बौद्ध धर्माचा संक्षिप्त परिचय

अनुवादकाचे प्रास्ताविक : प्राचीन भारतातील धार्मिक आणि सामाजिक घडामोडींबद्दल विचार उपक्रमावर अधूनमधून होतो. अशा संवादात बौद्धधर्माचा उल्लेख सहजच येतो. म्हणजे वेदकालातील किंवा महाभारतकालातील समाजमानसाबद्दल बोलताना बौद्धधर्माने याच्यात काय फरक घडवला, अशा प्रकारचा उल्लेख येणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत बौद्धधर्माबद्दल कुतूहल निर्माण होऊ शकते. म्हणून त्याबद्दल थोडक्यात परिचय करून द्यायची माझी इच्छा आहे. पण माझा खुद्द अभ्यास नाही, आणि धर्माचे पालन करण्याचा वैयक्तिक अनुभवही नाही. म्हणून येथे मी दुसर्‍या एका अभ्यासकाचा लेख भाषांतरित करून देतो आहे. माझ्याकडील धम्मपदाच्या प्रतीत [चौखंबा प्रकाशन, प्रकाशनवर्ष १९८३] श्री. कंछेदीलाल गुप्त यांनी प्रस्तावना लिहिली आहे, त्यात बौद्ध धर्माचा पुढील परिचय आला आहे. या मराठी भाषांतरातील सर्व मते, आणि अभ्यास श्री. गुप्त यांचा आहे - भाषांतरात काही चुका झाल्या असतील तर त्या अर्थात माझ्या आहेत.

बौद्ध धर्माचा संक्षिप्त परिचय
मूळ लेखक : श्री कंछेदीलाल गुप्त. "धम्मपद" (चौखंबा प्रकाशन, १९८३) या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील भाग.

बौद्ध धर्माचा सामान्य परिचय
भारतवर्ष अनादि काळापासूनची धर्मभूमी आहे. येथील विभूतींनी वेळोवेळी तत्कालीन जनभावनेच्या अनुसार, जनमानसाच्या पात्रतेकडे लक्ष देऊन, जीवन कसे जगावे आणि मृत्यूनंतर शांती कशी प्राप्त करावी याबद्दल आपले विचार प्रस्तुत केले आहेत. या विभूतींचे चिंतनस्थळ असलेला हा भारतवर्ष हा समस्त विश्वातील सर्वांत प्राचीन धर्मांची भूमी झाला, हे सांगणे नलगे. जगातील तीन प्राचीन आणि प्रसिद्ध धर्म - हिंदूधर्म, जैनधर्म आणि बौद्ध धर्म याच भारतभूमीवर जन्मले, फोफावले आणि बहरले. कर्मवाद, जन्मांतरवाद, आणि जीवनाचे अंतिम लक्ष्य म्हणून मोक्ष, कैवल्य किंवा निर्वाण या तीन्ही धर्मांना मान्य आहे.

बौद्ध धर्माचे प्रतिष्ठापक
भगवान गौतमांना सुरुवातीला राजकुमार गौतम म्हणणेच इष्ट आहे - हे कपिलवस्तु येथील एका प्रतिष्ठित क्षत्रिय राजाच्या घरी जन्मले. त्यांचा विवाह यशोधरा नावाच्या एका अत्यांत सुंदर राजकुमारीशी झाला होता. परंतु बाळपणापासूनच जन्म, जरा आणि मृत्यूने पिडलेल्या लोकांची दु:खे दूर करण्याचे विचार त्यांच्या मनात येत. विवाहानंतर पुत्रप्राप्ती होता त्यांनी घर सोडले. अनेक वर्षे भटकल्यानंतर, एकांतात मनन आणि चिंतन केल्याच्या फलस्वरूप ते एका निष्कर्षापाशी पोचले. त्यांनी मनुष्यजीवनाचे लक्ष्य निश्चित केले - जन्म, जरा, व्याधी आणि मत्यूच्या चक्रातून सदासर्वकाळसाठी दूर होण्याच्या स्थितीला त्यांनी नाव दिले "निर्वाण", किंवा मोक्षप्राप्ती. आणि या मोक्षाच्या प्राप्तीसाठी त्यांनी सोपी साधनेही प्रस्तुत केलीत. त्यांनी जे काही सांगितले, जो काही उपदेश केला, तेच बौद्धधर्माचे सार आहे. ज्या दिवशी राजकुमार गौतमाला चिंतन आणि मननानंतर हा निष्कर्ष मिळाला, त्या दिवशी ते भगवान गौतम "बुद्ध" (बुद्ध = जागलेला, ज्ञान प्राप्त झालेला) तसेच "सिद्धार्थ" (ज्याचे अर्थ सिद्ध झाले आहेत) या नावांनी ओळखले गेले.

गौतम एक लौकिक पुरुष होते, पण त्यांनी आपल्या जीवनात - आपल्या शरिरा-मनाने त्यांनी अशी काही साधना केली, असे काही प्रयोग केले, की ते भगवत्त्व प्राप्त झाले - ते नराचे नारायण झाले. त्यांनी सिद्ध करून दाखवले की मनुष्य प्रयास करून श्रेष्ठत्व प्राप्त करू शकतो. धम्मपदाच्या ३८०व्या गाथेत त्यांनी स्पष्ट म्हटले आहे - मनुष्य आपला स्वत:चा मालक आहे, दुसरा कोण मालक असू शकणार आहे?

या संदर्भात पूज्य गांधीजींचे स्मरण होते. त्यांनी आपल्या आत्मकथेला "माझे सत्याचे प्रयोग (My Experiments with Truth)" म्हटले आहे. गांधीजीसुद्धा आपल्या मनाला आणि शरिराला एक प्रयोगशाळा मानत, आणि शरिरा-मनावर प्रयोग करत-करत ते अशा स्थितीपाशी पोचले, त्या स्थितीतून त्यांना विचलित करणे सहज नव्हते. भगवान गौतमांनीही आपल्या जीवनातून स्पष्ट करून दिले की सामान्यात सामान्य मनुष्य साधना करून पुढे जाऊ शकतो.

बौद्ध धर्माचे साध्य
मनुष्यजीवन दु:खाने आणि तापांनी भरलेले आहे - जन्मापासून मृत्यूपर्यंत दु:खच दु:ख आहे. जन्म, जरा, व्याधी, आणि मृत्यूच्या भोवर्‍यात मनुष्य पडलेला असतो, इतकेच नव्हे, तर मृत्यूनंतर पुन्हा जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू हेच चक्र चालू राहाते. म्हणून बौद्ध धर्माने हिंदू आणि जैन धर्मांसारखेच या दु:खद जीवनचक्राला सदासाठी नष्ट करायचे ध्येय हेच आपले लक्ष्य किंवा साध्य मानले आहे.

बौद्ध धर्माचे प्रमुख सिद्धांत

(१) जग दु:खमय आहे. हे जग दु:खाने भरलेले आहे. जन्म, जरा, व्याधी आणि मरण, अप्रिय भेटणे आणि प्रिय-वियोग दु:खपूर्ण आहेत.
(२) या दु:खांचे कारण आहे. या सगळ्या दु:खांची उत्पत्ती कुठल्यातरी कारणाने होते. इच्छा, अभिलाषा, लालसा - किंवा बौद्धधर्माच्या भाषेत "तृष्णा" - यातून सर्व दु:खांची उत्पत्ती होते.
(३) या दु:खांचा प्रतिरोध केला जाऊ शकतो. कारण नष्ट केले तर परिणाम आपोआप नष्ट होतो. या दु:खांचे कारण इच्छा, अभिलाषा, लालसा, अथवा तृष्णा आहे. यांचा त्याग केला तर दु:ख नष्ट होते.
(४) यांचा त्याग करण्यासाठी मार्ग आहे. दु:खांचे करण असलेल्या इच्छा, अभिलाषा, लालसा, अथवा तृष्णा यांचा त्याग सहज नाही केला जाऊ शकत. तरी त्यांचा त्याग करण्यासाठी मार्ग आहे. याला अष्टांगिक मार्ग म्हणतात.

या अष्टांगिक मार्गात पुढील आठ गोष्टी आहेत :

(१) सम्यक दृष्टी - वरील चार आर्यसत्यांबद्दल पूर्ण विश्वास ठेवणे.
(२) सम्यक संकल्प - अकार्य न करायचा दृढनिश्चय करणे, संकल्प करणे.
(३) सम्यक वचन - असत्य, बाष्कळ भाषणापासून दूर राहाणे.
(४) सम्यक व्यवहार - प्राणिहिंसा आणि दुराचारापासून दूर राहाणे.
(५) सम्यक आजीव - सत्याने आजीविका चालवणे.
(६) सम्यक व्यायाम - मानसिक दोषांना पराजित करणे.
(७) सम्यक स्मृती - जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यूंचे सदैव स्मरण ठेवणे.
(८) सम्यक समाधी - तर्क, विचार, शांती आणि एकाग्रतेचा आश्रय घेणे.

वरील अष्टांगिक मार्ग म्हणजे बौद्ध धर्माची साधने होत.

बौद्ध धर्म मुख्यत: आचारधर्म आहे
या धर्मात नैतिक चरित्र आणि आचरणाचे मोठे महत्त्व मानलेले आहे. मनुष्य चांगला की वाईट, सुखी की दु:खी, हे त्याच्या करण्यावर आणि वागण्यावर अवलंबून आहे. मनुष्याला सदैव या गोष्टीकडे ध्यान द्यायला पाहिजे की आपण सदाचारी बनावे, सत्कर्मशील बनावे.

बौद्ध तत्त्वज्ञान
सृष्टी, जन्म-मृत्यू, परलोकवाद, ईश्वरवाद - यासंबंधीचे विचार हा तत्त्वज्ञानाचा विषय होय. भगवान बुद्धांनी या प्रश्नांना अवक्तव्य किंवा अनिर्वचनीय म्हटले आहे. अर्थात हे प्रश्न विचारण्यायोग्य नाहीत किंवा जाणण्यायोग्य नाहीत. हे जाणून-ना-जाणून मनुष्याला हानी होत नाही की लाभ होत नाही, म्हणून यांना जाणणे व्यर्थ आहे.

ईश्वर आणि ईश्वरभक्तीच्या संबंधात या तत्त्वज्ञानाचे निष्कर्ष आहेत की ईश्वरभक्तीवर भरवसा ठेवणार्‍यामध्ये शिथिलता आणि पराश्रयता उद्भवते. भक्तीचा सहारा घेऊन ईश्वर किंवा देवतेच्या भरवशावर राहून व्यक्ती असदाचरण करू शकतो, आणि त्या ईश्वर किंवा देवता भक्तीच्या बळावर त्या असदाचरणाला क्षमाही करवून घेऊ शकतो. म्हणून येथे भक्ती किंवा ईश्वराला काही स्थान नाही. येथे सिद्धांत आहे - सदाचारी व्हा, स्वावलंबी व्हा. तुम्ही स्वत:चा उत्कर्ष करू शकता, तुमचा उत्कर्ष दुसरा कोणी साधू शकत नाही.

कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म यांच्यावर या तत्त्वज्ञानाचा विश्वास आहे. मनुष्य कर्माच्या अनुसार पुनर्जन्म घेतो, आणि कर्माचे बंध सुटण्यालाच निर्वाण म्हणतात.
अतिशय कष्टमय तपश्चर्या याच्यामध्ये उचित मानली जात नाही. अत्यधिक मानसिक किंवा शारिरिक कष्ट सहन करणे येथे ठीक मानले जात नाही. त्याच प्रकारे सांसारिक पदार्थांत अत्यंत लिप्त होणेसुद्धा ठीक मानले जात नाही. या दोन्ही विरुद्ध टोकांच्या मध्ये सुवर्ण मध्य येथे स्वीकार केलेला आहे - यात ना अतिशय तपस्या आहे, ना अतिशय भोगलिप्सा.

बौद्धांची तीन रत्ने आहेत - बुद्ध, संघ आणि धर्म. प्रत्येक मनुष्याला या धर्माची दीक्षा घेताना या तिहींना शरण जायची प्रतिज्ञा घ्यावी लागते.

पुढील काळातल्या बौद्धजीवनात फाटे फुटल्यामुळे चार बौद्ध तत्त्वज्ञाने झाली आहेत - वैभाषिक, सौत्रांतिक, योगाचार, आणि माध्यमिक.

बौद्ध धर्मातील पुढे उद्भवलेल्या शाखा
भगवान बुद्धांनी सृष्टी आणि ईश्वर संबंधित प्रश्नांना अनिर्वचनीय, अव्याकृत म्हणून मौन धारण केले आहे. परंतु त्यांच्या पुढे आलेल्या धर्मावलंबी लोकांनी सृष्टी आणि ईश्वराच्या संबंधात आपले आपले विचार प्रस्तुत करण्यास सुरुवात केली.

दुसरी गोष्ट ही की संसार-समुद्रात पडलेल्या मनुष्याला सहार्‍याची अत्यंत आवश्यकता असते. मनुष्य एकदम स्वावलंबी होऊ शकत नाही. पूजा-अर्चा-वंदना केल्यास पार नेणार्‍या ईश्वर किंवा देवतेच्या सहायतेची त्याला आवश्यकता आहे. मनोवैज्ञानिक अंगाने आपण विचार केल्यास आपल्याला स्पष्ट दिसून येईल की साहाय्य मिळो, न मिळो, जोवर आपल्याला साहाय्य मिळण्याची आशा आहे, तोवर आपण हिमतीने कार्य करत राहातो. जर आपल्याला कुठला सहाराच नसेल तर आपण हाय खातो, किंवा निस्सहाय होऊन बसतो.

याच दोन कारणांसाठी किंवा उद्देश्यांच्या पूर्तीसाठी पुढील बुद्धधर्मात महायान शाखेचा जन्म झाला. त्यात ईश्वराच्या ठिकाणी गुरूची पूजा होऊ लागली. परंपरागत गोष्टी असलेल्या शाखेला हीनयान म्हणू लागले.

हळूहळू बौद्ध साहित्यात पौराणिक कथांसारख्या बुद्धजन्मासंबंधीच्या शेकडो कथा बनवल्या गेल्यात, आणि त्यांचा खूप प्रचार होऊ लागला.

महायान शाखेतले लोक सर्वांच्या निर्वाणाची कामना करतात. हीनयान शाखेचे बौद्ध केवळ स्वत:साठी प्रयासशील असतात.

महायान शाखेत हिंदूधर्माचे जवळजवळ संपूर्ण रूप दृष्टीस पडते. याच्यामध्ये बुद्ध सर्वशक्तिमान मानला गेला आहे, आणि ज्याप्रकारे विष्णू अवतार घेतो, त्याप्रमाणे बुद्धाचे अवतार सांगितलेले आहेत. बुद्धाच्या प्रतिमा बनवल्या जाऊ लागल्या, पूजा होऊ लागली, आणि बौद्ध भिक्षू पुरोहिताचे काम करू लागले.

बौद्धधर्माची वैशिष्ट्ये
(१) बौद्ध धर्म हिंदूधर्माच्या अवडंबरप्रियतेची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आला. म्हणून या धर्माने यज्ञाचा पूर्ण विरोध केला आहे.
(२) हा आचारप्रधान धर्म आहे. म्हणून या धर्मात उच्च प्रकारच्या नैतिकतेला आणि सदाचाराला विशेष महत्त्व आहे.
(३) या धर्मात निराशावाद अधिक आहे. जीवनाला नैराश्यपूर्ण आणि दु:खमय समजले जाते, आणि निराशा आणि दु:खाला दूर करण्याचे उपाय सांगितले आहेत.
(४) या धर्माचा कर्म-फलावर पूर्ण विश्वास आहे. मनुष्याला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते, आणि कर्मफल भोगायला त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात.
(५) या धर्मात - प्रारंभिक धर्मात - ईश्वराची काहीच आवश्यकता मानली गेली नाही आहे. ईश्वर आणि सृष्टि-सिद्धांताबाबत भगवान बुद्धांनी मौन पाळले आहे.
(६) ज्ञान आणि भक्ती बाजूला ठेवून या धर्मात कर्म आणि सदाचरणाचे विशेष महत्त्व दाखवलेले आहे.

भारतीय संस्कृतीला बौद्धधर्माने काय दिले
(१) कलांची उन्नती - कलेच्या माध्यमातून, म्हणजे चित्रकाराच्या कुंचल्यातून, मूर्तिकाराच्या छिन्नीतून आणि नर्तकाच्या मुद्रेतून, भारतीय संस्कृतीचे जे दर्शन आपल्याला मिळते, ते अद्वितीय आहे. अजिंठ्याची चित्रकला, कार्ले वगैरे ठिकाणच्या लेण्या, भरहुत आणि अमरावतीचे स्तूप, अमरावती आणि मथुरेतल्या मूर्ती, आणि अशोकाचे शिलास्तंभ - हे सर्व भारतीय कलेचे चांगले नमुने आहेत.
(२) साहित्याचा विकास - पाली भाषेत संपूर्ण बौद्ध साहित्य रचले गेले आहे. पाली साहित्यात त्रिपिटकांचे आपले खास असे महत्त्व आहे. भाषाविज्ञानात आणि प्राचीन भाषांच्या तुलनात्मक अभ्यासात पाली भाषेचे महत्त्व उघड आहे.
(३) सरळ आणि लोकप्रिय धर्म - या धर्माचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे, आणि हा हिंदूंच्या धार्मिक कर्मकांडांइतका जटिल नव्हता. यात केवळ एक गोष्ट महत्त्वाची होती - सदाचरण. आणि त्याचे पालन करणे सर्वांसाठी सोपे होते.
(४) उच्च नैतिक आदर्श - या धर्मात सदाचार, लोकसेवा आणि त्याग, या गोष्टींवर जोर दिलेला आहे. महायानी तर आपल्या स्वत:च्या निर्वाणाची पर्वा न करता प्राणिमात्राचे दु:ख दूर करणे, आणि सर्वांच्या निर्वाणासाठी सहयोग देणे, हे आपले लक्ष्य मानतात.

बौद्ध धर्मींकडून भारतीय संस्कृतीचा प्रसार
बौद्ध धर्माचा उत्कर्ष सम्राट अशोकाच्या काळात झाला. या धर्माला विश्वधर्म बनवण्याचे श्रेय त्याचेच. त्याने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना धर्मप्रचारासाठी लंकेला पाठवले. चीन, कोरिया, मध्य आशिया, बर्मा, थायलंड, मलाया, जावा, सुमात्रा आदि ठिकाणी आपल्या संस्कृतीचा झेंडा बौद्ध धर्मीयांनी फडकवला.

बौद्धधर्म आणि हिंदूधर्मातील प्रमुख साम्ये आणि फरक
दोन्ही धर्मांचा कर्मवाद आणि पुनर्जन्मावर विश्वास आहे. जन्म आणि व्याधींमधून सुटका मिळवणे हे दोन्ही धर्मांचे साध्य आहे.
हिंदूधर्मात सृष्टीबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा आहेत, भगवान बुद्धांनी या प्रश्नाबद्दल काहीच उत्तर दिलेले नाही.
हिंदू धर्म ईश्वरवादी आहे. ज्ञान, कर्म, भक्ती आदींना हिंदूधर्मात स्थान आहे. पण बौद्ध धर्माने ईश्वर-विषयाबद्दल विचार केलेला नाही. भगवान बुद्धांनी ईश्वराच्या प्रश्नाबद्दल मौन पाळले आहे. या धर्मात भक्तीचेही काही स्थान नाही. केवळ कर्म, आणि त्यातही सत्कर्माला महत्त्व आहे.
परंतु परवर्ती बौद्धधर्मात, म्हणजे महायान शाखेत, हिंदूधर्मासारखाच अवतारवाद, मूर्तिपूजा, पौराणिक गाथा, भिक्षुकांची पुरोहित म्हणून प्रतिष्ठा, गुरूचा सन्मान वगैरे गोष्टी प्रचलित झाल्या.

- - - - - -

Comments

धन्यवाद

लेखाचा अनुवाद येथे दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. लेखावरचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे. खास करुन इतर धर्मांसोबत तुलना.






अष्टांगिक मार्ग

या अष्टांगिक मार्गांचे आचरण कोणी करणे अपेक्षित असावे? जनसामान्यांनी का फक्त भिख्खूंनी?
पूर्व एशिया मध्ये बौद्ध धर्मीय लोक सामिष भोजन करणारेच असतात. भारतातले नवबौद्ध काय करतात ते मला माहिती नाही.
चन्द्रशेखर

हो, आणि...

पूर्व एशिया मध्ये बौद्ध धर्मीय लोक सामिष भोजन करणारेच असतात.

हो, खरे आहे. पण त्याबरोबरच (निदान अमेरिकेतल्या तरी) चिनी भोजनालयांत Buddha's Delight नामक एक अत्यंत बेचव शाकाहारी पर्याय पाहिलेला आहे. तो नेमका कोण खाते, हेही मला पडलेले एक कोडे आहे.

बुद्धाला मांसाहार निषिद्ध नव्हता..

गौतम बुद्ध आमगन्धसुत्त(सु.नि.१४) येथे म्हणतात, "पक्ष्यांचे मांस मिसळलेला साळीचा भात मी खात आहे. याला मी अभक्ष्यभक्षण म्हणत नाही. वध, छेद, बंधन, याच्यामार्गे प्राणिहिंसा करणे चोरणे, खोटे बोलणे, फसवणे हे (अशीच दुर्गुणांची लांबलचक यादी देऊन) अभक्ष्यभक्षण होय." यावरून असे वाटते की बुद्धाला मांसाहार वर्ज्य नव्हता. त्याच्या मते, वध करणारा दोषी आहे, मांस खाणारा नाही. कोणत्याही स्थळी किंवा देशी जे अन्‍न खाण्याचा प्रघात असेल तर ते खाण्यास हरकत घेऊ नये. मात्र माझ्यासाठी अमुक मांसाची 'डिश' करा असे जेवण घालणार्‍यास सांगू नये.
गौतम बुद्धाची अहिंसा ही यज्ञे आणि युद्धे अशा विशेष हिंसाप्रकारांचा निषेध करण्यासाठी होती. त्या तत्त्वाचा संबंध आहाराशी जोडण्याची त्याला गरज भासली नव्हती. याउलट, ब्राम्हणांची अहिंसा फक्त खाण्यासंबंधात होती आणि हिंसेची जी मुख्य क्षेत्रे--यज्ञभूमी आणि रणभूमी --त्यांच्या बाबतीतल्या हिंसेला त्यांचा विरोध नव्हता. --वाचक्‍नवी

अरे वा!

अरे वा! धम्मपद प्रतीच्या प्रस्तावनेचा मराठीतील अनुवाद वाचून विचारांना वळण मिळाले.
याच विषयावरचे पुस्तक वाचत आहे. तेही शुद्ध मराठीत. मंगला आठलेकरांचे "बुद्ध हसतो आहे..."
त्यातही अनेक संदर्भांसह अशीच माहिती आहे.
आणि योगायोग म्हणजे या प्रस्तावनेत उल्लेखलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे मोहनदास करमचंद गांधी यांचे (ते महात्मा होण्याच्या आधीचे) आत्मकथनही वाचत आहे.
ही दोन्ही पुस्तके वाचली असता - कालानुरुप उपलब्ध माहितीच्या आधारे 'सत्य' शोधण्याच्या मानवी प्रयत्नांचे क्षितीज विस्तारत चालले आहे हे खरे असले तरी प्रत्येक व्यक्तीचे सत्य तिच्यापुरतेच योग्य असते आणि ते तिचे तिलाच उमगून घ्यायचे असते हे जाणवते.त्या दृष्टीने गौतम बुद्ध फारच उदारमतवादी आहे. तो सत्याप्रत जाण्याचा मार्ग दाखवतो पण त्याला उमगलेले सत्य हेच खरे(?!) आणि एकमेव सत्य आहे असे मत तो आपल्या पट्टशिष्यांवरही लादत नाही.
याविषयावर बोलण्यासारखे बरेच आहे पण तुर्तास इतकेच.

आठलेकर बाईंचे पुस्तक मिळाल्यास जरूर वाचावे. त्या पुस्तकात लेखिकेचा एक व्यक्तीगत दृष्टीकोन आहे हे मान्य केले तरी लेखिकेने उपलब्ध (जवळजवळ सर्व) बौद्ध संदर्भांचा बारकाईने अभ्यास केलेला आहे हे महत्त्वाचे.यात वरील धम्मपद ग्रंथाचाही समावेश होतो.
आर्वाचिन काळात मूळ बौद्ध (म्हणजे 'अत्त दीपो भव' - या गौतम बुद्धाच्या वचनाचा) तत्त्वज्ञानाचा विपर्यास झालेला आहे का? आणि असेल तर तो किती? का? कसा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात.
शिवाय इतर धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यातली साम्यस्थळे आणि वैषम्यस्थळे यांचाही उहापोह या पुस्तकात केलेला आहे.
सद्य काळात बौद्ध धर्माबद्दलचे एक महत्त्वाचे पुस्तक अशी याची गणना करता येईल.
(या पुस्तकाचे जालावरील परीक्षण)

उत्तम

लिखाळने हल्लीच दिलेला दुवा आणि त्यानंतर आलेला हा लेख दोन्ही वाचनीय आहेत. लेखाबद्दल धन्यवाद.

सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवते. सध्या अशक्य आहे.

उत्तम

वाचनीय आणि विचारप्रवर्तक लेख. अनुवादाबद्दल अनेक आभार.

बौद्ध धर्मातील विचारांचा अस्तित्ववादामध्ये उल्लेख आढळतो. बुद्धधर्मातील विचार बरेचसे तत्त्वज्ञानाकडे झुकणारे आहेत हे याचे मुख्य कारण असावे. यात प्रामुख्याने शोपनहावर (पर्स्पेक्टिव्ह यांचा दुवा पहावा.) आणि हर्मन हेस यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. हर्मन हेस यांनी सिद्धार्थ ही कादंबरी लिहीली आहे. बुद्ध धर्मातील तीन मुख्य शाखा थेरवाद, महायान आणि वज्रयान. यातील महायान आणि वज्रयान तिबेट, जपान, चीन इथे प्रचलित आहेत असे कळते.

बौद्ध धर्मातील एक रोचक कल्पना म्हणजे वास्तवतेची कल्पना. बुद्ध आणि बहिया यांच्या संवादामध्ये बुद्ध ही कल्पना विस्ताराने स्पष्ट करतात. आपल्या भोवतालच्या जगाला खरे अस्तित्व नसून जग आपल्या जाणिवेचे प्रोजेक्शन आहे. ही कल्पना तत्वज्ञानामध्येही आहे. जग आभासी नाही हे सिद्ध करणे किंवा न करता येणे हा तत्वज्ञानातील बरेचदा चर्चिला जाणारा प्रश्न आहे. म्याट्रिक्स चित्रपटातील मध्यवर्ती संकल्पना याच्याशी मिळतीजुळती आहे. फक्त तिथे जाणिवेऐवजी सिम्युलेशन आहे.

----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32

धन्यू..

लेख माहितीपूर्ण आहे, अनुवादाबद्दल आभारी...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा..

फार माहितीपूर्ण आणि चांगला लेख.
अनुवाद करुन येथे दिल्याबद्दल आभार.

--लिखाळ.

अनुवादाबद्दल आभार

थोडक्यात माहिती आवडली. बौद्ध धर्माबद्दल बाबासाहेब आंबेडकर, धर्मानंद कोसंबी आणि दलाई लामा यांचे विचारही समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपापल्या सामाजिक उद्दिष्टांच्या दृष्टीने या धर्माचा अभ्यास केलेला आढळतो. जमल्यास यांचे विचार थोडक्यात नंतर टंकीन. त्यासाठी जागा राखून ठेवते.

कोसंबी

धर्मानंद कोसंबींच्या मते (माझ्या शब्दांत):
कोसल देशाच्या उत्तरेला असलेल्या शाक्य नावाच्या क्षत्रिय वंशात बुद्धाचा जन्म झाला (कपिलवस्तूच्या महाराजांच्या वंशात नव्हे). पण ते मोठे राजे नव्हते. काहीसे श्रीमंत जमीनदार असे त्यांचे स्वरूप असे. हे गणसत्ताक राज्य असावे. या काळात कोसल राजवंश प्रबळ झाला होता, आणि बुद्ध हा गोतम नावाने जन्माला आला (आई मायादेवी आणि वडील शुद्धोदन यांच्या घरी). जरा, व्याधि आणि मरण या तीन गोष्टींचे विचार त्याच्या मनात येत असत. तरी मुख्य मन उडण्याचे कारण म्हणजे सत्तेसाठी चाललेली चढाओढ. संघ हा नंतर विशेषतः बौद्धांशी जोडला गेला असला तरी याआधीच संघ अस्तित्वात होते (जैन मुनींचे). बुद्धाआधीच श्रमण संघ सगळीकडे फिरत असत. गृहस्थाश्रमात असतानाच त्याला प्रथम समाधी-अवस्था प्राप्त झाल्याची आठवण तो महासच्चक सुत्तात सांगतो. त्याच्या यावेळच्या गुरूचे नाव आडार कालम. असे करणारा बुद्ध हा पहिला राजपुत्र नव्हता, जैनांचा एक गुरू नाथपुत्र हा देखील असाच क्षत्रिय वंशातील होता. अशा अनेक गुरूंकडून त्याने तत्वज्ञान समजून घेतले पण त्याने त्याचे समाधान झाले नाही. यासाठी त्याने खडतर तप केले. यावेळी त्याने शरीरालाही त्रास दिला (उपास केले) पण एक दिवस लहानपणी लागलेल्या समाधीतील सुखाची आठवण झाल्याने त्याला वाटले की ते सुख मिळवून त्याचा आनंद उपभोगण्यासाठी शरीरही तसेच सुदृढ असावे. हे उपासांनी शक्य होणार नाही. यास्तव त्याने उपास सोडून दिले आणि देहाचे रक्षण करण्याइतके अन्न खाल्ले पाहिजे असे ठरवले (हा कदाचित आपल्या भाषेत टर्निंग पॉइंट असावा, येथून पुढे बुद्धांची दुसर्‍यांना उपदेश करण्याची तयारी झाली). यामुळे जे पाच भिक्षू त्यांना सोडून चालते झाले त्यांना त्यांनी नंतर स्वतः जाऊन तत्वबोध केला, वळवून घेतले. मुख्यत्वे मध्यम-मार्गाचा स्वीकार करावा असे सुचवले. यात कामोपभोगात सुख मानणे हे एक टोक आणि देहदंडन करणे हे दुसरे टोक ही दोन्ही टोके वर्ज्य आहेत. आणि मग अष्टांग मार्ग (वर दिलेला) सुचवला आहे. पार्श्वमुनी या बुद्धांच्या आधी होऊन गेलेल्या मुनींची असत्य बोलायचे नाही, चोरी करायची नाही, हिंसा करायची नाही आणि परिग्रह करायचा नाही ही चार व्रते होती. त्यात अधिक म्हणून पार्श्वमुनींचे शिष्य देहदंडनही करीत. बुद्धांनी या चार गोष्टींचा स्विकार केला पण देहदंडन मात्र करू नये असे सुचवले (शरीराला निरोगी ठेवण्यापुरते खावे). या काळात यज्ञाने वेगळेच रूप धारण केले होते. लहानमोठे राजे (जमीनदार) खेडेगावांतील पशूधन हे मनाविरूद्ध नेऊन यज्ञात बळी देत असत. (तरी इतरांना उपदेश करताना बुद्धांनी ज्या यज्ञांत बळी दिले जात नाहीत अशा यज्ञांना जाण्यास मनाई केली नाही, पण जेथे हिंसा होते अशा यज्ञाला मात्र जाऊ नये असे सुचवले).

बुद्धांच्या काळात विहार हे मध्यम परिस्थितीतील लोक बांधत (जसे व्यापारी), पण सम्राट अशोकाने श्रमणांच्या संघांना मोठा आधार दिला (विहार बांधले, संघासाठी नियम केले, आणि अनेक लोकोपयोगी कामे केली जसे पशू आणि माणसे यांना औषधे पुरवणे इ). त्यामुळे प्रभावित होऊन मोठा वर्ग हा बौद्ध धर्माकडे वळला. तरी यामुळे बौद्ध धर्मातही सेवकांची (यांना आरामिक म्हटले जाई) संख्या वाढली. एकाच ठिकाणी विहार बांधून राहण्याची प्रवृत्ती वाढली, परिग्रह वाढला. बुद्धांचा मार्ग सोडलेल्या आरामिकांशी भांडणे आणि हिंसाही वाढली. आणि त्यामुळे श्रमण संस्कृतीला हानी पोचली. आणि पौराणिक संस्कृती उदयाला आली. तरी यामुळे मोठ्या मोठ्या यज्ञयागांचे प्रमाण कमी झाले.

(बाकी अजून जमेल तसे देईन).

बौद्ध धर्माच्या र्‍हासाची कारणे

बौद्ध पंथाचा र्‍हासाचे जे कारण सांगितले जाते त्यात बौद्ध धर्माला पुढे सामाजिक राजकीय परिस्थितीशी जुळवून घेता-घेता बौद्ध पंथाचा आत्माच हरवून गेला. उदा. बुद्धाचा धार्मिक कर्मकांडांना, यज्ञयागांना विरोध होता. परंतु कालांतराने बौद्धांनी बुद्धाच्या मूर्ती घडवून मूर्तिपूजेच्या अनुंषगाने (महायान)पंथ निर्माण केला. किंवा जनसामान्यांच्या बोलीचा बुद्धाचा आग्रह मागे पडून बौद्धांचे ज्ञान संस्कृत भाषेत आणि पुढे पारंपरिक विचारांकडे गेले. बुद्धाला दहावा अवतार मानून बुद्धाच्या विचारांची हवाच काढून घेतली असे वाटते. बौद्ध मठामधे अनेक अनिष्ठ प्रवृत्ती शिरल्यामुळे समाजातील त्यांच्या विचारांविषयी आदर कमी झाला. काही भिक्षूक तंत्रसाधनेच्या मार्गाने जाऊ लागले. त्यामुळेही बौद्ध संघ समाजापासून दूर झाला असे वाटते.


अवांतर : बौद्ध धर्माच्या परिचयाचे अनुवादित लेखन असतांना काथ्याकुटाला सुरुवात केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

-दिलीप बिरुटे

चूकदुरूस्ती

बुद्धांचा मार्ग सोडलेल्या आरामिकांशी भांडणे आणि हिंसाही वाढली.

हे,

बुद्धांचा मार्ग सोडल्याने आरामिकांशी भांडणे आणि हिंसाही वाढली. (उदा. आरामिकांवर कर लादले होते. ते द्यायला नकार दिल्यावर समज देण्यासाठी राजांना हाताशी धरले जात असे, वेळप्रसंगी हिंसाही केली जात असावी). असे वाचावे.

खरे आहे,

वरील लिखाण काही अंशी अवांतर झाले असे वाटल्यास असे भाग गाळल्यास हरकत नाही. माहिती लिहीण्याच्या भरात लिहीली गेले - विशेषतः कोसंबी यांच्याबद्दल लिहीले ते. तसेही या सर्व काळाकडे पाहिले की खूपच प्रश्न उभे राहतात. तो काळ खूप घडामोडीचा असावा. जसे ज्या काळात बुद्धाने परिव्रज्या घेतली त्याकाळात भारतात अनेक पंथ (६२) उदयाला आले होते. त्यांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. अक्रियावाद (काश्यपाचा), नियतिवाद(मक्खली गोसाल) , उच्छेदवाद (अजित केशकंबल), अन्योन्यवाद (पकुध कच्चायन), विक्षेपवाद (संजय बेलपुत्ता)आणि चातुर्यामसंवरवाद (महावीराचा - वर उल्लेखलेला) हे सहा मुख्य वाद होते. हे बुद्धाला पटले नाहीत, पण त्याने त्यांची पूर्ण माहिती करून घेतली होती. आणि तत्वज्ञानाबद्दल चर्चा होत होत्या आणि राजकिय घडामोडीही होत असतील. पण याबद्दल नंतर कधीतरी चर्चा करू.

दलाई लामा

दलाई लामा यांचे विचार मांडते - हे विचार ज्याने बौद्ध धर्म आचरला आहे अशा व्यक्तीचे जीवन-विषयक तत्वबोध आहे हे समजून घ्यावे. विस्कळित आहेत कारण वाचलेले आठवले तसे शोधून लिहीत आहे.

कोणाही जिवाच्या जगण्याचा हेतू काय तर लामा याचे उत्तर "आनंदी होणे" हा आहे असे देतात. जसे, बालकाला जन्मल्यापासून दु:ख नको असते, आनंदच हवा असतो. शिक्षण, सामाजिक स्तर किंवा तत्वज्ञान अशा कुठच्याही गोष्टींमुळे या इच्छेत फरक पडत नाही. दु:खे प्रयत्नपूर्वक नष्ट करणे हे त्यामुळे महत्त्वाचे ठरते. दु:खाचे मूळ कारण म्हणजे अज्ञान (किंवा इग्नोरंस) - स्वतःबद्दलचे चुकीचे ज्ञान. हे दूर करण्यासाठी मनाच्या स्थितीला महत्व आहे. निर्वाणप्राप्तीस महत्त्व आहे. तिबेटमध्ये अस्तित्वात असलेल्या धर्मात "सूत्र" आणि "तंत्र" अशा दोन पद्धती आहेत. सूत्र म्हणजे उद्दिष्ट गाठण्यासाठी (निर्वाण प्राप्त करून घेण्यास) अनेक आयुष्ये करावे लागते तशी साधनापद्धती. आणि तंत्र म्हणजे एकाच आयुष्यात निर्वाण प्राप्त करून घेता येईल अशी पद्धती. (मन काबूत आणण्यासाठी बौद्धांची अनेक तंत्रे आहेत). पण हे दु:ख केवळ स्वतःचे दूर करायचे असे नसून लामांच्या म्हणण्याप्रमाणे दुसर्‍यांचे दु:ख दूर करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. इतरांचे दु:ख दूर केले नाही तर आपला आत्मिक आचार (स्पिरिचुअल प्रॅक्टिस) खुंटतो आणि आपण ज्ञान मिळवण्याची संधी गमावून बसतो असे ते म्हणतात. यापैकी लामा सांगतात ती पद्धती अशी की दु:खाला टाळण्याऐवजी त्यासंबंधी मानसिक चित्र रेखाटायचे (व्हिज्युअलाईज) आणि मनावर ताबा मिळवायचा. अशा पद्धतीने दु:ख "पाहिले" असले की खरी दु:ख पचवण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा अशी व्यक्ती तयार असेल.

जगाच्या जन्माबद्दलचे विचार -जरी बुद्धाने जगाच्या उत्पत्तीविषयी बोलणे टाळले असले तरी तिबेटपर्यंत गेलेला बौद्ध धर्म ह्या विचारांना टाळू शकला नाही. बौद्धांच्या मते देवाने जग निर्माण केले असे मानल्यास खूपच विसंवादी चित्र तयार होईल कारण असे मानावे लागेल की दु:ख आणि दुष्टपणादेखील देवानेच तयार केला. यापेक्षा बौद्ध असे समजतात की या जगात जे जीव आहेत त्यांच्या सर्वांच्या एकत्रित कर्माने सगळे विश्व बनले आहे. आपले विश्व हे आपल्या इच्छा आणि कृतींनी बनलेले आहे. ( त्यांनी यावरून एका सूत्रात सांगितलेली एक काव्यमय कल्पना सांगितली आहे ती अशी की इंद्राचे रत्नमय जाळे असावे तसे या विश्वातले सर्व जीव हे एकत्र जोडलेले आहेत. या जाळ्यातील प्रत्येक जीव (रत्न) हा दुसर्‍याशी जोडलेला आहे आणि बाकीचे सगळे यात प्रतिबिंबित आहेत. कुठचेही रत्न मध्यभागी नाही, आणि कुठचेही कडेला नाही. http://en.wikipedia.org/wiki/Indra%27s_net)

आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बुद्धा अँड हिज धम्मा या पुस्तकात खालीलप्रमाणे विवेचन केले आहे.
मुख्यत्वे मी कोण आहे, कुठून आलो/आले, मी काय आहे असे प्रश्न पाडून घेऊन त्यात वेळ घालवणे याचा त्याने विरोध केला. शरीर, संवेदना, निवडप्रक्रिया आणि चैतन्य या कशालाही आत्मा समजण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. शून्यवादाचा त्याग केला. जे याच्या विरोधात जातील (पाखंडी) त्यांच्या मताचा धिक्कार केला. जगाची काही एक ठराविक क्षणी सुरूवात झाली या कल्पनेचा त्याग केला. देवाने माणसाला निर्माण केले किंवा तो ब्रह्मातून जन्माला आल्याच्या कल्पनांना त्यागले. आत्म्याचे अस्तित्व नाकारले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले. खालील इंग्रजी उतारे आणि वाक्ये कोलंबिया विद्यापीठाच्या स्थळावरून साभार. संदर्भ : http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/...

3. The following are the ideas which he rejected
(i) He condemned indulging in speculation as to the whence, whither, and what am I?
(ii) He discarded heresies about the soul, and refrained from identifying it with either the body, sensations, volitions, and [=or] consciousness.
(iii) He discarded all the Nihilistic views which were promulgated by certain religious teachers.
(iv) He condemned such views as were held by heretics.
(v) He discarded the theory that the cosmic progress had a known beginning.
(vi) He repudiated the theory that a God created man, or that he came out of the body of some Bramha.
(vii) The existence of the soul he either ignored or denied.

स्विकार आणि बदल -
कार्यकारण भाव (लॉ ऊफ कॉज अँड इफेक्ट) स्विकारला. 1. He accepted the great grand law of cause and effect with its corollaries. पण जीवनात होणार्‍या घटनांवर दैवाचा पूर्ण अंमल चालण्याची कल्पना आणि याचे देवाने पूर्वनियोजन केलेले असणे या विचाराचा त्याने त्याग केला. 2. He repudiated the fatalistic view of life, and [the] other equally foolish view that a God predestined as to what should happen for man and the world. "संसार" ह्या कल्पनेच्या जागी पुनर्जन्म या कल्पनेला बसविले. 4. Transmigration (sansara) was replaced by the doctrine of re-birth. मोक्ष ही कल्पना काढून टाकून त्याजागी निब्बाण (निर्वाण) ही कल्पना स्थिर केली. 5. He replaced the doctrine of moksha or salvation of the soul by the doctrine of Nibbana.
3. He discarded the theory that all deeds committed in some former birth have the potency to produce suffering, making present activity impotent. He denied the fatalistic view of Karma. He replaced the view of Karma by a much more scientific view of Karma. He put new wine in old bottle[s].
मागील जन्मी केलेल्या कृत्यांमध्ये दु:ख निर्माण करण्याची शक्ती आणि सद्यकाळात करीत असलेले प्रयत्न असफल करण्याची शक्ती आहे हे नाकारले. दैवात हेच कर्म लिहीलेले आहे असा विचार नाकारला. त्याने कर्माचा अधिक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. जुन्या बाटलीत नवीन मद्य भरले.

त्याने मनाला सर्वापेक्षा श्रेष्ठ ठरवले. मन समजले की बाकी सगळे समजते. 2. Mind precedes things, dominates them, creates them. If mind is comprehended, all things are comprehended. मनावर संस्कार घडवणे हे प्रथम काम आहे. 4. The first thing to attend to is the culture of the mind. जे सगळे बरेवाईट आहे ते मनामुळेच उत्पन्न होते. 5. The second distinguishing feature of his teachings is that mind is the fount of all the good and evil that arises within, and befalls us from without. मनाची शुद्धी हे धर्माचे सार आहे. The cleaning of the mind is, therefore, the essence of religion. (म्हणून) सगळी पापे टाळली पाहिजेत. 8. The third distinguishing feature of his teachings is the avoidance of all sinful acts. धर्म हा पुस्तकांत नसून आचरणात आहे. 9. The fourth distinguishing feature of his teaching is that real religion lies not in the books of religion, but in the observance of the tenets of the religion.

आंबेडकरांच्या मते बौद्ध धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल का? त्यात सर्व नवे विचार होते. आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात (अनुवादित प्रत माझ्याकडे आहे) त्यातील प्रस्तावनेत त्यांच्या एका लेखाचा उतारा देऊन म्हटले आहे की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल (महाबोधी सोसायटीच्या ५१ सालच्या वैशाख अंकात).

हे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले किंवा कमी केले तर बरे होईल. हे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईल रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलरोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलरोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलरोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईल

आभार

अनुवादाबद्द्ल आभार
अनुवाद वाचतो आहे.. वाचुन झाल्यावर प्रतिक्रीया देतो

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

धन्यवाद

अनुवादाबद्दल धन्यवाद. लेखात बौद्ध धर्माची उत्तम संक्षिप्त ओळख करून दिलेली आहे. आणि अनुवादही ओघवता झाला आहे. एवढ्या संक्षिप्त लेखावरून प्रश्न विचारणे कदाचित चुकीचे ठरेल पण तरीही एक प्रश्न विचारतो.

मनुष्यजीवन दु:खाने आणि तापांनी भरलेले आहे - जन्मापासून मृत्यूपर्यंत दु:खच दु:ख आहे.

एखाद्याने इच्छामरण स्विकारणे हे बौद्ध धर्माला (विशेषतः हीनयान शाखेत) मान्य असावे का?

शोपेनहावर???

मनुष्यजीवन दु:खाने आणि तापांनी भरलेले आहे - जन्मापासून मृत्यूपर्यंत दु:खच दु:ख आहे.

शोपेनहावर या जर्मन तत्त्ववेत्त्याचे विचार काहीसे अशाच धर्तीवर असल्याबद्दल ऐकल्याचे आठवते. (स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेले नाही.)

किंबहुना उपरोल्लेखित दुव्यावर दिलेला शोपेनहावरचे विचार आणि बौद्ध तत्त्वांतील साम्यावरील परिच्छेद रोचक आहे.

एखाद्याने इच्छामरण स्विकारणे हे बौद्ध धर्माला (विशेषतः हीनयान शाखेत) मान्य असावे का?

बौद्ध धर्माबद्दल (हीनयान किंवा कोणत्याही शाखेबद्दल) कल्पना नाही, परंतु शोपेनहावरला मान्य असावे असे दिसते.

(डिस्क्लेमर: या प्रतिसादात उल्लेख केलेल्या कोणत्याही विषयावर याहून अधिक माहिती माझ्याजवळ नाही. गरजूंनी अधिक माहिती स्वतः शोधून काढावी.)


"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.

धन्यवाद

दुव्यातील मजकुर वाचता वाचता आणखी काही दुवे मिळाले. त्यात या दुव्यावर काही वाक्ये सापडली. त्यांचा मतितार्थ असा की आत्महत्या हे जीवनास संपवणे असल्याने बौद्ध धर्मात त्यास नकारात्मक क्रिया मानली आहे.

पण जगणे हीसुद्धा एक इच्छाच असल्याने तिचे निराकरण म्हणून मरणे स्विकारले तर तेही नकारात्मक क्रियाच ठरावे काय?

एक तर्क

पण जगणे हीसुद्धा एक इच्छाच असल्याने तिचे निराकरण म्हणून मरणे स्विकारले तर तेही नकारात्मक क्रियाच ठरावे काय?

बौद्ध धर्माच्या या बाबतच्या नेमक्या म्हणण्याबद्दल कल्पना नाही, परंतु कदाचित असा विचार करता येईल:

जगणे ही एक इच्छा आहे, बरोबर. त्या इच्छेचे निराकरण म्हणून जगण्याची इच्छा न बाळगणे, आणि अशा अवस्थेत निरीच्छपणे (शुद्धलेखन?) जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत जगत राहणे इथपर्यंत ठीक. त्यापुढे मरण ओढवून आणणे ही बहुधा नकारात्मक क्रिया ठरावी. (थोडक्यात, आलेले मरण स्वीकारणे आणि मरण ओढवून घेणे यात फरक असावा.)

अर्थात, आधी म्हटल्याप्रमाणे, अत्यल्प माहितीवरून केवळ तर्काने मेथड इन द मॅडनेस शोधण्याच्या फुटकळ प्रयत्नातून निघालेला हा माझा एक अंदाज झाला. प्रत्यक्षात बौद्धधर्म याबद्दल नेमके काय म्हणतो याबद्दल मला कल्पना नाही. (आणि हे माझे वैयक्तिक मतही नाही.) चूभूद्याघ्या.


"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.

तर्क पटण्यासारखा

तर्क पटण्यासारखा आहे पण 'मरण ओढवून आणणे' (मओआ) आणि 'मरण येत नाही तोपर्यंत जगत राहणे' (मयेनातोजरा) यात फरक करता येणे कठीण आहे. उदाहरणार्थ, अन्नत्याग करणे हे मओआ आणि मयेनातोजरा दोन्ही असू शकेल. अर्थात काही वेळा असा फरक करणे सोपेही आहे. उदाहरणार्थ, विष प्राशन करून मरणे हे मओआ आहे.

आणखी एक दुवा

त्रिपिटकांमध्ये आत्महत्येचे काही उल्लेख आलेले आहेत. महाजालावर याबाबतीतल्या नैतिक चर्चेचा एक दुवा मिळाला (दुवा) त्रिपिटकांमध्ये चन्न आणि गोधिक या भिक्खूंच्या आत्महत्येचे प्रसंग आणि त्याबद्दल बुद्धाचे विवेचन आलेले आहे, असे या दुव्यावरून कळते, आणि चन्न याच्या आत्महत्येबद्दल बौद्धांच्या नीतिशास्त्राच्या दृष्टीने काय ऊहापोह झाला आहे, त्याचे विस्तृत वर्णन वरील दुव्यात आहे.

धर्मपालनाच्या आणि बुद्ध-स्थितीकडच्या प्रगतीमधल्या बहुतेक सामान्य स्थितींमध्ये थेरवादी* बौद्धांना आत्महत्या मान्य नसावी असे दिसते. जवळजवळ बुद्धपदाला पोचलेल्या अरहन्तांना आत्महत्या करण्याची मुभा आहे की नाही, याबद्दल काही मतभेद असावेत असे दिसतात. पण त्या मतभेदांची उकल करताना माझे काय मत आहे हे सांगणे ठीक नव्हे - कारण मी त्या पंथातलाच नाही. आणि त्या मतभेदांपैकी कुठले मत थेरवादा*च्या मर्माच्या अधिक जवळ जाते हे तुलायला फार अभ्यास लागेल, असे वाटते.

तरी आपले काही विचार सांगतो :

प्रथम आर्यसत्यात मृत्यूचा "दु:ख" म्हणून उल्लेख आहे, आणि दु:ख दूर करायचे मार्ग पुढील आर्यसत्यांत वर्णिलेले आहेत. त्यामुळे मृत्यू कवटाळणे आणि आर्यसत्ये मानणे यांची संगत नीट बसत नाही - पण सरळसरळ तार्किक विरोध होत नाही हे मान्य.

आणखी एक गोष्ट ही की निर्वाण मिळवण्याकरिता मध्यममार्ग सांगितला आहे. म्हणजे एका टोकाची लिप्सा नाही, आणि दुसर्‍या टोकाला शरिरा-मनाला वेदना देणारे तप नाही. मुक्ती मिळवण्यासाठी जर मृत्यूचा मार्ग वापरायचा, तर तो शरिरा-मनाला वेदना देण्याच्या टोकाला जाणारा आहे, असे वाटते - म्हणजे तो मार्ग बहुधा आधीपासूनच बौद्धधर्माला अप्रिय असावा, बहुधा अमान्य असावा.

असो. कुठल्याही सांप्रदायातली नैतिक गुंतागुंत त्या संप्रदायाच्या मानसातून समजायची म्हणजे अभ्यास लागेल, म्हणून माझे इतकेच पुरे.
- - -
* मला "हीनयान" शब्दापेक्षा "थेरवाद" शब्द वापरायला आवडतो. "हीनयान" हे नाव त्या पंथाला स्वतःला "महायान" म्हणवणार्‍यांनी तुच्छतादर्शक म्हणून वापरले आहे. महायान-पंथाचा "महायान" असा गौरवशाली उल्लेख करण्यात मला काहीच वावगे वाटत नाही. पण दुसरा पंथ मला काही फार "हीन" वाटत नाही, मग त्याची हिणवणूक करणारे नाव वापरणे ("रिपोर्टेड स्पिच" सोडल्यास) मला प्रशस्त वाटत नाही. दुसर्‍या पंथाचे स्वतःसाठी गौरवशाली नाव "थेरवाद" असे आहे - म्हणजे "थोर-वाद" (स्थविर-वाद). म्हणून मी त्या पंथाचा थेरवाद म्हणून उल्लेख करतो.

श्री. कंछेदीलाल गुप्त यांना थेरवादापेक्षा महायान पंथ काही प्रमाणात उजवा वाटत असावा, असे मला त्यांच्या लिखाणातून ध्वनित होते - महायान एक आवश्यक मनोवैज्ञानिक गरज पुरवतो, वगैरे, त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी "महा" विरुद्ध "हीन" शब्द तुलनेसाठी बाजूबाजूला ठेवले, म्हणून अनुवादातही मला "हीनयान" असा प्रयोग करणे प्राप्त होते. पण या प्रतिसादात मात्र मी श्री. कंछेदीलाल गुप्त यांच्या पाठ्याला बांधील नसल्यामुळे मी तो वापरत नाही.

महायान - हीनयान

फारसा अभ्यास नसला तरी मंगला आठलेकरांच्या कृपेने लिहितो -
हीनयान आणि महायान हे शब्द लहान-मोठेपणा दाखवण्यासाठी नाहीत असे माझे मत झालेले आहे.
'हीन' हा शब्द तुच्छतादर्शक नसून तो मराठीत नामानंतरचा प्रत्यय आहे. म्हणजे - 'हीन'यान याचा प्रचलीत मराठी अर्थ यान'हीन' - विनायान = कोणतेही यान (मूर्तीप्रतिक) न वापरणारा - या अर्थी घ्यायला पाहिजे असे वाटते.
चुभूदेघे

थेरवाद आणि हीनयान हे वेगवेगळे

बुद्धाने सांगितलेल्या मूळ धर्माला मानणारे हीनयान पंथाचे किंवा थेरवादाचे अनुसरण करतात. असे असले तरी थेरवाद आणि हीनयान हे दोन्ही वेगळे पंथ आहेत.

आत्म्याचे अस्तित्व (इंग्रजीतले सोल) हीनयान पंथाला मान्य नाही. कारण बुद्धाला ते मान्य नव्हते. ईश्वराच्या अस्तित्वावर आणि पुनर्जन्मावर अर्थातच हीनयानींचा विश्वास नाही.

बुद्धाने सांगितलेला मूळ धर्म लोकापर्यंत पोचवणे सोपे नव्हते. ह्या गरजेतून मूळ धर्माचे सोपीकरण झाले आणि त्यातून महायान पंथाचा जन्म झाला. महायान पंथाने अनेक अविश्वसनीय पौराणिक गोष्टींचा आसरा घेतला.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

बरोबर

तरी स्वतःचा "हीनयान" म्हणून उल्लेख करणारे बौद्ध नसावेत. महायान पंथाचे बिगर-महायान-पंथी लोकांसाठी हे नाव आहे.

महायान नसलेल्यांपैकी पैकी सर्वात प्रचलित पंथ थेरवाद आहे. वज्रयान हा पंथसुद्धा प्रचलित आहे.

हीनयान शब्द अप्रचलित - वलपोल राहुल

श्रीलंकेतील बौद्धधर्माचे अभ्यासक, भिक्खु वलपोल राहुल त्यांच्या "बुद्धाने काय शिकवले (व्हॉट द बुद्ध टॉट, प्रकाशनवर्ष : १९५९)" पुस्तकाच्या प्रस्तावनेत अत्यंत संक्षेपाने म्हणतात :

The term Theravada - Hinayana or 'small vehicle' is no longer used in informed circles - could be translated as 'the School of the Elders', and Mahayana as 'great vehicle'.
=
"थेरवाद संज्ञेचे भाषांतर 'थोरल्यांचा पंथ' असे केले जाऊ शकते - जाणकार मंडळींत 'हीनयान' किंवा 'लहान वाहन' हा शब्द वापरला जात नाही; महायान संज्ञेचे भाषांतर 'मोठे वाहन' असे होते.

जाणकार मंडळींमध्ये 'हीनयान' संज्ञा का वापरली जात नाही, याचे स्पष्टीकरण वलपोल राहुल देत नाहीत, पण वर सांगितलेले कारण असावे. ते मी अन्यत्र वाचलेले आहे.

उजवे/डावे

मूळ लेखातील विषयावर चर्चा सुरू झाली ते चांगले झाले.

>श्री. कंछेदीलाल गुप्त यांना थेरवादापेक्षा महायान पंथ काही प्रमाणात उजवा वाटत असावा, असे मला त्यांच्या लिखाणातून ध्वनित होते - महायान एक आवश्यक मनोवैज्ञानिक गरज पुरवतो, वगैरे, त्यांचे म्हणणे आहे.

यात काय नवल?! प्रत्येकाला तो/ती ज्या पंथाशी संलग्न आहेत किंवा ज्यातील विचार त्यांच्या विचारांशी जुळतात ते जवळचे वाटतात. तसे वाटणे साहजिक आहे, पण पूर्णपणे चुकीचे नाही. एखाद्याला गुरूची गरज वाटणे यासाठी मुख्यत्वे वरील मनोवैज्ञानिक गरज या शब्दाचा वापर केला गेला आहे असे वाटते. गुरूंच्बरोबर कसे विनयपूर्वक विद्याग्रहण करावे यासंबंधीचे मार्गदर्शन हे बौद्ध साहित्यात असावे/आहेत (याचे संदर्भ मिळण्यासाठी आंबेडकरांचे पुस्तक उपयुक्त आहे). यात हल्लीच्या काळात लामा यांनीही गुरू कसा निवडावा यासंबंधी विवेचन केलेले आढळते. पण असा गुरू निवडल्यावर त्याची सेवा कशी करावी यासंबंधीचे नियमन माझ्या पहाण्यात लामांनी केलेले आढळले नाही (माझे वाचन त्रोटक आहे त्यामुळे असे असूही शकेल).

मुख्य पटत नसले तरी दुसर्‍याचे विचार समजून घेणे, प्रश्नांना उत्तरे देणे हे या दोन्ही पंथांत होत असावे /व्हावे असे गृहितक आहे. (प्रत्यक्ष अनुभव नाही). निदान दलाई लामा यांना अभिप्रेत असलेला धर्म हा असा नवीन कल्पनांना स्विकारणारा, त्यात आवश्यक ते बदल करणारा आहे असे त्रोटक वाचण्यावरून वाटते. आंबेडकरांनाही यातील कुठचीही एक प्राचीन पद्धती स्विकारावी असे वाटत नसावे असे वाटते.

सर्वांना एकत्र ठेवेल अशी काही विचारप्रणाली खरेच अस्तित्वात असेल का? येईल का? आली तर त्याचे काय परिणाम असतील असे प्रश्न नेहमी पडतात.

स्वतःचे मत असणे हे कंछेदीलाल गुप्त यांचे ठीकच आहे

स्वतःचे मत असणे हे कंछेदीलाल गुप्त यांचे ठीकच आहे. परंतु अभ्यासक म्हणून कधीकधी गडबड होऊ शकते. कंछेदीलाल गुप्त म्हणतात :

महायान शाखेतले लोक सर्वांच्या निर्वाणाची कामना करतात. हीनयान शाखेचे बौद्ध केवळ स्वत:साठी प्रयासशील असतात.

हे वाक्य मला फारसे ठीक वाटत नाही. "संघ" हा बिगर-महायान पंथींना मान्यच आहे. "संघ" म्हणजे आपल्या एकट्यापेक्षा दुसर्‍या व्यक्तीशी धर्मसंबंध येणे क्रमप्राप्तच आहे. बिगर-महायानी पंथी लोकही त्रिपिटके मानतात. बुद्ध आणि अन्य अर्हत लोक प्रवचने देत, लोकसंग्रह करत, हे सर्व थेरवादी लोकांच्या धर्मविचारात येतच असेल. म्हणूनही वरील उद्धरण मला ठीक वाटत नाही.

अंबेडकर, दलाई लामा, वगैरे आधुनिक बौद्ध विचारवंतांनी बौद्धधर्मात नवीन विचारांचे बीजारोपण केले आहे, हे प्रशंसनीय आहे.

(पण सामाजिक इतिहासाचा अभ्यास करताना तात्कालिक संकल्पनांचा विचार केला पाहिजे. मी जर बौद्ध धर्माचा अनुयायी असतो, किंवा माझे बहुतेक प्रियजन जर बौद्ध धर्माचे अनुयायी असते, तर बौद्धधर्माचा सामाजिक इतिहास, आणि त्याचा निष्पक्ष अभ्यास मला थोडासा कोरडा वाटला असता. बौद्धधर्मातल्या आधुनिक सुधारणांबद्दल मी खूपच अधिक रस घेतला असता. दुसर्‍या बाजूचे समजून घेतले असते, पण जी बाजू मला पटते, तिच्याबद्दल अधिक आत्मीयता वाटतच राहिली असती. - ही सर्व चित्रा यांच्या वरील प्रतिसादाशी सहमती आहे.)

आभार

दुव्यातील माहितीवरून व आपल्या प्रतिसादावरून शंकानिरसण झाल्यासारखे वाटत आहे.

जयंतभट्ट आणि बौद्धधर्म.

जयंतभट्टाचा बौद्धधर्माची टिंगल करणारा एक श्लोक प्रसिद्ध आहे, तो असा:
नास्त्यात्मा परलोकमात्रमथ च स्वर्गाय चैत्यार्चनम्‌ ।
सर्वम्‌ शून्यमिदं वसूनि गुरवे देहीति चादिश्यते ॥
संसारा: क्षणिका: युगस्थितिभृतश्चैते विहारा: कृता: ।
बौद्धानां चरितं किमन्यदियति दम्भस्य भूमि: परा ॥॥

आत्मा नाही, परलोक नाही, मग स्वर्गप्राप्तीसाठी चैत्याची पूजा का करायची? सर्वच जर शून्य आहे तर गुरूला धन देण्याचा आदेश का? संसार जर क्षणभंगुर आहे तर, युगानुयुगे टिकतील असे विहार का बांधायचे? या बौद्धांची विचारसरणी म्हणजे दुसरे काही नाही, तर पराकोटीचे ढोंग आहे. --वाचक्‍नवी

 
^ वर