तर्कक्रीडा:८२:बाळकरामाचे प्रेमप्रकरणः(एक), (दोन), (तीन)

बाळकरामाचे प्रेम प्रकरण (एक),(दोन),(तीन)
(एक)
(अ) बाळकरामचे इंदूवर तरी प्रेम आहे किंवा बिंदूवर तरी प्रेम आहे.
(ब) जर बाळकरामचे इंदूवर प्रेम असेल तर त्याचे बिंदूवर सुद्धा प्रेम आहे.
वरील दोन्ही विधाने सत्य मानून पुढील निष्कर्ष काढले आहेत.

१) बाळकरामचे इंदूवर प्रेम आहेच.
२)बाळकरामचे बिंदूवर प्रेम आहेच.
३) बाळकरामचे इंदूवर प्रेम नाहीच.
४) बाळकरामचे बिंदूवर प्रेम नाहीच.

यांतील कोणते निष्कर्ष तर्कशुद्ध आहेत?
*************************
(दोन)
काही दिवसांनी बाळकराम भेटला. त्याच्या संबंधी केलेल्या एका विधानाच्या सत्यासत्यतेविषयी साशंक होतो म्हणून विचारले,:
"

अरे,जर तुझे इंदूवर प्रेम असेल तर बिंदूवर प्रेम आहेच.; असे विधान (विधान प) एका कोड्यात केले आहे.ते खरोखरच सत्य आहे काय?"
" जर तुमचे विधान(प) सत्य असेल तर माझे इंदुमतीवर प्रेम आहे."........(विधान फ).

बाळकरामने केलेले विधान (फ)[जर तुमचे..........प्रेम आहे] सत्य मानून पुढील निष्कर्ष लिहिले आहेत.त्यांतील कोणते निष्कर्ष तर्कसुसंगत आहेत?

१) बाळकरामचे इंदूवर प्रेम आहेच.
२)बाळकरामचे बिंदूवर प्रेम आहेच.
३) बाळकरामचे इंदूवर प्रेम नाहीच.
४) बाळकरामचे बिंदूवर प्रेम नाहीच.

********************************************************
(तीन)
नंतर बरेच दिवस बाळकराम कुठे दिसला नाही. कळले की तो गंधर्व यक्षांच्या देशीं(अमरद्वीपावर) गेला.तिथे त्यांची भाषा शिकला.तिथला रहिवासी झाला. त्यासाठी गंधर्वधर्मी अथवा यक्षधर्मी झाला. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी त्यांच्या(यक्ष,गंधर्वांच्या) सर्व चालीरीती पाळणे आवश्यक असते हेही त्याने मान्य केले.(गंधर्व नेहमी सत्यच बोलतात तर यक्ष असत्य हे आपणांस विदित आहेच).
कालान्तराने त्याची भेट झाली.तो आता गंधर्व की यक्ष हे जाणण्याची उत्सुकता होती. पण प्रथम आठवले ते त्याचे प्रेमप्रकरण.त्याला विचारले:
"इंदु-बिंदूनां भेटायला आलास की काय? त्यांच्यावर अजून प्रेम आहे?"
उत्तरार्थ त्याने पुढील दोन विधाने केली:

१) इंदुमतीवर माझे प्रेम आहे.
२) जर माझे इंदुमतीवर प्रेम असेल तर माझे बिंदुवतीवरही प्रेम आहे.

यांवरून तो यक्षधर्मी नाही हे दिसून आले. ते कसे?
***************************************************
उत्तर कृपया व्यनि द्वारे
***********************************

लेखनविषय: दुवे:

Comments

व्य. नि.उत्तर:१

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय यांनी (एक),(दोन),(तीन) या तीनही प्रकरणांची अचूक उत्तरे शोधली आहेत.
प्रकरण (दोन)च्या लेखनाविषयी मी साशंक होतो.पण मला जे योग्य उत्तर वाटत होते तेच
श्री धनंजय यांनी कळवले आणि माझे शंकानिरसन झाले.धन्यवाद!

इंदूमती / बिंदूवती

इंदुमती = इंदू? / बिंदुवती = बिंदू?
असे गृहित धरायचे आहे काय? की तीच ग्यानबाची मेख आहे?

इंदू-बिंदू

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
इंदुमती म्हणजेच इंदू, बिंदुमती म्हणजे बिंदू.(एक), (दोन), (तीन) या तिन्ही प्रकरणांत त्याच युवती आहेत.मात्र तीन प्रकरणे स्वतंत्र आहेत. एका प्रकरणातील विधानांचा दुसर्‍या प्रकरणाशी संबंध नाही.

ठीक पण

एका प्रकरणातील विधानांचा दुसर्‍या प्रकरणाशी संबंध नाही.

हा खुलासा आधीच आवश्यक होता.

कोड्यातून यक्ष संकल्पनेला धक्का

कोड्यातून यक्ष संकल्पनेला मुळापासून धक्का पोचतो.
मी भाग तीन उत्तर देण्याइतपत पुरेसा सोडवला आहे, हे खरे.
मात्र यातून यक्ष संकल्पना फार गढूळ आहे, असे माझ्या लक्षात आले आहे.
यक्षाने केलेल्या जोड-विधानांमध्ये प्रत्येक अवयव-विधान असत्य असते काय?

कोडे सोडवताना असे गृहीत धरलेले आहे की पूर्णविराम-बिंदूने मर्यादित असे वाक्य असत्य असते. मग त्या वाक्यात किती का उपविधाने अवयव म्हणून असोत. म्हणून कोडे सुटले. परंतु तार्किक कोडे हे खरे तर सगळे मिळून एकच महावाक्य असते. म्हणजे कोड्यातील सर्व वाक्यांना "आणि"-शब्दाने जोडून एकत्र अन्वय लावायचा असतो.

मग "यक्षाची सर्व विधाने मिळून एकत्रित केलेले महावाक्य असत्य आहे" असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. असे म्हटल्यास कोडे सुटत नाही. उलट क्रमाने मानले की यक्षातील प्रत्येक वाक्यातील उपवाक्ये असत्य आहेत - तरी कोडे सुटत नाही.

अधिक चर्चा करून समजून घेऊया : तर्कशास्त्रातले सिद्धांत यक्षाच्या भाषेत कसे ऐकू येतात?
सिद्धांत. "अ अ आहे" हे नित्य सत्य आहे.
गंधर्वाच्या भाषेतील "अ अ आहे" हे वाक्य यक्ष कसा म्हणेल? "अ अ नाही" ???
एकदा का "अ अ नाही" असे विधान घेतले, की सर्व विधाने तर्कसंगत होतात. त्यामुळे यक्ष "द्विरुक्ती" हे एक सत्यविधान करू शकतो, अशी सूट यक्षाला दिल्याशिवाय गत्यंतर नाही.

वगैरे, वगैरे.

हम्म

p → q हे वाक्य यक्ष म्हणाला तर त्याचा अर्थ होतो ~(p → q), म्हणजेच p AND ~q. पण, p असा अर्थ p → q वरून काढताच येत नाही.

शंका

कोड्यात मूलभूत गफलत असे मला वाटते.

बाळकरामचे इंदूवर तरी प्रेम आहे किंवा बिंदूवर तरी प्रेम आहे.

'किंवा' या शब्दाचा 'ऑर' असा अर्थ पटत नाही आणि 'एक्सॉर' असा अर्थ घेतला तर भाग ३ चे निरीक्षणच (=तो यक्ष नाही) चूक वाटते.

जोड(संयुक्त) वाक्याची सत्यासत्यता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय विचारतातः"यक्षाने केलेल्या जोड-विधानांमध्ये प्रत्येक अवयव-विधान असत्य असते काय?"

उत्तर : असतेच असे नाही. मात्र यक्षाने उच्चारलेले संपूर्ण जोडवाक्य (महावाक्य) असत्य असतेच.
ते पुढे लिहितातः"तार्किक कोडे हे खरे तर सगळे मिळून एकच महावाक्य असते."
हो. हे खरेच आहे. आणि ते वर लिहिले आहे त्याच्याशी सुसंगतच आहे.अडचण कुठे आहे ते माझ्या लक्षात येत नाही.पुन्हा विचार करून बघतो.

उत्तराच्या प्रतीक्षेत

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

व्य. नि. उत्तर :२

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.रिकामटेकडा यांनी तीनही प्रकरणांची उत्तरे कळविली आहेत. ती सर्व अचूक आहेत.
धन्यवाद!

जोडवाक्याची सत्यासत्यता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
क्र.(तीन) संबंधी काही सदस्यांनी शंका उपस्थित केली आहे. उत्तर इथेच देतो.
समजा जोड वाक्य: जर अ च्या हातात ससा आहे; तर अ पारधी आहे.
इथे एकूण तीन विधाने आहेत.

विधान P: अ च्या हातात ससा आहे.
Q; अ पारधी आहे.
P--->Q :जर अ च्या हातात ससा आहे तर अ पारधी आहे.
या जोड विधानाचा अर्थ असा की ज्याच्या हाती ससा आहे तो पारधी आहेच.मात्र तोच पारधी आहे असे नव्हे. हाती ससा नसलेले अनेक पारधी असतील.

* वरील वाक्यांत P & Q सत्य असतील तर P--->Q सत्य असते हे स्पष्ट आहे.
* P सत्य , Q असत्य असेल तर P----> Q असत्य असते.
* P असत्य , Q सत्य असेल तर P--->Q सत्य असते.
*P &Q दोन्ही असत्य असतील तरीही P---->Q, सत्य असते.
म्हणजे अशा प्रकारच्या जोड वाक्यात पहिले वाक्य असत्य असेल तर ते जोड वाक्य सत्यच असते, मग दुसरे वाक्य सत्य असो वा नसो.
सत्यता तक्ता असा:
P........Q........P---->Q
..................................
T.......T...........T
T.......F..........F
F......T...........T
F.......F..........T
....................................................................
आता क्र.(तीन) : बाळकराम यक्ष नाही हे सिद्ध करायचे आहे.
समजा तो यक्ष आहे. तर त्याचे पहिले विधान असत्य.
त्याने केलेल्या जोड विधानातील पहिले वाक्य तेच आहे. म्हणजे ते असत्य आहे. त्यामुळे बाळकरामाचे जोड वाक्य सत्य आहे असा निष्कर्ष निघतो.. पण यक्ष सत्य विधान करत नाहीत.म्हणून बाळकराम यक्ष नाही.Q.E.D.(आनुषंगिक निष्कर्षः गंधर्वधर्मी बाळकरामाचे इंदू,बिंदू दोघींवर प्रेम आहे)
मला तरी यात काही तर्कदोष दिसत नाही.

बाळकरामाने किती विधाने केली आहेत

बाळकरामाने एक महा-विधान केले आहे की दोन महा-विधाने केलेली आहेत?

बाळकरामाचे एकच महा-महाविधान (जोड-जोड-विधान) असे का मानू नये?
१) इंदुमतीवर माझे प्रेम आहे आणि जर माझे इंदुमतीवर प्रेम असेल तर माझे बिंदुवतीवरही प्रेम आहे.
या महा-महाविधान असत्य असण्यात काहीही अंतर्गत विरोध नाही.

आणि जर असे म्हटले महा-महाविधाने तपासता येत नाहीत, (यक्षाच्या बोलण्यात ती खरी किंवा खोटी असतील), फक्त त्यांच्यातील अवयव विधानेच खोटी असतात, असा नियम करूया, तर काय.
मग कुठलेही जोडविधान (उदाहरणार्थ : भाग ३, विधान "२") तरी कसे पुरते कसे तपासता येईल? जोडविधाने ही महाविधानेच असतात. जोडविधानातही फक्त अवयवविधानेच तपासावी लागतील.

"यक्षाची विधाने शुद्धलेखनातल्या पूर्णविरामापर्यंत घेतली तरच असत्य असतात" असा नियम केला तर सर्व काही ठीक होते. पण हा तर्कशास्त्रातला नियम नाही. या गमतीदार खेळातला नियम आहे. मानून घ्यायला हरकत नाही. पण सांगायला पाहिजे.

दोन स्वतंत्र विधाने

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोड्यात लिहिले आहे:"उत्तरार्थ त्याने पुढील दोन विधाने केली:

१) इंदुमतीवर माझे प्रेम आहे.
२) जर माझे इंदुमतीवर प्रेम असेल तर माझे बिंदुवतीवरही प्रेम आहे."
..
ही दोन वाक्ये जोडून त्यांचे महावाक्य केलेले नाही. त्यामुळे यांतील प्रत्येकाची सत्यासत्यता तपासणे क्रमप्राप्त आहे.
*बाळकराम यक्ष आहे असे मानले तर विधान १) असत्य. आता जोडविधान २) सत्य ठरते.(कारण P असत्य)
म्हणून बाळकराम यक्ष नाही.

 
^ वर