महात्म्याचा पराभव
वरील शिर्षक हे म.टा. मधील अग्रलेखाचे आहे, खालचा लेख हा म.टा.चा अग्रलेख आहे! मी फक्त उर्धृत करत आहे. तो वाचत असतानाच तसेच महात्मा गांधींची ६०वी पुण्यतिथीच्या निमित्ताने नक्की आज भारतीय समाजात नक्की गांधीवाद कुठे दिसतो आणि गांधीवादी कुठे दिसतात असे वाटते?
मोहनदास करमचंद गांधी! माणसाचा महामानव आणि महामानवाचा महात्मा कसा बनतो, याचे मूतिर्मंत उदाहरण. कमरेला पंचा आणि हातात काठी घेणाऱ्या कृश शरीरयष्टीच्या या माणसाने कोणतेही शस्त्र हाती न घेता ब्रिटिशांची सत्ता उलथवली. एका बाजूला क्रांतिकारकांनी पुकारलेला ओजस्वी लढा आणि दुसऱ्या बाजूला महायुद्धानंतर खिळखिळी झालेली ब्रिटिश व्यवस्था यामुळे भारतावरील सत्ता सोडणे गोऱ्यांना क्रमप्राप्त होते, असा युक्तिवाद कोणी मांडेलही. पण गांधीजींच्या आंदोलनामुळे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाला राष्ट्रीय परिमाण प्राप्त झाले, शिवाय या चळवळीला नैतिक अधिष्ठानही लाभले, हे नाकारता येणार नाही.
गेल्या शतकाने जगाला दिलेल्या पाच युगपुरुषांची यादी करायची, तर माओ-त्से-तुंग, माटिर्न ल्युथर किंग, लेनिन, नेल्सन मंडेला यांच्याबरोबरीने महात्मा गांधींचे नाव आदराने घ्यावे लागेल. अशा या महात्म्याला ईहलोकीची यात्रा समाप्त करणे भाग पडले, त्या घटनेस आज साठ वषेर् होत आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीला देश आदरांजली वाहात असताना महात्माजींकडून आपण काय शिकलो आणि त्यांची शिकवण कितपत आचरणात आणली, याचाही विचार करायला हवा. तो मन सुन्न करणारा आहे. गांधीजी या शब्दाबद्दलच घृणा बाळगणाऱ्या पंथाचे लोक आजही त्यांची निंदा करण्यात धन्यता मानत आहेत. पण महात्माजींच्या नावाची जपमाळ सतत ओढत, मतांचा जोगवा मागून सत्तेची सिंहासने उबवणाऱ्या राज्यर्कत्यांनी महात्माजींची दर घडीला हत्या करण्याचे गेली साठ वषेर् चालवलेले पाप अधिक भयावह आहे. गांधीजींनी ज्या ज्या आघाड्यांवर काम केले व समाजशुद्धीचा यज्ञ चालवला, त्या सर्व क्षेत्रांत त्यांचेच पाठीराखे म्हणवणाऱ्यांनी राजकीय स्वार्थाचा चिखल निर्माण केला. त्यामुळेच त्यांच्या हौतात्म्याला साठ वषेर् झाली, तरी राजकीय हत्यांचे सत्र थांबलेले नाही आणि अस्पृश्यतेच्या रुढींचेही पूर्णपणे उच्चाटन होऊ शकले नाही. कायद्याने स्पृश्यास्पृश्य भेदभाव नष्ट झाले; संसद, विधिमंडळे व अन्य सभागृहांत रिझवेर्शन मिळाले आणि नोकरी-शिक्षणात राखीव जागांची सोय झाली, म्हणजे अस्पृश्यता निवारण झाले, अशी सोयीची समजूत राज्यर्कत्यांनी करून घेतली. अस्पृश्यतेची भावना खरेच नाहीशी झाली असती, तर खैरलांजीचे काळे पर्व होऊ शकले नसते.
गांधीजींनी समाजाला एकत्र आणण्यावर भर दिला. त्यांचे अनुयायी मात्र कधी जात, कधी धर्म, कधी प्रांत, तर कधी वर्गाच्या नावाखाली समाजाला दुभंगवून त्यांच्यातील विद्वेषाच्या आगीवरच आपल्या पोळ्या भाजू पाहात आहेत. 'वैष्णव जन तो तेणे रे कहीये जो पीड परायी जाने रे' हा त्यांचा धर्म होता. सुशिक्षित तरुणांची बेकारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आकाशाला भिडणारी महागाई, विजेचे, पाण्याचे दुभिर्क्ष या आणि अशा शेकडो समस्यांमुळे भारतवासी पीडित असताना केवळ सेन्सेक्स वधारला, उंच इमारती, मॉल्स आणि पंचतारांकित हॉटेल्स उभी राहिली व मूठभर लोकांच्या खिशात पैसे खुळखुळू लागले, म्हणजे देशात सुबत्ता आली असे उच्चरवात सांगणारे राज्यकतेर् देशात आहेत. त्यांना त्या महात्म्याची शिकवण कशी उमगावी? अखंड हिंदुस्थानची फाळणी ब्रिटिशांनी केली. स्वातंत्र्य मिळण्यापूवीर्च तसा आग्रह महमद अली जीना यांनी धरला होता. पण फाळणीचे खापर महात्माजींच्या माथी फोडणारे पंथ आजही अस्तित्वात आहेत. त्यांच्यापैकी काहींना पुढे जीनांच्या 'महानते'ची जाणीव झाली, ही गोष्ट वेगळी. पण १९४७च्या फाळणीला विरोध करणाऱ्यांनीच पुढे भारताच्या केलेल्या अनेक भावनिक फाळण्यांची गणती कोण करणार? गांधीजींनी स्वदेशीची चळवळ केली. त्यांच्याच पक्षाच्या आजच्या नेत्यांनी परकीय गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली भारतीय बाजारपेठेचे दरवाजे परकीयांना खुले केले. ग्राहकवादाचे स्वागत करताना इथला शेतकरी, कारागीर व कामगार यांचे किती नुकसान होते, त्याची काळजी करण्याच्या मनस्थितीत कोणी नाही. गांधीजींनी 'चले जाव'चा नारा देऊन इंग्रजांविरुद्ध देश पेटवला.
इंग्रज गेले आणि आता भारतात शिकून तयार झालेले हुशार आणि होतकरू तरुणही स्वत:लाच 'चले जाव'चा आदेश देत इंग्लंड, अमेरिकेत स्थायिक होऊ लागले. परदेशातील पक्का माल इथे येऊ लागला आणि बुद्धिमत्तेचा 'पक्का' माल देशाबाहेर जाऊ लागला. जे राज्य करतात, त्यांचीच पुढली पिढी परदेशगमनात आघाडीवर असल्याने कोण कोणाला थोपवणार? 'सेवा और सादगी' हे व्रत गांधीजींनी हयातभर अंगीकारले. बिर्ला, बजाज यांच्यासारख्या उद्योगपतींनाही त्यांनी साध्या राहणीची दीक्षा दिली. आज मात्र उद्योगपतींच्या उंची राहणीमानाशी स्पर्धा करणारी जीवनशैली राजकारण्यांनीच अवलंबलेली दिसते. असो.
गांधीजींच्या हौतात्म्याच्या साठाव्या वर्षी त्यांचे स्मरण करताना त्यांच्याच शिकवणुकीचा पराभव करण्याचे पाप आपण करत आहोत, याची थोडी जाणीव राज्यकतेर् आणि राजकारण व समाजजीवनाच्या विविध स्तरांवर वावरणाऱ्यांनी ठेवली, तरी ती महात्म्याच्या स्मृतीला आदरांजली ठरेल.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा


समाज-स्फुर्ती आणि व्यवहाराची जोड दुर्मिळ
स्वातंत्र्य आणि समाजसुधारणा हे हेतू आपापल्या परीने आणि आपापल्या मताने चालवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण आपल्याबरोबर प्रचंड जनसमूहाला स्फूर्ती देऊन समाजाचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा बदलणार्यांपैकी जे थोडे होते, पैकी मो. क. गांधी होते.
तसे तपशिलांमध्ये जाता त्यांच्या अनेक कल्पना अव्यवहार्य होत्या, आणि काही चूकही होत्या. उदाहरणार्थ, आर्थिक ग्रामस्वराज ही कल्पना केंद्राधिष्ठित अर्थव्यवस्था असलेला स्वतंत्र भारत कसा चालवू शकला असता हे आकळत नाही. पण सूतकताई करून, खादी वापरून काही फरक पडतो, या कल्पनेने भारावून जाऊन कित्येकांना जोम भरला, तो जोम व्यवहारातलाच होता ना? लैंगिक आकर्षणाचा निग्रह करण्यात नैतिक अधिष्ठान आहे, हे त्यांचे मत अव्यवहार्य आहे, असे मला वाटते. (इतकेच काय, कामेच्छेची पूर्ती हे मानवास सुयोग्य कर्तव्यांपैकी एक आहे असेही मी मानतो.) पण त्यांच्या आत्मनिग्रहात वैयक्तिक नैतिक अधिष्ठान होते, असे मला वाटते. त्याच प्रकारे जातिविषयक तिढा आत्मशुद्धीने नाहिसा होऊ शकतो, हे त्यांचे मत त्यांच्या स्वतःच्या उदाहरणामुळे अक्षरशः खरे आहे, असे प्रत्ययाला येते. पण जाति-जन्य भेदभावात काही लोकांचे हितसंबंध आहेत या व्यवहाराकडे दुर्लक्ष करून कसे चालेल - असा विचार मनात येतो.
जोपर्यंत गांधी हयात होते, तोवर त्यांच्या ओजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे जे अव्यवहार्य, तेही लोकांनी उचलून धरले. पण त्याबरोबर पूर्वीच्या शिथिल, गतानुगतिक, निराश समाजात जागृती, प्रगतिशीलता, आशा निर्माण होणे शक्य आहे, व्यवहार्य आहे, हेच त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.
त्यांचे जिवंत उदाहरण डोळ्यांसमोरून मृत्यूने हटवताच लोकांना कळले की इंद्रियनिग्रह, यंत्रविरोधी अर्थकारण, आणि आपल्या हितसंबंधांचा संततुल्य त्याग आपल्याला जमत नाही. म्हणून त्या अव्यवहार्य तत्त्वांच्या होळीत लोकसंग्रह, लोकचैतन्य, आणि एकजुटलेला आशावादही खाक व्हावा, याबद्दल वाईट वाटते.
गांधींच्या स्वप्नरंजनातील राज्य साकारले नाही, ही गांधींशी प्रतारणा झाली असे काही लोक मानतात. वरील उद्धृत लेखात अनेक उत्तम मुद्द्यांत मध्येच किंचित असा सुर किरकिरतो. माझ्या मते ती गांधींशी प्रतारणा नव्हे. पण त्यांनी अपूर्व प्रमाणात साधलेला जनसंग्रह आणि चेतना लुप्त झाली ही प्रतारणा आहे.
व्यावहारीकपणा + सामाजीक स्फुर्ती
सर्व प्रथम ही चर्चा चालू करताना माझा उद्देश हा जुने आरोप-प्रत्यारोप करत बसण्याचानव्हता अथवा काही विशिष्ठ ऐतिहासिक घटनांमधे (गांधीच्या बाजूने-विरुद्ध, त्यांच्या तत्वज्ञानाच्या बाजूने-विरुद्ध) गुंतण्याचा नव्हता हे स्पष्ट करायचे राहीले म्हणून येथे लिहीतो.
वर धनंजय यांनी लिहीलेल्या अनेक मुद्यांशी सहमत.मुख्यतः शेवटच्या वाक्याशी: "पण त्यांनी अपूर्व प्रमाणात साधलेला जनसंग्रह आणि चेतना लुप्त झाली ही प्रतारणा आहे."
कुठल्याही मोठ्या नेत्याचे जे होते (विशेष करून गेल्या दिडएक शतकात भारतीय समाजात ठळकपणे दिसते) ते म्हणजे अनुयायी हे "हिमालयाच्या सावलीत" वाढतात. परीणामी वाढ तर खुंटलेली असतेच. कधीकधी अनुयायी हे कळतनकळत नक्कल करू लागतात. एका अर्थी ती व्यक्तीपूजा असते. टिळकांनंतर सुपारी खाणारे अधीक झाले आणि गांधींनंतर सुतकताई आणि पंचा गुंडाळून बकरीचे दुध पिणारे अधिक झाले.कारण तसे करणे हे अधिक सोपे असते. पण हा त्या नेतृत्वाचा दोष नसतो. विशेष करून गांधी, टिळक, सावरकर या त्रयींना - ज्यांना अनेक अनुयायी लाभले (असे म्हणावेसे वाटते की बाकी बरेच नेतृत्व तयार झाले पण त्यांना अनुयायी तयार झाले नाहीत - अपवाद अर्थातच आंबेडकर), पण या त्रयींना कधी त्यांच्या अनुयायांना स्वतःच्या "मुशीतून घडवण्यासाठी" वेगवेगळ्या कारणांमुळे वेळच नव्हता.
गांधीजींच्या बाबतीत ते स्वातंत्र्याच्या पहाटेचे राष्ट्रीय नेतृत्व होते. दुर्दैवाने लगेच मरणाला सामोरे जावे लागले आणि स्वतंत्र भारतात राजकारणासाठी त्याचा नव्याने तयार होत असलेल्या राजकीय पुढार्यांनी भरपूर उपयोग केला. हौतात्म्य आल्यामुळे आणि त्यातही जातीय आणि वैचारीक मतभेदांना खतपाणी घालत स्वतःच्या पोळी टिकवण्याचा येथेच्छ उपयोग केला गेला. पुढे पुरूष या नाटकात भडकपणे म्हणले होते, जी गांधीटोपी एकेकाळी डोक्यावर घालून अन्यायाविरुद्ध वाचा फोडली, तीच गांधीटोपी आता तोंडात कोंबून अत्याचार करायला वापरली जात आहे.
समाजकारण सोडल्यास अधुनिकता बघताना आणि त्यावरील गांधीवादी मते विचारात घेताना, आजच्या काळात गांधी असते तर त्यांना काय वाटते.
गांधी
>> भारतीय समाजात नक्की गांधीवाद कुठे दिसतो आणि गांधीवादी कुठे दिसतात असे वाटते?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खरंतर भारतीय राजकारणाचा व समाजाचा प्रचंड अभ्यास हवा. तरी माझ्यापरीने उत्तर देण्याचा प्रयत्न म्हणा अथवा मुक्त चिंतन म्हणा :
गांधीवादाची व्याख्या मी तरी केवळ अहिंसा, खादि, सर्वधर्मसमभाव या मधेच सिमीत मानत नाहि. गांधीवादात त्यांच्या राजकिय भुमिकांबरोबरच् अनेक सामाजिक भुमिकाहि येतात. माझ्या मते गांधीनी गुलामगिरीपासून फक्त देशाला मुक्त केलं नाहि तर इथल्या नागरिकांच्या मनातील गुलामगिरी नष्ट केली. त्यांनी दिलेले शस्त्र म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी वापरलेली जिद्द. गांधी कधिहि कोणालाहि "चल देश स्वतंत्र झाला पाहिजे .." असे मागे लागत नसत. त्यांना देश राजकीयरित्या स्वतंत्र होण्यपेक्षा समाज स्वतंत्र होण्यावर विश्वास होता. अर्थात याचे मुळ प्रसिद्ध टिळक-आगरकर वादात आहे. टिळकांना स्वातंत्र्य आधी हवे होते तर आगरकरांना सामाजिक स्वास्थ्य. एकदा का समाज सशक्त झाला की हा सशक्त समाजच स्वातंत्र्य मिळवेल पण अशक्त ,दुबळा कोणत्याहि आधाराशिवाय् उभा राहु न शकणारा समाज जर अपरिपक्व असतानाच स्वतंत्र झाला तर् लवकरच पुन्हा पारतंत्र्यात जाईल.
गांधी या एका व्यक्तीमुळे मध्यममार्ग निघाला. जरी ते आगरकरांना गुरु मानत तरी त्यांनी स्वातंत्र्यचळवळीबरोबर सामाजिक उन्नती चालू केली. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र होणे हे पर्यायाने देश स्वतंत्र करण्यासारखे आहे हे तत्व आणि अन्यायाविरुद्ध अविश्रांत लढा देणे त्यांनीच समाजाला शिकवले. त्यानी समाजाला दिलेले सत्याग्रहाचे शस्त्र असे होते की ज्याच्या मनत जिद्द आहे असा कोणीही ते चालवू शकत. अनेक क्रांतिकारी त्याच काळात सशस्त्र क्रांती करत होते आणि तीही तितकीच महत्वाची होती. पण या मुठभर क्रांतिकारकांबरोबरच प्रत्येक नागरिकातील क्रांतिकारक जागवण्याचे काम हे या महात्म्याचेच... गांधीवादाचेच...
भारतीय समाजात गांधीवाद कुठे दिसतो या प्रश्नाचं उत्तर ही घटना म्हणजे गांधीवाद अशी देता येईल का हि शंका आहे.तसं पाहिलं तर, हरितक्रांती, दुग्धक्रांती वगैरे घडवून देशाला या बाबतीत स्वतंत्र करणे हा गांधीवादच.. बाबा आमटेंची प्रत्येक कृती हा गांधीवादच.. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजनेला तुडुंब प्रतिसाद हाहि गांधीवादच... नारायणमुर्ती, मित्तल आदिंनी कोणत्याहि शस्त्रा शिवाय भारताच्या "स्वतंत्र" तेचे प्रदर्शन करणे हा गांधीवादच.. हरभजनवर झालेल्या अन्यायाविरुद्ध व्यक्त केलेली चिड् हा गांधीवादच
वेगवेगळ्या प्रकारे गांधीवाद समाजत विखूरला आहे. त्या गांधीवादाला वापरून समाज घडवणार्या महात्म्याची मात्र गेली साठ वर्षे समाज वाट पाहतो आहे.
अजूनहि नेत्याच्या मार्गदर्शनाच्या कुबड्यांची वाट पहाणारा हा समाज पाहिला की गांधी अजून हवे होते याची जाणीव होते.
या महात्म्याला माझे कोटी कोटी प्रणाम!
-ऋषिकेश
अरेरे
अरेरे!
पराभवावर लेख आहे.याच लेखात
माओ-त्से-तुंग सरख्या कपटी नि भामट्या माणसा बरोबर गांधीजींना बसवलेले पाहून वाईट वाटले.
इतकीही त्यांची पातळी खाली नव्हती हे नक्की.
यातच लेखकाचा ज्ञानाच्या बाबतीतला पराभव दिसूनयेतो आहे.
आपला
गुंडोपंत
धन्यवाद!
माओ-त्से-तुंग सरख्या कपटी नि भामट्या माणसा बरोबर गांधीजींना बसवलेले पाहून वाईट वाटले.
मला पण हे नाव तसेच लेनीनचे नाव जाणवले. जरी लेनीन माओ त्से इतका कपटि नसला तरी त्याच्याशी गांधीजींची तुलना करणे अयोग्य वाटले.
यातच लेखकाचा ज्ञानाच्या बाबतीतला पराभव दिसूनयेतो आहे.
वरील मुद्यात लेखकाचे ज्ञान दिसण्यापेक्षा भारतीयांची मानसिकता दिसते जी डाव्या विचारवंतांनी व्यवस्थित जोपासली आहेत. जरी प्रस्तुत संपादक डावे नसले तरी तो प्रभाव नक्कीच असू शकतो. शेवटी त्याच वर्तमानपत्राचे पुर्वीचे संपादक गोविंद तळवळकर यांना टिळकांवर खरेच छान पुस्तक लिहीताना त्यांची त्यात सतत लेनीनशी तुलना करावीशी वाटली होती...
तळ्वलकर?
संपादक गोविंद तळवळकर माझे आवडते होते.
मला ते डावे वाटले नाहीत. त्यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे?
किंबहुना त्यांच्या सर्वच पुस्तकांची यादीच मिळेल का?
प्रकाशकही मिळाल्यास उत्तम.
आपला
गुंडोपंत
गोविंद तळवळकर वि सदानंद मोरे
http://sadhanatrust.com/magilank.html या लि़कवर
१) ३१ मार्च २००७ पान नं ५
२) ७ एप्रिल २००७ पान नं ५
'लोकमान्य ते महात्मा 'या डॉ.सदानंद मोरे लिखित संदर्भ ग्रंथावर टीका गोविंद तळवळकरांनी केली होती. त्याल उत्तर म्हणुन 'तळवळकरांचे द्वेषोपनिषद' हे सदानंद मो-यांचे २१ एप्रिल २००७ मध्ये उत्तर पान नं ७ वर पहा
१२ मे २००७ पान नं २५ वर श्री मा. भावे यांनी घेतलेला आढावा पण वाचनीय आहे.
२६ मे २००७ पासून गोविंद तळवळकरांचे 'परामर्श 'हे सदर चालू होते.
प्रकाश घाटपांडे
सुंदर.
श्री. प्रकाश यांनी फारच सुंदर असा दुवा दिलेला आहे. साधना, कूमार, किशोर, अमृत इत्यादी मासिकाचे मुखपृष्ठ मनाला वेगळाच आनंद देतात.
परंतु सर्वच लेख शब्दांचा कीस या धर्तीचे वाटतात.
तळवळकर - पुस्तके इत्यादी
गोविंद तळवळकर हे माझे पण आवडते लेखक आहेत/होते. याचा अर्थ त्यांचे सगळे पटते असा नाही अथवा ते कायम समतोल लिहीतात असेही नाही. त्यांना मी डाव्या विचारसरणीचे म्हणले नव्हते, तसे वाटले असल्यास माझी लिहीतानाची चूक समजावी. ते मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या विचारसरणितले होते/आहेत. अशा लोकांना रॉयिस्ट म्हणतात. यशवंतराव चव्हाण पण रॉयिस्ट होते. अर्थात हा रॉयीस्टपणा धेडगुजरी होता. एकंदरीतच आपल्या नेत्यांवर/विचारवंतांवर साम्यवादाचा पगडा असल्याने तेथील चांगले म्हणायची पद्धत तयार झाली. तळवळकर याला अपवाद नसावेत असे त्यांचे आता लेखन आठवताना वाटते.
त्यांनी "बाळ गंगाधर टिळक" असे पुस्तक लिहीले तेच मुळी लेनीनवर लिहीलेल्या इतर कुणा लेखिकेच्या "नॉट बाय पॉलिटीक्स अलोन" असे विविध पैलू दर्शवणार्या पुस्तकावर आहे. तो भाग ठिक असला तरी बर्याच ठिकाणि लेनीन असा होता आणि टिळकपण असे करायचे वगैरे लिहीले आहे. पण बाकी पुस्तक सुरेख आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर "नवरोजी ते नेहरू" असे दोन खंडांचे पुस्तक लिहीले पण क्रांतिकारक आणि हिंदूत्ववाद (अर्थात सावरकर वगैरे) सरळ बाजूला ठेवले आहे(एकदम् मोघम) . त्यांना वैयक्तिक आवडत नसेल तर तो त्यांचा प्रश्न, पण जेंव्हा ते इतिहास लिहीताना डावलले जाते तेंव्हा योग्य वाटत नाही...
संपादन आवश्यक!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
कोणताही लेख दुसरीकडून नक्कल करून इथे चिकटवताना त्यात संपादन करणे आवश्यक वाटते. नाहीतर वाचताना पदोपदी अडखळायला होते. तसे करणे कंटाळवाणे वाटत असल्यास कृपया त्यासंबंधीचा दुवा देणे जास्त योग्य होईल.
संबंधित त्याबद्दल भविष्यात त्याबद्दल काळजी घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
का बॉ?
अडखळायला काय झाले?
चांगला तर आहे...
मला तर अडखळायला झाले नाही... (आणि काल कार्यक्रमही झाला नाहीये तरीसुद्धा अडखळायला झाले नाही हे विषेश!)
अपल्याला कुठे झाले बरं?
आपला
गुंडोपंत
संपादन खुलासा
कोणताही लेख दुसरीकडून नक्कल करून इथे चिकटवताना त्यात संपादन करणे आवश्यक वाटते.
आपल्याला नीट दिसले नसल्यास क्षमस्व. हा कुठला ब्राउजर वापरत आहोत याचा पण परीणाम आहे कारण मला "र" चे प्रश्न दिसत नाही आहेत. माझा इंटरनेट एक्स्प्लोरर ७ आहे पण मी जेंव्हा फायरफॉक्स वापरतो तेंव्हा नीट दिसत नाही.
’र’ फार!(संपादन)
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
वरील लेखातील ’र’ फार ( मटाच्या संस्थ वरील मूळ लेखात चुकीचाच असल्यामुळे) संपादित करणे जरूरूचे आहे असे वाटते.
र् फार
युनिकोड कन्वर्जन मधे या चुका अनेक ठीकाणी होतात. त्यांचे निवारण करण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे सुज्ञ वाचक ते समजावून घेतील अशी अपेक्षा असते. योग्य नसलं तरी ही बाब क्षम्य असते.
या प्रतिसादात सुद्धा संपादन जरुरीचे आहे
प्रकाश घाटपांडे
जगाला देणगी.
गांधीवाद ही भारताची जगाला दिलेली देणगी समजावी. पूढील काळात अनेक समस्येवर या विचारांनी तोडगा काढता येईल.
असहमत..
गांधीवाद ही भारताची जगाला दिलेली देणगी समजावी. पूढील काळात अनेक समस्येवर या विचारांनी तोडगा काढता येईल.
'गांधीवाद ही भारताची जगाला दिलेली देणगी समजावी.' या वाक्याशी असहमत आहे! आज जगात तर सोडाच, खुद्द भारतातही कुणी एक कानफटात मारली तर मारणार्यापुढे कुणीही दुसरा गाल पुढे करत नाही, आणि तेच योग्य आहे! (करूही नये! अरे ला कारे म्हणणेच योग्य! उपास करून फायदा नाही!)
नशीब, शिवरायांना गांधीवाद माहीत नव्हता! नाहीतर महाराज बसले असते उपास करत आणि स्वराज्य स्थापना हे एक कायमस्वरुपी स्वप्नच राहिले असते!
असो..
आपला,
(सशस्त्र आणि रक्तरंजीत क्रान्तीवर विश्वास असलेला!) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
सहमत
सहमत आहे.
केवळ भारतीय चळवळच नव्हे तर अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग आणि सीझर शॅवेझ यांच्या चळवळीवरही गांधीजींचा प्रभाव राहिला आहे.
चळवळीमध्ये "वैष्णव जन तो" सारखी प्रार्थना म्हणणारे गांधीजी हेच खरे हिंदू होते असेही माझे मत आहे.
-- आजानुकर्ण
गांधीगिरी
अहिंसक मार्गाने चळवळ ही खरेच जगाला दिलेली देणगी आहे. जगात इतरत्रही या पद्धतीचा अवलंब करून यशस्वी चळवळी झालेल्या आहेत. आज "गांधीगिरी" पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहे.
अवांतर - मूळ लेखातला "इंग्रज गेले आणि आता भारतात शिकून तयार झालेले हुशार .." वगैरेचा परिच्छेद अनावश्यक आणि अप्रस्तुत वाटला.
शोकांतिका
हीच तर खरी शोकांतिका आहे. जगाने ह्या शिकवणुकीचा फायदा करून घेतल. पण खुद्द त्यांच्या भारतात मात्र 'गांधींचे नाव ऐकले तरी संताप होतो' अश्या विचारसरणीचे अनेक लोक बनले!
नीरक्षीरविवेक
इतर अनेक इझम्स् प्रमाणे, गांधींच्या विचारांच्या बाबतीतही नीरक्षीरविवेक बाळगून, त्यांच्या विचारांची नाळ आपल्या आजच्या आयुष्याशी, आपल्या समाजाच्या प्रश्नांशी जोडता येईल. (धनंजय आणि ऋषिकेश यानी हे मुद्दे विस्ताराने मांडले आहेत. ) गांधींचा निर्बुद्ध तिरस्कार, त्यांची आंधळी व्यक्तिपूजा, आणि त्यांच्या नावाचा मतलबी वापर हे तीनही पर्याय त्याज्य आहेत. योग्य पर्याय म्हणजे त्या तत्वांना आजच्या संदर्भावर घासून पडताळून पाहणे.
नीतीमत्तेसारख्या वैयक्तिक मूल्यांच्या पातळीवर, अंत्योदयासारख्या समाजाच्या उन्नयनाच्या संदर्भात, साधनशुचितेच्या संदर्भात गांधीवाद योग्य. किंबहुना, तिकडे गांधींच्या मार्गदर्शक तत्त्वाना पर्याय नाही. मात्र आर्थिक सुधारणा, संरक्षण , "इंद्रियांवर ताबा" सारख्या बाळबोध गोष्टी यासारख्या बाबतीतले सामाजिक आणि काळाचे संदर्भ केव्हाच बदललेत. त्यामुळे त्याबाबतीतला गांधीवाद अव्यवहार्य किंवा कधीकधी हास्यास्पद ठरतो.
खरे पहायचे तर कुठल्याही शास्त्र-विचार-तत्वप्रणाली -पंथ यांच्याबाबतीत हे खरे नव्हे काय ? जो विचार हरघडी बदलणार्या परिस्थितीनुसार लवचिक होऊ शकत नाही, त्याचे आज नाही तर उद्या मरण ठरलेले.
नीरक्षीर विवेक
आयुष्याच्या सुरुवातिला god is truth म्हणणारे गांधीजी आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र truth is god असे म्हणु लागले. प्रत्येक मनुष्य हा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात बदलत असतो. हा बदल मान्य करुन जर आत्मपरिक्षण करणे हे विवेकी आहे. पण तो बदल म्हणजे तत्वच्युती मानली जाते. मग तसा बदल घडू नये यासाठी तो स्वतःशी झगडतो. तुज आहे तुजपाशी मधील आचार्य आणि काकाजी आठवतात.
प्रकाश घाटपांडे
नीरक्षीरविवेक - अजून एक
चर्चिलसाहेबांचे एक वाक्य आहे - विशीतला तरुण जर साम्यवादी विचारांनी भारलेला नसेल तर त्याला हृदय नाही आणि तिशीनंतरही तो जर त्याच विचारांचा राहिला तर त्याला डोके नाही, असे समजा!
तात्पर्य - आपले विचार स्थलकालपरत्वे बदलू शकतात आणि ते तसे बदलणे म्हणजे तत्वच्युती समजू नये. वर्षानुवर्षे झापडबंद पद्ध्तीने एकाच वादाचा घोष करीत राहिलाच पाहिजे असे नाही. (मला १० वर्षांपूर्वी भेंडीची भाजी अधिक आवडत असली तरी आज सिमला मिरची अधिक आवडण्यास प्रत्यवाय नसावा!).
गांधींचा निर्बुद्ध तिरस्कार, त्यांची आंधळी व्यक्तिपूजा, आणि त्यांच्या नावाचा मतलबी वापर हे तीनही पर्याय त्याज्य आहेत. योग्य पर्याय म्हणजे त्या तत्वांना आजच्या संदर्भावर घासून पडताळून पाहणे.
सहमत !
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
नीरक्षीर विवेक + १
वरील मुक्तसुनीत, प्रकाशराव आणि सुनील यांच्या वयपरत्वे विचार बदलणे होणार याच्याशी सहमत आहे. When thinking process stops it becomes thought and when thoughts fossilize they become -isms. Hence we should make Hindu Philosophy, Hinduism". असे एकदा स्व. दत्तोपंत ठेंगडीचे विधान ऐकले होते आणि पटले होते. अर्थात कालपरत्वे व्यावहारीक विचार बदलाताना मुलभूत तत्वांशीच जर कोणी प्रतारणा करू लागले तर योग्य नाही. गांधीजींनी कुणाला आवडो/नावडो, बरोबर असो अथवा चूक, त्यांनी स्वत:साठी ठरवलेल्या मुलभूत तत्वांशी प्रतारणा केली असे वाटत नाही. कदाचीत असलाच तर अपवाद "करा अथवा मरा" ही हाक.
गांधींचा निर्बुद्ध तिरस्कार, त्यांची आंधळी व्यक्तिपूजा, आणि त्यांच्या नावाचा मतलबी वापर हे तीनही पर्याय त्याज्य आहेत. योग्य पर्याय म्हणजे त्या तत्वांना आजच्या संदर्भावर घासून पडताळून पाहणे. हा गोषवारा पण मान्य होण्यासारखा आहे.
आधी मी नाही पण येथेच कुणीतरी पुढील अर्थाचे म्हणल्यासारखे पुसटसे आठवते की गांधीजी हे राजकारणात पडण्याऐवजी समाजकारणात राहीले असते तर ते अधीक यशस्वी ठरले असते.
राजकारण आणि समाजकारण
> आधी मी नाही पण येथेच कुणीतरी पुढील अर्थाचे म्हणल्यासारखे
> पुसटसे आठवते की गांधीजी हे राजकारणात पडण्याऐवजी
> समाजकारणात राहीले असते तर ते अधीक यशस्वी ठरले असते.
ही चांगली आठवण काढली, मलाही ते पुसटसे आठवते आहे. पण त्या वाक्याचा अर्थ मला तेव्हाही कळला नव्हता. लोकशाहीत राजकारणात आणि समाजकारणात नेमका व्यावर्तक फरक (एक असले तर दुसरे नसते असा) काय आहे?
आता कोणी म्हणेल की निवडणुका लढवणे म्हणजे राजकारण. पण गांधींनी तर कुठलीच विशेष निवडणूक व्यक्ती म्हणून लढवली नाही. त्यामुळे त्या मूळ लेखकाचा तो अर्थ नसावा. काँगेसचे तर ते पुढे सदस्यही नव्हते...
पण तरी माझे मत म्हणावे तर ते व्हाईसरॉयशी वाटाघाटी वगैरे करत, म्हणजे ते राजकारणात होते. शिवाय समाज बदलायचा प्रयत्न केला म्हणून समाजकारणातही होते.
इतकेच काय, आजच्या युगात जो अत्यंत भ्रष्ट आणि आप्पलपोटा मंत्री असतो, तोही माझ्या मते समाजकारणात असतो. संसदेतले त्याचे प्रत्येक मत, जिल्हाविकास योजनेच्या अर्थसंकल्पावरची त्याची प्रत्येक सही समाजात, अनिष्ट का होईना, बदल घडवून आणत असते. त्याचे समाजविषयक धोरण कलुषित असले, म्हणून असे थोडेच म्हणता येते की तो फक्त भ्रष्ट राजकारणी आहे - तो त्या भ्रष्ट समाजाचा पाया घालत असतो, या कारणाने तो भ्रष्ट समाजकारणीही असतो.
आणि शुद्ध समाजकारणी व्यक्तीचे कोणी उदाहरण देऊ शकेल काय. अनिष्ट सामाजिक प्रथांना बंदी घालण्यासाठी ज्यांनी चळवळ केली त्यांना लोकांना, राजकर्त्यांना कायदा बदलण्यासाठी आपल्या बाजूला करावेच लागले ना? मग ते शुद्ध समाजकारणी कसे?
लोकशाहीत "राजकारण" आणि "समाजकारण" या शब्दांच्या चालू अर्थात मला जाणवलेला फरक येथे सांगतो.
"आपले म्हणणे लोकांच्या मालकीच्या शासनाचे आणि समाजाचे धोरण करणे" याच्या मार्गांना आणि क्लृप्त्यांना "राजकारण" म्हणतात. इंग्रजीत "मीन्स" (Means)
"समाजाचे आणि शासनाचे धोरण काय असावे" या ध्येयाला समाजकारण म्हणतात. इंग्रजीत "एंड्स्" (Ends)
मार्गांशिवाय ध्येयप्राप्ती नाही, आणि ध्येयाशिवाय (ते हीन आणि भ्रष्ट का असेना) मार्ग नाही.
याचे चार प्रकार होऊ शकतात :
१. उच्च ध्येय (समाजकारण), कुशल मार्गक्रमण (राजकारण) : असले लोक "सफल द्रष्टे नेते असतात." मराठी मनातली शिवाजीमहाराजांची प्रतिमा ही अशी आहे. याचे उदाहरण मुद्दामून आजच्या लोकशाहीतले गुळमुळीत देतो. जर तुम्ही आर्थिक उदारीकरणाला उच्च ध्येय, समाज बदलणारे तत्त्व, मानत असाल तर मनमोहन सिंह याच्यात येतात. उदारीकरणाचे पुरस्कार करणारे अनेक होते, पण सर्वांना कुशलतेने रेटणारे हेच - त्यांनी सोनियाला "ध्येयपूर्तीसाठी वापरले" की सोनियाने त्यांना "वापरले" हे विषय या विचारांत तपासावा लागेल - सोनियाला अर्थशास्त्रातले खूप काही कळत नसेल तर माझ्या मते मनमोहन यांनी सोनियाला आपल्या ध्येयापाशी पोचण्याचा मार्ग म्हणून वापरले. जर तुम्हाला जमीनदारी नष्ट करून कसेल त्याला जमीन देणे हे उच्च ध्येय वाटत असेल तर असाच काही विचार ज्योती बासू यांच्याबद्दल केला जाऊ शकतो. "उच्च ध्येय काय आहे" असे वर्तमानातल्या प्रश्नांबद्दल विचारले तर नेहमीच टोकाचे मतभेद निघतात. म्हणून हे गुळमुळीत इकडून-तिकडून दुहेरी उदाहरण दिले. भूतकाळातील सफल ध्येयांबाबत साधारणपणे खूप लोकांचे एकमत होते, म्हणून सुरुवातीला शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. आजच्या नेत्यांपैकी शंभर वर्षांनी असेच कोणाबद्दलतरी बोलले जाईल - मला काही शंका नाही.
२. उच्च ध्येय, अकुशल मार्गक्रमण : असले लोक असफल द्रष्टे होतात. याचे उदाहरण म्हणून र. धों. कर्वे मानावे. त्यांच्या हयातीत त्यांच्या (योग्य) ध्येयासाठी त्यांना फार कमी लोकांची साथ मिळाली, समाज बदलला नाही, आणि शासनाचे धोरण बदलले नाही.
३. हीन ध्येय, कुशल मार्गक्रमण : यात तुमचा नावडता हल्लीचा मंत्री टाका. कदाचित ज्या लोकांना मराठी राज्यातली फूट आवडत नाही, ते ताराबाईच्या कोल्हापूर-गादी स्थापनेला हीन ध्येय, कुशल मार्गक्रमण म्हणतील.
४. हीन ध्येय, अकुशल मार्गक्रमण : यात बहुतेक पुलंचा "अण्णू गोगटे" यावा. खरे म्हणजे बहुतेक गावगुंड किंवा "चमचे" याच्यात येतात. रामदासांच्या पत्रावरून अशी शंका येते की ते संभाजीला या रकान्यात (पण १. पर्यंत हवी असल्यास मजल मारू शकणारा) मानत असावेत.
समाजकारण
मार्गांशिवाय ध्येयप्राप्ती नाही, आणि ध्येयाशिवाय (ते हीन आणि भ्रष्ट का असेना) मार्ग नाही.
हे चांगले विधान आहे. त्यातील इतर मुद्यांबद्दल नंतर लिहीन कारण ते अवांतर होवू शकेल.
सर्व प्रथम मला असे वाटते की, आदर्श राजकारणी माणसाला समाजकारणी असावे लागते पण चांगल्या समाजकारणी माणसास राजकारणी नसले तरी चालू शकते. सध्याच्या बाबतीत राजकारण संदर्भात नाही पण उद्यमशिलतेच्या (entrepreneurship) संदर्भात सामाजीक उद्यमशीलता (social entrepreneurship) असा नवीन प्रकार बराच उदयाला आला आहे. थोडक्यात उद्योगी व्यक्ती धंदेवाईकासारखा निव्वळ नफ्याचा विचार न करता जेंव्हा तिच्या उद्योगातून सामाजीक कामे तयार करते, त्यातून समाजाला आर्थिक, शैक्षणीक, आरोग्यसंदर्भात वगैरे जेंव्हा फायदे होतात तेंव्हा अशा व्यक्तीस सामाजीक उद्यमशील समजले जाते. याप्रकाराला उत्तेजन देण्यार्या गटात (ग्रूप) मधे मी बॉस्टनमधे सक्रीय आहे आणि त्यावर वेगळा कमितकमी लेख करता येईल असे लिहू शकेन, पण उदाहरणादाखल एक उदाहरण देतो, ते म्हणजे महंमद युनुस यांचे. इकॉनॉमिस्ट असून त्यांनी बांग्लादेशातील दुष्काळाच्या वेळीस ग्रामीण बँक चालू केली. त्यावेळेस (७०च्या दशकात) लोकांनी दुर्लक्ष केले पण आज मायक्रोफायनान्स, बचतगट वगैरे शब्द वर्ल्ड बँकेपासून ते छोट्याछोट्या समाजसेवी संस्थांपर्यंत परवलीचे झालेत.
परत गाडी मूळ पदावर वळवतो:) समाजकारण आणि राजकारण याचा विचार करताना, आगरकर आणि टिळक हे यातील चांगले उदाहरण होवू शकेल. आगरकरांना राजकारणाआधी समाजसुधारणा हवी होती. त्यामुळे ते यशापयशाचा विचार न करता समाजकारणी झाले. टिळक अर्थातच समाजकारणी होते जरी राजकारण हे मुख्य अंग गरज म्हणून पत्करले असले तरी (त्यांना भारत स्वतंत्र असता तर गणिताचे प्राध्यापक म्हणून राहयचे होते). रामदासांचा एक श्लोक टिळक या संदर्भात अक्षरशः पाळत असे म्हणावेसे वाटते: मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, तैसे जनांस शिकवावे हळूहळू||
सावरकरांना अंदमान मधून सोडल्यानंतर सक्रीय राजकारणात बंदी होती. तेंव्हा त्यांनी अस्पृश्यतानिवारणाचे/जातीभेद नष्ट करण्याचे कार्य केले कारण राजकारणी म्हणून ते समाजकारणी होते आणि भारताच्या सामाजीक दुखण्याची त्यांना त्यांच्या दृष्टीकोनातून कल्पना होती आणि सप्तबंद्या उठवण्यासाठी तमाम उच्चवर्णीयांचा विरोध पचवत ते रत्नागिरीत करत राहीले (मला वाटते १२-१३ वर्षे). पण जेंव्हा राजकारण सुरू झाले तेंव्हा त्यांनी परत भारत स्वतंत्र करायला प्राधान्य दिले आणि स्वतंत्र झाल्यावर अभिनव भारत ही स्वतः स्थापलेली क्रांतिकारकांची संस्था स्वत:च समारंभपूर्वक बंद केली आणि शस्त्रास्त्राचा नागरीकांनी त्याग करून (थोडक्यात कायदा हातात न घेता) राष्ट्रनिर्मितीकडे लक्ष देण्याची विनंती केली. पण एकंदरीत टिळक अथवा सावरकर यांनी राजकारणात सक्रीय असताना त्यांच्या (निस्वार्थी) राजकारणास योग्य अशा पद्धतीनेच समाजकारण केले. तिथे दोन गोष्टी नको तशा एकत्र केल्या नाहीत जेणे करून सामाजीक वैचारीक गोंधळ होवू शकेल.
आता पूर्णपणे राजकारणात न राहता समाजकारणी होणारे अनेक आहेतः राजा राममोहन रॉय, विवेकानंद, महात्मा फुले, अरविंद घोष ही नावे स्वातंत्र्यपूर्व भारतात पटकन आठवतात. विनोबा, बाबा आमटे, विनायकराव पटवर्धन, अभय - राणी बंग अशी स्वतंत्र भारतातील नावे आठवतात अर्थात याहून खूपच सांगता येतील - काँग्रेसचळवळीशी संलग्न, रा.स्व.संघातील, कम्यूनिस्ट विचारसरणिची आणि कशातच नसलेलीसुद्धा!
समाजकारणाची जाणीव ठेवून राजकारणात येण्याची चूक झालेले म्हणजे - जयप्रकाश नारायण आणि त्याहूनही शरद जोशी.
ज्यांच्यामुळे दूरगामी परीणाम झालेत अशा थोरामोठ्यांच्या जीवनाचे विश्लेषण करताना, तुम्हाला एनएसएफ आणि ग्रँट सिस्टीम (मुद्दाम इंग्रजीच शब्द वापरत आहे) माहीत असल्याने सांगावेसे वाटते की Merit Review Criteria काय असावेत तर intellectual merit of the proposed activity आणि broader impacts of the proposed activity असे वाटते. या संदर्भात कुठल्याही थोर व्यक्तीचे स्थल, काल, समाजपरीस्थिती आणि त्या व्यक्तीची परीस्थिती ध्यानात घेऊन उथळ टिका न करता अभ्यास करावा असे वाटते. तसे केल्यास तशा व्यक्तीस कदाचीत देवत्व दिले जाईल पण देवदेव केले जाणार नाही.
चांगले मुद्दे - अवांतर खरडवहीत
आपल्या शब्द-अर्थात थोडा फरक आहे, त्यामुळे बहुतेक मान्य मुद्द्यांतील फरक थोडक्यात येथे, मग तुमच्या खरडवहीत सवडीने मांडेन.
तुम्ही शुद्ध समाजकारणी म्हणून राजा राममोहन राय हे तुम्ही उदाहरण घेतले आणि शुद्ध समाजकारणी कोणी नाही असा विचार करताना नेमके त्यांचे उदाहरणच माझ्या डोळ्यासमोर होते. कंपनीसरकारच्या लॉर्ड बेंटिंकशी दुवा साधून शासनाकडून सतीविरोधी कायदा लागू करणे, मोगलाईत तो कायदा न उलथवण्याविषयी बादशहाशी संगनमत करणे, मोगलाईचा राजदूत म्हणून इंग्लंडला जाणे, तिथे पार्लमेंटमध्ये सती-विरोधी कायद्द्याच्या विरोधातील विधेयक हाणून पाडणे - या सर्व प्रकारात कुशल राजकारण होते, आणि ते स्तुत्य होते. ते कौशल्य नसते तर सती-विरोध त्यांच्या मनातले महान दु:ख, इतकेच राहिले असते.
डॉ. अभय बंग राजकारणाचा मार्ग त्यांच्या उत्तम ध्येयमार्गासाठी कसा वापरतात ते तुमच्या खरडवहीत, सवडीने लिहीन. (बहुतेक त्यांच्याच शब्दांत.)
माझ्या अवांतर चर्चेचा उद्देश हा की कुशल राजकारण हे सफल समाजकारणाचा अवश्य मार्ग आहे. सामाजिक तत्त्वांचा वैयक्तिक पुरस्कार हा जर राजकारणाचा मूलभूत तिटकारा मानत केला, तर लोकशाहीत सफल होणारच नाही. पण मोठा धोका हा की, बहुसंख्य लोकांची मनःस्थिती अशी झाली, तर हा लोकशाहीच्या मुळावरच आघात होईल.
ते अवांतर. इथे जी मूळ चर्चा आहे, तीच चालावी, इत्यलम्.
विचार बदलणे
गांधीजींनी सांगितले आहे, "जर माझी परस्पर विधाने तुम्हाला आढळली, तर त्यांच्या तारखा बघा. जे विधान नंतरच्या तारखेला केले असेल ते माझे अंतिम मत असेल." वयपरत्वे विचार बदलणे होणार हे गांधीजींना जाणून होते.
गांधींचा निर्बुद्ध तिरस्कार, त्यांची आंधळी व्यक्तिपूजा, आणि त्यांच्या नावाचा मतलबी वापर हे तीनही पर्याय त्याज्य आहेत.
सहमत
गांधींचा निर्बुद्ध तिरस्कार, त्यांची आंधळी व्यक्तिपूजा, आणि त्यांच्या नावाचा मतलबी वापर हे तीनही पर्याय त्याज्य आहेत. योग्य पर्याय म्हणजे त्या तत्वांना आजच्या संदर्भावर घासून पडताळून पाहणे.
सर्व मुद्यांवर सहमत आहे. इतक्या नेमक्या शब्दांमध्ये मत व्यक्त केल्यावर अजून काय लिहायचे असा प्रश्न पडतो.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
नेमके
वा! फारंच मार्मिक वाक्य! त्यातल्या विशेषतः 'गांधींचा निर्बुद्ध तिरस्कार' ह्या प्रकाराची प्रचिती ह्या चर्चेतच दिसुन येते! फारच आशयगर्भ वाक्य.
असहमत..
कमरेला पंचा आणि हातात काठी घेणाऱ्या कृश शरीरयष्टीच्या या माणसाने कोणतेही शस्त्र हाती न घेता ब्रिटिशांची सत्ता उलथवली.
असहमत आहे...
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची प्रथमाहुती व त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली सशस्त्र क्रान्ती व त्यांनी घडवलेले क्रान्तीकारक, ह्याच गोष्टी ब्रिटिशांची सत्ता उलथवण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या. गांधींनी देशाकरता काही विशेष केले आहे असे व्यक्तिश: मला तरी वाटत नाही!
पण गांधीजींच्या आंदोलनामुळे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाला राष्ट्रीय परिमाण प्राप्त झाले, शिवाय या चळवळीला नैतिक अधिष्ठानही लाभले, हे नाकारता येणार नाही.
असहमत आहे. गांधींच्या कितीतरी अगोदरच आद्य क्रान्तीकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या समकालीन क्रान्तीकारकांमुळे स्वातंत्र्ययुद्धाला राष्ट्रीय परिमाण प्राप्त झाले होते.
'या चळवळीला नैतिक अधिष्ठानही लाभले,' हे म्हणणे अगदीच हास्यास्पद वाटते. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसमराचा जो यज्ञ मांडला होता तो अनैतिक होता, किंवा त्याला काहीही नैतिक अधिष्ठान वगैरे नसून तो केवळ एक पोरखेळ होता, असे लेखकाला म्हणावयाचे आहे की काय?
गेल्या शतकाने जगाला दिलेल्या पाच युगपुरुषांची यादी करायची, तर माओ-त्से-तुंग, माटिर्न ल्युथर किंग, लेनिन, नेल्सन मंडेला यांच्याबरोबरीने महात्मा गांधींचे नाव आदराने घ्यावे लागेल.
माझ्या मते या यादीत गांधींचे नांव असणे उचित ठरणार नाही. त्या ऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावामुळे वरील यादी अधिक वास्तववादी ठरेल असे मला वाटते!
त्यांच्या पवित्र स्मृतीला देश आदरांजली वाहात असताना महात्माजींकडून आपण काय शिकलो आणि त्यांची शिकवण कितपत आचरणात आणली, याचाही विचार करायला हवा.
क्षमस्व! गांधींच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यार्या देशवासीयात मी नाही. मी वैयक्तिकरित्या त्यांना कोणतीही आदरांजली वगैरे वाहू इच्छित नाही!
इंग्रज गेले आणि आता भारतात शिकून तयार झालेले हुशार आणि होतकरू तरुणही स्वत:लाच 'चले जाव'चा आदेश देत इंग्लंड, अमेरिकेत स्थायिक होऊ लागले.
सहमत आहे..
जे राज्य करतात, त्यांचीच पुढली पिढी परदेशगमनात आघाडीवर असल्याने कोण कोणाला थोपवणार?
जे राज्य करतात केवळ त्यांचीच नव्हे, तर भारतातील बर्याचश्या अराजकीय व्यक्तिंचीही पुढची पिढी आज परक्या देशात जाऊन त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानत असल्याचे माझ्या पाहण्यात आहे.
असो...
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
सहमत-असहमत
तात्यांच्या वरील प्रतिसादातील मुद्द्यांशी काहीबाबतीत सहमत तर काही बाबतीत असहमत आहे. पण चर्चेच्या सुरवातीस धनंजयना प्रतिसाद देताना म्हणल्याप्रमाणे येथे शक्यतो गांधींबद्दलचे नेहेमीचे विषय (बाजूने आणि विरुद्ध) येऊ नयेत असे वाटते म्हणून बाकी लिहायचे टाळतो.
फक्त दोनच मुद्यांबद्दल लिहीतो:
सावरकरांचे नाव लेनीन आणि माओ बरोबर असणे योग्य वाटत नाही जसे गांधींचे पण योग्य नाही.
नैतिक-अनैतिकतेबद्दलचा तात्यांचा मुद्दा अचूक आहे. तसे लिहीणे हे गांधीपूर्व केवळ क्रांतीकारकच नव्हेत तर अगदी काँग्रेसचळवळीच्या जन्माला पण अनैतिक ठरवते असे वाटते!
महात्मा?
सहमत.
स्वा. सावरकर,भगतसिंग,सुखदेव्,राजगुरु,चंद्रशेखर आझाद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस् यांच्यासारख्या जहालमतवादी क्रांतीकारांना गांधींच्या राजकारणाचा फटका बसला होता. याबद्दल् कोणी बोलत नाही.
सशस्त्र क्रांतीकार्यांना अतिरेकी ठरवणार्या, स्वतः एकही थोबाडित न खाता देशवासीयांना दूसरा गाल पुढे करायला लावणार्या 'महात्म्याला'(?) आम्ही काय म्हणावे?
गांधी अहिंसावादी असतील्,ती त्यांची पद्धत होती म्हणून् दूसर्याच्या पद्धतीला चूकीचे ठरवणे हेच् मूळात चूकीचे आहे.
सहमत पण..
बरोबर पण या चर्चेत तरी असे कोणी म्हणत असल्याचे अथवा दुसर्या पद्धतीला चूक ठरवत असल्याचे दिसले नाहि. असो.
-ऋषिकेश
स्वतः एकही थोबाडीत न खाता?
हे मी ऐकल्यापेक्षा वेगळे आहे.
त्यांना कधी इजा झाल्याचा डॉक्टराचा रिपोर्ट कदाचित आता मिळणार नाही, पण गांधींच्या कारावासाबद्दल तुमच्याही मनाला पटेल असा पुरावा तुम्हाला शोधून सापडेल असे वाटते.
हसायला आले
केवळ स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच नव्हे तर स्वातंत्र्य मिळवल्यानंतरही ऐंशीव्या दशकात ईशान्येतील लोकांनी केलेल्या "शांततापूर्ण" आंदोलनांवर गांधीजींचा असलेला प्रभाव व पंजाबमधील तथाकथित क्रांतीकारक आणि ईशान्य भारतातील - आसाममधील (आसु वगैरे) - प्रफुल्लकुमार मोहंती व तत्कालीन नेते यांच्या आंदोलन हाताळणीमागील फरकांमधून गांधीवादाचे महत्त्व ध्यानात येते.
येथे सावरकर/फडके यांच्याविषयी अनादर दाखवणे हा हेतू नाही.
गेल्या हजार वर्षात जगाला दिलेल्या युगपुरुषांची यादी करताना शेवटपर्यंट केवळ आईनस्टाईन आणि गांधी यांची नावे आली.
-- आजानुकर्ण
वा
वा!
संयत व उत्तम प्रतिसाद आवडला.
जे काही त्या विचार सरणीने घडवले आहे ते वेगळेच आहे असे म्हणायला प्रत्यवाय नसावा.
तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले वगैरे म्हणू नये. ते या देशाच्या सामान्य माणसालाच हवे होते. जेंव्हा जनतेला काही हवे असते तेंव्हा ते ती मागुन मिळाले नाही तर हिसकावून घ्यायला कमी करत नाही हे सत्य आहे.
शिवाय त्या काळात खुद्द इंग्लंडलाच हे सगळे सांभाळायला काही बळ उरले नव्हते. त्यामुळे गांधीजींनी योग्यवेळी ही स्वातंत्र्याची आग आटोक्यात आणली असे मात्र वाटते.
सावरकर आणि फडक्यांच्या हिंसेच्या मार्गावरून तर अजूनही अनेक देश चालत आहेत त्यांचे कसे सोमालिया नि केनिया होतो आहे ते आपण पाहतोच. शिवाय अमेरिकेचा नि ओसामाचा सद्य मार्ग हा सावरकर नि फडक्यांच्या सारखाच आहे. त्याची रक्तरंजित परिणीतीही आपण पाहतोच आहे.
बाकी कोणत्या गोष्टीचा आपण किती उदोउदो करायचा हा वैयक्तिक भाग आहे.
सगळे मार्ग पाहिले की गांधीजींच्या मार्गाला मात्र काही पर्याय नाही हेच सत्य आहे हे लक्षात येते. पन हा मार्ग किती नि कसा वापरायचा याचे ताळतंत्र मात्र ठेवणे आवश्यक आहे. प्रसंगी सरदार पटेलांचाच मार्ग असु शकतो हे हे तितकेच खरे!
आपला
गुंडोपंत
धन्य झालो...
गुंडोपंत,
सावरकर आणि फडक्यांच्या हिंसेच्या मार्गावरून तर अजूनही अनेक देश चालत आहेत त्यांचे कसे सोमालिया नि केनिया होतो आहे ते आपण पाहतोच. शिवाय अमेरिकेचा नि ओसामाचा सद्य मार्ग हा सावरकर नि फडक्यांच्या सारखाच आहे. त्याची रक्तरंजित परिणीतीही आपण पाहतोच आहे.
सावरकर आणि फडके यांच्यासारख्या क्रांतीकार्यांमधे आणि ओसामासारख्या अतिरेक्यामधे तुम्हाला काही फरक दिसत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्गही हिंसकच होता,मग त्यांनाही यांच्याच पंक्तीत बसवणार का? तुलना करताना ती कोणाशी करावी,याचे भान असू द्या.
-इनोबा
तुलना
तुलना करतान दृष्टीकोनाचा फरक हा ही महत्वाचा. खलिस्तान हवा म्हणुन लढणारे ,सशस्त्र हिंसा करणारे जिंदा सुखा सारखे लोक हे खलिस्तानवाद्यांच्या दृष्टीकोनातून हे क्रांतीकारकच आहेत. पण भारतीय राष्ट्रवाद या दृष्टीने तसेच घटनेच्या दृष्टीने ते अतिरेकी व गुन्हेगारच आहेत. हिंसा ही गोष्ट अपरिहार्य आहे. नकळत झाली तरी ती हिंसाच असते. 'हलाल' व 'झटका' हे दोन्ही प्रकार हिंसाच .तुलनेने झटकात कमी क्रौर्य आहे. अहिंसेची चळवळ म्हणजे हिंसेचे उदात्तीकरण थांबवण्याची चळवळ.
प्रकाश घाटपांडे
जरा अजून काही उदाहरणे