नेटिकेट आणि बरेच काही

बाजूचे संकेतस्थळ हा आपल्या सर्वांना अतिशय प्रिय विषय. तिथे एका सदस्येने लेख टाकला आणि अनेक लोक त्यावर तुटून पडले. पराचा कावळा केला. (नो पन इंटेंडेड) पण या अशा टीकेमुळे खचून न जाता लेखिकेने आंतरजालावरील सदस्यांच्या वागणुकीवर माइंडमॅप तयार केला. हे पाहून मला या लेखिकेचे कौतुक वाटले. (असे सदस्य उपक्रमावर यायला हवेत असेही वाटते.)

हा पहा तो ऐतिहासक माइंडमॅप

मोठ्या आकारमानात

आंतरजालावरील आपली प्रतिमा टिकवून ठेवणे हे खूप कठीण कर्म वाटते. अनेक लोक घाबरून गप्प राहतात किंवा आपली ओळख लपवून ठेवतात. असे होऊ नये म्हणून सर्वांनी नेटिकेट पाळणे आवश्यक आहे असे मला वाटते. पण तत्पूर्वी नेटिकेट म्हणजे काय हेही जाणून घ्यायला हवे. त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. शिवाय नेटिकेटची गरज आहे काय असा प्रश्नही कुणाच्या मनात येऊ शकतो. कारण अनेकांसाठी नेटवरली ऍनर्की म्हणा किंवा स्वातंत्र्य हीच खरी नशा आहे. तर ह्या सगळ्या मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा करावी, ही नम्र विनंती.

तसेच लेखिकेने केलेला हा माइंडमॅप तुम्हाला पटला का? त्यात सुधारणा सुचवा.

Comments

नेटीकेट

'एटीकेट' हे जसे एकवचन आणि अनेकवचन आहे तसेचनेटीकेट हेही आहे. नेटीकेटस् असे काही नसते.
बाकी चालू द्या ( सौजन्यः आजानुकर्ण)
सन्जोप राव
तंग आ चुके है कश्मकशे जिंदगी से हम
ठुकरा न दे जहां को कहीं बेदिली से हम
हम गमजदा है लाये कहां से खुशी के गीत
देंगे वही जो पायेंगे इस जिंदगी से हम

काही सूचना

लेखिकेचा माइ न्ड मॅप हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. परंतु यात लेखकाने काय पथ्ये पाळली पाहिजेत याचा काहीच उल्लेख नाही. ही पथ्ये पाळली तर येणारे प्रतिसाद जास्त कन्स्ट्रक्टिव्ह येतील हे लक्षात घेतले पाहिजे.

1. आपण जे लिहितो (ललित लेखन सोडून) ते सत्य आहे याची खात्री केल्याशिवाय विधाने करू नयेत. नंतर अडचणीत सापडू शकता.

2. अंधश्रद्धा, कर्मकांडे, ज्योतिष यांना प्रोत्साहनपर लेखन करू नये. जालावर असल्या विषयांना खूपच विरोध होतो.
3 काही लेखकांना (मुख्यत्वे लेखिकांना फार जास्त वैयक्तिक गोष्टी जालावर सांगावाशा वाटतात. त्याने फक्त हसू होते. हा प्रकार मी मुख्यत्वे परदेशी स्थायिक लेखकांच्या बाबतीत जास्त करून बघतो. तसेच इतर लेखक किंवा प्रतिसाद देणारे जरी आपले वैयक्तिक चांगले मित्र असले तरी नेटवर त्यांच्याशी औपचारिकता बाळगणे आवश्यक नाहीतर इतरांच्या दृष्टीने हे संभाषण जास्त ऑकवर्ड वाटते. मध्यंतरी दुसर्‍या एका सं.स्थळावर एक विदुषी डिपेन्डन्ट व्हिसा वर अमेरिकेला येणार याबद्दल त्यांच्या मित्र मैत्रिणीत झालेली चर्चा यात भाग घेणर्‍यांच्या दृष्टीने कितीही रोचक असली तरी माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीला अत्यंत विचित्र आणि बोअरिंग वाटली होती. अशा गोष्टी खरडवही द्वारे कळवल्या तर जास्त योग्य व्हावे.

आपण स्वत: टीका होईल असे लेखन केल्यावर इतर टीका करतील ती सहन करून घेणे आवश्यक असते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

वैयक्तिक, टीका करण्यायोग्य व कंटाळवाणं

१. लिहिताना कंस पूर्ण करणे (ह. घ्या.)

मला वाटतं की नेटवरच्या वागणुकीचे नियम हे बऱ्याच प्रमाणात सामान्य आयुष्यातल्या वागणुकीच्या नियमांशी मिळतेजुळते असतात. लोकांशी चांगलं वागा, शक्य तिथे मैत्री करा, लोकांचे शब्द अंगाला लावून घेऊ नका, व परक्यांवर विश्वास ठेवून भलतीसलती माहिती त्यांच्या हाती देऊ नका... ही व अशी तत्वं नेटच्या भाषेत लिहिता येतात.

हा प्रकार मी मुख्यत्वे परदेशी स्थायिक लेखकांच्या बाबतीत जास्त करून बघतो.

अशा प्रकारची जनरलयाझेशन्स न करणे हेही नेटिकेटच्या यादीत असायला हवं. निव्वळ एखाददोन निरीक्षणांवरून एका विशिष्ट वर्गाला वाईट लेबलं लावू नयेत. पण बहुतेकांना हे सामान्य जीवनात देखील पाळता येत नाहीत. नाहीतर जगातली कितीतरी दुःखं नष्ट झाली असती.

आपण स्वत: टीका होईल असे लेखन केल्यावर इतर टीका करतील ती सहन करून घेणे आवश्यक असते.

हे विधान थोडं गुळमुळीत वाटतं. म्हणजे टीका होऊ शकणार नाही असं लिखाण करता येतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कशावर कुठे टीका होईल हे सांगता येत नाही. एकंदरीत तुमच्या प्रतिसादात कंटाळवाणं लेखन असतं, टीका होईल असं लेखन असतं, व वैयक्तिक लिखाण असतं असा अॅब्सोल्यूटिस्ट विचार दिसतो. बहुतेक लेखना बाबतीत काहींना ते आवडतं, काहींना त्यावर टीका करावीशी वाटते, काहींना ते कंटाळवाणं वाटतं. वैयक्तिक लिखाण म्हणजे कंटाळवाणं असा नियम केला तर आत्मचरित्रं लिहिताच येणार नाहीत.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

खोटे नाही

अशा प्रकारची जनरलयाझेशन्स न करणे हेही नेटिकेटच्या यादीत असायला हवं. निव्वळ एखाददोन निरीक्षणांवरून एका विशिष्ट वर्गाला वाईट लेबलं लावू नयेत.

खरंय! हिरवा माज वगैरे आहेतच सोबतीला पण वरील वाक्याचा विचार केला तर अगदीच खोटे म्हणता येत नाही. परदेशात एकट्या दुकट्या व्यक्तीला आपल्याबद्दल इतरांना सांगायची मनापासून इच्छा होत असेल असे वाटते आणि म्हणून त्यांची संख्या अधिक दिसत असावी. परंतु, हे सांगता सांगता आपला तोल कधी ढळतो हे लक्षात घेणे बरे असते.

परदेश स्थायिक लेखक

हा प्रकार मी मुख्यत्वे परदेशी स्थायिक लेखकांच्या बाबतीत जास्त करून बघतो.

माझ्या प्रतिसादातील हे वाक्य उपक्रम किंवा तत्सम सं. स्थळावर होत असणार्‍या चर्चापुरतेच सीमीत नाही. मी नावे घेऊ इच्छित नाही. शोध गेल्यास सहजपणे सापडतील असे बरेच मराठी ब्लॉग दिसतात की जे परदेशी स्थायिक असलेल्या महिला लिहिताना दिसतात. या लेखिका अतिशय सुंदर शैलीत वाचकाला आवडेल असेच लिहित असतात. परंतु माझी त्यांच्याबद्दलची हीच तक्रार आहे की त्या आपला नवरा, मुले यांच्याबद्दल त्या फार डिटेल्स देतात. कदाचित प्रियालीताई म्हणतात तसे एकटेपणाच्या भावनेतून ते होत असावे. परंतु एकतर त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असते व अनोळखी वाचकाला ही डिटेल्स नको वाटतात. म्हणून याचा मी उल्लेख केला आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सहमत

१००% सहमत आहे. एकटेपणा सोबत आपले आपल्यापुरते असलेले जगच हे सर्वांचे जग आहे ही एक अगम्य भावना लेखनात असते.






अंशतः सहमत

मला वाटतं की नेटवरच्या वागणुकीचे नियम हे बऱ्याच प्रमाणात सामान्य आयुष्यातल्या वागणुकीच्या नियमांशी मिळतेजुळते असतात.

मला थोडा फरक करावासा वाटतो. जालावरचे लिखाण हे सभेत बोलण्यासारखे असते. (पुरावा राहतो म्हणून अधिक गंभीर.) वैयक्तिक बोलण्यात/वागणुकीत कदाचित थोडी जास्त शिथिलता येऊ शकते.

बाकी मुद्यांशी सहमत.

एकटेपणा हा बरेचदा विषयानुरुप असतो. तो नुसताच दूर देशीचा नसावा.
टीका करणे, तीस सामोरे जाणे आणि टीकेच्या अपेक्षेने लिहिणे (आपले म्हणणे तपासून पहाण्यासाठी) या तिन्ही एकत्रितपणे असणे हे रोजच्या तसेच नेटवरच्या संवादात गरजेच्या असाव्यात.

प्रमोद

बहुतांशी सहमत

अंधश्रद्धा, कर्मकांडे, ज्योतिष यांना प्रोत्साहनपर लेखन करू नये. जालावर असल्या विषयांना खूपच विरोध होतो.

पण अश्या लेखनातून आर्थिक फायदा होत असेल तर?

मध्यंतरी दुसर्‍या एका सं.स्थळावर एक विदुषी डिपेन्डन्ट व्हिसा वर अमेरिकेला येणार याबद्दल त्यांच्या मित्र मैत्रिणीत झालेली चर्चा यात भाग घेणर्‍यांच्या दृष्टीने कितीही रोचक असली तरी माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीला अत्यंत विचित्र आणि बोअरिंग वाटली होती.

हाहाहा. कोण बरे ह्या डिपेन्डन्ट व्हिसा वर अमेरिकेला जाणार्‍या विदुषी? उपक्रमावर आहेत का?
डिपेन्डन्ट व्हिसा वर अमेरिकेला जाणे ह्याविषयी कुणाला चर्चा कराविशी वाटणे हे निरोगी मनाचे लक्षण नाही.

कॉम्प्लान घ्या म्हणावं

मध्यंतरी दुसर्‍या एका सं.स्थळावर एक विदुषी डिपेन्डन्ट व्हिसा वर अमेरिकेला येणार याबद्दल त्यांच्या मित्र मैत्रिणीत झालेली चर्चा यात भाग घेणार्‍यांच्या दृष्टीने कितीही रोचक असली तरी माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीला अत्यंत विचित्र आणि बोअरिंग वाटली होती.
सहमत आहे. अशा विदुषींनी आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी 'लवकर मोठे व्हा' एवढेच सांगता येईल. आणि कॉम्प्लान घ्या म्हणावं.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अतिपरिचयात् अवज्ञा| दे आर वॉचिंग यू

माइंडमॅप मध्ये टाकता येतील असे अनेक नोड्स शिल्लक असावेत. आपण आपली किती माहिती बाहेर देतो, इतरांची माहिती किती देतो, आपल्याकडील माहितीचा कसा वापर करतो वगैरे अनेक गोष्टींवर नेटावरील आपली कारकिर्द अवलंबून असते. नेटावर सतत तुमची/इतरांची माहिती बाहेर येत असते. त्या माहितीतून तुम्ही इतरांना (किंवा इतर तुम्हाला) दुखावणारी वक्तव्ये करू शकता, व्यक्तीगत हल्ला करू शकता, अपमान करू शकता, भावना दुखवू शकता, माहितीचा गैरवापर करू शकता वगैरे वगैरे. एकंदरीत, नेटावर वावरणार्‍यांनी कोडगेपणाची चिलखते घालणे बरे ठरते. आपण आपली माहिती किती/कुठे आणि कुणाला देतो यावर आपला अंकुश हवा असे वाटते. तसेच, आपल्या माहितीचा कुणी गैरवापर करत असेल तर त्याला तोंड देणे/ तक्रार करणे वगैरे हिंमतही बाळगणे आवश्यक आहे.

नेटावरील एटिकेट्चे तीन नोड्स करता येतील आणि त्यात नंतर सबनोड्स टाकता येतील.

१. लेखामध्ये लेखकाने पाळण्याचे एटिकेट
२. प्रतिसादकर्त्याने प्रतिसादांत पाळण्याचे एटिकेट
३. इतर (यांत निरोप, खरडवह्या, चॅट, प्रत्यक्ष गाठीभेटी वगैरे)

माझ्या व्यक्तिगत अनुभवानुसार नेट-एटिकेट हे कर्मसिद्धांताशी फारकत घेणारे असतात. ;-)

बाकी, अपमान, व्यक्तिगत हल्ला वगैरेंच्या व्याख्या/पातळी वगैरे ठरवलेली आहे का? लोकांच्या अपमानाच्या, भावनांना ठेचा लागण्याच्या, राग येण्याच्या पातळ्या वेगवेगळ्या असल्याने अशा गोष्टींना वेसण घालण्याचा अधिकार संकेतस्थळाचे धोरणच करू शकते.

एक शंका - उपक्रमावर बायकांची कमी दिसणारी संख्या या गोष्टींशी निगडित असेल काय? :-)

निगरगट्टपणा हवा

एकंदरीत, नेटावर वावरणार्‍यांनी कोडगेपणाची चिलखते घालणे बरे ठरते.

अगदी बरोबर. निगरगट्टपणा हवा.

तसेच, आपल्या माहितीचा कुणी गैरवापर करत असेल तर त्याला तोंड देणे/ तक्रार करणे वगैरे हिंमतही बाळगणे आवश्यक आहे.

पुन्हा एकदा सहमत.


बाकी, अपमान, व्यक्तिगत हल्ला वगैरेंच्या व्याख्या/पातळी वगैरे ठरवलेली आहे का? लोकांच्या अपमानाच्या, भावनांना ठेचा लागण्याच्या, राग येण्याच्या पातळ्या वेगवेगळ्या असल्याने अशा गोष्टींना वेसण घालण्याचा अधिकार संकेतस्थळाचे धोरणच करू शकते.

एक शंका - उपक्रमावर बायकांची कमी दिसणारी संख्या या गोष्टींशी निगडित असेल काय? :-)

ह्यावरून तुम्हाला स्त्रिया ह्या भावनाप्रधान असतात किंवा निगरगट्ट नसतात, त्यामुळे बायकी विषयांत अडकून पडतात असे सुचवायचे आहे का? (असे असल्यास किमान उपक्रमावर येऊन तुमचा निषेध करण्यासाठी तरी काही महिला सदस्यत्व घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. किंबहुना त्यासाठीच तुम्ही वरील विधान केले असावे, असे वाटते आहे.) पुढे जाऊन स्त्रिया ह्या तर्कदुष्टपणे किंवा रॅशनली विचार करीत नाहीत असेही म्हणता येईल. किंबहुना जे पुरुष तर्कदुष्टपणे किंवा रॅशनली विचार करीत नाहीत ते बायकी असतात असाही सोयीस्कर निष्कर्ष सरतेशेवटी काढता येईल. असो.

माझ्यामते काही जणींनी पुढाकार घेऊन महिला वर्गाला उपक्रमावर बोलवायला हवे. पाककृतींवर किंवा पाकशास्त्रावर एखादी माहितीपूर्ण लेखमालिका लिहायला सुरुवात करा बरे कोणीतरी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

रॅशनल विचार

ह्यावरून तुम्हाला स्त्रिया ह्या भावनाप्रधान असतात किंवा निगरगट्ट नसतात, त्यामुळे बायकी विषयांत अडकून पडतात असे सुचवायचे आहे का?

हो. बहुधा माझी अशीच धारणा आहे. चू. भू. दे. घे. परंतु हे इतक्यावर थांबते असे वाटत नाही. बायकांनी नेटावर कसे वागावे याचे त्यांच्यावर "पीअर प्रेशर" असते का हे जाणून घेणे आवश्यक वाटते.

पुढे जाऊन स्त्रिया ह्या तर्कदुष्टपणे किंवा रॅशनली विचार करीत नाहीत असेही म्हणता येईल.

स्त्रियांनी योग्य मुद्दे मांडून चर्चा करणे किंवा रॅशनली विचार न करणे हा एका स्वतंत्र चर्चेचा विषय वाटतो. स्त्रियांना असे विचार करताच येत नाहीत असे म्हणणे मला धाडसाचे वाटते (धला तसे म्हणालेले नाहीत) परंतु स्त्रियांची संख्या तेथे कमी दिसते हे नक्की.

किंबहुना जे पुरुष तर्कदुष्टपणे किंवा रॅशनली विचार करीत नाहीत ते बायकी असतात असाही सोयीस्कर निष्कर्ष सरतेशेवटी काढता येईल. असो.

हाहाहा! नो कमेन्ट्स.

नको

माझ्यामते काही जणींनी पुढाकार घेऊन महिला वर्गाला उपक्रमावर बोलवायला हवे.

दत्तगुरूंची भक्ती करणारा महिलावर्ग का? त्यामुळे इथला बिनडोकपणा वाढणार नाही कशावरुन? नकोच ते!

+१

उपक्रमावर भाकडकथा व त्यांची त्याहूनही भाकड निरुपणे वाचण्याची इच्छा नाही.

_____
व्हेन पिपल डोन्ट फियर व्हॉट इज टेरिबल, द ग्रेट टेरर कम्स.

एक किस्सा

दत्तगुरूंची भक्ती करणारे बिनडोक असतात असे आपण म्हणू शकतो का :) मला वाटते दुसरे/आणखी चपखल विशेषण/विशेषणे शोधायला हवे/हवीत. कारण दत्तभक्तांमध्ये, समर्थभक्तांमध्ये असंख्य जण उच्चविद्याविभूषित आहेत. सच्चसाईबाबांच्या भक्तांत अनेक अणुशास्त्रज्ञ आहेत म्हणे. तर आमच्या अमेरिकेच्या संयुक्त राज्यातील एका मैत्रिणीने मध्यंतरी एक किस्सा ऐकवला. तो असा-

"माझ्या ओळखीतली एक डॉक्टरीण. चांगली एमडी. स्वामी समर्थांची भक्त आहे. मैत्रिणीचे घर झाले तर म्हणाली की तुला स्वामी समर्थांची एक तसबिर देते. मी म्हटले नको. मला त्यांची काही माहिती नाही, विश्वास नाही. आणि माहिती करून घ्यायची नाही. जाम वैतागली. तिने हे २-४ जणांना सांगितले. मी पुढेही सांगणार होते की मला उघड्या बंब पुरुषांचे फोटो नकोत घरात. पण म्हटले जाऊ दे. उगीच भावना फार फार दुखावतील या बाईंच्या."

आता अशा बायांना किंवा पुरुषांनाही काय म्हणावे? त्यांचे उपक्रमावर काय होणार?
असो.

अवांतर:
माझ्यामते बेढब उघडबंब पुरुषापेक्षा सिक्सपॅक परशुराम चालून जावा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हेहेहे!

माझ्यामते बेढब उघडबंब पुरुषापेक्षा सिक्सपॅक परशुराम चालून जावा.

तो बायकांना चालेल पण नवरे आक्षेप घेतील अशी शंका वाटते.

दत्तगुरूंची भक्ती

दत्तगुरूंची भक्ती करणारे बिनडोक असतात असे आपण म्हणू शकतो का

असे जनरलायजेशन बहुदा नाही करता येणार, पण दत्तगुरूंची भक्ती आणि मठ्ठपणा ह्याचा आलेख काढल्यास अतीशय स्ट्राँग पॉजीटीव कोरिलेशन दिसून येईल हे नक्की.

आता अशा बायांना किंवा पुरुषांनाही काय म्हणावे? त्यांचे उपक्रमावर काय होणार?

प्रश्न रास्त आहे. भाकड कथा आणि त्याचे त्याहून भाकड निरुपण ह्या दोन्हीवर मान डोलावणारे काही पुरुषही होते.

निगरगट्टपणा हवा

निगरगट्टपणा हवा.

अगदी. जिथे तिथे 'भावना दुखावल्या' वगैरे रडीचा डाव करणार्‍यांसाठी नेट हे खडतर आहे.

माझ्यामते

माझ्यामते मध्यंतरी प्रगल्भतेवर वगैरे जी चर्चा झाली होती त्यादृष्टीने ही चर्चा महत्वाची आहे. नेटवर आचरण कसे असावे ह्यासाठी असा 'माइंडमॅप' वगैरे काढावा लागत असेल तर परिस्थीती हाताबाहेर गेलेली आहे. अर्थात हे पाहून मलाही लेखिकेचे कौतुक वाटलेच.

मुद्दे पटले.

त्या अद्न्यात लेखिकेने अचूक निरीक्शणे छानपणे चित्रबद्ध केली आहेत. मला सगळे मुद्दे रास्त वाटतात. अजून त्यात काही मुद्दे जोडायचे म्हटले तर.

- आपल्या हातून टंकताना काही चूका झाल्या असतील, त्या कुठे-कुठे होतात. हे ध्यानात ठेवावे. पण इतरांनी त्यावर काही भाश्य केले तर मनाला वाईट वाटून घेवून लिहीणं थांबू नये. स्वत:ला ही माफ करता यायला हवे, मग इतरांच्या तशाच प्रकारच्या चूकांकडे खेळकर नजरेने पहाता येते.

- वेळेच्या दृश्टीने सतत संकेतस्थळावर उपस्थित राहू नये. आपले इतरही आयुश्य आहे हे विसरू नये.

- नेहमीच उठसूठ प्रतिसाद देणं टाळावं, सहभाग न घेता, प्रेशक म्हणून उपस्थित रहाण्यातून ही बरेच शिकता येते, मनोरंजन ही होते.

संपादक, कुठे आहात?

(ह.घ्या. मोड) इतर संकेतस्थळांना किंवा व्यक्तींना हिणवणे उपक्रमाच्या धोरणांत बसत नाही. या धाग्यावर विशिष्ट संकेतस्थळावरील काही दत्तभक्त, काही डिपेन्डन्ट व त्यांच्या मित्रपरिवारास हिणवले जात आहे. हे संपादित व्हावे अशी जाहीर मागणी करत आहे.(/ह.घ्या. मोड)
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

 
^ वर