"अर्वाचीन व्यासपीठ" आयोजित " श्री. अनिल बोकील " यांच्या " अर्थक्रांती " या विषयावरील व्याख्यान व चर्चा

नमस्कार ,
"अर्वाचीन व्यासपीठ" आयोजित " श्री. अनिल बोकील " यांच्या " अर्थक्रांती " या विषयावरील व्याख्यान व चर्चा सत्रात आपणास हार्दिक निमंत्रण आहे. सदर चर्चा-सत्र शुक्रवार दिनांक ६ एप्रिल २०१२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता साठ्ये महाविद्यालय ( पार्ले महाविद्यालय ) सभागृह, विले-पार्ले (पूर्व), मुंबई, येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर विषयावर अधिक माहिती साठी http://www.arthakranti.org/ या दुव्यावर टिचकी द्या. सदर व्याख्याना नंतर ज्या श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे असतील किंवा आपली मते व्यक्त करायची असतील तर ते सदर "अर्वाचीन व्यासपीठ" वरून करू शकतात. व्याख्यानाचे चित्रण केलेली चित्र फीत इच्छुकाना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच सदर आमंत्रण पत्रिका आपल्या परिचयातील जिज्ञासू व विचारवंत व्यक्तीना देखील पाठवावी . व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे.
या पूर्वी झालेली व्याख्याने -
(१) "भारतात विचारप्रणालीची घसरण झाली आहे काय?"- श्री श्रीधर तिळवे ( लेखक व दिग्दर्शक)
(२) " मी, ओशो आणि संगीत ! " - श्री यशवंत देव ( संगीतकार)
(३) " लोक ! सामान्य, बुद्धिमान , असामान्य !"- श्री श्याम मनोहर (लेखक)
(४) " सामाजिक सुधारणा कशा झाल्या , होतात, आणि व्हाव्यात !"- श्री अरुण टिकेकर (लेखक व पत्रकार)
(५) " देशीवाद"- श्री भालचंद्र नेमाडे ( लेखक)
(६) " प्रा. श्री. विद्याधर अमृते" - " शिक्षण कि शीक्षा ? "
आपले नम्र संयोजक
महेश पवार- मोबाइल क्रमांक ९८७०४१०३६५-
अजित दीक्षित - ९८६७३३२५४९-
ई मेल - maheshpmi6 @yahoo .com .

- "अर्वाचीन व्यासपीठ "-

-भूमिका-
मानवी समूहाच्या वस्तीचे रुपांतर एखाद्या नगरात होताना सुतार , गवंडी, लोहार , सोनार इ. प्रकारच्या बलुतेदार मंडळींचा फार मोठा सहभाग त्यात असतो. हळू हळू वस्ती वाढून नगराचे महानगरात रुपांतर होते.महानगराचे रचनाकार त्याचे आर्थिक व व्यापारी महत्व वाढवतच असतात .स्थलांतरीतांचे लोन्ढे येतच असतात. त्याचबरोबर महानगराची संस्कृती देखील बदलत असते.या अशा सांस्कृतिक जडणघडणीत शिक्षक,प्राध्यापक , लेखक, कलावंत इ. विचारवंतांचा सहभाग असतो.मुंबई शहराच्या बाबतीत देखील हे असेच झाले आहे.परंतु विसाव्या शतकातील घडामोडी पाहता आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात निराशाजनक फरक जाणवून येत आहे. विचारवंत मंडळी आपली वैचारिक बैठक सोडून सामान्य पातळीवर येऊन भय , भूक, मैथुन आणि निद्रा या चौकोनाच्या चार कोपऱ्यात जाऊन बसलेली दिसतात.अर्थात याला अपवाद आहेच.परंतु काही मुठभर मंडळी सोडली तर एकूण समाजास त्याचे काहीच सोयर-सुतक नसल्याचेच दिसते.समोरच्या व्यक्तीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन स्वतःची तुंबडी कशी भरावी याकडेच बहुतेकांचा कल असतो आणि त्यात काहीच गैर नाही असेच सगळ्यांना भासत असते. पण जर या महानगराच्या तसेच एकूण समाजाच्या भविष्याकडे पाहिले तर या महानगराचा भेसूर आणि विद्रूप चेहराच नजरेसमोर येतो. हल्ली माणसे स्वतःची मातृभाषा देखील नीट बोलू शकत नाहीत. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो असे म्हणतात, पण सध्या सुशिक्षित वाटणारा माणूसच जास्त असंस्कृत वागताना दिसतो.एक प्रकारची मग्रुरी, बेदरकारपणा ,मुजोरी त्याला आलेली दिसते. कदाचित त्याला आलेल्या अंशिक आर्थिक सुबत्तेमुळे हा बदल त्याच्यात आलेला असेल.अर्थात आर्थिक सुबत्ता काहीच गैर नाही, परंतु हि सुबत्ता कोणत्या मार्गाने येते त्यावरही हा बदल अवलंबून आहे. एकूणच माणूस साक्षर झाला पण सुशिक्षित नाही, अशी अवस्था आज आलेली दिसते आणि या परिस्थितीत समाजाची सांस्कृतिक व वैचारिक पातळी वाढवण्याचे कर्तव्य फक्त विचारवंत मंडळीच करू शकतात.परंतु दुर्दैवाने हि विचारवंत मंडळी एका व्यासपीठावर येऊन समाजाला मार्गदर्शन करताना दिसत नाहीत.त्यासाठी करणे अनेक असू शकतील. अनेक स्वयंघोषित विचारवंत स्वतःचे कंपू तयार करून त्यातच गुरफटून बसलेले दिसतात, तर काही वैचारिक दहशतवादाचे बळी झालेले दिसतात.काहीजण मानसन्मान, संमेलने , हारतुरे यातच कृतकृत्य झालेले दिसतात. परंतु या सगळ्या घडामोडीमुळे सामान्य माणसाचे मोठे नुकसान होत आहे हि बाब या विचारवंतांच्या लक्षात आलेली दिसत नाही आणि हि दयनीय आणखी वाईट होऊ नये या हेतूने "अर्वाचीन व्यासपीठाची" स्थापना करण्यात आली आहे.या व्यासपीठावर समाजातील सर्व क्षेत्रातील तदन्य आणि विचारवंत वक्त्यांचा समावेश आहे. कोणत्याही विचारसरणीची मते या व्यासपीठावरून सदर केली जाऊ शकतात. वक्त्याना आपले विचार संपूर्ण स्वातंत्र्याने मांडण्याचा अधिकार "अर्वाचीन व्यासपीठ" उपलब्ध करून देत आहे.तसेच त्या विचारांना चर्चेद्वारे विरोध करण्याचेही स्वातंत्र्य श्रोत्याना आहे. परंतु सभासंकेत मोडून वर्तन करणाऱ्या श्रोत्यांना "अर्वाचीन व्यासपीठाच्या " व्याख्यानांना मज्जाव केला जाईल. अर्वाचीन व्यासपीठावरून वक्त्यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यांशी संयोजक संपूर्णपणे सहमत असतील असेही नाही. " अर्वाचीन व्यासपीठ " हे अतिशय दर्जेदार व वैचारिक व्यासपीठ ठेवण्याकडेच संयोजकांचा कल आहे.या व्यासपीठाचे एखाद्या कट्ट्यामध्ये रुपांतर होऊ नये याची खबरदारी वक्त्यांनी व श्रोत्यानीच घ्यायची आहे.या व्यासपीठामुळे समाजात एका छत्राखाली विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे. बाकी काळच ठरवेल.
महेश पवार
संयोजक
९८७०४१०३६५
maheshpmi6 @yahoo .com
अजित दिक्षित
संयोजक
९८६७३३२५४९

लेखनविषय: दुवे:

Comments

कार्यास शुभेच्छा!

श्री. महेश पवार नमस्कार!

अर्वाचीन व्यासपीठाच्या संयोजकांचे काम खरच प्रशंसनीय आहे. परंतु महाराश्ट्र राज्य केवढं मोठं आहे. चर्चेचं स्थळ आहे -साठ्ये महाविद्यालय ( पार्ले महाविद्यालय ) सभागृह, विले-पार्ले (पूर्व), मुंबई येथे, मग एवढ्याश्या ठिकाणी महाराश्ट्रातील सगळी मंडळी कशी काय बरं येतील? मी स्वतः मुंबईत राहतो पण मला देखील प्रवासातली धावपळ करून सांगितलेल्या स्थळावर पोहचता नाही यायचं. येऊनही पहिल्याच भेटीत नवख्या व्यक्तीशी नवख्या विशयावर तोंडी चर्चा करताना बर्‍याच मर्यादा येतात. कारण दोनही व्यक्तींच्या मनात वेगवेगळे समज, गैरसमज, वेगळी माहिती असते दृश्टीकोन पररस्पर भिन्न असू शकतात. परंतु एकदाका हे ब्लॉक्स दूर झाले की माणसं म्युच्युअल बेनेफिटने व अंडस्टँडिंगने काम करण्यास एकत्र येऊ शकतात, असे वाटते.

तुम्ही ज्या उद्देशानं जे काम करताहात तेच तुमच्या एखाद्या संकेतस्थळावर करता आलं तर किती बरं होईल! अनेक विचारवंतांची मते महाराश्ट्रातील जास्तीत जास्त सुशिक्शीतांपर्यत पोहोचू शकतील. तसेच त्यांनाही त्याचवेळी वेगवेगळ्या स्तरातील मंडळींकडून इनपूट मिळू शकेल. संकेतस्थळावर चर्चेच्या दिवशी येण्याआधीच अशा विचारवंतांकडून देखील त्यांच्याकडे त्यांनी तयार केलेली माहिती व्यवस्थित सादर करता येईल. प्रत्यक्श संवादात वा चर्चेत अशी ऐनवेळी हवी असलेली माहिती सादर करणं तितकं शक्य होवू शकत नाही. तुमचा हेतू उत्तम असल्यामुळं तुमच्या संकेतस्थळाची देखील वेगाने प्रसिद्धी होईल. कारण अशा उद्देशाने चालणारे संकेतस्थळ अजून तरी मराठीत नाही. (थिंक महाराश्ट्र.कॉम हे काहिसे त्या ढंगाने जाईल असे वाटले होते. पण त्यांना ते जमले असे म्हणता येत नाही.)

केवळ वक्ता होवून एखाद्या ठिकाणी, काही तासांसाठी बोलण्याने 'समाजाची सांस्कृतिक व वैचारिक पातळी वाढेल' असे होवू शकत नाही. परंतु आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार जास्तीत जास्त जनतेत बराच काळ वावरण्यातून चांगल्या प्रकारे होऊ शकतो असे वाटते.

धन्यवाद

आदरणीय श्री सतीश रावले,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण सुचवलेले बरेचसे मुद्दे बरोबर आहेत. आम्ही त्यावर विचार करीतच आहोत. संकेतस्थळाची कल्पना देखील अगदी बरोबर आणि उत्तम आहे. संकेतस्थळ सुरु करण्या च्या दिशेने काम देखील चालू आहे. परंतु कुठेतरी हे काम सुरु झाले पाहिजे या हेतूने आणि उद्धेशाने हे व्यासपीठ सुरु झाले आहे. सध्या तरी आपल्या सारख्या सन्माननीय व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा इंटरनेट हाच मार्ग आहे. एकदा का संकेतस्थळ सुरु झाले कि मग सदर चर्चा ज्या आम्ही चित्रित करत आहोत , त्या सगळ्या चित्रफिती , सदर संकेतस्थळावर दाखवण्यात येईल जेणेकरून जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या मराठी भाषिकाला त्याचा आनंद घेता येईल.
धन्यवाद
आपला स्नेहांकित
महेश पवार.

प्रतिसाद

श्री. महेश पवार
आपला प्रतिसाद वाचला.
आपल्या प्रतिसादात आपण मला 'आदरणीय', 'सन्मानीय' अशी संबोधनं केल्याने मला संकोच वाटला. माझा आदर करण्याइतपत मी मोठा नाही. केवळ, माझ्या बायकोनं माझा मान राखावा व घराबाहेर माझा कोणी अपमान करू नये, इतकीच इच्छा मनात बाळगून असतो.

आपला मित्र,
सतीश रावले

 
^ वर