मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ४.

, , आणि येथे ह्यापूर्वीचे भाग पहावेत.

१) सत्यमेव जयते.
मुंडकोपनिषत् ३.१.६.

सत्यमेव जयते नानृतमं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्यात्मकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥

सत्याचा विजय होतो, असत्याचा नाही. आत्मसुखी ऋषि अंतिम सत्याकडे जाण्यासाठी चोखाळतात तो देवमान्य मार्ग सत्यातून जातो.

२) चराति चरतो भगः.

आस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वस्तिष्ठति तिष्ठतः।
शेते निपद्यमानस्य चराति चरतो भगः॥ चरैवेति चरैवेति...
ऐतरेय ब्राह्मण ७.१५.

बसलेल्याचे नशीब बसून असते, उभा राहिलेल्याचे उभे असते, झोपलेल्याचे झोपते आणि चालणार्‍याचे चालत राहते. म्हणून तू चालत रहा, चालत रहा...

३) बहुरत्ना वसुन्धरा.

पदे पदे च रत्नानि योजने रसकूपिका।
भाग्यहीना न पश्यन्ति बहुरत्ना वसुन्धरा॥
वृद्धचाणक्यशतकम्.

पावलोपावली रत्ने आणि प्रत्येक योजनावर भरलेली विहीर अशी ही पृथ्वी बहुरत्ना आहे पण भाग्यहीनांना ते दिसत नाही.

४) काकणभर सरस.

(’हातच्या कांकणाला आरसा कशाला’ ह्या म्हणीचा अर्थ लगेच उमगतो पण ’अमुक गोष्ट दुसरीहून काकणभर सरस आहे’ म्हणजे काय?) ’काकिणी’ हे प्राचीन भारतातील एका जुन्या नाण्याचे नाव आहे. १ निष्क = १६ द्रम्म = २५६ पण = १०२४ काकिणी = २०४८० वराटक असे कोष्टक भास्कराचार्याच्या लीलावतीमध्ये दिलेले आहे. अन्य ठिकाणी १ काकिणी = २० वराटक ह्याऐवजी १ काकिणी = २० कपर्द (कवडया) असाहि उल्लेख मिळतो. ह्यावरून दिसते की काकिणी हे एक फार छोटया मूल्याचे मान होते. ’काकणभर सरस’ म्हणजे अगदी थोडया फरकाने वरचढ. (कवडयादेखील बाजारात चालत असत ह्याचा पुरावा ’कवडीमोल’, ’कवडीचुंबक’ अशा शब्दांमध्ये टिकून आहे.)

५) प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत्.

लालयेत्पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत्।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत्॥
भागवतपुराण १०-११४.

५ वर्षे लाड करावे, नंतर दहा वर्षे धाकात ठेवावे. मात्र मुलगा सोळा वर्षाचा झाला की त्याला मित्रासारखे वागवावे. (ह्याच श्लोकाचा पहिला चरण नीतिसारामधे ’राजवत्पञ्चवर्षाणि दशवर्षाणि दासवत्’ असाहि सापडतो.)

६) दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्.

सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्।
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्॥
वेणीसंहार, अंक ३.

मी सूत असेन, सूतपुत्र असेन वा अन्य कोणी असेन. कुळामध्ये जन्म दैवाने मिळतो पण माझा पराक्रम मी मिळविलेला आहे.

७) मिष्टान्नमितरे जना:.

कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्।
बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जना:॥
नैषधचरित १०.१(?)

विवाहामध्ये कन्या रूपाची अपेक्षा करते, आई सुबत्तेची, वडील अभ्यासाची आणि नातेवाईक चांगल्या कुळाची अपेक्षा करतात, उरलेले सर्व सुग्रास भोजनाची अपेक्षा करतात.

८) स्त्रीरत्नं दुष्कुलादपि.

श्रद्दधान: शुभां विद्यामाददीतावरादपि।
अन्त्यादपि परं धर्मं स्त्रीरत्नं दुष्कुलादपि॥
मनु?

श्रद्धाळू व्यक्तीने धाकटयाकडूनहि विद्या उचलावी, अन्त्यजाकडूनहि धर्म आणि नीच कुटुंबामधूनहि स्त्रीरत्न उचलावे.

९) चारैः पश्यन्ति राजानः.

गावो गन्धेन पश्यन्ति वेदैः पश्यन्ति वै द्विजाः।
चारैः पश्यन्ति राजानः चक्षुर्भ्यामितरे जनाः॥
महाभारत उद्योगपर्व ३४.३२.

गाई गंधाने, विद्वान् ब्राह्मण वेदांमुळे आणि राजे हेरांमुळे जग जाणतात. उरलेले सर्व डोळ्यांनी जग पाहतात.

१०) बहुजनहिताय बहुजनसुखाय.
महापरिनिब्बान सुत्त ३८, जच्‍चन्धवग्गो इ. (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आकाशवाणी ह्यांचे बोधवाक्य).

’evaj vutte ayasma anando bhagavantaj etad avoca: 'titthatu bhante bhagava kappaj titthatu sugato kappaj bahujana-hitaya bahujana-sukhaya lokanukampaya atthaya hitaya sukhaya deva-manussanan' ti 'alaj dani ananda ma tathagataj yaci akalo dani ananda tathagataj yacanayati' महापरिनिब्बान सुत्त ३८ येथून. (मला पालीचे ज्ञान नसल्याने रोमन अक्षरात जसे मिळाले तसे येथे दाखविले आहे.)

येथे तेच शब्द अन्य बौद्ध लिखाणात आणि देवनागरीत पहा. अर्थ अंदाजाने कळतो.

’एवम्पि खो आयस्मा आनन्दो भगवता ओळारिके निमित्ते कयिरमाने, ओळारिके ओभासे कयिरमाने, नासक्खि पटिविज्झितुं; न भगवन्तं याचि – ‘‘तिट्ठतु, भन्ते, भगवा कप्पं; तिट्ठतु सुगतो कप्पं बहुजनहिताय बहुजनसुखाय लोकानुकम्पाय अत्थाय हिताय सुखाय देवमनुस्सान’’न्ति, यथा तं मारेन परियुट्ठितचित्तो । दुतियम्पि खो…पे॰… ततियम्पि खो भगवा आयस्मन्तं आनन्दं आमन्तेसि।’ (जच्‍चन्धवग्गो आयुसङ्खारोस्सज्‍जनसुत्तं.)

अभिजात संस्कृत वाङ्मयात हा शब्दप्रयोग कोठेच आढळत नाही. बौद्ध धर्म भारतात मागे पडल्यानंतर अलीकडच्या स्वातन्त्र्योत्तर काळातच त्याचा पुन:प्रसार झालेला दिसतो. अभिजात संस्कृत वाङ्मय वाचणार्‍या-लिहिणार्‍यांच्या विचारविश्वात बहुजनहित आणि बहुजनसुख ह्याला महत्त्वाचे स्थान नव्हते ह्याचे हे द्योतक आहे असे मला वाटते. सामाजिक विचाराच्या दृष्टिकोणातून पाहिल्यास ही गोष्ट लक्षात येण्याजोगी आहे.

११) निर्वीरमुर्वीतलम्.

तत्तद्विक्रमदोहदेन विलसद्दोर्दण्डदम्भोलिना
विद्वेषिव्ययकर्मठेन दिशता निर्वीरमुर्वीतलम् ।
किं ब्रूमश्चतुरब्धिसीमभुवनं राजन्वदातन्वता
येनाभूर्विजिगीषुणा विदधिरे दिक्पालशेषा दिशः॥
उमापतिधर (श्रीधरदाससंकलित ’सदुक्तिकर्णामृत’ येथून).

निरनिराळ्या पराक्रमांनी शोभणार्‍या हस्तरूपी वज्राने शत्रुविनाशकार्यात कठोर असा तू जेव्हा उर्वीतल निर्वीर करतोस, पृथ्वी जिंकणारा तू जेव्हा सर्व दिशांमध्ये केवळ दिक्पाल शिल्लक ठेवतोस आणि चार सागरांपर्यंत तू जेव्हा आपली सीमा नेऊन पोहोचवतोस तेव्हा, आम्हाला सांग, आम्ही त्याचे वर्णन करावे तरी कसे?

आद्वीपात्परतोऽप्यमी नृपतयः सर्वे समभ्यागता:
कन्येयं कलधौतकोमलरुचि: कीर्तेश्च लाभास्पदम्।
नाकृष्टं न च टंकृतं न नमितं स्थानाच्च नोच्चालितम्।
केनापीदमहो महद्धनुरिदं निर्वीरमुर्वीतलम्।।
सीतास्वयंवर नावाची अज्ञात कृति.

जंबुद्वीप आणि त्याच्या पलीकडून सर्व राजे येथे आलेले आहेत. सुवर्णाप्रमाणे कांति असलेली आणि कीर्तीचे निवासस्थान अशी ही कन्या आहे. तथापि कोणीहि हे प्रचंड धनुष्य ओढण्यास, त्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार करण्यास, त्याला वाकवण्यास अथवा त्याला उचलण्यास समर्थ दिसत नाही. उर्वीतल निर्वीर झाले आहे असे दिसते.

जालावर बराच शोध घेतल्यावर मला हे obscure म्हणता येतील असे दोन स्रोत मिळाले. ह्यापैकी कोठलाहि एक हा खरा मूलस्रोत आहे असे खात्रीने म्हणवत नाही.

१२) जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
सुभाषित.

लक्ष्मणा, लंका स्वर्णमय असली तरी मला ती नको. माता आणि मातृभूमि स्वर्गाहूनहि श्रेष्ठ आहेत.

हा श्लोक रामायण युद्धकांडातील आहे अशी सार्वत्रिक समजूत असली तरी रामायणाच्या कोठल्याहि पाठात तो मिळत नाही. त्यामधील ’जन्मभूमि’ आणि तिचे ’पावित्र्य’ ह्या संकल्पना तर अगदी आधुनिक दिसतात. बंकिमचंद्रांच्या ’आनंदमठ’ ह्या कादंबरीत त्याचे मूळ आहे, पं. मदन मोहन मालवीयांच्या लिखाणात त्याचा उगम आहे ह्याहि समजुती टिकत नाहीत. गेल्या शंभरदीडशे वर्षात हा श्लोकार्ध निर्माण होऊन त्याने जनमानसाची पकड घेतली आहे, ती इतकी की आपल्या ’सत्यमेव जयते’सारखा हा श्लोकार्ध नेपाळच्या राष्ट्रीय चिह्नावरती लिहिण्यात आला आहे. ह्या सर्व बाबींची विस्तृत चर्चा येथे उपलब्ध आहे.

१३) मरणान्तानि वैराणि.

मरणान्तानि वैराणि निवृत्तं नः प्रयोजनम्।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव॥
रामायण युद्धकाण्ड १०९.२५.

(रावणवधानंतर राम बिभीषणास म्हणतो...) वैर मरणाबरोबरच संपते. आमचे कार्य आता झालेले आहे. ह्याचा अन्त्यसंस्कार कर. हा जसा तुझा आहे तसाच माझाहि आहे.

१४) अर्धचन्द्र.

चतुर्थः श्यामलको यावन्न याति तावद् अर्धचन्द्रप्रदानेन निष्कासित:।
पंचतन्त्र लब्धप्रणाश (महाधनेश्वरनाम भाण्डपति कथा).

महाधनेश्वर नावाच्या व्यापार्‍याकडे त्याचे चार जावई मुक्कामाला आले आणि ते परत जायचे नावच काढत नव्हते. अखेर त्यांपैकी पहिल्या तिघांना युक्तिप्रयुक्तीने रस्ता दाखविला. चौथा कशालाच बधेना म्हणून त्याला मानेमागे हाताचा अर्धचन्द्र लावून बाहेर काढले अशी कथा.

१५) चक्रम.

अतिलोभो न कर्तव्यो लोभं नैव परित्यजेत् ।
अतिलोभाभिभूतस्य चक्रं भ्रमति मस्तके॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक २२.

(चार ब्राह्मण धनाच्या शोधासाठी निघाले. तिघे पुरेसे धन मिळाल्यावर थांबले. चौथ्याने अतिलोभामुळे आणि दुसर्‍यांचा हितकारक सल्ला न ऐकल्याने डोक्यावर फिरणारे चक्र मागे लावून घेतले.) अतिलोभ करू नये आणि लोभाचा पूर्ण त्यागहि करू नये. अतिलोभात फसलेल्याच्या डोक्यावर चक्र फिरू लागते.

१६) वसुधैव कुटुम्बकम्.

अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक ३८.

हा माझा किंवा परका असा विचार कोत्या मनाचे करतात. ज्यांचे वागणे औदार्यपूर्ण आहे त्यांना सर्व पृथ्वी आपल्या कुटुंबासारखी वाटते.

१७) अशिक्षितपाटव.

स्त्रीणामशिक्षितपटुत्वमानुषीषु संदृश्यते किमुत याः प्रतिबोधवत्यः।
प्रागन्तरिक्षगमनात्स्वमपत्यजातमन्यैर्द्विजै: परभृता: खलु पालयन्ति॥
शाकुन्तल ५.२२.

(शापामुळे विस्मृति झालेल्या दुष्यन्ताला ओळख पटविण्यासाठी शकुन्तला त्याने पूर्वी तिजपाशी ठेवलेली त्याची आंगठी दाखविते तेव्हा तो म्हणतो...)

स्त्रियांचे अशिक्षितपटुत्व मानवी नसलेल्या प्राण्यांमध्येहि दिसते, तर मग बुद्धि असलेल्या स्त्रियांविषयी काय बोलावे? आकाशात जाण्याअगोदर कोकिळा अन्य पक्ष्यांकडून आपली पिले वाढवतात.

१८) दीर्घसूत्री.

अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्च यः।
द्वावेतौ सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यति॥
महाभारत शान्तिपर्व १३७.२०.

जे येणार आहे त्याची तयारी ठेवणारा आणि शीघ्र विचार करणारा अशा दोघांची भरभराट होते. दीर्घसूत्री नष्ट होतो.

१९) योगक्षेमं वहाम्यहम्.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥
भगवद्गीता ९-२२ (आयुर्विमा महामंडळाचे बोधवाक्य).

माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो.

२०) सत्यं शिवं सुन्दरम्.

१९७८ साली पडद्यावर आलेला ह्या नावाचा चित्रपट आणि ह्याच शब्दांवरचे त्यातील गीत आपल्या परिचयाचे आहे. मात्र हे प्रसिद्ध वचन कोठे प्रथम निर्माण झाले हा प्रश्न अनुत्तरित आहे. एक तर्क पुढीलप्रमाणे:

’भक्तामल’ नावाची कृति नभदास नावाच्या लेखकाने १५८३ ते १६३९ ह्या काळात केव्हातरी रचली. तिच्यावर ’भक्तिरसमोहिनी’ नावाची टीका प्रियदास नावाच्या टीकाकाराने १७१२ साली लिहिली. तिच्यामधे तुलसीदासाच्या ’रामचरितमानसा’विषयी पुढील गोष्ट सांगितलेली आहे. रामचरित मानस देशी भाषेत असल्यामुळे काशीस्थित पंडित तिच्याकडे उपेक्षेने पाहात होते. अखेर एका रात्री काशीविश्वनाथाच्या गाभार्‍यात रामचरितमानस आणि वेदांसारखे अन्य ग्रंथे ठेऊन देण्यात आले. सकाळी गाभारा उघडल्यावर असे दिसले की रामचरितमानस अन्य ग्रंथांच्या वर होते आणि त्यावर ’सत्यं शिवं सुन्दरम्’ असे शब्द उमटलेले होते.

हा ’चमत्कार’ आपण आज मान्य करणार नाही परंतु नभदासाच्या टीकेत चमत्काराचे वर्णन देतांना जर हे शब्द असले तर त्यांचे मूळ १७१२पर्यंत निश्चितच जाते, मग ते नभदासाचे स्वतःचे असोत वा त्याच्या आधीचे अन्य कोणाचेतरी असोत.

’प्रथमग्रासेन मक्षिकापातः’ ह्या प्रसिद्ध उक्तीचा - किंवा तिच्यासारख्या दुसर्‍या उक्तीचा स्रोत बरेच प्रयत्न करूनहि मला मिळाला नाही. तीच गोष्ट ’व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ ह्या दुसर्‍या उक्तीची. कोणास ठाऊक असल्यास प्रतिसादमार्गे अवश्य कळवावा.

भाग २ मध्ये ’षट्कर्णी होणे’ ह्यासाठी दाखविलेल्या दोन स्रोतांहून अधिक जुना वाटतो असा स्रोत म्हणजे चाणक्याच्या नावाने प्रसृत असलेली चाणक्यसूत्रे. ह्यांमध्ये क्र. ३४ वर ’षट्कर्णाद्भिद्यते मन्त्र:’ असा सूत्ररूपाने हाच विचार सांगितला आहे.