काय भावात पडलं ऑर्कुट?

राम राम,

आजच्या सकाळमधली ही बातमी वाचा!

आता बोला, काय भावात पडलं ऑर्कुट?

असो, आंतरजालावर अनोळखी व्यक्तिंशी मैत्री वगैरे करताना सांभाळलं पाहिजे हाच धडा यावरून मिळतो!

आपला,
(सावध) तात्या.

Comments

ऑर्कुट

ऑर्कुट हे बहूतेक चांगल्या मुहूर्तावर निर्माण / लॉन्च नाही झालं. (शरद उपाध्याय यांना कुंडली दाखवली पाहीजे. ) ह्या ऑर्कुटची खूपच याना त्या कारणाने सतत कुप्रसिध्दी येते असते. आधी महाराजांना बदनाम, मग दाऊद फॅन क्लब, मुलींची खोटी व अश्लील प्रोफाईलस् , रेव्ह पार्ट्या आयोजन आता खून..

ह्या मानाने आपली इतर ऑनलाईन वाहने बरी म्हणायची म्हणजे भारतातल्या इंटरनेट ट्रॅफीकसाठी हो.

का कोण जाणे ते "आईची मुलं" असणं अगदीच काही वाईट नाही अस वाटते. :-)

आत्ताच पाहीलं

झी टिव्हीवर आत्ताच तो सर्व प्रकार दाखवला. हे प्रकार अमेरिकेत खूपच झालेत आणि अजूनही होऊ शकतील. आंतरजालावर माहीती नसलेल्या व्यक्तिशी जास्त जवळीक साधणे चूकच आहे.

मी या विशिष्ठ बातमीतील व्यक्तींबद्दल बोलत नाही, पण कुठेतरी वाटते, की जेंव्हा कुटूंबात एकमेकांशी बोलणे, संवाद साधणे बंद होऊ लागले, मैत्री म्हणजे स्वतःच्या स्टेटसचे अथवा ज्यांच्या समोर "शायनींग" करता येईल, इतक्या मर्यादीत आणि कोत्या अर्थाने होऊ लागली तेंव्हा अशा घटना कमी-जास्त गांभिर्याने घडू शकणार असे वाटते. इंटरनेट आणि विविध माध्यमांच्या जाळात अडकून माणसं निरागस संबंध आणि निखळ आनंद हरवून बसू शकतात आणि त्यात अशा "हवस" असलेल्या लोकांच्या तावडीत जाऊन स्वतःवर दुर्दैवी आघात ओढवून घेऊ शकतात.

"तुम्ही तुमच्या मुलांबरोबर आज बोललात का?" अशा आशयाची एक लोकशिक्षणाची जाहीरात येथील टि.व्ही.वर लागते. आज हा प्रश्न कुटूंबातील प्रत्येकानेच स्वतःच्या मनाला विचारण्याची गरज आहे, असे कुठेतरी वाटते.

ओर्कुट बंद गुगल बंद !

तात्याबा,

चांगल्या गोष्टी बरुबर वंगाळ् गोष्टी होतच राहते,त्याचं काय मनावर घ्याचं :)
चर्चला प्रस्ताव टाकला तुमी,अन आता गेली लैन त्या गुगलबॉची, अन ओर्कृटची.
जरा मजा घेऊन देत नाय बॉ तुमी.
बातमी वाचल्या पासून ओर्कुट वर एक बी खरड नाय, ना पोराची ना ...?

बाबूराव

ऑरकूट

ऑरकूट हे तर दळणवळणाचे साधन आहे. हत्यार म्हणा हव तरं? ही साधन जेवढी वाढतील तेवढि असुरक्षितता वाढेल. गुन्हा ही मानसिकता आहे. त्याची सार्वत्रिक व्याख्या करता आली नाही. संकल्पनेच्या आधारेच विवेचन करावे लागते. बरेचसे गुन्हे हे परिचितांकडूनच होतात आणि परिचय हा कोणत्याही प्रकारच्या दळणवळणाच्या माध्यमातून होत असतो.
आयुष्यभर एकमेकांच्या सहवासात राहूनही एकमेकांना न समजलेली माणसे आपण बघतोच की. स्वत:ची स्वतःशी देखिल पुरती ओळख आपली झाली नसते.अपरिचितांवर एकदम विश्वास टाकण हे धोक्याचे आहेच. ऑर्कूट सारखे हत्यार कसे वापरावे ?याचे शिक्षण दिले पाहिजे. सुरी ही भाजी कापायला पण वापरतात तशी खून करायला पण!
प्रकाश घाटपांडे

वाहवा!

ऑर्कूट सारखे हत्यार कसे वापरावे ?याचे शिक्षण दिले पाहिजे. सुरी ही भाजी कापायला पण वापरतात तशी खून करायला पण!


वा काय बोललात म्हणजे लिहिलात...!
अगदी योग्य...

आता या बातमी मुळे लगेच बंदी वगैरे हा खेळ होईलच...

आपला
गुंडोपंत

मार्मिक भाष्य

ऑरकूट हे तर दळणवळणाचे साधन आहे. हत्यार म्हणा हव तरं? ही साधन जेवढी वाढतील तेवढि असुरक्षितता वाढेल. गुन्हा ही मानसिकता आहे. त्याची सार्वत्रिक व्याख्या करता आली नाही. संकल्पनेच्या आधारेच विवेचन करावे लागते. बरेचसे गुन्हे हे परिचितांकडूनच होतात आणि परिचय हा कोणत्याही प्रकारच्या दळणवळणाच्या माध्यमातून होत असतो.

हे भाष्य अत्यंत मार्मिक वाटले.
तुलनेदाखल ब्रिटिशांनी आणलेल्या रेल्वेमुळे देशाचा सत्यानाश झाला हे जुने मत आठवले.
पूर्वीच्या काळी गावे स्वयंपूर्ण व स्वयंशासित असत. मोठे गुन्हेगारही वाळीत टाकण्याच्या शस्त्राला वचकून असत आणि या शिक्षेच्या भीतीने सुतासारखे सरळ होत असत असे वाचले आहे, कारण गाव सोडून ते सहजासहजी कुठेही जाऊ शकत नसत. नंतर रेल्वे आल्यामुळे गुन्हेगारांवर गावाचा ताबा राहिला नाही. काहीही करून पळून जायचे व अन्य गावाला जाऊन तिथे नव्याने सुरुवात करायची हे रेल्वेमुळे सहज शक्य झाले. त्यात भर कोर्टाची. या दोन्हीमुळे गावाचे सत्तासामर्थ्य डळमळीत झाले. अशी दळणवळणाची साधने वाढल्यामुळे असुरक्षितता वाढली.
पण शेवटी असे होणे चांगले की वाईट हे निश्चितपणे समजत नाही. परिचय, ज्ञान वाढल्यामुळे गुन्हे वाढतील का? की कमी होतील?

- दिगम्भा

एकदम बरोबर!

मराठी पालकांनी आपल्या मुलांना ऑर्कुट ऐवजी मनोगत/उपक्रमावर पाठवावे, हा सल्ला द्यावासा वाटतो.

एकदम बरोबर!

सहमत

मराठी पालकांनी आपल्या मुलांना ऑर्कुट ऐवजी मनोगत/उपक्रमावर पाठवावे, हा सल्ला द्यावासा वाटतो.

सहमत आहे.

परंतु उपक्रम व ऑर्कुटची धोरणे वेगवेगळी आहेत. उपक्रम हा केवळ गप्पांचा अड्डा नाही.

मात्र उपक्रमाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी आवश्यक असलेले मार्केटिंग करण्यासाठी काय करता येईल?

आम्ही यथाशक्ती मार्केटिंग करतच आहोत. उदा. आजानुकर्णोक्तीवर उपक्रमाचा दुवा देणे. देसीपंडितवर उपक्रमावरील व मनोगतावरील लेख देणे. इ.
मात्र काही मराठी दैनिकांमध्ये उपक्रमाचा एक माहितीपूर्ण लेख प्रत्येक सप्ताहात छापणे. व (फ्रॉम उपक्रम) असे तिथे दुवा देऊन कटाक्षाने लिहिणे यामुळे थोडे मार्केटिंग होईल.

इतर सदस्यांना काय वाटते?

सहमत ! पण ...!

मराठी पालकांनी आपल्या मुलांना ऑर्कुट ऐवजी मनोगत/उपक्रमावर पाठवावे, हा सल्ला द्यावासा वाटतो.

सहमत.
पालकांनी आपल्या मुलांना ऑर्कुट ऐवजी उपक्रवर पाठवावे.(मनोगतचा राग नाही) पण मुलांचे लेखन आणि प्रतिसाद प्रकाशित होईपर्यंत मुले आजारी पडतील ;)

उपक्रमाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी आवश्यक असलेले मार्केटिंग करण्यासाठी काय करता येईल?

आम्हीही उपक्रमींची संख्या वाढावी म्हणून कारण नसतांना व्याख्यानात(वर्गातल्या) उपक्रमची महती सांगतो (ध्येय धोरणाची नाही )आणि प्रत्येकाने सहभागी झालेच पाहिजे असे सांगतो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाहीतर...

आम्हीही उपक्रमींची संख्या वाढावी म्हणून कारण नसतांना व्याख्यानात(वर्गातल्या) उपक्रमची महती सांगतो (ध्येय धोरणाची नाही )आणि प्रत्येकाने सहभागी झालेच पाहिजे असे सांगतो !

सहभागी नाही झालात तर शिक्षा असते का? (ह. घ्या.)

उपक्रमसारखे

उपक्रमसारखे तरूणांना (शाळा, कॉलेजातील या अर्थाने तरूण) आवडू शकेल असे एखादे वेगळे मराठी संकेतस्थळ असायला हवे. त्यामुळे कदाचीत मराठीकडे आक्र्षण वाढू शकेल.

निमित्तमात्र

वय वर्षे केवळ १८, हातात स्कोडा ऑक्टेविया (किंमत १० लाखांवर आहे असं ऐकलं होतं), गेमिंग झोनमध्ये रात्र घालवण्याचा प्लॅन, रात्री दिड वाजता आईवडिलांना फोन करून आपण येत नसल्याचे कळवणे.... या सर्वाचा ऑर्कुटशी फार कमी संबंध आहे असे वाटत नाही का? ऑर्कुट येथे फक्त निमित्तमात्र वाटते.

आंतरजालावर अनोळखी व्यक्तिंशी मैत्री वगैरे करताना सांभाळलं पाहिजे हाच धडा यावरून मिळतो!

अगदी! एखादा सरळ दिसला/ली, सोज्वळ भासला/ली, ज्ञानी दिसला/ली म्हणून त्यावर विश्वास टाकण्यात अर्थ नसतो मग ऑर्कुट असो की मनोगत/ उपक्रम ;-)

मतितार्थ

अगदी! एखादा सरळ दिसला/ली, सोज्वळ भासला/ली, ज्ञानी दिसला/ली म्हणून त्यावर विश्वास टाकण्यात अर्थ नसतो मग ऑर्कुट असो की मनोगत/ उपक्रम ;-)

आपण या दुर्घटनेवरून योग्य शब्दात मतितार्थ सांगीतला...

अगदी बरोबर्!

अगदी! एखादा सरळ दिसला/ली, सोज्वळ भासला/ली, ज्ञानी दिसला/ली म्हणून त्यावर विश्वास टाकण्यात अर्थ नसतो मग ऑर्कुट असो की मनोगत/ उपक्रम ;-)

जागदी बरोबर हो. त्यामुळेच शंका रहू नये म्हणून आम्ही कसे आहोत् याचा एक फ्प्टो ही लावून टाकला आहे खरडवहीत... हे असे आहोत तुम्हाला 'जमत असेल' तरच पुढे या! ;)

आपला
गुंडोपंत

मोहजाल

अगदी! एखादा सरळ दिसला/ली, सोज्वळ भासला/ली, ज्ञानी दिसला/ली म्हणून त्यावर विश्वास टाकण्यात अर्थ नसतो मग ऑर्कुट असो की मनोगत/ उपक्रम ;-)

'महाजाला'वर न वावरता देखिल 'मोहजाला'त अडकणारी माणस आहेत च की? आभासी जगातील प्रत्येक मुखवट्या(आयडी) मागे एक् चेहरा (व्यक्ती) लपलेला असतोच. तो चेहरा व मुखवटा यात सुरक्षित अंतर राखण्याची स्किझोफ्रेनिक कसरत प्रत्येक करत असतो. कोषात आणी कोषाबाहेर असे त्याचे व्यक्तिमत्व दुभंगले जाते. कोषात आले कि सुरक्षित वाटते, पण नंतर नंतर जीव घुसमटतो कि तो कोषा बाहेर येतो. थोड मोकळ वाटलं कि असुरक्षिततेच्या भया पोटी परत कोषात. विश्वास हि सतत तपासली जाणारी प्रक्रिया आहे. आणि चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा.प्रत्येक श्रध्दा ही अंधच आस्ते. अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हट्ल्यासरखे आहे. विश्वासघातकि माणसे आपला कार्यभाग साधल्यावर विश्वास पानिपतात मेला असे म्हणतात. एका बाजूला विश्वासघातकी असणारी माणसे दुसर्‍या बाजूला विश्वासार्ह असू शकतात. आपण वाहवत जाउ या भीती पोटी काठावर बसलेली माणसे प्रवाहाचा आनंद कसा घेणार? असुरिक्षिततेच्या भयगंडापोटी यांचा स्वतःवरचा विश्वास देखिल उडतो.
" आयुष्यावर बोलू काही " हा संदीप खरे व सलील कुलकर्णी यांचा गेय कवितांचा कार्यक्रम याच मुळे मनाला भावतो. उपक्रमावरील सर्वांनी तो बघितला असेलच.
प्रकाश घाटपांडे

निमित्ताबद्दल

या सर्वाचा ऑर्कुटशी फार कमी संबंध आहे असे वाटत नाही का? ऑर्कुट येथे फक्त निमित्तमात्र वाटते.

ऑर्कुटवरील संधयित मिस्टिरियस एन्जेलची चौकशी पोलिसांनी थांबवली आहे असे कळते. आरोपी गेमींग झोन मध्ये भेटले होते अशीही बातमी आहे.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

ह्याचा ही दोष ऑर्कुटवर....

नमस्कार,
ह्या ऑर्कुटमुळे मला अनेक वर्षांपासून दूरावलेले मित्र परत भेटले. माझ्या छोट्या गावाच्या कट्ट्यावर सुमारे १०० लोक आम्ही एकत्र आहोत.
ह्या ऑर्कुटमुळे अनेक नवे मित्र भेटले. ह्यांच्यातील काहींना भेटलोय काहींना भेटायची इच्छा आहे. ह्याच ऑर्कुटमुळे अनिल अवचटांशी भेटता आले , गप्पा करता आल्या.
ह्याच ऑर्कुटमुळे राजू परूळेकर भेटले.
ह्याच ऑर्कुटमुळे तात्याचे पहिले दर्शन झाले.( तात्यांचा गातानाचा फोटो)
ह्याच ऑर्कुटवर अनेक मनोगती आणि उपक्रमी मित्रांना भेटता आले. सतत संपर्क झाला.
ह्याच ऑर्कुटमुळे अजानुकर्णं, त्रिशुल कुलकर्णी यांसारखी आता अगदी जव़ळ आलेली मित्र मंडळी भेटली.
एक ना अनेक गोष्टींमुळे ऑर्कुटचा मला फायदाच झाला आहे. हे एक सामाजिक संकेतस्थळ आहे. समाजात वावरतांना तुम्हाला जी अवधाने पाळावी लागतात ती येथेही पाळावी लागतात. नव्हे त्यापेक्षाही जास्त. कारण आपल्या गावात आपण प्रत्येकभाग कसा आहे. कुठे आपण सुरक्षीत आहोत आदी सगळं किमान माहिती असतं. येथे महाजालवर मात्र तसं नाही. त्यामुळे येथे माहिती देताना विशेषतः व्यक्तीगत माहिती देताना थोडं साभाळावं. सोबत काही खबरदारी घेतली की पुरेशी होते.

कुठलाही माणुस ओळखण्याचे एक कसब असते. तो कसा आहे हे ओळखता नाही आले तरी त्याचे किंवा माझे सुर जुळतात की नाही हे तरी लवकर कळतं. आपला मित्र कसा ओळखावा आणि मित्र कसे जोपासायचे याचा आणि ऑर्कुटचा कुठे आलाय संपर्क , अहो हे तर प्रत्यक्ष जीवणातील कसब आहे. हे प्रत्येकाने शिकायला हवं. मग आज ऑर्कुट आहे उद्या बिगअड्डा असेल.

नीलकांत

वा!

वा छान प्रतिसाद दिलास!
आवडला बरं का!

गुंड्या

सहमत !

असेच माझे देखील मत आहे, ऑर्कुटमुळे मला जास्त नाही पण खुप फायदा झाला आहे आपले काळाच्या ओघात हरवलेले मित्र परत सापडले काही नवीन व्यवसायिक समीकरणे देखील ऑर्कुटमुळे अस्तीत्वात आली !

मी जसा व्यक्तिगत जिवनामध्ये आहे तसाच महाजालावरील जिवनात नसेन.
साधे सोपे उदाहरण एक चित्रपट आहे तसा लहान मुलांसाठी आहे पण ह्या चित्रपटामध्ये जे दाखवले आहे त्यावरुन लक्षात येते की जो मनुष्य तुम्हाला महाजालावर कणखर वाटत असेल तो आपल्या साधारण जिवनामध्ये एकदमच ठिसूळ असू शकतो अथवा जो महाजालावर शुरवीर नावाने वावरतो तो शक्यतो घाबरट देखील असु शकतो ! चित्रपटाचे नाव आहे "Spy Kid - Game Over 3D"

राज जैन
*********
स्वाक्षरी लिहण्यात काही मजा नाई बा !

प्रतिसाद आवडला

सुंदर प्रतिसाद.

काय भावात पडलं ऑर्कुट?

..अजुनतरी फुकटच आहे.

महाजाल् एक मोठा बाजार समजा ना

विद्वान हो,
"महाजाल" हा एक खूप मोठा बाजार आहे, त्या मधे, बार आहेत, वेश्यालय आहेत, केसिनोज आहेत, मन्दिर आहेत, धर्म आहे, शाळा आहे, लायब्रेरी आहे, बरेच काही आहे... मग एका ओर्कुट वर सम्पूर्ण दोष कां टाकावा, कोण व्यक्ति बाजारात काय घेतात आणि कुठे जातात तो त्याचा स्वतः च्या बुद्धि चा प्रश्न आहे, आता ओर्कुट ची प्रसिद्धि बाकीच्यां पेक्षा जास्त आहे त्याला कुणी काय करणार, ते त्यांनी आपल्या "मार्केटिंग" नी मिळवली आहे, त्याला बन्दी घालण्यात काही अर्थ नाही, उद्या ओर्कुट सारखे दहा आणखी नवीन जालस्थल येतील... कुणाकुणाला रोखणार आणि कसं? त्यापेक्षा मुला-मुलींना बरं-वाईट काय आहे ह्याचे संस्कार दिलेले बरे... नाही का?

आधुनिकता कशाला म्हणतात, ह्या विचारात मग्न असलेला...
सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com

अगदी बरोबर

त्यापेक्षा मुला-मुलींना बरं-वाईट काय आहे ह्याचे संस्कार दिलेले बरे... नाही का?

पहिला बाजीराव म्हणतो तसं झाडाच्या फांद्या छाटत बसण्यापेक्षा मुळावरच घाव घालायचा.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

तिथेच तर घोडं अडतय..

त्यापेक्षा मुला-मुलींना बरं-वाईट काय आहे ह्याचे संस्कार दिलेले बरे... नाही का?

चिपलूनकरसाहेब, तुम्ही (प्रश्नाच्या) मुळावरच घाव घालताहात. आपले विचार एकदम पटले. पण काय आहे आईवडीलांचे मुलांशी बोलणेच नसते तर बाकीच्या संस्काराचे काय घ्या! १६-१७ वर्षाचा मुलगा जर रात्री क्लब्समधे गाणि ऐकायला जात असेल आणि पालकांना त्यात काही गैर वाटत नसेल तर तशीही ती चिंताच आहे...

 
^ वर