्या छोट्या बाबींवरुन गाडगीळांनी या अजस्र ड्रॅगनचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.

    एवढंच काय तर ते राहत असलेल्या हॉटेलातलं निरीक्षण नोंदवताना ते म्हणतात,"चीनमध्ये आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो तेथे कधी कधी चार-पाच घड्याळे लावलेली असत. त्यात चीनमधील वेळेप्रमाणे अन्य महत्त्वाच्या शहरातील वेळही दाखवलेली असे. त्यामुळे चीनला कोणती शहरे महत्त्वाची वाटतात ते चटकन कळायचं. या घड्याळात टोकियो, न्यूयॉर्क, लॉस ऍंजेलिस, लंडन इत्यादी शहरांतल्या वेळा दाखवलेल्या असत. त्याबरोबरच कराचीतील वेळही दाखवलेली असे. पण दिल्ली अगर मुंबई येथील वेळ मात्र दाखवलेली नसे. म्हणजे चीनला पाकिस्तान जवळचा आणि महत्त्वाचा वाटतो, भारत नव्हे. आपण तिबेट चीनला आंदण दिल्यावर असं व्हावं हे अपेक्षितच होतं. भाईभाई असा उदघोष करणार्‍या आमच्या महान नेत्यांना मात्र ते कळलं नाही."

    गाडगीळांची बारीक नजर पुस्तकात अशी सतत जाणवत राहते. एखाद्या लहान मुलाने प्रत्येक वस्तू कुतुहलाने न्याहाळावी तशी! या प्रवासात त्यांनी चीनचा ग्रामीण भागही जवळून बघितला. चीनमधला ग्रामीण भाग आणि भारतातल्या गावाकडच्या चित्राची तुलना करताना त्यांनी लिहले आहे,"आपल्या ग्रामीण भागातून प्रवास करताना अनेक रिकामटेकडी माणसं रस्त्याच्या कडेला बसून गप्पा छाटताना आणि विड्या ओढताना दिसतात. अनेक परदेशी लोकांनी तुमच्या देशात माणसं अशी रिकामटेकडी कशी बसलेली असतात, असा प्रश्न मला विचारलेला आहे. चीनमध्ये मात्र रस्त्याच्या कडेला बसलेली अशी रिकामटेकडी माणसं मला आढळली नाहीत. सगळी माणसं कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली होती. नाही म्हणायला एक अगदी म्हातारी बाई आपल्या घराच्या बाहेर खुर्चीवर बसलेली मला आढळली. पण तिच्या हातात सुद्धा काहीतरी विणकाम होतं." खूपच मार्मिक निरीक्षण आहे हे! डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हा वाक्प्रयोग वापरायचा मोह होतोय, तो आवरतो; मात्र काही तरी बोध देणारं नक्कीच म्हणता येईल. आणि गेल्याच काही वर्षात झपाट्याने आपल्या पुढे गेलेल्या चीनचं रहस्य उलगडणारंही!

    चीनच्या प्रवासाला गेल्यावर तिथल्या अगम्य खाद्यसंस्कृतीबद्दलही काहीतरी उल्लेख येणे अपरिहार्यच आहे. तसा तो या पुस्तकातही आलेला आहे. गाडगीळ म्हणतात,"एका वाटोळ्या टेबलाभोवती आम्ही बसलो. त्या टेबलावर एक जराशी लहान वाटोळी तबकडी होती. तिच्यावर एकामागून एक पदार्थांच्या बश्या आणून ठेवल्या जाऊ लागल्या. चॉपस्टिकने खाता यावं इतकेच पदार्थाचे तुकडे केलेले असत, पण आमचे चिनी स्नेही आपल्या चॉपस्टीक्स इतक्या कौशल्यानं वापरत होते की आम्ही चकितच झालो. जेवणात किती पदार्थ असणार ते आम्हाला सांगितलेलं नसे. एकामागून एक असे ते सारखे येतच राहात. ते पंधरा तरी सहज असत. बॅंक्वेट असलं की त्यांची संख्या वीस किंवा अधिक असायची. त्यामुळे आपण काय खायचं, किती खायचं, कुठे थांबायचं हे ठरवणं फार अवघड व्हायचं."

    अर्थात चीनला गेल्यावर गाडगीळांनी चंद्रावरुनही दिसण्याचा पोकळ दावा करणार्‍या जगप्रसिद्ध The Great Wall of China लाही भेट दिलीच.. त्याबद्दल ते म्हणतात,"...........

    असो. पुस्तकाच्या ओळखीसाठी आणि मनुष्य प्राण्यांमध्ये उपजत असलेले कुतुहल :-) जागे करण्यासाठी इतके लिखाण पुरे आहे. सगळेच सांगण्याचे काही कारण नाही, तेव्हा इथेच थांबतो. १९९१ नंतर चीनमध्ये, भारत चीन संबंधामध्ये बरेच बदल झालेले असले तरी या बाबीने पुस्तकाचे मूल्य उणावेल असे मला वाटत नाही. पुस्तकाची पाने, प्रकाशक, मूल्य इ. बाबत माहिती देऊ शकत नसल्याबद्दल क्षमस्व! मी ते लायब्ररीतून आणून वाचले. बरीच जुनी प्रत होती.

-सौरभदा.

Comments

मस्त रे!

मस्त परीक्षण, सौरभ.
परीक्षण वाचल्यावर कधी एकदा पुस्तक वाचतो अशी उत्सुकता वाटत असेल तर परीक्षण यशस्वी झाले आहे असे समजायला हरकत नसावी. :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

ड्रॅगन जागा झाल्यावर

नक्कीच रंजक परिचय. वाचायला आवडेल. मध्यंतरी अरूण साधूंचे 'ड्रॅगन जागा झाल्यावर' चाळलं होतं नि 'फिर्त्या' प्रभू बाईंचे 'चीनी मातीही' वाचले होते. पण गाडगीळांच्या पुस्तकाविषयी उत्सुकता आहेच.

(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !

तिबेट चीनला आंदण

आपण तिबेट चीनला आंदण दिल्यावर असं व्हावं हे अपेक्षितच होतं. भाईभाई असा उदघोष करणार्‍या आमच्या महान नेत्यांना मात्र ते कळलं नाही.
कसली स्वस्त टाळ्याघेऊ वाक्ये आहेत. आंदण द्यायला तिबेट भारताचा हिस्सा होता काय? कृपया जाणकारांनी प्रकाश पाडावा.

बाकी छान आहे पुस्तक-परिचय. धन्यवाद.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पंचशील धोरण

आपण तिबेट चीनला आंदण दिल्यावर असं व्हावं हे अपेक्षितच होतं. भाईभाई असा उदघोष करणार्‍या आमच्या महान नेत्यांना मात्र ते कळलं नाही.

हे वाक्य मलाही खटकलं होतं. वस्तुस्थिती अशी होती, की ब्रिटिश या प्रदेशातून निघून गेले तेव्हा तिबेटच्या परराष्ट्रविषयक धोरणाची जबाबदारी त्यांनी भारताच्या पर्यायाने नेहरूंच्या गळ्यात घातली होती. पण चीनने वांशिक साम्यतेच्या आधारावर तिबेट गिळंकृत केले, त्यावेळी भारताने चीनला कडाडून विरोध केला नाही. किंबहूना त्यापुढे नांगी टाकली. शत्रुत्व नको म्हणून 'हिंदी चिनी, भाई भाई' हे धोरण स्वीकारले. उपखंडात तणावाची परिस्थिती नको म्हणून नेहरूंनी पंचशील धोरणही जाहिर केले. पण चीनने त्याला भीक न घालता स्वतःला करायचे तेच केले. मधल्या काळात दलाई लामा तिबेटमधील हलाखीच्या परिस्थितीतून पळ काढून अरूणाचल प्रदेशमार्गे भारतात आले. नंतर धरमशालाला स्थायिक झाले. तिबेट कधीही भारताचा भाग नव्हते. पण त्याची जबाबदारी दिल्यानंतर ती भारताने निभावली नाही, असे म्हणता येईल. सध्या भूतान या देशाच्या बाबतीत अशीच परिस्थिती आहे. त्याच्या संरक्षणाचे नि परराष्ट्र धोरणाचे सर्व अधिकार भारताकडे आहेत.
(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !

उपयुक्त माहिती...

भोचक, या माहितीसाठी धन्यवाद. भारताचे धोरण त्याकाळी गुळमुळीत राहिले यात काहीच नवल नाही ? अशा अनेक घोडचुका आहेत ज्या आठवल्या की संताप येतो आणि लज्जास्पदही वाटते.

इतर प्रतिसादांबद्दलही धन्यवाद.

==================

मस्त

ओळख छान.. याच देशावरील चीनीमाती वाचले आहे.. आता हे देखील वाचून बघेन

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर