नविन मराठी शब्दांचे प्रयोजन
शैलेश ह्यांच्या अनुदिनीवर त्यांनी लिहिलेल्या वरील शीर्षकाच्या लेखावर मी माझी काही मते मांडली.मूळ लेख इथेवाचता येईल
आपल्या देशात हा इंग्लीश विरुध्द मातृभाषा असा वाद होण्याचे सर्वात महत्वाचे असे कारण म्हणजे आपला खंडप्राय देश. त्यातील विविध प्रदेशांच्या विविध मातृभाषा आणि त्यातील शिक्षण घेणारे लोक ह्यांच्यात समान असा दूवा असायला हवी ,अशी कोणतीच एक भाषा नाही की जिच्या माध्यमातून शिक्षण घेतल्यास देशातील कोणत्याही भागात नोकरी मिळू शकते. मग साहजिकच इंग्लीश हाच पर्याय ठरतो जी जागतिक पातळीवरील ज्ञानभाषा म्हणून ओळखली जाते. म्हणून नाईलाजाने आता लोक मातृभाषेच्या ऐवजी शिक्षणाचे माध्यम इंग्लीश म्हणून निवडतात आणि पर्यायाने मातृभाषेला पारखे होतात आणि ह्यातूनच होतो धेडगुजरी भाषेचा जन्म. अशा परिस्थितीत मराठी सारखीच इतर सगळ्या प्रादेशिक भाषांची दयनीय अवस्था झालेय. रोजच्या वापरातले सहजसुंदर शब्दही ह्या इंग्लीश माध्यमामुळे लोक विसरून गेलेत आणि सर्रास मग दोनतीन भाषांची खिचडी असा प्रकार रूढ होत आहे. म्हणूनच आपल्या सारख्या काही विचारवंत आणि आचारवंत मराठीभिमानी लोकांच्या ह्या 'प्रतिशब्द' शोध मोहिमेला मराठी लोकांकडूनच कितपत सक्रीय सहकार्य लाभेल हे काळच ठरवेल. माझ्या मते आपण आपापले कार्य असेच जारी ठेवावे.
'कर्मण्ये वाधिका रस्ते' च्या चालीवर केवळ काम करत राहाणे इतकेच आपल्यासारख्यांच्या हातात आहे .
मंडळी आपली ह्या विषयावरील मौल्यवान मते जाणून घ्यायला आवडेल
Comments
जारी
माझ्या मते आपण आपापले कार्य असेच जारी ठेवावे.
हे वाक्य माझ्या मते आपण आपापले कार्य असेच सुरू ठेवावे असे लिहीले जावे. खिचडी दोन्ही भाषांचे नुकसानच करते असे वाटते. भाषेत नवे शब्द निर्माण होणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण ठरावे. ~ तो ~
खिचडी
खिचडी नुकसान करेलच असे नाही. नवे शब्द घडवताना केवळ संस्कृतवर अवलंबून राहू नये. भाषेत अनेकदा चांगले नवे शब्द निर्माण अशा खिचडीतून होतात. उदाहरणार्थ, 'मुळाबरहुकूम' ह्या शब्दात तत्सम, फारशी आणि अरबी शब्दांची खिचडी झाली आहे. आणि भाषेचे नुकसान म्हणजे काय, ह्यावर चर्चा व्हायला हवी.
सहमत आहे.
आपल्याशी सहमत आहे.