'पाकव्याप्त काश्मीर'मधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?

'पाकव्याप्त काश्मीर'मधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?
कृपया खालील दुवा उघडा:
http://hindu.com/2010/08/29/stories/2010082955490900.htm
ही बातमी सर्वप्रथम मी इंडियन एक्सप्रेसच्या ई-पेपरवर काल सकाळी वाचली पण थोड्या वेळानंतर येथील भारतीय दूतावासातील एका अधिकार्‍याला दाखविण्यासाठी म्हणून शोधली तर ती इंडियन एक्सप्रेसवरून गायब झाली होती. 'इंडियन एक्सप्रेस'च्या Domain वर 'सर्च' वापरून दुवा शोधल्यावर ती मिळाली पण 'ही लिंक उघडल्याने आपला काँप्यूटर खराब होईल' अशी 'धमकी'ही दिसली. मग open domainवर सर्च केल्यावर 'हिंदू'मध्ये हा दुवा मिळाला. बातमी/लेख मूळचा 'न्यू यॉर्क टाइम्स'मधील आहे.
या लेखानुसार आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टिस्तान भागात चीनचे ११,००० सैन्य तैनात आहे व पाकिस्तानने या चिनी सैन्याला हळूच, गाजावाजा न करता या भागाचे संपूर्ण नियंत्रण/ताबा देऊन टाकला आहे (अगदी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!). या भागात पाकिस्तानी सरकारच्या विरोधात बंडाच्या हालचाली फारच वेगात होत असून (कदाचित हा भाग पाकिस्तानच्याही ताब्यात रहाणार नाहीं म्हणून कीं काय...) ही पावले उचलण्यात आली आहेत असे 'न्यू यॉर्क टाइम्स' म्हणतो.
'न्यू यॉर्क टाइम्स'नुसार दोन महत्वाच्या घडामोडी गिलगिट/बाल्टिस्तान विभागात होत आहेत. एक तर पाकिस्तानविरुद्ध बंड व दुसरे चिनी सैन्याचे आगमन. (हा भाग एरवी जगाला 'खुला' नाहींच!)
चीनला पाकिस्तानमधून रस्ते व रेल्वेचा सर्रास वापर हवा आहे. त्यासाठी पाकिस्तानातून जाणारी जलदगती रेल्वेही चीन बांधत आहे. पूर्व चीनमधून तेल व इतर माल बलुचिस्तानात चीनच्याच सहाय्याने बांधलेल्या ग्वादार, पास्नी व ओरमारा इथल्या पाकिस्तानी नौदलाच्या तळावर ४८ तासात आणायची योजना आहे. इथून सर्व आखाती देश जवळच आहेत.
हे सैनिक काराकोरममधून चीनच्या 'शिंज्यांग' प्रांताला जोडणारा रस्ता बाधतील, रेल्वेवर काम करतील, धरणें, द्रुतगती मार्ग यासारख्या इतर प्रकल्पांवरही काम करतील असे 'न्यू यॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे.
इराणहून चीनला नैसर्गिक वायू नेणार्‍या २२ बोगद्यांचे काम इतके गुप्तपणे चाललेय् कीं तिथे तर पाकिस्तान सरकारलाही जाण्याची बंदी आहे. पण या बोगद्यांत प्रक्षेपणास्त्रेही ठेवता येऊ शकतील.
हे सैनिक तात्पुरत्या छावणीवजा घरात रहात होते व आपले काम संपवून परतही गेले. आता तिथे कायम स्वरूपात रहाण्याची सोय असणारी गृहयोजना राबविली जात आहे. या घटनेने वॉशिंग्टनला चिंतेत टाकले आहे.
आपल्या सरकारला याची संपूर्ण माहिती आहे कां? त्याविरुद्ध सरकार कांही पावले टाकू शकते काय? शकेल का? टाकेल का? प्रश्न खूप आहेत पण उत्तरे कुणाकडे?
इथे हा लेख मुख्यतः माहितीसाठी दिला आहे. प्रतिसादही वाचायला आवडतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

एक प्रश्न

भारतीय उपखंडावर चीनचे नियंत्रण आले तर चांगले की वाईट? मला वाटते चिनी नेत्यांची दुरदृष्टी फारच चांगली आहे. आपल्या सरकार बद्दल काय बोलणार? ते आम्हाला आपले वाटतच नाही. ते एका घराण्याच्या आणि काँग्रेसमधल्या काही हौशी नेत्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी आहे.






अहो जाकार्तावाले काळे

एवढे घाबरू नका हो! रस्ते बांधणे, बोगदे खणणे किंवा रेल्वे मार्ग बांधणे ते सुद्धा दुसर्‍या देशात जाऊन हे गूगल अर्थ वर जाऊन रेघा मारण्यासारखे सोपे नसते हो.

वानगीदाखल एकच घटना सांगतो. या वर्षीच्या सुरवातीला पाकिस्तानव्याप्त कश्मिरच्या उत्तरेला असलेल्या हुंजा नदीचा प्रवाह प्रचंड दरडी कोसळल्यामुळे पूर्णपणे खंडित झाला. हळू हळू या नदीचे एका मोठ्या जलाशयात रूपांतर झाले आहे. हा जलाशय फुटला तर नदीच्या खालील अंगाला असलेली सर्व गावे वाहून जातील हे नक्की. या जलाशयात पाकिस्तान -चीनला जोडणार्‍या काराकोरम रस्त्याचा 25 मैल भाग बुडला आहे व सर्व वाहतुक पूर्णपणे गेली 8 महिने ठप्प आहे. पाकिस्तान सरकारने आता पूर्णपणे शरणागती पत्करली आहे व चिनी सरकारला साकडे घातले आहे. हे आलेले चिनी सैनिक हुंजा नदीचा प्रवाह परत चालू करणे व हा रस्ता परत नवीन मार्गावरून बांधणे या साठी आले असावेत असे वाटते. तरी मी आंतरजालावर शोध घेतो आहे. काही आणखी रोचक सापडल्यास उपक्रमींना कळवीनच.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

प्रतिसाद डुप्लिकेट झाल्याने काढला!

प्रतिसाद डुप्लिकेट झाल्याने काढला!
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!

आमच्या तर अर्ध्या गोवर्‍यासुद्धा गेल्या......!

Learning is not compulsory... neither is survival हे ब्रीदवाक्य असलेल्यांना कसली हो भीती? ते तर केंव्हांच मुक्त झाले!
आणि आम्हाला हो कसली भीती आता? आमच्या तर अर्ध्या गोवर्‍यासुद्धा गेल्या.......!
तुम्ही तरुण लोकांनी चिंता करावी!
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!

तरूण

निदान काळे काका तरी मला तरूण म्हणालेले बघून क्षणभर आनंद वाटला पण क्षणभरच!
चन्द्रशेखर

हेलमंद कुठे आहे आणि ग्वादार कुठे आहे ते पहा

This is a better map!

या नकाशात सर्व झकास दिसत आहे! हेलमंद कुठे आहे आणि ग्वादार कुठे आहे ते पहा!
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!

मला काका म्हणणार्‍यांचे दोन गट आहेत

मला काका म्हणणार्‍यांचे दोन गट आहेत. (१) जे खरेच माझ्या मुलांच्या वयाचे असतात किंवा (२) आपण तरुण आहोत असे भासविणारे असतात (अभी तो मैं जवान हूं)!
हाहाहा!
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!

व्यासमहर्षी

"ऊर्ध्वबाहूर्विरोम्येष | नचकश्चित्छृणोति माम् ||"
बाहू उभारून हाकारितो कोणी ऐकेचिना मज.

चंद्रशेखर यांचीप्रतिक्रिया वाचून काळे काकांना नक्की असेच वाटेल.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती?

छे! छे!! खरं तर एक जुन्या मराठी चित्रपटातलं लतादीदींनी संगीतबद्ध केलेलं गाणं आठवलं....
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती?
हाहाहा!
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!

शंका

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती?

मराठे (लढवय्ये मराठी) स्वतःला मावळे म्हणवतात ना? मग गाण्यात स्वतःला सरदार कशाला म्हणवून घेतात उगाच? त्यांना सोडा ना त्यांच्या पंजाबात.






गिलगिट बाल्टीस्तान

गेले एक दोन महिने या भागाबद्दल बरीच महिती मिळवली आहे तसेच लेखनही केले आहे. त्यामुळे जरा अधिकारवाणीने (फुकटच्या) लिहिले असे वाटते. काळेकाकांना दुखविण्याचा हेतू अजिबात नव्हता. आता त्यांच्या लेखातल्या मुद्यांबद्दल

चीनला पाकिस्तानमधून रस्ते व रेल्वेचा सर्रास वापर हवा आहे. त्यासाठी पाकिस्तानातून जाणारी जलदगती रेल्वेही चीन बांधत आहे. पूर्व चीनमधून तेल व इतर माल बलुचिस्तानात चीनच्याच सहाय्याने बांधलेल्या ग्वादार, पास्नी व ओरमारा इथल्या पाकिस्तानी नौदलाच्या तळावर ४८ तासात आणायची योजना आहे. इथून सर्व आखाती देश जवळच आहेत.
चीनपेक्षा पाकिस्तानच असे घडावे म्हणून बरीच वर्षे प्रयत्नशील आहे. ग्वाडर बंदर चीनने बांधले हे खरे आहे. पण एकतर हा भाग अफगाणिस्तानच्या हेलमंड भागाजवळ आहे. हा भाग मूलतत्ववादी अतिरेक्यांच्या कारवाईचे प्रमुख केंद्र आहे. तसेच ग्वाडरपासून जाणारा कोणताही रस्ता बलुचिस्तान मधूनच जातो. या भागातही पाकिस्तान विरोधी कारवाया चालूच आहेत. या दोन्ही कारणांमुळे ग्वाडर बंदर कोणी फारसे वापरत नाही. सोमालियाच्या किनार्‍यावर गस्त घालणारी चिनी आरमाराची जहाजे सुद्धा ग्वाडर बंदर जवळ असून कराचीमधे तेल पाणी घेत असतात. चीन व पाकिस्तान यांनी आपले रस्ते 1990 मधेच एकमेकाला जोडलेले आहेत. रेल्वे बांधल्याने फारसा फरक पडेल असे वाटत नाही कारण सीमेवरची खुंजरेब खिंड ही बारमाही उपलब्ध नसते.
मागच्या वर्षी पाकिस्तानने गिलगिट-बाल्टीस्तान भागाला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला आहे. या भागात शिया मुस्लिमांचे बहुमत आहे. पाकिस्तानमधल्या सुन्नी मुस्लिमांशी त्यांचे फारसे पटत नाही. त्याचप्रमाणे ते स्वत:ला काश्मिरी समजत नाहीत. या कारणांनी या भागात स्वतंत्रतेसाठी चळवळ होते आहे. परंतु ती शमवण्यासाठी चिनी सैनिक आणण्याइतके पाकिस्तान सरकार मूर्ख नसावे असे वाटते. चिनी सैनिक हे मुख्यत: बांधकाम करण्यासाठी या भागात आले असावेत. या सर्व भागावर सियाचिन जवळच्या सॉल्टेरो पर्वतराजीवरची भारतीय ठाणी उत्कृष्टपणे लक्ष ठेवू शकतात.
माझ्या आधीच्या प्रत्सादात म्हटल्याप्रमाणे चीन पाकिस्तानला जोडणारा काराकोरम हायवे तर गेले 8 महिने बंदच आहे. पुढच्या 1/2 महिन्यात जर तो खुला करण्यात यश मिळाले तर तो चालू होईल नाहीतर पुढच्या उन्हाळ्याची वाट बघावी लागेल.
हा सर्व भाग अतिशय निसर्ग रमणीय आहे व काश्मिरपेक्षाही जास्त सुंदर आहे असे म्हणतात. इथल्या लोकांना कश्मिरपेक्षा लडाखबद्दल जास्त आपुलकी आहे व हे लोख लडाखी लोकांप्रमाणेच दिसतात.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

धन्यु

प्रतिसाद अतिशय आवडला.

आधीच इतक्या समस्याने त्रस्त असलेल्या देशात् अजुन परदेशाचे लष्कर पाकीस्तान लष्कर कशाला घुसु देईल? केवळ भारताला/भारतीयांना बैचैन करायला? असे लिहणार होतो पण कळकळीने लिहणार्‍या काळेकाकांना नाराज करायचे नव्हते.

तरी तरुण तडफदार श्री चंद्रशेखर यांना विनंती :-), की चिनी सैनिक हे मुख्यत: बांधकाम करण्यासाठी या भागात आले असावेत. एकदाचा सोक्षमोक्ष लावावा. नेमके का आलेत?

काळेकाकांचे लांडगा आला रे असे व्हायला नको!

ग्वाडर बंदर खुंजेरेब खिंड वगैरे

माझ्या या ब्लॉगपोस्टवर कदाचित आणखी थोडी फार माहिती मिळू शकेल असे वाटते.
चन्द्रशेखर

फारच आवडला.

प्रतिसाद फारच आवडला. तुमचा ब्लॉगही.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

गिलगिट- बाल्टीस्तान

या भागातील एक राजकीय कार्यकर्ते एम.आय. खान यांनी लिहिलेला एक रोचक लेख माझ्या वाचनात आला आहे. मला हा लेख आवडला. ज्या कोणा उपक्रमीना या विषयात रुची असेल त्यांनी तो जरूर वाचावा असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

लेह-लड्डाक वेगळा कधी होणार?

चंद्रशेखर साहेब,
तुम्ही लिंक दिलेल्या लेह-लडाख संबंधातील लेख वाचला.
मला त्या भागाचा भौगोलिक व सांस्कृतिक इतिहास माहित नव्हता. तो काही प्रमाणात माहिती झाला. पण ती माहिती नसताना एक गोष्ट नेहमी अजून पर्यंत वाटायची ती ही की, या देशावर बरेच वर्षे राज्य करणार्‍या कॉंग्रेस सरकारने त्यांची 'डिवायड अँड रूल' ही पद्धत वापरून लेह-लड्डाक चे जम्मू-काश्मिर पासून विभाजन का केले नाही?
आज लेह-लड्डाक ची स्वतःची भाषा असून ही तेथील लोकांना राज्याची म्हणजे 'जम्मू काश्मिर' ची राजभाषा उर्दू शासकिय शाळांद्वारे शिकावी लागत आहे.
तेथील लोक जम्मूतील मुसलमानांसारखे आक्रमक व आक्रस्ताळे देखील नाहीत.

चिनी सैनिक

चिनी वृत्तवाहिनीचा हा दुवा बघा. अर्थात चिनी वाहिन्या दर वेळी सांगतात ते सत्यच असते असे नाही
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कांहीं तरी गफलत होते आहे

Gwadar & Halamand

ग्वादार व हालमंद यांच्यात खूप अंतर आहे असे या नकाशावरून दिसते. जरा पुन्हा एकदा आपले निवेदन तपासा. ग्वादार कराचीच्या पश्चिमेला असून हालामंद कंचदाहारच्या पश्चिमेला बरेच दूर दिसते आहे.
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!

ग्वाडर आणि हेलमंडमध्ये बरेच अंतर आहे!

नकाशा चुकून जरा खाली लागला आहे. ग्वाडर आणि हेलमंडमध्ये बरेच अंतर आहे!
ग्वाडर बंदर चीनने बांधले हे खरे आहे. पण एकतर हा भाग अफगाणिस्तानच्या हेलमंड भागाजवळ आहे.
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!

आपले महान पंतप्रधान या सर्व प्रकरणाचे पुरावे घेवून अमेरिकेला साद

आहो जकार्तावाले काळे आपण कश्याला आपण त्रागा करतात. आपल्या माननीय प्रथम पंतप्रधानानी चीनने प्रथम अक्साईचिन येथे आक्रमण केले होते तेंव्हा तेथे गवताचे पाते ही उगावत नाही अशी टिपण्णी संसदेत नेहरू यानि केली होती तेंव्हा बहुतेक मोदी यानि सर आपल्या डोक्यावर सुद्धा केस उगवत नाही असा टोमणा मारला होता. नेहरुचे चीन कडे दुर्लक्ष धोरण आज ही तसेच चालू आहे. अभी दिल्ही बहोत दूर है म्हणत दिल्हीचे नबाब राजकारणी लोक नेते गलीछ राजकारणात कामन भ्रष्ट्राचारात मग्न आहेत . आम्ही जगात तिसरी महासत्ता आहोत म्हणून ढोल बडविण्यात मगशुल आहेत. स्वत: कांही न करता अमेरिके कडे हे आस लावून बसले आहेत . अमेरिका बोले मनमोहन डोले अशी आपली वाईट अवस्था झाली त्यातच आपण भूषण मानतो.
खेड्या तील काय राजधानी दिल्ही मधील रस्ते आपण नीट बंधू शकत नाही तर बर्फाळ प्रदेशात काय उजेड पडणार आहोत.
आत्ता आत्ता बातमी आली की, आपले महान पंतप्रधान या सर्व प्रकरणाचे पुरावे घेवून अमेरिकेला सादर करण्यास जाणार आहेत .आणि अमेरिकेने या विरुद्ध ठोस पावले उचलावी या करता आग्रह धरणार आहे.

अहो ठणठणपाळ

अहो ठणठणपाळ, त्रागा तुम्ही करताय् आणि वर मलाच विचारताय्! व्वा राव!
मी न्यूयॉर्क टाइम्समधल्या लेखाचे/बातमीचे फक्त भाषांतर केले व इथे सगळ्यांसाठी चढवले. बस्स.
माझ्या पोस्टचे शेवटचे "इथे हा लेख मुख्यतः माहितीसाठी दिला आहे. प्रतिसादही वाचायला आवडतील." हे वाक्य वाचा कीं राव!
मी कसलाही त्रागा किंवा ठणठणाट केलेला नाहीं. नोंद घ्यावी.
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!

हेलमंड प्रांत व मकरन किनारा

माझ्या प्रतिसादातल्या ग्वाडर बंदर चीनने बांधले हे खरे आहे. पण एकतर हा भाग अफगाणिस्तानच्या हेलमंड भागाजवळ आहे. हा भाग मूलतत्ववादी अतिरेक्यांच्या कारवाईचे प्रमुख केंद्र आहे. या वाक्याचा अर्थ भौगोलिक रित्या ही दोन्ही ठिकाणे एकमेकाला लागून आहेत असा नाही. माझ्या लेखातून तो तसा ध्वनित होत असला तर तो माझ्या अयोग्य वाक्यरचनेचा दोष असावा असे मी मानतो.
मला असे सूचित करायचे होते की अफगाणिस्तानातला हेलमंड प्रांत मूलतत्ववाद्यांचे मुख्य केंद्र असून पार मकरन किनार्‍यापर्यंत (ग्वाडर बंदर या किनार्‍यावरच आहे) ते प्रभावी आहेत. ग्वाडर बंदर फारसे पॉप्युलर न होण्यामागच्या कारणांपैकी हे एक कारण आहे. या शिवाय या बंदरापासून पश्चिमेला थोड्याच अंतरावर चबाहर हे बंदर इराण सरकार भारत सरकारच्या मदतीने विकसित करत आहे. हे बंदर अरबी खाडीच्या जास्त जवळ असल्याने व येथील परिस्थिती शांत असल्याने जास्त बोटी या बंदराचा उपयोग करत आहेत. ग्वाडर बंदर पाकिस्तान सरकारने एका सिंगापूरच्या कंपनीला चालवायला दिले आहे. या भागातून रस्ते, पाईपलाईन व रेल्वे बांधण्यासाठी गेली बरीच वर्षे पाकिस्तान सरकार चीनच्या मागे आहे. परंतु फक्त एक पाहणी करण्यास चिनी सरकारने मान्यता दिली आहे.
एक व्ह्युहात्मक प्लॅन म्हणून ग्वॅडर खुंजेरेब खिंड रस्ता, रेल्वे व पाईपलाईन ही संकल्पना साहजिकच पाकिस्तान व चीन या दोघांसाठी अतिशय आकर्षक आहे यात शंकाच नाही. परंतु समुद्रसपाटीवरच्या बंदरापासून ते 15000 फुटावरच्या व दोन हजार किलोमीटर अंतरावरच्या हिमालयातल्या या खिंडीपर्यंत तेल वाहून नेणे ही सोपी बाब नसल्याने, हा प्रकल्प झालाच तरी त्याला बराच काल लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आंतर्राष्ट्रीय परिस्थितीत काय बदल होत राहतील हे सांगणे आज तरी अवघड आहे.
चीनला अशी पाईपलाईन अतिशय आकर्षक वाटण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एकतर आखातातून बोटीने नेलेले तेल चीनला पोचण्यास 20 ते 22 दिवस लागतात. या मार्गावर सोमालियाचे चाचे अतिशय ऍक्टिव्ह असल्याने आरमारी संरक्षणाखाली जहाजे त्या भागातून न्यावी लागत आहेत. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे या जहाजांना मलाका सामुद्रधुनीत उतरण्यासाठी, निकोबार बेट व सुमात्रा बेटाचे बंडा एसेच हे उत्तर टोक या मधल्या 90 मैलाच्या चिंचोळ्या पट्टीतूनच जावे लागते. या भागावर भारतीय नौदल व वायुसेना यांचे बारीक लक्ष असल्याने आपला एवढा संवेदनाशील कच्चा माल पुरवठा भारताच्या नजरेखालून होतो आहे ही गोष्ट चीनला अस्वस्थ करणारी आहे. यावर पाकिस्तानमधली पाईपलाईन हा त्यांच्या दृष्टीने रामबाण उपाय आहे. या संबंधी जास्त माहिती माझ्या या ब्लॉगपोस्टवर मिळू शकेल. ज्यांना रुची आहे ते वाचू शकतात.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

हेलमांड कुठेही असले तरी ग्वादार हे बंदर कधीच लोकप्रिय होणार नाही

माझे वाचन आपल्याइतके प्रगल्भ नसेल, पण जे कांहीं मी वाचले आहे त्यानुसार दहशतवादी, सनातनी आणि मूलतत्ववादी चमूंचे खरे केंद्र 'कराची'च आहे. (वझीरिस्तान हेही कदाचित् तितकेच बळकट केंद्र असेल, पण कराची हे बंदर असल्यामुळे ते जास्त 'पावरबाज' आहे.) इथेच डॅनियल पर्लला पळविण्यात आले, इथेच अलीकडे अल कायदाच्या नं २ला अटक झाली आणि इथूनच मुंबई नरसंहारासाठी अतिरेकी बाहेर पडले. जवळ-जवळ सर्वच अनर्थांची सुरुवात इथूनच होते. म्हणजे दहशतवाद आणि मूलतत्ववाद ही जर ग्वादारच्या अधोगतीची कारणे असतील तर हेलमांड कुठेही असले तरी ग्वादार हे बंदर कधीच लोकप्रिय होणार नाहीं!
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!

 
^ वर