सध्या काय वाचताय् ?

या व्यासपीठावरील नानाविध व्यक्ति काही ना काही वाचत असतील. हाती असलेल्या/संपविलेल्या पुस्तका/पुस्तकांबद्दलचा सांगोपांग आढावा घेणे वेळ,शक्ति यांच्या अभावामुळे म्हणा , किंवा एकूण प्रवृत्तीमुळे म्हणा दर वेळी शक्य असतेच असे नाही. प्रत्येक नव्या वाचलेल्या पुस्तकाबद्द्ल एक नवा धागा सुरू करणे बर्‍याचदा शक्य होत नाही.

हे सारे लक्षांत घेता, प्रस्तुत धाग्याची कल्पना सुचली. वाचत असलेल्या , संपविलेल्या पुस्तकांबद्दल तुम्हाला काय वाटले , त्याचा कुठला भाग आवडला/नावडला याबाबत येथे लिहिता येईल. इतर वाचकांची मते/ इच्छुकांचे प्रश्न हे सारे इथे येऊ शकेल.

(या धाग्याची कल्पना माझी नव्हे. अन्य काही फोरम्स् वर हे मी पाहिले ; आणि येथे ते चांगल्या रीतीने चालविले जाऊ शकेलसे वाटले ; म्हणून हा प्रपंच.)

मी सध्या वाचतोय एक हिंदी कादंबरी : "नदी के द्वीप" . गेल्या पिढीतील एक दिवंगत हिंदी लेखक "अध्न्येय" यांची ही कादंबरी आहे. अजून ५० पानांच्यापुढे मी गेलेलो नाही. या धाग्याला थोडा प्रतिसाद जरी मिळाला तरी त्याबद्दल मी जरूर लिहीन.

लेखनविषय: दुवे:

Comments

संदर्भ न वाचता दिले आहेत असे म्हणता काय?

अमर्त्य सेन यांनी त्यांच्या पुस्तकातील संदर्भग्रंथ न वाचता संदर्भ दिले आहेत असे तुमचे म्हणणे आहे काय?
सेन यांनी ए जी नूरानी यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. त्यात मुळात आत्माचरण कोर्टाखाली पोचलेल्या निर्दोष निकालाबरोबर, जस्टिस कपूर यांच्या आयोगाने मिळालेल्या नवीन पुराव्यां-साक्षींसकट पोचलेले निष्कर्ष त्या पुस्तकात दिलेले आहेत. खुद्द आदल्या कोर्टात माफीच्या साक्षीदारांकडून गोडसे यांच्याशी गुरूशिष्य संबंधाची साक्ष दिली गेली होती, पण ती ग्राह्य ठरली नाही. कपूर आयोगाकडे सावरकरांचे अंगरक्षक, सचीव, वगैरेंची साक्ष उपलब्ध होती ज्यावरून मूळ कोर्टापेक्षा हा आयोग ठाम निष्कर्षापर्यंत तो पोचू शकला, असे वर्णन नूरानी यांनी दिलेले आहे.
प्रोफेसरकी कुठल्या एका विषयात असली तरीही दुसर्‍या कुठल्या विषयावर अभ्यास करून सबळ संदर्भांसकट लिहिण्यास सेन यांस परवानगी असावी. अब्दुल कलाम यांनाही अभ्यास केला असल्यास नद्यांच्या कालव्याबाबत मत असण्यास, आणि तसेच तुम्हा-आम्हाला रॉकेटबाबत अभ्यासपूर्ण मत असण्यास परवानगी असावी.
सावरकरांबाबत सेन यांच्या पूर्ण पुस्तकात एक परिच्छेद आहे, आणि निबंधाचा विषय वेगळा आहे. त्या तेवढ्यात ब्ल्यू प्लेक च्या बाबतीतही उल्लेख करणे हे विषयाला प्रवाहाला धरून राहिले नसते.

ब्ल्यू प्लेकना आपणही फार महत्त्व देऊ नये असे वाटते. तुम्ही दिलेल्या संकेतस्थळावर अन्य ब्ल्यू प्लेक्सची यादी आहे. यादीत सावरकरांच्या आदले (पूर्ण) नाव साँडर्स नामक राणी व्हिक्टोरियाच्या दंतवैद्याचे आहे, आणि खालचे नाव सेयर्स नामक एका डिटेक्टिव्ह कथा लेखिकेचे आहे. त्यामुळे कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या प्राथमिक माहितीत ब्ल्यू प्लेकचा उल्लेख अप्रस्तुत वाटतो. सावरकरांच्या ब्ल्यू प्लेक वर गंमत म्हणजे "भारतीय देशभक्त आणि तत्त्वज्ञ" असा उल्लेख आहे. पैकी तत्त्वज्ञ म्हणून सावरकरांचे शिक्षण आणि प्रसिद्धी नव्हती. त्यामुळे या ब्ल्यू प्लेक थोडक्यात महत्त्वाची माहिती देतील इतपत संशोधन ते प्लेक लावणारी इंग्लिश हेरिटेज ही संस्था करत नसावी असे वाटते. गांधी, नेहरू यांच्यासुद्धा ब्ल्यू प्लेक आहेत, पण त्यांच्या कुठल्याही चरित्रात तो तपशील प्राधान्याने दिलेला वाचला नाही, आणि हेच योग्य आहे.

सावरकर - सेन - खुलासा

सेन यांनी ए जी नूरानी यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. त्यात मुळात आत्माचरण कोर्टाखाली पोचलेल्या निर्दोष निकालाबरोबर, जस्टिस कपूर यांच्या आयोगाने मिळालेल्या नवीन पुराव्यां-साक्षींसकट पोचलेले निष्कर्ष त्या पुस्तकात दिलेले आहेत. खुद्द आदल्या कोर्टात माफीच्या साक्षीदारांकडून गोडसे यांच्याशी गुरूशिष्य संबंधाची साक्ष दिली गेली होती, पण ती ग्राह्य ठरली नाही. कपूर आयोगाकडे सावरकरांचे अंगरक्षक, सचीव, वगैरेंची साक्ष उपलब्ध होती ज्यावरून मूळ कोर्टापेक्षा हा आयोग ठाम निष्कर्षापर्यंत तो पोचू शकला, असे वर्णन नूरानी यांनी दिलेले आहे.

सेन यांचे संशोधन हे नुरानी यांच्या पुस्तकापासून चालू होऊन तिथेच थांबते...जस्टिस जीवन लाल कपूर कमिशन बद्दल माहीती शोधण्याचा मी जालावर प्रयत्न केला, पण कम्यूनिस्ट संकेतस्थळे आणि नुरानी यांच्या पुस्तकाची समिक्षा सोडल्यास त्याची माहीती कुठे आढळली नाही. मी ततसंबंधी माहीती काढायचा प्रयत्न करत आहे. आपणास असल्यास कृपया जरूर कळवावी. याचा अर्थ मी हे खोटे आहे असे म्हणत नाही पण खालील काही (मला पडलेल्या) प्रश्नांची उत्तरे मिळू शकली नाही:

  1. हे कमिशन कोणी आणि कधी स्थापले होते? त्यांनी त्यांचे फायंडींग १९६९ म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर का जाहीर केले?
  2. सावरकरांच्या मृत्यू आधी त्यांची जबानी या कमिशनने घेतली होती का? (सावरकरांचा मृत्यू हा तसा जाणून आला होता कारण त्यांनी प्रायोपवेशन केले होते). त्याचा संदर्भ कोठे लागला नाही. हे म्हणताना अर्थातच समजूत अशी आहे की हे कमिशन त्यांच्या हयातीत नेमले गेले होते. तसे नसेल अथवा (त्यांच्या हयातीतील) असले पण तरी देखील त्यांची जबानी नसेल तर मात्र असे कसे हा प्रश्न पडतो. एखाद्याला गुन्हेगार ठरवताना त्याची जबानी न घेता ठरवणे साधारणपणे अयोग्य वाटते.
  3. जर त्यांच्या विरूद्धच्या साक्षी या त्यांच्या मृत्यू नंतर घेण्यात आल्या असल्या तर त्याची विश्वासार्हता कशी धरावी?
  4. जर सावरकर एव्हढे त्यात गुन्हेगार ठरवले गेले तर नंतर एक कम्यूनिस्ट सोडल्यास इतरांनी ("सेक्यूलर" - काँग्रेस आदींनी) त्यावर कसे काही आवाज केले नाहीत. किंबहूना इंदिरागांधीनी स्वा. सावरकरस्मारकास स्वतःच्या निधीतून पैसे कसे दिले?
  5. सर्वात महत्वाचे म्हणजे सत्तास्थानी १९४८ पासून ते सावरकरांच्या मृत्यूपर्यंत आणि नंतरही त्यांचे वैचारीक विरोधक आणि गांधीजींचे आचरणशून्य तोंडदेखले समर्थक होते. त्यांनी सावरकरांना पूर्णपणे बदनाम करण्याची संधी कशी काय सोडली? माझ्या माहीतीप्रमाणे चीन युद्ध चालू झाले तेंव्हा नेहेरूंनी त्यांना स्थानबद्ध केले होते. (नेहेरू - म्हणजे "नेहमी हरू" असे एका मोठ्या संघाशी/भाजपशी संबंध नसलेल्या व्यक्तीच्या तोंडातून ऐकले आहे!) थोडक्यात त्यांना पूर्णपणे "न्याय" मिळून फासावर नाहीतरी आजन्म तुरूंगवासात सहज टाकता आले असते.

नुरानी यांची इतर पुस्तके संघ/हिंदूत्व/भाजपच्या विरोधातील दिसली. ९/११ नंतर त्यांनी इस्लाम आणि जिहाद वगैरेचे अर्थ सांगणारी पुस्तके लिहील्याचे कळले. त्याचा सूर हा त्याबाबतीत "डिफेन्सिव्ह" वाटला. थोडक्यात त्यांची म्हणून एक विचारधारा आहे, ज्याला माझा विरोध नाही. तो त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न आहे. पण अशा व्यक्तीचे विचार हे एखाद्या स्वातंतत्र्य योध्द्याच्या संदर्भात जो वैचारीक पातळीवर पूर्णपणे विरुद्ध आहे त्याबाबत निष्पक्ष असू शकतील या विषयी शंका येते. त्यात अशाच व्यक्तीचा केवळ एक संदर्भ अमर्त्य सेन सारख्यांनी संशोधन म्हणून दिला असल्यास ते अजूनच गैर वाटले.

प्रोफेसरकी कुठल्या एका विषयात असली तरीही दुसर्‍या कुठल्या विषयावर अभ्यास करून सबळ संदर्भांसकट लिहिण्यास सेन यांस परवानगी असावी. अब्दुल कलाम यांनाही अभ्यास केला असल्यास नद्यांच्या कालव्याबाबत मत असण्यास, आणि तसेच तुम्हा-आम्हाला रॉकेटबाबत अभ्यासपूर्ण मत असण्यास परवानगी असावी.

अगदी मान्य. पण माझे निरीक्षण असे आहे की सेन स्वतःच्या नोबेलचे आणि त्यासंदर्भातील प्रसिद्धीच्या वलयाचे नैतिक दडपण अत्यंत सहजपणे आणि नकळतपणे श्रोतृवर्गावर आणि वाचकवर्गावर आणतात. महंमद युनुसांचे पहा, ऍल गोर चे पहा आणि असे अनेक, जे सामाजीक क्षेत्रातील कामगिरींमुळे नोबेलविजेते झाले. पण त्याचा त्यांनी असा गैरवापर करताना दिसत तरी नाही. पण सेन मात्र स्वतःस सातत्याने "फिलॉसॉफर" म्हणतात (मी एनपीआर वर ऐकले आहे) "इतिहासा"वर बोलतात पण स्वतःच्या इकॉनॉमीक्सवर बोलायची वेळ आली की गप्प. बरं सर्वात गंमत म्हणजे जसे महंमद युनूस यांच्या कामाचा सरळ फायदा समाजाला झाला (आणि तसाच इतर नोबेल विजेत्या अर्थशास्त्रज्ञांचा पण ) तसा काही सेन यांच्या संशोधनाचा फायदा झाल्याचे ऐकीवात तरी नाही. पण हा अवांतर भाग झाला...

ब्ल्यू प्लेकना आपणही फार महत्त्व देऊ नये असे वाटते.

मी महत्व देत नाही आहे. पण ९०+ वर्षाच्या ब्रिटीश खासदाराने ती मिळवण्यासाठी धडपड केल्याचे ऐकले आहे. शिवाय असा विचार करा, की अशी धडपड कोणी केली असती पण ब्रिटीश सरकारने त्याचा जाहीर विरोध करत नाकारले असते तर सेन आणि त्यांच्या सारख्या इतर विद्वानांनी त्यावर किती लिहीले असते जरी ब्ल्यू प्लेक महत्वाच्या नसल्या तरी!

मग प्रश्न पडतो की इतकी वर्षे सावरकरांना इतका विरोध का? (त्यात गंमत पहा त्यांना फॅसिस्ट म्हणले गेले पण जे नेताजी हिटलरची मदत घेयला गेले त्यांना मात्र हा "प्रॉब्लेम" नाही)

कारण साधे वाटते. आपण जर सावरकरांचे विचार वाचाल तर लक्षात येईल की हा माणूस तर्कट पण टोकाचा तर्कशुद्ध होता. एव्हढे विचार जर लोकांना भावले तर इतर कुणाचेच विचार त्यापुढे तगणार नाहीत ही भिती असावी.... यावर वेगळी चर्चा त्यांचे काही उतारे देऊन नंतर चालू करीन.

धन्यवाद.

फिलॉसॉफर

> पण सेन मात्र स्वतःस सातत्याने "फिलॉसॉफर" म्हणतात
> (मी एनपीआर वर ऐकले आहे) "इतिहासा"वर बोलतात
> पण स्वतःच्या इकॉनॉमीक्सवर बोलायची वेळ आली की गप्प.

खरे आहे. मीसुद्धा हे एन् पी आर वर ऐकले आहे.
सेन यांना हार्वर्ड विद्यापीठात फिलॉसॉफी आणि एकॉनॉमिक्स दोन्ही विभागांत प्रोफेसर म्हणून नेमणूक आहे. फिलॉसॉफी विभागात प्रोफेसरकी असल्यास एखाद्याला फिलॉसॉफर म्हणण्यात फार चूक नसावी. त्यांचे कधी कधी अर्थशास्त्रावर बोलणे होते असे दिसून येते. वेल्फेअर अर्थशास्त्राविषयी ते अजून लेखन करतात असे त्यांच्या सीव्ही वरून दिसते.

मोहंमद यूनुस आणि ऍल गोर यांना नोबेल शांती पुरस्कार मिळाला.

सेन यांना अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळाला. लायनस पाउलिंग यांना १९५४ मध्ये केमिस्ट्रीचा पुरस्कार मिळाला, तरी त्यांनी शांती चळवळीत लुडबुड केली (पुढे त्यांना शांती पुरस्कारही मिळाला म्हणा.)
आइनस्टाईन यांचे शांती विषयक मत पुष्कळांनी ऐकले, आणि ग्राह्य मानले. त्यांचा नोबेल पुरस्कार भौतिकीत होता. त्यांना शांती पुरस्कार मिळाला नाही.

एक संदर्भ नव्हे, दोन. पैकी एक खुद्द सावरकरांच्या लेखणीतला होता, जो मुख्य आहे, कारण त्यात "हिंदुत्वाची" व्याख्या दिलेली होती. आणि ती व्याख्या पटण्यासारखी नाही असे त्या निबंधाचे म्हणणे होते.

प्रभावी

हे पुस्तक प्रभावी का वाटले याचे कारण आठवले. यात फाळणीनंतरच्या प्रसांगांचे प्रभावी वर्णन आहे. सीमेलगतची सर्व शहरे पेटली होती. दोन्ही बाजूंनी अमानवीय हिंसाचार चालू होता. पोलीस, सैन्यदल यांना नियंत्रण ठेवणे अशक्य होत होते. पण या सर्व धामधुमीत एक शहर शांत होते. तिथे दंगली पूर्णपणे थांबल्या होत्या. दंगलखोर आपणहून शस्त्रे खाली ठेवते होते. ते शहर होते कलकत्ता. आणि त्या शहराचे असे परिवर्तन होण्यास केवळ एक व्यक्ती जबाबदार होती : महात्मा गांधी. सैन्यदल, पोलिस या सर्वांना जे जमत नव्हते ते एका माणसाने करून दाखवले होते. ही वॉज द ओन्ली सॅनिटी लेफ्ट.

विसू : हा प्रतिसाद फ्रीडम ऍट मिडनाइट या पुस्तकाच्या संदर्भात आहे. लेखातील प्रतिसाद दुसर्‍या पानावर गेल्यावर हा प्रतिसाद वेगळ्याच ठिकाणी येतो आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सध्या

द् माँक् हू सोल्ड हिज फेरारी- रॉबिन शर्मा
युगान्तः इरावती कर्वे

दोन्ही आवडली.

अभिजित...

द् माँक् हू सोल्ड हिज फेरारी

हे ठोडं बढाइइखोर पुस्तक वाटलं... असो.. युगान्त मस्तच आहे. :)

सध्या

एक गाव एक पाणवठा (बाबा आढाव) वाचायला घेतले आहे. पुस्तक जुनेच आहे, पण मी वाचले नव्हते. ते वाचून विचार काय आले ते नंतर कधीतरी.

खुणावणारी पुस्तके

टेबलवरील 'देहबोली' - अंजली पेंडसे आणि 'पैलपाखरे' ही पुस्तके खुणावत आहेत. जी. एं. च्या पत्रांचे चारी खंड वाचण्याचा मोह टाळू शकलो नाही. सध्या नाईलाजाने फिलिप कोटलरचे 'मार्केटिंग मॅनेजमेंट' वाचतो आहे!
सन्जोप राव

"पैलपाखरे"

"पैलपाखरे" वाचून अनेक वर्षे उलटली. त्यातील "माया" नावाचा एक लेख आठवतो. मूळ लेख कुणाचा ते पार विसरलो आहे. अन्य भाषांतरांबद्दल थोडे अधिक विस्ताराने लिहा सवडीने.

पत्रांबद्द्ल बद्दल मात्र वेगळा धागा निर्माण करायला पाहिजे. त्यावर तुमचा एक प्रदीर्घ लेख येईल अशा आशेत.

पैलपाखरे

माया: मूळ लेखक हर्मन हेस, इंग्रजी अनुवाद : रिचर्ड आणि क्लॅरा विन्स्टन.

पण मला विचाराल तर, "मेला होता तो माणूस" आणि "पावश्या भगत" फार आवडले होते.


आम्हाला येथे भेट द्या.

पुस्तके वाचणारी आणि खपणारी

रविवार महाराष्ट्र टाईम्स मध्ये " मी वाचक" या नावाच एक सदर चालू आहे त्यात " कोणते पुस्तक अकारण गाजते आहे असे आपल्याला वाटते?" असा पण एक प्रश्न नामवंतांना आहे. त्यातील वेगवेगळी उत्तरे असतात. ती वाचनीय असतात. काही पुस्तकांचे मार्केटींगचा माहोल असे भारी असते कि ते पुस्तक तुमच्या कडे नसेल तर " वाचकांच्या इलाईट क्लास" मधे तुम्ही निरक्षर्. प्रेस्टीज इश्यु सारखा.मग लोक अशी पुस्तके चावण्यासाटी घेतात. "बुक बाईट" . या "बाईट"ला मिडिया मध्य् लई भाव आहे बरका? काही नियतकालिकांचे वर्गणीदार वाचक असतातच असे नाही. वाचक तर सोडा पण चावक पण नसतात. व्यक्तिगत प्रेमा पोटी वर्गणॉ दार झालेले, पंथाचे अनुयायी असल्यामुळे वर्गणीदार झालेले. वर्गणी दार असणे म्हणजे त्या नियतकालिकाचे अस्तित्व टिकवून ठेवायला आपली मदत होते या पोटी हितचिंतक वर्गणीदार झालेले. हितसंबंध गुंतल्यामुळे वर्गणी दार झालेले. अर्थातच याची दुसरी बाजू म्हणजे वर्गणीदार नसलेले वाचक आणि चावक हे देखिल गृहित धरले पाहिजे . त्यामुळे वर्गणीदारांचा आकडा हाच इंडिकेटर. खरा आकडा कुणालाच कळत नाही .

प्रतिसादातील अनावश्यक वाटलेला आणि व्यक्तिगत रोखाचा भाग काढून टाकण्यात येत आहे. -- उपसंपादक.
प्रकाश घाटपांडे

सध्या चालू असलेली इतर काही वाचनें

माझे सध्या थोडेसे एका उनाड गुराप्रमाणे झाले आहे. म्हणजे धड एक पुस्तक न संपविता , "चरत" जाणें.
प्रॉब्लेम असा आहे की, ते उपरोल्लेखित हिंदी पुस्तक इतके जड पडते आहे की , मी आपला लाडक्या मराठीच्या "चरई"मध्ये येत राहतो. आणि इथे सध्या असणारा "चाराही" तसाच चविष्ट आहे ...
मर्ढेकरांच्या कविता शाळेत असल्यापासून वाचत होतो. कॉलेजमधे असताना त्यांचा परिचय अधिक दृढ बनला. काही जाणकार मित्रांमुळे त्यांच्याकडे बघण्याचे आपल्यापेक्षा वेगळे आणि अर्थातच जास्त अभ्यासपूर्ण दृष्टिकोन कळायला लागले. एकूण काय तर बाळ सीताराम जवळ राहिले. गेल्या महिन्याभरात काही योगायोग जुळून आले आणि मर्ढेकरांच्या कवितेवरची एक सोडून ३-३ पुस्तके माझ्याजवळ आली. बस्, मग काय ? बाळ सीताराम पुन्हा एकदा बासनातून निघाले. आणि या ३ पुस्तकांच्या संदर्भात त्यांचे काही नवे दर्शन घडते आहे का असला प्रकार सुरू. "चरैवति" या संस्कृत सुभाषिताचा हा आम्ही शोधलेला नवा अर्थ : चरत रहा ! :-) ही ३ पुस्तके म्हणजे :

१. "कारुण्योपनिषद्" : विनय हर्डीकर
२. धो.वि.देशपांडे यांचे <पूर्ण नाव पटकन आठवत नाही. पण नाव बर्‍यपैकी नॉन्-डिस्क्रिप्ट् आहे.>
३. म.वा.धोंड यांचे "अजुनि येतो वास फुलांना".

हेल्प वाचणे?

संगणकावर हेल्प वाचणे, हे वाचन असु शकते का?
तसे असेल तर मी एक्सेल ची हेल्प वाचतोय.
जे हवे आहे ते चटकन न सापडेल याची उत्तम काळजी घेतलेली असते
असे जाणवते आहे या हेल्प मध्ये.

याशिवाय मी मा. सॉ. ऑफिस ऑनलाईन ट्रेनिंग नावाचा प्रकार असतो तो ही केला...
पण काही खास नाही हो :(
असो,

आपला
(अजुनही संगणकाचे गमभन गिरवणारा)
गुंडोपंत

हा हा हा

>> संगणकावर हेल्प वाचणे, हे वाचन असु शकते का?
का नाही??
>> जे हवे आहे ते चटकन न सापडेल याची उत्तम काळजी घेतलेली असते
हा हा हा .. अगदी पटलं.. आणि चुकून मिळालच तर कळणार नाही.. आणि कळलच तर चुकीचं कळेल याचीही काळजी घेतलेली असते. :)))

एक्सेल

एक्सेल च्या हेल्प ऐवजी एम. एस. एक्सेल बायबल. मिळाल्यास वाचा. हेल्प वाचायचे विसराल :)
(किंवा या ला भेट द्या.)

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

लोकमान्य ते महात्मा

डॉ. सदानंद मोरे यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' पुस्तकाचे (ग्रंथाचे) दोन खंड वाचत आहे.
अनेक पूर्वग्रह नष्ट होऊन 'लो. टिळक ते म. गांधी' या कालखंडातल्या भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रीय
समाज-राजकारणाबद्दल एक सुस्पष्ट चित्र निर्माण होत आहे.
पुस्तक (दोन्ही खंड) क्लिष्ट संशोधकी थाटाचे नसल्याने आणि मागचे-पुढचे संदर्भ पुन्हापुन्हा येत
असल्याने समजायला सोपे झाले आहे.
ग्रंथातील अनेक प्रकाशचित्रांमुळे प्रत्यक्ष व्यक्ती, प्रसंग आणि कागदपत्रे पहायला मिळतात.
'राजहंस'ची उत्कृष्ट निर्मिती मूल्ये आहेतच.

गोविंद तळवलकर यांनी या पुस्तकावर आघळपघळ आणि पूर्वग्रहदूषित म्हणून
साप्ताहिक साधनात टीका केली होती. डॉ. सदानंद मोरे यांनी या टीकेला सा. साधनेतूनच उत्तरही दिले आहे.

वाचनीय ग्रंथ.

स्ट्राँग फादर, स्ट्राँग डॉटर

दहापैकी पहिले दोन भाग वाचून झालेत. आतापर्यंत तरी युवावस्थेतील मुलगी-पिता यावरच जास्त भर असल्या सारखा वाटतो आहे. पण लेखिका नात्यातील खोलीत चांगली जात आहे. केवळ मुलींच्या बापांनीच नव्हे तर सर्वांनीचा वाचन्यासारखे आहे. वाचून झाल्यावर जास्तीचे लिहीन.

 
^ वर