विठ्ठलाच्या स्त्रिया
(अन्य स्थळावर एका असंबंधित धाग्यावरील चर्चेत विठोबाच्या पत्नींबद्दल थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने जुना विषय पुन्हा समोर आला. त्यांच्या मूळ प्रतिसादामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आणता आला त्या अवलिया उर्फ नानाचे आभार)
विठोबा-रखुमाईचा गजर करणार्या महाराष्ट्देशी विठोबाच्या स्त्रिया हा विषय कदाचित आश्चर्यकारक वाटेल. पण परंपरेला तो तसा मुळीच नाही. आपल्या लाडक्या विठोबाचे नाव या ना त्या प्रकारे अनेक जणींशी जोडले गेले आहे. त्यात त्याची राणी रुक्मिणी तर आहेच, पण अभिजात परंपरेबाहेर त्याच्या पदुबाई उर्फ पद्मावती, तुळशीबाई या अन्य पत्नी तर आहेतच पण जनी सारखी साधीसुधी स्त्री सुद्धा आहे. इरावती कर्वेंसारखी एखादी विदुषी त्याला बॉयफ्रेंड म्हणून त्याच्याशी आधुनिक नातेही जोडू पाहते. यामुळे या विठोबाच्या स्त्रिया हा हा विषय दुर्गा भागवत, इरावती कर्वे आणि अरुणा ढेरे या तीन विदुषींच्या लिखाणाआधारे इथे मांडला आहे. (बरेचसे त्यांचे लिखाण जसेच्या तसे उद्धृत केले आहे, माझा सहभाग संपादक म्हणून.)
एका कथेनुसार विठोबा हा माळशिरसचा राजा, खंडोबाचा (ज्याच्या पुन्हा दोन बायका आहेत म्हाळसा नी बानू) मांडलिक. त्याची बायको पदुबाई (म्हणजे पद्मावती). एकदा विठोबाच्या एका भक्ताचा आदरसत्कार तिने जाणूनबुजून केला नाही असा गैरसमज झाल्याने विठोबाने तिला शाप दिला (तो शाप फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे, पण विषयांतर नको म्हणून सोडून देऊ) त्यामुळे ती भ्रमिष्ट झाली आणि मरण पावली. इथे एक विचित्र संदर्भ आहे. विठोबाने कोणालाही तिच्या मृतदेहाला स्पर्ष करू दिला नाही आणि घारी गिधाडांकरवी त्याची विल्हेवाट लावली. नंतर पावसाला बोलावून तिची हाडे समुद्रात वाहविली. पण ज्या भक्तासाठी हे घडले त्या भक्ताने थोर तप केले आणि समुद्राकडून ती हाडे परत मिळविली आणि पद्माळ्यात विसर्जित केली. अर्थात नंतर विठोबाला पश्चात्ताप झाला आणि तो ही भ्रमिष्टावस्थेत फिरत असताना पंढरपूरच्या पद्माळ्यात त्याला एक सुंदर कमळ दिसलं, ते खुडताच त्यातून पदुबाई साकार उभी राहिली. अर्थात विठोबाने तिच्याशी संसार करणार नाही अशी आण घेतली असल्याने तिला स्वतंत्र मंदिरात संसार थाटावा लागला.
तसा विठोबा हा मूळचा दक्षिणेकडिल, पण तो पंढरपुरात राहिला तो पुंडलिकामुळे असे संतपरंपरा सांगते. परंतु धनगर म्हणतात तो आला पदुबाईमुळे. किंबहुना पदुबाई ही मूळची राणी नि रुक्मिणी ही तिची छाया (किंवा पदुबाई हीच पुनर्जात रूपात रूक्मिणी) अशीही त्यांच्यात समजूत आहे. (लोकधारणा आणि अभिजात संकल्पनेची सांगड घालण्याचा हा प्रयत्न असू शकेल).
अशीच कथा तुळशीची. ही कथा कुणबी परंपरेतील. एका दरिद्री ब्राह्मणाची काळी मुलगी, तिला वर मिळणार नाही असे भविष्य होते म्हणून बापाने तिला वाऱ्यावर सोडले. विठोबाने तिला आश्रय दिला. पण रुक्मिणीने मत्सरग्रस्त होऊन काही कारस्थान केले म्हणून ती जमिनीत गडप झाली. परंतु ती गडप होत असताना विठोबाने तिला केस धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, तर एक सावळे झाड वर आले. विठोबाच्या हातात मंजिऱ्या होत्या. मानवी तुळशीला दिलेले लग्नाचे वचन त्या झाडाशी लग्न करून विठोबाने पुरे केले. हा देव तसा अन्य गृहस्थधर्माला जागणारा आहे. तो कधीकधी भक्तांकडे चहापाण्यालाही जातो. मग त्याचा पाहुणचार केला जातो. मग रुक्मिणीला साडी-चोळी मिळते तर सत्यभामेला चोळीसाठी दोरव्याचे कापड. पण विट्ठलाला काय द्यायचे?
रुख्माईला साडी-चोळी, सत्यभामेला दोरवा ।
विठ्ठल देवराया, तुळशीबाईचा गारवा ॥
तुळशीबाईशीसे त्याचे -विवाहबाह्य का असेना - असलेले नाजूक नाते भक्तांनाही माहित आहे. म्हणून ते देवाची तुळसाबाईशी गाठ घालून देतात.
अरूणा ढेरेंच्या 'ओव्यांमधली रुक्मिणी या लेखात तर त्यांनी विठोबाच्या अन्य स्त्रियांमुळे रुसलेल्या रुक्मिणीच्या काही ओव्याच उधृत केल्या आहेत. त्यातील एक दोन इथे देतो. इथे विठोबा हा मूळ कृष्णाचा अवतार असल्याचा संदर्भ अधिक ठळक होतो. इथे रुक्मिणी नाराज आहे ते विठोबाच्या राधेशी असलेल्या संबंधांबद्दल. त्याबद्दल आयाबाया दळताना म्हणतात:
राणी रुक्मिणी परीस राधिकेला रूप भारी
सावळा पांडुरंग नित उभा तिच्या दारी
अर्थात रुक्मिणी यामुळे त्या द्वारकेच्या राण्यावर रुसली आहे.
थोरली रुकमिण जशी नागीन तापली ।
देवाच्या मांडिवर तिने राहीला (म्हणजे राधेला) देखली ॥
इथे रुक्मिणी ही गृहकृत्यदक्ष गृहिणी आहे. ती घरची नेहेमीची कामे तर करतेच, पण विठोबाच्या भक्तांसाठी बुक्का दळून ठेवते. त्यांच्या भक्तांची, नातेवाईकांची उस्तवार करते.
द्रौपदीने दिले घोडे पांडुरंगाहाती ।
नणंदेच्या नात्यानं रखुमाय पाय धुती ॥
असं असलं तरी विठोबा तिचा एकटीचा नाही. त्यामुळे ती विचारते:
इट्ठलाच्या पाया रखुमाई लोणी लावी ।
देवाला इचारती, 'जनी तुमाला कोण व्हवी' ॥
ही जनी - जनाबाई - विट्ठलाची लाडकी आहे. म्हणून असं म्हटले आहे:
रखुमाईच्या पलंगाला गाद्या गिरद्या बख्खळ ।
देवाला आवडती जनाबाईची वाकळ ॥
क्वचित कधी थोडी अधिक धीट होऊन रखुमाई पुसते:
रुक्मिण पुशिते, देव व्हते कुठं राती ।
शेल्याला डाग पडे, तुळशीची काळी माती ॥
रुक्मिण पुशिते, कुठं व्हते सारा वेळ ।
शेल्याला लागलं कुण्या नारीचं काजळ? ॥
पण विठोबा चतुर आहे, हरप्रयत्नाने सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुक्मिणीला तो काहीच उत्तर देत नाही. इथे अरुणाबाईंनी रुक्मिणीविषयी एक अतिशय हृद्य वाक्य लिहिले आहे. त्या म्हणतात रुक्मिणीला सर्व काही कळले होते पण 'कळण्यानं दु:ख मिळतं, परिस्थिती बदलंत नाही हे ही तिला कळलं होतं'. अतिशय चटका लावणारं हे मूल्यमापन सर्व भारतीय स्त्रियांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.
साऱ्या संतपरंपरेने मात्र विठोबाचा राजेपणा मोडला आणि त्याला आपल्यात ओढला. तो ही त्यांच्या प्रेमाने बांधला गेला. अनेक मार्गाने त्याने सर्वांच्या सुखदू:खात त्यांची सोबत केली. एखादी बाई दळिताकांडिता त्याला विचारत राहिली:
जिवाचं सुखदुक तुला सांगते विट्ठला।
माज्या पंढरीच्या हरी, कधी भेटशील एकला ॥
आणि तो तिला भेटत राहिला वास्तपुस्त करीत राहिला. म्हणून तर आपण त्याने रुक्मिणीवर केलेल्या अन्यायाची आठवण विसरू शकतो.
जनीशी विठ्ठलाचे सर्वात जवळचे नाते आहे.
माय गेली बाप मेला | आता सांभाळी विट्ठला ||
मी तुझे गा लेकरू | नको मजसी अव्हेरू ||
अशी विनवणी करणाऱ्या जनीला या दासीला त्याने सर्वस्वाने आपले म्हटले आहे. इतर कोणासाठी नाही, पण जनीसाठी विठोबा राबला आहे. जनीने झाडलोट केली की याने केर भरावा, दूर टाकावा, तिने साळी कांडायला काढल्या की याने उखळ साफ करून कांडपाला हातभार लावावा, कोंडा पाखडावा, पाणी भरावे अशी सगळी कामे विठोबाने तिच्यासाठी केली आहेत.
पण असे बापाचे नाते सांभाळणाऱ्या विठोबाला जनी कधी "अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या' असेही म्हटले आहे. क्वचित ती त्या पोरट्याला आपल्या म्हातारीची काठी असेही म्हटले आहे.
पंढरीचा विठुराया, जसा पोरगा पोटीचा
मज आधार काठीचा, म्हातारीला
विठुराया पाठीवरी, हात फिरवे मायेने
पुसे लेकाच्या परीने, बये फार भागलीस?
तर याउलट तिच्या संबंधाने रखुमाईने विठोबाची शंकाही घेतली आहे. तर जनीनेच आणखी एक पाऊल पुढे टाकून 'डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी' असे म्हणत विठोबासाठी वेसवापणही स्वीकारले आहे. जनीचे विठोबाशी असे गुंतागुंतीचे नाते आहे. ते समजण्यासाठी ढेरेबाईंचा 'डोईचा पदर... ' (पुस्तकः कवितेच्या शोधात) हा लेख मुळातून वाचायला हवा.
संदर्भः
पैस- दुर्गा भागवत
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी: पृ. २३-२४
स्त्री आणि संस्कृती - अरुणा ढेरे
आठवणीतले अंगण - अरुणा ढेरे
कवितेच्या शोधात - अरुणा ढेरे
गंगाजल - इरावती कर्वे
Comments
विठोबा पारशी
ह्याचे श्रेय गौरी देशपांडेच्या नवऱ्याला, अविनाशला, द्यायला हवे. त्यानेच इरावतीबाईंना गमतीने "काय म्हणतो तुमचा बॉयफ्रेंड" असे विचारले होते. चूभूद्याघ्या.
हा विठोबा पारशी दिसतो.
माहिती एकंदर रोचक आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
"काय म्हणतो तुमचा बॉयफ्रेंड"
श्री. धम्मकलाडू यांना मी प्रथम विनंती करीन की त्यांनी इरावतीबाईंचे पुस्तक नीट वाचावे. "काय म्हणतो तुमचा बॉयफ्रेंड" हे वाक्य त्यांचा ज्येष्ठ जावई श्री. बनविहारी किंवा बॉन याच्या तोंडचे असल्याचे त्यांनी पुस्तकात स्पष्ट म्हटले आहे. ते वाक्य श्री. अविनाशच्या तोंडात श्री. धम्मकलाडू यांनी खुशाल कोंबून दिले आहे.
दुसरे म्हणजे हे वाक्य इरावतीबाईच्या एका ललित लेखामधले आहे व ते दुसर्या व्यक्तीने(जरी ती व्यक्ती त्यांचा जावई असली तरी) म्हटलेले आहे. त्याचा विपर्यास करून लगेच इरावतीबाई विठोबाशी बॉय फ्रेंड म्हणून त्याच्याशी नाते जोडू पहात आहेत हा अजब शोध रमताराम यांनी कसा काय लावला आहे हे समजत नाही. आपल्या हातात लेखणी आली म्हणजे काय वाटेल ते लिहिण्याची आपल्याला परवानगी आहे असे जर श्री रमताराम यांना वाटत असेल तर ते चुकीचे आणि अत्यंत निंद्य आहे.
चन्द्रशेखर
अरेच्चा!!!
एवढ्या जहाल आणि टोकाच्या प्रतिसादाचे कारण काय असेल बरे? !!!! प्रतिसादातील विधानांबद्दल नक्की माहित नाही पण प्रतिसाद असा लिहिला गेला हे पटले नाही. असो.
बिपिन कार्यकर्ते
असहमत
माझी विनंती आहे की आपण तो लेख पुन्हा वाचावा. प्रथम उल्लेख त्यांच्या जावयाने केलेला असला तरी उरलेल्या लेखात त्यांनी तो उचलून धरलेला आहे. त्या लेखाचे शीर्षकच मुळी 'बॉयफ्रेंड' असे आहे. माझ्या दृष्टीने एवढे पुरेसे आहे.
धन्यवाद.
क्षमस्व | आभारी आहे
आदरणीय चंद्रशेखर चुकीचा 'जावईशोध' लावल्याबद्दल क्षमस्व. चूक सुधारल्याबद्दल आभारी आहे. मी 'चूभूद्याघ्या' म्हटले होतेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
राई रखुमाबाई राणीया सकळा
यातील राई ही रखुमाबाईपेक्षा वेगळी स्त्री आहे की राई हे रखुमाबाईचे विशेषण आहे?
मला लेख आवडला. विठोबाच्या लोककथाही मस्तच.
अंदाज
माझ्यामते वेगळ्या असाव्यात. आरतीत उल्लेख येतो ना "राई-रखमाबाई राणीया सकळां.."
बाकी लोककथा मस्त
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
राही (राधी)
राई हे राही चे उच्चारी अपभ्रंश रूप आहे. राही हे ही मुळात 'राधी' चे रूप असावे. राही म्हणजे राधा.
वरील लेखात राहीला विठोबाच्या अंकावर बसलेली पाहून संतापलेल्या रुक्मिणीबद्दल एक ओवी लिहिली
आहे.
अरेच्चा!
खरंय!