उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
घातक मेडीकल वेस्ट रिसायकल
गिरीश
August 14, 2010 - 5:54 am
मला मागील महिन्यात कमरेवर ४ इंजक्षनं घ्यावी लागली. चौथ्या आठवड्यात मला कमरेजवळ अब्सेस झाले. माझा कयास असा आहे की, ही करामत डिस्पोजेबल सिरींजची असावी, जी रीसायकल झाली असावी. किंवा डॉक्टरच्या अस्वच्छ हाताने सिरींज जंतूवाली झाली.
डिस्पोजेबल सिरींज पुन्हा बाजारात येत असाव्यात?
दुवे:
Comments
डॉक्टरांचा असाही अनुभव...
काही वर्षांपूर्वी माझा एक नातलग या मेडिकल वेस्ट डिस्पोजेबल यंत्रणेचे विपणन करत होता. ती उत्पादने चांगली होती आणि स्वस्तही होती. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, असे त्याला वाटत होते. प्रत्यक्षात तो जेव्हा फिरायला लागला तेव्हा त्याला डॉक्टर आणि रुग्णालये यांचे जे अनुभव आले ते चक्रावून टाकणारे होते. उदाहरणार्थ : यात एक नीडल बर्निंग मशिन होते. इंजेक्शनची वापरलेली सुई यात टाकली की बटण दाबताच ती सुई जळून जाई. म्हणजे जंतू असल्यास तेही जळत. या यंत्राची किंमत २००० रुपये होती आणि कंपनीने ते डॉक्टरांना १२०० रुपयांत देऊ केले होते. पण डॉक्टरांनी ते किती रुपयांत मागावे? फक्त ६०० रुपयात द्या, असे म्हणू लागले. माझ्या नातलगाला फार आश्चर्य वाटले. जे डॉक्टर रुग्णाला तपासण्याची किमान १०० रुपये फी घेतात त्यांना १२०० रुपयांचे साधे यंत्र परवडू नये? नंतर त्याला या क्षेत्रातील खाचाखोचा कळू लागल्या. कट प्रॅक्टिस, औषध कंपन्यांचे मिंधेपण यात डॉक्टर किती गुरफटले आहेत, हे दिसले.
शस्त्रक्रियेदरम्यान वापरलेले आणि रक्ताळलेले बोळे, सॅनिटरी नॅपकिन व इतर दूषित कचरा जाळण्यासाठी इन्सिनरेटर वापरतात. रुग्णालयाची उलाढाल पाहिली तर हेही यंत्र फार महाग वाटू नये, पण तरीही फार कमी रुग्णालये आहेत ज्यांनी स्वतःचा इन्सिनरेटर बसवला आहे. तिथेही प्रत्येक देवापुढे खडीसाखर ठेवणे आलेच आणि विश्वस्त किंवा प्रमुख अधिकार्याचा तर सिंहाचा वाटा. सामाजिक उत्तरदायित्व, आरोग्याप्रती जागरुकता यापेक्षा 'फायदा क्या?' हा व्यापारी मंत्र परवलीचा झाला आहे.
खरे तर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर पावले उचलल्यास डॉक्टर व रुग्णालयांसाठी ही यंत्रणा अनिवार्य होऊ शकेल, पण भारतात अनेक गोष्टींना 'असे का?' हा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर नसते किंवा गूढ असते.
नेत्यांना दुषणं देण्याचा काही अधिकार कोणाला पोचतो का?
समाजातील कित्येक स्तर जर भ्रष्ट आचरणाने बरबटलेले असतील तर नेत्यांना दुषणं देण्याचा काही अधिकार कोणाला पोचतो का?
धक्कादायक
योगप्रभू यांनी नोंदवलेल्या निरीक्षणात तथ्य आहे.
ग्रामीण भागात मेडिकल वेस्ट डिस्पोसल हा प्रकारच अस्तित्वात नाही. एक तर अशा प्रकारच्या सुविधा पुरवणार्या यंत्रणा शहरात- जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. ही सुविधा पुरवण्यासाठी ते काही ठराविक रक्कम महिन्याला चार्ज करतात. त्यांची गाडी येऊन आपला बायोमेडिकल कचरा घेऊन जाते, अशी पद्धत आहे. (हे ज्या दवाखान्यांत स्वतःचा इन्सिनरेटर नाही, त्यांच्यासाठी.)
साधारण तीन वर्षापुर्वी मी जळगाव जिल्ह्यातल्या एका तालुक्याच्या ठिकाणी खासगी वैद्यकीय व्यवसायाला सुरूवात केली. जळगाव शहरात त्यावेळी "मान्साई बायोमेडीकल वेस्ट डिस्पोजल एंटरप्रायजेस" नावाची संस्था होती. म्हणजे अजूनही आहे. मी त्यांच्याकडे रितसर नोंदणी करून माझ्याकडचा जैव-वैद्यकीय कचरा [जो सुरूवातीला अगदीच कमी होता.. ;-)] म्हणजे वापरलेल्या सिरींजेस, सलाईनच्या बाटल्या इत्यादि पाठवू लागलो. तालुक्याच्या गावातून हा कचरा दरवेळी जळगावात पाठवणे काहीसे जिकिरीचे होते.
कालांतराने माझ्या लक्षात आले की गावात माझ्याशिवाय कोणताही प्रॅक्टीशनर असे करत नाही. तपासांती कळले की महिन्याच्या काही ठराविक दिवशी एक भंगारवाला येतो, त्याला हा सर्व कचरा किलोने विकतात. मग मीही काही महिने तेच केले. एक दिवशी सहज उत्सुकता म्हणून मी भंगारवाल्याचा इंटरव्ह्यू घेतला. ते लोक या प्लास्टिकचे काय करतात असे विचारले. माझी अशी कल्पना होती की ते लोक याला रिसायकल करत असावेत. त्याने दिलेले उत्तर धक्कादायक होते. शहरात गोळा केलेला हा कचरा (पक्षी: सिरींजेस) हे लोक खेडोपाडी असलेल्या बोगस आणि काही डिग्रीवाल्या डॉक्टरांनाही अत्यल्प दराने विकत असत. ते "डॉक्टर्स" मग हा कचरा उकळून आपल्या पेशंट्ससाठी वापरत असत. (खरं तर या सिरींजेस फक्त दीड ते दोन रुपयाला एक या दराने बाजारात मिळतात.)
ही माहिती कळल्यावर मी हा प्रकार माझ्यापुरता बंद केला. इतर काही डॉक्टर्सना त्यापासून परावृत्त केले. आता जळगाव शहरात शिफ्ट झाल्याने तो प्रश्न निकाली निघाला आहे. मान्साईवाल्यांची घरपोच सेवा उपलब्ध आहे. पण एकंदर ग्रामीण भागात परिस्थिती अजूनही भयाण आहे.
गादी-उशा कारखानदार आणि हे
मध्यंतरी संसदेत एक मुद्दा उपस्थित केला होता- दिल्लीमधील गादी-उशा कारखानदार मेडीकल वेस्टचा कापुस त्यात वापरतात व ह्यास कसा प्रतिबंध आणता येईल.
काही मेडीकल प्रॅक्टीशनर जर भंगार मालातून युज्ड सिरींज घेऊन त्यावापरत असतील तर, वरील गादी-उशा कारखानदार आणि हे, काही फरक नाही.
भारतात देवळांचा व्यवसाय जोरात चालू असण्याचे हे ही एक कारण आहे- आधी अनैतिक वागायचे व मग मनाला लागले की, मनःशांती साठी देवाला आळवणी करायची व त्यालाही पैशाची लालूच (ह्यातही लालू आहेच) दाखवायची.
मशिन घेण्याची सक्ति
हेल्मेट सक्तिसारखे हे मशिन् घेण्याची सक्ति केली पाहिजे. मग त्यातही भ्रष्टाचार वगैरे होणार पण आळा बसेल- शेवटी कोणताही कायदा काहीतरी रेष मारण्याचा प्रयत्न करत असतो.