मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २.
१) हातचा मळ.
माझ्या समजुतीनुसार सहजप्राप्य, totally under control, अशा अर्थाचा जो ’करतलामलकवत्’ (करतल+आमलक+वत्) हा शब्दसमूह आहे त्याचे हे अपभ्रंशरूप आहे. ’करतलामलकवत्’ म्हण्जे हाताच्या तळव्यावरील आवळ्याइतके कह्यात असलेले. विद्यारण्यस्वामीकृत ’ब्रह्मविद्-आशीर्वाद’ येथे ’असंभावनाविपरीतभावनारहितत्वेन करतलामलकवत् अहं ब्रह्मास्मीति अप्रतिबद्धापरोक्षब्रह्मसाक्षात्कारो दृढीभूयात्’ (संक्षिप्त भाषान्तर ’ब्रह्मसाक्षात्कार हा करतलामलकवत् अडसर नसलेला आणि प्रत्यक्ष असावा’) असा ह्या संस्कृत शब्दसमूहाचा वापर आढळला. मूळ शब्दाची जाणीव विसरल्यामुळे करतलातून हात आणि आमलकातून मळ असे बदल करून ’हातचा मळ’ हा त्याच अर्थाचा मराठी शब्दसमूह निर्माण झाला असावा.
२) जितं मया.
महाभारताच्या सभापर्वात युधिष्ठिराकडून द्यूतामध्ये एकेक गोष्ट जिंकल्यावर प्रत्येक वेळी शकुनि उन्मादाने ’जितं’ असे ओरडतो. त्यावरून विजयाच्या स्वैर उन्मादाचे वर्णन म्हणून ’जितं मया’ ह्या शब्दसमूहाचा वापर होतो असे वाटते.
३) बाष्कळ.
ऋग्वेदसंहितेच्या शाकलशाखेसारखेच ऋग्वेदसंहितेचे अन्य एक रूप अशी बाष्कलशाखा आहे. बाष्कलशाखेमध्ये सूक्तांची संख्या थोडी कमी आहे आणि त्यांचा क्रमहि काहीसा वेगळा आहे. शाकलशाखेचे वैदिक बाष्कलशाखेला हीन आणि अग्राह्य मानतात. ह्यावरून बाष्कळपणा. बाष्कळ बडबड असा बाष्कळ ह्या शब्दाचा हीनत्वदर्शक वापर सुरू झाला. जुन्या मराठीतील ह्या शब्दाच्या अशा अर्थाच्या वापराचे उदाहरण म्हणून तुळपुळे-फेल्डहाउस कोशामध्ये ’पुराणे सकळिक बाष्कळिक’ असा ज्ञानेश्वर अभंगातील उतारा दिला आहे.
४) सव्यापसव्य.
श्रावणीच्या आणि श्राद्धाच्या वेळी अनेक वेळा जानवे डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर आणि पुनः उलटे असे करावे लागते. ’सव्य’ म्हणजे डावा आणि ’अपसव्य’ म्हणजे उजवा. (’सव्यसाची’ म्हणजे डाव्या हातानेहि प्रत्यंचा ओढून बाण मारू शकणारा ambidextrous धनुर्धारी.) ह्यावरून ’सव्यापसव्य’ ’निष्कारण वेळखाऊ उद्योग’ असा शब्द प्रसारात आला. (असाच 'hocus pocus' निरर्थक मंत्रतंत्र अशा अर्थाचा इंग्रजी वाक्प्रचार कॅथलिक यूखरिस्टमधील ’hoc est corpus meum’ ’हे माझे (ख्रिस्ताचे) शरीर’ ह्यावरून निर्माण झाला.)
५) पंचपंच उषःकाली.
(पंचपंच उषःकाली रविचक्र निघो आले - ’घनश्याम सुंदरा’ भूपाळी). भारतीय ज्योतिषानुसार एक दिवस म्हणजे ६० घटिका आणि दोन घटिकांचा एक मुहूर्त. घटिका आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत मोजतात. दिवसाच्या तीस मुहूर्तांना स्वतंत्र नावे आहेत आणि काही मुहूर्त शुभ आणि काही अशुभ अशीहि विभागणी आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे २९वा मुहूर्त आणि हा सर्वोत्तम मानला आहे. हा मुहूर्त ५७व्या घटिकेपासून सुरू होतो. त्यामध्ये काही ईश्वरप्रार्थनेसारखे काही पुण्यकार्य करावयाचे असल्यास ५६व्या घटिकेमध्ये किंवा ५५ घटिका झाल्यानंतर झोपेतून उठावयास हवे. ५५ म्हणजे ’पञ्चपञ्चाशत’. ह्यातील ’शत’ हा तुकडा गळून पडून ’पंचपंच’ एव्हढेच उरले असा माझा तर्क आहे.
६) छप्पन्न.
’तुझ्यासारखे छप्पन्न शहाणे पाहिलेले आहेत’ हे वितंडवादातले नेहमीचे वाक्य आहे. ’षट्प्रज्ञ’ म्हणजे ’सहा शास्त्रे जाणणारा विद्वान’. त्याचेच साध्या मराठीत रूपान्तर ’छप्पन्न’!
७) षट्कर्णी होणे. (सगळीकडे पसरणे.)
षट्कर्णो भिद्यते मन्त्रः चतुष्कर्णः स्थिरो भवेत्।
द्विकर्णस्य च मन्त्रस्य ब्रह्माप्यन्तं न गच्छति॥
काश्मीरी कवि वल्लभदेवाने केलेला संग्रह ’सुभाषितावलि’.
सहा कानांमध्ये गुप्त गोष्ट फुटते, चार कानात ती गुप्त राहते, आणि दोन कानातच असली तर ब्रह्मदेवहि ती शोधू शकत नाही.
षट्कर्णो भिद्यते मन्त्रश्चतुष्कर्णः स्थिरो भवेत्।
तस्मात् सर्वप्रयत्नेन षट्कर्णं वर्जयेत्सुधीः॥
पंचतंत्र १.१०८
सहा कानांमध्ये गुप्त गोष्ट फुटते, चार कानात ती गुप्त राहते. म्हणून शहाण्या माणसाने सर्व प्रयत्न करून गोष्ट सहा कानांपर्यंत पोहोचणार नाही असे पहावे.
८) वचने किं दरिद्रता.
हस्तादपि न दातव्यं गृहादपि न दीयते ।
परोपकारणार्थाय वचने किं दरिद्रता ॥
शार्ङ्गधरपद्धति.
परोपकार करतांना याचकाला हातानेहि काही द्यायचे नाही आहे आणि घरातूनहि काही द्यायचे नाही आहे. अशा स्थितीत तोंडापुरते बोलण्यामध्ये दारिद्र्य दाखविण्याची काय आवश्यकता?
९) महाजनो येन गत: स पन्थाः.
श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम्।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गत: स पन्थाः॥
सुभाषित
श्रुति वेगळेवेगळे सांगत आहेत, स्मृतीहि वेगळेवेगळे सांगत आहेत. असा एकहि मुनि नाही की ज्याची शिकवण सर्वमान्य आहे. धर्माचे गूढ गुहेत लपल्यासारखे आहे. अशा स्थितीत आदरणीय व्यक्ति ज्या मार्गाने गेल्या तो मार्ग चोखाळावा.
१०) युद्धस्य कथा रम्याः.
दूरतः पर्वता रम्या वेश्याश्च मुखमण्डने।
युद्धस्य च कथा रम्यास्त्रीणि रम्यानि दूरतः॥
सुभाषित.
दुरून डोंगर साजरे, मुखप्रसाधनानंतर वेश्या चांगल्या दिसतात, युद्धाच्या गोष्टी मनोरंजक असतात. ह्या तीनहि गोष्टी दुरून चांगल्या वाटतात.
११) समानशीलव्यसनेषु सख्यम्.
मृगा मृगैः सङ्गमनुव्रजन्तिगावश्च गोभिस्तुरगास्तुरङ्गैः।
मूर्खाश्च मूर्खै: सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम्॥
पंचतंत्र लब्धप्रणाश.
हरिण हरणांसह, गाई गाईंसह, घोडे घोडयांसह. मूर्ख मूर्खांसह आणि शहाणे शहाण्य़ांसह असतात. ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात त्याच्यात मैत्री होते.
१२) मौनं सर्वार्थसाधनम्.
आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः।
बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्॥
पंचतंत्र लब्धप्रणाश.
आपल्या तोंडाळपणामुळे पोपट आणि सारिका पिंजर्यात पडतात. (न बोलणारे) बगळे मोकळे राहतात. मौनामुळे सर्व घडून येते.
१३) अव्यापारेषु व्यापार.
अव्यापारेषु व्यापारं यो नरः कर्तुमिच्छति।
स एव निधनं याति कीलोत्पाटीव वानरः॥
पंचतंत्र मित्रभेद.
संबंध नसलेल्या बाबीत जो मनुष्य लुडबुड करतो तो पाचर उपसून काढणार्या माकडाप्रमाणे मृत्युमुखी पडतो. (लाकूडतोडया दूर गेला आहे असे पाहून एक अतिचौकस माकड झाडावरून उतरून लाकडावर बसून पाचर उपसून काढण्याचा प्रयत्न करतो. पाचर निघाल्यामुळे लाकूड पुनः सांधले जाऊन माकडाचे वृषण त्यात सापडून तो मरतो.)
१४) मनःपूतं समाचरेत्.
दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम्।
सत्यपूतं वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत्॥
मनुस्मृति ६-४६.
डोळ्यांनी पाहून पाय टाकावा, वस्त्राने गाळून पाणी प्यावे, सत्याची कसोटी लावून बोलावे आणि मनाला (विवेकाला) पटेल तेच करावे.
१५) जीवो जीवस्य जीवनम्.
अहस्तानि सहस्तानामपदानि चतुष्पदाम्।
फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम्॥
भागवत १.१३.४६
हात असलेले हात नसलेल्यांवर, चार पायाचे पाय नसलेल्यांवर आणि मोठे लहानांवर पारध करतात. एक जीव दुसर्याचे जगण्याचे साधन असतो.
१५) कामातुराणां न भयं न लज्जा.
अर्थातुराणां न गुरुर्न बन्धुः कामातुराणां न भयं न लज्जा।
विद्यातुराणां न सुखं न निद्रा क्षुधातुराणां न रुचिर्न वेला॥
विक्रमचरित(?) हस्तलिखित.
पैशासाठी लोभी असलेल्यांना कोणी मोठा नसतो आणि कोणी नातेवाईक नसतो. कामेच्छेच्या अधीन झालेल्यांना भीति नसते आणि लाजहि नसते. विद्याप्राप्तीसाठी झटणारे सुख आणि निद्रेची पर्वा करीत नाहीत. भुकेलेल्यांना चव नसते आणि मर्यादाहि नसते.
१७) छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति.
एकस्य दुःखस्य न यावदन्तं गच्छाम्यहं पारमिवार्णवस्य।
तावद्द्वितीयं समुपस्थितं मे छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति॥
हितोपदेश १९३.
समुद्र पार केल्यासारखा मी एका दुःखातून बाहेर पडतो तोंच दुसरे माझ्यापुढे उभे राहते. एकदा छिद्र निर्माण झाले की त्यातून संकटे गुणित होऊ लागतात.
१८) सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम्.
सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते।
शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति।
कन्दैः फलैर्मुनिवरा गमयन्ति कालम्।
सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम्
पंचतंत्र मित्रसम्प्राप्ति १५९.
साप वारा पिऊन जगतात पण ते दुर्बल नसतात. सुके गवत खाऊन अरण्यातले हत्ती बलवान् होतात. ऋषिमुनि कन्दफळांवर दिवस काढतात. आनंदी वृत्ति हाच माणसाचा सर्वोत्कृष्ट ठेवा आहे.
१९) अरसिकेषु कवित्वनिवेदनम्.
इतरतापशतानि यदृच्छया वितर तानि सहे चतुरानन।
अरसिकेषु कवित्वनिवेदनं शिरसि मा लिख मा लिख मा लिख॥
सुभाषित.
हे ब्रह्मदेवा, अन्य शंभर त्रास माझ्या मागे लाव, मी ते सहन करीन. पण अरसिकापुढे काव्यवाचन एव्हढे मात्र माझ्या कपाळावर लिहू नकोस.
२०) बालादपि सुभाषितम्.
विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि काञ्चनम्।
अमित्रादपि सद्वृत्तं बालादपि सुभाषितम॥
विषामधून अमृत घ्यावे, अपवित्र गोष्टींमधून सोने घ्यावे, शत्रूपासून चांगली वर्तणूक घ्यावी आणि लहानापासून योग्य बोललेले घ्यावे.
Comments
सुंदर
अतिशय उत्कृष्ट मालिका
पुरवणी
क्र. १४, 'मन:पूतं समाचरेत्' ह्या वाक्याचा उपयोग मराठीमध्ये उच्छृंखल वागण्याच्या वर्णनासाठी केला जातो. मूळ अर्थ अगदी उलटा आहे.
क्र. १० मध्ये 'त्रीणि रम्यानि दूरतः' ह्याच्या स्थानी 'त्रीणि रम्याणि दूरतः' असे हवे.
मनःपूतं समाचरेत
हेच सांगण्यासाठी प्रतिसाद टंकायला घेतला होता, पण आपण ते काम आधीच केलेले आहे.
त्याआधीच्या (अव्यापारेषु व्यापार) पाचर उपटणार्या माकडाच्या गोष्टीत शेपूट अडकते असे वाचल्याचे आठवते. कदाचित लहानमुलांसाठीच्या व्हर्जन् मुळे शेपूट झाले असावे.
उपयोगी आणि माहितीपूर्ण
दोनही भागांतील संकलन अतिशय उपयोगी आणि माहितीपूर्ण आहे
आभार!
ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?
+१
असेच म्हणतो.
समानशीलव्यसनेषु सख्यम्.
'समानशील' हे अवतरण पंचतंत्रातल्या पहिल्या, म्हणजे मित्रभेद या तंत्रातले असावे, लब्धप्रणाशमधले नसावे.
आणि मुळातले...
दूरस्था: पर्वता रम्या वेश्याश्च मुखमण्डने।
युद्धस्य वार्ता रम्या च त्रीणि रम्याणि दूरतः॥
-----वाचक्नवी
उद्बोधक
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*पंचपंच उषःकाली हा शब्दप्रयोग बहुपरिचित आहे.पण त्याचा उगम मला ठाऊक नव्हता.शोधायचा प्रयत्न केला पण काही सापडले नव्हते.श्री.अरविन्द कोल्हटकर यांचा लेखवाचून उगम समजला.ते म्हणतातः
..कोल्हटकरांचा हा केवळ तर्क असेल ,पण माझी संशयनिवृत्ती झाली आहे.
*"अरे जा! तुझ्यासारखे छप्पन्न पाहिले आहेत." यात छप्पन चे मूळ षट्प्रज्ञ हे प्रथमच समजले.एकदम पटले.
* त्रीणि रम्यानि वाचल्यावर खटकले. पण त्यांनी तो दोष पुरवणीत सुधारला.
*"समानशीलव्यसनेषु " हे व्याकरणदृष्ट्या निर्दोष आहे. कांही वेळां समानशीले व्यसनेषु असे वाचनात येते. ते सदोष दिसते. समानशीलव्यसना:|तेषु|
पंचपंचउषःकाल आणि मोल्सवर्थ
मोल्सवर्थ-कॅन्डीच्या कोशात पंचपंचउषःकालचा अर्थ देताना सूर्योदयापूर्वीच्या पाच घटिका असाच दिला आहे. मात्र, पंचपंच म्हणजे पंचपंचादश असा तर्क करणे खरोखरीच कौतुकास्पद आहे.
---वाचक्नवी
मूलस्रोत मिळाले हे उत्तम
अनेक शब्दांचे मूलस्रोत मिळाले आणि सोबत योग्य उच्चार.
उत्तम उपक्रम. धन्यवाद!
१७६०
जा रे, तुझ्यासारखे सतराशे साठ पाहिलेत!
१७६० ही संख्या कुठुन आली असावी?
महाभारतीय युद्धात पाच पांडव, शंभर कौरव आणि इतर रथी, महारथी आणि अतीरथी इ. (सैनिक वगळून) योद्धे असे एकुण १७६० जण लढले आणि त्यापैकी दोन्हीबाजुकडील मिळुन केवळ ११ जण वाचले. त्यावरून वरील वाक्प्रचार निर्माण झाला असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.
जाणकारांनी यावर कृपया प्रकाश टाकावा.
वामन देशमुख
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.
१ मैल = १७६० यार्ड
१ मैल = १७६० यार्ड यावरून हा संख्याप्रयोग उदयाला आला, अशी थिअरी कुठेतरी वाचल्याचे आठवते. सत्यासत्यतेबद्दल खात्री नाही.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
पानपताचे युद्ध
पानपताचे युद्ध १७६० साली झाले. त्यावरून वरील वाक्प्रचार आला असावा असे एक मत आहे.
हा भागही आवडला. अनेक आप्तेष्टांना विरोपत्रातून दोन्ही दुवे पाठवले आहेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
१७६०
१७६० चे काही सुचत नाही पण '१७००' ही संख्या 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं' येथे दिसते.
थोडा शोध घेतल्यावर असे कळले की भारतीय ज्योतिषामध्ये एकूण १७६० शुभयोग (ग्रहांच्या स्थानांचा एकत्रित विचार करून निघणार्या स्थिति) आणि त्या संख्येच्या दुपटीहून थोडे अधिक अशुभ योग आहेत. (पहा http://rajeev-upadhye.blogspot.com/2011_01_01_archive.html). ह्याचे अधिक स्पष्टीकरण कोठे दिसले नाही. पण एक 'अफाट संख्या' अशा अर्थी १७६० चा उपयोग करण्याची प्रथा पडली असावी.
भारतीय ज्योतिषातील ७ दृश्य ग्रह (सूर्य, चन्द्र, शनि, गुरु, मंगळ, शुक्र आणि बुध) ह्यांची ७! = ५१४० इतकी combinations होऊ शकतात. १७६०*३=५२८० ह्याहून ही संख्या थोडीच मोठी आहे. पण ह्याचा १७६० शुभयोगांशी काही संबंध आहे काय इत्यादि चर्चा माझ्या ज्ञानकक्षेबाहेरची आहे.
मालिका आवडली
मालिका आवडली.
हातचा मळ हा पूर्वी कधी हातचा आंवळा होता हे गमतीदार आहे. (तरी आधुनिक लेखकाने-बोलणार्याने लक्षात ठेवले पाहिजे, की आजच्या वाक्प्रचारात "मळ" शब्द आहे. वाचक-ऐकणार्याच्या मनात तीच कल्पना येईल. एखादे काम मळासारखे सहजप्राप्य आहे, यात एका प्रकारचा लडिवाळ तुच्छ भाव आहे. आवळ्यात तो भाव नाही.)
छान
पहिला भाग अजून वाचला नव्हता आता तोही वाचतो.
प्रसन्न करणारा वाचन अनुभव
वारंवार वाचतच राहावे असे विवरण. मालिका अखंडपणे चालूच असावी अशी भावना ठेवून आहे.
१) "छप्पन्न शहाणे" संदर्भावरून हिंदी भाषिकांतही "छप्पन्न छुरियोंवाली" असे एक विशेषण स्त्रीवर्गाला उद्देश्यून असल्याचे आढळते. असे एक बर्यापैकी गाजत असलेले चित्रपटगीतही स्मरते. इथे 'छुरि' चा अर्थ 'तेज' घेता येईल पण म्हणून छप्पन्नचे सांख्यिकी प्रयोजन उमजत नाही.
२) विषय आता निघालाच आहे तर श्री.कोल्हटकर (आणि अन्य अभ्यासकांनीही) यानी "सोमाजी गोमाजी कापसे" या नामावरही प्रकाश टाकावा. एखाद्या व्यवहारात लुडबूड करणार्याला वा नको इतकी चिकित्सा करून आगाऊपणा दाखविणार्याला 'ह्यो कोन् सोमाजी गोमाजी कापशे' असा ग्रामीण भागात उल्लेख होत असतो, पण या नामाचा उगम कळून येत नाही.
३) ब्राह्मण कुटुंबियांत "त्र्यंबक" हे नाव सर्रास आढळते. पण एकदा ऋग्वेदाच्या संदर्भात चर्चा चालू असताना "त्र्यंबक = तीन माता असलेला" तसेच जास्त फोड करून असेही म्हटले जाते की "तीन माता म्हणजे विश्वाची तीन भागात विभागणी हे सुचविणारा" असे वाचनात आले. या लेखाच्या निमित्ताने आठवले इतकेच्.
वचने किं दरिद्रता
पर्यायी सुभाषितः
प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः |
तस्मात्तदेव वक्तव्यं वचने किं दरिद्रता ||(चाणक्यनीति १६.१४)
--- वाचक्नवी
करतळीं आवळे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संत ज्ञानेश्वर रचित हरिपाठाच्या अभंगात आहे:
..करतळ ताणून त्यावर आवळा ठेवला तर एक स्पर्षबिंदू सोडला तर उर्वरित सर्व आवळा दिसतो.त्याचा रंग,आकार, त्यावरील रेघा स्पष्ट दिसतात.काही डाग,दोष असल्यास लक्षात येतात.तो ताजा आहे की शिळा ,तयार आहे की कोवळा हे ओळखता येते.थोडक्यात असे की आवळा तळहातावर धरल्यास तो समजणे सुलभ होते.करतलामलकवत् चा मूळ अर्थ आकलनास सुलभ असा आहे.करण्यास सोपे असा नाही.मात्र हातचा मळ या शब्दप्रयोगाचा अर्थ हिंदीतील "बायें हातका खेल " च्या अर्थ सारखा आहे.
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २.
आपले लेख फारच आवडले. शाळेत ८ वी ते ११वी पर्यंत (१९६२) मनापासून संस्कृत शिकलो. अजून बरेच श्लोक लक्ष्यात आहेत पण जाणवते की खूप विसरलो सुद्धा आहे. आपले लेख वाचून फारच छान वाटले. धन्यवाद