स्पिन डॉक्टर्सची चलती!

(Spin doctor या इंग्रजी शब्दातील नेमका आशय ध्वनित करणारा मराठीत समानार्थी शब्द न सापडल्यामुळे संपूर्ण लेखात इंग्रजी शब्दच वापरला आहे.)
गूगलवर cancer असे टाइप केल्यास सुमारे 61 कोटी रिझल्ट्स आहेत, अशी माहिती मिळेल. कॅन्सरचे विविध प्रकार, कॅन्सरची लक्षणं, कॅन्सरचे निदान, कॅन्सरवरील उपचार (याचबरोबर कर्कराशीची माहिती, कर्क रासवाल्यांचे भविष्य!) इत्यादी सर्व प्रकारच्या विषयांची पानं आपल्याला क्लिक करून उलगडता येईल. आपण त्यातली कुठली पानं वाचावीत, कुठली वाचू नये, हे आपण ठरवू शकतो. परंतु बहुतेक साइटवर या रोगाबद्दल लिहिताना आकडेवारीच्या जंजाळातून आपली सुटका होत नाही. 'तुम्ही अमुक अमुक केल्यास (वा न केल्यास!) अमुक अमुक टक्के कर्करोग होण्याची शक्यता आहे' वा ' चंगळवादी जीवनशैलीमुळे 30 वर्षाखालील तरुण-तरुणींच्या पुफ्फुसाच्या कॅन्सरच्या प्रमाणात 15 टक्क्यानी वाढ झाली आहे.' असले मथळे वाचून काही क्षण जीव घाबरत असतो.

काही वेळा ही आकडेवारी आपल्यासाठी नसून आपल्याला काही होणार नाही असेही वाटत असते. आकडेवारीमुळे येऊ घातलेल्या संकटाची आपल्याला कल्पना येते. नुसते मोघमपणे काही सांगण्यापेक्षा आकडेवारीतून सांगत असल्यास त्या विधानांना अर्थ प्राप्त होतो; त्याच्यामुळे धोक्याची, त्यापासून होणार्‍या दुष्परिणामांची नेमकी कल्पना येते. परंतु या आकडेवारीचा आजकाल फार मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करून घेतला जात आहे.

आपल्यासारख्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन आपला खिसा रिकामा केला जात आहे. अधिकृतपणे अभ्यास करून प्रामाणिकपणे आकडेवारी देत असल्यास त्यातून विषयाच्या गांभीर्‍याची कल्पना येते. जर कुणी आपल्याला भारतात दर दिवशी 2200 अन् वर्षभरात 9-10 लाख लोक तंबाखूचे शिकार होतात, प्रौढामध्ये किमान 35 टक्के स्त्री - पुरुष तंबाखूचे शौकीन आहेत वा दर दिवशी 55000 युवकांमध्ये सिगारेट वा गुटकाजन्य व्यसनाची सुरुवात होत असते असे अभ्यासांती सांगत असल्यास परिस्थिती फार गंभीर आहे व त्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु आमच्या उपचार केंद्रात आलेल्या 100 रुग्णांपैकी 87 रूग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत अशी जाहिरात करणार्‍यांपासून चार हात लांब असलेले बरे असे म्हणावेसे वाटते. हे संख्याशास्त्र किती फसवे आहे याची सर्वसामाऩ्यांना कधीच कळणार नाही. या बोटावरील थुंकी दुसर्‍या बोटावर कशी जाते हे कधीच कळणार नाही. त्यातही आरोग्याच्या संदर्भातील आकडेवारीमुळे नेमके काय चालले आहे तेच कळेनासे झाले आहे.

क्लिनिकल चाचण्या
वैद्यकीय उपचार ही फारच गुंतागुंतीची प्रक्रिया असते.उपचाराच्या प्रांतात चमत्कार घडत नाहीत हे माहित असूनसुद्धा या डॉक्टरचा हातगुण चांगला आहे, अमुक डॉक्टरनी दिलेल्या (ब्रॅंडेड!) औषधीगोळ्या जास्त परिणामकारक आहेत, ही उपचार पद्धती या रोगासाठी फारच चांगली आहे... असे काही बाही बडबडत आपण आपलीच पाठ थोपटून घेत असतो व न कळत मौखिक जाहिरात करत असतो. एखाद्या रोगासाठी अमुक औषध परिणामकारी आहे या विधानाच्या पुष्ट्यर्थ लाखो रुपये खर्च झालेले असतात. अनेक तज्ञांना कित्येक वर्षे अहोरात्र परिश्रम करावे लागतात. क्लिनिकल चाचण्या घ्याव्या लागतात. त्या औषधापासून उपदुष्परिणाम होणार नाहीत याची खात्री करून घ्यावी लागते. सुदीर्घकाळ निरीक्षण करावे लागते. हे सर्व करताना प्रचंड प्रमाणात माहिती गोळा केली जाते. माहितीचे विश्लेषण करून औषधाची परिणामकारकता तपासली जाते. बाहेरच्या स्वतंत्र तज्ञांकडून अनुकूल शिफारशी मिळाल्यानंतरच मोठ्या प्रमाणात बाजारात आणण्यासाठी उत्पादन करण्याची प्रक्रिया सुरु होते. या सर्व क्रियाप्रक्रियामधून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या औषधांनाच डॉक्टर्स prescribe करत असतात. योग्य उपचार व्यवस्थेत कुणीही उठावं, काहीही सुचवावं, कुणालाही काहीही द्यावं असं होत नाही. म्हणूनच ही evidence based उपचार पद्धती जगन्मान्य होत आहे.

क्लिनिकल ट्रायल्सची ही पद्धत 1946मध्ये पहिल्यांदा अधिकृतपणे राबवली गेली. स्ट्रेप्टोमायसिनच्या गोळ्यामुळे क्षयरोग बरा होऊ शकतो या दाव्यातील खरे खोटेपणा पडताळण्यासाठी डॉ. ऑस्टिन ब्रॅडफोर्ड हिल या ब्रिटिश तज्ञाने रुग्णांचे दोन गट निवडले. एका गटाला स्ट्रेप्टोमायसिनच्या खर्‍या गोळ्या व दुसर्‍या गटाला स्ट्रेप्टोमायसिन सदृश खोट्या गोळ्या देवून चाचणी करण्यात आली. अशाच प्रकारच्या कित्येक चाचण्यानंतर या गोळ्या मोठ्या प्रमाणात क्षयरुग्णांसाठी वापरण्यात आल्या. याच प्रकारे डॉ. हिल व डॉ. रिचर्ड डॉल यांनी तंबाखू व घशाचा कर्करोग यांच्यातील अन्योन्य संबंधाबद्दल संशोधन करून संख्याशास्त्रीय दृष्टीने तंबाखू हानिकारक आहे, हे सिद्ध करून दाखविले.

मुळातच आपण जेव्हा क्षय, एड्स, कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावरील वैद्यकीय उपचारांशी संबंधित निर्णय घेत असतो त्यावेळी आपण नको तितके भावनावश होत असतो; ताण तणावातून जात असतो. आपली संस्कृती, आपल्या भावना, रुग्णाशी असलेले आपले नाते, व आपण मानत असलेली जीवनमूल्ये इत्यादी अनेक घटकांच्या आधारावर आपला निर्णय होत असतो. अशा वेळी प्रसार माध्यमातील जाहिरातबाजीला व सादर केलेल्या आकडेवारीला आपण न कळत बळी पडतो व विचारपूर्वक घेतलेल्या पूर्वीच्या निर्णयाबद्दल शंका घेत वेळ व पैशाचे नुकसान करून घेतो आणि रुग्णाचा जीव धोक्यात घालतो. आपल्याला फसवू पाहणारे तथा कथित संशोधक, व स्पिन डॉक्टर्स, कॅन्सरसाठी आशेचे किरण वा कॅन्सरवर शास्त्रशुद्ध उपचार, वा साइड इफेक्ट्स नाही, शस्त्रक्रिया नाही, स्टिरॉइड्स नाही, असे काहीबाही सांगत आपल्याला जाळ्यात ओढून घेतात व काही आकडेवारी अंगावर फेकून आपल्याला फसवतात. त्यामुळे वैद्यकीय संख्याशास्त्रापासून (व या तथाकथित रोगोपचार तज्ञांपासून!) आपले रक्षण कसे करून घ्यावे ही एक फार मोठी समस्या आहे.

टीव्ही बघितल्यामुळे मृत्यु
काही महिन्यापूर्वी एक उत्साही टीव्ही चॅनेल, 8800 टीव्ही वीक्षकांपैकी 284 जण गेल्या दोन वर्षात मृत्युमुखी पडले, त्यामुळे टीव्ही बघणे हे मृत्युला आमंत्रण दिल्यासारखे होईल, अशी ब्रेकिंग न्यूज - अगदी प्राइम टाइम मध्ये - प्रसारित करत होती. ही बातमी दिवसातून 8-10 वेळा तरी पुन:प्रसारित झाली असावी. टीव्हीच्या पडद्यावरील सरकत्या शीर्षक-वाक्यातून काही अर्थबोध होत नव्हता; मुख्य बातमी ऐकतांना मात्र याविषयी जास्त कळले. दिवसातून चार तासापेक्षा जास्त वेळा टीव्हीसमोर बसणार्‍यांच्या मृत्युचे प्रमाण दोन तास व त्याहून कमी वेळ टीव्हीसमोर बसणार्‍यांपेक्षा 46 टक्क्यानी जास्त होते, यावर भर जास्त होता. खरे पाहता 'टीव्हीमुळे मृत्यु - वैज्ञानिकांचा एक सखोल अभ्यास' हा मथळा वाचतानाच आपल्याला धक्का बसलेला असतो. त्यातून ती आकडेवारी... परंतु या आकडेवारीतील चलाखीचा उलगडा सहजासहजी होत नाही. मृत पावलेल्यापैकी किती जणांचे वय 70 -80 च्या दरम्यान होते, मृतांपैकी किती जणांवर औषधोपचार चालू होते, किती जण सशक्त होते, इत्यादी प्रकारची माहिती न देता केवळ मृतांचा आकडा देऊन सामान्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. एक मात्र खरे की चार तास एकाच ठिकाणी टीव्हीवरची नजर न हलवता वेळ घालवत असल्यास या sedentary जीवनशैलीमुळे आपण कुठल्या तरी रोगाचे शिकार होणार हे मात्र नक्की. परंतु टीव्ही बघितल्यावर माणसं मरतात, हे कदाचित अतिशयोक्तीचे विधान ठरेल. यापूर्वी मोबाइल वापराविषयीसुद्धा अशीच आवई उठली होती. उलट सुलट दावे केले. व शेवटी काय झाले हेच कळले नाही.

अशाच प्रकारचे अनेक छोट्या मोठ्या जाहिराती आपल्याला नेहमीच फसवत असतात. पांढरे ऍप्रन घालून संशोधक-डॉक्टरांची नक्कल करत असलेल्या स्पिन डॉक्टर्सच्या 'आमच्या अमुक टॉनिकमध्ये अमुक अमुक टक्के जीवनसत्व आहेत; त्यामुळे तुमच्या पाल्याची उंची वाढते' वा 'आम्ही सांगितलेल्या व्यायाम प्रकार केल्यामुळे अमुक टक्के लोकांचे वजन अमुक टक्क्यानी कमी झाले' अशा प्रकारच्या विधानांच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वर्तन करणे निव्वळ मूर्खपणा ठरू शकेल. कार्य कारण भावाचा संबंध प्रस्थापित करत असताना त्या दोन्हींच्या मधील न भरलेल्या जागांबद्दलही विचार करणे हितावह ठरेल. टीव्ही वा इतर माध्यमावरील जाहिरातीवर भरवसा ठेऊन अमुक टॉनिक घेतल्यामुळे उंची वा स्मरणशक्ती खरोखरच वाढू शकेल का याची शहानिशा करायला हवे. केवळ मानसिक समाधान वा कुणाच्यातरी स्वानुभवाचे विधान यावर पूर्णपणे विसंबून न राहता विधानांची चिकित्सा, स्वीकारार्ह निकष, मोजमाप वा पुरावे आहेत का यांचाही विचार करून आपल्या खिशात हात घालावा. शेवटी जाहिरात करणार्‍यांना आपला माल खपवायचा आहे व त्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून कुठलेही विधीनिषेध न बाळगता काहीही सांगण्याच्या तयारीत ते असतात. परंतु आपण आपली बुद्धी गहाण न ठेवता अशा विधानांची सत्यासत्यता तपासून पाऊल उचलायला हवे.

स्पिन डॉक्टर्सच्या आकड्यांची चलाखी
80 टक्के महिलांच्या मते अमुक शांपू वापरल्यामुळे केस नितळ व कांतीयुक्त होतात.... अशा प्रकारच्या जाहिराती बघण्याची आपल्याला सवय जडलेली आहे. व मॉलमध्ये गेल्यावर आपण नेमकी तीच वस्तू विकत घेतो. परंतु ही 80 टक्के संख्या कुठून आली हे शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही. पाचपैकी चार महिलांचे हे म्हणणे आहे की हजारपैकी आठशे महिलांचा हा अनुभव आहे की दहा हजार पैकी आठ हजार महिलांचे हे मत आहे, याचा आपल्याला थांगपत्ता लागत नाही. पाच - दहा महिलांचे हे मत असल्यास त्या सर्व त्याच कंपनीत काम करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापैकी दोघी -तिघींचे केस पहिल्यापासून कांतियुक्त असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सामान्यपणे वैद्यकीय उपचारातील टक्केवारीचे आकडे देत असताना किती रुग्णांवर त्या उपचाराचा परिणाम झाला आहे हे महत्वाचे ठरते, टक्केवारी नव्हे. दहापैकी 6 रोग्यांना गुण आला हे नक्कीच आशादायक आहे. परंतु 500 पैकी 300 रुग्ण या उपचारामुळे पूर्ण बरे झाले हे विधान कदाचित अतिशयोक्तीचे ठरू शकेल. त्यामुळे क्लिनिकल ट्रायल्समध्ये sample sizeमहत्वाचे ठरते.

प्राण्यांच्यावरील प्राथमिक चाचणीनंतर काही चाचण्या randomised controlled trials (RCT) च्या निकषाप्रमाणे करायला हवेत. RCT चे निकष प्रमाणीकृत मोजमापाप्रमाणे असल्यामुळे औषधं वा उपचार विश्वासार्ह ठरतात. याचप्रमाणे निरुपयोगी औषधं / उपचार योगायोगामुळे रुग्णांना बरे करत असल्यास त्याचाही शोध औषधं / उपचार बाजारात येण्यापूर्वीच घ्यायला हवे. काही वेळा 20 चाचण्यापैकी 1-2 चाचण्या औषधं / उपचार निरुपयोगी असूनसुद्धा गुणकारक ठरतात. त्यामुळे जितके जास्त वेळा, जास्त ठिकाणी, जास्त वेगवेगळे वयोगट, जास्त वंशगट, यामधून चाचण्या होऊन परिणामकारकतेची खात्री होईल, तितकी औषधं / उपचार यांची विश्वासार्हता वाढत जाईल.

पुढच्या वेळी हातात रिमोट धरून चॅनेल्स सर्फिंग करत असताना शांपूची वा तत्सम जाहिरात आल्यास खालील प्रश्नांची उत्तर शोधण्यचे प्रयत्न करायला हवेत: किती जणांनी याची चाचणी घेतली? RCT च्या निकषाप्रमाणे चाचण्या झाल्यात का? स्वतंत्रपणे या चाचण्यांची विश्वासार्हता सिद्ध झाली आहे का?

सरकारी आकड्यांचा घोळ
आरोग्याशी संबंधित प्रशासकीय व्यवस्थेतील बाबूंना स्वत:च्या कर्तृत्वाचे ढोल वाजवण्याची वाईट खोड असते व ते नेहमीच आपली आकडेवारी इतरांशी तुलना करत आपली पाठ थोपटून घेत असतात. गडचिरोलीसारख्या मागासलेल्या जिल्ह्यात कुपोषणामुळे बालमृत्युचे प्रमाण वाढत आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत असूनसुद्धा प्रशासन ते कधीच मान्य करणार नाही. बालमृत्युच्या वाढीच्या दरात घट वा यापूर्वीच्या काही वर्षांच्या तुलनेने आज कमी या पुष्ट्यर्थ काही टक्केवारी तोंडावर फेकून आपल्याला गप्प बसवतात. मुळात एवढ्या सोई सुविधा, संपर्क माध्यमांची रेलचेल, वाहन सुविधा, अत्याधुनिक औषधांची उपलब्धता इत्यादी गोष्टी असूनसुद्धा बालमृत्युचे प्रमाण शून्याच्या जवळपास का येत नाही, याचे समर्पक उत्तर प्रशासनांकडून कधीच मिळणार नाही. तरीसुद्धा आत्म परीक्षणास त्यांच्यापैकी कुणीच, कधीच तयार होत नाहीत.

मुळातच प्रशासनाकडे टक्केवारीसाठी लागणारा अद्यावत डेटाच नसतो. कुठले तरी दहा - बारा वर्षापूर्वीच्या आकड्यांची, बेरीज - वजाबाकी - सरासरी यांची चलाखी करून टक्केवारी काढलेले असतात. त्यांना अपेक्षित असलेल्या टक्केवारीला धक्का देणारी आकडे असल्यास त्या बिनधास्त वगळल्या जातात. अशा प्रकारे सामान्यांची दिशाभूल करतच प्रशासनाचा गाडा हाकलला जात असतो. व हे सर्व कुठल्यातरी स्पिन डॉक्टरच्या देखरेखीखाली घडत असते.

रोगोपचाराचे आकलन
खालील विधानांपैकी कुठल्या विधानामुळे आपल्याला जास्त काळजी वाटू लागते, हे सांगू शकाल का?
दरवर्षी भारतात शंभरपैकी 25 जण कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात,
वा
दरवर्षी भारतात हजारपैकी 250 जण कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात.
कदाचित हा प्रश्न काहींना बालिश वाटेल. कारण दोन्ही विधानातील मृत्युचे प्रमाण 25 टक्के, हे स्पष्ट आहे. परंतु अशा प्रकारच्या तुलनेतून धोक्याची कल्पना येत नसली तरी रोगोपचाराच्या आकलनासाठी ती आवश्यक ठरते. आरोग्यविषयक टक्केवारीसाठी जितकी मोठी संख्या तितका जास्त धोका. 10000 लोकांपैकी 1300 जण कॅन्सरने मरतात, हे विधान 100 पैकी 25 जण मरतात या विधानापेक्षा - दुसर्‍या विधानातील टक्केवारी (25) पहिल्या पेक्षा दुप्पट असूनसुद्धा (13) - जास्त धोकादायक ठरते. एखाद्या कॅन्सरच्या प्रकारामुळे रोज 100 जण मृत्युमुखी पडतात, हे विधान दरवर्षी 36500 जण मरतात, हे विधान अनेकांना कमी धोकादायक वाटेल. त्यामुळे आपण धोक्याची व्याख्या करताना सर्व आकडेवारी एकाच पातळीवर आणणे इष्ट ठरेल. कारण स्पिन डॉक्टर्स अशाच प्रकारचे loop holes शोधत आपल्याला गंडवत असतात.

काही आचरट दावे
कॅन्सर होवू नये यासाठी आपल्याला नेमके काय करायला हवे, हा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर पटकन सांगणे कठिण होईल. कारण स्पिन डॉक्टर्संना प्रत्येक गोष्टीत कॅन्सरची बीजं आढळतात. फार गरम चहापीत असला तरी कॅन्सर, फार थंड असला तरी कॅन्सर, दिवसातून दोन वेळा घेतलं तरी कॅन्सर, चार वेळा घेतलं तरी कॅन्सर, द्राक्षाच रस घेतल तरी कॅन्सर, नाही घेतल तरी कॅन्सर... अमुक अमुक घेतल्यामुळे थ्रोट कॅन्सरचा धोका 8 पटीने वाढतो, द्राक्षाचा रस घेतल्यामुळे 40 -45 वयोगटातील महिलामध्ये ब्रेस्ट कॅन्सर वाढण्याचा धोका, ....रोज तुम्ही चिकन सँडविच खात असल्यास आतड्याच्या (bowel) कॅन्सरचा धोका 20 टक्क्यानी वाढतो...

अशा प्रकारच्या विधानातील सत्यासत्यता कळण्यास आपल्याकडे कुठलेही निकष नाहीत. त्यामुळे आपण गोंधळून जातो. कारण अशा आकडेवारीमधून धोक्याची सापेक्षता व्यक्त होत असते, वस्तुनिष्ठता नाही. प्रत्यक्ष धोका आहे की नाही हे शेवटपर्यंत कळत नाही. खरे पाहता कुठल्याही सामान्य माणसाला बॉवेल कॅन्सरची शक्यता 5 % असते. जर सॅंडविच खाल्ल्यामुळे धोक्यात 20 % वाढ म्हणजे 5 % ऐवजी 6 % शक्यता असे म्हणू शकतो. त्यामुळे ही वाढ नगण्य ठरेल. परंतु स्पिन डॉक्टर्स मात्र 20 टक्के वाढीचाच मुद्दा पुढे करून दिशाभूल करू पाहतात.

वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित मंडळीप्रमाणे माध्यमाशी संबंधित असलेलेसुद्धा आकडेवारीशी चलाखी करतात. औषध/ उपचार यांची भलावण करत असताना नेहमीच तुलनात्मक आकडेवारीवर भर देतात. व दुष्परिणामाबद्दल विधान करताना वस्तुनिष्ठ धोक्याचा आधार घेतात. आतड्याच्या (bowel) कॅन्सरग्रस्तांसाठी हॉर्मोन आरोपण उपचाराची भलावण करताना बॉवेल कॅन्सरचे प्रमाण 50 टक्के कमी होत आहे, असा दावा केला जातो. परंतु अशा रुग्णांच्य़ात प्रती हजारी 6 रुग्णांना वक्षस्थळाचा रोग होऊ शकतो हे सोइस्करपणे विसरले जाते. कारण त्यांच्या दृष्टीने ही संख्या फक्त 0.6% असते. बॉवेल कॅन्सर होण्याच्या प्रमाणाचे वस्तुनिष्ठ आकडे उपलब्ध नसल्यामुळे त्या गोंधळाचा असा फायदा घेतला जातो. सामान्यपणे 5 टक्के असलेला धोका 2.5 % पर्यंत येतो, यावरच जास्त भर दिला जातो.

एकदा आपल्याला आकड्यांची मखलाशी कळू लागल्यास आपण नेमके काय करायला हवे हे कळू शकेल. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. म्हणूनच प्रत्येक विधानाची चिकित्सा, त्याबद्दलचा सारासार विचार व विचारांती कृती यांना पर्याय नाही!

संदर्भ: New Scientist, 17 फेब्रुवरी 2011

Comments

लेख आवडला

नानावटी साहेब आपला लेख आवडला. स्वतःच्या शरीराचा स्वतःच अभ्यास केला तर एक sixth sense येतो. त्या प्रमाणे सुज्ञानी स्वतःला झेपेल व रुचेल असे जगावे, खावे व रहावे. असे वाटते.

सांख्यिकीशी तोंडओळख सर्वांनाच हवी

खरे आहे. सांख्यिकीशी तोंडओळख सर्वांनाच हवी. म्हणजे नुसते आकडे बघणे नव्हे, तर आकड्यांचे तात्पर्य आकळणे.

सुरेख!!

लेख खूप आवडला. हाफ नॉलेज इज डेंजरस या म्हणीची आठवण करून देणारा सुरेख लेख. पुलेशु. आपले सर्वच लेख मला आवडतात.

तिबेटी औषधे

थोडा मोकळा वेळ होता म्हणून वाचायला घेतले आणि नानावटींचा लेख आणि तिबेटी औषधांवरील हा लेख दोन्ही लागोपाठ वाचले. :-)

असो. वरील लेख आवडला हे.वे.सां. न.

माहितीपूर्ण लेख.

माहितीपूर्ण लेख.

पण, असल्या माहितींवर विसंबून निर्णय घेणारी माणसे आणि त्रास-निर्मुलनासाठी मांत्रिकाकडे जाणारी माणसे सारखीच.

 
^ वर