उपक्रम सेवादात्याकडे काही व्यत्यय आल्याने उपक्रम काही काळ बंद होते. आता ते पूर्ववत सुरू झाले आहे. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
विकासाची फळ!
विकासाची फळ!
विश्वासराव पाटील हे मागच्या पिढीतील एक नावाजलेले उद्योजक. काळाची पाऊले ओळखून त्यांनी आपल्या उद्योगांचा पसारा वाढवत नेला. त्यांच्या इतर सहकार्याप्रमाणे पुणे - मुंबई - ठाणे - कोल्हापूर पट्ट्यात उद्योग चालू न करता आपल्या वाड-वडिलांच्या जमीन-जुमल्यावरच उद्योगाचा पसारा मांडला, वाढवला. स्वत:च्या खेड्यातच राहून आपले उद्योग भरभराटीला आणले. स्वत:बरोबर त्यांच्या खेड्याची, भोवतालच्या खेड्यांची भरभराटी केली. पाटील व त्यांच्या पत्नीच्या कष्टाला फळ मिळाली. कष्टाचे चीज झाले. मुलं मोठी झाली, शिकली व आपापल्या उद्योगाला लागली.
विश्वासरावांना त्यांच्या वाड-वडिलांनी बांधलेले हे घर फार आवडत होते. वेळोवेळी छोटी मोठी डागडुजी करत आपले घर पूर्वीसारखेच ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला. पूर्वजाकडून मिळालेली ही अनामत आहे तसेच पुढच्या पिढीला देणे हे आपले कर्तव्य आहे या निष्ठेने त्यांनी आपल्या घराची काळजी घेतली. घराला लागूनच उद्योगाचा पसारा वाढवल्यामुळे घराच्या पायाला धक्का पोचण्याची शक्यता होती. घराला धक्का पोचता कामा नये या एकमेव उद्देशाने प्रेरित होऊन गेली काही वर्षे - त्यांच्या उत्पादनांना प्रचंड मागणी असूनसुद्धा - उत्पादनाचा वेग कमी कमी करत गेले. मिळत असलेल्या किमान उत्पन्नातच ते समाधानी होते. घर वाचवता आले याचेच त्यांना कौतुक वाटत होते.
पुढील आठ - दहा वर्षात पाटील पती - पत्नींचा मृत्यु झाला. मुलांना पित्रार्जित मालमत्ता मिळाली. आई - वडिलांच्या इच्छेप्रमाणे राहते घर सुस्थितीत ठेवण्यासाठी खर्चाचा अंदाज त्यांनी घेतला. परंतु खर्चाचे आकडे ऐकून मुलं स्तंभित झाली. दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाज त्यांच्या कुवतीच्या पलिकडचा होता. दुरुस्ती न केल्यास घर अल्प काळात मातीमोल होण्याची भीती होती. पाटलांचा धाकटा मुलगा एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्यावर ( व चांगल्या पगारावर!) होता. तोसुद्धा अंदाजाची रकम ऐकून सुन्न झाला. डोक्याला हात लावून बसला. कदाचित वडिलांनी उत्पादनाचा वेग कमी न करता काही वर्ष जास्त नफा कमविला असता तर त्याच नफ्यात आपण हे घर पूर्व स्थितीला आणू शकलो असतो.
विश्वासरावांनी फार मोठ्या आशेने व जिद्दीने पूर्वजाकडून मिळालेला वारसा, आहे तसाच पुढच्या पिढीच्या हातात सोपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यासाठी उद्योगातील तोटा सहन केला. परंतु शेवटी ते स्वत:च घराच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरले.
Source: The Skeptical Environment by Bjorn Lomborg (CUP)
वर उल्लेख केलेली रूपक कथा ग्रामीण भागातील उद्योग, उद्योग व्यवसायांचे नियोजन, नफा तोट्यांचा हिशोब यासंबंधी नसून आज आपल्यासमोर 'आ' वासून उभा असलेल्या पर्यावरण रक्षणासंबंधी आहे हे लक्षात आले असेल. विकास की पर्यावरणरक्षण हा पेच आपल्यासमोर असून त्याचा विचार व उपाय (तातडीने) न केल्यास या पृथ्वीचे काय होईल याचा अंदाजही करता येणार नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे. यासंबंधात हवामानातील बदल याचेच उदाहरण म्हणून घेता येईल. तज्ञांच्या मते हा बदल मानवनिर्मित आहे व हा बदल थोपवण्यासाठी आपल्याजवळ खात्रीशीर उपाय नाहीत. क्योटो कराराचे एकूण एक सर्व राष्ट्रांनी तंतोतंत पालन केले तरी जो धोका येऊ घातला आहे तो टाळता येणार नाही. फार फार तर काही काळ पुढे ढकलता येईल. पर्यावरणाच्या ढासळत्या स्थितीला सर्वात अग्रेसर असलेल्या अमेरिकेला क्योटो करारपूर्तीसाठी हजारो-करोडो डॉलर्स खर्ची घालावे लागतील. करारपूर्तीऐवजी याच खर्चात सर्व विकसनशील व अविकसित राष्ट्रांच्या पिण्याच्या पाण्याची कायमची सोय करता येईल, असा त्यांचा कयास आहे. म्हणूनच अतिखर्चिक क्योटो कराराची अंमलबजावणी अमेरिका टाळत आहे. मुळातच एवढ्या मोठ्या प्रमाणात यासाठी खर्च करावा का?
येथे प्रश्न अमेरिका सर्व जगाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार की नाही हा नाही. या पृथ्वीच्या पर्यावरणाचा धोका कसा टाळता येईल व त्यासाठी नेमके काय करायला हवे हा आपल्यासमोरील ज्वलंत प्रश्न आहे. विश्वासराव पाटील यांच्या वडिलोपार्जित घरासंबंधीच्या समस्यासारखीच ही पण समस्या आहे. आर्थिक विकासाला खीळ घालून त्याकडे दुर्लक्ष करत पुढील धोका लांबवत जाणार की पुढच्या पिढीलासुद्धा अशक्यप्राय वाटावीत अशा समस्यांचे ताट त्यांच्या पुढे वाढून ठेवणार? यासाठी काहीही करणार नाही का? आता आपल्या डोळ्यासमोर जे काही होत आहे, घडत आहे, ते हात बांधून, डोळे घट्ट मिटून बघत बसणार की काय?
याविषयी काहीही करायचे नाही वा थातुर मातुर मलमपट्टी लावून वेळकाढूपणा करायचा असे सांगण्याचा उद्देश नसून आपण नेमके काय करणार आहोत, करत आहोत, करत असलेल्या कृतीचे अल्प व दीर्घ परिणाम काय होवू शकतील याचा विचार करणे गरजेचे आहे, एवढेच सांगायचे आहे. आपण करत असलेल्या उपाय योजनेमुळे आणखी जास्त नुकसान होण्याची शक्यता नाही ना? आताच विकास कार्यक्रमांना खीळ घालून जागतिक तापमानवाढीमुळे होणार्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी पुढच्या पिढ्यांना अशक्य करणार का?
पाटील कुटुंबियासारखे आपल्याला मिळालेल्या वारश्याच्या जपणुकीसाठी उत्पादन थांबवणे हा काही उपाय होऊ शकत नाही. याउलट पुढच्या पिढ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना सक्षम वारसा देणे गरजेचे आहे. झाले ते नुकसान जास्त झाले असून ते थांबवण्यासाठी सर्व विकासप्रक्रिया ठप्प करावे हा पर्यावरणवाद्यांचा (जालिम!) उपाय हे काही समस्याचे उत्तर होऊ शकत नाही.
उपाय म्हणून 'कॉमन सेन्स'च्या तीन गोष्टी आपल्याला करता येतील. कदाचित पर्यावरणवाद्यांना त्या पटणार नाहीत, रुचणार नाहीत:
- प्रथम, या पृथ्वीवरील प्रदूषणात अल्पकाळ थोडीशी वाढ झाली तरी, हाती घेतलेल्या आतापर्यंतचे विकासप्रकल्प न थांबवता पूर्ण करावेत.
- तंत्रज्ञान विकासाचा वेग आहे तसाच ठेवून पर्यावरण समस्येला उत्तर शोधत राहणे ही कॉमन सेन्सची दुसरी गोष्ट असेल. व
- यानंतरचे तंत्रज्ञान पर्यावरण समस्येला नक्कीच उत्तर शोधू शकेल याची खात्री बाळगणे ही तिसरी गोष्ट असेल.
परंतु कट्टर पर्यावरणवाद्यांना तंत्रज्ञान हे उत्तर नसून तीच मूळ समस्या आहे असे वाटत आले आहे.
कॉमन सेन्सच्या मुद्द्यात पर्यावरणवाद्यांना समर्पक उत्तर आहे. तरीसुद्धा त्यांना ते का पटत नाही हे एक न सुटलेले कोडे आहे!
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

जुळती कथा?
मांडलेल्या प्रश्नाशी सांगितलेली रूपककथा पुरेशी ऍनालॉगस नाही.
पर्यावरणवादी लोक बहुधा विकास नको असे म्हणत नसून विकासासाठी लागणारी अमाप ऊर्जा खनिज इंधनांऐवजी इतर मार्गांनी मिळवण्याच्या आवश्यकतेवर भर देत आहेत.
तसेच विकसित जीवनशैलीच्या नावाखाली साधनसंपत्तीचा अपव्यय कमी करणे हा उपाय ते सुचवत आहेत.
नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)
+१
+१
दृष्टांत कथेमध्ये पर्याय (मुलांच्या दृष्टीने) स्पष्ट आहेत. तसे अवघ्या पृथ्वीच्या भविष्याच्या बाबतीत नाहीत.