फुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (उत्तरार्ध)

Fukushima

११ मार्चपासून फुकुशिमा पॉवर स्टेशनमध्ये घडत गेलेल्या घटनांकडे पाहण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. माणसाच्या शरीरात जठर, यकृत, फुफ्फुसे वगैरे इंद्रिये असतात आणि त्यांचे कार्य कसे चालते वगैरे आपण पुस्तकातून शिकतो, पण केंव्हाही त्या इंद्रियांच्या आतमध्ये नेमके काय चालले आहे किंवा काय होऊन गेले हे आपल्याला बाहेरून समजण्याची कसलीही निसर्गदत्त सोय नाही. त्याचप्रमाणे रिअॅक्टरची रचना आणि कार्यपध्दती माहीत असली तरी त्याच्या अंतर्गत भागात नेमके काय घडत आहे याचे खडान् खडा वृत्त बाहेरून समजत नाही. त्यासाठी प्रेशर, टेंपरेचर यासारखी अनेक प्रकारची मोजमापे घेणारी आणि त्यांची नोंद ठेवणारी उपकरणे असतात, पण तीच बिघडून गेली तर त्यांच्यापासून मिळणारी माहिती मिळत नाही किंवा मिळालेली माहिती विश्वासार्ह रहात नाही. शरीराला आलेला ताप, सूज, मळमळ, जळजळ, खोकल्याची ढास, वेदना वगैरे बाह्य लक्षणांवरून ते व्याधीग्रस्त झाल्याचे समजते आणि नाडीपरीक्षा, रक्तदाब, रक्ताची तपासणी, क्ष किरण, सोनोग्राफी यासारख्या खास परीक्षणांमधून त्याचे निदान केले जाऊन त्यावर उपाययोजना होते. रिअॅक्टरमध्ये मोठा बिघाड झाला तर त्याची चिकित्सासुध्दा दृष्य, आवाज, तपमान यासारख्या बाह्य लक्षणांवरून आणि निरनिराळ्या ठिकाणी मोजलेली वेगवेगळ्या विकीरणांची तीव्रता यासारख्या काही मोजमापांवरून केली जाते आणि त्यावर उपाययोजना केली जाते. ती करतांना रिअॅक्टरच्या स्वास्थ्याची काळजी बाळगण्यापेक्षा त्यापासून माणसांना हानी पोचणार नाही किंवा ती कमीतकमी पोचावी याला प्राधान्य दिले जाते. या प्रयत्नांमध्ये रिअॅक्टरचे नुकसान झाले तर त्याची पर्वा केली जात नाही. रुग्णाला दिलेल्या औषधोपचारातून त्याचे जठर, फुफ्फुस, हृदय यांच्या काम करण्यात नेमका कोणता आणि किती फरक पडला हे शरीराच्या बाह्य लक्षणावरूनच ठरवावे लागते. त्याचप्रमाणे रिअॅक्टरमध्ये काय चालले आहे याचा अंदाजसुध्दा अशा बाह्य निरीक्षणावरूनच घ्यावा लागतो. हे काम करत असलेल्या तंत्रज्ञांना त्यातले जेवढे समजलेले असते त्यातला थोडासा भाग ते जाहीर करतात आणि त्यात स्वतःचे तिखटमीठ मिसळून वार्ताहर त्याला प्रसिध्दी देतात. यामुळे निरनिराळ्या वाहिन्यांवरील बातम्या आणि वर्तमानपत्रांमधले वृत्तांत यात तफावत आढळते. या विषयावरील जेवढी माहिती मला वेगवेगळ्या सूत्रांकडून घरबसल्या मिळाली, त्यातली जेवढी उमगली आणि सुसंगत वाटली त्याच्या आधारावर हा लेख लिहिला आहे. या घटनेची चौकशी करणा-या औपचारिक यंत्रणेशी माझा कसलाही संबंध नाही आणि कोणाचीही बाजू घ्यायचे मला कारण नाही हे आधीच नमूद करतो.

वर दिलेल्या पहिल्या चित्रात बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरवर चालणा-या वीजनिर्मितीकेंद्राचे रेखाचित्र आहे, दुस-या चित्रात रिअॅक्टर व्हेसलची अंतर्गत रचना आहे आणि तिस-या चित्रात रिअॅक्टर बिल्डिंगमधील रचना आहे. ही चित्रे प्रातिनिधिक आहेत. तंतोतंत फुकुशिमाची नाहीत. त्यामुळे तपशीलात थोडा फार फरक असू शकतो. माझ्या पहिल्या लेखात लिहिल्याप्रमाणे जेंव्हा हे केंद्र व्यवस्थित कार्य करत असते त्यावेळी इंधनातील भंजनक्रियेतून रिअॅक्टरमध्ये ऊष्णता निर्माण होते, त्यामधून प्रवाहित होत असलेल्या पाण्यापासून उच्च दाबाची वाफ तयार होते, त्या वाफेवर टर्बाइन चालते आणि त्याला जोडलेल्या जनरेटरमध्ये निर्माण झालेली वीज ग्राहकांना पुरवली जाते. टर्बाइनमधून बाहेर पडलेल्या वाफेचे कंडेन्सरमध्ये पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि ते पाणी बाष्पीभवनासाठी रिअॅक्टरमध्ये परत जाते.

फुकुशिमा दायची विद्युतकेंद्रात अशा प्रकारचे सहा रिअॅक्टर आहेत. त्यापैकी युनिट क्र, ४, ५ आणि ६ काही दिवसापासून इन्स्पेक्शन, मेंटेनन्स वगैरेंसाठी बंद होते. ११ मार्च रोजी १, २ आणि ३ क्रमांकांची केंद्रे चालत होती. भूकंपाचा जोराचा धक्का बसताच ती आपोआप बंद झाली. त्यामधील फिशन थांबले असले तरी रेडिओअॅक्टिव्ह डिकेमधून मोठ्या प्रमाणावर ऊष्णता बाहेर पडत होती आणि ती वाहून नेणे आवश्यक होते. युनिट बंद होताच टर्बाइनचे फिरणे थांबते. त्यामुळे ही वाफ थेट कंडेन्सरकडे किंवा दुस-या हीट एक्स्चेंजरमध्ये नेऊन थंड करावी लागते. वाफेची निर्मिती थांबल्यानंतर तापत असलेले गरम पाणी या हीट एक्स्चेंजरमध्ये फिरवून निववले जाते. या पाण्याचे तसेच त्याला थंड करण्यासाठी समुद्रातील किंवा कूलिंग टॉवरमधील पाण्याचे अभिसरण करण्यासाठी काही पंप चालवावे लागतात. बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरमधील वाफ रेडिओअॅक्टिव्ह असल्याकारणाने ती हवेत सोडून देता येत नाही. तिला थंड करून बंदिस्तच ठेवावे लागते. गरजेनुसार रिअॅक्टरचे बंद करणे आणि पुन्हा सुरू करणे या नेहमीच्या क्रिया असल्याने रिअॅक्टर बंद केल्यानंतर त्याला थंड करण्याची योजना सर्व ठिकाणी केलेली असते आणि एरवी ती सुरळीतपणे चालते. अशा वेळी पॉवर स्टेशनमधील इतर युनिट्स चालू असल्यास त्यांच्याकडून विजेचा पुरवठा उपलब्ध असतो. तो नसेल तर ग्रिडला जोडलेल्या तारांच्या जाळ्यामधून बाहेरची वीज मिळू शकते. ते सुध्दा शक्य नसेल तर पुरेशी वीजनिर्मिती करण्यासाठी मोठमोठी डिझेल जनरेटर्स तयार ठेवलेली असतात. त्याशिवाय मोठ्या बॅटरी बँक्स असतात. कंट्रोलरूममधील सर्व उपकरणे, त्यांना माहिती पोचवणारी सारी उपकरणे, काँप्यूटर्स, महत्वाच्या व्हॉल्व्ह्जची उघडझाप करणारी यंत्रे, महत्वाचे लहान पंप, यांत्रिक दरवाजे, लिफ्ट्स, उजेडाची व्यवस्था अशा सर्व अत्यावश्यक गोष्टी न थांबता (अनइंटरप्टेड) निदान आठ तास तरी चालत राहतील एवढी क्षमता या बॅटरी बँक्समध्ये असते.

फुकुशिमा येथे भूकंपामुळे तेथील सर्व युनिट्स एका क्षणात बंद झाली आणि विजेचे टॉवर्स व तारांना क्षति पोचल्यामुळे बाहेरील वीजपुरवठासुध्दा थांबला. पण अपेक्षेप्रमाणे डिझेल जनरेटर्स लगेच सुरू झाले आणि रिअॅक्टर्सना थंड करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर तासाभरात सुनामीची १४ मीटर उंच अशी प्रचंड लाट आली आणि ७ मीटर उंच असलेल्या संरक्षक भिंतीला ओलांडून ती पॉवर स्टेशनमध्ये घुसली. स्टेशनमधील सर्व डिझेल जनरेटर्स तळमजल्यावर किंवा तळघरात ठेवलेले असल्यामुळे सुनामीच्या दणक्याने त्या सर्वांची मोडतोड होऊन ते निकामी झाले. गरज पडल्यास एका युनिटमधून इतर युनिट्सना मदत करता येण्याची व्यवस्था असते, पण सहा युनिटसाठी केलेली सर्व व्यवस्था अशी एकाच वेळी नष्ट होईल अशी कल्पना मात्र कोणी केली नसेल. तसेच देशभर सगळीकडेच हाहाःकार उडालेला असल्यामुळे बाहेरूनसुध्दा कसलीही मदत मिळणे अशक्य झालेले होते.

रिअॅक्टरची कूलंट सिस्टिम बिल्डिंगच्या अनेक भागात बरीच पसरलेली असते. त्यात पंप, व्हॉल्व्ह, हीट एक्स्चेंजर्स, फिल्टर्स, पाइप्स, फिटिंग्ज वगैरे बरीच इक्विपमेंट्स असतात. कोणत्याही कारणाने त्यातल्या कशामधूनही पाण्याची गळती झाल्यास रिअॅक्टरला होणारा पाण्याचा पुरवठा खंडित होतो आणि त्याचे तपमान वाढायला लागते. अशा आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी खालील व्यवस्था रिअॅक्टरमध्ये केलेल्या आहेत.
हाय प्रेशर कोअर स्प्रे
लो प्रेशर कोअर स्प्रे
लो प्रेशर कूलंट इंजेक्शन
स्टँडबाय लिक्विड कंट्रोल सिस्टिम
ऑटोमॅटिक डिप्रेशरायझेशन
यातील प्रत्येक सिस्टिमसाठी वेगवेगळ्या टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवले असते. जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे क्रमाक्रमाने त्या सिस्टिम्स कार्यान्वित होतात आणि रिअॅक्टरला थंड करण्याचे काम करतात. या कामासाठी कधीही पाण्याचा तु़टवडा पडणार नाही हे विश्लेषणातून तसेच प्रात्यक्षिकांमधून सिध्द करावे लागते. मात्र हे काम करतांना कुठली ना कुठली वीज उपलब्ध असेल असे गृहीत धरावे लागते आणि त्याचीही भरपूर योजना केलेली असल्यामुळे ती नाही असे यापूर्वी कधी झाले नाही. पण यावेळची परिस्थिती अकल्पनीय अशी होती.

डिझेल जनरेटर्स बंद पडल्यानंतर बॅटरी बँक्सचे नक्की काय झाले हे माहीत नाही, पण एकाच वेळी सर्व रिअॅक्टर्सना मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुरवठा करणे त्याच्या आवाक्याबाहेरचे काम होते याची कल्पना होती. त्यामुळे लगेच आणीबाणीची घोषणा केली गेली आणि २० किलोमीटरच्या परिसरातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले. तीनही रिअॅक्टरमधील तपमान वाढत गेले, त्यातून हैड्रोजन वायू तयार झाला आणि तो बाहेर पडून त्याचा स्फोट झाला हे माझ्या पहिल्या लेखात लिहिले होते. असा हैड्रोजन वायू कमी प्रमाणात तयार झाला असेल तर त्याला हवेत सोडण्यापूर्वीच एका बंद चेंबरमध्ये जाळून टाकण्याची व्यवस्था असते. इतर सारे सुरळीत चालले असते तर कदाचित हे काम सुनियंत्रित रीतीने करता येऊ शकले असते. पण हैड्रोजन वायूचा दाब इतका वाढला होता की त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्याने रिअॅक्टर व्हेसलला फोडून बाहेर पडण्यापूर्वी त्याला बाहेर पडण्याची वाट मोकळी करून देणे भाग होते. त्यातून झालेल्या स्फोटामुळे बिल्डिंग्जची छपरे उडाली आणि भिंती कोसळल्या.

रिअॅक्टर्समध्ये हे महाभारत चालले असतांना त्याच्या शेजारी असलेल्या स्पेंट फ्यूएल पूलमधील पाणी थंड करणे तर थांबलेले होतेच, त्या पाण्याची वाफ होऊन त्याची पातळी खाली जातच होती. रिअॅक्टर क्रमांक ४ मध्ये मुख्य रिअॅक्टरपेक्षा या स्पेंट फ्यूएल पूलने जास्त उग्र रूप धारण केले. हा ओपन टँक असल्यामुळे त्यात प्रेशर वाढण्याचा प्रश्न नसला तरी तपमान वाढत जाणे धोकादायक होते. त्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये आग लागली. नेहमीची अग्निशामक व्यवस्था चालत नसल्यामुळे हॅलिकॉप्टरमधून पाण्याचा वर्षाव करण्यात आला. एका युनिटमध्ये आलेला प्रॉब्लेम इतर ठिकाणीसुध्दा येण्याची शक्यता असल्यामुळे सगळीकडे पाणी टाकण्यात आले.

रिअॅक्टर किंवा स्पेंट फ्यूएल पूल अशा महत्वाच्या जागी अत्यंत शुध्द असे डिमिनरलाइज्ड पाणी वापरले जाते. पण ते तयार करणारी यंत्रणा तसेच त्याला नियोजित जागी नेण्यासाठी लागणारे पंप वगैरे उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून तात्पुरते पंप आणि फायर इंजिन्स मागवून चक्क समुद्रातले पाणी उपसून सगळीकडे शिंपडण्यात येत होते. कारण काही केल्या रिअॅक्टरला होईल तितके निववायचे प्रयत्न करत राहणे भाग होते. या घाणेरड्या पाण्यामुळे सारी यंत्रे खराब होतील, त्यात मिठाचे थर साठतील, त्याचे भाग गंजतील, नंतर ती साफ करता येणार नाहीत वगैरेवर विचार करायलासुद्दा वेळ नव्हता इतकी तातडीची गरज होती.

जपानमधील परिस्थिती कोलमडलेली असल्यामुळे अमेरिकेतून मोठाल्या बार्जवरून पाणी आणले गेले आणि समुद्राच्या पाण्याऐवजी आता त्याचा वापर सुरू झाला आहे. तसेच अमेरिकेसह परदेशातून मोठमोठे पोर्टेबल पंप आले आहेत आणि ते पंप पाइपामार्फत जोडण्याचे प्रयत्न चालले आहेत. बेसमेंटमधले डिझेल जनरेटर्स सुरू करणे शक्यच नसल्यामुळे दोन तीन किलोमीटर नव्या केबल्स टाकून बाहेरून वीजपुरवठा करण्यात आला आहे. आता स्टेशनमधील सुस्थितीमध्ये असलेल्या पंपाना ती वीज पुरवण्यासाठी जोडणी करण्यात येत आहे. हे सगळे काम करण्यासाठी कामगारांना रिअॅक्टरच्या जवळ जावे लागते आणि रेडिओअॅक्टिव्हिटीच्या लेव्हल्स पाहून कमीत कमी वेळात होईल तेवढे काम करून परत फिरावे लागते. त्यामुळे त्यात अनपेक्षित असे अडथळे येतात.

रिअॅक्टरला थंड करण्यासाठी ओतलेले पाणी वाहून कुठे जाणार? एरवी संपूर्णपणे बंदिस्त अशा सिस्टिममध्ये त्याचे अभिसरण होत असते. पण आता बाहेरून टाकलेले पाणी खाली साचून त्याची डबकी बनणे अपरिहार्य आहे. आधीच सुनामीमुळे आलेले पाणी साठले होतेच त्यात नवी भर पडत आहे. या पाण्याला थेट समुद्रात नेऊन सोडता येत नाही. वाफ बनून हवेत आणि जमीनीतून झिरपत ते हळूहळू कमी होणार. रिअॅक्टरचे कंटेनमेंट अभेद्य राहिले तरी या मार्गाने काही रेडिओअॅक्टिव्ह द्रव्ये पर्यावरणात मिसळत आहेत. जसजसा वेळ जाईल तसतशी रिअॅक्टरमधील ऊष्णता कमी होत जाणार हे पाहता त्यावर पाणी शिंपडणे कमी करून त्याची डबकी साचण्यावर नियंत्रण केले जात आहे. अशा प्रकारचे अनेकविध प्रयत्न चालले आहेत.

देशभर जागोजागी रेडिओअॅक्टिव्हिटीची मोजणी करून तेथील पाणी किंवा अन्नपदार्थ खाण्यावर प्रतिबंध करण्यात येत आहेत. हवेमधून रेडिओअॅक्टिव्ह दूषित हवा शरीरात येऊ नये म्हणून तोंडावर मास्क लावणे, शक्य तोवर बंदिस्त घरातून बाहेर न पडणे यासारखे सुरक्षिततेचे उपाय योजले जात आहेत. आयोडीनच्या गोळ्या वाटल्या जात आहेत. या सगळ्यामुळे लोकांचे जीवन कठीण झाले आहे यात शंकाच नाही. पण सर्व अडचणींवर मात करून यातून बाहेर पडण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली मालिका

रिऍक्टरची एवढी जवळून ओळख झाली नव्हती. तुमच्या या लेखमाले मुळे झाली. तुम्ही ठरवल्याप्रमाणे इतर प्रकारच्या रिऍक्टरवर अशीच मालिका लिहा, आम्ही वाट पाहतो आहोत.

यातील आयोडीनच्या गोळ्यांचे प्रयोजन समजले नाही. अमेरिकेहून पाणी मागविलेले काही वेगळ्या दर्जाचे होते का हे नीटसे कळले नाही. आसपासच्या लोकांवर काय परिणाम झाला. किती किमीच्या कक्षेत कुठली निर्बंधे आणली. भारतात असे झाले तर जास्त पॅनिक होईल का?

जैतापूर प्रकल्प व्हावा या मताचा मी आहे. या प्रकल्पात ज्यांची भूमी संपादन केली त्यांचा या प्रकल्पाला फारसा विरोध नाही असे वृत्तपत्रातील बातम्या वाचून वाटले. पण ज्यांची भूमी संपादन केली नाही आणि त्यामुळे ते प्रकल्पबाधित नाहीत अशांना काहीच न मिळता टांगती तलवार घ्यावी लागत आहे. कदाचित ती मानसिक असेल. अशांसाठी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांनाही प्रकल्पाच्या फायद्यात वाटेकरी केले तर कित्येकांचा विरोध मावळेल असे वाटते. जपानचे उदाहरण घेऊन आसपासच्या क्षेत्रासाठी संकटकालीन उपाययोजना असाव्यात असे ही वाटले. अर्थात यातले काही केले जात असेल.

प्रमोद

उपाययोजना

रिअॅक्टरमधून जे रेडिओअॅक्टिव्ह पदार्थ पर्यावरणात मिसळत आहेत त्यामध्ये आयोडिन १३१ नावाचे एक आयसोटोप आहे. ते अन्नपाण्यातून शरीरात गेल्यास थायरॉइड ग्रंथींमध्ये जाऊन बसण्याची शक्यता असते. आधीच आयोडिनच्या गोळ्या घेऊन भरपूर प्रमाणात चांगले आयोडिन शरीराला दिले तर या रेडिओएअॅक्टिव्ह आयोडिनचा परिणाम त्यावर होत नाही.

रिअॅक्टरमधील ऊष्णता वाहून तिला वातावरणापर्यंत नेऊन सोडण्याचे काम दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये केले जाते. रिअॅक्टरमधून ऊष्णता घेऊन बाहेर जाणा-या पाण्याला 'प्रायमरी कूलंट' असे म्हणतात. ते पाणी रेडिओअॅक्टिव्ह होत असल्यामुळे नेहमी बंदिस्त अशा पाइपांमधूनच फिरत राहते. ज्याप्रमाणे आपल्या शरीरातले थोडेसे रक्त किडनीमध्ये जाऊन शुध्द होऊन बाहेर येते आणि पुन्हा मुख्य प्रवाहात मिसळते त्याचप्रमाणे या प्रायमरी पाण्याचे सतत शुध्दीकरण होत असते आणि त्यातून बाहेर काढलेली अशुध्द द्रव्ये साठवून ठेवली जातात. या 'न्यूक्लियर वेस्टचे मॅनेजमेंट' करण्याचे वेगळे शास्त्र आहे. त्यानुसार जनतेला धोका पोचणार नाही याची पूर्ण खबरदारी घेऊन त्या द्रव्यांची विल्हेवाट लावली जाते.

'प्रेशराइज्ड वॉटर रिअॅक्टर्स'मध्ये या प्रायमरी कूलंटमधील ऊष्णता स्टीम जनरेटर्समध्ये 'सेकंडरी कूलंट'ला दिली जाते. त्या पाण्याची वाफ टर्बाइनमध्ये जाऊन त्याचे चाक फिरवते आणि कंडेन्सरमध्ये त्या वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात होते. या 'सेकंडरी कूलंट'ची शुध्दता राखणे महत्वाचे असल्यामुळे त्याचे अभिसरणसुध्दा बंदिस्त पाइपांमध्येच होते. त्याच्या वाफेला थंड करण्यासाठी जे पाणी वापरले जाते ते नदी, तलाव किंवा समुद्रातून घेतले जाते. नदी किंवा तलावामधून गरजेइतका जास्त पाणीपुरवठा होऊ शकत नाही. यामुळे 'कूलिंग टॉवर'चा उपयोग करतात. सर्व थर्मल पॉवर स्टेशनमध्येसुध्दा अशीच व्यवस्था करतात. कंडेन्सरमधून गरम होऊन आलेले नदी तलावातले पाणी या कूलंट टॉवरमध्ये हवेत शिंपडले जाते, त्यामुळे त्य़ातील ऊष्णता हवेत जाते आणि ते पाणी थंड होते. समुद्रात अमाप पाणी असल्यामुळे समुद्रातून घेतलेले पाणी कंडेन्सरमध्ये गरम झाल्यावर त्याला समुद्रातच खोलवर नेऊन सोडतात.

फुकुशिमा येथे असलेल्या 'बॉइलिंग वॉटर रिअॅक्टर'मध्ये पहिला 'स्टीम जनरेटर'चा टप्पा नसतो. फक्त 'प्रायमरी कूलंट'च असतो. त्याखेरीज इतर कामांसाठी 'प्रोसेस वॉटर' नावाचे शुध्द केलेले साधे (नदी किंवा तलावातले) पाणी लागते. यामुळे 'गोड्या पाण्या'चा पुरेसा साठा लागतोच. सुनामीच्या लाटेमुळे तो उध्वस्त झाला. रिअॅक्टरला थंड करण्यासाठी गोडे पाणी उपलब्ध नसल्यामुळे नाइलाजाने समुद्रातल्या पाण्याचा उपयोग करावा लागला. भूकंपामुळे हादरलेल्या जपानमधील धरणांमधून जे 'साधे पाणी' उपलब्ध आहे ते नागरिकांच्या गरजा भागवण्याठीसुध्दा अपुरे पडत असावे. त्यामुळे पाण्याचे रेशनिंग करावे लागत आहे. कदाचित या कारणामुळे अमेरिकेमधून पाच लाख यूएस गॅलन्स एवढे 'फ्रेश वॉटर' बार्जमधून पाठवले गेल्याचे वृत्त आहे. समुद्रमार्गे ते थेट फुकुशिमा येथे पोचवणे शक्य होते.

फुकुशिमाहून वीस किलोमीटर्स अंतरापर्यंत 'एक्स्क्ल्यूजन झोन' डिक्लेअर केला असून तेवढ्या भागात राहणा-या दीड दोन लाख लोकांना दूरच्या ठिकाणी नेऊन छावण्यांमध्ये वसवले आहे. यामधील अनेक लोकांची घरेदारे सुनामीमुळे वाहून गेलेली असल्यामुळे ते बेघर झालेले असले तरी रेडिओअॅक्टिव्हिटीच्या भीतीमुळे ते आपल्या गावी परत जाऊन त्याची उभारणीसुध्दा करू शकत नाहीत. त्यापलीकडे रहात असलेल्या लोकांच्या अन्नपाणीहवा वगैरेसंबंधी रोजच्या रोज पाहणी करून सूचना दिल्या जात आहेत. त्य़ाला कंटाळून त्यातील ज्या लोकांची इतरत्र व्यवस्था होणे शक्य असेल तिकडे जाण्याचा प्रयत्न ते करत आहेत

भारतात अशी वेळ आली तर काय होईल याचे तर्क करण्यात काही अर्थ नाही. पण जेवढ्या ठिकाणी 'न्यूक्लियर पॉवर स्टेशन्स' आहेत त्या प्रत्येक जागी 'एक्स्क्ल्यूजन झोन' निश्चित केलेले आहेत. त्या भागात नवीन वस्ती उभी केली जाऊ शकत नाही आणि आवश्यकता पडल्यास तेथील सर्व लोकांचे स्थलांतर कसे करता येईल याची योजना 'डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी'च्या सहाय्याने करून घेतली जाते. अधून मधून 'इमर्जन्सी ड्रिल' घेऊन त्याप्रमाणे सर्व सोयी उपलब्ध असल्याची खातरजमा करून घेतली जाते. अशा दृष्टीने तांत्रिक दृष्ट्या तयारी केली जाते. पण लोकांच्या मनोधैर्याबद्दल अंदाज करणे कठीण आहे.

सध्याचे वातावरण जैतापूरबद्दल चर्चा करण्यासाठी अनुकूल नाही असे दिसते. यावर पुनर्विचार करण्यात येईल असे अधिकृत सूत्रांकडूनच सांगितले जात आहे.

उत्तम लेखमाला..

उत्तम लेखमाला सुरु झाली आहे. या मालिकेतच पुढे भारताने केलेले अणूस्फोट या विषयी पण एखादा लेख येउ दे. मला स्मरते की वाजपेयी सरकारच्या काळात केलेल्या अणूस्फोटांपैकी काही स्फोट हे पूर्वीच्या पेक्षा वेगळे होते. त्याविषयी वाचायला आवडेल. "आणि बुद्ध हसला !!" "फुले उमलली आहेत!!" ही संकेतवाक्ये अन ए पी जे अब्दुलकलामांच्या मुलाखतीत अणूशक्तीच्या विनाशक क्षमतेवद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी म्हटलेले "..... विकलिंग्ज आर नॉट ऑनर्ड् !! ही वाक्ये मला प्रेरणादायी वाटतात.

उपक्रमींची आवड

फुकुशिमा येथील दुर्घटनेबद्दल माहिती देणारा माझा पहिला लेख अनेक वाचकांनी वाचला (कदाचित असावा असे मला वाटले). त्यावर बरेचसे प्रतिसादही आले. यामुळे माझा उत्साह वाढला आणि मी दोन भागांमध्ये हा सविस्तर लेख लिहिला. पण या लेखांना भेट देणार्‍या वाचकांची अत्यल्प संख्या पाहता माझा भ्रमनिरास व्हायलाही वेळ लागला नाही. या विषयावरील माझे लेखन मी माझ्या ब्लॉगवर करीत राहणार आहे. ज्या वाचकांना या विषयाची आवड असेल त्यांना ते या दुव्यावर वाचता येईल.
http://anandghan.blogspot.com
त्यासाठी उपक्रमाची अमूल्य जागा अडवण्यात मला हशील वाटत नाही. या तीन लेखांचे प्रकाशन केल्याबद्दल उपक्रमाचे आणि ते वाचणार्‍या वाचकांचे आभार.

अरेरे!

त्यासाठी उपक्रमाची अमूल्य जागा अडवण्यात मला हशील वाटत नाही. या तीन लेखांचे प्रकाशन केल्याबद्दल उपक्रमाचे आणि ते वाचणार्‍या वाचकांचे आभार.

अरेरे! घारेकाका, किती हा आततायी निर्णय! अहो वाचकांना समजून घ्या. :-) विज्ञानविषयक, गणितविषयक, व्याकरणविषयक वगैरे लेखांना समजून घेणे हा सर्वसामान्य माणसाच्या डोक्याला ताण देण्याचा प्रकार असतो. कदाचित ती त्याची आवड नसू शकते.

उदा.-१: मला कवितेत काहीही रुची नाही, मी धनंजयांच्या नुकत्याच आलेल्या लेखावर "पास" असा शिक्का मारला. परंतु तुमच्या लेखावर मारलेला नाही कारण मला असे लेख सावकाश वेळ काढून वाचावे लागतात. उपक्रमावर चालू राजकारण, चर्चा, श्रद्धा-अंधश्रद्धांसारखे टैमपास विषय यांना अधिक प्रतिसाद येतो कारण तिथे मूळ लेखावर डोके थोडे वापरावे लागते आणि इतरांच्या प्रतिसादांवर ताबडतोब प्रतिक्रिया देण्याकडे कल असतो.

उदा.-२: पाकड्यांना हरवण्याचा तो आनंद काय वर्णावा !! हा लेख तुमच्या लेखाशी तुलना करावा असाही नाही तरीही तेथे प्रतिसाद ओसंडून वाहत आहेत याचे कारण त्या सर्व उत्स्फुर्त प्रतिक्रिया आहेत. (त्या देण्यासाठी डोके विशेष वापरावे लागत नाही. ;-)) तेव्हा हे असे व्हायचेच असे म्हणून सोडून द्या. या उदाहरणावरून तुम्ही देशमुखांपेक्षा वाईट लेखक आहात असा कोणी निष्कर्ष काढत असेल तर दुर्लक्ष करा. :-)

वेळ काढून लेख वाचायचा ठरवला तर तुमचा लेख आल्या आल्या तो न वाचताच"छान! आवडला लेख." अशी प्रतिक्रिया देणे अयोग्य आहे. तेव्हा लेख वाचून त्यावर योग्य प्रतिसाद देण्यास वाचकांना वेळ द्या.

असो. तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्याल अशी आशा आहे. तसेही, किती वाचने झाली किंवा प्रतिसाद आला यापेक्षा लेख संकेतस्थळाच्या धोरणांशी सुसंगत आहे आणि तो लिहून मला समाधान वाटले या दोन्ही गोष्टी मला अधिक महत्त्वाच्या वाटतात पण हे झाले माझे वैयक्तिक मत.

बाकी, चांगल्या लेखांना उपक्रमींनी चांगला प्रतिसाद द्यावा असे मलाही वाटते. मी अद्याप लेख वाचला नाही पण वाचेन तेव्हा अवश्य प्रतिक्रिया देईन.

सहमत

एकदम सहमत :)

घारेना दुख: होणे साहजिक आहे, पण त्यांनी लेखाचे वाचक आणि त्याच्या प्रतिक्रिया ह्याचे गणित मनाशी करून ठेवणे गरजेचे आहे, आणि उपक्रमिनी देखील आवडले असेल तर आवडले असे सांगणे देखील गरजेचे आहे. मी देखील ते व्यक्त न केलेला एक उपक्रमी.

@घारे - आपले लेख उत्तम माहितीपर आणि विषय अवघड असताना देखील तसे समजण्यास सोपे आहेत, अशा विषयांशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. अजून लेख कृपया येऊ द्यावेत हि विनंती.

मागील लेखात....

या लेखमलिकेतील मागील लेखात जेव्हा तुम्ही म्हटले की रिऍक्टरच्या प्रकारांवर एक लेख लिहितो तेव्हाच खरे तर मी तुम्हाला अणुस्फोटांबद्दल ही लिहा असा प्रतिसादात लिहिणार होतो ते आज लिहिले. अहो अशा बाबतीत बोट मिळाले तर हात धरणारांपैकी मी एक. माझ्या सारखे अनेक लोक निश्चित आहेत. असे असतांना उपक्रम वरील जागा अडवत नाही वगैरे हे काय भलतेच?

अप्रतिम लेखमाला

अतिशय उत्तम माहितीपूर्ण लिखाण. न घाबरवता शहाणे करून सोडते. क्रिकेटज्वराने आजारी असल्यामुळे हा आणि आधीचा भाग थोडा उशिराच वाचला. घारेसाहेब, वाचनसंख्या बघून निराश होऊ नका. हे लिखाण एखाद्या मासिकात किंवा वर्तमानपत्राच्या पुरवणीत यायला हवे. असे लिखाण तर चांगल्या चांगल्या वृत्तपत्रांतही येत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वर दिलेल्या मतांशी सहमत आहे

आधीच लेख उघडून पाहिला होता, पण लक्षात आले की नुसते वाचता येणार नाही. आणि क्रिकेट मुळे मती गुंग झाली होती. :) लेख येथेच द्यावेत असे सुचवते..

लेख अतिशय आवडला. सोप्या भाषेत, तांत्रिकी संज्ञांमध्ये लोकांना हडबडवून-गडबडवून न टाकता लिहीलेला लेख वाटला. हा लेख आपण प्रिंट मीडियातही छापण्याचा प्रयत्न करावा असे सुचवते. एक गोष्ट वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९/११ च्या हल्ल्यांप्रमाणेच जाणवली: बहुतेक वेळा जास्तीत जास्त काय वाईट घडू शकेल याची इंजिनीअरांनी जी कल्पना केलेली असते त्याहीपेक्षा विपरीत घडलेले आपण पाहतो. उदा. वीज उपलब्ध नसणे किंवा एकाच वेळी सहा रिऍक्टर बंद पडणे, त्सुनामी इ. यापुढील काळात अशा अनेक शक्यता विचारात घ्याव्या लागतील.

जैतापूरसाठी भारत तयार आहे का? एवढी शिस्त बाणवण्याची, एवढा विचार आता या नव्या पार्श्वभूमीवर करण्याची, आपली इच्छा आहे का?

लेख आवडला

लेख आवडला. माहिती खूप असल्यामुळे वाचायला आणि समजून घ्यायला वेळ अधिक लागत आहे.

चांगला लेख

सोप्या शब्दांत मांडलेला लेख परंतु खूप माहिती एकत्रित दिल्याने वाचनास वेळ लागला. आयोडीनच्या गोळ्यांचे प्रयोजन कळले नाही असे सहस्रबुद्ध्यांनी वर लिहिले आहे त्याचे स्पष्टीकरण मला दिसले नाही की दिलेले नाही?

असो. चित्रांमुळे लेख समजण्यास मदत झाली.

दिले होते

आयोडिनचे स्पष्टीकरण मी एकदा दिले होते, ते पुन्हा खाली देत आहे

रिअॅक्टरमधून जे रेडिओअॅक्टिव्ह पदार्थ पर्यावरणात मिसळत आहेत त्यामध्ये आयोडिन १३१ नावाचे एक आयसोटोप आहे. ते अन्नपाण्यातून शरीरात गेल्यास थायरॉइड ग्रंथींमध्ये जाऊन बसण्याची शक्यता असते. आधीच आयोडिनच्या गोळ्या घेऊन भरपूर प्रमाणात चांगले आयोडिन शरीराला दिले तर या रेडिओएअॅक्टिव्ह आयोडिनचा दुष्परिणाम त्यावर होत नाही.

फुकुशिमामधून बाहेर पडणार्‍या विकिरणांपासून प्रत्यक्ष धोका पोचण्याएवढे ते तीव्र नाहीत. पणसौम्य असा रेडिएंशनचा स्रोत सुद्धा शरीरात ठय्या मारून बसला तर तो घातक ठरू शकतो. तसे होऊ नये यासाठी ही उपाय योजना केली जाते.

घारे साहेब.

आपले लेखन आवडते. प्रतिक्रिया आल्या नाही म्हणून लेख आवडला नाही असे काही नसते. लोक वाचत नाही असेही काही नसते. एक दोन दिवसापूर्वी पुण्याच्या एका प्राध्यापकाचा याच विषयावर मराठीतून लेख वाचला. त्या तुलनेत आपले लेखन कितीतरी पटीने भारी आहे. खरे तर आपण सदरील लेख मराठी दैनिकांमध्ये द्यायला हवा होता असे वाटले.

-दिलीप बिरुटे

आभार

मला दिलेल्या प्रोत्साहनासाठी सर्व वाचक मित्रांचा मी आभारी आहे.
माझ्या लिखाणाच्या गुणवत्तेची मला थोडी कल्पना आहे, तसेच माझ्या ब्लॉगला भेट देऊन तो वाचणार्‍या मित्रांची संख्या बर्‍यापैकी समाधानकारक आहे. त्यामुळे मला नैराश्य वगैरे यायचे काही कारण नाही. समयोचित अशा चार ओळी लिहीत राहण्याचा माझा सध्याचा छंद जमेल तोपर्यंत चालू रहाणारच आहे.
मी उपक्रमावरचा रेग्युलर मेंबर नाही. वेळ मिळेल तेंव्हा अधून मधून इकडे येऊन काय चालले आहे ते पहात असतो. उपक्रमाच्या धोरणात बसेल असे मी नेहमी लिहीत नाही. त्यामुळे माझा त्या बाबतीतला सहभाग तसा कमीच आहे. माझा हा लेख प्रकाशित झाला होता त्या सुमारास येत असलेले इतर लेख आणि त्यावरील चाललेले मल्लयुद्ध यांना मिळत असलेली उदंड लोकप्रियता पाहता माझ्या लेखांना उपक्रमावर स्थान देण्याबद्दल मी थोडा साशंक झालो होतो. आता ती शंका मी मनातून काढून टाकली आहे आणि एक नवा लेख सुद्धा दिला आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.

 
^ वर