तुकयाची नॅनो--
तुकारामाची नॅनो ! ( इन्सर्ट: नॅनोचे चित्र )
१) अभंगाची रचना व अल्पाक्षरत्व:
अभंग हे एक अक्षरवृत्त आहे. त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.
मोठा अभंग चार चरणांचा असतो, पहिल्या तीन चरणात प्रत्येकी सहा अक्षरे, दुसर्या व तिसर्या चरणांशेवटी यमक असते. चौथे चरण फक्त चार अक्षरांचे असते. उदाहरण म्हणून प्रसिद्ध मंगलाचरण पहा: सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी । कर कटेवरी । ठेवूनिया ॥
लहान अभंगात दोन चरण असतात, त्यात साधारणपणे प्रत्येकी आठ आठ अक्षरे असतात. उदाहरण म्हणून पहा: लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥ ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठिण ॥ ( आठ अक्षरांऐवजी कधी नऊ तर कधी दहाही अक्षरे असतात.)
आता स्वत: तुकाराम महाराजांना कोणता अभंग आवडत होता ? जोग प्रतीत एकूण अभंग दिलेत ४१४९ व क्षेपक ( म्हणजे हे तुकारामाचेच आहेत ह्याविषयी संशय आहे असे ) अभंग ४०९. तर प्रथम मोजण्याच्या सोयीसाठी लहान अभंग कोणते आहेत त्यावर खुणा केल्या. हे सोयीचे कसे ? तर फक्त शेवटच्या शब्दांकडे पहायचे. ते यमकांनी शेवट होणारे असतील तर लहान अभंग. जसे : दया , क्षमा, शांती । तेथे देवाची वसती ॥ खुणा करून झाल्यावर त्यांची संख्या मोजली. १ ते १००० ह्या अभंगात लहान अभंग भरले : १५४३ ( खंड, चार किंवा पाच खंडांचा एक अभंग असतो ). आता १००० अभंगात खंड होते ४२३३. म्हणजे लहान अभंगांचे प्रमाण भरते: ३६.४५ टक्के. साहजिकच उरलेले मोठे अभंग मग भरतात : ६३.५४ टक्के. असेच १००१ ते २०००, २००१ ते ३०००, ३००१ ते ४००० व ४००१ ते ४१४९ व क्षेपक ह्यातून मोजले तर मोठया अभंगांचे प्रमाण अनुक्रमे भरले : ६१.११, ७०, ७०.८९, व ७०.७१ टक्के. म्हणजे मोठे अभंग सरासरीने आढळतात : ७० टक्के. ( तर तुकाराम महाराज असे आहेत, मोठे अभंगकार !)
२) नॅनो रचना:
नाव जरी "मोठा अभंग" असले तरी रचनेच्या दृष्टीने अभंग हे अक्षरवृत्त तसे अल्पाक्षरीच आहे. कारण प्रत्येक चरणात असावे लागतात फक्त सहा अक्षरे. अशी तीन चरणे व शेवटच्या चरणात चार अक्षरे. प्रथम शेवटचे चरण पाहू. चार अक्षरात दोन शब्द बसवायचे म्हटले तर ते असू शकतात प्रत्येकी दोन अक्षरी किंवा एक तीन अक्षरी व दुसरा एक अक्षरी. त्यात शेवटच्या चरणात एक प्रकारचा पंच किंवा फटका यायला हवा असतो जो दोन अक्षरी शब्दांनीच बहुदा साधला जातो. आता पहिल्या तीन चरणात सहा अक्षरात परत तोच पेच पडतो व मग अल्पाक्षरी शब्दच निवडावे लागतात. उपक्रम.कॉम नावाच्या संकेतस्थळावर देवळेकर ह्यांनी सबंध गाथाच संगणकाद्वारे तपासली तेव्हा त्यांना आढळले की सबंध गाथेत एकदाच वापरलेले शब्द मोजले तर ते भरतात ३० हजार. त्यापैकी २७,४७९ शब्द हे अल्पाक्षरी म्हणजे १ ते ४ अक्षरी आहेत, तर ५ पेक्षा ज्यास्त अक्शरे असलेले शब्द आहेत;२६५३.
आता कोणी नवख्या कवीला जर हे कोडे घातले तर तो साहजिकच म्हणेल अगदी अल्पाक्शरी शब्दच योजावेत. मग एकच अक्षर असलेले शब्द आपल्याला वापरणे सर्वात सोयीस्कर. ( जसे भल्या मोठ्या कादंबरीचे नाव श्रीमती महाजन ठेवतात एकाक्षरी "ब्र", व कदाचित कोणी पुरुष कादंबरीकार लिहील "ब्रा" ! ). असे एकच अक्षर असलेले वापरण्यायोगे व अर्थ असलेले शब्द होतात: उ, ए, ये, का, की, खा, खो, गा, गे, गो, घी, घे, घो, चि ( हे चि ), छे, छू, जा, जे, जो, ठो, तो, ती, दो, न, ना, नि, पी, पै, फू, बा, बी, बे, भे, मा, मी, या, ये, री, रे, वा, शी, हा, ही, हे, हो. आता ह्या शब्दांचा अर्थ होत असला तरी विषयाप्रमाणे व तेही काव्यात वापरण्यासारखे एकाक्षरी शब्द फारच कमी असतात. गाथेतले शब्द मोजायला संगणक जाणण्यार्यासाठी कोडच्या कळी आहेत पण मी एक अगदी सोपी युक्ती वापरतो. जसे "फाइंड" वर टिचकी देऊन आपल्याला कुठला शब्द मोजायचा तो खिडकीत लिहायचा व "फाइंड नेक्स्ट" टिचकावायचे की गाथेत तो शब्द कुठे असेल तिथे ब्लॉकमध्ये दिसतो व मग परत "फाइंड नेक्स्ट" व मोजायचे मनात दोन.... असे करत एकाक्षरी शब्द मी मोजले ते निघाले असे : ये--१४९ वेळा, हे--६०६ वेळा, गे--४७ वेळा, रे--४५७ वेळा, या---९५०वेळा, वा--५ वेळा, हा---६०० वेळा, ही---३५० वेळा, हे---५०० वेळा, हो---१५० वेळा, तू---१० वेळा, का--३५ वेळा, की--२ वेळा, खा---२ वेळा, गा---१४३ वेळा, जा---१५ वेळा, जे---१०० वेळा, जो---११५ वेळा, तो---११०० वेळा, चि---१३०० वेळा, ती--२३ वेळा, दो--६ वेळा, पै--१ वेळा, बा---४२ वेळा, भे--२ वेळा, मा-- २ वेळा, मी---४५० वेळा, ए--५ वेळा. खो, शी, उ,घी, घो, छे, छू, पी, ठो, बी, आणि बे, ही-अक्षरे एकही वेळ वापरली नाहीत.
वरील मोजकामात सर्वात ज्यास्त वापरलेला शब्द गवसला : चि ( हे चि दान दे गा देवा---ह्या छोट्या छोट्या शब्दातला चि ) जो भरला ४५८३ अभंगात १३०० वेळा. म्हणजे टक्केवारीत ( अभंग संख्येच्या वर) वापर होतो अवघा : २८ टक्के. पण तुकाराम महाराज हे निष्णात कवी आहेत. ते "न" हा शब्द वापरतात १७०९ वेळा, "ना" हा शब्द वापरतात: १२४ वेळा, व "नाही" हा शब्द वापरतात: २००० वेळा ज्यावरून तेच त्यांचे लाडके शब्द आपण म्हणू शकतो. ( कारण हा वापर भरतो ८३ टक्के ). हीच आहे तुकाराम महाराजांची रचनेतली नॅनो रचना !
३) काही अल्पाक्षरी उदाहरणे ( नॅनो रचना ) :
अगदी एकच अक्षराचा शब्द करून रचना करणे हे खूपच अवघड काम. ते तुकाराम महाराज विषयाला बाधा न आणता सहजी करतात व त्यावरून त्यांची भाषेची हातोटी दिसून येते. उदाहरणार्थ एक ओळ पहा: मी तें मी तूं तें तूं । ( कुंकुड हे लाडसी ) ॥ ( २१९५ देहू प्रत) . असेच एके ठिकाणी : हें तों नुरे ये रुचि ( ३३४३ देहू प्रत )
दोन अक्षरी शब्दांवर तर त्यांची जाम हुकुमत चालते. इतकी कोणाला गजलच वाटेल अशी ही प्रसिद्ध रचना पहा:
हे चि माझे तप । हे चि माझे दान । हे चि अनुष्ठान । नाम तुझे ॥
हे चि माझे तीर्थ । हे चि माझे व्रत । सत्य सुकृत । नाम तुझे ॥
हा चि माझा धर्म । हे चि माझे कर्म । हा चि नित्यनेम । नाम तुझे ॥
हा चि माझा योग। हा चि माझा यज्ञ । हे चि जपध्यान । नाम तुझे ॥
हे चि माझे ज्ञान । श्रवण मनन । हे चि निध्यासन । नाम तुझे ॥
हा चि कुळाचार । हा चि कुळधर्म । हा चि नित्यनेम । नाम तुझे ॥
हा माझा आचार । हा माझा विचार । हा माझा निर्धार । नाम तुझे ॥
तुका म्हणे दुजे । सांगायासि नाही । नामेविण काही । धनवित्त ॥
ह्याच धर्तीवर दोन अक्षरी शब्दांच्या रचना आहेत : चित्त शुद्ध तरी । शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती । सर्प तया ॥; गोड तुझे रूप । गोड तुझे नाम । देई मज प्रेम । सर्व काळ ॥; तुका म्हणे काही । न मागे आणिक । तुझे पायी सुख । सर्व आहे ॥; हे चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥; तसेच : हीन माझी याति । वरी स्तुती केली संती ॥ अंगी वसू पाहे गर्व । माझे हरावया सर्व ॥; याती हीन मति हीन कर्म हीन माझे । तुज मज नाही भेद । केला सहज विनोद ॥; देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥; तुका म्हणे जया गावा जाणे जया । पुसोनिया तया वाट चाले ॥; शब्द नाही धीर । ज्याची बुद्धी नाही स्थिर ॥; चित्ती नाही आस । त्याचा पांडुरंग दास ॥; तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥; आम्ही घ्यावे तुझे नाव । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥; बीज पेरे सेती । मग गाडेवरी वाहाती ॥ वाया गेले ऐसे दिसे । लाभ त्याचे अंगी वसे ॥; ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥; बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥; नव्हे साच काही कळों आले मना । म्हणोनि वासना आवरली ॥; प्रीती करी सत्ता । बाळा भीती माता पिता ॥; तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥; तुज न भें मी कळिकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥; मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्ता म्हणों नये ॥; पुरविली आळी । जे जे केली ते ते काळी ॥.... वगैरे.
अल्पाक्षरात काव्य करणे हे आधुनिक काळातही चलतीचे आहे, असे आरती प्रभू ह्याच्या ह्या कवितेवरून दिसते : लव लव करी पात: डोळं नाही थार्याला; एकटक पाहू कसं, लुक लुक तार्याला ? चव गेली सारी, जोर नाही वार्याला; सुटं सुटं झालं मन: धरू कसं पार्याला ? ....किंवा विंदा करंदीकर : तुका म्हणे विल्या । तुझे कर्म थोर । अवघाचि संसार । उभा केला ॥...तुका म्हणे बाबा। त्वा बरे केले । त्याने तडे गेले । संसाराला ॥;
तुकारामाच्या काळात मौखिक परंपरा होती हे आपण लक्षात घेतले तर म्हणताना अल्पाक्षरी शब्दच बरे पडतात हे आपल्याला सहजी पटू शकते जसे कोणाला "अगं गंगू" असं म्हणण ज्यास्त बरे पडते, "अगं गंगाभागिरथे" पेक्षा !
४) "न", "ना", "नाही" ची नॅनो :
वर आपण मोजकाम करताना पाहिले की न, ना, नाही हे शब्द सगळ्यात ज्यास्त वेळा ( १७०९, १२४ व २००० वेळा अनुक्रमे ) येतात म्हणून त्यांना तुकारामाची लाडकी नॅनो आपण म्हणू शकतो. शैली मीमांसेत हे त्यांचे खासे वेगळेपण आहे असे म्हणायचे तर आपल्याला सध्याचे कवीही हे शब्द वापरतात का ते बघणे भाग पडते. ह्यासाठी कोणी एक कवी घेण्यापेक्षा मी "दृश्यांतर, स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता" हे चंद्रकांत पाटील संपादित पुस्तक धुंडाळले. त्यात एकूण ५० कवींच्या १९० कविता आहेत. ( प्रसिद्ध कवी आहेत: विंदा, मुक्तिबोध, सुर्वे, पाडगावकर, आरती प्रभू, सुरेश भट, अरुण कोलटकर, वगैरे ). त्यात "न" हे अक्शर मोजले तर निघाले फक्त ३६ ठिकाणी. एक कविता हा एक अभंगच(चार ते पाच खंडांना मिळून एक अभंग मोजतात) मानला, तर हे प्रमाण भरते अवघे १८ टक्के, तर तुकारामाचे भरते ३६ टक्के.
तुकाराम हे बंडखोर कवी आहेत तसेच ते वृत्ताच्या रचनेबाबत, भक्तिसंप्रदायाबाबत, परंपरा पाळणारेही आहेत. मग वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर "न" हा एकेश्वरी शब्द वापरत असत का हे पाहणे योग्य ठरेल असे वाटून सबंध ज्ञानेश्वरी धुंडाळली तर आढळले की, त्यांनी ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्यातल्या ८१४४ ओव्यात ११७३ वेळा "न" वापरलेला आहे. ( हे प्रमाण भरते १४.५ टक्के व ते एक प्रकारची परंपराच दाखवते.). मूळ संस्कृतातली भगवदगीता तपासली तर त्यातही हे न चे प्रस्थ हमखास दिसेल कारण त्यातले काही प्रसिद्ध श्लोक पाहिले तर न सर्वत्र दिसते ते असे : न कांक्षे विजयं कृषणं न च राज्यं सुखानि च ।; नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।; न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।; यो न ह्रष्यन्ति न द्वेष्टि न शोचति न काङक्षति ।; न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावक: ॥
न ना ची ही रट, एकप्रकारचा नकारार्थी रेटा आहे का? तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त, "न करणे" ही असते. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा "नेति नेति" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही ! ). पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज "न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी "न-पदार्थ" अशी संबोधिली गेली आहे. "येथे"च्या उलट "तेथे" असे होते, पण "न येथे" म्हणजे काही "तेथे" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे "न येथे"! तसेच, "बोलणे" ह्या विरुद्ध खरे तर क्रियेच्या दृष्टीने "ऐकणे" असे व्हावे. . "न बोलणे " ह्याने बोलण्याशिवाय जे खाणाखुणांचे, ईंटिश्यूनने सांगण्याचे, देहबोलीचे, वातावरणाचे अपार विश्व आहे ते सांगितल्या जाते व ते काही नकारार्थी असत नाही. नुसते असते. वेगळे जरूर असते. कलेच्या क्षेत्रात जे महत्व धूसरपणाचे ( एबस्ट्रॅक्टचे ) आहे, तेच अशा "न"वापरून केलेल्या शब्दांनी साधल्या जाते. म्हणून हे न-पुराण नकारार्थी नाही. उलट अर्थाचा वेगळा पसारा मांडणारे आहे. कदाचित हेच तत्व भाषाशास्त्री "बायनरी ऑपोजिशन" ह्या प्रकरणातून सांगत असावेत. ( जिथे असे सांगण्यात येते की जेव्हा आपण दोन विरुद्ध अर्थी शब्द एकत्र वापरतो तेव्हा वाचकाला त्या दोहोंच्या दरम्यानचे साम्य, विरोध, संबंध, व अर्थ शोधणे भाग पडते.).
५) "न, ना" द्वारे सुजाण पालकत्व :
तुकाराम महाराज हे सदगुरू आहेत. सदगुरूचे उत्तरदायित्व मोठे कठिण असते. साधकाला संभ्रमात टाकणारे इतके मार्ग असतात की, "वाया आणिका पंथा जाशी झणी" अशी भीती वाटत असते. साधकाचे हित ध्यानात ठेवून त्याला योग्य व नेमका मार्ग सांगावाच लागतो. मग त्यात "असे करू नको", "तसे करू नको" किंवा बहुतेक पालक जसे "डोंट प्ले नाउ". "डोंट वेस्ट टाइम" अशी काय करू-नकोची भाषा बोलतात, तसे ते बोलतात. हे नाही केले तर हमखास "वाया जाणे" येतेच. मग सदगुरूला "बॅड पेरेंटिंग"चा दोष पत्करून नेमके मार्गदर्शन करावेच लागते. सुलभ रहदारीच्या नियमात सुद्धा आपण पाहतोच की "नो एंट्री" ची नितांत गरज भल्या भल्या ठिकाणी पडतेच. ही नकारात्मकता फायद्याचीच असते.
संसारात राहावे का परमार्थ करण्यासाठी संसारत्याग करावा हा खरे तर एक कूट प्रश्न आहे. संत रामदासांना अगदी कळकळीने वाटले की संसार करू नये. म्हणूनच तर ते सावधान म्हणताच लग्नमंडपातून पळ काढते झाले. प्रश्न असे गहन असता त्याचे थोडक्यात नेमके उत्तर देणाराच गुरू असतो. म्हणून ते सांगतात "जोडोनिया धन । उत्तम वेव्हारे । उदास विचारे । वेच करी ॥ ". ज्याला आपला कळवळा आहे तोच कोणा तत्वज्ञांची तमा न बाळगता असा व्यवहारी सल्ला देऊ धजेल. आणि हेच खरे पालकत्व निभावणे झाले. नकारात्मतेची फारशी तमा न बाळगता मग तुकाराम महाराज आपले, साधकाचे, असे पालकत्व स्वीकारतात. म्हणूनच ते रोखठोक सल्ला देतात की "नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥".
इंग्रजीत कुठल्याही विषयावरचे दोन पर्याय असतात त्यांना म्हणतात : डूज आणि डोंट्स. म्हणजे काय करावे व काय करू नये. ह्यात काय करावे हे सकारात्मक सांगणारे नियम किंवा कमांडमेंटस असतात तितक्याच महत्वाचे डोंटस म्हणजे काय करू नये ते सांगणारे नियम असतात. खरा पालक नेहमी डोंटस वर ज्यास्त जोर देत असतो. त्याची ज्यास्त धास्ती बाळगतो. हे पालकत्व तुकाराम महाराज फार उत्तम निभावतात ते असे नकारात्मक डोंटस सांगून
६) "न, ना" ची श्रवणसुलभता :
म्हणतात की माणसाच्या उत्क्रांतीत कान हा अवयव सगळ्यात शेवटी प्रगत झाला. त्यामुळे ऐकू येणे हे आपले सगळ्यात कमी प्रगती झालेले इंद्रीय आहे.( इतर इंद्रीयांच्या तुलनेत ). तसेच दोन बाजूला असलेली कानाची ठेवण व कानात निरनिराळी हाडे असल्याने ऐकू येणे हे दिशेवरही अवलंबून असते. म्हणूनच वर्गात आपण शिक्षकांकडे पाहिले तरच आपल्याला चांगले ऐकू येते. किंवा मैफिलीत गायकाकडे पहावे लागते तेव्हा चांगले ऐकू येते. ऐकू आले तरच ते समजते तसेच न समजणारे ऐकूही येत नाही.
एरव्ही सुद्धा आपल्याला श्रुतिगम्यता खूप महत्वाची असते. कार्यक्रमात ऐकूच आले नाही तर आपल्याला त्यात रस येत नाही. आजकाल शहरात आवाजाचे एवढे प्रदूषण असते की आवाज मोजायच्या यंत्रावर ८० डेसिबल आवाज आसमंतात असतोच.(९० डेसिबल ही शिवाजी पार्कवरच्या सभेला पोलीस वरची मर्यादा घालतात.). आता अशा पार्श्वभूमीवर आवाज ऐकू यायचा तर आपल्याला लाऊडस्पीकर आवश्यकच ठरतो. आजकाल ५०/६० जणांचा छोटेखानी सभागृहात कार्यक्रम असेल तरीही लाऊडस्पीकर आवश्यकच असतो. आता ह्या समस्येच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज रात्रीच्या वेळी भजन कीर्तन करताना त्यांना लोकांना ऐकू येणे ( श्रुतिगम्यता ) किती महत्वाचे होते हे आपण लक्षात घ्यावे.
ह्यावर तुकाराम महाराजांनी एक शास्त्रीय पद्धतीने तोडगा काढलेला दिसतो. फोनोलॉजी नावाचे आवाजाचे एक शास्त्र आहे. ह्यात सांगतात की स्वर व वर्ण एकत्र येऊन जो शब्द ( सिलॅबल) तयार होतो त्यात आवाजाची एक लाट तयार होत असते. त्यात एक आवाज येणारा ( ऑनसेट ), मधला ( न्युक्लियस ) मुख्य आवाज, व शेवटचा ( कोडा) असे आवाज असतात. त्यात न्युक्लियसचा मुख्यत्वे आवाज टिकतो. पण आपल्या मराठीत शेवटच्या अक्षरावर जोर देण्याची रीत आहे. त्यामुळे शब्दातल्या शेवटच्या वर्णाचा ( फोनेम ) चा आवाज प्रामुख्याने आपल्याला ऐकू येतो. आता उच्चार यंत्रणेच्या ठेवणीमुळे ह्या निरनिराळ्या फोनेम चे ऐकू येणे कमी ज्यास्त फरकाचे असते. ह्याला सोनॉरिटी प्रकरणामध्ये एक श्रेणी देतात ज्यात सगळ्यात कमी ऐकू येणारे वर्ण ते सगळ्यात जोरात ऐकू येणार फोनेम अशी श्रेणीवार प्रतवारी लावतात. ह्यात असे दाखवतात की सगळ्यात कमी ऐकू येणारे फोनेम आहेत : ब, द, त, प, आणि क हे वर्ण. हे कमी का ऐकू येतात, तर ह्यांचा उच्चार पूर्ण अडथळा येऊन होतो व त्यांना स्टॉप्स असे म्हणतात. त्यानंतर मोठ्याने ऐकू येतात : च, ज ज्यांना आफ्रिकेटस म्हणतात. त्यानंतरचा मोठा आवाज येतो तो : स, झ, फ, श, थ, ह्या घर्षकांचा,व त्यानंतर य, र, ल, व ह्यांचा. सगळ्यात मोठा आवाज ऐकू येतो तो स्वरांचा : अ, इ, ऐ, ओ, ऊ . आणि ह्या खालोखाल नंबर लागतो तो अनुनासिकांचा म्हणजे नाकातून उच्चार होणार्या वर्णांचा जसे : न, म,
म्हणजे जे शब्द अनुनासिकांनी शेवट होतात ते ऐकू येण्यासाठी चांगले सुलभ असतात. आता तुकाराम महाराज व त्याकाळचे मौखिक परंपरेतले सर्व जण अनुनासिकांचा ( न, ना, नाही ) एवढा मुबलक उपयोग का करीत हे चटकन ध्यानात येते. त्याच्या मुळाशी आहे ही श्रुतिगम्यता व श्रुतिसुलभता. ( आपण जेव्हा हाका मारतो किंवा हाळ्या देतो तेव्हा ती पटकन ऐकू यावी अशी आपली संकल्पना असते. म्हणून सगळ्या हाका बघा कशा स्वरांनी शेवट होणार्या असतात. जसे : राम्या ए राम्या ए s s , किंवा ओ ये ओ ये s s, किंवा नुसते ए s s ! ).
७) "न, ना" चे सांगणे संदर्भातले महत्व:
मतमतांचा इतका कोलाहल माजतो की साधकाला कोणता मार्ग बरोबर त्याचा संभ्रमच पडतो. व ही जाणीव सर्वकालीन असते. ती जशी तुकारामाच्या काळी होती तितक्याच तीव्रतेने आजच्या साधकालाही जाणवते. म्हणूनच कदाचित वारकरी संप्रदायामध्ये "माळ" म्हणजे गुरू करण्याचे फार महत्व आहे. खरा गुरू आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. कोणता मार्ग आपल्याला बरा राहील हे तर तो सांगतोच पण त्याचबरोबर कोणता मार्ग घेऊ नये हेही सांगतो. आजकालच्या संदर्भात तर हे फारच महत्वाचे ठरते. आपण शहरात पाहतो की एखाद्या ठिकाणी पोचायचे दोन तीन मार्ग असतात. पण काही मार्ग हे अडचणीचे असतात, ट्रॅफिक जामचे असतात. खरा मार्गदर्शक आपल्याला कोणता मार्ग घेऊ नकोस ते आधी सांगतो. हे त्याचे नकारार्थी मार्गदर्शन नसते तर तो आपल्या हिताचा कळवळा असतो. ह्याच कळवळ्यापायी काय काय करू नको असा नकाराचा दोष पत्करूनही तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून "न", "ना", "नाही" हे शब्द मुबलकपणे वापरून आपल्याला "सांगत" असतात.
प्रसिद्ध गुजराती कवी सुरेश दलाल ह्यांना एकदा मी विचारले होते की आजकाल कोणत्याही कवी लेखकाचे साहित्य त्याच्या मृत्यूपश्चात १५/२० वर्षात विस्मरणात जाते व असे असताना, ज्ञानेश्वर-तुकारामांचे साहित्य इतकी सातशे वर्षे कशामुळे टिकले असावे ? त्यांचे उत्तर मोठे बोलके होते. ते म्हणाले की त्यांची कलाकृती ही अगत्याने काहीतरी सांगण्याची होती, केवळ स्फूर्ती आलीय व लिहिले अशा प्रकारची नव्हती. तर "सांगणे" व ते ही कळकळीने, हे असे महत्वाचे ठरते, व ह्या सांगण्यात "हे हे करू नको" असे नकारार्थी सांगणे महत्वाचे व प्रत्ययकारी ठरते.
हे "सांगणे" प्रकरण किती सर्वदूर साहित्यात दबा धरून असते ते पहा. कादंबरी म्हणजे आजकाल नुसती कोणती तरी राजा राणीची कहाणी असत नाही तर तिने काही तरी सांगावे लागते. जसे भालचंद्र नेमाडे "हिंदू" ह्या कादंबरीतून ब्राह्मणांनी धर्म कसा बिघडवला हे सांगण्याचा निश्चय करतात. चित्र हे सुद्धा नुसते काही तरी टिपणारे नको असते तर ते बोलके असावे लागते. सिनेमाचेही आपण असेच परिक्षण करतो व चांगला उदात्त संदेश देणारा चित्रपट उत्तम असे ठरवतो. आपल्या जगण्यानेही काही तरी मानवतेला संदेश मिळावा अशीही आपली महत्वाकांक्षा असते. तर असे "सांगणे" मुख्य हेतू असताना साधकांची सोय म्हणून तुकाराम महाराज "काय करू नका" असे सांगतात व साहजिकच ते सांगताना "न", "ना", "नाही" हे शब्द भरपूर वापरतात. ह्या वापराने त्यांच्या सांगण्याचा संदर्भ सिद्ध होतो.
८) लांबलचक शब्दांची मालगाडी व तिचा खडखडाट :
मराठी शब्दकोश पाहिला व त्यात पाच अक्षरे व त्याहून ज्यास्त असलेले शब्द मोजले तर आपल्याला आपल्या भाषेचाच कल अल्पाक्षराकडे आहे का ते समजेल. ह्या दृष्टीने वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर हा कोष पाहिला. आता सगळा कोश मोजणे जिवावर आले. म्हणून त्यात संख्येने ज्यास्त शब्द असलेले "स" पासून सुरू होणारे ५८८८ शब्द तपासले ( कोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत ). म्हणजे हा १० टक्क्याचा मासला ( सॅंपल ) होतो. तर " स"पासून सुरू होणारे ५व त्यापेक्षा ज्यास्त अक्षरांचे मोठे शब्द खुणा करून मोजले तर भरले एकूण ७१२. टक्केवारीत हे पडतात १२ टक्के. म्हणजे भाषेतच ८८ टक्के शब्द हे अल्पाक्षरी आहेत म्हणायचे. आता तुकाराम गाथेत आपल्याला अल्पाक्षरी शब्द आढळले होते एकूण ३० हजारापैकी २७४७९ म्हणजे ९१ टक्के. आता हे साहजिकच भाषेच्या कलाप्रमाणेच आहे हे दिसून येईल. आता साहजिकच लांबलचक मालगाडी सारखे शब्द असू नयेत हा नियम ओघानेच येतो व तो तुकारामांनी तंतोतंत पाळलेला आहे हेही लक्षात येते.
आपण जो आवाज काढतो तो टाळू, दात, दात व टाळू दरम्यानचा भाग, घसा, ह्या ठीकाणी जिभेचा वावर करून व नाक ह्यातून हे तर आता सर्वांना माहीतच असते. आपण जी हवा घेतो ती मोठे शब्द म्हणत असताना लगेच विरून जाते. म्हणजे आपली जी व्यवस्था आहे त्याप्रमाणेही अल्पाक्षरे हीच आपली निकड आहे. भाषेतले दोन अक्षरी शब्द मोजले ( स पासून सुरू होणार्या ५८८८ शब्दांपैकी ) तर ७५३ म्हणजे १२ टक्के. आणि नेमाडे संपादित अभंगगाथेतले पहिले १०० अभंग तपासले तर त्यात दोन अक्षरी शब्द निघाले २३०३ शब्द, म्हणजे २३ अल्पाक्षरे प्रति अभंग किंवा ३६ शब्दापैकी ( चार खंडांचा एक अभंग व एका अभंगात एकूण ३६ शब्द) २३ शब्द दोन अक्षरी भरले. तर अशा रितीने ७० टक्के शब्द तुकाराम महाराज दोन अक्षरी वापरतात हे दिसून येते. ते लांबलचक शब्दांची मालगाडी अशी टाळतात व त्यायोगे होणारा खडखडाटही मग टळतो.
हे अल्पाक्षरी काव्य करणे "येरा गबाळ्याचे " काम नाही हे आजकालच्या काही आधुनिक कवींच्या रचना अल्पाक्षरांसाठी मोजल्या तर लक्षात येऊ शकेल. "दृश्यांतर" ह्या चंद्रकांत पाटील संपादित पुस्तकातून विंदा करंदीकर, सुर्वे, कोलटकर, पाडगावकर, सुरेश भट, ह्यांच्या ३७७२ एकूण शब्द असलेल्या कविता तपासल्या तेव्हा त्यात अवघे १५६७ दोन अक्षरी शब्द आढळले. म्हणजे ४१ टक्के व हेच तुकारामाच्य अभंगात प्रमाण आहे दोन अक्षरी शब्दांचे ७० टक्के. अल्पाक्षरी काव्य ह्यात तुकाराम महाराजांची अशी हातोटी सिद्ध होते.
९) गेयता व अल्पाक्षरे :
गेयते साठी कमीत कमी अक्षरांचे शब्द असावेत हे तर जे शास्त्रीय संगीत ऐकतात त्यांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. कारण जेव्हा गायक ताना घेतात, त्यात चढ उतार करीत वेगवेगळ्या चालीत बदल करत असतात तेव्हा शब्दांऐवजी ते सरगम वापरतात जसे: म म ग ग रे ग सा वगैरे. नुसते स्वर हे एक अक्षरी शब्द असतात. आता दर वेळी एकाक्षरी शब्द सुचणे व ते वापरणे काव्यात शक्य होत नाही. तेव्हा त्यातल्या त्यात जवळचे अल्पाक्षरी शब्द असतात दोन अक्षरी. आणि आपण पाहिले की तुकाराम महाराज अभंगात ७० टक्क्यांनी असे दोन अक्षरी शब्द वापरतात. त्यामुळेच तुकारामाचे अभंग हे अप्रतीम गेय होतात.
तामिल शास्त्रीय संगीतात प्रत्येक गायकाने कमीत कमी दोन तरी तुकारामाचे अभंग गावेत अशी परंपरा आहे असे श्री गणेशकुमार सांगतात. हे गृहस्थ चेंबूरच्या फाइन आर्ट सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांना पंढरपूरच्या देवस्थानाने अभंग-रत्न हा किताब दिलेला आहे.ह्यांचे मराठी अभंग विषयावर एक भाषण होते. अभंगाचे हे लेक्चर-डेमोंन्स्ट्रेशन होते. त्यादरम्यान त्यांनी काही माहीती सांगितली ती थक्क करणारी आहे. सर्वात मोठ्ठे विठ्ठल मंदीर भारतात कांचीपूरम येथे आहे. तिथे विठ्ठलाची १२ फूट उंचीची मूर्ती असून इतर संतांच्या १० फुटी मूर्ती आहेत. संपूर्ण पंढरपूरच्या देवळाची आसपासची प्रतिकृतीही केलेली आहे. तंजावरचा दक्षिण भजन संप्रदायात हटकून मराठी अभंग म्हटले जातात. तिथल्या गायकांना दोन तरी मराठी अभंग म्हणावेच लागतात. त्यांच्याकडची हरिकथा पद्धती म्हणजेच प्रवचनाचा एक प्रकार आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतगुरू त्यागराज ह्यांच्या समाधी मागेच विठ्ठलाचे मंदीर आहे.
सर्वात ज्यास्त लोकप्रिय मराठी अभंग तामिळ नाडूत म्हटले जातात. म्हणूनच भीमसेनजी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे ह्यांचे तुकारामाचे अभंग लोकप्रिय झाले असून सर्वात गेय आहेत हे जाणवते.
१०) भाषासंपत्ती, भाषांतरे व अल्पाक्षरे :
शब्द-संपत्ती ( व्होकॅब्युलरी ) हा मोठा गहन विषय आहे. असे म्हणतात की पहिल्या इयत्ते पर्यंतच्या बालकाला साधारण २५००ते ५००० शब्द माहीत असतात व ते बालक दर वर्षाला ३००० हजार शब्द शिकत असते. किंवा दर दिवशी ८ शब्द ! कॉलेज शिक्षित तरुणाला साधारण १७००० शब्द माहीत असतात. ( तो दाखल होतो तेव्हा त्याला साधारण १२००० शब्द माहीत असतात. ). तुमची शब्दकळा-संपत्ती किती आहे त्यावरून तुमचे वाचण्यातले आकलन ठरत असते. भाषिक शब्दसंपत्ती किती आहे त्यावरून तुमची वैचारिक संपत्ती किती आहे ते ठरते. माणसाची महनीयता आपण त्याच्या शब्दसंपत्तीवरून जोखू शकतो. कदाचित हेच पुरेपूर जाणवून तुकाराम महाराज म्हणाले असतील: "आम्हा घरी धन । शब्दाची च रत्ने । शब्दाचीच शस्त्रे । यत्न करू ॥ शब्द चि आमुच्या । जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन । जनलोका ॥ तुका म्हणे पाहा । शब्द चि हा देव । शब्दे चि गौरव । पूजा करू ॥" तुकाराम महाराजांच्या गाथेतली शब्दसंपत्ती आहे ३० हजार शब्दांची व त्यावरनं त्याचा आवाका ध्यानात यावा.
इंग्रजी भाषेतला दहा लाखावा शब्द नुकताच शब्दकोशात आला. तो होता : "जय हो". त्या तुलनेत मराठी शब्दकोशात ( वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर ) आहेत फक्त: ६०,५५९ शब्द. इंग्रजी भाषेत शब्दकोशांवर प्रचंड संशोधनही झालेले आहे. फ्रान्सिस व कुसेरिया ह्यांनी किती शब्द भाषेतले किती व्याप सांभाळतात त्याचे कोष्टकच तयार केलेले आहे. जसे : १००० शब्द ७२ टक्के भाषा व्यापते, २००० शब्द ७९.७ टक्के भाषा व्यापते, ३००० शब्द--८४ टक्के, ४००० शब्द---८६.८ टक्के, ५००० शब्द--८८.७ टक्के, ६००० शब्द ८९.९ टक्के, तर १५,८५१ शब्द--९७.८ टक्के भाषा व्यापते. मायकेल वेस्ट ह्याने तर २००० सामान्यत: वापरल्या जाणारे शब्द असे निवडले आहेत की त्यातून ५० लाख शब्दांचा संभार उभा राहू शकतो.
इराक युद्धात सैन्याला वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ने जे संगणक तयार केले होते त्यात तर सर्व इंग्रजी-इराकी भाषेतले व्यवहार सहजी पार पाडण्याची क्षमता केवळ १ हजार शब्दांमार्फत केलेली होती. इतके हे मूलगामी १ हजार शब्द होते. असेच प्रत्येक भाषेत जोरकस वापराचे साधारण असेच हजार शब्द असतात. व बहुदा ते सर्व असे छोटे छोटे शब्दच असतात. तेव्हा दुसर्या भाषेत भाषांतर करायचे असेल तर अल्पाक्षरी शब्दच वापरणे हे चांगले धोरण ठरते. व ते तुकारामाला ठाऊक होते हाच त्याचा मोठेपणा आहे !
११) सौंदर्य व अल्पाक्षरे :
एकेकाळी अलंकारिक भाषा, अगडबंब लांबलचक शब्द व वाक्यरचना ही सौंदर्याची लक्षणे मानल्या जायची. त्यामुळे संस्कृत प्रचुर भारदस्त भाषा ही प्रमाण भाषेतली सुंदर भाषा समजली जायची. ह्या उलट आजकाल सहज बोली-सुलभ भाषा, तीही अनालंकृत, हेच सौंदर्याचे लक्षण मानले जाते आहे. इंग्रजीत सुद्धा पूर्वी गुंतागुंतीचे क्लॉजेस असलेले पॅरेग्राफभर चालणारे वाक्य लिहिता येणे म्हणजे भाषेवर हुकुमत चालवणे समजत असत. आजकाल तर कित्येक निबंधात एका वाक्यात आठच्यावर एक शब्दही येऊ नये असा चांगले लेखक सल्ला देतात. विजय तेंडुलकर "कोवळी उन्हे" हे सदर अवघ्या १२० शब्दात लिहीत असत. इतकी सौंदर्याची समज लांब शब्दांकडून त्रोटक शब्दांकडे झुकली आहे. हे पाहिल्यावर दोन अक्षरी शब्दच इतक्या विपुल प्रमाणात ( ७० टक्के ) वापरणारे तुकाराम महाराज किती दूरवरचा मोलाचा विचार बाळगून होते ह्याची साक्ष पटते.
सायकोलिंग्विस्टिक्स ह्या विषयात मेंदूत भाषा ग्रहण करण्याचे जे कार्य चालते त्यासंबंधी असे नोंदविले आहे की माणसाची ज्यास्तीत ज्यास्त अक्षरे लक्षात ठेवण्याची शक्ती ही पाच अक्षरी शब्दांचीच असते. म्हणजे शब्द जर पाच किंवा अधिक अक्षरांचा असेल तर तो ग्रहण करणे, लक्षात ठेवणे हे आपल्याला अवघड जाते. म्हणजे लहान शब्दांची आपल्या मेंदूची निकडच असते व म्हणूनच आपण लहान शब्द वापरतो.
काही भाषाशास्त्रींच्या मते प्रत्येक शब्दात मुळातच एक संदेशवहनाची खुबी अंतर्भूत असते. कदाचित ह्यामुळेच आपण आपल्या मातृभाषेतले नवे शब्द शब्दकोशात पाहिल्याविना नीट समजू शकत असू. आता हे शब्दांचे अंतर्गत भाव कळवणे, शब्द जितका जिकिरीचा, मोठा, तितके अवघड होत असणार. आणि शब्द जितका लहान, कमीत कमी अक्षरांचा तितके हे काम बिनबोभाट होत असणार. आणि शिवाय आजकालच्या समजुती प्रमाणे अधिक सौंदर्यपूर्ण ! म्हणूनच भाषा सुंदर करायची असेल तर ती अल्पाक्षरातच उलगडून दाखवावी लागेल आणि हेच सप्रमाण तुकाराम महाराज त्यांच्या अल्पाक्षरी रचनेने दाखवून देतात.
-----------------------------------------------------------------------------------------------
( शब्दसंख्या: ३७५५) चित्र: नॅनोचे व तुकारामाचे
अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडीया नगर, घाटकोपर ( पूर्व ), मुंबई--४०० ०७७
भ्र: ९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com
Comments
वा!
चांगला लेख. तुकोबा महाराजांचे काव्य अल्पाक्षरी आहे हे माहीत होते. पण त्याचा असा सखोल अभ्यास विरळा.
सहा नंबरचा मुद्दा थोडा पटला नाही. म्हणजे 'ह्यावर तुकाराम महाराजांनी एक शास्त्रीय पद्धतीने तोडगा काढलेला दिसतो.' हे वाक्य बदलले पाहिजे.'न'ची श्रुतीगम्यता (सोनॉरिटी) तुकोबांना शास्त्रीयदृष्ट्या माहित होती असे ध्वनीत होते आहे.
ट्वीट्स
लेख आणि माहिती खूप आवडली.
शिर्षक "तुकयाची नॅनो" पेक्षा, "तुकयाच्या ट्वीट्स" असे जास्त योग्य ठरले असते! ;)
विश्लेषणाची पद्धत, उदाहरणे आवडली
विश्लेषणाची पद्धत, उदाहरणे आवडली
हेच म्हणतो.
उत्तम, अभ्यासपूर्ण लेख. अनेक नव्या गोष्टी समजल्या.
धन्यवाद.
अतिशय आवडला
लेख अतिशय आवडला. निष्कर्ष काढण्याची पद्धतही खूप छान! -- वाचक्नवी