चला विठ्ठला आता तू सुद्धा तिरुपती,शिर्डीवाले साईबाबा च्या पंगतीत जावून बसला

चला विठ्ठला आता तू सुद्धा तिरुपती,original शिर्डीवाले साईबाबा च्या पंगतीत जावून बसला.आनंद झाला. गावोगावी जी साई ची मंदिरे आहेत ती (duplicate) आहेत हे आम्हाला माहितच नव्हते शिर्डी संस्थानाने ते जाहीर केले. देवा मंदिरे नकली असतात पण देवा आमच्या श्रद्धा तर असली आहेत ना! जशी मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात केविलवाणी उभी राहते तसा तू जुन्या विटेवर युगा युगा पासून उभा आहे. इतके दिवस आम्हाला लाजल्या सारखे होत होते. आता लवकरच हिरेजडीत सोन्याच्या विटेवर तू उभा राहशील
आता लवकरच हिरेजडीत सोन्याच्या विटेवर तू उभा राहशील लवकरच बडवे आमचाच विठ्ठल खरा आहे. दुसरी मंदिरे नकली आहे येथेच या .असे जाहीर करतील म्हणजे रोज लाखोंची गर्दी पंढरपुरात होईल गर्दी साठी पंचतारांकित हॉटेल्स पब मैयखाने उभी राहतील राहिला आम्हा वारकऱ्यांचा प्रश्न कुठे शोधिशी काशी अन कुठे शोधिशी रामेश्वर म्हणत शेतमजुरी करताकरता मुखी तुझे नाव घेवूत सावंता माळ्या सारखे.

www.thanthanpal.blogspot.com

Comments

वारकरी

ते काहीही असो, लोकांना ते पैसेवाले देव चालतात तर इथे का नको? असो. चॅनेलवर प्रतिक्रिया पाहिल्या त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच कळले की विठ्ठल हा गरिबांचा देव आहे. कोणी सांगेल का कि देव गरिबांचा श्रीमंतांचा असा वेगवेगळा असतो का? त्यासाठी देवाने काही नियम/आरक्षण बनवले आहे का? कि गरिबी सीमारेषा वगैरे विठ्ठलाने घालून दिली आहे आणि ती आम्हाला माहितच नाही?
साहित्य संमेलनाध्यक्षाचा मुद्दा असो की हा आत्ताचा, आमचे तरी मत असे झाले आहे की वारकरी हे आता वार-करी झाले आहेत. पहावं तेंव्हा आंदोलनाचे हत्यार काढून वार करण्याची भाषा ऐकवतात. विठ्ठला, पांडूरंगा तुच बघ रे बाबा.






खरं आहे...!

>>आता लवकरच हिरेजडीत सोन्याच्या विटेवर तू उभा राहशील लवकरच बडवे आमचाच विठ्ठल खरा आहे. दुसरी मंदिरे नकली आहे येथेच या .असे जाहीर करतील म्हणजे रोज लाखोंची गर्दी पंढरपुरात होईल

खरं आहे. या बडव्यांना कोणीतरी बडवा रे...!
>>आम्हा वारकऱ्यांचा प्रश्न कुठे शोधिशी काशी अन कुठे शोधिशी रामेश्वर म्हणत शेतमजुरी करताकरता मुखी तुझे नाव घेवूत सावंता माळ्या सारखे.

खरं आहे...! देव [दर्शन] आता खूप महाग होत चालले आहे.

-दिलीप बिरुटे

पुंडलिकाचे भेटी..

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
विठ्ठलाचे वेगळेपण
* विठ्ठलाचे रूप इतर देवांहून भिन्न आहे. ते "विटेवरी उभा, कटेवरी हात।" असे पूर्णतया मानवी आहे. गणपती गजमुख,विष्णू चतुर्भुज, शंकर त्रिनेत्र,दत्त त्रिमुखी, हे सगळे अतिमानवी.
* "ऐसा विटेवर देव कोठे! (ले.म.वा.धोंड) या पुस्तकात लिहिले आहे:
"प्रथम भेटी आलिंगन।मग वंदावे चरण।" अशी पूर्वी विठ्ठल दर्शनाची प्रथा होती.दुसर्‍या कोणत्याही देवाला भक्त आलिंगन देत नाहीत.
*विठ्ठलाचे भक्त त्याला कोणताही नवस बोलत नाहीत."हेचि दान देगा देवा तुझा
विसर न व्हावा।"नलगे मुक्ती धन संपदा संतसंग देई सदा"एव्हढेच मागणे.(आता शासकीय पूजेच्या वेळी मंत्री " राज्यात पाऊस पडू दे.पीक चांगले येऊ दे"असे काही म्हणतात ते सोडा)
**पंढरीची वारी पुण्यसंपादन,पापनाशन इत्यादि साठी नसते."माझे माहेर पंढरी" या भावनेने जायचे.माहेरी जायचे ते आईला भेटण्या्साठी. दुसरा कोणता हेतू नसतो.पण भेटीने सासुरवासाचा शीण कमी होतो.
*खरा वारकरी विठ्ठलापुढे संसारदु:खाचे रडगाणे गात नाही.तो दर्शन घेतो, आलिंगन देतो,भक्तीचा सोहळा पाहून उल्हसित होतो आणि संसारातील कष्ट उपसायला प्रसन्न मनाने परततो.त्याला विठ्ठलाशी मनसंवाद साधायचा असतो.काही मागायचे नसते.
* विठ्ठल पंढरीत आला तो पुंडलिकाला भेटायला.पुंडलिक संकटात नव्हता. त्याने धावा केला नव्हता.विठ्ठलाला होती भक्तभेटीची ओढ.भक्त येऊ शकत नाही म्हणून देव गेला.
तर असे हे विठ्ठलाचे वेगळेपण आहे. आता पूजेसाठी ११००/रु मोजले की भक्त काहीतरी ऐहिक लाभाची इच्छा ठेवणारच.मग विठ्ठलाचे बाजारीकरण होणार .श्री. ठणठणपाळ यांनी व्यक्त केलेली व्यथा अशी असावी असे वाटते.

आठवले

पंढरीनाथा, झडकरी आतां, पंढरी सोडून चला !
विनविते, रखुमाई विठ्ठला !!
शरद

नाठाळांच्या माथी हनु काठी तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी हाणाव्या

हजारो वर्षा पासून विठ्ठल हा गरीबांचा बहुजन समाजाचा देव नाही माय माउली आहे आणि आपण म्हणता मला पहिल्यांदाच हा देव गरीबांचा आहे हे पहिल्यांदा समजले . अज्ञानाची सुद्धा मर्यादा असते. भार्ष्ट्राचार करून त्यातील १० % कमिशन तिरुपती शिर्डीला आपल्या पापात सहभागी करणारे
माय माउली विठ्ठलाच्या दर्शनाला कधी जात नाही. स्वत: विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेत उभा राहून अनुभव घेतल्या शिवाय हे तुम्हाला कसे कळणार नाही. पुढचा विचार वारकरी हे आता वार-करी झाले आहेत. बरोबर आहे त्यांच्या श्रद्धे वर तुम्ही साडेतीन टक्के लोक घाव घालणार तर त्यांनी का गप्प बसावे धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट' आणि नाठाळांच्या माथी हनु काठी तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी हाणाव्या या न्यायाने
वारकरी वागले तर काय चुकले त्यांचे.

काय सांगता?

अज्ञानाची सुद्धा मर्यादा असते.

मुळातच देव ही संकल्पना आहे. देवाचे देवपण मानायचे तर नाते मनुष्याचे आणि देवाचे झाले. तिथे आर्थिक पातळी मध्ये कशाला आणायची? देवाला सगळेच सारखे आहे भक्त म्हणून.
वारकर्‍यांचे वागणे वारी ऐवजी आंदोलनकारी जास्त वाटते आहे. संघटनाची शक्ति दाखवायचीच असेल तर् काहीतरी चांगले करून दाखवा. सरकारची बाकी सगळी महागाई बरी चालते या वारकर्‍यांना, त्यावेळी आंदोलन का नाही करत? की फक्य विठ्ठलाला साकडे घालून महागाई कमी होणार आहे?






किरकोळ सुधारणा

मुळातच देव ही संकल्पना आहे.

मुळातच देव ही मानवनिर्मित संकल्पना आहे, असे हवे. मग मुद्दा अधिक स्पष्ट होईल.
बाकी चालू द्या...

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

विठ्ठलाची मूर्ती

पंढरपूरच्या मूर्तीबद्दल संत साहित्यात बरीच बर्णने आहेत. त्यावरून मला निव्वळ दगडातली मूळ मूर्ती पाहायची उत्सुकता आहे. असे प्रकाशचित्र कुठे मिळेल का?
पंढरपूरला जाऊन हे मिळणे मला त्याहून कठीण वाटते.

प्रमोद

श्रीविठ्ठल एक महासमन्वय

श्रीविठ्ठल एक महासमन्वय हे रा.चि.ढेरे यांचे पुस्तक घ्यावे असे मी सुचवीन
त्यात आपल्याला बरीच प्रकाशचित्रे पाहावयास मिळतील.
[ हे पुस्तक यनासरांनी मला सुचविले होते]

-दिलीप बिरुटे

 
^ वर