आधुनिकोत्तर कोणास म्हणावे?

आजकाल जालावर वावरतांना आधुनिकोत्तरवाद (पोस्ट मॉडर्निजम) या संकल्पनेविषयी काहीबाही वाचायला मिळते. मला या संकल्पनेविषयी फारशी माहिती नाही. विकिपिडियावरील माहिती चांगली आहे पण फारसे समजले नाही. उपक्रमावरील सुजाण व व्यासंगी वाचकच याबाबत मार्गदर्शन करू शकतील.

तर मला पडलेले प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत:
१. आधुनिकोत्तरवाद म्हणजे काय?
२. आधुनिकोत्तरवादी लेखक कोणास म्हणावे? मराठीत अशा लेखनाची काही उदाहरणे आहेत का?
३. साहित्यात इतरही संकल्पना आहेत. उदा. देशीवाद, आधुनिकवाद वगैरे यांच्या काँटेक्स्टमध्ये आधुनिकोत्तरवाद कोठे बसतो?

धन्यवाद.

लेखनविषय: दुवे:

Comments

व्याख्या

वस्तुनिष्ठ सत्य आणि जागतिक सांस्कृतिक वर्णन किंवा अधि-वर्णन यांनी लक्षणीय ठरलेल्या समकालीन संस्कृतीला नाकारण्याची वृत्ती म्हणजे आधुनिकोत्तरवाद होय. आधुनिकोत्तरवाद भाषेची भुमिका, शक्तिसंबंध आणि प्रेरणा यांना अधोरेखित करतो. विशेषत: स्त्री विरुद्ध पुरुष, समलिंगी विरुद्ध भिन्नलिंगी, काळे विरुद्ध गोरे आणि साम्राज्यवादी विरुद्ध वसाहतीतले अशा तीव्र वर्गीकरणास आधुनिकोत्तरवाद विरोध दर्शवितो. वाङ्मयीन समीक्षा, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, स्थापत्यकला, दृष्य कला आणि संगीत यांसारख्या सांस्कृतिक क्षेत्रांत आधुनिकोत्तरवादाचा प्रभाव दिसून येतो.

...
पळवाट: वरील परिच्छेद विकिपिडियावरून जितका शब्दशः करता येईल तितका अनुवादीत करण्याचा प्रयत्न केला आहे. हाच परिच्छेद मूळ इंग्रजीत माझ्या खरडवहीत स्वागताचा मजकूर म्हणून डकवला आहे. कृपया तो वाचून खरडवहीतून अनुवादात बदल सूचवावेत.

धन्यवाद

या चर्चेची मर्यादीत व्याप्ती लक्षात घेऊन चर्चा केल्याबद्दल उपक्रमींचे आभार. चितातूर जंतू यांच्या माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल त्यांचे विशेष आभार. हा विषय मोठा आहे आणि एका चर्चेतून सर्व मुद्दे समोर येणे अशक्य आहे. तरीही माझ्याप्रमाणेच काही उपक्रमींना या चर्चेमुळे त्यांचे आधुनिकोत्तरवादाचे आकलन सुधारल्याचे जाणवले असावे, अशी आशा व्यक्त करतो. मी या प्रतिसादात बदल करणे थांबवत आहे. मात्र इतरत्र चर्चेत भाग घेत राहीन.

_____________
विखंडितपणा: व्यवच्छेदक लक्षण? (शनि, 12/04/2010 - 03:30)

विखंडितपणा हे आधुनिकोत्तरवादाचे व्यवच्छेदक लक्षण आहे का? असा प्रश्न नंदन विचारतात. या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही पण तरीही माझ्या आकलनाप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंतच्या चर्चेवरून व अन्य स्रोतांतून कळलेल्या माहितीवरून या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक असावे असे वाटते. लेखकाची वर्णनशैली विखंडित (fractured) असू शकेल, लेखकाच्या अनुभवविश्वामुळे विखंडितपणा निर्माण होत असेल पण सर्व वाचकांना निखंडितपणा निर्विवादपणे जाणवतो का? याचे उत्तर नाही असे असावे. पिंचॉनची 'मेसन अँड डिक्सन' ही कादंबरी वाचून घटनांच्या अनेक कथनातून इतिहास ठरतो, स्वतंत्र इतिहास असे काहीच नसते, असे मला वाटले. कादंबरीत रेव्हरंड चेरिकोक हे पात्र निरनिराळ्या श्रोत्यांसमोर निरनिराळया पद्धतीने मेसन आणि डिक्सन यांची कथा सांगतो. त्यामुळे वाचकाला विखंडन जाणवतेच. पण पिंचॉनने या कादंबरीचे खर्डे प्रत्यक्ष प्रकाशनापुर्वी कितीतरी वेळा नजरेखालून घातले असावेत तसेच त्याच्या संपादकानेही अनेक खर्डे वाचले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान त्या दोघा वाचकांसाठी वाचनानुभव म्हणून विखंडन संपुष्टात आले असावे, असे वाटते. दुसरा मुद्दा म्हणजे विखंडित वर्णनतंत्राचा अभाव असतांनाही एखादे लेखन आधुनिकोत्तर ठरवले जाते. दोनेक वर्षांपुर्वी वाचलेली 'मेमरीज ऑफ माय मेलन्कली होअर्स' ही मार्किझची लघुकादंबरी मला आधुनिकोत्तरी वाटते. नव्वदी उलटलेला म्हातारा आणि एक कुमारिका यांच्यातल्या सबंधांविषयी या कादंबरीतील घटना घडतात. प्रस्थापित नैतिक चौकटीला छेद जातो तो नायकाच्या न-नैतिकतेमुळे. पण म्हातारा खरंच अन-नैतिक आहे का? तर याचे उत्तर निश्चितपणे मिळत नाही. मोबदल्याशिवाय कुठल्याही स्त्रीशी संग न करणार्‍या नायकाला कुमारिकेत त्याच्या पूर्वानुभवांतली क्षण जगल्याचे जाणवते की एका नवा-ताजा अनुभव हे सर्व अनिश्चित आहे. तिच्याविषयी नायकाच्या मनातही संदिग्धता आहे आणि वाचकाच्या मनातही. या सर्व अनिश्चिततेत विखंडन नाही पण निश्चितताही नाही म्हणून मला ही लघुकादंबरी आधुनिकोत्तर वाटते.

केवळ दुसर्‍या महायुद्धाआधी लिहिली गेलेली (१९२९) म्हणून ती पोस्ट-मॉडर्निस्ट न ठरता मॉडर्निस्ट ठरते, अशी काळाप्रमाणे विभागणी आहे का?

काळाप्रमाणे विभागणी आहे की नाही हे निश्चितपणे माहीत नाही पण ढोबळमानाने असावी. बर्‍याचदा आधुनिक आणि आधुनिकोत्तर लेखनात वर्णनतंत्रांचे साम्य आढळते. मी 'द साऊंड अँड द फ्युरी' वाचलेली नाही, फक्त विकिपानावरून असे वाटते की केवळ युद्धपूर्व म्हणून तिला आधुनिक ठरवले गेले नसावे. विकिपानावरच्या खाली दिलेल्या मजकुरावरून तरी असे वाटले.

The last line is, perhaps, the most meaningful; Faulkner said in his speech upon being awarded the Nobel Prize in Literature that people must write about things that come from the heart, "universal truths". Otherwise they signify nothing.

पळवाट: आधुनिकोत्तरवाद म्हणजे काय? याविषयीचा संदिग्धपणा, चाचपडणे हे माझ्यासाठी अजुनही कमी झालेले नाही. तेव्हा या प्रतिसादातील मते पूर्णपणे चुकीची असू शकतील.

________________________
विखंडितपणा-स्ट्रिम ऑफ कॉन्शसनेस (शुक्र, 12/03/2010 - 14:59)

चिंजंनी विखंडितपणाच्या अर्थावर येथे अधिक प्रकाश टाकला आहे. संहितेतील 'बेभरवशाचा निवेदक', पात्रांचे भास या प्रकाराची उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत. हा मुद्दा थोडासा धम्मकलाडू यांच्या 'स्ट्रिम ऑफ कॉन्शसनेस'शी सबंधित असावा असे वाटते. जाणीवांचा प्रवाह (स्ट्रिम ऑफ कॉन्शसनेस) हे वर्णनाचे एक तंत्र असावे. आधुनिक, आधुनिकोत्तर व इतर सांस्कृतिक चळवळींमध्येही या तंत्राचा वापर आढळतो. केरुऑकची 'ऑन द रोड' किंवा जॉइसची 'युलिसिस' दोन्हीतही हे तंत्र सामर्थ्याने हाताळल्याचे दिसते. तेव्हा एकच कलाकृती जाणीवांचा प्रवाह आणि आधुनिकोत्तर या दोन्हींचे उदाहरण म्हणून सांगता येते. नुकत्याच वाचलेल्या 'खेकसत म्हणणे आय लव यु' या शाम मनोहरांच्या कादंबरीत अनेक पात्रांचे जाणीव प्रवाह आहेत आणि ते विखंडीतही आहेत.

पळवाट: प्रतिसाद आकलन (पुढे सुरू)
_________________

प्रतिसाद आकलन (शुक्र, 12/03/2010 - 02:33)

आत्तापर्यंतच्या चर्चेत आस्वाद-अनुभवावर, अर्थ निर्णयनावर* काही मुद्दे समोर आले आहेत. हे मुद्दे मला तरी आधुनिकोत्तर म्हणजे काय? या चर्चेशी संलग्न वाटले.

१. 'समकालीन जगण्यात असलेला विखंडितपणासुध्दा अर्थांचे पदर निर्माण करू शकतो.'
२.निर्मिती प्रक्रियेवर जरी लेखकाचे नियंत्रण असले तरी वाचकाचा आस्वाद-अनुभव व निर्मिती प्रक्रिया यांचा संबंध वाचकाच्या निर्मितीप्रकियेतेविषयी असलेल्या कुतूहलापर्यंतच मर्यादीत आहे.
३.अर्थनिर्णयन व्यक्तिगत तसेच व्यक्तिसापेक्ष आहे. परंतु अनेक वाचक, लेखक यांचे अर्थनिर्णयन सारखे असणे अशक्य नाही.

रिकामटेकडा यांचा आक्षेप काहीसा असा असावा: आस्वाद अनुभवाचे आकलन/विश्लेषण जर समजा वाचक करू शकत नसेल किंवा वाचकाचा आस्वाद-अनुभव असंबद्धतेबाहेर पडू शकत नसेल तर किमानपक्षी हा आस्वाद अनुभव सुसंबद्ध करता येण्याइतपत तरी आस्वाद-अनुभवाची व्यक्तिसापेक्षता निरर्थक ठरते. चिंजंच्या मताप्रमाणे असंबद्धता हाच आस्वाद अनुभव असल्याने त्याला सुसंबद्ध करण्याची काही गरज नाही कारण अमुक वाचकासाठी सुसंबद्ध असा अर्थच नसू शकेल.

धनंजय यांचा उपप्रतिसाद मला पूर्ण समजलेला नाही. 'कोहेनच्या उदाहरणात फॅशन शोला उपस्थित मंडळीही संहितेचा भाग आहे. अशी उदाहरणे ऐतिहासिक कलाकृतीतही दाखवता येतात. त्यामुळे कोहेनचे उदाहरण संयुक्तिक नाही' असे काहीसे मला समजले आहे.

*या शब्दाबद्दल पुष्कर जोशी यांचे आभार.

पळवाट: माझे आकलन चुकीचे असण्याची शक्यता मोठी आहे.
________________________
चर्चेची व्याप्ती: धडा पहिला (गुरू, 12/02/2010 - 18:03)

या चर्चेची व्याप्ती आधुनिकोत्तरवाद म्हणजे काय हे समजून घेणे आहे. अनेक उपक्रमींना या संकल्पनेविषयी, विचारप्रवाहाविषयी समग्र माहिती असणे शक्य आहे. पण माझ्यासारखे काही उपक्रमी याविषयी चाचपडत आहेत हेही उघड आहे. ज्यांना या वादाविषयी माहिती आहे, समज आहे परंतु या प्रवाहाबद्दल आक्षेप आहेत ते हा या चर्चेत अवांतर नाहीत. परंतु त्यावरील चर्चेत अधिकांना सगभागी होता यावे म्हणून हा आधुनिकोत्तरवादावर पहिला धडा समजावा. दुसर्‍या चर्चाविषयात आधुनिकोत्तरवादावरचे आक्षेप-प्रवाद यावर समरसून चर्चा करता येईल. खालच्या वर्गात न्युटचे नियम शिकणार्‍या वर्गात पुंजभौतिकीय आक्षेप आल्यास वर्गातील मुले गोंधळात पडतील. माझ्यासारख्या खालच्या वर्गातल्या मुलांना शिकू द्यावे, अशी सर्व उपक्रमींना विनंती. आधुनिकोत्तरवादाविषयी इतर भाषिय उदाहरणेही चालतील पण शक्य तितपत उपक्रमींनी आधुनिकोत्तरवादाबद्दल मराठीतील उदाहरणे द्यावीत.

"अधुना" या शब्दाचा अर्थ
धनंजय यांनी समजावून सांगून रावलेंच्या शंकेला उत्तर दिलेच आहे. विवाहीत विरुद्ध अविवाहीत, बायको विरुद्ध नवरा अशा वर्गीकरणासही आधुनिकोत्तर नाकारतील असे वाटते.

पळवाट: प्रतिसाद-उपप्रतिसाद समजावून घेत आहे.

______________

चिंजंच्या प्रतिसादामुळे वर दिलेली व्याख्या मला थोडीफार उमगू लागली आहे. चिंजंनी प्रतिसादांतून यावर प्रकाश टाकत रहावा ही विनंती.

पळवाट: उपक्रमावर साहित्य-कला विषयांवरील चर्चांमध्ये संज्ञा व व्याख्या फारच गोंधळ निर्माण करतात. विज्ञानाप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातील मेथॉडोलॉजींचे संकलन उपक्रमावर असावे हाच माफक उद्देश या चर्चेमागे आहे. माझे अज्ञान दूर करणे हा स्वार्थ अर्थातच आहे.

वाचनोत्सुक!

वाचनोत्सुक!

बिपिन कार्यकर्ते

थोडक्यात...

विषय खूप मोठा आहे आणि त्याविषयी विविध मतभेद आणि प्रवादही आहेत. काळानुसारही संकल्पनेत बदल झाले आहेत. तरीही थोडक्यात मांडणी करतो. नंतर लागेल तसं अधिक तपशीलात जाता येईल.

अस्मिता किंवा ओळख (identity) हा मनुष्याच्या आयुष्यात एक महत्त्वाचा धागा आहे आणि प्रत्येकाची ओळख बहुआयामी असते असं मानणारा विचार याचा एक महत्त्वाचा भाग आहे. उदा: मी एखादी गोष्ट म्हणतो (किंवा वाङमय प्रसवतो) ते पुरुष म्हणून, मराठी म्हणून, पुणेकर म्हणून, भारतीय म्हणून की उच्चवर्णीय म्हणून हे विचारात घेतल्यानं कदाचित माझ्या म्हणण्याचे संदर्भ आणि अर्थ बदलू शकतात. पण मी केवळ वाङमय प्रसवणाराच नाही तर आस्वादकही असू शकतो. त्यामुळे आस्वादकानुसारही अर्थ बदलतो.

समकालीन जगण्यात असलेला विखंडितपणासुध्दा अर्थांचे पदर निर्माण करू शकतो. यात एक खोडसाळ खटयाळ खेळकरपणाही येतो. शब्दांचे खेळ, अर्थांचे खेळ ‘गांभीर्याने’ करत-करत पुष्कळ काही म्हटलं जाऊ शकतं (उदा: वेटिंग फॉर गोदो).

अभ्यासक्रमात लावलेलं इरावती कर्वेंचं ‘Kinship Organization in India‘ वाचता वाचता कंटाळले होते. किक्याचा एक SMS काय आला आणि अचानक FC वरच्या CCDत कट्टा ठरला. मग मी माझ्या लो-कट Levi'sच्या आत पप्पांनी यु.एस. वरून आणलेली Calvin Klein ची पर्पल पँटी घालू की माझी नेहमीची रेड या विचारात गुंतले. शेवटी रात्री मॅकची पार्टी आहे त्याला पर्पल घालू म्हणून रेड घालून निघाले. बाहेर पडताना आई म्हणाली अगं अंघोळ केल्यावर काही न खाता बाहेर पडू नये. जरा साखर टाक तोंडात. मी म्हटलं मग साखर नको, मला थोडा 'जोशी स्वीट्स'मधला करदंट दे. आमची आई म्हणजे पण नं सदाशिवपेठी आहे नुसती. तर सांगत काय होते, आमचा कट्टा...

यातली गंमत आणि विखंडितपणा लक्षात आला का?

अर्थांचे हे (आणि असे इतर) आयाम एकाच सत्यापेक्षा अनेक सत्यं अस्तित्वात असल्याचा दावा करतात. उदा: साहित्यकृतींच्या बाबतीत त्यामुळे अनेक अर्थ निघणं आणि त्यामुळे नक्की काय म्हणायचं आहे याविषयी संभ्रम निर्माण होणं वगैरे घडतं. जर सत्य सापेक्ष आहे आणि त्यामुळे कलाकृतीचा अर्थ सापेक्ष असेल तर everything is a text and the text is everything या तर्कानं एकुणात मानवजातीनं प्रसवलेलं सगळं काही सापेक्षच आहे असं त्यामुळे होऊ लागतं.

हे अर्थात भल्याभल्यांना भंजाळून टाकतं! त्यामुळे मराठी साहित्य आणि समीक्षा त्याच्या जरा लांबच असते. पण श्याम मनोहर आणि मकरंद साठे ही आधुनिकोत्तर साहित्यात आत्ताची ठळक नावं म्हणून सांगता येतील. हिंदीतून मराठीत आलेले उदय प्रकाश यांच्याकडेही बोट दाखवता येईल. विलास सारंग आणि कोलटकर आधीचे म्हणून सांगता येतील.

नक्की काय घडतं आहे ते स्पष्ट असेल, पात्रांच्या विचार-वर्तनावरून त्यांचा मूल्यात्मक आलेख सुस्पष्टतेनं मांडता येत असेल तर ते वाङमय आधुनिकोत्तर नाही असं खुशाल समजावं.

इतर संकल्पनांमध्ये हे कुठे बसतं हे फार गुंतागुंतीचं आहे. कारण सीमारेषा धूसर आहेत आणि व्याख्याही धूसर आहेत. (अंतिम सत्य काही नाही ना!)

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

समजले नाही

अभ्यासक्रमात लावलेलं इरावती कर्वेंचं ‘Kinship Organization in India‘ वाचता वाचता कंटाळले होते. किक्याचा एक SMS काय आला आणि अचानक FC वरच्या CCDत कट्टा ठरला. मग मी माझ्या लो-कट Levi'sच्या आत पप्पांनी यु.एस. वरून आणलेली Calvin Klein ची पर्पल पँटी घालू की माझी नेहमीची रेड या विचारात गुंतले. शेवटी रात्री मॅकची पार्टी आहे त्याला पर्पल घालू म्हणून रेड घालून निघाले. बाहेर पडताना आई म्हणाली अगं अंघोळ केल्यावर काही न खाता बाहेर पडू नये. जरा साखर टाक तोंडात. मी म्हटलं मग साखर नको, मला थोडा 'जोशी स्वीट्स'मधला करदंट दे. आमची आई म्हणजे पण नं सदाशिवपेठी आहे नुसती. तर सांगत काय होते, आमचा कट्टा...

यातली गंमत आणि विखंडितपणा लक्षात आला का?

अर्थांचे हे (आणि असे इतर) आयाम एकाच सत्यापेक्षा अनेक सत्यं अस्तित्वात असल्याचा दावा करतात.

गंमत लक्षात आली नाही. विखंडितपणा म्हणजे काय तेही कळले नाही. अनेक सत्ये कोणती तेही समजले नाही. "लोकांना अर्थ समजणार नाही असे लेखन" म्हणजेच आधुनिकोत्तर का रे भाऊ?

असंबध्दता

"लोकांना अर्थ समजणार नाही असे लेखन" म्हणजेच आधुनिकोत्तर का रे भाऊ?

गंमत लक्षात आली नसेल तर उत्तर 'होय' असेच समजावे. कारण अंतिम सत्य काही नाही; आस्वादक अर्थ ठरवतो. तुमच्या मते हे असंबध्द आहे. तुम्ही आस्वादक आहात. विषय संपला.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या

म्हणजे आस्वाद घेण्यात दिग्दर्शन/मदत इ. काही शक्य नसते काय? एखाद्या व्यक्तीला विनोद समजला नाही तर तो उलगडून सांगणे साधारणतः कोणालाच आवडत नाही. परंतु, कुणी स्वतःची विनोद समजून घेण्यातील दुर्बलता व्यक्त केली तर विनोद उलगडून देणे शक्य असतेच ना? "अंतिम सत्य काही नाही" असे म्हटले की "माल स्वतःच्या जवाबदारीवर विकत घ्यावा, 'ऍज इज, वेअरेवर इट इज' तत्त्वावर माल विकल्यावर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही" असे सांगितल्यासारखे वाटते.
"लेखनात गंमत आहे" असा तुमचा दावा होता की "गंमत लाईज इन द ब्रेन ऑफ द रीडर"? "यात गंमत आहे, तुम्हाला लक्षात आली का?" हा प्रश्न आहे की "यातून तुम्हाला गंमत वाटली का?" हा प्रश्न आहे?

अगदी बरोबर

"अंतिम सत्य काही नाही" असे म्हटले की "माल स्वतःच्या जवाबदारीवर विकत घ्यावा, ऍज इज-वेअरेवर इट इज तत्त्वावर माल विकल्यावर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही" असे सांगितल्यासारखे वाटते.

आधुनिकोत्तर साहित्य तसे करते खरे. यापायी पुष्कळांना त्रास होतो किंवा त्याचा राग येतो हेही खरे. म्हणून अनेकजण त्या फंदात न पडणे पसंत करतात. पण काहींना त्यात मजा येते हेही खरे.

"लेखनात गंमत आहे" असा तुमचा दावा होता की "गंमत लाईज इन द ब्रेन ऑफ द रीडर"? "यात गंमत आहे, तुम्हाला लक्षात आली का?" हा प्रश्न आहे की "यातून तुम्हाला गंमत वाटली का?" हा प्रश्न आहे?

'गंमत आहे' असा मी दावा केला तरीही अंतिम सत्य आधीच अमान्य केले असल्याने तो दावा निरर्थक ठरेल. शेवटी संहिता प्रसवणारा (लेखक) सुसंबध्द आहे हे गृहितकच गळून पडू शकते. आता या दाव्यांच्या अमान्य करण्यात काही (असंबध्द) गंमत वाटली का? नसेल तर अजून एक उदाहरण :-)

साशा बॅरन कोहेन यांचा एक दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमअंश पाहिला होता. एका फॅशन शोनंतर काही उपस्थितांच्या मुलाखती घेतलेल्या त्यात दाखवल्या होत्या. (दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकाला प्रत्यक्ष फॅशन शो दाखवला नव्हता; फक्त मुलाखती दाखवल्या होत्या.) मुलाखतकर्ता शोविषयीच्या एका विशिष्ट मुद्द्यावर एक प्रश्न विचारत होता (बहुधा 'शोमधील जहाजांच्या थीमविषयी काय वाटले?' असा तो प्रश्न होता). काहींच्या मुलाखतींतून असे सूचित होत होते की शोमध्ये जहाजांची थीम वापरून सध्याच्या समाजाविषयी किंवा जीवनाविषयी खूप गहन टिप्पणी केलेली आहे - म्हणजे उदा: आपण सगळेच कसे दूर-जवळ जाणारी जहाजे असतो; किनारा मिळेल न मिळेल कोण जाणे, वगैरे आनंद बक्षी स्टाईल. फॅशन शोच्या कर्तीला (म्हणजे संहिता प्रसवणारीला) याविषयी विचारले असता ती म्हणाली की माझ्या शोमध्ये जहाजांची थीमच नव्हती.

यात गंमत वाटली का?

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

होय

'गंमत आहे' असा मी दावा केला तरीही अंतिम सत्य आधीच अमान्य केले असल्याने तो दावा निरर्थक ठरेल. शेवटी संहिता प्रसवणारा (लेखक) सुसंबध्द आहे हे गृहितकच गळून पडू शकते. आता या दाव्यांच्या अमान्य करण्यात काही (असंबध्द) गंमत वाटली का?

संदर्भ समजला नाही, "आता या दाव्यांच्या अमान्य करण्यात काही (असंबध्द) गंमत वाटली का?" हा प्रश्न नेमका कोणकोणत्या दाव्यांविषयी आहे तेच समजले नाही.

साशा बॅरन कोहेन यांचा एक दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमअंश पाहिला होता. एका फॅशन शोनंतर काही उपस्थितांच्या मुलाखती घेतलेल्या त्यात दाखवल्या होत्या. (दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकाला प्रत्यक्ष फॅशन शो दाखवला नव्हता; फक्त मुलाखती दाखवल्या होत्या.) मुलाखतकर्ता शोविषयीच्या एका विशिष्ट मुद्द्यावर एक प्रश्न विचारत होता (बहुधा 'शोमधील जहाजांच्या थीमविषयी काय वाटले?' असा तो प्रश्न होता). काहींच्या मुलाखतींतून असे सूचित होत होते की शोमध्ये जहाजांची थीम वापरून सध्याच्या समाजाविषयी किंवा जीवनाविषयी खूप गहन टिप्पणी केलेली आहे - म्हणजे उदा: आपण सगळेच कसे दूर-जवळ जाणारी जहाजे असतो; किनारा मिळेल न मिळेल कोण जाणे, वगैरे आनंद बक्षी स्टाईल. फॅशन शोच्या कर्तीला (म्हणजे संहिता प्रसवणारीला) याविषयी विचारले असता ती म्हणाली की माझ्या शोमध्ये जहाजांची थीमच नव्हती.

यात गंमत वाटली का?

होय, गंमत वाटली. परंतु ही मेटाकलाकृती आहे ना? "गंमत वाटविणे" हा कोहेन या मेटासंहिता प्रसवित्याचा उद्देशच आहे ना! मूळ संहिताकर्तीची कलाकृती काय होती याविषयी उपस्थितांची फसवणूक करण्यात तो यशस्वी झाला असे म्हणता येईल ना?
--------
बोरात या विडंबनपटामुळे मला कोहेन माहिती होता. विडंबन करताना विपर्यास आणि विसंगत्योद्घाटन असे दोन्ही प्रकार त्यात आहेत. त्यातही गंमत वाटली होती.

साशा बॅरन कोहेनचा फॅशन शो

होय, गंमत वाटली. परंतु ही मेटाकलाकृती आहे ना? "गंमत वाटविणे" हा कोहेन या मेटासंहिता प्रसवित्याचा उद्देशच आहे ना! मूळ संहिताकर्तीची कलाकृती काय होती याविषयी उपस्थितांची फसवणूक करण्यात तो यशस्वी झाला असे म्हणता येईल ना?

उत्तम प्रगती आहे (गंमत वाटली म्हणता आहात म्हणून ;-)).

कोहेननं उपस्थितांची फसवणूक केली असं म्हणत आहात. पण कोहेननं फॅशन् शो आपल्या प्रेक्षकांना दाखवला नव्हता. मग त्यात जहाजाची थीम होती की नव्हती ते ठामपणे सांगता येईल का? नव्हती असं ठामपणे म्हणणारी एक व्यक्ती दिसली - फॅशन शोची कर्ती. होती असं इतरांचं म्हणणं पडलं. संहिता प्रसवणार्‍याला देव मानलं तर जहाजाची थीम नव्हती असं म्हणावं लागेल. पण वर म्हटल्याप्रमाणे अंतिम सत्य नाही असं मानलं तर? "संहिता प्रसवणारा (लेखक) सुसंबध्द आहे हे गृहितकच गळून पडू शकते." असं वर वाक्य आहे. बहुमताचं मानलं तर लेखक (फॅशन शोची कर्ती) असंबध्द बोलते आहे असं म्हणता येईल का? मग कोहेनचा प्रेक्षक (लेखकाला देव मानणार्‍या जुनाट भ्रमांना बळी पडल्यामुळे) फसला असं म्हणता येईल का? आता गंमत वाटते आहे का? :-)

कोहेनचा उतारा अधिक सोपा जाईल म्हणून दिला होता. आता 'ब्रँडेड बेबी' प्रश्नावलीकडे वळायला तयारी झाली असे समजा.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

मयसभा/अभिज्ञानशाकुंतल/मॉक्युमेंटरी

- - -
चर्चाप्रस्तावकाच्या विनंतीला मान देऊन हा उपधागा वेगळा काढावा.
- - -

एखादी वस्तू रसिकाने न-बघितलेली असते, पण त्या वस्तूबद्दल कल्पित पात्रांचे झालेले गैरसमज हाच कथाविषय असणे, हे काही नवीन नाही.

कीर्तनकार (किंवा आपले आजी आजोबा) महाभारतातील मयसभेची कथा सांगतात, असा अनुभव आपणापैकी खूप जणांना असेल. मयसभेच्या स्थापत्यशास्त्राबद्दल आपल्याला तांत्रिक माहिती कीर्तनकार/आजी देत नाही. एक-लाख श्लोकांच्या महाभारतात तरी कितपत माहिती आहे, कोणास ठाऊक. मात्र पाणी दिसते तिथे फरशी होती, घट्ट जमीन दिसली तिथे पाणी होते, अशी कौरवांची फसवणूक झाली - ते कौरवांचे अनुभव कीर्तनकार छान रंगवून सांगतो. इथे तुम्ही म्हणाल "पण मयसभा ही दगडा-विटा-पाण्याची होती ते अबाधित सत्य होते ना?"

मग अभिज्ञानशाकुतंलातल्या संघर्षबिंदूचे उदाहरण बघू. गरोदर शकुंतला दुष्यंताच्या दरबारात जाते. दुष्यंत शकुंतलेला विसरलेला असतो. या घटनेबद्दल दुष्यंताचे स्पष्टीकरण, शकुंतलेचे स्पष्टीकरण, आणि गौतमी (शकुंतलेबरोबर आलेली पोक्त बाई) हिचे स्पष्टीकरण कालिदास (किंवा रंगपटावरील संघ) आपल्याला देतो. प्रत्येकांचे स्पष्टीकरण वेगवेगळे असते :

दुष्यंत : शकुंतला ही एक लबाड व्यभिचारिणी आहे
शकुंतला : दुष्यंत पोरीबाळींशी मौजमजा करून नामानिराळा राहाणारा आहे
गौतली : दुष्यंत लबाड आहे, आणि शकुंतला भोळसट आहे

म्हणजे "खरे" काय आहे, त्यावेगळी पात्रांची परस्परविरोधी मते रसिक समजून घेतो, याची परंपरा प्रदीर्घ आहे. रसिक "वरची तीन्ही मते चुकलेली आहेत, दुर्वासाच्या शाप तितका खरा आहे" वगैरे मानतो. पण "दुष्यंत लबाड आहे, शकुंतला व्यभिचारिणी आहे किंवा भोळसट आहे" याबाबत दुर्वासाच्या शापात काहीच तपशील नाहीत.

तरी तुम्ही म्हणाल, कालिदासाने दुर्वासाचे पात्र निर्माण करून "निरपवाद सत्य" असे सांगितलेलेच आहे. त्यामुळे बाकीच्या पात्रांची झालेली फसवणून ती प्रेक्षका-वाचकाची कधीच होत नाही. मला काही हे पटत नाही - कालिदासाने निर्माण केलेला शापही तितकाच कल्पित आहे. पण ठीक...

शोधल्यास असा कुठला शाप नसून "संशयकल्लोळ" चितारलेल्या कलाकृतींची उदाहरणे देता येतील. आणि यातील वेगवेगळ्या पात्रांचे विसंगत विचार म्हणजे अर्धवट-बरोबर-समज आहेत, की पुरते-गैर-समज आहेत, हे मुळीच स्पष्ट नसते. जेन ऑस्टनच्या "प्राइड अँड प्रेज्युडिस" कादंबरीचे उदाहरण घेऊया. नायकाबद्दल नायिकेचा सुरुवातीला समज होतो की तो गर्विष्ठ आणि अहंमन्य आहे. तिला वाटतो तितका तो गर्विष्ठ नसतो, पण तरी थोडा गर्विष्ठ असतोच असे वाचकाला जाणवते. मग नायिकेचे सुरुवातीला डार्सीबद्दल दिलेले मत खरे की खोटे? नायकाचे स्वतःबद्दल मत असते की त्याचे वागणे सुयोग्य आणि माणुसकीचे असते. नायकाचेही खरे नाही काय? (समांतर : फॅशन शो च्या कर्तीचे फॅशन शोबद्दल मत खरे नाही काय?)

मी वरील सर्व उदाहरणे मुद्दामूनच प्राचीन किंवा अनेक शतकांपूर्वीच्या कृतींची देत आहे, हे लक्षात आलेच असेल.

आता २०व्या शतकात. साशा बॅरन कोहेनपेक्षा थोडी वेगळी पद्धत "मॉक्युमेंटरी" = माहितीपटाचे विडंबन. या कलाप्रकारात माहिर असा ख्रिस्तोफर गेस्ट आहे. त्याचे चित्रपट म्हणा, किंवा माँटी पायथनची बीबीसी-माहितीपटांची विडंबने म्हणा, यांच्यात "सत्य" म्हणजे पूर्ण कल्पितच असते.

साशा बॅरन कोहेन अशी मजा करतो, की चित्रण करताना काही लोकांना सांगत नाही की काय चालू आहे. पण तो ज्या रूपांत लोकांच्या समोर जातो ती रूपे पुरती कल्पित असतात (अली जी हा "हिपहॉपवाला", बोराट हा मध्यआशियाई गावंढळ बुवा, ब्रुनो हा उथळ कलाशून्य आणि गर्विष्ठ समलिंगी डिझायनर). असे असता त्याची चित्रणे बरीचशी कल्पिताकडेच झुकतात. माझ्या मते साशा बॅरन कोहेन जरी चित्रणे "उघड्यावर", सर्व पात्रांना स्क्रिप्ट न-देता करत असला, तरी त्याच्यापाशी स्क्रिप्टचा सांगाडा असतोच. म्हणून त्याच्या चित्रकृती मॉक्युमेंटरी कलाप्रकाराचाच उपप्रकार मानल्या पाहिजेत.
- - -
कलेच्या बाबतीत पोस्टमॉडर्न विचारसरणी मला काहीशी पटते. (माध्यम हासुद्धा संदेश, वगैरे.) परंतु बराचसा अतिरेक वाटतो. (माध्यम हाच संदेश, म्हणतात ते.) संदेश decode करायला सांस्कृतिक संदर्भ लागतात, हेसुद्धा मला पटते. पण सांस्कृतिक संदर्भावरून काय वाटेल तो अर्थ लावता येतो, अर्थांना मर्यादाच नाहीत, हे काही पटत नाही. वाटेल तो अर्थ घ्यायचा तर इजिप्शियन चित्रलिपीचा अर्थ लावण्यासाठी रोझेटा शिलालेख उगाच वापरला म्हणावे लागेल.

फरक

संहिता प्रसवणार्‍याला देव मानलं तर जहाजाची थीम नव्हती असं म्हणावं लागेल. पण वर म्हटल्याप्रमाणे अंतिम सत्य नाही असं मानलं तर?

माझा समज झाला की "अंतिम सत्य नसू शकते" हे विधान सिद्ध करण्यासाठी तुम्ही उदाहरण देत आहात. "अंतिम सत्य नाही" हे गृहीतक असेल तर त्यामुळे कलाकृतीतून 'कमी माहिती'च मिळेल (गार्बेज इन गार्बेज आऊट). त्यापेक्षा असे म्हणता येईल की एका कलाकृतीऐवजी अनेक असंबद्ध कलाकृती दिलेल्या आहेत आणि प्रत्येकीचे स्वत:चे एक 'सत्य' आहे. "सत्यच नाही" असे का म्हणावे?

"संहिता प्रसवणारा (लेखक) सुसंबध्द आहे हे गृहितकच गळून पडू शकते." असं वर वाक्य आहे. बहुमताचं मानलं तर लेखक (फॅशन शोची कर्ती) असंबध्द बोलते आहे असं म्हणता येईल का? मग कोहेनचा प्रेक्षक (लेखकाला देव मानणार्‍या जुनाट भ्रमांना बळी पडल्यामुळे) फसला असं म्हणता येईल का?

"कोहेन कोणत्या प्रकारचा माणूस आहे?" (उपस्थितांना अनेकदा फसवितो, इ.) हा पूर्वग्रह बाजूला ठेवला तरीही, "शोमधील जहाजांच्या थीमविषयी काय वाटले?" हा सूचक प्रश्न आहे. असे प्रश्न विचारले गेल्यास साक्षीदार चकू शकतात हे ज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे ("त्यामुळेच" असे आवश्यक नाही, "फॅशन शो बघायला जाणारे काय अकलेचे असतील?", "आनंद बक्षी टाईप उत्तरे देणारे अविश्वासार्ह" इ. पूर्वग्रह आहेतच ;) ), 'एक संहिताकर्ती विरुद्ध उपस्थित बहुसंख्य' या सामन्यात संहिताकर्तीच्या बाजूनेच नल हायपोथेसिस बनवावा ना?

स्ट्रीम ऑफ़ कॉन्शसनेस

समकालीन जगण्यात असलेला विखंडितपणासुध्दा अर्थांचे पदर निर्माण करू शकतो. यात एक खोडसाळ खटयाळ खेळकरपणाही येतो. शब्दांचे खेळ, अर्थांचे खेळ ‘गांभीर्याने’ करत-करत पुष्कळ काही म्हटलं जाऊ शकतं (उदा: वेटिंग फॉर गोदो).

बेकेटचे 'वेटिंग फॉर गोदो' हे लिटररी मिनिमलिझमचे उदाहरण आहे असे वाटते. अर्थांचे पदर निर्माण करण्यात इथे वाचकाची भूमिका महत्त्वाची ठरते असे वाटते. हे नाटक आमच्या महाविद्यालयातल्या काही हुशार मित्रांनी केले होते. वेटिंग फॉर गोदो करतो आहे असे ते सांगायचे ;) काहीतरी भारी करतो आहे असेच तेव्हा त्यांना वाटायचे आणि मलाही . त्यातले संवाद मला त्यावेळी घुमाफिराके वोही बात छाप वाटले होते.

अभ्यासक्रमात लावलेलं इरावती कर्वेंचं ‘Kinship Organization in India‘ वाचता वाचता कंटाळले होते. किक्याचा एक SMS काय आला आणि अचानक FC वरच्या CCDत कट्टा ठरला. मग मी माझ्या लो-कट Levi'sच्या आत पप्पांनी यु.एस. वरून आणलेली Calvin Klein ची पर्पल पँटी घालू की माझी नेहमीची रेड या विचारात गुंतले. शेवटी रात्री मॅकची पार्टी आहे त्याला पर्पल घालू म्हणून रेड घालून निघाले. बाहेर पडताना आई म्हणाली अगं अंघोळ केल्यावर काही न खाता बाहेर पडू नये. जरा साखर टाक तोंडात. मी म्हटलं मग साखर नको, मला थोडा 'जोशी स्वीट्स'मधला करदंट दे. आमची आई म्हणजे पण नं सदाशिवपेठी आहे नुसती. तर सांगत काय होते, आमचा कट्टा...

यातली गंमत आणि विखंडितपणा लक्षात आला का?

हे बहुधा स्ट्रीम ऑफ़ कॉन्शसनेसचे उदाहरण आहे असे वाटते. जेम्ज़ जॉइसने त्याच्या यूलसीज़ ह्या कादंबरीत ह्या तंत्राला परिपूर्णत आली असे मानले जाते. (मी ही कंटाळवाणी कादंबरी वाचण्याचा कोणे एके काळी मनापासून प्रयत्न केला आहे.)

नक्की काय घडतं आहे ते स्पष्ट असेल, पात्रांच्या विचार-वर्तनावरून त्यांचा मूल्यात्मक आलेख सुस्पष्टतेनं मांडता येत असेल तर ते वाङमय आधुनिकोत्तर नाही असं खुशाल समजावं.

फारच छान. ही व्याख्या सुस्पष्ट आहे ;)

शेवटी चूभूद्याघ्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

'स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस'

हे बहुधा स्ट्रीम ऑफ़ कॉन्शसनेसचे उदाहरण आहे असे वाटते.

असं म्हणता येईल. असंबध्द वाटणारे विचार नकळत एकेक दुवा घेऊन पुढे सरकू शकतात. ते दुवे पुढे हरवल्यामुळे विचार असंबध्द वाटू शकतात. ते दुवे शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. शैक्षणिक पठडीतून या उतार्‍याविषयी (उदाहरणार्थ) असे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.

वरील उतार्‍यात किती ब्रँडेड गुड्सचा उल्लेख आहे?
"इरावती कर्वेंचं ‘Kinship Organization in India‘" हा उल्लेख ब्रँडेड गुड्समध्ये येईल का? स्पष्टीकरण द्या.
'यु.एस्.' हा उल्लेख ब्रँडेड गुड्समध्ये येईल का? आणि सदाशिव पेठ? स्पष्टीकरण द्या.
वरील उतार्‍यात किती Kinshipsचा उल्लेख आहे?
Kinship व्यक्तींशी असते की ब्रँडेड गुड्सशी की दोन्हींशी? विस्तार करा.
उतार्‍यातील प्रथमपुरुषी निवेदकाच्या Kinshipsविषयी उतारा वाचून तुम्हाला काय कळले हे वरील विस्ताराच्या आधारे स्पष्ट करा.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

रिप्रिव्ह

यावरून सार्त्र यांची रिप्रिव्ह ही कादंबरी आठवली. यात त्यांनी एक अभिनव प्रयोग केला आहे. कथा दुसर्‍या महायुद्धावर आहे आणि चार-पाच उपकथानकांचा यात समावेश आहे. साधारणपणे कादंबरीत अशा वेळी एका उपकथानकाला एक प्रकरण किंवा एका प्रकरणातील एक भाग दिला जातो. सार्त्र यांनी एकेक वाक्य एका उपकथानकाला दिले आहे. म्हणजे वाक्य पहिले - उपकथानक पहिले, वाक्य दुसरे - उपकथानक दुसरे, वाक्य तिसरे - उपकथानक तिसरे. सुरूवातीला भंजाळून जायला होते पण नंतर संगती लागत जाते. महायुद्धाच्या एका विशाल कॅनव्हासवर छोटी आयुष्ये, अडचणी कशा भरडल्या जातात हे दाखवण्याचा एक अप्रतिम आविष्कार.

--
अनुदिनी : मै और मेरे पाहुणे..
http://rbk137.blogspot.com/

ह्यॅ!

काहीही नियम सापडला की त्यानुसार अर्थ लावता येईल. अर्थ लावणे किती अवघड उरते ते सरावानुसार बदलू शकेल. या प्रयोगाला आधुनिकोत्तर का म्हणावे?

मी

मी या प्रकाराला आधुनिकोत्तर म्हटलेले नाही. स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेसवरून हे आठवले म्हणून दिले इतकेच.

--
अनुदिनी : मै और मेरे पाहुणे..
http://rbk137.blogspot.com/

ना समझे वो अ....!

आरागॉर्न ह्यांनी जे म्हटलय तेच मलाही म्हणावेसे वाटते.
अधून म्हणजे आत्ता, आत्ता ह्या क्शणाचा अनुभव घ्यायचा असेल तर वेगाचा अनुभव घेता यायला हवा. इथे वेगाचे आकलन होण्यासाठी बुद्धीच्या आकलन पटावर वेगाने एकामागून एक भिन्न- भिन्न, वेगवेगळ्या घटना किंवा विचार आकलन करता-करता आदळू लागल्या कि त्या विखंडीतपणातून एक वेगळेच चित्र, विचार मनचक्शूंपूढे येवू शकते.

उदा.
स्थिर चित्र : कोलाज
साधारण पुस्तकरूपातील चल चित्र : ऍक्शन प्लिकर
महाकाव्य : महाभारत, रामायण
अगदी सोपे उदाहरण: माझा एक लेख ''कॅलिडोस्कोप भाशेचा''

लाडूचा एक कण जरी खल्ला तरी लाडू गोड आहे की नाही हे जसे सांगता येते. अगदी तसेच पण उलटे, म्हणजे आधी खूप मोठे व किचकट कथानक पहा/वाचा/ऐका मग त्यानंतर त्यातून एक साधे,सोपे व सुक्श्म सत्य गवसेल आणि ते असेल/असू शकेल 'काळाच्या (घड्याळातील नव्हे!) वेगाचे व त्यातून काळाच्या चालीचे आकलन'.

अजून एक उदाहरण...

याक्षणी उपक्रमावर 'चर्चेचे प्रस्ताव' मध्ये हे दिसते आहे:

'पिंडदानाचे वेळी कावळ्याचे महत्व'
'आधुनिकोत्तर कोणास म्हणावे?'
'नीकोन कुलपीक्स एल ११० बद्दल आधीक जाणुन घ्यायचे आहे...'
'अनिल अवचट : एक न आवडणं'
'मध्यमवर्ग'
'विकी लिक्स विरूद्ध अमेरिकन सरकारः तुम्ही कोणत्या बाजुला?'
(थोडं खाली गेलं की 'राखी का इन्साफ' सुध्दा दिसत आहे).
हेही एक आधुनिकोत्तर 'टेक्स्ट' (संहिता) म्हणून पाहता येईल. एकविसाव्या शतकातल्या सुजाण, सुशिक्षित, संगणकसाक्षर, माध्यमसंपृक्त मराठीजनांच्या असणार्‍या विविध ओळखीच त्यातून प्रतिबिंबित होत आहेत असं मांडता येईल.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

यादी

"एकविसाव्या शतकातल्या सुजाण, सुशिक्षित, संगणकसाक्षर, माध्यमसंपृक्त मराठीजनांच्या असणार्‍या विविध ओळखींना" "एक आधुनिकोत्तर 'टेक्स्ट' (संहिता)" का म्हणावे? ही एक यादी आहे, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एकत्र आलेल्या, एकविसाव्या शतकातल्या सुजाण, सुशिक्षित, संगणकसाक्षर, माध्यमसंपृक्त मराठीजनांच्या एका गटात, एका विशिष्ट कालखंडात सुचविले गेलेले असंबद्ध विषय यापलिकडे त्यातून काही सापडावे अशी अपेक्षाच का करावी?

'अधुन' म्हणजे काय?

आजकाल जालावर वावरतांना आधुनिकोत्तरवाद (पोस्ट मॉडर्निजम) या संकल्पनेविषयी काहीबाही वाचायला मिळते.
तुम्ही ह्या संकल्पनेविशयी कुठे वाचले? काय वाचले? लिंक मिळेल कां? कारण मी अजूनपर्यंत नाही वाचले.

'आधुनिक होणे' म्हणजे मला तरी 'आधुनिक झालेल्यांनी आधुनिक नसलेल्यांना हिणवणं' असेच वाटत होते. अन् मी देखील 'लग्नाआधी' तसेच वागत होतो. लग्नानंतर माझ्या बायकोच्या सहवासातून आता माझी आधुनिकतेविशयीची मते नकळत बदलत आहेत. म्हणून असे म्हटले.

'आधुनिकोत्तरवाद' हा शब्द खूपच मोठा व जड आहे.

'अधून-मधून' ह्या शब्दात 'मधून' म्हणजे काय? हे माहित आहे. पण 'अधून' म्हणजे काय?
'अधुन' म्हणजे काय हे कळले कि आधुनिक म्हणजे काय हे सांगता येईल. आधुनिक म्हणजे काय हे कळले कि आधुनिकोत्तर म्हणजे काय ते सांगता येईल. मग आधुनिकोत्तर म्हणजे काय हे कळले कि तुमच्या प्रश्नाचे उत्तर सांगता येईल.

"अधुना" :-)

व्युत्पत्तीचे मूळ "अधून" नाही, तर "अधुना" आहे.
"अधुना" या संस्कृत शब्दाचा मराठी अर्थ "आता"

"आधुनिक" म्हणजे "आताचे"
१८५०-१९५० काळातल्या लोकांनी त्यांच्या काळातल्या चालू विचारसरणीला आणि कलाशैलींना "आताच्या" म्हणून घेतले. गंमत म्हणजे त्यापूर्वीचे अभिजन आपले विचार नवीन असले तरी "आताचे" म्हणून सांगत नसत तर "शाश्वत" म्हणूनच सांगत असत. जुन्यापासून फारकत अभिमानाने सांगायची पद्धत त्या मानाने काही थोडी शतकेच चालू असल्यामुळे त्या काळातल्या लोकांचा (आपल्यासारखा) "आताचे" शब्दाच्या मूळ-अर्थाशी गोंधळ होत नव्हता.

"आताचे" हा शब्द १८५०-१९५० काळातल्या लोकांनी बळकावल्यानंतर त्यापुढच्या लोकांनी काय करावे? त्यांनी "१८५०-१९५०चे-लोक-आताचे-म्हणतात-त्याच्या-नंतरचे" असा शब्दप्रयोग सुरू केला. थोडक्यात "आताचेच्या-नंतर" =
= धुना-इक-उत्तर = धुनिक-उत्तर = आधुनिकोत्तर (मराठी-संस्कृत व्याकरणाप्रमाणे)
= modern<-post = postmodern (इंग्रजी व्याकरणाप्रमाणे)

अधून, आधुनिक, आधुनिकता बसं एवढेच! ह्याच्या 'पुढे' काही नाही.

व्युत्पत्तीचे मूळ "अधून" नाही, तर "अधुना" आहे.
"अधुना" या संस्कृत शब्दाचा मराठी अर्थ "आता"

माहितीबद्दल आभारी आहे.
'अधुन' म्हणजे 'आत्ता' हे कळले.

पण 'आत्ता' म्हणजे काय?

"आताचे" हा शब्द १८५०-१९५० काळातल्या लोकांनी बळकावल्यानंतर त्यापुढच्या लोकांनी काय करावे? त्यांनी "१८५०-१९५०चे-लोक-आताचे-म्हणतात-त्याच्या-नंतरचे" असा शब्दप्रयोग सुरू केला. थोडक्यात "आताचेच्या-नंतर" =
= अधुना-इक-उत्तर = आधुनिक-उत्तर = आधुनिकोत्तर (मराठी-संस्कृत व्याकरणाप्रमाणे)
= modern<-post = postmodern (इंग्रजी व्याकरणाप्रमाणे)
'या विशया संबंधित असे जे' असे जेंव्हा म्हणायचे असते तेंव्हा एक साचा(सूत्र) वापरला जातो ज्या साच्यात मूळ शब्द घालून करंजी, मोदकासारखे नवे शब्दरूप आकारले जाते. साचा कोणता आहे ते जाणून नवीन शब्दरूपाचा अर्थ आपल्याला जाणत येतो.
उदा.:
पहिला वर्ण - शेवटचा वर्ण - साच्यानुसार वर्ण
(अ असेल तर आ, उ असेल तर औ, इ असेल तर ए )- ई चा स्वर क्शरा(व्यंजना) मध्ये मिसळणे - साच्यानुसार वर्ण
उदार्णार्थ:-
साचा एक: <>
'भुगोल' <या विशया संबंधित असे ते >'भौगोलिक'
'अधुन' <या विशया संबंधित असे ते >'आधुनिक'
साचा दोन:<>
'वंदन' <या शब्दाच्या अर्थाच्या वापराजोगे असे ते> 'वंदनीय'
'स्मरण' <या शब्दाच्या अर्थाच्या वापराजोगे असे ते> 'स्मरणीय'

चर्चा प्रस्तावकाने चर्चेसाठी विशय मांडताना जी 'विकिपीडीयामधील' व्याख्येचे जे अनुवादीत रूप मांडलेले आहे, त्या नुसार आपण मांडलेले वर मत मिळते जुळते नाही. तुम्ही जे मत मांडलेले आहे त्यानुसार 'आत्ता' च्या विशया संबंधित असे जे आहे ते 'आधुनिक' होत नाही.

*'आत्ता' म्हणजे काळाच्या (वेळेचा नाही) घटना घडण्याचा हा एक क्शण! घटना घडली कि त्या घटना घडण्यातून जे (समुद्राच्या लाटांसारखे, वा भुकंपासारखे जे) ट्रीमर निघतात ते ट्रिमर पुन्हा नव-नव्या घटना घडवत जातात. हे ट्रीमर मानवी, पशू, प्राणी वनस्पती या सर्वांच्या आयुश्यावर परिणाम करीत जातात. ह्या घटना घडण्याच्या त्या क्शणाला 'आत्ता' किंवा 'अधून' म्हणता येईल. 'अधुन-मधून' हा शब्द काळाचा (इथे वेळेचा, दिवसाचा, महिन्यांचा म्हणता येईल) एक टाईमस्पॅन म्हणून अर्थासाठी घेता येईल.
आधुनिक: नव-नव्या घटना घडणार्‍या 'त्या क्शणाच्या' काळातील सगळ्यात जवळच्या टाईमस्पॅन संदर्भाबाबत असे ते.

उदा,:=
आधुनिक तंत्रद्न्यान= नव-नव्या घटना घडणार्‍या 'त्या क्शणाच्या' काळातील सगळ्यात जवळच्या टाईमस्पॅन मध्ये सध्याचे तंत्रद्न्यान
साचा तीन:<>
अधून<या शब्दाच्या अर्थाचा गाभा ज्यात दडला आहे असे ते>आधुनिकता
प्रथम <या शब्दाच्या अर्थाचा गाभा ज्यात दडला आहे असे ते>प्राथमिकता

माझा निश्कर्श:
या विचार साखळी नुसार 'आधुनिकोत्तर' हा शब्द मुळ शब्दाच्या गुणधर्मानुसार 'प्रवाही' नसून 'जडत्ववादी' आहे व म्हणून तो चूकीचा आहे. पुढे काय घडणार आहे. हे आपण कसे सांगणार? फक्त कयास करू शकतो. ते कयासपूर्ण लिखाण, विचार 'चिंतातूर जंतू' नावाचे सदस्य ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे विखंडीतपणाचे असू शकते. काळ पुढे सरकला की त्या लिखाणातील, विचारातील धूसर भाग, दूर होत जावून स्पश्ट होत जाईल. पण जेंव्हा तसे होईल तेव्हा ते आधुनिक लिखाण नसणार कारण ते आत्ताचे नसणार. तेंव्हा 'आत्ताचे'* लिखाण वेगळे असणार.

आधुनिकोत्तर सतीश रावले

सतीश रावले यांचे प्रतिसाद मला आधुनिकोत्तर शैलीतील वाटतात.

अचूक निरीक्षण

सतीश रावले यांचे प्रतिसाद मला आधुनिकोत्तर शैलीतील वाटतात.
अचूक निरीक्षण. हजार टक्के सहमत. सतीश रावले ह्यांच्या लेखनाच्या अनुषंगानेही चर्चा व्हायला हवी. त्यांचे प्रतिसाद महत्त्वाचे आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

डहाक्यांची कविता आणि रावल्यांचा प्रतिसाद

रावल्यांचा प्रतिसाद वाचून वसंत आबाजी डहाके यांच्या 'वाक्य' या कवितेच्या काही ओळी आठवल्या.

सगळी सनातन सत्यं
म्हणजे उडवाउडवी ठरली.
सगळे कानांत प्राण आणून
मनोभावानं ऐकणारे
पंखांची अस्वस्थ फडफड करीत राहिले
जागच्या जागी;
नंतर तेही
अज्ञातवासात गेले.
वर्तमानकाळाची चित्रलिपी
उलगडता आली नाही
कुणालाही;
सगळेच ठरले निरक्षर आणि ठोंबे
यातनेच्या पिळवटीसारख्या
लिखावटीसमोर.

पळवाटः आठवणीतून (चूभूद्याघ्या.) पुस्तक समोर नाही.

उद्बोधक

उद्बोधक चर्चा. मला बरीच नवी माहिती जंतुरावांमुळे मिळाली. या चर्चेबद्दल प्रस्तावकर्त्याचे आभार मानावेत असे वाटते. हा पोष्ट् मॉडर्निझम् म्हणजे "नेति नेति शब्द न ये अनुमाना" या न्यायाने दत्तसंप्रदायाचा भाग वाटतो आहे ! (हघ्या !)

उत्तर आधुनिकता

याच संदर्भात " लेखकाचा मृत्यू "(लेखकाचे साहित्यव्यवहारातील उच्चस्थान नष्ट होणे , आस्वादक म्हणून वाचकाचे साहित्यव्यवहारातील महत्त्व वाढणे , निश्चीत अर्थनिर्णयनाच्या अभावी सर्जनशीलतेभोवतीचे गूढत्वाचे वलय पुसले जाणे. उदा . शाम मनोहरांच्या बहुतेक 'खूप लोक आहेत' मध्ये निवेदक लेखक मरतो) आणि "संहितांचा परस्परसंबंध"(संहिता या पूर्णांशाने स्वतंत्र नसून त्या एकमेकांशी निगडीत असतात , कोणतीही संहिता ही अनेक संहितांच्या जाळ्यातली एक अशीच अस्तित्वात असते, तिचे अर्थनिर्णयन या परस्परसंदर्भातच केले जावू शकते) या संकल्पना ही वाचल्याचे आठवते.
कोणी विस्ताराने समजावेल काय ?

रिऍलिटी शो

दूरदर्शनवर सुरू असलेल्या रेऍलिटी शोजसंदर्भात 'लेखकाचा मृत्यू' ही संकल्पना वापरता येईल का? असा विचार करतोय.

धन्यवाद

चर्चा उत्तम, बरीच माहिती मिळाली. धन्यवाद. आता कुठे "वेटिंग फॉर गोडो(ट)" किवा "अंधाराच्या लेकी"(ते ह्या प्रकारात मोडते कि नाही हे माहित नाही) ह्या नावावरून आत काय असेल ह्याचा अंदाज बांधता येईल. तसेच लहान मुले जे काही बोलतात त्यास देखील आधुनिकोत्तर म्हणता येऊ शकते, कारण आधुनिकोत्तर हि संकल्पना सादर-करत्यावर कमी आणि अस्वादकावर अधिक अवलंबून आहे असे दिसते.

अवांतर -
पण आधुनिकोत्तर हे काही नाव असू शकत नाही, केवळ नाव सुचले नाही म्हणून हे ठेवले असे वाटते. आता ह्या आधुनिकोत्तर संकल्पनेनंतर काहीच निघणार नाही का? जर अजून दुसरी अशी काही संकल्पना निघाली तर तिला काय आधुनिकोत्तर-त्तर असे म्हणणार?

का यांना प्रतिसाद

का यांच्या या प्रतिसादात वारंवार बदल केला जात असल्याचे दिसते. चर्चेचे सूत्रसंचालन/सारांश यासाठी तो प्रतिसाद राखीव आहे असे वाटते म्हणून शंका येथे विचारतो आहे.

'समकालीन जगण्यात असलेला विखंडितपणासुध्दा अर्थांचे पदर निर्माण करू शकतो.'

विखंडितपणा म्हणजे काय ते समजलेले नाही.

रिकामटेकडा यांचा आक्षेप काहीसा असा असावा: आस्वाद अनुभवाचे आकलन/विश्लेषण जर समजा वाचक करू शकत नसेल किंवा वाचकाचा आस्वाद-अनुभव असंबद्धतेबाहेर पडू शकत नसेल तर किमानपक्षी हा आस्वाद अनुभव सुसंबद्ध करता येण्याइतपत तरी आस्वाद-अनुभवाची व्यक्तिसापेक्षता निरर्थक ठरते.

सारांश मला समजला असेल तर सहमत आहे.

चिंजंच्या मताप्रमाणे असंबद्धता हाच आस्वाद अनुभव असल्याने त्याला सुसंबद्ध करण्याची काही गरज नाही कारण अमुक वाचकासाठी सुसंबद्ध असा अर्थच नसू शकेल.

"अमुक वाचकासाठी सुसंबद्ध असा अर्थच नसू शकेल" याचे उदाहरण मी शोधतो आहे. "मला चित्रातून अमुक अर्थ लागला" हे रंगांधळ्यांना समजावून देणेही शक्य नाही, असा काही दावा आहे काय? उदाहरणार्थ,

"या चित्रात मला 49 दिसतच नाहीत" असे रंगांधळ्यांनी म्हणणे हे व्यक्तिसापेक्षतेचे उदाहरण आहे काय? भुकेल्याला ढगांत अन्नसदृष आकृती दिसणे, असे दुसरे उदाहरण मला सुचते. तिसरे उदाहरणः

अन्यथा, "अर्थ नाही" हाच मेटाअर्थ 'सांगण्याचा' संहिताकर्त्याचा उद्देश असेल तर ऍबसर्डिटी हाच मेटाअर्थ सर्वांना लागेल आणि त्यातून गंमत वाटेल हे मान्य आहे. एक उदाहरणः

--------

धनंजय यांचा उपप्रतिसाद मला पूर्ण समजलेला नाही. 'कोहेनच्या उदाहरणात फॅशन शोला उपस्थित मंडळीही संहितेचा भाग आहे. अशी उदाहरणे ऐतिहासिक कलाकृतीतही दाखवता येतात. त्यामुळे कोहेनचे उदाहरण संयुक्तिक नाही' असे काहीसे मला समजले आहे.

ऐतिहासिक उदाहरणे असल्यामुळे आधुनिकोत्तर कलेचे 'आधुनिकोत्तर' हे विशेषण चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले असे मला वाटते.

प्रयत्न

प्रतिसाद येथे दिल्याबद्दल अनेक आभार. वरचा प्रतिसाद संपादीत करून त्यात भर घालत राहीन.

विखंडितपणा म्हणजे काय ते समजलेले नाही.

माझ्या अनुभवविश्वाच्या संदर्भात मला उमगलेले सांगण्याचा प्रयत्न करतो. जन्म खेड्यात, अर्धे माध्यमिक शिक्षण तालुकावजा गावात, उरलेले महाराष्ट्रातील बर्‍यापैकी मोठ्या शहरात, महाविद्यालयीन शिक्षण आणखी मोठ्या शहरात, पदव्युत्तर शिक्षण परदेशात, नोकरी परदेशात. या सर्व प्रवासात अनेक भुमिकांतून जावे लागले. कुटूंब, कचेरीतील सहकारी, शेजारी-पाजारी, इतर संबंधित, पुस्तके, चित्रपट, आंतरजाल, इतर माध्यमे यात एकसंधपणा नाही. समकालीन लोकांच्या अनुभवांतील स्थित्यंतरांची वारंवारता असा विखंडितपणाचा अर्थ मला जाणवला.

"मला चित्रातून अमुक अर्थ लागला" हे रंगांधळ्यांना समजावून देणेही शक्य नाही, असा काही दावा आहे काय?

तुम्हाला रंगांधळ्यांना समजावून देणे शक्य असावे पण तुमचा आस्वाद-अनुभव व रंगांधळ्याचा आस्वाद-अनुभव भिन्नच असणार.

"अर्थ नाही" हाच मेटाअर्थ 'सांगण्याचा' संहिताकर्त्याचा उद्देश असेल तर ऍबसर्डिटी हाच मेटाअर्थ सर्वांना लागेल...

संहिताकर्त्याचा उद्देश काहीही असला तरी वाचकांच्या/प्रेक्षकांच्या अनुभव-आस्वादावर, अर्थनिर्णयनावर त्याची मक्तेदारी असू शकत नाही. एखाद्याला ऍब्सर्ड वाटेल तर दुसर्‍याला मजा येईल. उदा. 'वेटिंग फॉर गोडो'चे प्रयोग स्त्रियांनी सुरू केल्यावर बेकेटने त्याबद्दल आक्षेप घेतला होता पण प्रयोग होतच राहीले.

ऐतिहासिक उदाहरणे असल्यामुळे आधुनिकोत्तर कलेचे 'आधुनिकोत्तर' हे विशेषण चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले असे मला वाटते.

असे मलाही वाटले होते. पण ऐतिहासिक कलाकृतींची आधुनिकोत्तरी समिक्षा केली जाण्याची शक्यता तसेच त्यांची व मॉक्युमेंटरीची उदाहरणे संहितेतील पात्रांना संहितेतील घटनांचे उलटसुलट अर्थ लागणे, हे आधुनिकवादाचे व्यवच्छेदक लक्षण नाही हे पाहता त्यांना वेगळे काही अपेक्षित असावे असे वाटले. चिंजंनाही ते व्यवच्छेदक लक्षण वाटत नसतांना कोहेनचे उदाहरण धनंजय यांना संयुक्तिक वाटले नसावे. पण प्रतिसाद पूर्ण समजला नसल्याने तुम्ही म्हणता तसाही त्यांचा उद्देश असावा.

पळवाट: मी शिकतो आहे.

काही प्रतिसाद, काही विनंत्या

आतापर्यंत उपस्थित झालेल्या काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या प्रतिसादात केला आहे. पण त्याआधी दोन गोष्टी सांगेन.

संज्ञा/व्याख्या यांच्यावर विसंबून राहणं कधी कधी धोक्याचं ठरतं; त्यापेक्षा आकलन/आस्वाद घेण्याचा प्रयत्न करा. मग आधुनिकोत्तरतेसारखी सुळसुळीत गोष्ट काहीशी गवसायची शक्यता वाढेल. ती सुळसुळीत आहे हे मान्यच आहे. (हे एक अंतिम सत्य मानायला हरकत नाही ;-))

दुसरी गोष्ट म्हणजे आक्षेप/आरोप यांच्या गदारोळात चर्चा अडकण्याचा धोका दिसतो आहे. ती पुढे जाण्यासाठी ‘ब्रांडेड बेबी’ उतारा आणि त्यावरची प्रश्नावली यांकडे लक्ष द्या अशी विनंती करेन. त्यावरच्या उहापोहातून चर्चा पुढे जाईल अशी आशा करतो.

रिकामटेकडा यांचा आक्षेप काहीसा असा असावा: आस्वाद अनुभवाचे आकलन/विश्लेषण जर समजा वाचक करू शकत नसेल किंवा वाचकाचा आस्वाद-अनुभव असंबद्धतेबाहेर पडू शकत नसेल तर किमानपक्षी हा आस्वाद अनुभव सुसंबद्ध करता येण्याइतपत तरी आस्वाद-अनुभवाची व्यक्तिसापेक्षता निरर्थक ठरते. चिंजंच्या मताप्रमाणे असंबद्धता हाच आस्वाद अनुभव असल्याने त्याला सुसंबद्ध करण्याची काही गरज नाही कारण अमुक वाचकासाठी सुसंबद्ध असा अर्थच नसू शकेल.

‘आस्वाद घेता यावा यासाठी आमच्या हातात काही तरी सामग्री द्या. नाहीतर संहिता निरर्थक आहे असं मानून आम्ही तीकडे दुर्लक्ष करू. किंवा आधुनिकोत्तरताच टाकून देऊ.’ अशा तक्रारी आणि आरोप आधुनिकोत्तरतेवर झाले आहेतच. इतके की ते आरोप आणि त्यांची खिल्ली ही आधुनिकोत्तरतेच्या अंगवळणी पडलेली बाब आहे असं म्हणता येईल. हा खोडसाळपणा स्पष्ट करण्यासाठीच रिटे यांच्याशी तो संवाद त्या दिशेनं पुढे नेला होता. कोहेनच्या फसवणुकींचं उदाहरणही त्यासाठी दिलं होतं. हा मुद्दा पचनी पडला असेल तर आता हे आरोप/आक्षेप या धाग्यावर येऊ नयेत अशी विनंती करेन. मग चर्चा पुढे जाण्यास मदत होईल.

धनंजय यांनी पूर्वकाळातली उदाहरणं दिली आहेत. त्यात एक गोष्ट अधोरेखित करेन. श्रोता/प्रेक्षक हा कथाभागातल्या कशाशीतरी (उदा. शकुंतला ही व्यक्तिरेखा आणि तिच्यावर आलेलं संकट, किंवा मयसभेतली अद्भुतता) एकरूप होईल किंवा त्यात रमून जाईल; अशा अवस्थेत आपल्या मनात तो एक सुसंबध्द आकलन-मालिका रचेल; बहुसंख्यांची ही मालिका एकसारखीच असेल हे या काळात गृहीत होतं. म्हणजे संहितालेखक (कालिदास) किंवा निवेदक (कीर्तनकार) आणि आस्वादक यांच्यात एकतानता आणि ‘सह’भाग अभिप्रेत होते. (इथे complicity हा शब्द त्यातल्या गुन्ह्याच्या संदर्भामुळे अधिक मजेशीर आणि म्हणून अधिक फिट्ट वाटतो आहे.) त्यामुळे तात्पुरते गैरसमज झाले तरी अखेर सर्व काही स्पष्ट झाल्याचा अनुभव होई. आधुनिकोत्तरतेनं हे नाकारलं. शाकुंतलाचा कालिदास बेभरवशाचा निवेदक (किंवा संहिता लेखक) नाही. कोहेन तसा म्हणता येईल. म्हणून काहींना कोहेन विनोदी वाटत नाही; ओढूनताणून फसवणूक करणारा वाटतो. असो.

इजिप्शिअन चित्रलिपी आधुनिकोत्तर नाही. पण तिचं पृथक्करण आधुनिकोत्तर पध्दतीनं करता येईल कदाचित. त्यातून काही आस्वादयोग्य प्रसवताही येईल कदाचित. ही शक्यता लक्षात घ्या एवढंच म्हणेन. हे सर्व अवैज्ञानिक आहे हे उघडच आहे. त्यामुळे वैज्ञानिक आक्षेप त्यावर घेऊ नयेत असं वाटतं.

थोडक्यात, complicity धारण करा ;-)

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

संज्ञा, व्याख्या इ.

चर्चा होण्यासाठी काही ढोबळ चौकट (सुळसुळीततेच्या आकलनासाठी थोडासा किंकी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व.) असावी म्हणून व्याख्या, संज्ञा आहेत. त्या अंतिम नाहीतच.

रोचक

त्यामुळे तात्पुरते गैरसमज झाले तरी अखेर सर्व काही स्पष्ट झाल्याचा अनुभव होई. आधुनिकोत्तरतेनं हे नाकारलं. शाकुंतलाचा कालिदास बेभरवशाचा निवेदक (किंवा संहिता लेखक) नाही. कोहेन तसा म्हणता येईल. म्हणून काहींना कोहेन विनोदी वाटत नाही; ओढूनताणून फसवणूक करणारा वाटतो. असो.

इथे आणि काल धनंजय यांचा प्रतिसाद वाचतानाही कुरोसावाच्या राशोमोनची आठवण आली होती. (धनंजय यांचा तो आवडता चित्रपट असल्याचे त्यांनी म्हटल्याचे असे आठवते. त्यांनाही याची आठवण झाली असण्याची शक्यता आहे.) मग जालावर शोध घेतला असता राशोमोन आधुनिकोत्तर विचारांची सुरूवात आहे असे कळले. यावर आणखी विचार करायला हवा मात्र संकल्पना थोडी थोडी कळते आहे असे वाटते.

--
अनुदिनी : मै और मेरे पाहुणे..
http://rbk137.blogspot.com/

राशोमॉन

हे सर्व वाचून राशोमॉन आठवला असेल तर योग्य दिशेनं प्रवास चाललेला आहे असं म्हणेन. मी राशोमॉनचं उदाहरण देणार होतो, पण ते फारच उगाळून झालेलं आहे म्हणून दिलं नाही.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

राशोमोन, अनन्तरम्

राशोमोन हा माझा आवडता चित्रपट आहे खरा. एक तर अनुभवाच्या व्यक्तिनिष्ठतेचे उपयोगी विश्लेषण आहे. पण दुसरे म्हणजे व्यक्तिनिष्ठ विश्लेषणाच्या मर्यादाही दाखवलेल्या आहेत. दोन्ही दाखवण्यात तो चित्रपट यशस्वी होतो.

चित्रपटातील "डाकू-उमराव-खटाला" चालू असताना गुन्ह्याच्या कथानकाच्या चार परस्पर-विसंगत आवृत्ती दाखवलेल्या आहेत. डाकू, स्त्री, उमराव आणि लाकुडतोड्या या चौघांनी वेगवेगळ्या घटना सांगितलेल्या आहेत. खून झाला की आत्महत्या होती, बलात्कार होता की व्यभिचारी संभोग, डाकू-उमराव लढले ते साहसाने की तिटकार्‍याने... अगदी इतके मूलभूत फरक आहेत.

चित्रपटाची सुरुवात आणि शेवट, या प्रसंगांच्या मात्र वेगवेगळ्या आवृत्ती दाखवलेल्या नाहीत : खटल्याबद्दल शेकोटीभोवतीच्या गप्पा चालू आहेत, त्या शेकोटीबद्दल चित्रीकरणे सुरुवातीला आणि शेवटी आहेत. विशेषतः शेकोटीजवळच्या शेवटचा कथाप्रसंग आणि त्याबद्दल दिग्दर्शक कुरोसावाचे नि:संदिग्ध नैतिक मत चित्रपटात सांगितलेले आहे. शेकोटी गप्पांमध्ये खटल्यातल्या कथेच्या चार आवृत्ती सांगितल्या जातात, तेव्हा गप्पा मारणार्‍या एका तिरसट गावकर्‍याला प्रत्येक आवृत्तीमधले दोष दिसतात. गप्पांचा अड्डा उठतो, तेव्हा चित्रपटाच्या शेवटीचा प्रसंग असा : गप्पा मारणार्‍यांना त्या ठिकाणी एक टाकून दिलेले तान्हे बाळ सापडते. तिरसट-"चतुर" गावकर्‍याने टाकलेल्या बाळाचे कपडे फेडून नेले, मग लाकुडतोड्याने बाळ पाळण्यासाठी आपल्या घरी नेले. या घटनांबद्दल कथानकात एकच आवृत्ती आहे. पैकी कपडे फेडून चोरण्याची पहिली घटना घृणास्पद आहे, आणि मूल पाळायला घ्यायची घटना प्रशंसनीय आहे, हे कुरोसावाचे मत अगदी स्पष्ट आहे - याबाबत भावना वेगवेगळ्या असू शकतात असे म्हणायला कुठलीही जागा कुरोसावाने ठेवलेली नाही.

कॉलेज वयात जेव्हा मी हा चित्रपट बघितला, तेव्हाचे माझे मत असे : शेवटाची एकच आवृत्ती (तीसुद्धा आकलनास अतिशय सोपी आणि एकरेषीय) दिग्दर्शकाने काय म्हणून ठेवली? मला कुरोसावाबद्दल आश्चर्य वाटले. त्याने हा भागही संदिग्ध ठेवायला हवे होते, असे मला वाटत असे. पण तेव्हासुद्धा आणि आजही : शेवट नुसताच कातरून "लोक अड्डा संपवून घरी गेले" असा करताच येत नाही हे कळत होते. माझ्या विचारात फरक झाला आहे, तो असा - तेव्हा मला वाटत असे की कुरोसावा श्रेष्ठ कलाकार आहे, म्हणून त्याने कल्पक रीतीने शेवटसुद्धा संदिग्ध करायला हवा होता. आता माझी खात्री झाली आहे, की कुरोसावा श्रेष्ठ कलाकार आणि विचारवंत होता, म्हणून त्याने तेवढ्या भागात कथानक नि:संदिग्ध केलेले आहे.

- - -

शेवटसुद्धा संदिग्ध सोडला अशा प्रकारचा (मी न बघितलेला) चित्रपट "अनन्तरम्" (मलयाळम्, दिग्दर्शक - अडूर गोपालकृष्णन्) आहे.
यात एक तरुण आपली जीवनकथा दोन स्वगतांमध्ये (मध्यंतरापूर्वी एकदा, मध्यंतरानंतर एकदा अशी) सांगतो. अर्थातच "जीवनकथा" म्हणजे जीवनातल्या "महत्त्वाच्या" प्रसंगांची साखळी. जे-जे प्रसंग पहिल्या स्वगतात सांगितले जातात (चित्रित केले जातात) त्यातून एक कथानक तयार होते. दुसर्‍या स्वगतात, मधले-मधले अन्य प्रसंग सांगितले जातात. आता कळलेल्या नव्या प्रसंगांनुसार प्रेक्षक पहिल्या स्वगतातील घटनांचा वेगळाच काही अर्थ लावू लागतात. दुसरे स्वगत संपते. चित्रपट संपवण्यासाठीचा प्रसंग असा -
पायर्‍यावरती एक छोटा मुलगा खेळत असतो. उड्या मारत असतो. कधी एक-दोन-चार-सहा अशा पायर्‍यांवर उड्या मारत जातो. कधी तीन-पाच-सात अशा उड्या मारत जातो... फेड आऊट, चित्रपट संपतो. म्हणजे गोपालकृष्णन् अभिप्राय देतात, की "खरी" कथा आपल्याला कधीच कळणार नाही.

(या शेवटच्या "दिग्दर्शकीय टिप्पणी"ची ही एकच आवृत्ती दिलेली आहे. ही बाब सोडावी, की लक्षात घ्यावी?)

चित्रपटाचे हे वर्णन माझ्या एका केरळी मित्राने मला सांगितले तसे आहे. जमेल तेव्हा हा चित्रपट बघायची इच्छा आहे. कित्येक महत्त्वाच्या प्रसंगी सदसद्विवेक करून कामाला लागण्यापुरती नि:संदिग्धता असते, असे कुरोसावा म्हणतो. गोपालकृष्णन् यांनी "तितकीसुद्धा नि:संदिग्धता कधीच नसते" असा अभिप्राय दिला आहे काय? की फक्त "या तरुणाच्या कथानकात स्पष्ट सदसद्विवेक शक्य नाही" असे मर्यादित कथानक सांगितलेले आहे? हे प्रत्यक्ष बघायची उत्सूकता आहे.

राशोमोनः शेवटचा प्रसंग

पैकी कपडे फेडून चोरण्याची पहिली घटना घृणास्पद आहे, आणि मूल पाळायला घ्यायची घटना प्रशंसनीय आहे, हे कुरोसावाचे मत अगदी स्पष्ट आहे - याबाबत भावना वेगवेगळ्या असू शकतात असे म्हणायला कुठलीही जागा कुरोसावाने ठेवलेली नाही.

शेवटचा प्रसंग बघतांना माझेही असेच मत झाले होते. लाकुडतोड्या हा सुरूवातीपासूनच संभ्रमात आहे. शेवटच्या प्रसंगात मूलाचे संगोपन करण्याची जबाबदारी घेण्याचा निर्णय त्याने पश्चातापदग्ध भावनेतून घेतला आहे का? असा प्रश्न मात्र मला पडतो.

शेवटच्या प्रसंगाविषयी अजून एक रोचक मत वाचायला मिळाले.

हेतू काही असला तरी कृती नि:संदिग्ध

लाकूडतोड्याचा हेतू काही असला तरी कृती नि:संदिग्ध.

पश्चात्ताप असू शकेल. लाकूडतोड्याने हिरेजडित सुरा घेतला होता, याबाबत बहुधा शंका नाही. बौद्ध भिक्षूने (म्हणजे आपण आणि कुरोसावाने) हे स्वीकारलेले आहेच.

चित्रपटाच्या सुरुवातीला लाकूडतोड्याला ताईत ठेवायची कुपी सापडली होती, हे माझ्या तेव्हा लक्षात आले होते. पण कोणास ठाऊक का - आज हा तपशील मी विसरलेलो होतो. तुम्ही दिलेल्या दुव्यावरच्या चर्चेने आठवण झाली - धन्यवाद. बाळाचा संदर्भ सुरुवातीला देऊन कुरोसावाने प्राचीन नाट्यशास्त्राच्या तत्त्वांना मुजरा केलेला आहे. आणि तपशील अर्थपूर्ण आहे, बेवारशी नव्हे...

हा महत्त्वाचा तपशील भरीस घातला, तरी : मूल पाळायला घेण्याच्या कृतीच्या बाजूने कुरोसावा नि:संदिग्धपणे आहे, हा मुद्दा बदलत नाही.

अर्थात

मूल पाळायला घेऊन लाकूडतोड्याने सकारात्मक, आशेचा किरण दाखवणारे काम केले आहे. हेतूंबाबत काही संदिग्धता आहे पण कृतीविषयी नाही असेच माझेही मत आहे. बौद्ध भिक्षू - कॉन्शन्स किपर हेही आधुनिकोत्तरतेपेक्षा जरा वेगळी वाट चोखाळल्यासारखे वाटते.

खुलासा

संज्ञा/व्याख्या यांच्यावर विसंबून राहणं कधी कधी धोक्याचं ठरतं; त्यापेक्षा आकलन/आस्वाद घेण्याचा प्रयत्न करा. मग आधुनिकोत्तरतेसारखी सुळसुळीत गोष्ट काहीशी गवसायची शक्यता वाढेल. ती सुळसुळीत आहे हे मान्यच आहे. (हे एक अंतिम सत्य मानायला हरकत नाही ;-))

नाडीशास्त्राची आठवण झाली.

हा मुद्दा पचनी पडला असेल तर आता हे आरोप/आक्षेप या धाग्यावर येऊ नयेत अशी विनंती करेन.

मुद्दा पचला नसल्यामुळे मी चर्चेतून बाहेर पडतो आहे.

ठीक

नाडीशास्त्राची आठवण झाली.

माझा नाडीशास्त्राचा अभ्यास नाही. त्यामुळे चूभूद्याघ्या. मला वाटते की नाडीशास्त्र जगातल्या सर्व व्यक्तींविषयीचे सत्य नाडीग्रंथांत असल्याचा दावा करते. आधुनिकोत्तरता ते करीत नाही. मला असेही वाटते की सुळसुळीतपणा हा नाडीशास्त्राच्या समर्थकांना आरोप वाटेल. आधुनिकोत्तरतेमध्ये तो मिरवण्याजोगा गुण आहे. अर्थात, आस्वादकाचे सामर्थ्य मान्य असल्यामुळे तुम्हाला नाडीशास्त्र आणि आधुनिकोत्तरता यांत साधर्म्य वाटणे ही एक शक्यता आहेच. ते वाटण्याचे स्वातंत्र्य आधुनिकोत्तरतेत अंतर्भूतच आहे.

मुद्दा पचला नसल्यामुळे मी चर्चेतून बाहेर पडतो आहे.

तुमची मर्जी.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

विखंडितपणा

विखंडितपणाविषयी का यांनी वर अशी मांडणी केलेली आहे:

माझ्या अनुभवविश्वाच्या संदर्भात मला उमगलेले सांगण्याचा प्रयत्न करतो. जन्म खेड्यात, अर्धे माध्यमिक शिक्षण तालुकावजा गावात, उरलेले महाराष्ट्रातील बर्‍यापैकी मोठ्या शहरात, महाविद्यालयीन शिक्षण आणखी मोठ्या शहरात, पदव्युत्तर शिक्षण परदेशात, नोकरी परदेशात. या सर्व प्रवासात अनेक भुमिकांतून जावे लागले. कुटूंब, कचेरीतील सहकारी, शेजारी-पाजारी, इतर संबंधित, पुस्तके, चित्रपट, आंतरजाल, इतर माध्यमे यात एकसंधपणा नाही. समकालीन लोकांच्या अनुभवांतील स्थित्यंतरांची वारंवारता असा विखंडितपणाचा अर्थ मला जाणवला.

होय. हे विखंडितपणाचं एक उदाहरण मानता येईल. पण विखंडितपणाचेही अनेक प्रकार आहेत. विशेषत: बेभरवशाच्या निवेदकासंदर्भात ते महत्त्वाचे ठरू शकतात. एक-दोन उदाहरणं देतो.

व्हर्जिनिआ वूल्फला आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसला होता. पहिल्या महायुद्धातली हिंसाही तिचं मानसिक संतुलन डळमळीत करणारी ठरली. दुसरं महायुध्द सुरु झाल्यावर १९४१ मध्ये तिनं नैराश्यग्रस्त अवस्थेत आत्महत्या केली. रुढ अर्थानं ती मानसिक रुग्ण होती. ती एक महत्त्वाची लेखिका मानली जाते. ब्लूम्सबरी गटाची ती एक प्रमुख सदस्य होती. सत्य, प्रेम आणि सौंदर्य हे आदर्श आहेत असं या गटाला वाटे. वसाहतवाद आणि भांडवलशाही यांना या गटाचा विरोध होता. जगाविषयीच्या आदर्शवादी कल्पना आणि वास्तव यांच्यातला फरक (विखंडितता) हे वूल्फचं संतुलन ढळण्याचं एक कारण होतं असं मानतात.

मिसेस डॅलोवे (१९२५) या वूल्फ-लिखित कादंबरीत सेप्टिमस ही व्यक्तिरेखा आहे. हा पहिल्या महायुद्धात लढलेला आणि युध्दाच्या धक्क्यानं (शेल शॉक) मानसिक संतुलन हरवून बसलेला माणूस आहे. कादंबरीत तो निराशाग्रस्त आहे. पक्षी ग्रीकमध्ये गातात असा भास त्याला होतो. स्वत: वूल्फला असे भास व्हायचे.

आता वूल्फचं विखंडितपण हे वरच्या विखंडितपणाहून वेगळं असेल. सेप्टिमसचं कदाचित त्याहून वेगळं असेल. युध्दोत्तर वाङमयात अशा विखंडितपणांची नोंद घेतली गेली. त्यांना अभिव्यक्ती मिळाली. आधुनिकोत्तरतेत मानसिक वास्तव विखंडित असणारे निवेदक आले. त्यांना भास होत असल्यामुळे किंवा वास्तवावरचा त्यांचा ताबा सुटलेला असल्यामुळे ते बेभरवशाचे होते. त्यांच्या कथनात असत्य आणि सत्य यांचा ठोस निवाडा करता येणार नाही अशी वर्णनं आली.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

आधुनिक कोणाला म्हणायचे

चर्चाप्रस्तावाच्या मानाने झालेली चर्चा जास्त रोचक वाटली. हे थोडेसे फॅशन शो सारखे झाले. :)

चित्रकला माध्यमात बर्‍याच चळवळी होत असतात.
इतिहास पाहिला तर या चळवळी या स्थळ काळाने आणि काही नावानी बद्ध आहेत असे दिसते. तत्व प्रणाली वा शैली कुठली असे विचारले तर सांगता येत नाही. नावे देखील मुद्दाम तयार केलेली. (सरियलिज्म). एक प्रस्थापित मतप्रवाह असताना कोणी एक वा जास्त त्यानुसार न जाता वेगळ्या वाटेने जातात. त्यांना अनुयायी मिळत जातात (करणार्‍यात आणि आस्वादकात) आणि एक नवीन मतप्रवाह/चळवळ दिसायला लागते. अशाच पद्धतीची त्याहून जुनी कलाकृती कदाचित असू शकते.

यातील काही चळवळी मात्र स्थळ-काळ-आणि व्यक्तिंपेक्षा मोठ्या होतात. आधुनिकोत्तर वाद हा त्याहून मोठा आहे असे दिसते. चित्रकलेच्या क्षेत्रात वास्तववादी आणि अमूर्त अशी एक ढोबळ विभागणी असते. यातील अमूर्त प्रकार हा आधुनिकोत्तर वादाला जवळचा आहे असे समजतो. चित्रकाराने चित्र काढावे आस्वादकाने त्याचा आस्वाद घ्यावा. या दोन्ही एकमेकांशी संबंधित नसलेल्या सर्जन (क्रिएटिव) क्रिया आहेत असे म्हटले जाते. माझ्या चित्राबाबत मला जे काही सांगायचे आहे ती मी चित्रातच सांगितले आहे (अजून सांगायची गरज नाही.) असे चित्रकार म्हणतात.

आधुनिकोत्तर हा शब्द तसा फसवा आहे. आधुनिक म्हणजे काय हे समजल्याशिवाय त्याचा अर्थबोध होणार नाही. मराठी कवितेतली नवकविता (मर्ढेकरी) ही आधुनिक कविता म्हटली तर आधुनिकोत्तर (कोलटकर) असे समजू शकेल. कशाला आधुनिक म्हणायचे, कशाला अभिजात म्हणायचे याचे संभ्रम असेच असतात.

आधुनिकोत्तरवाद हा मोठा असला तरी त्याला काळाच्या संदर्भात विसरून चालणार नाही असे वाटले.

सत्य हे बहुआयामी असते, आणि ते आस्वादकात गुंतलेले असते अशी नेमकी तत्वप्रणाली 'भासमान' जग या कल्पनेत दिसतेच.

प्रमोद

आधुनिकोत्तर

उत्तम चर्चा. प्रतिसाद वाचून या संज्ञेबद्दल असलेला गोंधळ थोडा दूर होतो आहे, असं वाटलं.
काही प्रश्न -

१. विखंडितपणा हे आधुनिकोत्तर साहित्याचं व्यवच्छेदक/आवश्यक लक्षण आहे का?

२. बरेचसे आधुनिकोत्तर साहित्य दुसरे महायुद्ध आणि त्यानंतरच्या कालावधीत मोडते का? दुसर्‍या महायुद्धाचे आणि त्यानंतरच्या समाजाचे चित्रण करताना एका विशिष्ट शैलीचा (किंवा शैलीच्या अभावाचा) आधार घेणारे काही लेखक - उदा. थॉमस पिंचॉन, हारुकी मुराकामी हे आधुनिकोत्तर लेखकांत गणले जातात.

नक्की काय घडतं आहे ते स्पष्ट असेल, पात्रांच्या विचार-वर्तनावरून त्यांचा मूल्यात्मक आलेख सुस्पष्टतेनं मांडता येत असेल तर ते वाङमय आधुनिकोत्तर नाही असं खुशाल समजावं.

चिजंनी दिलेल्या या कसोटीवर दोघांचं लेखन उतरतं, असं म्हणायला हरकत नाही. मात्र हेच विल्यम फॉकनरच्या 'द साऊंड अँड द फ्युरी'बद्दल म्हणता येईल. केवळ दुसर्‍या महायुद्धाआधी लिहिली गेलेली (१९२९) म्हणून ती पोस्ट-मॉडर्निस्ट न ठरता मॉडर्निस्ट ठरते, अशी काळाप्रमाणे विभागणी आहे का?

३. स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस हाही आधुनिकोत्तर साहित्यात आधुनिक साहित्यातून (मॉडर्निझम ते पोस्ट-मॉडर्निझम) आला असावा, असं वाटतं. व्हर्जिनिया वूल्फचे 'टू द लाईटहाऊस' किंवा ऍना कॅरेनिना ही त्याची उत्तम उदाहरणं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

असेच वाटते आहे

स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस हाही आधुनिकोत्तर साहित्यात आधुनिक साहित्यातून (मॉडर्निझम ते पोस्ट-मॉडर्निझम) आला असावा, असं वाटतं.
तुम्ही म्हणता ते बरोबरच असावे असे वाटते आहे. १९४१ साली जेम्ज़ जॉइस आणि व्हर्जिनिया वुल्फ़ ह्या दोघांचे निधन झाले. १९४१ साली आधुनिकोत्तरवादाचा प्रारंभ झाला असे मानण्यात येते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जगन्मिथ्या

१. आधुनिकोत्तरवाद म्हणजे काय?
-'जगन्मिथ्या' हा अर्धा भाग घेतला तर त्याला पोस्ट मॉडर्निजम म्हणता येईल.
२. आधुनिकोत्तरवादी लेखक कोणास म्हणावे? मराठीत अशा लेखनाची काही उदाहरणे आहेत का?
३. साहित्यात इतरही संकल्पना आहेत. उदा. देशीवाद, आधुनिकवाद वगैरे यांच्या काँटेक्स्टमध्ये आधुनिकोत्तरवाद कोठे बसतो?
- कबीर व सूफी संत सर्वात आधीचे भारतीय पोस्ट मॉडर्न कवि (साहित्यकार)म्हणता येतील. जगाच्या व्यवहाराबाबत उदासीनता बाळगणारा बैरागीही पोस्ट मॉडर्न असतो.

नंदन यांच्या दोन प्रश्नांना प्रतिसाद

विखंडितपणा हे आधुनिकोत्तरवादाचे व्यवच्छेदक लक्षण आहे का?
बरेचसे आधुनिकोत्तर साहित्य दुसरे महायुद्ध आणि त्यानंतरच्या कालावधीत मोडते का?

नंदन यांच्या या दोन प्रश्नांची उत्तरं एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणून त्यांना एकत्र उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे.

पहिल्या महायुद्धानं जी विलक्षण हानी केली त्यामुळे पाश्चिमात्य जगातले अनेक संवेदनशील जीव मुळापासून हादरले. त्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळया माध्यमांत वेगवेगळ्या पद्धतींत आल्या. आधी उल्लेख केलेलं वूल्फचं विखंडितपण ही एक प्रतिक्रिया होती. तंत्रज्ञान हे मानवाला मिळालेलं एक उत्तम साधन आहे; त्याच्या मदतीनं मानवजात आपले प्रश्न सोडवेल अशी एक विचारसरणी होती. युद्धात आधुनिक तंत्रज्ञानामुळे जी अपरिमित हानी झाली त्यामुळे या विचारसरणीला या काळात धक्के बसले. औद्योगिक क्रांती, आधुनिक तंत्रज्ञान वगैरे ज्यातून उगम पावले त्या तर्कनिष्ठ (देकार्त - I think, therefore I am वगैरे) चौकटीलाच त्यामुळे हादरे बसले. Enlightenment काळातल्या ‘ज्ञानातून प्रगती’ या अपेक्षेला तडा गेला. मानवी आयुष्याला काही अर्थ नाही असा एक निरर्थकतावाद त्यातून पुढे आला. जर् आयुष्याला अर्थ नाही तर कलेला काय अर्थ उरेल? मग कलेऐवजी विरोध-कला (anti-art) असं काही बोललं/केलं जाऊ लागलं. त्याची एक परिणती ‘दादा’ या चळवळीत झाली. त्यांनी सर्वच चौकटी/परंपरा अमान्य केल्या. चौकटी मोडणं हे त्यांचं एक ध्येय होतं. धक्कातंत्र हे त्यांचं एक शस्त्र होतं. उदा: १९१७ साली मार्सेल द्यूशाँ यानं आपलं ‘कारंजं’ सादर केलं. पुरुषांच्या मुतारीत ठेवलं जाणारं मूत्रपात्र त्यानं उलट केलं होतं आणि त्यालाच कारंजं म्हटलं होतं. ते इथे पाहता येईल.

‘त्याच्यावर सही केलेली आहे; ते संग्रहालयात आहे; त्यामुळे तुम्ही त्यात मुतू शकत नाही. मग ती कलाच!’ असा एक पराकोटीचा थिल्लरपणा आणि खोडसाळपणा यात होता. (सन्माननीय रिटे यांना अशाच खोडसाळ असंबध्दतेचा त्रास झाला असावा; त्याबद्दल जाहीर माफी.)

भाषेतही काही गमतीशीर खेळकर प्रयोग या काळात झाले. उदा: गियोम आपोलिनेर या फ्रेंच कवीनं कॅलीग्राम असा एक नवा खेळ केला (१९१८). त्यात कविता ही चित्राच्या स्वरुपात आणली गेली. उदा: हा ‘टाय’ पहा:

Cravate - Apollinaire
Cravate - Apollinaire

किंवा हे पहा:

La Langue (française)
La Langue (française)

‘जर्मनांना जीभ वेडावून दाखवणाऱ्या फ्रेंच भाषेतून जगाला हाय/हलो’ अशा काहीशा अर्थाची ही ओळ आहे. फ्रान्सचं बोधचिन्ह मानता येईल असा आयफेल टॉवर किंवा जीभ असे दोन आकार त्यात दिसतील. त्यातच फ्रेंचमध्ये जीभ आणि भाषा यांना langue असा एकच शब्द आहे. त्यामुळे त्यात एक शब्दखेळही आहे.

अशा कवितांचा आपोलिनेरचा कवितासंग्रह पिकासोची रेखाटनं मिरवत प्रसिध्द झाला होता. ‘युध्द आणि शांतीच्या कविता’ हे त्याचं उपशीर्षक होतं. युध्दात बळी पडलेल्या आपोलिनेरच्या एका मित्राला तो अर्पित केला होता. त्याचं मुखपृष्ठ इथे पाहता येईल:

हा खेळकरपणा किंवा ‘आम्ही थुकलो तरी ती कलाच’ असा हा सगळा चौकटीमोडू खोडसाळपणा आधुनिकोत्तरतेचं मूळ समजला जातो. प्रवाह म्हणता येईल इतका आकार त्याला दुसऱ्या महायुध्दानंतर आला. अर्थात, अणुबाँब, छळछावण्या आणि होलोकॉस्टसारख्या दुसर्‍या महायुध्दाच्या देणग्याही पहिल्या महायुध्दावर कडी करणार्‍या होत्या.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

तरीही येतो वास फुलांना...

विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, चिं.जं. आपोलिनेरची langue-in-cheek म्हणता येतील अशी कॅलिग्राम्सही सुरेख! (joue चा अर्थही खेळणे आणि गाल असा दुहेरी आहे, हा योगायोग म्हणावा का?)

पहिल्या महायुद्धानंतरच्या 'लॉस्ट जनरेशन'चे चित्रण हेमिंग्वेच्या 'सन ऑल्सो रायझेस'मध्ये येतं. प्रथम वाचनात ते पुस्तक तितकंसं आवडलं नव्हतं. आता कदाचित या नवीन संदर्भात ते पुन्हा वाचून पहावं लागेल.

वरील एका प्रतिसादात विचारल्याप्रमाणे मराठीत या दृष्टीने मर्ढेकरांचं नाव घ्यावं लागेल. 'चहूकडे अन् एकच गिल्ला, जुन्या शवावर नवे निखारे' सारख्या ओळींतून तुम्ही म्हणता तशी संहाराची आणि पुढे निरर्थकतेची भावना स्पष्ट दिसते.

*येथून पुढचा भाग थोडा अवांतर. नेम-ड्रॉपिंगचा आरोप पत्करून लिहिलेला. मात्र चर्चा भरकटू नये म्हणून केवळ डोक्यात आलेले एक-दोन प्रश्न मांडून थांबतो.

डिस्टोपियन कादंबर्‍या हे याच काळाचं अपत्य मानता येईल. म्हणजे कारण एकच (हिंसा, महायुद्ध, संहार) पण त्याचा साहित्यात दिसून येणारा परिणाम निराळा. (पहिला म्हणजे पोस्ट-मॉडर्निस्ट साहित्य आणि दुसरा - पण अखेरचा नव्हे - म्हणजे डिस्टोपियन कादंबर्‍या)

एकोणिसाव्या शतकातही या स्वरूपाच्या काही कादंबर्‍या लिहिल्या गेल्या असल्या तरी, खर्‍या अर्थाने या साहित्यप्रकाराला झाम्यातिन या रशियन लेखकाच्या 'वी' (१९२०) या कादंबरीने सुरुवात झाली असं म्हणतात. (ऑर्वेलच्या १९८४ या पुस्तकामागची प्रेरणा हीच असाही एक प्रवाद आहे.) त्यानंतरच्या गाजलेल्या कादंबर्‍यांवर महायुद्धानंतर बदललेल्या राजकीय स्थितीचं - मग त्यात दोन्ही व्यवस्था आल्या - प्रतिबिंब पडलेलं दिसतं. (उदा. साम्यवादाची काळी बाजू प्रकाशात आणणारी डार्कनेस ऍट नून आणि फोर्डिस्ट भांडवलशाहीवर टीका करणारी ब्रेव्ह न्यू वर्ल्ड).

मराठी साहित्यात निदान मर्ढेकरांच्या रुपाने पहिल्या स्वरूपाचे पडसाद उमटले असं म्हणता येईल (कदाचित साठोत्तरी साहित्याशीही याचा दूरचा संबंध जोडता येईल). मात्र दुसर्‍या प्रकारचं म्हणजे डिस्टोपियन स्वरूपाचं लेखन मात्र अजिबात नाही. दुसर्‍या महायुद्धाची थेट न लागलेली (रेशनिंग, महागाई वगळता) झळ आणि बरीचशी सलग लोकशाही ही यामागची कारणं असू शकतील का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आधुनिकतावाद

१. आधुनिकोत्तरवाद म्हणजे काय?

संकल्पना क्लियर नसल्यामुळं आधुनिकोत्तर म्हंजी काय हे सांगता येणार न्हाय.

२. आधुनिकोत्तरवादी लेखक कोणास म्हणावे? मराठीत अशा लेखनाची काही उदाहरणे आहेत का?

मराठीत वास्तवादी लेखन करणारी जे काय मंडळी आस्सन त्यायचं साहित्य आन त्यायच्या लेखकाची नावं घेता येईन.
पण गॅरंटीने तेच असे काय म्हणता येणार नाय.

३. साहित्यात इतरही संकल्पना आहेत. उदा. देशीवाद, आधुनिकवाद वगैरे यांच्या काँटेक्स्टमध्ये आधुनिकोत्तरवाद कोठे बसतो?

आधुनिकवादाचा संबंध मार्क्सवादाशी जोडता येईन. वास्तववादाशी जोडता येईन.
आधुनिकतावादाचा संबंध नव्या साहित्याशी जोडता येईन. जशी- प्रायोगिक कविता. नव कविता.
आधुनिकोत्तर म्हंजी इतिहासातील गोष्टीचा नव्यानं अर्थ शोधणे.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

 
^ वर