संस्कृत- जिवंत की मृत? - काय फरक पडतो?

एका प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रुपांतर करते आहे.

भाषा मृत की जिवंत हे ठरवण्यासाठी सर्वसाधारणपणे मानल्या जाणार्‍या निकषांच्या खेरीजही काही निकष आहेत. पहिला निकष म्हणजे, ती भाषा एका पिढीकडून पुढच्या पिढीला दिली जात आहे का. या कसोटीवर तांत्रिकदृष्ट्या संस्कृत मृत ठरवता येणार नाही, कारण शैक्षणिक माध्यमातून का होईना, संस्कृत ही भाषा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला दिली जाते. आता ज्या प्रमाणे मराठी भाषा पुढची पिढी अवगत करून घेते, त्याचप्रकारे संस्कृत भाषा अवगत करून घेत नाही हा एक भाग झाला.

दुसरे म्हणजे जेव्हा एखाद्या भाषेचा एकही भाषिक जिवंत राहत नाही, तेव्हा ती भाषा पूर्णपणे मृत होते. परंतू जोवर तिचे काही भाषिक जिवंत आहेत, तोवर ती भाषा मृत मानता येत नाही. आपल्या माहितीसाठी २००१ च्या जनगणनेनुसार १४१३५ इतके लोक संस्कृत भाषा बोलतात, इतकेच नव्हे, तर हे सर्व लोक संस्कृत ही आपली मातृभाषा आहे असे सांगतात. लोकांनी सांगितले, जनगणना अधिकार्‍यांनी मानले ही परिस्थिती खरी असली, तरीही आजूबाजूला पाहिल्यास एकमेकांशी अस्खलित संस्कृतमधे संवाद साधणारे लोक दिसून येतात. माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना संस्कृतमधे बोलता येते एवढेच नव्हे, तर ते एकमेकांशी फक्त संस्कृतमधेच बोलतात. (मी त्यांच्यातली एक नाही.)

सर्वसाधारणपणे मानल्या जाणार्‍या इतर निकषांबद्दल बोलायचं झालं, तर संस्कृतभाषेत कोणते वृत्तपत्र निघते की नाही, याची मला कल्पना नाही, परंतू काही मासिके, त्रैमासिके मात्र निघतात. व ज्या अर्थी ही मासिके गेली अनेक वर्षे अखंडित रीत्या प्रकाशित होत आहेत, त्या अर्थी त्यांचा पुरेसा वाचकवर्गही असला पाहिजे. बोलीभाषेतील स्वरूपाबद्दल बोलायचे झाले, तर आपण एखाद्या सर्वसामान्यपणे जिवंत समजल्या जाणार्‍या भाषेचे उदाहरण घेऊ, जशी जर्मन. जर तुम्हाला जर्मन भाषाच येत नसेल, तर तुम्हाला प्रमाणित जर्मन काय, जर्मनची एखादी वेगळी बोलीभाषा काय, काहीही ऐकवले तरी ती बोलीभाषा आहे की नाही, हे सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे संस्कृतला बोलीभाषेचे 'स्वरूप' नाही आहे, असे कोणीच ठामपणे म्हणू शकत नाही. आधी एकदा सांगितल्याप्रमाणे संस्कृत भाषेत शिव्याही आहेत, संस्कृत भाषेत ओव्याही (सुवचने या अर्थाने) आहेत. त्यामुळे संस्कृतचे 'स्वरूप' हे बोलीभाषेचे नाही, हे मान्य करणे कठीण जाते. प्रत्येक भाषेची वेगवेगळी 'रजिस्टर्स' असतात. जसे मी घरात जसे मराठी बोलते ते एका 'रजिस्टर'चे झाले, मी उपक्रमावर लेखन करताना ज्या मराठीत करते, ते मराठीचे वेगळे 'रजिस्टर' झाले, मी निविदा सूचनांचा इंग्रजीमधून मराठीत अनुवाद करताना जे मराठी वापरते, ते तिसरे 'रजिस्टर' झाले, शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकात जे मराठी आपण वाचले, ते चौथे रजिस्टर. थोडक्यात जी भाषा अधिक 'काँटेक्स्ट्स'मधे वापरली जाते, तिची अधिक 'रजिस्टर्स' असतात, व अधिक उपयोगही. संस्कृतच्या बाबतीतही हे खरे आहे. संस्कृतमधे देवाच्या प्रार्थनेसाठी एक 'रजिस्टर' वापरले जाते, विज्ञानसंबंधी चर्चा करण्यासाठी दुसरे, अध्यात्मासंबंधी चर्चा करण्यासाठी तिसरे, नाटकांत पात्रांच्या तोंडी असते, ते चौथे, याज्ञवल्क्य स्मृतींमधे वगैरे वडिलांच्या संपत्तीची विभागणी मुलांत कोणत्या पद्धतीने करावी हे सांगण्यासाठी वापरलेले पाचवे अशी अनेक रजिस्टर्स आहेत. ते पाहता संस्कृतभाषा कोणत्या ना कोणत्या काळी अनेक 'डोमेन्स'मधे वापरली जात होती हे दिसते.

आता सध्यापुरते बोलायचे झाले, तर संस्कृतभाषेतही नवनिर्मिती होते आहे. काही वर्षांपूर्वी साहित्य अकादमीने संस्कृतमधे लिहिल्या गेलेल्या एका पुस्तकाला पुरस्कारही दिला होता. मी स्वतः महाविद्यालयात असताना संस्कृतमधे आजच्या काळातले विषय घेऊन लिहिली गेलेली नाटके केली आहेत. आपल्या माहितीसाठी, त्यातले एक नाटक मुंबईत लोकल ट्रेनमधे झालेल्या एका घटनेवर होते, दुसरे नाटक जुगाराचे आजच्या काळातले स्वरूप यावर होते तर तिसरे नाटक भांडारकर संस्थेवर झालेला हल्ला, त्यामागील राजकीय हेतू यांवर होते. आणि महत्त्वाची गोष्ट ही की या नाटकांचा बहुतांश भाग कोणा संस्कृत पंडिताने नव्हे तर आम्ही १८-१९ वर्षांच्या मुलांनी मिळून लिहिलेला असे. अशी नाटके करणारे आमचे महाविद्यालय एकमेव नव्हे, पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय (मराठी/ इंग्रजी कथा / एकांकिका घेऊन त्यांचे संस्कृत रुपांतरण करणे ही फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांची स्पेशॅलिटी आहे), स. प. महाविद्यालय, रेणुकास्वरूप इत्यादि शाळा, रत्नागिरीतले एक महाविद्यालय हे सर्व गेली काही वर्षे स्वतः नवीन संस्कृत एकांकिका लिहीत आहेत व सादर करत आहेत. इतकेच नव्हे तर राज्यपातळी वर या एकांकिकांच्या स्पर्धा होतात, राज्यनाट्य स्पर्धांमधे तर संस्कृत एकांकिकांची एक स्वतंत्र स्पर्धा होते. मराठीइतक्या मोठ्या प्रमाणावर नवनिर्मिती होत नसेल कदाचित, पण म्हणून 'मी पाहिले नाही या अर्थी संस्कृतमधे नवनिर्मिती होत नाही', असे म्हणणे योग्य नव्हे. आपण 'पाहिले' नाही, तर आपल्याला 'दिसणार' कसे?

थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की संस्कृतभाषा ही तांत्रिकदृष्ट्या मृत नाही. ती एक पुनरुज्जिवीत केलेली भाषा आहे.

हा मुद्दा संस्कृतप्रेमींनी लक्षात घ्यायला हवा आहे. संस्कृत कशी महान आहे, संस्कृत कशी बोलीभाषा आहे, संस्कृतात कशी नवनिर्मिती होते, ज्यांना संस्कृत येत नाही किंवा संस्कृत आवडत नाही ते कसे असंस्कृत आहेत, हे दहावेळा ओरडून सांगितल्याने चित्रपटांत दाखवतात तसे लोकांचे अचानक हृदयपरिवर्त होऊन ते एका क्षणात संस्कृतद्वेष्ट्यांचे संस्कृतप्रेमी होणार नाहीत. शिवाय काय आवडावे, काय नाही, कशावर विश्वास ठेवावा, कशावर नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, त्यामागे ज्याची त्याची एक स्वतंत्र वैचारिक भूमिका असते. तिचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. एखाद्याला संस्कृत आवडत नाही म्हणून त्याच्या ऊरावर बसून वाच संस्कृत,शिक संस्कृत, संस्कृत आवडून घे असे प्रकार करण्यात किंवा वैयक्तिक टीका करण्यात काहीच हशील नाही. अर्थातच हे संस्कृतप्रेमींप्रमाणेच इतरांनाही लागू होते. एखादी व्यक्ती संस्कृतबद्दल अत्यंत प्रेमाने काहीतरी बोलते आहे, म्हणून मराठीच्या प्रत्येक शब्दाला शेवटी 'म्' लावून एक प्रतिसाद लिहून तिची खिल्ली उडवणे योग्य नाही.

उपक्रमावर गेले काही दिवस जे वाद चालले आहेत, ते अत्यंत निंदनीय आहेत, त्याबद्दल वेगवेगळ्या सदस्यांना 'आता पुरे' अशा अर्थाचे निरोप पाठवले असता, 'सुरुवात त्याने केली', 'त्याने थांबवलं तर मी थांबवेन' अशा प्रकारची उत्तरे आलेली आहेत. कृपया एवढे लक्षात घ्या की अशा वादांमुळे उपक्रमाची व संस्कृतची निंदा होते, ते लिहिणार्‍यांची नव्हे.

वरील वाक्य उपक्रमाच्या धोरणाप्रमाणे उडवले जाण्यायोग्य आहे हे माहित आहे, परंतू कृपया ते २ दिवस तरी ठेवावे.

आता माझा स्वतःचा पुढचा मुद्दा असा की, ठीक आहे आपण मान्य करुया की संस्कृत ही फक्त तांत्रिकदृष्ट्याच जिवंत भाषा आहे, मराठी, इंग्रजी च्या प्रकारे 'जिवंत' भाषा म्हणता येतील, त्याप्रकारे संस्कृतभाषा जिवंत नाही. सो व्हॉट? त्यामुळे संस्कृतमधे एकेकाळी प्रचंड ग्रंथनिर्मिती झाली आहे हे सत्य बदलत नाही. या सर्व ग्रंथांचा मोठ्या प्रमाणावर बारकाईने अभ्यास केला जाण्याची आवश्यकता आहे, हेही तितकेच खरे आहे. संस्कृत ग्रंथांमधे विज्ञान आहे की नाही या वादात मला पडायचे नाही. परंतू माझ्या विषयापुरते बोलायचे झाल्यास, संस्कृतमधे व्याकरणविषयक जे ग्रंथ आहेत, ते फक्त व्याकरणाच्याच नाही तर भाषाविषयक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाश्चिमात्त्य भाषाशास्त्रज्ञांना पाणिनी, पतंजली नंतर आता कुठे भर्तृहरी, दिङ्नाग, कात्यायन, कौंडभट्ट यांचे 'शोध' लागत आहेत. या क्षेत्रात किती संशोधन करता येईल याला सीमा नाही. (बर्‍याच लोकांचा असा ठाम गैरसमज असलेला मी पाहिलेला आहे की पाणिनीनंतर कोणी वैयाकरणी झालाच नाही म्हणजे पाणिनीनंतरच्या काळात संस्कृत भाषेत काही बदल झालाच नाही, त्यांना मी यानिमित्ताने सांगू इच्छिते की पाणिनीनंतर किमान १० वैयाकरणी होऊन गेले आहेत. कात्यायनाने तर पाणिनीच्या सूत्रांना पुरवण्या जोडून कात्यायनाच्या काळात संस्कृत भाषा कोणकोणत्या वाक्यप्रयोगांच्या बाबतीत बदलली होती, ते सांगितले आहे. संस्कृत भाषा प्रवाही होती व इतर 'जिवंत' भाषांप्रमाणे एकेकाळी बदलत होती याचा हा पुरावा आहे) मगाशी संस्कृत घेणार्‍या लोकांना अर्थार्जनाच्या संधी नाहीत असे कोणीतरी म्हटलेले वाचले. काही अंशी हे खरे आहे. परंतू संस्कृत शिकवल्या जाणार्‍या शाळा, महाविद्यालये, विश्वविद्यालये, सरकारपुरस्कृत इतर संस्था यांची संख्या खूप मोठी आहे. या सर्वांत अध्यापन व संशोधन यांसाठी सतत संस्कृततज्ञांची मागणी असते. परंतू जर्मन/ हिंदी भाषा शिकल्यावर भाषांतर करून जितक्या मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करता येईल, तितक्या मोठ्या प्रमाणात संस्कृतच्या बळावर करता येत नाही, हे खरे आहे,पण म्हणून संस्कृतभाषेला उपयोगमूल्यच मुळी राहिलेले नाही, असे अजिबात नाही.

संस्कृत भाषेतच बोलण्याचा आग्रह धरणारे (उपक्रमावरचे व बाहेरचेही) माझे स्नेहीच आहेत, त्यांच्याशी माझी अत्यंत चांगली मैत्री आहे, परंतू तरीही थोडी नकारात्मकता स्वतःकडे घेऊन त्यांना सुचवावेसे वाटते, की संस्कृत ही भाषा आहे म्हणून ती बोलली पाहिजे हे जरी खरे असले, तरी आजच्या काळात संस्कृतमधे बोलल्याने काय उपयोग होणार आहे, याचा साकल्याने विचार करावा. संस्कृतचा प्रसार व्हावा म्हणून सरकारने वेगवेगळ्या संस्कृत संस्थांना अनुदान देऊन, प्रसंगी नव्या संस्था निर्माण करून संस्कृत बोलणे शिकवण्याचे वर्ग सुरू करवले. उद्देश हा की,संस्कृत भाषा समजायला लागली, की लोक संस्कृत ग्रंथांच्या वाचनाकडे वळतील, मग त्यातून पुढे काही त्या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रेरित होतील. परंतू आजची स्थिती पाहिल्यास, संस्कृतप्रेमींमधे सरळ सरळ दोन तट पडले आहेत. एक जे संस्कृतविषयक संशोधन करतात पण संस्कृतचा वापर बोलण्यासाठी करत नाहीत, व दोन जे फक्त संस्कृतमधे बोलतात व ते इतरांना शिकवतात, त्या संस्कृतचा वापर सुवचनांपलिकडे जाऊन अभिजात साहित्य वाचणे, संशोधन करणे यासाठी करत नाहीत. संस्कृत बोलणारे व त्याचा पुढे अभ्यासही करणारे लोक फार म्हणजे फारच कमी आहेत. यामुळे होते काय, की संस्कृतभाषिकांची एक परंपरा निर्माण होत आहे. हे संस्कृतभाषिक स्वतः संस्कृत शिकतात, संस्कृतमधे बोलतात व इतरांना संस्कृत बोलायला शिकवतात, त्यांचे विद्यार्थीही तेच करतात. परंतू संस्कृत भाषा 'तगवणे' या पलिकडे याचा काय उपयोग होतो? आणि यातून पुढचा प्रश्न असा उद्भवतो की संस्कृत भाषेला 'तगवल्याने' संस्कृतचं काय भलं होतं?

संस्कृत भाषा बोलणारे लोक आज अस्तित्त्वात आहेत हे खरे. पण सो व्हॉट, त्यांनी संस्कृतच्या संशोधनामधे नक्की किती योगदान दिले? संस्कृत बोलणे, सुवचने वाचणे ऐकवणे इथे संस्कृत संपत नाही, ती केवळ सुरुवात आहे. फक्त सुरुवातीवरच अडून बसणे आणि पुढे न जाणे, यांत फारसे काही हशील नाही.

या आख्यानाची तात्पर्ये पुढील प्रमाणे (ती संस्कृतप्रेमी व इतर दोघांसाठीही सारखीच लागू होतात)-
१-जशी आपली एक वैचारिक भूमिका असते तशी विरुद्ध मताच्या व्यक्तीचीही असते, तिचा आदर करावा.
२- आपण ज्या तत्त्वांना मानतो, व त्या तत्त्वांप्रमाणे चालतो, त्यांना काही अर्थ आहे का, त्यांचा काही उपयोग आहे का हे सतत तपासून पहावे. मुद्दाम संस्कृतच्या विरुद्ध नारेबाजी केल्याने व संस्कृतच्या बद्दल आपले प्रेम व्यक्त केल्याने खरेच कुणाचे भले होते का याचा विचार करावा.

राधिका

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख

आणि संतुलित लेख. अतिशय आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

हॅट्स ऑफ

राधिकाताई,

लेख फार सुंदर झाला आहे. संस्कृतभाषा ही आता मृत किंवा जिवंत आहे याचा शोध लावून नक्की साध्य होणार आहे हेच मला कळत नाही.

१-जशी आपली एक वैचारिक भूमिका असते तशी विरुद्ध मताच्या व्यक्तीचीही असते, तिचा आदर करावा.
२- आपण ज्या तत्त्वांना मानतो, व त्या तत्त्वांप्रमाणे चालतो, त्यांना काही अर्थ आहे का, त्यांचा काही उपयोग आहे का हे सतत तपासून पहावे. मुद्दाम संस्कृतच्या विरुद्ध नारेबाजी केल्याने व संस्कृतच्या बद्दल आपले प्रेम व्यक्त केल्याने खरेच कुणाचे भले होते का याचा विचार करावा.

ही दोन वाक्ये फार आवडली. मराठी संकेतस्थळांवर चालू झालेला बुशिझम पाहून फार वाईट वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असेच म्हणतो.

राधिकाताई खूपच छान लेख झाला आहे. आवडला. संस्कृत भाषा आज जिवंत आहे का नाही, असली तर ती जगणार का नाही वगैरे बाबींची मला फारशी काळजी वाटत नाही.
मात्र माझ्या मायबोली मराठी व्यतिरिक्त माझ्या संस्कृतीशी जवळ अशी एखादी भाषा आहे, तिच्यात छान छान सुभाषिते आहेत, भलामोठा शब्दसंग्रह आहे, मातब्बर ग्रंथ या भाषेत आहेत, कित्येक काळापासून ती चालत आल्याने तिला एक खास असे गूढतेचे वलय आहे, या भाषेतला भलामोठा शब्दकोश घेऊन बसता तिच्यातूनच आलेले कित्येक शब्द माझ्या मराठीत असल्याचे पाहून वाटणारे आश्चर्य वगैरेसाठी तरी मला संस्कृत खूप आवडते आणि या लिहलेल्या काही गोष्टींसाठी तरी ती असावी असे मनापासून वाटते.

बाकी कर्णभाऊ, बुशिझम हे काय नवीन काढलेत? त्याचा अर्थ काय होतो?

(दहावीला संस्कृतात ९५ मार्क मिळवलेला
आणि आज या भाषेशी पूर्वीइतकी जवळीक नसल्याने वाईट वाटणारा)
सौरभ.

बुशिझम

बुशिझम ही फारच जनरल संज्ञा आहे.
मला हे म्हणायचे होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुरेख विवेचन

प्रतिसादाचे लेखात रुपांतर केल्याबद्दल धन्यवाद.

असेच म्हणतो

उत्तम लेख.

धन्यु.

चला ते घडवु या.

संस्कृत मृत आहे अथवा मृत होणार आहे या चर्चेत मला रस नाही. माझी एक धारणा आहे की संस्कृतच्या दुरावस्थेमूळेच भारतीय भाषांच्या दुरावस्थेला सुरवात अथवा त्यांच्या दुरावस्थेची गती वाढली आहे.

यासाठीच कोणत्याही भाषेचा विकास, वाढ, प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक असते. आम्ही मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी एक उपक्रम म्हणून पुस्तकविश्व www.pustakvishwa.com नावाचे संकेतस्थळ निर्माण केलेले आहे. या स्थळाचे वैशिष्ठय म्हणजे येथे संस्कृत भाषेच्या प्रकाशकांनाही आपली प्रसिद्धी विनामूल्य करता येईल.

माझ्या माहितीप्रमाणे किलापारडी येथे संस्कृत भाषेचे प्रकाशन नियमितपणे होते, कालच पुण्याच्या पुस्तकमेळ्याव्यात मला दिल्लीचे एक प्रकाशक भेटले, की जे संस्कृत भाषेचे पुस्तकेही प्रकाशित करतात, त्यानाही मी या स्थळाचे निमंत्रण दिले आहे.

माझी सर्व उपक्रमी बंधु आणि भगिनीना विनंती आहे की त्यांनी अश्याच प्रकारची माहिती मला व्यनि द्वारे अथवा सरळ प्रकाशकांना कळवावी.

शेवटी सर्वच भारतीय भाषांचा कणा संस्कृत भाषा आहे असे मला वाटते.

संस्कृत मरणार आहे, हिचे मुल्य काय असे प्रश्न निर्माण करण्यात आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा यावर लिखाण करु या, यातील असणार्‍या अडचणीचा सामना करु या.

संस्कृत भाषेच्या पुस्तकावर वरील संकेतस्थळावर मराठीत परीक्षण / परिचय / रसास्वाद / रसग्रहण लिहावेत अशी प्रार्थना.

मुद्दा..

यातील असणार्‍या अडचणीचा सामना करु या.

मुद्दा हा नाही की अडचणी आहेत! मुद्दा हा आहे की या अडचणी आल्याच का? संस्कृत भाषेवर जीवनमरणाची वेळ का यावी?

जीवनमरणाची वेळ येण्याइतकी ही भाषा आजच्या घडीला का अशक्त ठरली आहे? हा प्रश्न आहे!

मी एखाद्या पानवल्याकडे जाऊन बनारसी १२०, कच्ची सुपारी, वेलची सोलून.." अशी ऑर्डर आज संस्कृतमध्ये दिली तर तो आणि आजुबाजूचे माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहतील याची मला खात्री आहे.

बर्‍याच मंडळींनी आपापल्या प्रतिसादात संस्कृतमध्ये पूर्वापार निर्मिलेले जे सहित्य आहे त्याबद्दल लिहिले आहे. माझ्या मूळ चर्चाप्रस्तावात ते मी कुठेही नाकारलेले नाही. आजच्या घडीला साहित्य, नाटक, चित्रपट, आदी गोष्टीत अक्षरश: कुठेही संस्कृतची नावनिशाणीही दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.

काही मंडळी संस्कृत बोलले जाण्याची वगैरे अपवादात्मक उदाहरणे देताहेत परंतु ती उदाहरणे केवळ अपवादात्मकच आहेत असे नमूद करावेसे वाटते..!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हिच तर वेळ् आहे.

आपले म्हणणे बरोबर आहे. आज संस्कृतचे पुनर्जिवन शक्य आहे. आज जी गोष्ट संस्कृतच्या साठी आपण विचारत आहात तीच वेळ आपण जागे राहिलो नाहीतर मराठीसाठी येईलच.

कोणतीही भाषा ही तिच्या निर्मितीच्या जोरावरच टिकु शकते.

पटले नाही

मुद्दा पटवण्याकरिता तुम्ही जे उदाहरण दिले आहे, ते अप्रस्तुत वाटते. पानवाल्याला "बनारसी १२०, कच्ची सुपारी, वेलची सोलून.." हे संस्कृतच काय, फ्रेंच/स्पॅनिश भाषांमध्ये सांगितले, तरी तुमच्याकडे आजुबाजूचे चमत्कारिक नजरेनेच बघतील. मुळात ज्याला जी भाषा येते, त्याच्याशी त्याच भाषेत बोलावे हा सर्वसाधारण प्रघात आहे. त्यामुळे संस्कृत उपयोगी नाही हे सिद्ध होत नाही. पुलंच्याच शब्दांमध्ये - "आमच्या हिच्या थालिपीठाची चव कश्शा-कश्शाला नाही" हे इंग्लिशमध्ये नाही सांगता येणार. प्रत्येक भाषेच्या काही खुबी आहेत, त्या त्या-त्या भाषेतच शोभून दिसतात. त्या निकषावर आपण दुसर्‍या भाषेत त्याचे ऍप्लिकिशन नाही करू शकत.

लेख आवडला

संतुलित लेखनासाठी राधिका यांना धन्यवाद.

संतुलित?

खरे तर उपक्रमावर लिहायचे नाही असेच ठरवले होते. पण या लेखाची संतुलित अशी भलावण झाल्याने एकदा वाचून पाहिला. आवडला असे म्हणायला जीभ रेटत नाही. म्हणजे व्यासंगपूर्ण आहे यात शंका नाही. पण

विसोबा खेचरांनी ज्या मुद्द्यांच्या आधारांवर संस्कृत मृत भाषा आहे असा निष्कर्ष काढला होता त्या सर्व मुद्द्यांचे सप्रमाण खंडन केल्यावर "संस्कृत जिवंत भाषा आहे" ऐवजी "संस्कृत तांत्रिकदृष्ट्या जिवंत आहे (पक्षी: मृत आहे)" असा निष्कर्ष कसा काढला हे मला समजले नाही. अर्थात आमच्या बुद्धीची झेप तोकडी आहे हे पण कारण असू शकेल. याबाबतीत श्री. धनंजय यांनी एके ठिकाणी जे लिहिले आहे "अमुक एक भाषा मृत आहे असे मी म्हणणार नाही. ....ज्ञानेश्वरांची भाषा जिवंत आणि कालिदासाची भाषा मृत म्हणण्यात काही हशील नाही" हे जास्त पटते.

संस्कृतच्या प्रसारकांबद्दल लेखिकेने जे काही लिहिले आहे ते अत्यंत आक्षेपार्ह वाटते. प्रसारक लोक जनमानसात असलेली संस्कृतची "अवघड भाषा" आहे ही भीती घालवण्यासाठी संभाषण संस्कृत सारखे उपक्रम करतात. त्याने काही प्रमाणात तरी लोकांच्यात संस्कृतप्रेम उत्पन्न होते याबदल दुमत नसावे. या प्रयत्नांचे उपक्रमवर किंवा इतरत्र स्वागतच व्हावे. या ऐवजी इथे संस्कृत मृत भाषा आहे तिला पुरून टाका असा सूर (चित्रमय) इथे अनेकांनी लावला होता. आता या सर्व प्रकाराबद्दल लेखिकेचे धोरण काय आहे हे बघू. सर्वप्रथम संस्कृतप्रसारकांना लेखिकेने धारेवर धरले आहे. "आवडून घ्या, शिका" असा आरडाओरडा केल्याने लोकांना संस्कृत आवडणार नाही हे त्यांनी अचूक सांगितले आहे. मात्र नेमके काय केले असता लोकांना संस्कृत आवडेल याबद्दल मौन बाळगले आहे.

लेखिकेचा दुसरा आक्षेप असा की हे प्रसारक लोक फक्त संस्कृत बोलण्यावरच भर देतात, त्यापुढे मूलभूत संशोधन करत नाहीत. याबद्दल माझे मत असे की मनुष्य आपली मातृभाषा पहिल्याने बोलायला शिकतो, मग लिहिणे, व्याकरण वगैरे. असे केल्याने भाषा शिकणे सोपे जाते असे वाटते. बहुतेक लोक इंग्रजी भाषा प्रथम लिहिणे, मग व्याकरण आणि शेवटी बोलणे अशा पद्धतीने शिकल्याने ती त्यांना किंचित अवघड जात असावी. त्यामुळे संस्कृत शिकण्याची सुरूवात बोलण्याने करावी हे नैसर्गिक वाटते.

राहता राहिला मुद्दा मूलभूत संशोधनाचा. मूलभूत संशोधन करायचे की नाही किंबहुना कला शाखेत जाऊन संस्कृतमध्ये पदवी , द्विपदवी आणि त्यानंतर विद्यावाचस्पती या पदवीपर्यंत शिकायचे की नाही त्यापुढे शिक्षकी करायची की संशोधन करायचे हे सर्व निर्णय व्यक्तिगत पातळीवर घेतले जातात, त्यात संस्कृत भारतीसारख्या संस्थांना करण्यासारखे फारसे नसते त्यामुळे हे लोक फक्त पहिल्या पातळीवरच अडकून पडतात पुढे जात नाहीत या युक्तिवादात अर्थ नाही. मूलभूत संशोधन वगैरे न करता फक्त बोलायला शिका असे संस्कृत भारतीवाले नक्कीच म्हणणार नाहीत याची खात्री आहे. दुसरे म्हणजे बोलण्यापुरती संस्कृत शिकायला कुठलीही पात्रता आवश्यक नाही. अगदी माझ्यासारखा असंस्कृत मनुष्यालाही थोड्याशा प्रयत्नाने संस्कृत बोलता येईल असा विश्वास वाटतो पण मूलभूत वगैरे संशोधन करायचे तर पी. एच्. डी. करावी लागते ती किती लोक करू शकतात? आता हे सर्व मुद्दे लेखिकेच्या ध्यानात खरेच आले नसतील का? मला तसे वाटत नाही. या प्रसारक लोकांना एकदा आडव्या हाताने घेतलेच पाहिजे अशा काहीशा भूमिकेतून हे लिहिले असावे असा माझा कयास आहे.

आता इथे एका माननीय सदस्याने खरडवहीत संस्कृतचे थडगे बांधले होते. त्यावर सदर लेखिकेने वारंवार "कृपया ते चित्र काढा, मी आपल्याशी सहमत आहे पण ते कृपया चित्र काढा" अशा विनवण्या केल्या, पण त्यापलिकडे जाऊन तीव्र शब्दात निषेध केला का? तर नाही. म्हणजे संस्कृतबद्दल अत्यंत हीन अभिरूची दर्शवणारी चित्रे खरडवहीत टाकणार्‍या सदस्याबद्दल कमालीचे नरमाईचे धोरण, लांगूलचलन, आणि बिचार्‍या संस्कृतप्रसारकांना मात्र कठोर शब्दात धारेवर धरणे यालाच संतुलित वगैरे प्रतिसाद म्हणायचे का?

इथले संस्कृतप्रसारक अगदीच निर्दोष आहेत असे कुणीच म्हणणार नाही. त्यांचे जे काही चुकले असेल, कोणाला कठोर शब्द वापरून दुखावले असेल तर त्या सदस्याला जरूर समज द्या तसेच संस्कृतची विटंबना करणार्‍यालाही. पण विटंबना करणार्‍याचेलांगूलचलन आणि प्रसारकांची सरसकट बदनामी करणारी टीका अशा दुटप्पी धोरणाचा मी तरी निषेध करतो.

जाता जाता शेवटचे, काही वर्षांपूर्वी शिल्पा दातार या दारुबंदीविषयक लेख लिहीत. तेव्हाही काही सदस्यांनी त्यांची टवाळी केली होती. त्या सोडून गेल्या. आता इथले संस्कृतप्रसारक पण अशा "संतुलित" लेखनाने, विटंबना करणार्‍या चित्रांनी, विखारी टीकेने निघून जातील हे सर्व उपक्रमाला शोभा देणारे आहे का याचा सर्व उपक्रमींनी विचार करावा.

विनायक

सहमत..

जाता जाता शेवटचे, काही वर्षांपूर्वी शिल्पा दातार या दारुबंदीविषयक लेख लिहीत. तेव्हाही काही सदस्यांनी त्यांची टवाळी केली होती. त्या सोडून गेल्या.

हम्म! अलिकडे बर्‍याच दिवसात शिल्पाताई उपक्रमावर दिसल्या नाहीत खर्‍या!

असो, मी त्यांची टवाळी करणार्‍यांचा निषेध करतो.. उपक्रमावरील त्यांचे दारुबंदीविषयक लेख खरंच खूप उद्बोधक व माहितीपूर्ण असत!

आपला,
(ड्राय डे प्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सदर सदस्या

हम्म! अलिकडे बर्‍याच दिवसात शिल्पाताई उपक्रमावर दिसल्या नाहीत खर्‍या!

सदर सदस्या उपक्रमावर पुन्हा दाखल झालेल्या आहेत. लिहित्याही आहेत. सध्या येथे नसल्यास त्यांना इतर कामे असावीत. http://mr.upakram.org/user/685 तेव्हा कोणालाही काळजी नसावी आणि उगीच त्यांचे नाव घेऊन विषयांतर करण्याची गरजही नाही.

बरे.

आवडला असे म्हणायला जीभ रेटत नाही.

बरे. मत कळवल्याबद्दल धन्यवाद.

सर्व मुद्द्यांचे सप्रमाण खंडन केल्यावर "संस्कृत जिवंत भाषा आहे" ऐवजी "संस्कृत तांत्रिकदृष्ट्या जिवंत आहे (पक्षी: मृत आहे)" असा निष्कर्ष कसा काढला हे मला समजले नाही.

माझा युक्तिवाद वरील लेखात उपलब्ध आहे. तो पुन्हा एकदा नीट वाचावा. तो समजला नसण्याचे एक कारण शक्य आहे, ते म्हणजे आपण 'मृत' या शब्दाला भावनिक मूल्य जोडत असावात. मी तो शब्द भाषाशास्त्रातील एक तांत्रिक संज्ञा म्हणून वापरला आहे. ज्या भाषेचा एकही भाषिक शिल्लक नाही, तिला मृत म्हटले जाते. ते तसे म्हटले जाऊ नये, हा संस्कृत संभाषणवर्गामागच्या अनेक हेतूंपैकी एक हेतू आहे. पण कृत्रिमरीत्या ती भाषा लोकांना शिकवून त्या लोकांनी फक्त त्या भाषेचे पुनरुज्जीवन करायचे या एकाच उद्देशाने ती आपापसात बोलून ती भाषा फक्त तांत्रिकदृष्ट्या जिवंत होते, मराठी सारखी 'जिवंत' होत नाही. हे मी परत परत माझ्या लेखात म्हटले आहे.

याबाबतीत श्री. धनंजय यांनी एके ठिकाणी जे लिहिले आहे "अमुक एक भाषा मृत आहे असे मी म्हणणार नाही. ....ज्ञानेश्वरांची भाषा जिवंत आणि कालिदासाची भाषा मृत म्हणण्यात काही हशील नाही" हे जास्त पटते.

आपण जे विधान उद्धृत केले आहे ते धनंजयरावांचे व्यक्तिगत मत झाले. शिवाय ते वाचले असता 'ज्ञानेश्वरांची भाषा जिवंत आणि कालिदासाची भाषा मृत म्हणण्यात काही हशील नाही' आणि 'संस्कृत- जिवंत की मृत? काय फरक पडतो?' यांच्यात १००% जरी नसले, तरी ५०% हून अधिक मतसदृशता दिसते. फरक इतकाच आहे की मी संस्कृतला मृत ही तांत्रिक संज्ञा दिली, ती द्यायची त्यांनी नाकारली.

संस्कृतच्या प्रसारकांबद्दल लेखिकेने जे काही लिहिले आहे ते अत्यंत आक्षेपार्ह वाटते.

बरे.

प्रसारक लोक जनमानसात असलेली संस्कृतची "अवघड भाषा" आहे ही भीती घालवण्यासाठी संभाषण संस्कृत सारखे उपक्रम करतात. त्याने काही प्रमाणात तरी लोकांच्यात संस्कृतप्रेम उत्पन्न होते याबदल दुमत नसावे. या प्रयत्नांचे उपक्रमवर किंवा इतरत्र स्वागतच व्हावे.

सहमत आहे. परंतू आपल्या वाक्यातील 'काही प्रमाणात' हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. या प्रयत्नांचे उपक्रमावरच काय् इतर ठिकाणीही स्वागतच आहे. इथे मी विरोध केला आहे तो इतरांच्या मतांप्रति दाखवल्या जाणार्‍या असहिष्णुतेबद्दल व स्वतःच्या मतांना दुसर्‍यांवर लादण्याच्या केल्या जाणार्‍या प्रयत्नांबद्दल.

"आवडून घ्या, शिका" असा आरडाओरडा केल्याने लोकांना संस्कृत आवडणार नाही हे त्यांनी अचूक सांगितले आहे. मात्र नेमके काय केले असता लोकांना संस्कृत आवडेल याबद्दल मौन बाळगले आहे.

याबद्दल 'मौन् बाळगण्याचे' कारण म्हणजे, तो त्या प्रतिसादाचा विषय नव्हता. पण हा तुमच्या प्रतिसादाचा असल्याने इथे त्याला उत्तर देते. माझे वैयक्तिक मत म्हणजे संस्कृत भाषेची गोडी वाढवण्यासाठी पुढील गोष्टी करता येतील.-
१- संस्कृत ही भाषा कशी सोपी आहे हे दाखवणे. परंतू याचा अर्थ संस्कृत भाषा ही 'बोलायला' कशी सोपी आहे हे दाखवणे असा नव्हे. संस्कृत 'समजायला' कशी सोपी आहे, एवढे दाखवले तरी पुरे हे मला स्वतःच्या, माझ्या विद्यार्थ्यांच्या, माझ्या संस्कृत न बोलणार्‍या पण संस्कृत उत्कृष्टपणे शिकवणार्‍या मित्रमंडळींच्या व त्यांच्यामुळे संस्कृतमधे पदवी शिक्षण घेण्यास प्रेरित झालेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या उदाहरणावरून सांगू शकते. इंग्रजी संभाषणाचे वर्ग काढले जातात कारण अभ्यास व कामाच्या क्षेत्रांमधे जास्तीत जास्त व्यवहार इंग्रजी भाषेतून जातो, तिथे लोक इंग्रजीतून बोलतात. संस्कृत संभाषण वर्ग सुरू होण्यापूर्वी संस्कृत कोठे बोलले जात होते, की जेणेकरून संस्कृत बोलण्याची गरज भासावी? (कदाचित पाठशाळांत संस्कृत बोलले जात असेल, पण किती टक्के मुले पाठशाळांत शिकतात?)
२- एकदा संस्कृत समजायला कशी सोपी आहे, हे दाखवले, की प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीचा विषय जाणून घेऊन त्या विषयावर लिहिल्या गेलेल्या संस्कृत ग्रंथांची त्याला ओळख करून द्यावी. मग त्या विद्यार्थ्याच्या वय, बौद्धिक क्षमता, अभ्यासाची इच्छा यांचा विचार करून ते ग्रंथ वाचायला देणे , ते वाचण्यात व त्यावर विचार करण्यात मदत करणे. त्या ग्रंथांतील ज्ञानाची आजच्या तंत्रज्ञानाशी सांगड घालणे शक्य आहे का, यावर विचार करण्यास प्रवृत्त करणे.
३- संस्कृतच्या बळावर अधिकाधिक अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणे. (हे काही संस्थांकडून केले जाते, पण त्यातही अधिक भर संस्कृतवर दिला गेल्याने त्यांच्या योजना प्रत्यक्षात उतरतातच असे नाही)
४- संस्कृतबद्दल लोकांचे असलेले गैरसमज व अज्ञान काढून टाकण्यासाठी त्याचे भावनेच्या आहारी न जाता केलेले सप्रमाण खंडन असलेले अधिकाधिक लिखाण करून त्याचा प्रसार करावा, जेणेकरून लोकांत जागृती निर्माण होईल. संस्कृत का शिकावी? या प्रश्नाला 'ती महान भाषा आहे, ती सुंदर भाषा आहे, तिच्यात महान ग्रंथ-सुवचने आहेत' एवढेच उत्तर देऊन न थांबता, ती भाषा का महान आहे, का सुंदर आहे, ते महान ग्रंथ कुठे मिळतील, त्यांचा अर्थ कसा समजून घ्यावा, त्यांचा उपयोग आताच्या काळात कसा करावा यांचीही उत्तरे द्यावीत, ती माहित नसल्यास स्वतः शोधायचा प्रयत्न करावा.

हे न करता फक्त संस्कृत संभाषणावरच भर दिला जातो. संस्कृत बोलायला शिकणे यात वाईट काहीच नाही, परंतू फक्त तेवढेच करणे, याला माझा आक्षेप आहे. अर्थांत तो व्यक्तिगत प्रश्न आहे, असे कोणी म्हणू शकेल. परंतू संस्कृत प्रचार-प्रसारासाठी जीवन समर्पित करणार्‍या लोकांनी मात्र आपण काय करणार हे ठरवण्यापूर्वी सारासार विचार केला पाहिजे, हे केल्याने काय् होईल , ते केल्याने काय होईल, यांचा अंदाज घेतला पाहिजे. एवढे करून जर एखाद्याला वाटले की संस्कृत संभाषणानेच संस्कृतचा उद्धार होईल, तर मग त्याच्या निर्णयाला हरकत घ्यायचे कारण नाही. परंतू किती जण हा विचार करतात? किती जणांना आपण करतोय ते बरोबर करतोय का असा प्रश्न पडतो?

हे सर्व लिहिताना मला फक्त उपक्रमावरचे संस्कृतसंभाषणवादी अभिप्रेत नाहीत. उलट उपक्रमावरचे संस्कृतसंभाषणवादी यांना त्यांच्या विषयाचे पूरेसे ज्ञान तरी आहे. इतर संस्कृतसंभाषणवादींपैकी एक 'वृद्धि' हा शब्द 'वृद्ध' या शब्दाचे सप्तमी एकवचन आहे असे तृतीय वर्ष संस्कृत साहित्याच्या विद्यार्थ्यांना सांगत असल्याचे ऐकले आहे. संस्कृत भाषेशी गेली १० वर्षे अविरत संबंध आल्याने संस्कृत संभाषण वादी, संस्कृत न बोलणारे संस्कृतप्रेमी या सर्वांशी माझा बराच जवळून संबंध आला आहे, अजूनही येतो आहे. माझी मते या माझ्या दहा वर्षांच्या अनुभवावर आधारलेली आहेत, ती कृपया उपक्रमावरच्या संस्कृतप्रेमींना उद्देशून आहेत, असा गैरसमज कोणी करू नये. संस्कृतचा प्रसार फक्त संस्कृत संभाषण केल्याने व शिकवल्याने होतो, या मताला माझा विरोध आहे, तो मांडणार्‍या व्यक्तींना नाही.

याबद्दल माझे मत असे की मनुष्य आपली मातृभाषा पहिल्याने बोलायला शिकतो, मग लिहिणे, व्याकरण वगैरे. असे केल्याने भाषा शिकणे सोपे जाते असे वाटते.

सहमत आहे. परंतू येथे 'मातृभाषा' या शब्दाला महत्त्व आहे. संस्कृत ही कोणाची मातृभाषा आहे? इथे पुन्हा सांगायला हवे, की 'मातृभाषा' ही एक तांत्रिक संज्ञा आहे. तिचा अर्थ लहानपणापासून आई किंवा घरातील इतर लोकांकडून शिकवली गेलेली भाषा. संस्कृत ही सर्व भाषांची 'जननी' आहे म्हणून ती आपली 'मातृभाषा' वगैरे मुद्दे येथे फोल ठरतील.

मूलभूत संशोधन करायचे की नाही किंबहुना कला शाखेत जाऊन संस्कृतमध्ये पदवी , द्विपदवी आणि त्यानंतर विद्यावाचस्पती या पदवीपर्यंत शिकायचे की नाही त्यापुढे शिक्षकी करायची की संशोधन करायचे हे सर्व निर्णय व्यक्तिगत पातळीवर घेतले जातात, त्यात संस्कृत भारतीसारख्या संस्थांना करण्यासारखे फारसे नसते त्यामुळे हे लोक फक्त पहिल्या पातळीवरच अडकून पडतात पुढे जात नाहीत या युक्तिवादात अर्थ नाही.

माझा लेख नीट वाचून पाहिल्यास कळेल की हा युक्तिवाद संबंधित संस्थांच्या सर्व विद्यार्थ्यांबद्दल नाही, तर अशा विद्यार्थ्यांंबद्दल आहे, जे पुढे संस्कृतमधेच काम करायचे ठरवून त्याच संस्थेत किंव स्वतंत्रपणे संस्थेत केली जाणारी संभाषण-अध्यापनादि कामे करतात.

मूलभूत संशोधन वगैरे न करता फक्त बोलायला शिका असे संस्कृत भारतीवाले नक्कीच म्हणणार नाहीत याची खात्री आहे.

तसे म्हणत कोणीच नाही, परंतू वास्तव परिस्थिती काय दिसते?

पण मूलभूत वगैरे संशोधन करायचे तर पी. एच्. डी. करावी लागते ती किती लोक करू शकतात?

संस्कृत प्रचार-प्रसारासाठी जीवन समर्पित केलेल्यांसाठी ती मोठी गोष्ट नव्हे, कारण संशोधन करण्यासाठी पी. एच्. डी हा एकमेव मार्ग नाही. चार संस्कृत ग्रंथ घरी आणून वाचले व त्यावर विचार केला तरी पुरे झाले. शिवाय पी.एच्.डी करायची झाल्यास माझ्या माहितीप्रमाणे संस्कृतच्या संशोधनाला उत्तेजन देण्यासाठी काही अनुदान सरकारतर्फे काही अनुदान द्यायची तरतूद आहे, तेव्हा पी.एच्. डी करायला फारशी हरकत नसवी.

या प्रसारक लोकांना एकदा आडव्या हाताने घेतलेच पाहिजे अशा काहीशा भूमिकेतून हे लिहिले असावे असा माझा कयास आहे.

तो कयास चुकीचा आहे.

त्यापलिकडे जाऊन तीव्र शब्दात निषेध केला का? तर नाही.

आपली तीव्र शब्दांची व्याख्या माझ्या तीव्र शब्दांच्या व्याख्येहून वेगळी असावी.

म्हणजे संस्कृतबद्दल अत्यंत हीन अभिरूची दर्शवणारी चित्रे खरडवहीत टाकणार्‍या सदस्याबद्दल कमालीचे नरमाईचे धोरण, लांगूलचलन, आणि बिचार्‍या संस्कृतप्रसारकांना मात्र कठोर शब्दात धारेवर धरणे यालाच संतुलित वगैरे प्रतिसाद म्हणायचे का?

आपल्या माहितीसाठी, जाहीर रीत्या नसले तरी संबंधित संस्कृतप्रेमींना उपक्रमावरचा हा वाद निर्माण होण्यापूर्वी व त्याआधीही बर्‍याचदा वेगवेगळ्या प्रकारे समजावले आहे, आपल्या भाषेत तेही लांगुलचालन झाले पाहिजे. म्हणजे मी दोन्ही पक्षांचे सारखेच लागुलचालन केले आहे. शिवाय दोन्ही पक्षांना मी सारख्याच कठोरपंणाने सुनावले, असे माझे तरी मत आहे. कुणाला ते किती कठोर वाटावे हे सब्जेक्टिव्ह आहे, तेव्हा त्यावरून आक्षेप घेण्यात हशील नाही. आणि मुख्य म्हणजे लेखातली शेवटची दोन वाक्ये मी दोन्ही पक्षांना उद्देशून वापरली आहेत. आता सारखेच शब्द एकाला कठोरपणे म्हटले आहेत आणि दुसर्‍याला लांगुलचालन करण्यासाठी म्हटले आहेत, असा अर्थ आपल्याला काढायचा असल्यास माझी हरकत नाही. माझ्या लेखनाचा कोण काय अर्थ काढेल, यावर मी ताबा ठेवू शकत नाही.

शिवाय एखाद्या व्यक्तीला मी सहमती व्यक्त केली म्हणजे मी तिचे लांगुलचालन करते व एखाद्यच्या मताचा विरोध केला म्हणजे मी त्या व्यक्तीला विरोध करते असा होत नाही. आणि एकदा एकाच्या मताला सहमती व्यक्त केली म्हणून नेहमी त्या व्यक्तीच्या प्रत्येक मताला सहमती व्यक्त करेन असेही नाही, याची ज्याची त्याने नोंद घ्यावी.

जाता जाता शेवटचे, काही वर्षांपूर्वी शिल्पा दातार या दारुबंदीविषयक लेख लिहीत. तेव्हाही काही सदस्यांनी त्यांची टवाळी केली होती. त्या सोडून गेल्या. आता इथले संस्कृतप्रसारक पण अशा "संतुलित" लेखनाने, विटंबना करणार्‍या चित्रांनी, विखारी टीकेने निघून जातील हे सर्व उपक्रमाला शोभा देणारे आहे का याचा सर्व उपक्रमींनी विचार करावा.

आपण जसे वागू तसे इतर आपल्याशी वागतील, हे लक्षात ठेवून जर प्रत्येकाने लिखाण केले, तर विखारी टीका होण्याची वेळच येणार नाही. संबंधित संस्कृतप्रसारक व्यक्ती माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत, आमच्यात चांगली मैत्री आहे, तीही उपक्रमा आधीपासून. या व्यक्तींनी नुसतीच माझ्याशी मैत्री केली नाही, तर वेळोवेळी मला अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, प्रसंगी स्वतःकडची पुस्तके मला उधार दिली आहेत. इतक्या चांगल्या मित्र-मैत्रिणीला मी विरोध करणे, किंवा त्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करणे शक्य नाही. माझा विरोध केवळ त्यांच्या मतांना व ती मते व्यक्त करण्याच्या पद्धतीला आहे. व्यक्तीला विरोध करणे व व्यक्तीच्या मतांना विरोध करणे यांत फरक आहे.

राधिका

चांगला लेख

लेख चांगला आहे विधानांना संदर्भा आवश्यक आहे. ती विधाने व्यनीतून पाठवेन.

"परंतू संस्कृत भाषा 'तगवणे' या पलिकडे याचा काय उपयोग होतो? आणि यातून पुढचा प्रश्न असा उद्भवतो की संस्कृत भाषेला 'तगवल्याने' संस्कृतचं काय भलं होतं? "

खरं आहे. संस्कृतीचे वेगळेपण दर्शवणार्‍या अनेक गोष्टींपकी भाषा ही एक आहे. एका संस्कृतीचे दुसर्‍या संस्कृतीवर जेव्हा आक्रमण होते तेव्हा जेत्यांची भाषा सर्वांवर लादली जाते. लढाई करुन जिंकणे हाच एकमेव आक्रमणाचा प्रकार नसून आर्थिक, वैचारीक आक्रमणामुळेही एखादी संस्कृती व पर्यायाने त्यांचे अस्मिता/वेगळेपणा दर्शवणारे मुद्दे लोप पावू लागतात. आज मराठीवर हिंदी-इंग्रजीचे आक्रमण झाले आहे अशी धारणा आहे. अजूनही मराठी भाषेत होणारी साहित्य, चित्रपट, वृत्तपत्र निर्मिती, ग्रंथप्रदर्शने, संकेतस्थळे वगैरे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मराठीच्या भाषेबद्दल तितकी चिंता वाटत नसली तरी येणार्‍या काळात सक्षम असेल तीच भाषा टिकून राहील. भाषेची सक्षमता त्या भाषेत किती भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी/प्रगतीसाठी कितपत ज्ञान आहे; नसल्यास ते आत्मसात करुन घेण्याची लवचिकता आहे त्यावर अवलंबून आहे.

भाषेचा प्रसार हा ती भाषा वापरल्याने होत असतो. ती भाषा ज्यांना समजते त्यांच्याकडूनच वापरली जाते. ती भाषा शिकल्याने व्यवहारात काही फायदा होणार नसेल तर काही हौशी लोक सोडून कोणी ती भाषा शिकणार नाही. (काही उदा: मारवाडी लोक जिथे जाईल तिथली भाषा शिकतात. व्यवहारात फायदा होतो. उद्या त्यांने संस्कृतबहुल प्रदेशात दुकान टाकले तर ते संस्कृतही शिकतील. मुंबई महानगरपलिकेची भाषा मराठी केल्याने सर्वांना मराठी शिकणे बोलणे अपरिहार्य आहे.)

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

लेख आवडला !!!

संस्कृतभाषेविषयी तटस्थपणे प्रबोधन करणारा उत्तम लेख, आवडला !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संतुलित लेख

लेख आवडला. तटस्थपणे केलेले लेखन संयमित आहे.

वरील वाक्य उपक्रमाच्या धोरणाप्रमाणे उडवले जाण्यायोग्य आहे हे माहित आहे, परंतू कृपया ते २ दिवस तरी ठेवावे.

प्रतिसादाचा लेख करताना अशी काही वाक्ये टाळता आली असती.

अजून काही...

बर्‍याच दिवसात लिहायचे राहून गेले आहे... आता हात जरा मोकळे करून घेतो :-)

सर्वप्रथम खुलासा: हे काही मी संस्कृतच्या बचावात्मक पवित्र्यातून लिहीत नाही आहे. तर संस्कृतचा ज्या पद्धतीने विरोध दाखवला जात आहे तो मला तसे करणारे माझे सन्मान्य मित्र असूनही पोकळ वाटला आणि अनाठायी वाटला. त्यामुळे त्यात जो मला फोल वाटत आहे, तो सांगण्याचा प्रयत्न आहे.

या चर्चेची सुरवात ज्या चर्चेतून झाली, संस्कृत ही मृत भाषा समजावी काय? ती पाहून मला हसायलाच आले... कारण संस्कृत असण्याने आणि नसण्याने अथवा तसे कुठल्याही बाजूने म्हणल्याने, चर्चाकाराला नक्की काय मिळणार आहे ते काही समजले नाही...उद्या आपण अजून एक चर्चा चालू करू , "देव ही संकल्पना आहे का सत्य आहे?" आता त्या संदर्भात आपण म्हणू की ज्याला जे मानायचे आहे ते त्याच्यासाठी सत्य आहे. ... थोडक्यात राधीकाचे वरील मुद्दे मान्यच आहेत. तरी देखील या संदर्भात उत्सुकते पोटी माहीती शोधली. एकंदरीत भाषा ही मृत आहे का जिवीत ह्या प्रश्ना पेक्षा ती अस्तित्वात आहे का लोप पावली याला महत्व आहे. एखादी भाषा जर व्यवहारात वापरली जात नसेल तर ती अर्थातच मृत समजतात पण अस्तंगत झालेली समजत नाहीत.

संस्कृतः ethnologue.com या संकेतस्थळाचा संदर्भ अनेकजण देतात त्याप्रमाणे जिवंत भाषा आहे. आता नॅशनल व्हर्च्युअल ट्रान्स्लेशन सेंटर प्रमाणे संस्कृत काय आहे? आता जरा अमेरिकन सरकारी पानावरील माहीती शोधल्यास काय दिसले ते येथे थोडक्यात चिकटवतो:
Sanskrit, meaning 'perfected' or 'refined,' is one of the oldest, if not the oldest, of attested human languages... The oldest form of Sanskrit is Vedic Sanskrit believed to date back to the 2nd millennium BC. Known as "The mother of all languages," Sanskrit is the dominant classical language of the Indian subcontinent and one of the 22 official languages of India... Vedic Sanskrit is one of the earliest attested members of the Indo-European language family.

Originally, Sanskrit was considered not to be a separate language, but a refined way of speaking, a marker of status and education, a form of language studied and used by Brahmins. It existed alongside spoken vernaculars, called Prakrits which later evolved into the modern Indo-Aryan languages. Classical Sanskrit continued to be in use long after it was no longer spoken as a first language.

Scholars distinguish between Vedic Sanskrit and its descendant, Classical Sanskrit, however these two varieties are very similar and differ mostly in a some points of phonology, grammar, and vocabulary...The vocabularies of prestige varieties of Indian languages, such as Hindi, Bengali, Gujarati, and Marathi, are heavily Sanskritized.

आता याच संकेत स्थळावर मराठी संदर्भातील काही विधाने पाहूयात...

Marathi (also known as Maharashtri) is a member of the Indo-Aryan branch of the Indo-European language family.... It is spoken as a first language in India, primarily in the state of Maharashtra, by 68 million people and by another 3 million people as a second language, primarily in the state of Maharashtra. Marathi is the fourth largest language of India. Outside of India it is spoken in Israel and Mauritius (Ethnologue).

Marathi is derived from Sanskrit through a Prakrit dialect called Maharashtri, the official language of the Satavahana Kingdom in the 1st-2nd centuries AD. It was the most widespread Prakrit dialect of its time. Maharashtri gradually evolved into Marathi in the 15th and 16th centuries,

आता ही सर्व वरील चिकटवलेली माहीती ही अमेरिकन सरकारी संकेतस्थळावरील आहे. अर्थात ती अचूक आहे असे मला म्हणायचे नाही पण एकतर्फी आणि काही उद्देशाने लिहीली आहे असे म्हणायला यात जागा नाही, कारण ही माहीती जगातील सर्व भाषांच्या माहीतीमधे देण्याता आलेली आहे.

माझ्या सुदैवाने मी या संदर्भातील अनेक जाणत्या व्यक्तींना भेटलो. ज्यांचे ज्ञान जितके सखोल होते तितके त्यांचे पाय जमिनीवर होते. याच उलट असेही महाभाग पाहीलेत की जे भेटल्यावर हमखास संस्कृतमधे बोलणार. मग त्या कडे दुर्लक्ष करून इंग्रजीत अथवा हिंदीत (जर मान्य असेल तर) बोलायचे... पण अशा व्यक्तींमुळे माझा त्रागा जर झाला असेल (आणी तो मी त्यांना दाखवलापण असेल) तर तो त्या व्यक्तींसंदर्भात झाला, संस्कृत संदर्भात झाला नाही. इथे पाहतो तर उलटेच! संस्कृत मृत आहे का यावर वाद.

आता मला विचाराल तर भाषा ही वापरात असेल अथवा वापरात नसेल. अर्थात भाषा ही काही "जीव" नाही जीला मरण येते. भाषा कुठल्या पद्धतीने जगू शकते? अर्थातच तिच्यातील शब्द भंडारातून, वाड्मयातून, ज्ञानभंडारातून, आणि व्याकरणातून आणि अर्थात या सर्वांच्या अथवा यातील कुठल्याही गोष्टींच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वापरातून. आज संस्कृतचा या संदर्भात विचार केला तर काय दिसून येते? - शब्दभंडार आपण जसेच्या तसे वापरतोच, शिवाय अनेक शब्दांची मुळे पण संस्कृतमधे आहेतच. वाड्मय आणि ज्ञानभंडाराबाबत कुणाला शंका असेल तर अवश्य लिहावे, पण मला तरी शंका नाही. आज मराठी व्याकरण जसे काही अंशी इंग्रजाळलेले आहे (दादोबा पांडूरंग) ज्यामुळे विरामचिन्हे आपण इंग्रजी पद्धतीचे वापरतो, पण वृत्ते, र्‍हस्व-दीर्घ आदी संकल्पना आणि प्रथम, द्वि आणि बहुवचन प्रकार थोड्याफार फरकाने आपण संस्कृतमधून घेतला असे म्हणू शकतो. आता जर कुणाला माहीत असेल की तसे नाही तर अवश्य लिहावे.

पण तरी देखील एक अवघड वाटते म्हणून संस्कृत आवडत नसेल असे म्हणायचे असेल तर त्यासाठी इतकी आवई उठवण्याचे कारण काय? विचार करा, विशेष करून उपक्रमावर विविध विषयांवर माहीतीपूर्ण लेखन आले आहे - संस्कृत हे त्यातील एक आहे. पण त्याच बरोबर इतिहास, पुराण, अणूवाद, कोडी, पदार्थ विज्ञान, स्थापत्यशास्त्र, गणित, संगणकीय विज्ञान आणि पर्यावरण... यातील कुठला न कुठला विषय आपल्याला आवडत नाही तर कुणाला तरी आवडतो. पण त्या संदर्भात आपण इतकी आरडा ओरड करतो का? म्हणून असे वाटते की, संस्कृत मृत आहे का पासून सुरू झालेल्या चर्चेत बर्‍याचदा जे प्रतिसादात सूर दिसतात ते प्रतिक्रीयात्मक असतात आणि त्या प्रतिक्रीया या संस्कृतबद्दल असण्यापेक्षा ती ज्यांनी बंदीस्त केली त्यांच्याबद्दल असतात ज्यात काही चूक नाही. पण आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी अशी काहीशी ही अवस्था वाटते...

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

आणखी थोडे

व्यक्तीगत रोख आणि परस्परांतील हेवेदावे हे उपक्रमाचे उद्दिष्ट्य नाही. सदर प्रतिसाद संपादन मंडळाने सध्या राखून ठेवला आहे याची कृपया नोंद घ्यावी. - संपादन मंडळ

प्रतिसाद २

माझा युक्तिवाद वरील लेखात उपलब्ध आहे. तो पुन्हा एकदा नीट वाचावा. तो समजला नसण्याचे एक कारण शक्य आहे, ते म्हणजे आपण 'मृत' या शब्दाला भावनिक मूल्य जोडत असावात. मी तो शब्द भाषाशास्त्रातील एक तांत्रिक संज्ञा म्हणून वापरला आहे. ज्या भाषेचा एकही भाषिक शिल्लक नाही, तिला मृत म्हटले जाते. ते तसे म्हटले जाऊ नये, हा संस्कृत संभाषणवर्गामागच्या अनेक हेतूंपैकी एक हेतू आहे. पण कृत्रिमरीत्या ती भाषा लोकांना शिकवून त्या लोकांनी फक्त त्या भाषेचे पुनरुज्जीवन करायचे या एकाच उद्देशाने ती आपापसात बोलून ती भाषा फक्त तांत्रिकदृष्ट्या जिवंत होते, मराठी सारखी 'जिवंत' होत नाही. हे मी परत परत माझ्या लेखात म्हटले आहे.


संस्कृत भारतीने किंवा त्यासारख्या एखाद्या संस्थेने ज्यांना संस्कृत बोलायला शिकवले नाही असा एकही संस्कृत भाषा बोलणारा भारतात अस्तित्त्वात नाही असे आपले म्हणणे आहे काय? कर्नाटकात मठूर गावात सर्व लोक (अगदी ५० - १०० का असेनात) संस्कृत बोलतात असे वाचले आहे आणि हे वंशपरंपरागत संस्कृत बोलायला शिकले आहेत (जसे आपण मराठी बोलतो) असे वाचले आहे. त्यामुळे ही भाषा कमी प्रमाणावर का होईना पण अगदी "मराठीसारखीच" जिवंत होते असे मला वाटते. आपल्याकडे १. ही माहितीच खोटी आहे २. ही माहिती खरी आहे पण संस्कृत भारती किंवा तत्सम संस्था लहान मुलांना बोलायला शिकवते तिथून् मुले शिकतात आपल्या आईबापांकडून नाही याबद्दल पुरावे असल्यास माझी माहिती खोटी ठरेल आणि मी आपले म्हणणे मान्य करेन. तसे नसेल तर आपण माझे म्हणणे मान्य कराल का?

सहमत आहे. परंतू आपल्या वाक्यातील 'काही प्रमाणात' हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. या प्रयत्नांचे उपक्रमावरच काय् इतर ठिकाणीही स्वागतच आहे. इथे मी विरोध केला आहे तो इतरांच्या मतांप्रति दाखवल्या जाणार्‍या असहिष्णुतेबद्दल व स्वतःच्या मतांना दुसर्‍यांवर लादण्याच्या केल्या जाणार्‍या प्रयत्नांबद्दल.


उपक्रमावरच्या प्रसारकांनी असे प्रकार केल्याचे उदाहरण आहे का? आता आपण म्हणाल की हे विधान उपक्रमाबाहेरच्या प्रसारकांबद्दल आहे तर माझे एकच सांगणे आहे की आपण कृपया लिहितेवेळी एक स्पष्ट करत जा की अमुक विधान बाहेरच्या प्रसारकांबद्दल आहे आणि तमुक इथल्या प्रसारकांबद्दल. बर्‍याच लोकांना ते अंतर्ज्ञानाने कळतही असेल पण मी जात्याच मंदमती. त्यामुळे स्पष्ट लिहावे.

हे न करता फक्त संस्कृत संभाषणावरच भर दिला जातो. संस्कृत बोलायला शिकणे यात वाईट काहीच नाही, परंतू फक्त तेवढेच करणे, याला माझा आक्षेप आहे. अर्थांत तो व्यक्तिगत प्रश्न आहे, असे कोणी म्हणू शकेल. परंतू संस्कृत प्रचार-प्रसारासाठी जीवन समर्पित करणार्‍या लोकांनी मात्र आपण काय करणार हे ठरवण्यापूर्वी सारासार विचार केला पाहिजे, हे केल्याने काय् होईल , ते केल्याने काय होईल, यांचा अंदाज घेतला पाहिजे. एवढे करून जर एखाद्याला वाटले की संस्कृत संभाषणानेच संस्कृतचा उद्धार होईल, तर मग त्याच्या निर्णयाला हरकत घ्यायचे कारण नाही. परंतू किती जण हा विचार करतात? किती जणांना आपण करतोय ते बरोबर करतोय का असा प्रश्न पडतो?

संस्कृत भारतीवाल्यांनी आपल्यासमोर विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ते संकुचित वाटत असेल तर एक तर लोकांना आपले मुद्दे पटवून त्यांना त्यांचे उद्दिष्ट व्यापक करवून घ्यावे किंवा समविचारी लोक जमवून दुसरी संस्था सुरू करावी. नुसती बोंबाबोंब करण्यात काय अर्थ आहे?

हे सर्व लिहिताना मला फक्त उपक्रमावरचे संस्कृतसंभाषणवादी अभिप्रेत नाहीत. उलट उपक्रमावरचे संस्कृतसंभाषणवादी यांना त्यांच्या विषयाचे पूरेसे ज्ञान तरी आहे. इतर संस्कृतसंभाषणवादींपैकी एक 'वृद्धि' हा शब्द 'वृद्ध' या शब्दाचे सप्तमी एकवचन आहे असे तृतीय वर्ष संस्कृत साहित्याच्या विद्यार्थ्यांना सांगत असल्याचे ऐकले आहे. संस्कृत भाषेशी गेली १० वर्षे अविरत संबंध आल्याने संस्कृत संभाषण वादी, संस्कृत न बोलणारे संस्कृतप्रेमी या सर्वांशी माझा बराच जवळून संबंध आला आहे, अजूनही येतो आहे. माझी मते या माझ्या दहा वर्षांच्या अनुभवावर आधारलेली आहेत, ती कृपया उपक्रमावरच्या संस्कृतप्रेमींना उद्देशून आहेत, असा गैरसमज कोणी करू नये. संस्कृतचा प्रसार फक्त संस्कृत संभाषण केल्याने व शिकवल्याने होतो, या मताला माझा विरोध आहे, तो मांडणार्‍या व्यक्तींना नाही.


संस्था चालवणार्‍यांना त्याचे धोरण ठरवण्याचा अधिकार आहेच की. तो मान्य नसेल तर स्वतः दुसरी संस्था काढावी.

माझा लेख नीट वाचून पाहिल्यास कळेल की हा युक्तिवाद संबंधित संस्थांच्या सर्व विद्यार्थ्यांबद्दल नाही, तर अशा विद्यार्थ्यांंबद्दल आहे, जे पुढे संस्कृतमधेच काम करायचे ठरवून त्याच संस्थेत किंव स्वतंत्रपणे संस्थेत केली जाणारी संभाषण-अध्यापनादि कामे करतात.

कोणाबद्दलही असेल. ज्याच्याबद्दल आहे त्याला त्याचा निर्णय घेऊ द्यावा की. आपण कशाला त्यात ढवळाढवळ करावी.

आपल्या माहितीसाठी, जाहीर रीत्या नसले तरी संबंधित संस्कृतप्रेमींना उपक्रमावरचा हा वाद निर्माण होण्यापूर्वी व त्याआधीही बर्‍याचदा वेगवेगळ्या प्रकारे समजावले आहे, आपल्या भाषेत तेही लांगुलचालन झाले पाहिजे. म्हणजे मी दोन्ही पक्षांचे सारखेच लागुलचालन केले आहे. शिवाय दोन्ही पक्षांना मी सारख्याच कठोरपंणाने सुनावले, असे माझे तरी मत आहे. कुणाला ते किती कठोर वाटावे हे सब्जेक्टिव्ह आहे, तेव्हा त्यावरून आक्षेप घेण्यात हशील नाही. आणि मुख्य म्हणजे लेखातली शेवटची दोन वाक्ये मी दोन्ही पक्षांना उद्देशून वापरली आहेत. आता सारखेच शब्द एकाला कठोरपणे म्हटले आहेत आणि दुसर्‍याला लांगुलचालन करण्यासाठी म्हटले आहेत, असा अर्थ आपल्याला काढायचा असल्यास माझी हरकत नाही. माझ्या लेखनाचा कोण काय अर्थ काढेल, यावर मी ताबा ठेवू शकत नाही.

शिवाय एखाद्या व्यक्तीला मी सहमती व्यक्त केली म्हणजे मी तिचे लांगुलचालन करते व एखाद्यच्या मताचा विरोध केला म्हणजे मी त्या व्यक्तीला विरोध करते असा होत नाही. आणि एकदा एकाच्या मताला सहमती व्यक्त केली म्हणून नेहमी त्या व्यक्तीच्या प्रत्येक मताला सहमती व्यक्त करेन असेही नाही, याची ज्याची त्याने नोंद घ्यावी.

जाऊ दे. या विषयावर लिहिण्याचा वीट आला आहे. काही झाले तरी आपण संस्कृतद्वेष्ट्यांचे लांगूलचलन केलेत आणि ज्यांना आपल्या आधाराची गरज होती त्या प्रसारकांचा विश्वासघात केलात हे माझे मत कधीही बदलणार नाही. त्यावर आणखी बोलण्यात अर्थ नाही.

आपण जसे वागू तसे इतर आपल्याशी वागतील, हे लक्षात ठेवून जर प्रत्येकाने लिखाण केले, तर विखारी टीका होण्याची वेळच येणार नाही. संबंधित संस्कृतप्रसारक व्यक्ती माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत, आमच्यात चांगली मैत्री आहे, तीही उपक्रमा आधीपासून. या व्यक्तींनी नुसतीच माझ्याशी मैत्री केली नाही, तर वेळोवेळी मला अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, प्रसंगी स्वतःकडची पुस्तके मला उधार दिली आहेत. इतक्या चांगल्या मित्र-मैत्रिणीला मी विरोध करणे, किंवा त्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करणे शक्य नाही. माझा विरोध केवळ त्यांच्या मतांना व ती मते व्यक्त करण्याच्या पद्धतीला आहे. व्यक्तीला विरोध करणे व व्यक्तीच्या मतांना विरोध करणे यांत फरक आहे.


यावर संस्कृतप्रसारकांचा विश्वास बसला आणि तुमचे संबंध पूर्ववत झाले तर मला आनंदच वाटेल. माझा अजिबात नाही. असो.

काही उत्तरे / काही शंका

संस्कृत भारतीने किंवा त्यासारख्या एखाद्या संस्थेने ज्यांना संस्कृत बोलायला शिकवले नाही असा एकही संस्कृत भाषा बोलणारा भारतात अस्तित्त्वात नाही असे आपले म्हणणे आहे काय?

राधिकाबाईंच्या लेखात किंवा प्रतिसादात त्यांनी असे कुठे म्हण्टल्याचे मला आढळले नाही.

कर्नाटकात मठूर गावात सर्व लोक (अगदी ५० - १०० का असेनात) संस्कृत बोलतात असे वाचले आहे आणि हे वंशपरंपरागत संस्कृत बोलायला शिकले आहेत (जसे आपण मराठी बोलतो) असे वाचले आहे. त्यामुळे ही भाषा कमी प्रमाणावर का होईना पण अगदी "मराठीसारखीच" जिवंत होते असे मला वाटते. आपल्याकडे १. ही माहितीच खोटी आहे २. ही माहिती खरी आहे पण संस्कृत भारती किंवा तत्सम संस्था लहान मुलांना बोलायला शिकवते तिथून् मुले शिकतात आपल्या आईबापांकडून नाही याबद्दल पुरावे असल्यास माझी माहिती खोटी ठरेल आणि मी आपले म्हणणे मान्य करेन. तसे नसेल तर आपण माझे म्हणणे मान्य कराल का?

पन्नासेक माणसे जी भाषा आवर्जून बोलतात (मातृभाषा म्हणून नव्हे ) - असे कुठेतरी वाचले आहे - ती भाषा १० कोटी भाषक अस णार्‍या मराठी भाषेसारखी सारखीच जिवंत होते हे म्हणणे तर्कविसंगत आहे. बरे, ज्या माहितीबद्दलच केवळ जिथे "वाचले आहे" इतपतच (कसलेही संदर्भ न देता म्हणता ) म्हणता येते , तेथे ही माहिती खोटी आहे की खरी आहे या भानगडीत कोण कशाला पडेल ? ही माहिती खरी आहे असे तुम्हाला "वाटते" का तसे कुठला पुरावा/काही संदर्भ /आकडेवारी काही उपलब्ध आहे ? का निव्वळ नसलेला मुद्दा आणायचा आहे ?

संस्कृत भारतीवाल्यांनी आपल्यासमोर विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ते संकुचित वाटत असेल तर एक तर लोकांना आपले मुद्दे पटवून त्यांना त्यांचे उद्दिष्ट व्यापक करवून घ्यावे किंवा समविचारी लोक जमवून दुसरी संस्था सुरू करावी. नुसती बोंबाबोंब करण्यात काय अर्थ आहे?

खरे आहे तुमचे म्हणणे. ज्याना "खरे तर उपक्रमावर येऊन बोललेले आवडत नाही" त्यांनी नुसती बोंबाबोंब करण्यात काय अर्थ आहे?

कोणाबद्दलही असेल. ज्याच्याबद्दल आहे त्याला त्याचा निर्णय घेऊ द्यावा की. आपण कशाला त्यात ढवळाढवळ करावी.

पुन्हा हेच म्हणतो. राधिकाबाईंनी ढवळाढवळ केली असे तर कुठे दिसत नाही. बाकीच्यांनी का करावी ?

जाऊ दे. या विषयावर लिहिण्याचा वीट आला आहे. काही झाले तरी आपण संस्कृतद्वेष्ट्यांचे लांगूलचलन केलेत आणि ज्यांना आपल्या आधाराची गरज होती त्या प्रसारकांचा विश्वासघात केलात हे माझे मत कधीही बदलणार नाही. त्यावर आणखी बोलण्यात अर्थ नाही.

विश्वास ठेवा , तुम्ही या धाग्यात येऊन जे करत आहात त्याचा देखील काही लोकांना वीट आला आहे. कुणी कितीही संतुलित लिहीले , आणि नसलेल्या मुद्द्यांचाही प्रतिवाद केला तरी उगाच विश्वासघात , लांगूलचालन वगैरे लेबले आणून काहीतरी निरर्थक आरडाओरडा करायचा हे मत बदलायचे नाही.

प्रतिपादन

ज्या भाषेचा एकही भाषिक शिल्लक नाही, तिला मृत म्हटले जाते. ते तसे म्हटले जाऊ नये, हा संस्कृत संभाषणवर्गामागच्या अनेक हेतूंपैकी एक हेतू आहे. पण कृत्रिमरीत्या ती भाषा लोकांना शिकवून त्या लोकांनी फक्त त्या भाषेचे पुनरुज्जीवन करायचे या एकाच उद्देशाने ती आपापसात बोलून ती भाषा फक्त तांत्रिकदृष्ट्या जिवंत होते,मराठीसारखी 'जिवंत' होत नाही. हे मी परत परत माझ्या लेखात म्हटले आहे.

असे असेल तर आपण "दुसरे म्हणजे जेव्हा एखाद्या भाषेचा एकही भाषिक जिवंत राहत नाही, तेव्हा ती भाषा पूर्णपणे मृत होते. परंतू जोवर तिचे काही भाषिक जिवंत आहेत, तोवर ती भाषा मृत मानता येत नाही.आपल्या माहितीसाठी २००१ च्या जनगणनेनुसार १४१३५ इतके लोक संस्कृत भाषा बोलतात, इतकेच नव्हे, तर हे सर्व लोक संस्कृत ही आपली मातृभाषा आहे असे सांगतात." हा मजकुर आपल्या मूळ उत्तरात द्यायचे कारण समजले नाही.

एका बाजूला ही भाषा किती लोक बोलतात हे दाखवून ही भाषा जिवंत कशी हे दाखवायचे आणि दुसर्‍या बाजूला हे इतके लोक बोलत आहेत ह्यापाठी कष्ट घेणार्‍यांचे श्रेय नाकारायचे हा दुटप्पीपणा झाला.

आपण जे विधान उद्धृत केले आहे ते धनंजयरावांचे व्यक्तिगत मत झाले. शिवाय ते वाचले असता 'ज्ञानेश्वरांची भाषा जिवंत आणि कालिदासाची भाषा मृत म्हणण्यात काही हशील नाही' आणि 'संस्कृत- जिवंत की मृत? काय फरक पडतो?' यांच्यात १००% जरी नसले, तरी ५०% हून अधिक मतसदृशता दिसते. फरक इतकाच आहे की मी संस्कृतला मृत ही तांत्रिक संज्ञा दिली, ती द्यायची त्यांनी नाकारली.

हाच निकष हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला लावायचा झाल्यास ते शेवटचे आचके देत आहे असे म्हणायचे का? तर नाही. कारण काळाच्या एका छोट्या भागात एखाद्या लोक समुदायाने एखादी गोष्ट टाळली तर ती गोष्ट अयोग्य अथवा मृत होत नाही. आज पंचतारांकित उपाहारगृहात जाणारी जन्माने मराठी मंडळी तिथे एकही शब्द मराठीभाषेत बोलत नाही त्यावरून मराठी भाषा मृत होत नाही.

पण ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन मी इथे एक गोष्ट उद्धृत करू इच्छिते. एक आपल्यासारखा विद्वान् अभ्यासक असतो. मात्र दुर्दैवाने त्याला स्वत:च्या ज्ञानाविषयी 'ग' ची बाधा झालेली असते. तो विचार करतो की आज आपण सर्वांसमोर गुरुजींची फजिती करुया. म्हणजे सगळे आपली वाहवा करतील. तो एक छोटासा पक्षी मुठीत पकडतो आणि मुठ दाबतो. त्यामुळे तो पक्षी अर्धमेला होतो. मग गुरुजींपुढे जातो आणि सर्वांसमोर गुरुजींना आह्वान देतो की आपण खरे ज्ञानी असाल तर लवकर सांगा हा पक्षी जिवंत आहे का मृत् गुरुजींना त्याचा खोडसाळपणा कळतो. ते विचार करतात, मी जर म्हटले की हा पक्षी जिवंत आहे तर हा शिष्य त्याला अधिक चिवळून ठार मारणार. जिवंत नाही म्हटले तर तो दाखवणार की तो पक्षी मृत नसून अर्धमेला आहे. म्हणजेच मला खोटे पाडण्यासाठी हा विद्वान् अभ्यासक पक्ष्याचेच हाल करणार. त्यावर विचार करून गुरुजी मंद पण ठाम स्वरात म्हणतात, बाळा, तो पक्षी जिवंत आहे की मृत ते मला ठाऊक नाही मात्र तो तुझ्या मुठीत आहे त्याला जिवंत ठेवणे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. जो आपल्या अधीन असतो त्याचे रक्षण, पालन पोषण करणे आपल्याच हातात आहे.

जे फक्त संस्कृतमधे बोलतात व ते इतरांना शिकवतात, त्या संस्कृतचा वापर सुवचनांपलिकडे जाऊन अभिजात साहित्य वाचणे, संशोधन करणे यासाठी करत नाहीत.

मी वारंवार पाहिले की आपण म्हणता की संस्कृत भारतीचे कार्यकर्ते केवळ संस्कृत बोलतात मात्र त्याचा खोलात जाऊन अभ्यास करीत नाहीत. माफ करा, मला वाटते आपण हे वैयक्तिक आकसाने व कुठलाही खोलात अभ्यास न करता म्हणत आहात. ह्यातून आपल्याला काय साधायचे आहे तेच कळत नाही. आपण काही उदाहरणे पाहू १) श्रीनंद बापट, संचालक - भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ. संस्कृत भारतीचे १०+ वर्षे कार्यकर्ते. भांडारकर प्राच्य ही संस्था वैश्विक मान्यताप्राप्त संस्था आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी होयबांना घेऊन काढलेले मराठी संस्थळ नव्हे. तिथे संचालक पदावर वर्णी लागताना लांगुलचालन ह्याऐवजी संस्कृत, इतिहास ह्यांचा सखोल अभ्यास अपेक्षित आहे. माझ्या माहितीप्रमाणे श्री. बापट हे पी.एच.डी.
धारक आहेत. २) तरंगिणी खोत - मुंबई विद्यापीठातून बी.ए., एम.ए. ला सुवर्ण पदक. २०+ वर्षे संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्या. आजही अनेक पी.एच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या शिक्षिका प्रा. मन्जुषा गोखले आणि तरंगिणीताईंचा संस्कृत ग्रंथातील अनेक गहन विषयांवर होणारा वाद (संवाद ह्या अर्थी) मी स्वत: पाहिलेला आहे विशेषत: सिद्धार्थ कौमुदीच्या बाबतीत. ३) शाल्मली पितळे - संस्कृत एम.ए. सी-डक संस्थेत संगणीकरणासाठी संस्कृत भाषा ह्यासाठी मोलाचे योगदान. सध्या आयआयटी, मुंबई इथे भाषा विज्ञानावर संशोधन चालू. ४) प्रीती करंदीकर, जगदीश इंदलकर संस्कृत व्याकरणशास्त्रात विशेष प्रावीण्यासह एम.ए. अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विनामुल्य संस्कृत शिक्षण. तसेच उत्तम संस्कृत शिक्षक तयार व्हावेत ह्यासाठी शिक्षक प्रशिक्षक वर्ग घेतात. जगदीश इंदलकर सध्या व्याकरणशास्त्रात पी.एच.डी. करीत आहेत. हे दोघेही १०+ वर्षे संस्कृत भारतीचे कार्यकर्ते. ५) निखिल देव - एका बहुराष्ट्रीय कंपनीत संगणक अभियंता. संस्कृत एम.ए. १०+ वर्षे संस्कृत भारतीचा कार्यकर्ता. पुढील लेखात अजून ५-१० नावे देईनच.

याबद्दल 'मौन् बाळगण्याचे' कारण म्हणजे, तो त्या प्रतिसादाचा विषय नव्हता. पण हा तुमच्या प्रतिसादाचा असल्याने इथे त्याला उत्तर देते. माझे वैयक्तिक मत म्हणजे संस्कृत भाषेची गोडी वाढवण्यासाठी पुढील गोष्टी करता येतील.- १- संस्कृत ही भाषा कशी सोपी आहे हे दाखवणे. परंतू याचा अर्थ संस्कृत भाषा ही 'बोलायला' कशी सोपी आहे हे दाखवणे असा नव्हे.

मुळात संस्कृत ही भाषा आहे. भाषा हा शब्द भाष् ह्या धातुवरून आला आहे. ज्याचा अर्थच मुळी बोलणे होतो, शिकणे नव्हे. भाषा शिकणे म्हणजे पुस्तके वाचणे नव्हे, ते तिचे संभाषण करणे. पुस्तकी पांडित्याविषयी एक श्लोक आहे. पुस्तकस्थां विद्या परहस्त गतं धनम् | कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनम् ।|

संस्कृत 'समजायला' कशी सोपी आहे, एवढे दाखवले तरी पुरे हे मला स्वतःच्या, माझ्या विद्यार्थ्यांच्या, माझ्या संस्कृत न बोलणार्‍या पण संस्कृत उत्कृष्टपणे शिकवणार्‍या मित्रमंडळींच्या व त्यांच्यामुळे संस्कृतमधे पदवी शिक्षण घेण्यास प्रेरित झालेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या उदाहरणावरून सांगू शकते.

पदवी घेणे हीच इति कर्तव्यता मानायची का? दैनंदिन व्यवहारात जर त्याचा उपयोग शुन्य असेल तर काय उपयोग? एखादा माणूस जर अभियांत्रिकी शिकून जर किराणा मालाचे दुकान चालवीत असेल तर लोक त्याला इंजिनीयर असे न संबोधता शेठ असे म्हणतात. पदवीच्या कागदी भेंडोळ्याची किंमत काय मग? माझ्या माहितीतील एक संस्कृत पदवीधारक विद्यार्थ्यांना इतिहास शिकवताना 'केशव पन' म्हणायचा. बहुदा रुईयाचाच विद्यार्थ्यी.

आपल्या इतर थोर विचारांना यथावकाश उत्तरे देईनच पण सध्या आपण हे उत्तर गांभीर्याने वाचावे ही वि.वि.

उपक्रमच्या नियमाप्रमाणे हा लेखसुद्धा उडण्याची शक्यता गृहित धरून तो आपल्या ख.व. मध्ये डकवत आहे.

_____________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।
काही मजकूर संपादित

शेवटचे

आधीही हजारदा सांगितले आहे आणि आता शेवटचे सांगते. हे माझे मत आहे व तुमचे मत हे तुमचे आहे. दोन्ही मते जुळावीत असा कोणी नियम केलेला नाही. मला माझी मते मांडण्याचा व ती राखण्याचा पूर्ण अधिकार आहे, तसाच तो तुम्हालाही आहे, आणि त्या अधिकाराबरोबरच एकमेकांच्या मतांचा आदर करणे हे आपल्या दोघींचेही कर्तव्य आहे. मी आपल्या मतांचा आदर करते, तुम्ही ती बदलावीत असे माझे म्हणणे नाही. फक्त प्रत्येकाने त्यावर विचार करावा एवढेच माझे म्हणणे आहे. तुम्ही विचार करून तुम्हाला तुमचे मत योग्य वाटत असेल, तर तसे सांगून तो विषय तिथे संपवा. तुमचे मत मला पटवून देण्यासाठी जाहिर प्रतिसाद, खरडवही आणि इमेल असा तिहेरी भडिमार जो माझ्यावर चालू आहे, तो कृपया बंद करा.

यालाच मी दुसर्‍यांच्या मताप्रति असहिष्णुता दाखवणे आणि स्वतःची मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणे असे म्हणते.

याखेरीज एक गोष्ट आवर्जून सूचवू इच्छिते, कोणतीही विधाने करण्यापूर्वी त्या विधानांसाठी आधार म्हणून जे काही आपण वाचले असेल, ते नीट वाचावे. अपण म्हटले आहे-

मी वारंवार पाहिले की आपण म्हणता की संस्कृत भारतीचे कार्यकर्ते केवळ संस्कृत बोलतात मात्र त्याचा खोलात जाऊन अभ्यास करीत नाहीत.

व पुढे ५-१० लोकांची नावे दिली आहेत. त्यावर मी इथे माझे लेखातील मूळ वाक्य उद्धृत करते-

संस्कृत बोलणारे व त्याचा पुढे अभ्यासही करणारे लोक फार म्हणजे फारच कमी आहेत.

इथे मी असा अभ्यास कोणीच करत नाही असे विधान केलेलेच नाही, तर करणारे कमी आहेत असे म्हटले आहे, आणि हे विधान करताना आपण उल्लेखलेल्या लोकांपैकी जे काही मोजके लोक आहेत, ज्यांच्याबद्दल मला आदर वाटतो, तेच माझ्या नजरेसमोर होते.

राधिका

नोंद घ्यावी

सर्वांनी एका गोष्टीची नोंद घ्यावी, की या विषयीच्या चर्चांमधे संस्कृतप्रसारक मंडळी एका विवक्षित संस्कृतप्रसारक संस्थेचे नाव घेऊन लिखाण करत आहेत. त्यांच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करताना जरी मी स्पष्टपणे लिहिले नसले, तरी आता अत्यंत स्पष्टपणे हे लिहिते, की त्या संस्कृतप्रसारक संस्थांचा उल्लेख केवळ त्यांच्याकडून झालेला आहे, माझ्याकडून एकाही संस्कृतप्रसारक संस्थेचा नावानिशी वेगळा उल्लेख झालेला नाही, तसा करायचा विचारही नाही.

राधिका

विचारांची दिशा बदललेला लेख

राधिकाबाई, सर्वप्रथम अभिनंदन. मागील एका माझ्या लेखावर प्रतिक्रिया देताना आपण संस्कृत ही मृत भाषा आहे असे म्हणाला होतात. मात्र आता आपण ती मृत कशी नाही हे समजवण्याच्या कामी लागला आहात हे पाहून अत्यानंद झाला.

विरोधकांकडे दुर्लक्ष करा आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडची आपली वाटचाल अशीच जोमाने चालू ठेवा. आपली संस्कृती हेच म्हणते, तमसो मा ज्योतिर्गमय । अंधाराकडून उजेडाकडे वाटचाल.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

हेच,

विरोधकांकडे दुर्लक्ष करा आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडची आपली वाटचाल अशीच जोमाने चालू ठेवा. आपली संस्कृती हेच म्हणते,

मीदेखील हेच म्हणतो..! राधिकाजी, फारच सुंदर लेख..!

तमसो मा ज्योतिर्गमय । अंधाराकडून उजेडाकडे वाटचाल.

तुम्हाआम्हा सर्वांनाच अंधारातून उजेडाकडे वाटचाल करण्याकरता शुभेच्छा देऊन माझं ऋजुरावांच्या प्रतिसादाला दोन शब्दांचं अनुमोदन संपवतो..!

आपला,
(तूर्तास अंधारात चाचपडणारा!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

कोण म्हणतो संस्कृत मृत भाषा?

-हे वाचा. --वाचक्नवी

सिद्ध होत नाही

लोकसत्तेतील सदरील लेख काळजीपूर्वक वाचला,
पण सदरील लेखावरुन संस्कृत भाषा जीवंत की मृत सिद्ध होत नाही असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर