भारतीय मतदार

आपल्याकडे ग्रामपंचायती पासून लोकसभे पर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या कि शब्दांचे खेळ सुरु होतात. मतदाराचा लगेच मतदार राजा होतो. जगभरात थोड्याफार फरकाने सगळीकडे हिच परिस्थिती असावी असे वाटते. (वेगळी असू शकते.) पण आपल्याकडे जरा खासियत असते. भारतीय मतदार जरा हटकेच आहेत हे मात्र खरे.

भारतात निवडणुक कशासाठी होते आणि कोणासाठी होते हा एक मोठा अभ्यासाचा प्रश्नच आहे. मतदान कोणत्या कारणासाठी होते कोण करते हे सगळेच एकदम अभ्यासाचे मुद्दे आहेत. निवडणुका ग्रामपंचायतीच्या असतात, साखर कारखान्यांच्या, दुधसंघांच्या........ विधानसभेच्या आणि लोकसभेच्या. निवडणुका होतात पण वर्षानुवर्ष त्याच त्याच मुद्यांवर होतात. मतदारांची मानसिकता फारशी बदलेली नाही. खरतर मतदान हा शब्दच कसा आहे ना? मत आपलं असत. ते आपण देणार असतो. खास करून अशा माणसाला जो समाजासाठी काही ना काही कार्य करणार असतो. आपण स्वतः सुद्धा समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत. त्यामुळे मतदान हा आपला स्वार्थ आहे. आपण मत देतो ते एका मोबदल्यासाठी. मग ते दान कसे?

आपल्याकडे १३ दिवसात सरकार पडले, परत निवडणुका झाल्या. पण सरकार पडायचे कारण काय? कांद्याचा भाव. ठिक आहे. मान्य आहे. पण त्यानंतर आजवर अनेकदा अनेक भाव अतर्क्य वाढले. पण आता सरकारे नाहीत पडत. एक बाजु मान्य करू कि हा राजकारणाचा भाग आहे. पण एकदा कांद्याच्या भावासाठी मतदान करणारा मतदार अणूकराराच्या मुद्यासाठी इतका निराश? अस का व्हावं बर? मुळातच मतदान करणारे मतदार कोण? हाच कळीचा मुद्दा आहे. आपल्याकडे कधीतरीच भरभरुन मतदान होते. जेंव्हा भारतात मतदान ८०% वगैरे होईल त्यावेळी भारतात नक्किच काहितरी जोरदार घडले असणार आहे. कारण एकदम सरळ आहे. सर्वसामान्य, प्रत्येक भारतीय मतदार सर्वात पहिले म्हणजे उजडेचमन असतो. माझ्या एकट्याच्या मताने काय फरक पडणार आहे? शेवटी राजकारण हा घाणेरडा खेळ आहे, आम्हाला त्याचा भाग व्हायचे नाही. आम्ही मतदान करू, पण बोगस मतदान कोण थांबवणार वगैरे वगैरे सगळे मुद्दे मतदान न करण्यासाठी नेहमीच पुढे येतात. मग मतदान होते ते कोणाचे? ज्यांना रोजच्या रोटीचा प्रश्न आहे. ज्यांना कर भरायचाच नाही. ज्यांना कधी स्वतःचे पक्के मोठे घर बांधायचेच नाही. ज्यांना अनधिकृत गोष्टी अधिकृत करुन घ्यायच्या आहेत. हे असे मतदार मग नेटाने मतदान करतात कारण त्यांना समाजाच्या उद्याची चिंता नसते कि त्यांच्या पुढच्या काही वर्षांची.

सरकारे बनतात, पडतात, तुम्ही आम्ही त्यांच्या कायद्याच्या चौकटीत राहुन आयुष्य जगतो, रेशन कार्डावर सामान आणायला आपण जातच नाही. आतातर ते आपल्याला मिळत देखील नाही. मग त्यावर मिळणारे धान्य काय प्रतिचे आहे? हे कशाला पहायला जातोय? पण सरकार मात्र आम आदमीचा नारा देउन नवीन चित्रे रंगवुन घोटाळे करतात. कर आपण भरतो, पण खिसे कर न भरणार्यांचे भरतात. काहिजणांचे निवडणुक उभी होइ पर्यंत तर काहिंचे ऐन निवडणुकीच्या दिवसात. आपण मात्र आहोतच फॉर्म १६ भरायला तत्पर. नाहीतर सरकारचे प्रेमपत्र आहेच कधी ना कधी.

असे कित्येक मुद्दे आहेत जिथे आपण सगळेच भरडले जात असतो. मग मुद्दा कांद्याचा-डाळीच्या भावाचा असो, कि शस्त्रास्त्र खरेदिचा. आपण उदास, पण याचे जे दुरगामी परिणाम घडतात, त्याला जबाबदार कोण? आपणच आहोत. जरा डोळे उघडून बाहेर पहायला हवं. जगात अनेक देशात जागरुक मतदार आहेत. भरलेल्या कराचा मोबदला मिळालाच पाहिजे या भावनेने विचार करुन मतदान करणारे मतदार आहेत. जगात आपला देश एक जबाबदार देश आहे आणि आपल्या सरकारच्या निर्णयाचे जगावर चांगले वाईट परिणाम होणार आहेत याचा विचार करुन मतदान करणारे मतदार आहेत. मग भारतीय मतदार असे का? एवढे उदास, एवढे कमविचारी? कि आम्ही असेच आहोत? आम्हाला सगळंच जे घडत ते मान्य आहे? आम्हाला आमचं आमचं राज्य करायची इच्छा नाही? कि आमच्यावर लादलेलेच राज्य जास्त चांगल असत? छातीठोक पणे सांगायच कि भारतातली लोकशाही हि जगातली सर्वात मोठी आणि प्रगल्भ लोकशाही आहे. मात्र हे सांगताना मतदान करणारे मतदार खरच प्रगल्भ आहेत? भारतात मतदारांनी खरच आपला हक्क म्हणून मतदान केले, जगाची एक महासत्ता म्हणून मतदान केले, आपल्या समाजाच्या आणि परिसराच्या विकासासाठी मतदान केले तर? असे होइल का? भारतीय मतदार खरच सुजाण, अभ्यासू आणि जबाबदार मतदार बनेल काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

खरे आहे.

"वर्गीकरण, मध्यमवर्ग, राजकारण."

बहूतेक मध्यमवर्गात अनास्था, नैराश्य आहे की राजकारणी नेहमीच गरीब व श्रीमंतांच्याच प्रश्राकडे लक्ष देतात. भ्रष्ट नोकरशाही देखील जनतेला जितकी उत्तम सेवा उपलब्ध करून द्यायला पाहीजे ती देत नाही. त्यामुळे मध्यमवर्ग निवडणूका, राजकारण ह्या कडे जरा दुर्लक्ष करतो. आताशा हळूहळू जागृती होत आहे व लोक स्थानीक प्रश्रांना एकदम महत्व देत आहेत. वर्षानुवर्षे काँग्रेसचची सत्ता असलेल्या पूणे महानगरपालीकेत त्यांना धूळ चारलीच. तसेही मध्यमवर्ग हा जरा आत्मकेंद्रीत आहे (टिका नाही जगभर असेच असते.) त्यामुळे (कधी जाणूनबुजून) तो ही जबाबदारी टाळतो.

मला तामीळ लोकांचे मोठे कुतूहल वाटते. तामीळनाडूमधे मतदान भरघोस होते. मस्त पैकी पूर्ण बहूमताने विजयी करतात त्यामुळे इतर घटक पक्षांना न घाबरता सत्ताधारी पक्षाला कारभार करता येतो.

आपल्याकडे सत्तेचे घटकपक्ष जरा जास्त उपद्रव देतात असे नाही वाटत?

स्थानीक निवडणूका ह्या स्थानीक प्रश्रांवर तर देशपातळीवरच्या निवडणूका ह्या मोठ्या मुद्यांवर झाल्या पाहीजेत. तसेच जेवढे हजारो करोड रुपये हे निवडणूकांवर खर्च केले जातात त्यातले थोडे हे मतदारांच्या शिकवणीवर/प्रबोधनावर खर्च केले पाहीजेत. म्हणजे मतदान करणे कसे महत्वाचे आहे, निवडणूका म्हणजे काय, त्याचे बरेवाईट परीणाम वगैरे मतदाराला शिकवणे कंपलसरी ठेवले पाहीजे. मतदान ह्या महत्वाच्या विषयावर आपल्याला किती औपचारीक शिक्षण मिळाले आहे?

खरे आहे..

मध्यमवर्ग उदास असतो हे खरे आहे. आपण जिथे नोकराशाही म्हणला आहे तिथेच मध्यमवर्ग जास्त असतो. मतदानासाठी होणारा खर्च तसेच त्यासाठी होणारी एकुणच तयारी मी जवळून पाहिली आहे. जे मतदान करत नाहीत. त्यांना कधीतरी या प्रक्रियेत सामील करायला हवे. मग निवडणुकीची खरी धग लक्षात येइल असे वाटते. तसेच निवडणुकींवर होणारा खर्च हा आपल्याच खिशातला असतो, कर रुपाने भरलेला.

मुळातच निवडणुक माझ्यासाठी का महत्वाची आहे याचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.

तामिळ लोकाचे जसे कौतुक आहे तसेच आश्चर्य देखील. चित्रपटातल्या लोकांना राज्याची सत्ता देणे तिथे शक्य आहे. अर्थात अमेरिकेत सुद्धा उदाहरणे आहेत. पण तामिळनाडुमध्ये जरा अतिरेकच आहे.





मराठीत लिहा. वापरा.

वा

तसेच जेवढे हजारो करोड रुपये हे निवडणूकांवर खर्च केले जातात त्यातले थोडे हे मतदारांच्या शिकवणीवर/प्रबोधनावर खर्च केले पाहीजेत. म्हणजे मतदान करणे कसे महत्वाचे आहे, निवडणूका म्हणजे काय, त्याचे बरेवाईट परीणाम वगैरे मतदाराला शिकवणे कंपलसरी ठेवले पाहीजे. मतदान ह्या महत्वाच्या विषयावर आपल्याला किती औपचारीक शिक्षण मिळाले आहे?
हा मुद्दा फार आवडला.
--लिखाळ.

या पुर्वीची चर्चा

या पुर्वी जनहितवादींच्या 'निवडणूक नियमात सुधारणा ' यातील प्रतिसाद http://mr.upakram.org/node/523 मध्ये आपण सहभागी होतोच. निवडणुकांच्या काळात संख्याशास्त्रींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. या काळात काही प्राध्यापक गोबेल्स बनतात. त्यांना भरपूर मानधन मिळत. शब्दांची कसरत करण्यात ते तरबेज असतात. मी एकदा पुण्यातील एसेम जोशी सभागृहात अशा एका मतदार प्रबोधन कार्यक्रमात गेलो होतो. मतदार सदाशिव पेठी . पण शब्दरंगकर्मींनी आपल्या शब्दाभिनयातून अशी जादू केली की कॊंग्रेसला मत द्या हे थेट सांगायचे फक्त बाकी होते.
यांना एकदा मी प्रश्न विचारला होता कि जे लोक मतदान करत नाही त्यांचा प्रामाणीक सर्व्हे घेउन अभ्यासपुर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न कधी कुणि केला आहे का?
वयोगट, शिक्षण. व्यवसाय. लिंग, आर्थिक स्तर, शहरी/निमशहरी/ग्रामीण/ वगैरे....
त्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाकडून उत्तर "नाही" असे मिळाले.

प्रकाश घाटपांडे

नाही

आपल्याकडे प्रसार माध्यमे बराचसा प्रभाव पाडतात. कदाचित ती प्रसार माध्यमांऐवजी प्रभाव माध्यमे आहेत असे म्हणणे फारसे चुक नाही. खास करुन तुम्ही म्हणता तो प्रकार नेहमी होताना दिसतो. पडद्या आडून अमुक एका पक्षाला मत करा. हे सांगितले जाते. मतदार सुद्धा एवढा निर्बुद्ध आणि अपरिपक्व असतो हे पटत नाही. रोजच्या घडामोडीत स्वतःला काय हवं हे प्रत्येकाला कळत असत. कदाचित आला दिवस मारून न्या. हि मानसिकता जास्त आहे. फार पुढचा विचार करायचा नाही. नेते मंडळी सुद्धा अशा लोकांमधुनच पुढे येतात. त्यामुळे दिर्घ मुदतीचा विचार करताना कोणी दिसत नाही.





मराठीत लिहा. वापरा.

जग

मी जग अजुन फारसे पाहिले नाही. पण एवढे मात्र नक्किच जाणवले कि भारतातली प्रसार माध्यमे अनेकदा बेजबाबदार पणे वृत्ते प्रसारित करतात.





मराठीत लिहा. वापरा.

घरच झालं थोडं

ह्या सर्व वाहिन्या भारतात दिसतात.

त्या बघा. वृत्तवाहिन्यांचा बेजबाबदारपणा लक्षात येईल.

हे म्हणजे. घरच झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोड अस झालं. दुर्दैवाने जे पाश्चात्य ते सगळच अनुकरणीय अशी अनेक भारतीयांची मानासिकता आहे. मग तोच बेजबाबदारपणा येथे आढळणे हे फारसे आश्चर्यकारक नाही.





मराठीत लिहा. वापरा.

जगी

अहो, जगी सर्वसुखी असा कोण आहे? हे संतवचन आम्ही भारतातच ऐकले आहे. तुम्ही फक्त जगात इतरत्र तरी काय वेगळे आहे ? म्हणत आहात. मी पुर्वी लिहिल्या प्रमाणे आम्ही जग पाहिले नाही. जागातल्या इतर विकसीत देशांप्रमाणे भारत विकसीत का नाही? वर्षानुवर्षे विकसनशीलच का आहेत? आता असे म्हणु नका कि जगात सगळेच देश विकसनशील आहेत. विकसीत कोणीच नाही. जगात इतरत्र तरी काय वेगळे आहे ?





मराठीत लिहा. वापरा.

तरॊ देखिल


मतदार सुद्धा एवढा निर्बुद्ध आणि अपरिपक्व असतो हे पटत नाही.


मान्य ! पण मतदानाच्या वेळेला केलेली भावनिक आवाहने अधिक प्रभावी ठरतात. ही तत्कालीन असली तरी निर्णायकतेकडे झुकणारी असतात.सदाशिव पेठी मतदार श्रोत्यांसमोर कूठले तंत्र वापरायचे आणि कुठेले नाही हे त्यांना चांगले माहित असते. अहो शत्रूला देखिल भावनिक आवाहनातुन संवेदनाशिल माणूस माफ करतो. राजीव गांधींच्या हत्येनंतर आलेली सहानुभूतीची लाट अशीच होती.
प्रकाश घाटपांडे

सहमत

राजीव गांधींच्या हत्येनंतर आलेली सहानुभूतीची लाट अशीच होती.
या बद्दल सहमत.
मी ही तेच म्हणतो आहे ना. कि आपल्याकडे नसत्या लाटांवर स्वार होउन मतदार देशाचे भवितव्य ठरवतात.





मराठीत लिहा. वापरा.

चिंतन

चिंतन करणे याला दोष म्हणायचा का? जे चुक आहे ते चुक म्हणायला नको का? सगळीकडेच चुक आहे म्हणुन आहे ते बरोबर आहे का?
गेल्या काही दशकाता आंतरराष्ट्रीय पातळीला भारतातने आघाडी घेणे शक्य झाले नाही तसेच काही ठोस निर्णय घेणे शक्य झाले नाही. त्याचे मुख्य कारण अस्थिर सरकारे आहेत. या अस्थिर सरकारांना मतदार सुद्धा जबाबदार आहेत. मग त्यांना चिंतन करा असे सांगणे म्हणजे दोष कसा होतो?





मराठीत लिहा. वापरा.

भारतात

आम्हाला भारतात राहताना आमची तसेच इतरांची चिंता वाटते आणि आम्ही चिंतित होतो. म्हणुन चिंतनाचा विचार. तुम्ही म्हणता तसे जगात वेगळे काहीच नसेल तर मग तो मात्र मोठा चिंतेचाच विषय आहे. आमच्यासाठी तरी. तशी जगाची चिंता अमेरिकेला आणि अमेरिकेनांना जास्त आहे. म्हणुन आम्ही आत्ता तरी जगाची चिंता करण्यापेक्षा आमची कुवत पाहुन भारताची चिंता करतो आहोत. म्हणुन चिंतन. कदाचित अमेरिकेत जास्त चिंतन चालत असेल. त्यांना जगाची चिंता आहे. आम्ही अमेरिका पाहिली नाही. तुम्ही पाहिली आहे. तेंव्हा तिथे चिंतन कसे चालते हे सांगितल्यास आम्हाला मार्गदर्शन होइल. आम्ही निदान जनांचे ऐकण्याचे काम करु शकतो.





मराठीत लिहा. वापरा.

मिसूरी...कळाले नाही.

तो उमेदवार मेल्याचे जाहीर झाले नव्हते का? का जाहीर होऊनसुद्धा अनेकांना माहीत नसल्याने त्याला मते मिळाली? त्याच्या मरणामुळे निवडणूक रद्द कशी झाली नाही? की निवडणुकीच्या दिवशी तो जिवंत होता आणि निकालाच्या दिवशी मृत?-वाचक्‍नवी

कसा करणार?

>यांना एकदा मी प्रश्न विचारला होता कि जे लोक मतदान करत नाही त्यांचा प्रामाणीक सर्व्हे घेउन अभ्यासपुर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न कधी कुणि केला आहे का?

जे मतदान देखील करत नाहीत, त्यांना अशा सर्वेक्षणाला वेळ द्यायला जमेल? (जमेल बहुदा, मतदान डिजीटल असलं म्हणजे झालं.)

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

भ्रष्ट आणि अनुशासनहीन भारतीय

"तसेच जेवढे हजारो करोड रुपये हे निवडणूकांवर खर्च केले जातात त्यातले थोडे हे मतदारांच्या शिकवणीवर/प्रबोधनावर खर्च केले पाहीजेत"... काही उपयोग होणार नाही लिखाळ साहेब, ह्या शिकवणी/प्रबोधना मधे पण लोकं लाच-लुचपत खातीलच, खरं सांगायचं तर आम्ही भारतीय लोकं "ढोंगी" आहोत, मोठ्या-मोठ्या गोष्टी करणे मात्र इथल्या लोकांना छान जमतात, पण ज्याला मोका मिळतो तो "खाल्ल्याशिवाय" राहात नाही, ज्याला मोका मिळाला नाही, तो लोकशाही आणि ईमानदारीच्या गोष्टी करतो... खुद्द रास्वसंघ चे आजीवन कार्यकर्ते भाजप मधे येवून चांगलेच भ्रष्ट झाले (तेच लोकं जास्त मोठ्या-मोठ्या गोष्टी करतात) पण "भ्रष्टाचार" नावाचा जन्तू आता सम्पूर्ण भारताला (पंचायती राज मुळे थेट खेड्या-पाड्या पर्यन्त) लागला आहे, भारतीय आपल्या देशांत रहातात तेव्हां ते जात्याच अनुशासनहीन असतात (मात्र देशाबाहेर ते "सरळ" रहातात, कारण तिथे कायद्या ची भिती असते), ट्रेफ़िक लाईट लाल असला आणि रोड वर कुणी नसेल तर भारतीय माणूस आपली गाडी पुढे काढेलच, वीज-पाणी किती आणि कसे चोरी करता येईल ह्याचा विचारात तो नेहमीच राहतो, असे बरेच उदाहरण आहेत, तर फ़क्त मतदाराला शिकवून काही होणार नाही, आधी भारतीयांच्या रक्तात भिनलेलं हे "अनुशासनहीनता, भ्रष्टाचार आणि कामचोरी च्या कैन्सर चा इलाज़ शोधावा लागेल.... ह्याचा इलाज काय, हे मात्र सांगणे एवढे सोपे नाही...
टैक्स भरणारा, मतं देणारा आणि भ्रष्टाचारावर नुस्ताच खवळत रहाणारा
सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com

कर, मत आणि भ्रष्टाचार

आपल्याकडे दोन प्रकारची माणसे आहेत. एक निमुटपणे सहन करणारी आणि दुसरी म्हणजे हव ते वाट्टेल त्या मार्गाने मिळवणारी. पहिली माणसे जास्तीत जास्त काय करतात? हे बदलणार नाही असा समज करुन घेउन गप्प राहतात. दुसरे आहेत ते मोकळं रान मिळाल्याने चरतच राहतात. गरज आहे ती जन जागृतीची. सुरुवात फक्त आपल्यापासुन नाही तर आपल्या सोबत इतरेजनांना सक्रिय करून मतदान करायला आणि ते हि विचार करुन करायला अशी व्हायला हवी.





मराठीत लिहा. वापरा.

सुवर्णमध्य

मी मुळ विषयात लिहिले आहेच कि इतरत्र काही वेगळे असेलच असे नाही. पण मतदानाच्या बाबतीत अनेक ठिकाणी परिपक्वता दिसुन येते. आपल्याकडे सुद्धा चांगली उदाहरणे आहेतच. सुवर्णमध्य साधणारे लोक जास्त संख्येने हवेत.

अवांतरः तामिळनाडु मध्ये सिनेकलाकार निवडणुकांवर बर्‍या पैकी प्रभाव टाकतात पण महाराष्ट्र अथवा इतर काही राज्यात तसे होणे नाही.





मराठीत लिहा. वापरा.

नाही

सिनेकलाकारांनी अपरिपक्वतेची धुरा डोक्यावर घेतलेली आहे का ?
नाही. प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेतच.
समाजासाठी काम करणार्‍यांना विरोध करणारे अपवादात्मक असतात. मुंबइमध्ये लोकांनी गोविंदाला निवडुन दिले. ते ही योग्य आहे का नाही हे पुढच्या निवडणुकी मध्ये पाहुच.

मतदानाबाबतच्या परिपक्वतेची व्याख्या काय ? - याचे योग्य उत्तर निवडणुक आयोग देउ शकतील. माझ्यासाठीची व्याख्या माझ्यासाठी तसेच माझ्यासारख्या समविचारींसाठी सीमित असु शकते.

आपल्याला योग्य वाटेल त्या उमेदवाराला कुणी मत दिले नाही, तर त्याला इतर मतदारांची अपरिपक्वता असे संबोधणे ही सर्व जगातील मध्यमवर्गीयांची एक पद्धत आहे.
मध्यमवर्गीयांची व्याख्या काय? तसेच असे वक्तव्य/लिखाण करण्याला आधार काय?





मराठीत लिहा. वापरा.

भारतीय मतदार !

चाणक्य साहेब,
एक मस्त विषय आणलाय तुम्ही, नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या, त्यात कोणत्या विकासाच्या गोष्टी होत्या
असे नव्हे, भाऊबंदकी, सुड, आणि गावातील वर्चस्व यापलीकडे हे राजकारण जात नाही . त्यात भर पडली तंटामुक्ती गावच्या अध्यक्षाची त्यांनी गावात भांडणे होऊ नये म्हणून प्रयत्न करावेत, तर तेच भांडतांना दिसत होते.

आणि मध्यमवर्गीयांचे तर विचारु नका, ते कोणाला मतदान करतील याचा भरवसा राहिलेला नाही. कोणी निवडून आले तरी आपले भले होऊच शकत नाही ही मानसिकता कधी बदलेल कोणास ठाऊक. तसेच ज्याला मतदान करायचे आहे, त्याच्याबाबतील काही क्षणात निर्णय घ्यायचा असतो तेव्हा फार काही चॉइस नसते म्हणून मतदान करावे लागते तेव्हा मात्र ती लोकशाहीची क्रुर चष्टा वाटते. अण्णासाहेब हजारेंनी लोकप्रतिनिधिंना परत बोलावण्याची जी मागणी केली आहे ती आम्हाला योग्य वाटते. ( विषयांतर झाले असल्यास क्षमस्व )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग्रामपंचायत

सर, तुम्ही नेमक्या मुद्यावर बोट ठेवल आहे. खरतर सुरुवात गावांपासुन होते. तिथे असलेले मतदार आणि नेते मंडळी यांचे समीकरण तुम्ही म्हणत आहात तसे आहे. आपल्या गावा बाहेर सुद्धा गाव आहे. हा विचार रुजवणारे नेते हवे आहेत. अनेक गावे मिळुन देश तयार होतो. प्रत्येक गावा मध्ये देशाला सशक्त करायची योग्यता आहे हा विश्वास त्यांना देणे गरजेचे आहे. नाहीतर मग आमचं गाव, गावातला साखर कारखाना या पलिकडे विचार जातचं नाहीत. कारखान्या सोबत प्रत्येक गावात एखादाच चांगला दुसरा कारखाना उभा राहिला तर बरेचसे प्रश्न कमी होतील.





मराठीत लिहा. वापरा.

माझं मत..

मग भारतीय मतदार असे का? एवढे उदास, एवढे कमविचारी? कि आम्ही असेच आहोत? आम्हाला सगळंच जे घडत ते मान्य आहे? आम्हाला आमचं आमचं राज्य करायची इच्छा नाही? कि आमच्यावर लादलेलेच राज्य जास्त चांगल असत?

दुर्दैवाने आजपर्यंत तरी हेच खरं आहे....!

जगाची एक महासत्ता म्हणून मतदान केले, आपल्या समाजाच्या आणि परिसराच्या विकासासाठी मतदान केले तर? असे होइल का? भारतीय मतदार खरच सुजाण, अभ्यासू आणि जबाबदार मतदार बनेल काय?

कठीण आहे. पण असं एक ना एक दिवस नक्की होईल अशी मला आशा आहे....

जो भी है, जैसा भी है, ये देश मेरा है! आणि याच्या भल्याकरता, उन्नतीकरता, चांगले कार्यक्षम सरकार निवडून देण्याकरता मी नेहमीच कटिबद्ध राहीन आणि माझ्यापरिने तरी जनजागृतीचे जमतील तेवढे प्रयत्न करीन एवढंच या क्षणी लिहू शकतो...

चाणक्यराव, व्यक्तिगत पातळीवर 'चाणूमामा' वगैरे संबोधून आपल्याशी भांडा-झगडायला नेहमीच मजा येते परंतु आपले 'राजकीय विचार आणि चिंतन' याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे!

चांगला लेख..!

असो...

तात्या.

लोकशाही

भारतातल्या लोकशाहीत लोकं स्वातंत्र्याचा विचार स्वैराचार करु लागल्याने आजची वेळ आली आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. आपल्याकडे असे अनेक मतदार आहेत जे मला मत देण्या लायक उमेदवार नाही म्हणून मतदान करत नाहीत अथवा मत बाद करतात. मतदाने केले नाही तर बोगस मतदान होते आणि मत बाद केले तर त्या मतदानाला काहिच अर्थ उरत नाही. त्या ऐवजी आहे त्यातले त्यातल्यात्यात चांगले स्वीकारणे योग्य.
आपल्याकडे लोकांची खास करुन नेत्यांची एक मानसिकता दिसुन येते. आपल्याला हवे ते आपल्या पक्षात नाही मिळाले तर काढा आपला स्वतःचा पक्ष मग आपला कंपु घेउन तेवढ्या पुरतेच शक्ति प्रदर्शन करत् बसायचे. याने होते काय? लोकशाही जास्त कमकुवत होते. याचा विचार कोणीच करत नाही. राज ठाकरे आणि अनेक जनता दल हे याचे ज्वलंत उदाहरण. दोनाला तीन पक्ष असणे एकवेळ ठिक आहे. पण पक्षांची खिचडी आपणा सर्वांनाच मारक आहे.





मराठीत लिहा. वापरा.

जग

जग फार मोठं आहे हो आणि जगाच्या लोकसंख्येचा मी केवढा भाग आहे? पुर्ण जगाची चिंता करणे चांगले आहे. पण आम्हाला भारतापासून सुरवात करायची आहे. जगात लोकांना कायद्याचे भय असणारी राष्ट्रे सुद्धा आहेत. भारता तसे फारसे दिसत नाही. हम करे सो कायदा...





मराठीत लिहा. वापरा.

त्यातल्या त्यात?

मतदाने केले नाही तर बोगस मतदान होते आणि मत बाद केले तर त्या मतदानाला काहिच अर्थ उरत नाही. त्या ऐवजी आहे त्यातले त्यातल्यात्यात चांगले स्वीकारणे योग्य.

इलेक्ट्रॉनिक यंत्रात ' वरीलपैकी कोणासही नाही" असे मत व्यक्त करण्यासाठी शेवटी एक बटन ठेवता येत असतानाही ते ठेवले गेले नाही. जेव्हा असे मत व्यक्त करायचे असेल तर तशी व्यवस्था ही मतदानकेंद्रावर केली असून एक अमुक नंबरचा फॉर्म भरुन द्यावा असे आदल्या दिवशी पेपर मध्ये आले. त्यानुसार काही जागरुक नागरिकांनी विचारणा केली असता. मतदान केंद्र अधिकार्‍यांनी सांगितले आम्ही पण पेपर मध्येच वाचले आहे.ते फॉर्म आमच्या कडे आता नाहीत असे सांगितले. सकाळ मध्ये ही बातमी आली होती. दरोडेखोर,डाकू. चोर,भामटा, भुरटा,उचल्या, यापैकी कोणाची तरी निवड मतदानातून करावी लागते. नाही तर उदासिनतेचा शिक्का बसतो.
हे मत आम्ही पुर्वीच व्यक्त केले होते. त्याची पुनरावृत्ती करतो येवढेच.
प्रकाश घाटपांडे

आय आय टीयन्स

काही आय आय टीयन्स नी एक प्रतिष्ठान स्थापन केले होते. त्यात आयाआयटीतील उच्चशिक्षीत लोकांनी सक्रीय राजकारणात उतरण्यासाठी एक अजेंडा तयार केला होता. तो पेपर मध्ये आला होता. पुढे काय झाले माहित नाही. पण पुण्याचे माजी महापालिका आयुक्त अरुण भाटिया (ज्यांची स्वच्छ प्रशासक म्हणून प्रतिमा होती) त्यांना स्थायी समितीने संख्याबळाच्या आधारे पदावरुन हाकलले. ते लोकसभेच्या निवडणुकिला उभे राहिले. सुशिक्शितांचा पाठींबाही मिळाला, पण मतपेटीने मात्र हाकलले.

Democracy without education is hypocrisy without limitation. असे कुणाचे तरी (अर्थात विचारवंतच असणार ) वाक्य मी श्री अरूण टिकेकर यांच्या एका लेखात वाचल्याचे स्मरते. ज्या लायकीची जनता त्या लायकिचे सरकार. भारतासारख्या दोन विभिन्न टोके असलेल्या देशात प्रबोधनाने लोकशाहीच्या लायकीचे लोक बनण्यास वेळ बराच लागणार

कमी 'चोर 'तो 'साव 'या तत्वावर मतदान करावे.
प्रकाश घाटपांडे

परित्राण/भारत् उदय मिशन

>काही आय आय टीयन्स नी एक प्रतिष्ठान स्थापन केले होते. त्यात आयाआयटीतील उच्चशिक्षीत लोकांनी सक्रीय राजकारणात उतरण्यासाठी एक अजेंडा तयार केला होता. तो पेपर मध्ये आला होता. पुढे काय झाले माहित नाही

भारत उदय मिशनलोकपरित्राण हे ते दोन पक्ष आहेत. संकेतस्थळांवर 'काय झाले' ची महिती असावी.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

लीड इंडिया

रेडियो मिर्ची आणि टाइम्स वर चालू असलेल्या लीड इंडिया योजनेची प्रगती कुठपर्यंत आली आहे? याबाबत कोणाला काही माहिती आहे का? मला ही योजना(ऐकून तरी) आवडली. 'नायक' चित्रपटाची आठवण आली. आपल्यापैकी कोणीकोणी या योजनेला हातभार लावला आहे? त्यांचे अनुभव ऐकायला आवडेल.(मी वेळेअभावी आणि राजकारण ज्ञानाअभावी लावला नाहिये.)

इथे पाहा.

लीड इंडियाचे पहिले राउंडस् झालेले दिसतात, राज्यातून तीन उमेदवार निवडले गेले असावेत.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

मत विकने आहे

चांगाला विषय ऐरणीवर घेतला आहे तुम्ही.

मुळातच मतदान करणारे मतदार कोण?
ज्यांना आपली मते विकून रोटी-कपडा-दवा-दारू यापैकी काहीतरी मिळवायचे असते ते.

मग मतदान होते ते कोणाचे? ज्यांना रोजच्या रोटीचा प्रश्न आहे. ज्यांना कर भरायचाच नाही. ज्यांना कधी स्वतःचे पक्के मोठे घर बांधायचेच नाही. ज्यांना अनधिकृत गोष्टी अधिकृत करुन घ्यायच्या आहेत. हे असे मतदार मग नेटाने मतदान करतात कारण त्यांना समाजाच्या उद्याची चिंता नसते कि त्यांच्या पुढच्या काही वर्षांची.
अगदी १००% खरे. मनातले बोललात.

आपला,
(मतदान बहिष्कृत) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

हे पहा

हा पहा भारतीय मतदारांच्या/समर्थकांच्या/विरोधकांच्या मानसीकतेचा एक नमुना.





मराठीत लिहा. वापरा.

नमुना

दैनिक सकाळ मधल्या बातमीमुळे मिळालेला एक नमुना देतो आहे. हा बातमीचा काही भाग आहे. भारतीय मतदारांचा हा आणखी एक नमुना...

बाजार समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र आघाडी करत उमेदवार उभे केले. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सहकार्य घेतले; पण आघाडीच्या उमेदवारांना पाचशे ते सहाशेच्या आसपास मते मिळाल्याने त्यांची अनामतही जप्त झाली. ऊस, दूध दरवाढीसाठी संघटनेचे आंदोलन डोक्‍यावर घेणारे शेतकरी जेव्हा सत्तेसाठी लढाई असते, तेव्हा पारंपरिक पक्षांच्या उमेदवारांनाच पाठिंबा देत असल्याचे समितीच्या निवडणुकीत स्पष्ट झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते नाराज झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी गोकुळच्या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली आहे.





मराठीत लिहा. वापरा.

म. टा.

म. टा. च्या अग्रलेखातला थोडासा भाग....

डाव्यांच्या या विरोधामुळे यापुढच्या काळात आघाडी सरकारे कितपत ठाम निर्णय घेऊ शकतील, अशी शंका निर्माण झाली आहे. भारताला आथिर्क प्रगतीचा वेग गाठायचा असेल आणि एक शक्ती म्हणून जगात वाटचाल करायची असेल, तर काही निर्णय ठामपणे घेणे आवश्यक आहे. आघाडी सरकारे असा ठाम निर्णय घेऊ शकतील, असे आता वाटत नाही. त्यामुळे यापुढच्या काळात मतदारांनी जागरूकपणे मतदान करून एकाच पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार आणि तितकाच प्रबळ विरोधी पक्ष निवडून देणे आवश्यक आहे. सरकारच्या एखाद्या धोरणाला विरोध करणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य असते. आंतरराष्ट्रीय करारांची साधकबाधक चर्चाही आवश्यक असते. पण हा विरोध व्यक्त झाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सरकारला असलेच पाहिजे. डाव्या पक्षांनी सध्या सरकारला हे स्वातंत्र्यच नाकारले आहे. ज्या सरकारला निर्णय घेऊन तो अमलात आणण्याचे स्वातंत्र्य नसेल त्याला सरकार म्हणायचे का, हे मतदारांनी ठरविण्याची वेळ आता आली आहे.

हे प्रबोधन प्रसार माध्यमांनी करणे हा एक खरच चांगला प्रकार आहे.





मराठीत लिहा. वापरा.

एकाच!

त्यामुळे यापुढच्या काळात मतदारांनी जागरूकपणे मतदान करून एकाच पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार आणि तितकाच प्रबळ विरोधी पक्ष निवडून देणे आवश्यक आहे.

एकाच पक्षाचे म्हणजे कुणाच्या पक्षाचे? तुमच्या की माझ्या? विरोधी पक्षाच्या प्रबळतेसाठी देखील 'स्थिरता' ही पूर्व अट आहे का?

मतदारांनी सरकार वगैरे निवडण्याच्या भानगडीत पडू नये. चांगले उमेदवार निवडून दिले तरी पुरेसे ठरावे.

डाव्या पक्षांनी सध्या सरकारला हे स्वातंत्र्यच नाकारले आहे.

पटलेल्या तत्वासाठी, सत्तेवरून हटायची तयारी नसलेल्यांना कसले स्वातंत्र्य अपेक्षित आहे? डाव्यांना हव्या त्या सरकारला/पक्षाला/मुद्याला समर्थन द्यायचे स्वातंत्र्य आहे का?

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

हे मुद्दे

हे मुद्दे वर्तमान पत्रातले आहेत.
हे कळले नाही...
मतदारांनी सरकार वगैरे निवडण्याच्या भानगडीत पडू नये. चांगले उमेदवार निवडून दिले तरी पुरेसे ठरावे.
निवडल्या गेल्या उमेदवारामधुनच सरकार तयार होते ना? मतदार अप्रत्यक्षपणे सरकारच निवडतात.

एकाच पक्षाचे म्हणजे कुणाच्या पक्षाचे? तुमच्या की माझ्या? विरोधी पक्षाच्या प्रबळतेसाठी देखील 'स्थिरता' ही पूर्व अट आहे का?
इथे तुमच्या किंवा माझ्याचा प्रश्नच नाही. असे अनेक तुम्ही आणि मी काय विचार करतात आणि त्यांची संख्या यावर कोणता पक्ष सत्तेत येणार आणि कोणता नाही हे ठरणार. तुमच्या विचारांचे जास्त लोक असतील तर नक्किच तुमचे सरकार येइल.

डाव्यांना हव्या त्या सरकारला/पक्षाला/मुद्याला समर्थन द्यायचे स्वातंत्र्य आहे का?
पहिला प्रतिप्रश्न: डाव्यांमधे सरकार बनवायची कुवत/संख्याबळ आहे का?
दुसरा: विरोधाला विरोध आणि सत्तेची हाव या पायी आज काँग्रेस सत्तेवर आहे. गरज लागल्यावर शिवसेनेचे उंबरे सुद्धा गाठले आहेत. मग डाव्यांचे असे विचित्र संख्याबळ असेल जबाबदारीने सत्ता सांभाळने हे त्यांचे काम नाही काय?
तिसरा: डावे सत्तेत सहभागी का नाहीत?
चौथा: डाव्यांच्या नेत्यांचे तरी अणु करारावर एकमत आहे का? इकडे विरोध आणि तिकडे गरज.
डाव्यांची स्वातंत्र्यांची सांगड घालणे थोडे हास्यास्पदच वाटते. स्पष्टच लिहायच तर डाव्यांचा स्वैराचार सुरू आहे. कॉंग्रेसला डाव्यांच्या आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांत जर संख्याबळ वाढुन मिळाले असते तर डाव्यांना एवढे महत्व आले असते का?
आत्ता या क्षणी तरी सत्तेच्या हव्यासापायी तेरी भी चुप मेरी भी चुप करुन नाटक सुरु आहे.





मराठीत लिहा. वापरा.

'मु'द्दे

हे मुद्दे वर्तमान पत्रातले आहेत

अर्थात. आपणच तसे म्हटले आहे.

मतदार अप्रत्यक्षपणे सरकारच निवडतात.

बरोबर. ते 'अप्रत्यक्षपणेच' निवडावे असे त्याला वाटते. परिणामी कुणाला बहुमत मिळते याचा खल न करता.

तुमच्या विचारांचे जास्त लोक असतील तर नक्किच तुमचे सरकार येइल.
हेच म्हणतो. मग 'एकाच पक्षाचे सरकार व्हावे' असे म्हणण्याला अर्थ उरतो का? जास्तीजास्त लोकांचे विचार एकसारखे असावेत असा अर्थ अपेक्षित आहे का?

डावे / उजवे

पहिला प्रतिप्रश्न: नसेल. प्रश्न गैरलागू आहे.

(तुम्हाला सत्तेत येता येत नाही ना?, मग आम्हाला हवे ते करू द्या. समर्थन मात्र चालू ठेवा असे सुचवायचे आहे काय?)

दुसरा: आपल्याला पेलवतील असेच निर्णय घेणे व घेतल्यास ते निभावून नेणे जबाबदारीचे लक्षण नाही आहे काय?

तिसरा: प्रश्न गैरलागू. डाव्यांनाच विचारा.

चौथा: डाव्यांची स्वातंत्र्यांची सांगड घालणे थोडे हास्यास्पदच वाटते.
काँग्रेसनेला निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य होते, त्यांनी तो घेतला आहे. आपण म्हणता तसे "मग डाव्यांचे असे विचित्र संख्याबळ असेल जबाबदारीने सत्ता सांभाळने हे त्यांचे काम नाही काय?" त्यांनी जबाबदारीच दर्शवली आहे. मग "डाव्या पक्षांनी सध्या सरकारला हे स्वातंत्र्यच नाकारले आहे" हे पटत नाही. दिलेले समर्थन परत घेणे हा डाव्यांचा अधिकार आहे असे त्याला वाटते.

(निर्णय स्वातंत्र्य हा ऋण अधिकार आहे. माझ्या निर्णयाला इतरांनी (त्यांच्या स्वातंत्र्याला मुरड घालत!) खतपाणी घालावे हे ऋण अधिकाराच्या अपेक्षेबाहेर असावे.)

स्पष्टच लिहायच तर डाव्यांचा स्वैराचार सुरू आहे.
हम्म. प्रबळ विरोधी पक्षदेखील विरोधातच होते म्हणे. डाव्यानी विरोध केला नसता तर हा डाव्यांचा व काँग्रेसचा स्वैराचार ठरता काय?

कॉंग्रेसला डाव्यांच्या आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांत जर संख्याबळ वाढुन मिळाले असते तर डाव्यांना एवढे महत्व आले असते का?

जर-तर चा प्रश्न. जर उत्तर देता आले असते तर पैसे लावता आले असते.

आत्ता या क्षणी तरी सत्तेच्या हव्यासापायी तेरी भी चुप मेरी भी चुप करुन नाटक सुरु आहे.
कुणाचे? ज्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य हवे होते, जे स्वैराचारी डाव्यांनी दिले नाही, पण जे 'जबाबदारी पाळण्यासाठी' काँग्रेसने मिळवले त्यांचे ?

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

चर्चा

उपक्रमींनो, हा या चर्चेचा ५० वा प्रतिसाद. या नंतर प्रतिसाद शोधणे थोडे कठीण होते असा अनुभव आहे. त्यामुळे हा शेवटचा प्रतिसाद... वरील प्रतिसादा मी वैयक्तिक निरोपातुन प्रतिसाद दिला आहे. या विषयावर कोणाला पुढे चर्चा करायची असल्यास नवीन चर्चा विषय सुरू करावा हि नम्र विनंती.

भारतात गेली काही दशके आघाडी सरकारे येत आहेत तसेच गेल्या दोन सरकारात प्रमुख राजकिय पक्षांनी सुद्धा त्याची अपरिहार्यता मान्य केली आहे. कदाचित भविष्यात याचे परिणाम म्हणुन राजकिय पक्ष आणि मतदार आणखी जबाबदार बनतील आणि भारताला एक जगातील एक प्रमुख आणि जबाबदार राष्ट्र बनविण्यास हातभार लावतील असे वाटते. कदाचित काहिंना चर्चेचा शेवट पटणार नाही. पण तांत्रिक कारणामुळे मी हि चर्चा येथे समाप्त झाली असे जाहिर करतो.





मराठीत लिहा. वापरा.
 
^ वर