उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
विधानसभा मतदान
वसंत सुधाकर लिमये
October 13, 2009 - 1:53 am
आज महाराष्ट्रात मतदानाचा दिवस आहे. नेहमीप्रमाणे आपले मत देण्यालायक एकही पक्ष मला दिसून आला नाही. इंदीरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. जातीचे राजकारण आणि त्यातून येणारे विलासराव देशमुखांसारखे नेतृत्व ह्यामूळे मी त्यांना मत देऊ शकत नाही. शिवसेना-भाजप युतीला कोणाही सभ्य माणसाने मत देऊ नये अश्या मताचा मी असल्याने त्यांना मत नाही. मनसेचा पर्याय तर त्याहून खडतर वाटतो. शिवसेनेचे गुंड परवडले असे मनसेचे आहेत म्हणे. अपक्षांना मत देऊन काहीच फायदा नाही.
अशा परिस्थीतीत तत्वास मुरड घालून कुणालाही मत न देणे हे अधिक योग्य नाही काय?
उपक्रमींना काय वाटते? मत द्यावे का?
द्यायचे झाल्यास कुणाला आणि का द्यावे? ह्यावर चर्चा करायला हा प्रस्ताव मांडत आहे.
दुवे:
Comments
सर्वोत्तम पर्याय
मतपत्रिकेवर स्वतःचे नाव लिहून त्यासमोर शिक्का मारावा आणि मतपत्रिका पेटीत टाकावी.
विनायक
कुठल्या जगात असता?
अहो इल्क्ट्रॉनीक यंत्रे बसवली आहेत सगळीकडे आता. कसलं नाव आणि कसला शिक्का!!
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
पंचाईत
ह्या विलेक्ट्रानिक मशीनीने आम्हा लोकान्ची लईच पण्चायीत केली बंघा. पूर्वी कसा कागदाला हल्दी कुकु वाहता यायाच. त्येच्यामंदी शियमला पत्र लिवता यायाच. झालच त पाच रुपयाची नोट सर्कवता यायाची आनी आप्ल्याला आवडतिल त्या ४-५ लोकान्वर शिका पन मारता यायाचा.
साली सम्दी मजाच ग्येली बापु...
________________________________________
आणिबाणी जाहीर करुन टाकली आहे. साला कुणाची मस्ती नाय पायजेल! आपल्याला जे वाटेल ते ठेऊ, बाकीचं उडवू! 'हेच नमोगतावर होत होतं तर त्यावर तू कांगावा केलास, आणि तुझ्या स्थळावर झालेलं बरं चालतंय तुला?' अशी एक आगाऊ प्रतिक्रिया आली होती. लगेचच उडवली!
कोणालाही नाही
'कोणालाही नाही' असा पर्याय असावा, जेणे करून तो आपल्याला वापराता आला पाहिजे.
सगळ्या बटना दाबायच्या आणि आपले मत स्वतःहून बाद करायचे.
आपण मत दिले नाहीतर, आपल्या नावाने अजून कोणीतरी मत देतील.
सगळी बटणे दाबता येत नाहीत
सगळ्या बटना दाबायच्या आणि आपले मत स्वतःहून बाद करायचे.
सुदैवाने असे करणे शक्य नसावे. एक बटण दाबले की मशीन पुढचे इनपुट घेत नाही. त्यामुळे असे मत बाद करणे शक्य नाही. एकदा बटण दाबले की डन होते.
आपण मत दिले नाहीतर, आपल्या नावाने अजून कोणीतरी मत देतील.
हे मात्र खरे आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत मला हा अनुभव आला आहे. सकाळी आठ वाजता मतदानाला गेलो असता त्यापूर्वीच माझ्या नावाने कोणीतरी मतदान केले होते. मात्र मतदान अधिकाऱ्याने माझे स्पष्टीकरण ऐकून मतदान करु दिले.
'कोणालाही नाही' असा पर्याय असावा, जेणे करून तो आपल्याला वापराता आला पाहिजे.
असा पर्याय आताही आहे. पण त्या पर्यायाचा (एक पर्याय म्हणून) काही उपयोग नाही असे माझे मत झाले आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
घोळ
एकदा मी सकाळी आठ वाजता मतदानाला गेली असतांना त्यापूर्वीच माझ्या नावाने कोणीतरी मतदान केले होते. मात्र मतदान अधिकाऱ्याने माझे स्पष्टीकरण ऐकून मतदान करु दिले. नंतर मला असे कळले की माझे नंतर दिलेले मत ग्राह्य धरले नसेल अशी मते फक्त काही विशिष्ट वेळेला म्हणजे दोन गटात 'टाय' झालाच की बघितल्या जाते. हे विधान किती खरे आहे हे मला माहीत नाही.
माझे नाव यादित दोनदा आहे. दोन मतदार नंबर आहे! अर्ज दिला होता पण अजूनही ते तसेच आहे.
प्रयोग
काल प्रयोग म्हणून एकाच वेळी ३ बटणा दाबायचा प्रयोग करून बघितला. तिन्ही बटना लाल झाल्या होत्या!!!
नक्की कोणत्या बटणाला प्राधान्य मिळेल हे सांगता येत नाही. कदाचित तांत्रिक बिघाड तर नसेल?
असे शक्यच नाही.
>>काल प्रयोग म्हणून एकाच वेळी ३ बटणा दाबायचा प्रयोग करून बघितला. तिन्ही बटना लाल झाल्या होत्या!!!
असे होणे शक्यच नाही. तीन बटण दाबूनही त्यात पहिल्यांदा जे बटण दबले असेल तिथेच आपले मत पडले आहे.
-दिलीप बिरुटे
(माजी केंद्राध्यक्ष )
सहमत
एकाच वेळी तीन बटणा दाबायचा प्रयोग फक्त विंडोज मध्ये करता येतो किंवा करावा लागतो (ctrl alt del) . इतरत्र तशी परिस्थिती नाही.
- आजानुकर्ण
(आजी मतदार)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
+१
अगदी मनातले बोललात. जमल्यास माझा हा ब्लॉग बघा.
चन्द्रशेखर
उमेदवारांचा प्राधान्यक्रम शक्य म्हणून मतदानास जावे.
श्री लिमये, मतदान करतांना प्रत्येकवेळी आपल्या निकषांप्रमाणे योग्य उमेदवार मिळेलच असे नाही. असलेल्या उमेदवारांतील त्यातल्या त्यात कमी वाईट असलेल्या उमेदवारास मत देणे योग्य आहे, असे मला वाटते. मतदानास न जाणे हा वैयक्तिक निर्णय असला तरीही उदासिनतेचे लक्षण आहे. मतदान केल्याने मतदान न करण्यापेक्षा जास्त वाईट परिणाम होणे शक्य नाही. परंतु चांगला परिणाम घडण्याची कमी असली तरीही शक्यता आहे. तेव्हा मतदान करावेच. श्री विनायक आणि श्री चंद्रशेखर यांच्या मतांशी आदरपूर्वक असहमती व्यक्त करतो.
सहमत
मतदान हे पक्षासाठी न करता उमेदवारासाठी करावे असे वाटते. मात्र मतदान नक्की करावे असे वाटते.
प्राधान्यक्रम
तुम्ही देत असलेले मत हे निवडून आल्यावर सर्वात जास्त नुकसान करणार्या उमेदवाराला जात नाही आहे, हे खात्रीने माहित असेल तर तुमचा विचार योग्य वाटतो. मी माझ्या अंदाजाने प्राधान्यक्रम लावला तरी धूर्त राजकारण्यांच्या डावपेचांमूळे तो प्रत्यक्षात अचूक असेलच असे नाही. सध्याच्या पक्षांची वाटचाल बघता असा अचूक प्राधान्यक्रम लावता येईल असे मला वाटतच नाही. तेव्हा मतदान केल्याने वा न केल्याने वाईट परिणाम घडण्याची शक्यता तितकिच राहते. मग मतदान करुन विनाकारण मनास बोचणी कशाला?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
मतदान कराच (पक्ष सोडून व्यक्तिला करा)
श्री लिमये, प्राधान्यक्रम लावतांना तुम्ही वर सांगितलेला (कमीत कमी नुकसान करणारा) निकष वापरावा. इतर एखाद्या मतदारास प्रामाणिक उमेदवार हवा असल्यास त्याने प्रामाणिकतेचा निकष (समजा अचुक नसले तरीही उपलब्ध माहितीवरून असे करणे शक्य आहे.) वापरावा. तुमच्या निकषाप्रमाणे प्राधान्यक्रम लावा.
बोचणी दोन्ही बाजूने वाटणे शक्य आहे. म्हणजे तुम्हाला कोणी एक उमेदवार कमी उपद्रवकारक (उपद्रवाच्या तुमच्या हिशोबानुसार) वाटतो पण तो काही मते कमी पडल्याने द्वितीय स्थानी आला तर तुम्ही मतदान केले असते तर तो निवडून येऊ शकला असता अशी बोचणी लागून राहील. काहीतरी करून अपयश येणे हे आत्मपरिक्षण करतांना समाधान मिळवून देते. पण काही न करताच अपयशाची कवने रचणे यात केवळ अपराधीपणाचीच जाणीव शिल्लक राहते.
अक्षय यांच्याशी सहमत
पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकापेक्षा एक नग उभे आहेत. मात्र तरीही मी सकाळीच जाऊन मतदान करुन आलो. शिवसेना-भाजपला मत देऊ नये असे माझे मत असल्याने उरलेल्या उमेदवारांमध्ये राऊंड ऑफ एलिमिनेशनने नोंदणीकृत पक्षाच्या (म्हणजे साहेबांच्या राष्ट्रवादीच्या) उमेदवाराला मत दिले. (बंडखोर व अपक्षांना अगदी नाईलाज असला तरच मत द्यावे असे वाटल्याने). निकष असा की उमेदवार अत्यंत मूर्ख असला तरी पुढे होणाऱ्या घोडेबाजारास माझा अप्रत्यक्ष हातभार लागू नये.
दुर्दैवाने मनसेचा एकही उमेदवार इथे नसल्याने त्याला मतदान करता आले नाही. वास्तविक इतर पक्षांना धडा शिकवण्यासाठी तरी मनसेला मतदान करण्याची माझी फार इच्छा होती.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
जातीचे राजकारण
इंदीरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही एकाच माळेचे मणी. जातीचे राजकारण आणि त्यातून येणारे विलासराव देशमुखांसारखे नेतृत्व ह्यामूळे मी त्यांना मत देऊ शकत नाही.
जातीचे राजकारण ही फक्त काँग्रेसी पक्षांची मिरासदारी नाही. शिवसेनेने एके काळी हुकूमशाही वापरून जातपातीच्या राजकारणाला दूर ठेवले होते. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून, घृणास्पद पद्धतीने रामदास आठवले यांना हरवले तेव्हाच जातीयवादाची पूर्णपणे लागण झाल्याचे उघड झाले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
जातीयवादी कसे?
जातीचे राजकारण ही फक्त काँग्रेसी पक्षांची मिरासदारी नाही. शिवसेनेने एके काळी हुकूमशाही वापरून जातपातीच्या राजकारणाला दूर ठेवले होते. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून, घृणास्पद पद्धतीने रामदास आठवले यांना हरवले तेव्हाच जातीयवादाची पूर्णपणे लागण झाल्याचे उघड झाले.
शिर्डी - अहमदनगरच्या राजकारणाबद्दल लिहिलेच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिर्डी मतदारसंघ राखीव होता. म्हणजेच निवडणूक हरलेले काँग्रेसचे रामदास आठवले आणि जिंकलेले शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह सर्व उमेदवार अनुसूचित जात - जमात वाले होते. दलित उमेदवाराला हरवण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी सवर्ण उमेदवाराला पाठिंबा देऊन निवडून आणले असते तर कदाचित जातीयवादी राजकारण म्हणता आले असते. स्वतःच्या पक्षाचा दलित उमेदवार असलेल्या आठवल्यांना पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेच्या दलित उमेदवाराला पाठिंबा देऊन निवडून आणणे हे पक्षद्रोही कृत्य असेल पण जातीयवादी कसे बुवा?
विनायक
जातीयवादी अशासाठी की
शिवसेना व रिपब्लिकन हे दोन्ही दलित उमेदवार असले तरी वाकचौरे हे जातीने चांभार होते व आठवले महार. शिवसेनेने प्रचार करताना (हिंदू धर्म सोडलेल्या नवबौद्ध) महारांना मतदान करण्यापेक्षा (हिंदू) चांभारांना मतदान करा अशा प्रकारचा प्रचार केला होता त्यामुळे हा प्रचार जातीयवादी वाटला.
त्यामुळे जातीय राजकारण न करण्याचे शिवसेनेचे धोरण अधिकृतपणे मोडीत निघाले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
एक वेगळा दृष्टीकोन
राखीव जागा ह्या हिंदू महार तसेच हिंदू समाजातील इतर दलित लोकांसाठी असतात. नवबौद्धांनी आरक्षणाची मागणी बर्याच वेळा करूनही मान्य झाली नाही तरी फरक पडला नाही. कारण बहुसंख्य नवबौद्ध लोक जनगणनेच्या वेळी नवबौद्ध असतात आणि राखीव जागांचा फायदा घेताना हिंदू महार लिहून सवलत घेतात. त्यात काही गैर नसले तरी महारेतर (बौद्धेतर)दलितांनी त्याला आक्षेप घेतल्यास समजू शकतो. रामदास आठवले यांनी तसे केले असल्यास आणि त्यावर श्री. वाकचौरे यांनी आम्ही आठवल्यांसारखा खोटेपणा केला नसल्याने आम्ही प्रामाणिक आहोत म्हणून आम्हाला मते द्या असे आवाहन केले तर त्यातही गैर नाही. निदान मी तरी त्याला जातीयवाद म्हणणार नाही. तसेही श्री. रामदास आठवले गेली कित्येक वर्षे मंत्रीपदाच्या, खासदारकीच्या खुर्चीला चिकटून आहेत, पण समाजासाठी काही ठोस केल्याचे वाचले नाही. त्यामुळे ते पडले ते बरेच झाले असे वाटते. आता त्यांनी राज्यसभेसाठी लॉबीईंग सुरू केले आहे.
विनायक
सहमत आहे ....
असो.
शिवसेनेच्या सो कॉल्ड प्रचारापेक्षा पडद्यामागची विखे पिता-पुत्रांची कारस्थानं आठवले यांच्या पराभवास जबाबदार होती असे वाटते.
जाऊ देत, जातीचे फारच राजकारण चालते नाही.
पुढच्या वेळी आठवले साहेबांनी "खुल्या मतदारसंघात" उभा राहुन निवडुन यावे म्हणजे बाकीच्या जातीचे राजकारण करणार्या जात्यंधंना सणसणीत चपराक मिळेल, काय बोल्ता ???
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
मुद्दा आठवले यांचा नाही
पुढच्या वेळी आठवले साहेबांनी "खुल्या मतदारसंघात" उभा राहुन निवडुन यावे म्हणजे बाकीच्या जातीचे राजकारण करणार्या जात्यंधंना सणसणीत चपराक मिळेल, काय बोल्ता ???
आठवले काही विशेष कर्तृत्व असलेले नेते नाहीत. त्यामुळे जात्यंधांना चपराक देण्यासाठी त्यांनी निवडून येण्याचा काही संबंध नाही. जातीय प्रचार कसा होतो हे दाखवणे इतकाच या उदाहरणामागचा उद्देश होता.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
शिर्डी - राष्ट्रवादीची चलाखी
रामदास आठवले हे साहेबांचे प्यादे. खरे तर त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी द्यायला हवी होती. शिर्डी आणि अहमदनगर पैकी शिर्डी राखीव झाला. दोनपैकी एक जागा काँग्रेसला आणि एक जागा राष्ट्रवादीला अशी विभागणी असताना शिर्डीच्या राखीव जागेतून काँग्रेसच्या तिकिटावर आपल्या रामदास आठवल्यांची वर्णी साहेबांनी लावली तर अहमदनगर मधून शिवाजी कर्डिले या राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला तिकीट दिले. अशा रीतीने चलाखी करून कागदोपत्री काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी १ अशी विभागणी असली तरी दोन्ही जागा राष्ट्रवादीने आपल्या पदरात पाडून घेतल्या. बाळासाहेब विखे पाटलांना नगरमधून काँग्रेसचे तिकीट मिळून खासदार होण्याची रास्त अपेक्षा होती. पण साहेबांच्या चलाखीने (आणि काँग्रेसच्या मूर्खपणाने) दोन्ही जागा राष्ट्रवादीला गेल्याचे पाहून काँग्रेसवाल्यांनी दोन्ही जागांवर भाजप आणि शिवसेनेला मदत केली यात मला फारसे गैर किंवा जातीयवादी असे वाटले नाही. राष्ट्रवादीच्या जागा उगीच कमी झाल्या नाहीत. अप्रामाणिकपणा केला त्याचे फळ मिळणारच.
विनायक
सांगून आलेल्या
विवाहेच्छु मुलींमध्ये खोड्या काढत जन्मभर अविवाहित राहणे किंवा वय वाढल्यावर नाईलाजाने जी समोर येईल तिच्या गळ्यात माळ घालावी लागणे हे दोनच पर्याय अतिचिकित्सक लोकांकडे शिल्लक राहतात असा पायंडाच पडलेला आहे. म्हणून अतिचिकित्सकपणा टाळून त्यातल्या त्यात बरा चेहरा दिसेल त्याला मत देणे चांगले.
मैं गोताखोर, मुझे गहरे पानी में जाना होगा, तुम तट पर बैठ भँवर की बातें किया करो....
मात्र मतदान केलेच नाही तर मात्र आपल्याला सरकारच्या नावाने बोटे मोडण्याचा काहीही अधिकार नाही हेही तितकेच खरे.
स्वगत : मराठीसंकेतस्थळांवर संपादक, उपसंपादक पदांसाठी खुल्या वातावरणात, भ्रष्टाचारविरहित निवडणूका कधी घेतल्या जातील बर्या?
_____________________________________________
आणिबाणी जाहीर करुन टाकली आहे. साला कुणाची मस्ती नाय पायजेल! आपल्याला जे वाटेल ते ठेऊ, बाकीचं उडवू! 'हेच नमोगतावर होत होतं तर त्यावर तू कांगावा केलास, आणि तुझ्या स्थळावर झालेलं बरं चालतंय तुला?' अशी एक आगाऊ प्रतिक्रिया आली होती. लगेचच उडवली!
सहमत
एकदम सहमत आहे. सविस्तर प्रतिसाद लिहिणार आहेच. सध्या मतदानाला जाण्याच्या घाईत आहे.
उद्या देवाने विचारले, तुला पुरुष बनायचे आहे कि स्त्री? जर तुम्ही उत्तर दिले कि मला स्त्री बनायला सुद्धा नाही आवडणार आणि पुरुष सुद्धा. मग तुम्ही नपुंसक बनण्याच्या विचारांचे आहात असे देवाला नक्कीच वाटेल.
थोडी आशा
यंदा दक्षिणेतील (मुख्यत्त्वे आंध्र व तामिळनाडू) जयप्रकाश नारायणन यांच्या "लोकसत्ता" या बहुचर्चित पक्षाने काहि चांगल्या उमेदवारांना पाठींबा दिला आहे तर काहि ठिकाणी स्वतः उमेदवार उभे केले आहेत (त्यांच्या साईटवर उमेदवार मिळतीलच.). शिवाय अण्णा हजारे यांनीही काहि उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. रिडालोसने, भाजपाने, काँग्रेसने व मनसेने काहि ठिकाणी चांगले उमेदवार दिले आहेत.
शिवाय "अपक्षांना मत देऊन काहीच फायदा नाही." या मताशीही सहमत नाहिच. जर तुम्हाला वाटातं की उमेदवार अबक तुमच्या मतदारसंघाचं काम व्यवस्थित करू शकेल तर मत देण्यास प्रत्यवाय नसावा.
मत न देण्यापेक्षा जिंकु न शकणार्या चांगल्या उमेदवाराला मत द्यावं.. आपलं मत हे बहुसंख्यांचं मत असलं पाहिजे हा अट्टाहास का?
मी विधानसभेसाठी ७५% उमेदवार व २५% पक्ष अश्या निकषाने मतदान करतो
शिवाय अजून एक तत्त्व आहे.. जर तुम्ही पूर्ण कन्फ्युज असाल तर स्त्री उमेदवाराला मत द्यावे.. तिथे चांगल्या-कमी भ्रष्टाचार- कारभारची थोडी तरी आशा आहे
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
आत्ताच मतदान केले
विषय आत्ताच मतदान केले. तेथील मतदान कर्मचार्यांना ४९ ओ फॉर्म च्या उपलब्धतेविषयी विचारले कोणाला काही सांगता आले नाही. परवाच सकाळ मधे नकाराधिकाराची बातमी होती.
प्रकाश घाटपांडे
दुवा
नकाराधिकार पर्यायाचा काही प्रॅक्टिकल फायदा आहे असे वाटत नाही.
सकाळच्या बातमीचा दुवा भलतीकडेच जातो आहे. कृपया दुरुस्त करुन द्या. बातमी वाचायची आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
काँग्रेस किंवा मनसे ...
अहो मग "अपक्षांना" मतदान करा की. लायक पक्ष नसला म्हणुन काय झाले, अपक्ष तर आहेत ना अजुन ?
निवडणुकानंतर घोडाबाजारातुन ते कुठल्यातरी तुम्ही नाकारलेल्या पक्षाच्या वळचणीला बंधले जातील पण त्यात दोष तुमच्या माथी लागणार नाही.
पहिल्या वाक्याशी सहमत आहे व दुसर्या वाक्याबाबत थोडासा साशंक आहे.
जातीचे राजकारण् वगैरे मान्य पण "विलासराव देशमुख" हे मराठा जातीमुळे वर येतात असे वाटत नाही. राज्यात पवारांशी लढण्यासाठी उपलब्ध पर्यायांपैकी जास्तीत जास्त लायक म्हणुन देशमुख येतात. अर्थात आता ते केंद्रात गेले असल्याने व त्यांना परत इकडे बोलावल्यास इथे राणे + चव्हाण + देशमुख + पाटील ह्यांच्या मारामार्या अटळ असल्याची हायकमांडला कल्पना असल्याने ते अजुन तरी वरच रहातील. सो, समजले असेलच मला काय म्हणायचे आहे ते.
हा हा हा, असो असो.
१९९५ च्या काळापेक्षा आजच्या काळात "सभ्य लोकांची" संख्या वाढत असल्याचे पाहुन आनंद झाला.
जाऊ देत, ह्याला उत्तर द्यावे असे वाटत नाही. मात्र मनसेची गुंडागर्दी ह्यावर आंतरजालावर ( सामना सोडुन ) शोध घ्यावासा असे वाटते.
ह्याबाबत १००% सहमत.
१००% असहमत.
मतदान न करण्यासारखा घोर अपराध दुसरा कुठला नाही. ( राष्ट्रवादीला मतदान करणे हा त्यापेक्षा थोड्या कमी लेव्हलचा घोर अपराध आहे असे आमचे वैयक्तिक मत आहे.)
असो, तुम्ही मतदान करणारच नसाल तर " पुढच्या ५ वर्षात सरकारच्या नावाने खडे फोडायचा ( आणि आंतरजालावर मेगाबाईटच्या मेगाबाईट वाद घालायचा )" अधिकार तुम्हाला नसेल हे मात्र जरुर ध्यानात ठेवा.
एखादी सिस्टिम बनवण्यात जर तुम्हाला इंटरेस्टच नसेल तर अर्थात त्यावर टिका न करण्यात "सभ्यता" आहे !
हे एक चांगले केलेत, मतदान करा किंवा नका करा पण चर्चा ही घडलीच पाहिजे नाही का ?
असो.
माझ्या मते ह्यावेळी मतदानासाठी अवघे २ पर्याय उपलब्ध आहेत.
१. स्थैर्यासाठी ह्यावेळी "काँग्रेस" ला मतदान करा. ह्यावेळी ह्या पक्षाचे सरकारस्थापनेचे चान्सेस सर्वात् जास्त आहेत त्यामुळे निदान आपले मत वाया जाणार नाही.
अर्थात रा.कॉं.ची आघाडी असल्याने "गाड्याबरोबर नळ्याचीही वरात" म्हणुन ज्या ठिकानी काँग्रेसच्या जागी राष्ट्रवादी आहे तिथे रा.काँ.ला मतदान करावे.
( शिवसेना-भाजपा ह्यांची सत्ता येण्याची शक्यता फक्त त्यांनाच वाटते, असो.)
२. सर्व प्रस्थापितांना ( ह्यात काँग्रेस्, रा.काँ., शिवसेना, भाजपा, रिपब्लिकन , डावे वगैरे सर्व आले ) धडा शिकवण्याची इच्छा असल्यास व त्यांना मतदाराच्या ताकदीचा नमुना दाखवुन् ह्या बड्या धेंडांना घरी बसवायचे असल्यास "मनसे" ला मतदान करा.
एका दगडात २ पक्षी मारले जातीत.
माजोरडे आणि निर्ढावलेले प्रस्थापित घरी बसतील आणि मनसेलाही काम करण्यास मंच उपलब्ध होईल्, मग पाहु ते तरी किती काम करुन दाखवतात ते.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
असहमत
असहमत. समजा मी मत दिलेला उमेदवार निवडून आला आणि तो अतिशय भ्रष्ट निघाला तर मला खडे फोडायचा अधिकार नाही का? कारण त्यावेळेसही, 'तुम्ही त्याला का मत दिलेत? आता तुम्हाला तक्रार करता येणार नाही' असे म्हणाल. बरोबर का? मी मत देईन किंवा देणारही नाही तरीही जो कोणी निवडून येईल त्याने त्याचे काम न केल्यास तक्रार करण्याचा अधिकार मी गमावत नाही. मी वेळच्यावेळेला कर भरतो आणि त्या पैशातुनच सरकारची तिजोरी भरते. तेव्हा मी मत दिले नाही तरी मला जाब विचारण्याचा अधिकार आहे. एखाद्या करचुकव्या भामट्याला तुम्ही म्हणू शकता की 'तू स्वत:च कर बुडवतोस त्यामूळे सरकारी विकासकामे रखडली तर लोकप्रतिधीनींच्या नावाने खडे फोडण्याचा अधिकार तुला नाही.'
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
प्राधान्यक्रम
प्राधान्यक्रम ठरवून मतदान करावे. अक्षय यांनी सांगितलेल्या, आणि काही अन्य प्रतिसादकांनी विवेचन केलेल्या या तत्त्वाशी सहमत आहे.
मतदान
मतदान चुकवू नये असे एकंदरीत 'बहुमत' दिसते. त्यातल्या त्यात 'दगडापेक्षा मऊ वीट' शोधून मतदान करणे हे तत्व मीही अवलंबायचो परंतू सद्य निवडणूकीत इतके नालयक पक्ष पुढे आलेले आहेत की त्यातल्या कुणालाही सत्ता मिळाली असता त्यात माझा हातभार होता ही टोचणी मला नको आहे. म्हणून त्यापेक्षा मतदान करुच नये असा विचार मनात डोकावला.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
ड्राय डे...
निवडणुकीचा दिवस धरून एकूण तीन दिवस ड्राय डे लादला गेल्यामुळे त्याचा निषेध म्हणून मी आणि मद्यविक्री व्यवसायातील माझ्या बर्याचश्या सहकार्यांनी (जे माझे अशील आहेत) मतदान केले नाही..
आपला,
(उपक्रमी) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!