सुरकोटला अश्व: भाग 2

(मागील भागावरून पुढे)

1971-72 या वर्षामध्ये श्री. ए.बी.शर्मा या भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञाने, सुरकोटला येथील टेकाडावर, इ.स.पूर्व 2000 या कालखंडातील घोड्याच्या अस्थी अवशेषांचा लावलेला शोध, पुढची सुमारे 20 वर्षे,जगभरच्या इतर शास्त्रज्ञांनी संपूर्णपणे अमान्यच केल्याने तसा दुर्लक्षितच राहिला. एक सुप्रसिद्ध आणि सन्मानित पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड एच मेडो (Dr. Richard H. Meadow) यांनी उलट या शोधावर टीका करताना असे सांगितले होते की:
” छोट्या रणाजवळ असलेल्या सुरकोटला या हडप्पाकालीन उत्खनन स्थलावर सापडलेल्या तथाकथित घोड्याच्या पायाच्या खुरांजवळील हाडांच्या छायाचित्रावरून मूल्यांकन केल्यास,निश्चितपणे एका मोठ्या आकाराच्या खेचराची ही हाडे आहेत असे म्हणता येते.”
(“ It is on the basis of this phalanx that one can ascertain from the published photographs that the ‘horse’ of Surkotada, a Harappan period site in the little Rann of Kutch, …… is likewise almost certainly a half-ass, albeit a large one.”)
इतर देशातील पुरातत्त्व शास्त्रज्ञांची मते काहीही असोत! सिंधू-सरस्वती संस्कृतीमधील उत्खनन स्थलांवर, घोड्याच्या अस्तित्वाचे जास्त जास्त पुरावे भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांना इतर ठिकाणी केलेल्या उत्खननांमध्ये मिळू लागले होते हे स्पष्ट दिसत होते. 1955-56 साली म्हणजेच सुरकोटला मधील शोधाच्या आधी झालेल्या एका उत्खननात, सुरकोटलाच्या दक्षिणेकडे असलेल्या लोथल या जागी, भारतीय पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ श्री. एस. आर. राव व त्यांचे सहकारी यांना काठेवाड किनार्‍यावर असलेल्या सिंधू-सरस्वती संस्कृतीतील एका मोठ्या बंदराचा शोध लागला होता. या ठिकाणी जहाजांवरील मालाची चढ उतार करण्यासाठी बांधलेला एक मालधक्का आणि नवीन जहाजे बांधणे आणि नौका दुरुस्ती या साठी बांधलेली एका गोदी यांचाही शोध लागलेला होता. याच ठिकाणी केलेल्या नवीन उत्खननात, श्री. राव यांना भाजलेल्या मातीपासून बनवलेल्या दोन अश्व प्रतिकृती (figurines of terracotta horses) सापडल्या. यापैकी एका मूर्तीतील घोड्याला आखूड शेपूट, लांब मान आणि उभे असलेले कान दाखवलेले होते. यानंतर पी.के.थॉमस व पी.पी.जोगळेकर या पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तज्ञांनी केलेल्या शिकारपूर व कुंतासी येथील उत्खननात, एम.के ढवळीकर् यांनी केलेल्या चंबळ नदीच्या खोर्‍यातील कायथ येथे केलेल्या उत्खननात, घोड्यांची हाडे सापडल्याचे त्यांनी सूचित केले होते. श्री ढवळीकरांना कायथ येथे, भाजलेल्या मातीपासून बनवलेली एका घोडीची (figurine of a mare) छोटी प्रतिकृती सुद्धा सापडली होती.
1991 मध्ये, सुरकोटलाच्या वायव्येला 60 किमी वर असलेल्या मोठ्या रणातील खादिर बेटावर, ज्याची तुलना फक्त मोहेंजोडारो किंवा हडप्पा बरोबरच होऊ शकेल, अशा एका सिंधू-सरस्वती संस्कृतीतील महानगराचा शोध, भारतीय पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ श्री. बिश्त व त्यांचे सहकारी यांना धोलावीरा या खेड्याजवळ लागला आणि सुरकोटला व तेथील अश्व हा विवाद बाजूलाच पडल्यासारखा झाला. धोलावीरा या ठिकाणी एवढ्या प्रचंड प्रमाणात रोजच्या वापरातील वस्तू, कला-कुसरीच्या वस्तू, सील्स-सीलींग्ज, दागिने व इमारतींचे भग्नावशेष सापडले की पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना सुरकोटलाचे विस्मरण झाले असल्याचे नवल वाटत नाही. मोहेंजोडारो व हडप्पा ही ठिकाण पाकिस्तानात गेल्याने भारताकडे या संस्कृतीतील मोठे असे उत्खनन स्थळ या पर्यंत नव्हते. ती कसर धोलावीराने भरून काढली. दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात धोलावीरामध्ये सापडलेल्या शेकडो वस्तू ठेवलेल्या आहेत. मात्र हे सगळे असले तरी घोड्याचे कोणतेही अस्थी अवशेष किंवा प्रतिकृती धोलावीरा येथे सापडलेल्या नाहीत.
1991-92 मध्येच म्हणजे श्री. ए.बी.शर्मा यांनी सुरकोटला अश्वाच्या अस्थी अवशेषांचा शोध लावल्याला 20 वर्षे झाल्यानंतर, अश्व तज्ञ म्हणून ज्यांची जगभर ख्याती होती असे एक हंगेरियन पुरातत्त्व शास्त्रज्ञ सॅन्डॉर बोकोन्यी (Sándor Bökönyi) यांचे दिल्लीला एका परिसंवादात भाग घेण्यासाठी भारतात आगमन झाले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मुख्य संचालकांनी त्यांना सुरकोटला येथे मिळालेल्या अश्व अस्थी तपासण्याची विनंती केली. त्यांनी त्या अतिशय बारकाईने तपासल्या आणि नंतर परिसंवादात केलेल्या आपल्या भाषणात, अत्यंत स्पष्ट शब्दात या तपासणीचा अहवाल देताना सांगितले:
” सुरकोटला अश्वाचा खालचा जबडा आणि दात यावर असलेल्या एनॅमलचा आकार(pattern), पुढच्या दातांचा साईज आणि फॉर्म व खुराजवळील हाडे यांचा पुरावा लक्षात घेता हा प्राणी एक खराखुरा अश्व (Equus caballus L) आहे हे सिद्ध होते. प्लायस्टोसीन युगानंतरच्या कालात, भारतीय उपखंडात रानटी घोडे अस्तित्वात नसल्याने, हा अश्व पाळलेला होता या बद्दल कोणतीही शंका घेण्याची आवश्यकता नाही.”
“The occurrence of true horse (Equus caballus L ) was evidenced by the enamel pattern of the upper and lower cheek and teeth and by the size of and form of incisors and phalanges. Since no wild horses lived in India in post-pleistocene times, the domestic nature of the Surkotada horse is undoubtful.”
भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञ श्री. ए.बी.शर्मा यांचा शोध आंतर्राष्ट्रीय ख्यातीचे एक शास्त्रज्ञ सॅन्डॉर ब्रोकोन्यी यांनी संपूर्णपणे मान्य केल्याने,शर्मांवर अविश्वास दाखवणार्‍या इतर पाश्चिमात्य शास्त्रज्ञांना नाईलाजाने हा शोध मान्य करणे भागच पडले. या नंतर याच परिसंवादात श्री.ए.बी.शर्मा यांना सर्व श्रोत्यांनी 2 मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करून सन्मानित केले त्यांच्या शोधाबद्दल त्यांना पोचपावती दिली.
दुसर्‍या एका खंडातून आलेल्या एका शास्त्रज्ञाने आपला शोध मान्य केल्यानंतर स्वदेशीयांनी आपल्या शोधाला मान्यता दिली याची मनाला अतिशय खंत वाटल्याने श्री..ए.बी.शर्मा या सन्मानाबद्दल फारसे समाधानी नव्हते. नंतरच्या कालात लिहिलेल्या आपल्या एका पुस्तकात ते म्हणतात.
” हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात दुख्खद दिन होता असे मी मानतो. सर्व श्रोते माझे कौतुक करत असताना माझ्या मनात हेच विचार येत राहिले की दुसर्‍या एका खंडातून एकजण आला, त्याने अस्थी अवशेष तपासले व जाहीर केले की “‘शर्मा म्हणतात ते बरोबर आहे.” हे होईपर्यंत माझ्या शोधाला मान्यता मिळण्यासाठी मला 2 दशके वाट पहावी लागली. दुसर्‍या देशांकडून आपल्या शोधांना मान्यता कधी मिळते ? याची वाट न बघत बसण्याचे बौद्धिक धैर्य आपण कधी दाखवणार आहोत? आपले इतिहासकार तर या बाबतीत आणखीनच मानसिक गुलामगिरीत आहेत. आर्य लोक भारतीय उपखंडाच्या बाहेरून आलेले कोणी लोक नव्हते हे सिद्ध करण्यासाठी हा सर्व प्रयत्न चालू आहे असे त्यांना वाटते.”
“This was the saddest day for me as the thought flashed in my mind that my findings had to wait two decades for recognition, until a man from another continent came, examined the material and declared that “ Sharma was right.” When will we imbibe intellectual courage not to look across borders for approval? The historians are still worse, they feel it is an attempt on the part of the “rightists” to prove that Aryans did not come to India from outside her boundaries.”
सॅन्डर ब्रोकोन्यी यांनी आपले मत निःसंदिग्ध रितीने परत एकदा 1993 मध्ये, पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ संचालकांना (Director-General) दिलेल्या अहवालात व्यक्त केले आहे.
” इतिहास पूर्व कालातील सुरकोटला, कच्छ, येथे डॉ. जे.पी.जोशी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उत्खननात मिळालेल्या घोड्याच्या प्रजातीच्या प्राण्याच्या अस्थी अवशेषांच्या बारकाईने व संपूर्णपणे केलेल्या अभ्यासाच्या आधारावर मी हे विधान करता आहे. सुरकोटला अश्वाचा खालचा जबडा आणि दात यावर असलेल्या एनॅमलचा आकार (pattern), पुढच्या दातांचा साईज आणि फॉर्म व खुराजवळील हाडे यांचा पुरावा लक्षात घेता हा प्राणी एक खराखुरा अश्व (Equus caballus L) आहे हे सिद्ध होते. प्लायस्टोसीन युगानंतरच्या कालात भारतीय उपखंडात रानटी घोडे अस्तित्वात नसल्याने हा अश्व पाळलेला होता या बद्दल कोणतीही शंका घेण्याची आवश्यकता नाही. या शिवाय याच अस्थी अवशेषांत असलेल्या घोड्याच्या वरच्या जबड्यामधील (inter- maxilla fragment) हिरडी व दात शाबूत असलेल्या एका तुकड्यावर, त्या घोड्याने आपला तोडांतील लगाम सतत चावल्याच्या खुणा उमटलेल्या अस्तित्वात आहेत. ही लगाम चघळण्याची वाईट सवय, जे घोडे फक्त युद्धासाठी वापरले न आता इतर कामांसाठीही वापरले जातात त्यांच्यात दिसून येते“
“Through a thorough study of the equid remains of the prehistoric settlement of Surkotada, Kutch, excavated under the direction of Dr. J. P. Joshi, I can state the following: The occurrence of true horse (Equus caballus L.) was evidenced by the enamel pattern of the upper and lower cheek and teeth and by the size and form of incisors and phalanges (toe bones). Since no wild horses lived in India in post-Pleistocene times, the domestic nature of the Surkotada horses is undoubtful. This is also supported by an inter- maxilla fragment whose incisor tooth shows clear signs of crib biting, a bad habit only existing among domestic horses which are not extensively used for war”
सुरकोटला अश्व विवाद यानंतर जवळपास संपुष्टातच आला व हे मान्य केले गेले की सिंधू संस्कृतीतील लोकांना इ.स.पूर्व 2000 या कालानंतर पाळलेला घोडा हा प्राणी माहीत होता व त्यांच्या वापरात होता.
मात्र आर्य आक्रमण सिद्धांताच्या चाहत्यांजवळच्या भात्यात, आणखी एक बाण शिल्लक होताच. या बाकी उरलेल्या सिद्धांताप्रमाणे, आर्य सेना या अनार्य सेनांपेक्षा वरचढ असण्यास आणखी एक महत्त्वाचे कारण होते. आर्य योद्धे वापरत असलेल्या रथांना आरे(spoke) असत व अनार्यांच्या रथांना आरे नसलेली सपाट घन (solid wheels) चाके असत. या कारणाने आर्य योद्ध्यांचे रथ कितीतरी जास्त गतीने प्रवास करू शकत व त्यांना अनार्यांवर विजय मिळवता येण्याचे हे एक महत्त्वाचे कारण होते.
मात्र हा मुद्दा कपोलकल्पित असल्याचे भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केलेल्या अनेक स्थानांवरील उत्खननांवरून आढळून आले. कालीबांगन आणि राखीगढी येथील उत्खननात भाजलेल्या मातीपासून बनवलेली मुलांच्या खेळण्यांतील अनेक चाके सापडली. या सर्व चाकांवर आंसापासून ते बाहेरच्या परिघापर्यंत रंगवलेले आरे दिसून आले. बाणावली मधील उत्खननात तर मातीमध्येच आरे कोरलेले (low relief) आढळले. धोलावीरा मध्ये दोन्ही प्रकारची चाके सापडली.
भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या या कार्यामुळे, हडप्पाकालीन भारतावर कोणतेही आर्य आक्रमण झाले नव्हते ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. हडप्पावासीयांना घोड्याच्या पाठीवरून व रथात बसून तुफानी घोडदौड करत येणार्‍या, कोणत्याही आक्रमकांशी सामना करावा लागला नव्हता. हे जरी सगळे मान्य झाले असले तरी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हडप्पा पूर्व काल आणि सुरवातीचा हडप्पा काल (pre-Harappan) या मध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्याच उत्खनन स्थळी घोड्याचे कोणतेही अवशेष कोठेच सापडलेले नाहीत. त्याच प्रमाणे या सिंधू संस्कृतीमध्ये, वैदिक संस्कृतीत घोड्याला असलेले सांस्कृतिक महत्त्व असल्याचा कोणताच पुरावा आढळत नाही. सुरकोटला अश्वामुळे फक्त एवढेच सिद्ध होते आहे की परिपक्क्व हडप्पा कालात (mature Harappan phases) घोडा हा प्राणी पाळला जात होता. पर्यायाने याचा अर्थ असाच होतो की 1920 सालापासून इतिहासकारांना कोड्यात टाकणारा मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला आहे.
हा मूळ प्रश्न या प्रमाणे आहे:
पाकिस्तानमधील ‘स्वात‘ या भागापासून, काठेवाड किनार्‍यापर्यंत दक्षिणेला आणि पूर्वेला गंगा खोर्‍यापर्यंत विस्तार असलेली ही विशाल सिंधू-सरस्वती संस्कृती अचानक नष्ट कोणत्या कारणासाठी आणि कशी झाली असावी? त्याचप्रमाणे, जहाजे किंवा नौका बांधणी करून, समुद्र मार्गाने व्यापारउदीम करणार्‍या, स्वतची लिपी असणार्‍या आणि उत्कृष्ट शहर आखणी तसेच नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याच्या अप्रतिम सोई करू शकणार्‍या या संस्कृतीने, मागे आपला कोणताही वारसा न सोडता ती इतिहासांच्या पानात गडप कशी झाली? आणि भारतीय उपखंड परत एकदा अंधकार युगात ही सर्व प्रगती विसरून कसे काय गेले?
या शिवाय आणखीही एक प्रश्न निदान माझ्या मनाला तरी पडतो आहे. सिंधू संस्कृतीतील लोक, मानवी पुनरुत्पादन आणि फलोधारणा (fertility) यांचे पूजन करणारे मूर्तीपूजक होते. मस्तकासह असलेले किंवा मस्तक विरहित असलेले स्त्री शरीर आणि लिंग (phallic symbol) यांच्या प्रतिमांचे ते पूजन करीत. जर आर्यांचे आक्रमण त्यांच्यावर कधीच झालेले नव्हते तर ही मूर्तीपूजा सोडून देऊन त्यांनी पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करणार्‍या अमूर्त देवांना अग्नीद्वारा हविर्भाग देण्याची आर्य प्रथा का स्वीकारली असावी?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजून तरी मिळाली आहेत असे मला वाटत नाही. मात्र तर्कसंगत खुलासा काही बाबतीत तरी मिळू शकतो आहे.
(क्रमश)

या लेखा सोबत असणारी छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर किल्क करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त

उत्कंठावर्धक असा हा दुसरा भाग सुद्धा आवडला वाचायला आणि बरिच नवी माहिती मला मिळाली. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

धन्यवाद

लेख आवडला. एकूण इतिहास माहिती होता सँदोर बोकोर्नींच्या निकालासकट, पण शर्मांचे मनोगत वाचले नव्हते. ते दिल्याबद्दल विशेष धन्यवाद :)

सुरेख

हा भाग फार आवडला. पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत.

आर्यांचे आक्रमण झाले नव्हते. विसरणाच्या तत्त्वाने (idea diffusion) आर्यपद्धती भारतात रुजू झाली असे म्हटले तरी आपले जुने रितीरिवाज सोडून वैदिक पद्धती एतद्देशीयांनी का स्वीकारली असा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे १००% विसरणापेक्षा एक संस्कृती दुसर्‍या संस्कृतीपेक्षा वरचढ ठरली असावी आणि त्यांनी दुसर्‍या संस्कृतीतील रितींना दुय्यम ठरवले असावे किंवा कमीपणाची भावना आणली असावी.

गोवर्धन पर्वताच्या गोष्टीत कृष्णाने केलेला इंद्राचा नि:पात बोलका आहे.

----------

भारतीयांना इतिहासाची ओळख पाश्चात्त्यांनी करून दिली असे म्हणावे लागेल. त्या करता लागणारे संशोधन, चिकाटी, पैसा खर्च करण्याची क्षमता आणि निष्कर्ष पाहता त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची परंपरा पूर्वीच अस्तित्वात आली आहे. भारतीयांचा चटकन निष्कर्षाप्रत येण्याचा स्वभाव, आमचे ते सर्व उत्तम अशी वृत्ती वगैरेंमुळे शर्मांच्या संशोधनाकडे लोकांनी पाठ फिरवली असेल तर आश्चर्य नाही. ही परिस्थिती बदलायला इतिहासाकडे हेटाळणीने पाहण्याचा दृष्टीकोनही कारणीभूत असू शकेल. परंतु हे काही योग्य नाही.

शर्मांच्या संशोधनाला योग्य व्यासपीठ आणि प्रसिद्धी मिळाली असती तर हा तिढा थोडासा सुटला असता का?

शर्मांचे संशोधन

प्रियालीताईंचे विचार बरोबरच आहेत. गेली काही महिने भारतीय पुरातत्तव खात्याचे व पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे अहवाल मी वाचतो आहे. यांच्या संशोधनामुळे प्राचीन भारताचा इतिहास पुन्हा नव्याने लिहिण्याची वेळ आली आहे असे माझे तरी मत झाले आहे. उदाहरणार्थ धोलाविरा चे आर एस बिश्त यांनी धोलाविरा मधील दफन भूमी उत्खनन करताना त्यांना मिळालेल्या काही कबरी , आरे असलेल्या चाकाच्या आकाराच्या व घुमटाकार आकार असलेल्या असल्याने पुढे वैदिक कालातील शतपथ ब्राम्हण आणि सुल्ब सुत्र यातील सप्रधी रथ चक्र (Sara-rata-chakra-citi and sapradhi-rata-chakra-citi mentioned in the Śatapatha Brahmana and Sulba-sutras या संकल्पनेचे हे कदाचित उगम स्थान असू शकते असे विचार मांडले आहेत. वैदिक संस्कृतीमध्ये सिंधू संस्कृतीतील कोणकोणत्या परंपरा पुढे चालू राहिल्या हा एक मोठा संशोधनाचा विषय खासच आहे.

उत्तम

मस्त. हा भाग पण आवडला.

मस्त

हा भागही आवडला.

 
^ वर