पूर्वांचलाचा इतिहास

गुवाहाटी शहराचे जुने नाव प्राग् ज्योतिषपूर. नरकासुराने हे शहर वसवल्याचा उल्लेख पुराणात आहे. आजचा आसाम पूर्वी कामरुप प्रदेश म्हणुन ओळखला जात असे. दक्षाने शिवपत्नीचा केलेला अपमान सहन न झाल्याने तिने केलेले आत्मदहन व त्यातुन क्रोधित झालेल्या शंकराने हाती सतीचे शव घेउन केलेले तांडव नृत्य पाहुन पृथ्वी भयभीत झाली. विष्णुने सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे केले व ते तुकडे जेथे जेथे पडले ती एकावन्न स्थाने शक्तीपीठे म्हणुन् भारताच्या चारी दिशांना पसरलेली आहेत. गुवाहाटीतील 'कामाख्या'(कामाक्षी) देवीचे मंदीर हे त्यापैकीच एक आहे.

उषा व अनिरुध्दाची प्रेमकथा आसामच्या तेजपूर मधे घडली होती. आसाम वर अनेक वर्षे ज्या 'अहोम' राजांनी राज्य केले ते स्वतःला स्वर्गदेव म्हणवत. त्यांच्या जुन्या ग्रंथाप्रमाणे ते इंद्राच्या मोठ्या भावाची संतती आहेत्. आसामच्या डोंगराळ कारबीआंगलांग जिल्ह्यातील कारबी समाज स्वतःला सुग्रीवाचे वंशज् समजतो.

अरुणाचल प्रदेशात परशुरामाने आईच्या रक्ताने माखलेला परशू धुण्यासाठी खडक फोडुन जो जलप्रवाह चालू केला त्याचा पुढे ब्रम्हपुत्र नद झाला. अरुणाचल प्रदेशाच्या लोहित या जिल्ह्यातच रुक्मिणीचा पिता भीष्मक याची भीष्मकनगर ही राजधानी होती. तिचे अवशेष अजुनही तेथे सापडतात. रुक्मिणीचे हरण करुन तिला द्वारकेला नेतांना काही काळ श्रीकृष्ण अरुणाचल च्या सियांग जिल्ह्यात थांबला होता असे स्थानिक लोक अजुनही मानतात.

मेघालयातील खासी स्वतःला एकलव्याचे वंशज् मानतात व त्यामुळे ते धनुष्यबाण चालवतांना अंगठ्याचा उपयोग आजही करीत नाहीत.

जयंतियांमध्ये जुळी मुले झाल्यास त्याची नांवे 'राम-लखन' व जुळ्या मुली झाल्यास "दुर्गा-गंगा' ठेवणे हा परंपरागत नियम आहे.

भीमाने ज्या हिडिंबेशी विवाह केला ती नागालँडची होती. नागालँडचे आजचे जे डिमापूर शहर आहे त्याचे मूळ नाव 'हिडिंबापुर्' असे होते.

मणिपूर् च्या राजकन्येशी - 'चित्रांगदे' शी अर्जुनाने विवाह केला होता.

त्रिपुरावर सुमारे दोन हजार वर्षे माणिक्य वंशाचे राज्य होते. त्यानी बांधलेली मंदिरे व बुध्दविहार एकात्मतेची साक्ष देतात. वरील ऐतिहासिक उल्लेखांवरुन पूर्वांचल हजारो वर्षांपासुन भारताशी किती समरस होता याची साक्ष पटते.

संदर्भःपूर्वांचलाचे आव्हान आणि आवाहन-सुनील देवधर.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर