गानयोगी!

पंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या 'गानयोगी' ह्या संपादित चरित्राचे समीक्षण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न!
ह्या पुस्तकात मूळ कन्नड भाषेतील ' माझी रसयात्रा' ह्या पंडितजींच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद सौ.उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला आहे. ह्यात मजेची गोष्ट अशी आहे की सौ.उमा कुलकर्णीना कन्नड वाचता येत नाही मात्र त्या कानडी समजू शकतात. ह्या कामी त्यांना त्यांचे पती श्री. विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांनी वाचन करून साथ दिली आहे.
श्री पु. ल. देशपांडे, सौ. सुनिता देशपांडे,श्री भिर्डीकर(पंडितजींचे शिष्य),श्री.एम.के.कुलकर्णी यांच्या बरोबरीनेच मन्सूरपुत्र डॉ. राजशेखर ,सुकन्या लक्ष्मीबाई यांच्या लेखनाचा आणि श्री. अशोक वाजपेयी यांच्या कवितांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.
ह्या पुस्तकाचे संपादन श्री. वि.भा.देशपांडे ह्यांनी केलेय.

धारवाड जवळच्या मन्सूर ह्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांची आई नीलम्मा आपल्या गोड आवाजात जात्यावरच्या ओव्या गात असे. हेच त्यांच्यावर झालेले प्राथमिक संगीत संस्कार.त्यांचे मोठे बंधू बसवराज हे कन्नड संगीत नाटकात कामे करत आणि असे करताना त्यांनी खूप नावलौकिक मिळवला होता. त्यांच्याच आधाराने आणि प्रोत्साहनाने छोट्या मल्लिकार्जुनाने संगीत नाटकात कामे करायला सुरवात केली आणि थोड्याच काळात ते एक उत्तम बालगायक म्हणून प्रसिद्धी पावले.पण मल्लिकार्जुनाला त्यात समाधान वाटेना. त्याला गाण्यात प्रगती करायची होती. शेवटी बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावात शिवयोगी स्वामींच्या दर्शनाला गेले असताना छोट्या मल्लिकार्जुनाचे गाणे ऐकून स्वामी आनंदित झाले आणि त्यांनी नीलकंठबुवा आलुरमठ(ग्वाल्हेर घराणे) ह्यांच्याकडे त्याला गाणे शिकवावे म्हणून शिफारस केली. इथेच गाणे शिकता शिकता मन्सूरजी नावारुपाला आले. निरनिराळ्या ठिकाणच्या संगीतसभा गाजवत असतानाच काही नाटकांचे संगीत दिग्दर्शन करण्याची संधीही त्यांना मिळाली आणि त्यांनी ती अतिशय समर्थपणे पार पाडली. ह्यातूनच मग त्यांच्या आवाजात काही रागांच्या ध्वनिमुद्रिका काढण्याची प्रेरणा एचएमव्ही ला मिळाली.
पुढे त्यांची गाठ गान सम्राट अल्लादियांखांशी पडली आणि त्यातूनच मग त्यांचेच चिरंजीव मंजीखां ह्यांचेकडून गंडाबंधन करून घेऊन जयपूर घराण्याची तालीम सुरू झाली. पुढे मंजीखांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू भुर्जीखां ह्यांच्याकडून तालीम मिळाली.
अशाच आणि बऱ्याच चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेले हे चरित्र मुळातूनच वाचल्याशिवाय त्याची महती कळणार नाही.

पुलंनी म्हटलंय " मल्लिकार्जुन मन्सूर हा एक गाण्यात राहणारा माणूस आहे. तसा त्यांचा टपाली पत्ता'मृत्यंजय बंगला,धारवाड' असा आहे. पण अण्णांचे वास्तव्य गाण्यात. सकाळी ते तोडी-आसावरीत राहतात. दुपारी सारंगाच्या छायेत असतात. संध्याकाळी पूरिया-मारव्याच्या ओसरीवर येऊन बसतात आणि रात्री यमन-भूप-बागेश्रीच्या महालात असतात".

हे इतके सांगितले तरी भरपूर आहे. तरीही पंडितजी ही काय चीज आहे हे कळण्यासाठी त्यांचे भरपूर गाणे ऐकले पाहिजे आणि त्यांचे हे संपादित चरित्रही प्रत्येकाने जरूर वाचायला हवेय.

आता आपल्याला हे चरित्र वाचावेसे वाटले तर माझ्या चार वेड्यावाकड्या शब्दांना काही अर्थ प्राप्त होईल.

गानयोगी
पं.मल्लिकार्जुन मन्सूर
प्रकाशिका: सौ‌. स्मिता इनामदार
पृथ्वी प्रकाशन,२२,भोसले काँप्लेक्स,
पौड रोड,पुणे: ४११०३८
किंमत:एकशे पंचवीस रुपये

Comments

सुसंवादाचे नियम

लेखी किंवा तोंडी संवाद अधिक प्रभावशाली होण्यासाठी पाळावयाचे जे काही नियम आहेत त्यातला एक प्रमुख म्हणजे "हे मला काही फारसे रंगवून सांगता येणार नाही", "वस्तुतः या विषयावर बोलण्याचा माझा अधिकार नाही", "हे जरासे कंटाळवाणे आहे पण.." अशी नकारात्मक सुरुवात न करणे.केविलवाणा प्रयत्न! चार वेड्यावाकड्या शब्दांना हे कशाला? यातून नम्रता दाखवणे हा उद्देश असेल तर ती अगदीच बेगडी वाटते!
बाकी पुस्तक वाचावेसे वाटू लागले आहे!

सन्जोप राव

खोटी,बेगडी नम्रता वगैरे काही नाही हो!

पण रसग्रहण अथवा समीक्षा करणे हा माझा प्रांत नाही . तरी देखिल आपल्याला आवडलेले इतरांपर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न होता. मी माझ्या बद्दल जे म्हटले आहे ते माझे प्रांजळ मत आहे. खोटा विनय वगैरे त्यात दुरान्वयानेही नाही ह्याची कृपया खात्री बाळगा! मी जर एखाद्या पुस्तकाचे अथवा लेखाचे /कवितेचे रसग्रहण अथवा समीक्षा समर्थपणे करू शकलो असतो तर मी स्वतःला निश्चितच भाग्यवान समजलो असतो. पण मला माझ्या मर्यादा माहित आहेत आणि खर्‍याला खरं म्हणणं हा माझा 'स्व'भाव आहे आणि त्याचा सार्थ अभिमानही आहे(आत्मप्रौढीचा दोष स्वीकारून म्हणतोय).
खरे तर पुलंचा संपूर्ण लेखच मी इथे टंकित करणार होतो;पण विस्तारभयास्तव मी तसे केले नाही आणि त्यातला पहिलाच परिच्छेद इथे उद्घृत केला जेणेकरून ह्या माणसाबद्दल(पंडितजींबद्दल)वाचकानां कुतुहल निर्माण व्हावे जे कदाचित माझ्या लिखाणामुळे होण्याची शक्यता अत्यल्प होती.
असो !माझ्या बाबतीत न्युनगंड अथवा अहंगंड असा कोणताही प्रकार नसून वस्तूथितीची जाणीव असणे असा प्रकार मात्र निश्चितपणे आहे असे म्हणता येईल.आपण पुस्तक वाचावे हीच मुख्य इच्छा! बाकी सर्व सोडून सोडा की राव!

पटले

आपण पुस्तक वाचावे हीच मुख्य इच्छा! बाकी सर्व सोडून सोडा की राव!

प्रमोदजी, तुमच्या सच्चेपणाविषयी शंकाच नाही. मी फक्त लेखनातील एक त्रुटी सांगितली.
आपले वरील वाक्य पटले.
सन्जोप राव

मन्सूरअण्णा! क्या बात है..

क्या बात है प्रमोदशेठ,

खूप छान लिहिलं आहे आपण. मनापासून लिहिलं आहे! आपको हार्दिक बधाई!

मन्सूरअण्णांचं गाणं म्हणजे एक सततचा प्रवाह. मन्सूरअण्णांचं गाणं म्हणजे हरिद्वारच्या गंगेइतकं निर्मळ! स्वच्छ, सुरेल, जीवाला हात घालणारं!

अत्यंत बुद्धिमत्ता असलेलं, अत्यंत सुरेल, आणि लयीवर हुकुमत असलेलं, आणि तेवढंच प्रवाही असं गाणं होतं मन्सूरअण्णांचं! अब मे क्या बोलू अत्त्यानंदसाब आपको, आपनेभी क्या याद दिलाई! साला दिल खुश होऊन गेला!

हा माणूस सूरलयीच्या दुनियेत श्रोत्यांना इतकं खिळवून ठेवायचा की त्याच्या गाण्यामध्ये असलेल्या प्रवाहीपणासोबतच बुद्धीचा भागही किती असायचा याची कल्पना बर्‍याच वेळेला श्रोत्यांना यायची नाही. कारण मन्सूरअण्णा एकदा गाऊ लागले की त्यातल्या प्रवाहीपणाला जराही उसंत नसायची. त्यांच्या गाण्यातला दमसास हा केवळ थक्क करणारा होता. मूळ तालीम ही अष्टांगानी समृद्ध अश्या ग्वाल्हेरची आणि त्यावर तानक्रियेची जादुगरी असलेले जयपूरचे संस्कार! त्यामुळे मन्सूरअण्णा हे एक वेगळंच रसायन होतं!

नटाचे प्रकार, नंद, यमन, खट, तोडीचे प्रकार हे सर्व अगदी मन्सूरअण्णांचे आवडते राग बरं का!

आत्ता आपल्या लेखाला उत्तर देता देता मन्सूरअण्णांचा नटबिहाग ऐकतो आहे. काय गायला आहे! कमाल केली आहे.

मन्सूरअण्णांच्या अखेरीच्या काळातल्या चारसहा मैफली मला ऐकायला मिळाल्या, हे मी माझं भाग्य समजतो!

तात्या.

गानयोगी

माझ्या बाबतीत न्युनगंड अथवा अहंगंड असा कोणताही प्रकार नसून वस्तूथितीची जाणीव असणे असा प्रकार मात्र निश्चितपणे आहे असे म्हणता येईल.आपण पुस्तक वाचावे हीच मुख्य इच्छा! बाकी सर्व सोडून सोडा की राव!

स्वत:शी प्रामाणिक रहाणं आवडलं. परिक्षण /समीक्षा अशा शब्दांच्या भानगडीत न पडता परिचय असा साधा शब्दप्रयोग वापरावा.

(संगीतातल ओ कि ठो न कळणारा प्रकाश घाटपांडे)

 
^ वर