अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन मंडन (भाग ३)

अणुवादाच्या खंडनाच्या ऐवजी यावेळी अणुवादाचे एक प्राचीन समर्थन आहे ते देत आहे.

मागील भागांचे दुवे
अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १): ब्रह्मसूत्र २.२.१२ वरचे शांकरभाष्य
अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग २): ब्रह्मसूत्र २.२.१३ आणि २.२.१४ वरचे शांकरभाष्य

मागच्या दोन भागांत जी खंडने दिली होती त्यांच्याशी पुढील समर्थने पडताळावीत. हा उतारा न्यायसूत्रातील वात्स्यायनभाष्याचा आहे. त्यात अणुवादाविरुद्ध दोन वेगवेगळे मुद्दे (त्यांच्या दृष्टीने) पराजित केलेले आहेत.

"काहीच नाही असे मानणारा" अणूंविरुद्ध हे मुद्दे मांडतो.

पहिला मुद्दा मागील भागांशी संबंधित नाही, पण रोचक आहे. दुसरा मुद्दा शंकरांनीही मांडलेला आहे. (न्यायसूत्रे शंकरांच्या पूर्वीची होत. त्यामुळे हा मुद्दा शंकरांचा म्हणून खंडित केलेला नाही, तर "काहीही नाही असे मानणार्‍याचा" म्हणून खंडित केलेला आहे.)

शंकरांनी भाग १ मध्ये केलेले खंडन तर्कशुद्ध होते, पण अपूर्ण होते, असे मत मी तिथे मांडले होते. त्या अपूर्णतेचा पुरेपूर फायदा येथे घेतलेला आहे. भाग २ मध्ये शंकरांनी "अनवस्थिती"चा मुद्दा उपस्थित केला होता. (म्हणजे जर अणू एकमेकांना जोडायचे असतील तर कुठलातरी संबंध कल्पावा लागतो, तो संबंध अणूशी जोडायला आणखी एक संबंध कल्पावा लागतो, ... आणि अशा तर्‍हेने तार्किक कल्पना एकमागे एक वाढतच जातात, त्यांचा अंतच होत नाही.) ही तर्कातून तर्क निघून "अनवस्थिती" होते, म्हणून अणूंचा समूह जोडला जाणारच नाही, वगैरे वगैरे.

"अनवस्थिती"चा मुद्दा घेऊन न्यायसूत्रे शंकरांचे प्रथम खंडन हाणून पाडतात. हेच शंकरांच्या प्रथम खंडनातील अपूर्णत्व, आणि त्यामुळेच त्यांचा तर्क "सिद्ध" होत नाही. कारणांपाठीमागे कारणे शोधणार्‍या सर्वांचीच अनवस्थिती होते. कणाद-नैयायिक कुठल्या एका कल्पनेपाशी येऊन "ही शेवटची तार्किक कल्पना, हेच अंतिम कारण" म्हणून थांबतात. शंकर "त्या विशिष्ट ठिकाणी थांबू शकत नाही", इतकेच खंडन देतात. ते कारण-शोधनात अनवस्थेचा उल्लेख करत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे, पण त्यांच्या दृष्टीने आवश्यकही आहे : ते वेगळ्या कुठल्या ठिकाणी, वेगळ्या कुठल्या मार्गाने जातात, आणि "ही कल्पना शेवटची, हे अंतिम कारण" म्हणून थांबतात.

अनवस्थेचा न उल्लेख करण्याची त्रुटी सोडल्याने, शंकरांच्या उत्तम वादात भगदाड पडते. कारण-शृंखलेत अंत केला नाही तर सर्वांनाच अनवस्था प्रसंग येतो, हे नैयायिक सांगतात. मग कोणीच काही बोलू शकणार नाही. तर अनवस्था टाळायची असेल तर कारण-शृंखला अणूंपाशी थांबवली तर काय वाईट?

न्यायसूत्रभाष्य आणखी एक प्राचीन कोड्याचा उल्लेख करते, ते अगणित संख्यांच्या बेरजेबद्दल आहे. गणिताच्या दृष्टीने हा फार विचारवंतांना पडलेला विचार आहे. ते गणित हल्लीहल्ली १९व्या शतकात सोडले गेले.

---------------------------------------------------------------------

(अणूबद्दल) "काहीच नाही" असे मानणारा आता म्हणतो :

(सूत्र) त्याच्या आतमध्ये आकाश/अवकाश भिनले असल्याकारणाने तो उत्पन्न होणार नाही. न्या. सू. ४.२.१८
तुम्ही म्हणता तसा कुठला अवयव नसलेला, शाश्वत अणू उत्पन्नच होणार नाही. का? आकाशाने भिनल्यामुळे. आत-बाहेर अणूमध्ये आकाश=अवकाश समाविष्ट असते, म्हणजे भिनलेले असते. आकाश त्यामध्ये शिरल्यामुळे तो अणू स-अवयव असतो. स-अवयव असतो म्हणून शश्वत नसतो.

(सूत्र) नाहीतर आकाश=अवकाश सर्वत्र नाही. न्या. सू. ४.२.१९
"आकाश अणूत भिनले नाही" असे म्हणावे तर आकाश सर्वत्र नाही असे मानण्याचा प्रसंग येईल.

(टीप : आक्षेपाचे उत्तर)
(सूत्र) आत आणि बाहेर, हे कार्यद्रव्याबद्दल (बनवलेल्या वस्तूबद्दल) कुठल्यातरी अन्य कारणाच्या (बनवणार्‍या वस्तूच्या) संदर्भात असते. ही बनवलेली वस्तू नसल्यामुळे, आत-बाहेर या कल्पनाच नाहीत. न्या. सू. ४.२.२०
"आत" म्हटले की कारण (घटक) द्रव्याने झाकलेला कुठला अन्य घटक, असा अर्थ निघतो. तो अर्थ बनवलेल्या वस्तूंबाबतच संभवतो. अणू हा घटकांनी बनवला नसल्यामुळे, त्याच्या बाबतीत "आत" संभवत नाही. बनवलेली वस्तू नसल्यामुळे परमाणूच्या "आत" आणि "बाहेर" या कल्पनाच नसतात. अणूंनी बनवलेल्या वस्तूंनाच ही कल्पना लागू आहे. ज्याच्याहून लहान असे काही नाही, त्याला परमाणू म्हणतात.

(टीप : या मुद्द्याचे आणखी सखोल खंडन करता यावे, म्हणून "आकाश म्हणजे काय" याविषयी थोडक्यात माहिती देतात, आणि त्या माहितीच्या जोरावर तपशीलवार खंडन करतात. -धनंजय)
(सूत्र) ध्वनी भिनणे, संयोग होणे, यामुळे ते सर्वगामी आहे. न्या. सू. ४.२.२१
ध्वनी जिथे कुठे का उत्पन्न होवो, तो आकाशात भरून जातो, आणि त्याच्या सहार्‍याने राहातो. मने, परमाणू, त्यांच्यापासून बनलेली कार्यद्रव्ये आकाशातच निष्पन्न होतात. आकाशापासून वेगळे झालेले कुठलेही मूर्त द्रव्य उपलब्ध नाही. म्हणून "सर्वत्र नसलेले" असे आकाश असूच शकत नाही.

(सूत्र) ढवळले न जाणे, आडथळा न होणे, आणि सर्वत्र भिनलेले असणे, हे आकाशाचे गुणधर्म आहेत. न्या. सू. ४.२.२२
काठीने पाणी ढवळले जाते, आणि काठी पाण्यावर मारली तर आडथळा जाणवतो. पण आकाशातून हलणार्‍या वस्तूने ते ढवळले जात नाही, आणि त्याला आपटणार्‍या वस्तूसाठी ते आडथळा होत नाही. असे कसे? कारण त्याला अवयव नाहीत. हलणार्‍या किंवा आदळणार्‍या वस्तूला रोखत नाही, आणि ती क्रिया करणारा जो गुण आहे, त्याचा प्रतिबंध करत नाही. असे का? कारण आकाशाला "स्पर्शण्या"चा गुणधर्म नसतो. स-अवयव, स्पर्श-गुण असलेल्या पदार्थांमध्येच आडथळा जाणवतो. ते गुणधर्म नसल्यास अशी काही कल्पना केली जाऊ शकत नाही.
"अणूचे अवयव 'अणूंपेक्षाही अणू' असल्याचा प्रसंग येईल म्हणून अणू हे बनवलेले द्र्व्य असू शकत नाही."
अणू स-अवयव आहे असे म्हटले, तर अणूचे अवयव 'अणूपेक्षाही अणू' असल्याचा प्रसंग येईल. असे का? बनवणार्‍या घटकांच्या आणि बनवलेल्या वस्तूच्या आकारमानामध्ये फरक दिसल्यामुळे. म्हणून अणू हे बनवलेले कार्य-पदार्थ असू शकत नाहीत. बनवणार्‍या घटकांच्या विभाजनामुळे बनवलेल्या कार्य-वस्तू शाश्वत नसतत. आकाश भिनल्यामुळे नव्हे. मातीचे ढेकूळ भाग वेगवेळे पडल्यामुळे अशाश्वत असते, त्यात आकाशाचा समावेश असल्यामुळे नव्हे.

(पुढची दोन सूत्रे आक्षेपकर्त्याची आहेत.)
(सूत्र) मूर्त वस्तूंना आकार असतो, म्हणून त्यांना अवयव असतात. न्या. सू. ४.२.२३
मर्यादित, स्पर्शगुण असलेल्या वस्तूंनाच आकार असतो - म्हणजे त्रिकोण, चौरस, गोळा, वगैरे. अवयवांच्या रचनेने आकार प्राप्त होतो. अणू गोलाकार असतात, म्हणून त्यांना अवयव असतात.

(सूत्र) आणि संयोग झाल्यामुळेही. न्या. सू. ४.२.२४
आगल्या-मागल्या अणूंच्या मध्ये असलेला अणू त्या अलीकडच्या-पलिकडच्या अणूंच्या मध्ये आडथळा बनून असतो. त्यावरुन असे अनुमान करता येते, की तो अलीकडच्या भागाने अलीकडच्या अणूशी संपर्क करतो, आणि पलीकडच्या भागाने पलीकडच्या अणूशी संपर्क करतो. अलीकडचा भाग आणि पलीकडचा भाग म्हणजे अवयवच होत. त्याच प्रकारे सर्व दिशांनी अणूचा कशाकशाशी संपर्क येतो, ते सर्व दिशांचे भाग अवयवच.

(पुढचे न्यायसूत्र सांगण्यापूर्वीच वात्स्यायन आक्षेपाचे खंडन करणारे भाष्य सुरू करतात.)
"मूर्त वस्तूंना आकार असतो, म्हणून त्यांना अवयव असतात" याबद्दल बोललो आहोत. ते काय? विभाग करता-करता आणखी लहान भाग करता येत नाहीत, त्या ठिकाणी अणू प्राप्त होतो. अणूचे अवयव 'अणूंपेक्षाही अणू' असल्याचा प्रसंग येईल म्हणून अणू हे बनवलेले द्रव्य असू शकत नाही.

आणि पुन्हा इथे जे म्हटले आहे, की अणू संयोग करतात, तेव्हा स्पर्श-करून आडथळा बनतात, तो स्पर्श पूर्ण अणूला व्यापक नसल्यामुळे अणूचे भाग विभागता येतात, त्याच्याबद्दल हे बघा. येथे म्हटले आहे, की स्पर्श-गुण असलेला अणू अन्य स्पर्शगुण असलेल्या अणूंच्या मध्ये येत असल्यामुळे तो आडथळा बनतो, भाग असल्यमुळे नव्हे. विभाग करता-करता आणखी लहान भाग करता येत नाहीत, त्या ठिकाणी अणू प्राप्त होतो. अणूचे अवयव 'अणूंपेक्षाही अणू' असल्याचा प्रसंग येईल म्हणून अणू हे बनवलेले द्रव्य असू शकत नाही.

मूर्त वस्तूंना आकार असतो, आणि स्पर्श-गुण असलेल्या वस्तू संयोग करू शकतात, या कल्पनांना लक्ष्य बनते ते पुढील सूत्र -

(सूत्र) अनवस्था निर्माण होते, आणि अनवस्था निर्माण करणारे वाद योग्य नव्हेत, म्हणून हा अणूवादाचा प्रतिषेध नव्हे. न्या. सू. ४.२.२५
जे काही मूर्त आहे, आणि जे काही संयोगक्षम आहे, ते सर्व स-अवयव आहे असे म्हटले तर अवयव पडतच राहातील, आणि तर्काला स्थिर स्थिती कधीच येणार नाही, अशी अनवस्था उत्पन्न करणार्‍या या कुशंका आहेत. अनवस्था हीच खरोखर असेल, तरच हे दोन तर्क खरे असतील. (आणि हे ठीक नाही.) त्यामुळे अणूंना अवयव नाहीत, या गोष्टीचा वरील दोन तर्कांनी प्रतिषेध होत नाही. वस्तूचा विभाग करता-करता विभागाची प्रक्रिया संपणारच नाही, आणि प्रलयकाळच येऊ शकणार नाही, असे होईल. अनवस्था होऊ दिली, तर हरेक प्रकारच्या वस्तूचे अनंत अवयव होतील, आणि त्यांची वेगवेगळी मोजमापे मानता येणार नाहीत, त्यांचे वेगवेगळे गुरुत्व मानता येणार नाही. परमाणूंच्या अवयवांच्या विभागानंतर स-अवयव वस्तू आणि त्याच्या अवयवाचे समान मोजमाप होऊ लागेल.

---------------------------------------------------------------------

चर्चेसाठी विषय :
१. जाता जाता सूत्रांनी अणूंची व्याख्या दिली आहे :
"ज्याच्याहून लहान असे काही नाही, त्याला परमाणू म्हणतात."
"आत/बाहेर...कारण (घटक)..."
शंकरांनी कणादांची म्हणून जी अणूची व्याख्या दिली आहे, ती नैयायिकांशी मिळतीजुळती आहे का? दोन मुद्दे : १. भाग पाडण्याची परिसीमा. २. कारण (घटक) या अर्थी (आठवा: शंकरांनी कपडा-धागे हा दाखला वापरला होता.)

२. आकाश=अवकाशाचे भागच नाहीत. ते सर्वत्र असले तरीते कशाला छेद देत नाही. छेद देत नाही, म्हणून भाग पाडत नाही. न्यायसूत्र म्हणत आहे, की अणूपेक्षा लहान अवकाश आपल्या कल्पनेत येऊ शकले, म्हणजे काही अणूला छेद देऊन भाग पडत नाही. हे तुम्हाला पटते का?

३. अनवस्था उत्पन्न करणारे वाद योग्य नसतात, कारण कुठलीतरी स्थिती कधीतरी झालेली असते (उदाहरणार्थ : प्रलय). म्हणून अनवस्था हीच अव्यवस्थित आहे. अनवस्था उत्पन्न करणारा वादच ग्राह्य नाही. म्हणून कुठेतरी भाग पाडणे थांबवता येते. तोच अणू/परमाणू. हा वाद पटण्यासारखा आहे का?

४. अणूंचे भाग हा मुद्दा शंकरांनी जवळजवळ सुरू करून अनवस्थेपर्यंत नेला नाही (भाग १ मध्ये). न्यायसूत्रात शंकरांचा तो वाद अनवस्थेपाशी पोचतो हे दाखवले. शंकरांनी तो तिथपर्यंत का पोचवला नाही?

५. मात्र "समुह-भाव/संबंध/अनवस्था" हा वाद (भाग २ मधला) हा शंकरांनी अनवस्थेपर्यंत का पोचवला? न्यायसूत्रांनी अनवस्था-गामी वादांविरुद्ध प्रतिपादन केले आहे. त्या विचाराने शंकरांचा (भाग २ मधील) अनवस्था मुद्दाही निपटतो का?

६. अनवस्थित वाद तुमच्या व्यवहारात जेव्हा होतात तेव्हा तुम्ही काय करता? जर मूल "आई, अमुक का?" "मग तुझे कारण का?" "तुझ्या कारणाचे कारण का?"... अशी अनवस्था असलेली कारणे विचारत राहातात, तर तुमचे शेवटचे उत्तर काय असते?

७. "हरेक प्रकारच्या वस्तूचे अनंत अवयव होतील, तर त्यांची वेगवेगळी मोजमापे मानता येणार नाहीत, त्यांचे वेगवेगळे गुरुत्व मानता येणार नाही. परमाणूंच्या अवयवांच्या विभागानंतर स-अवयव वस्तू आणि त्याच्या अवयवाचे समान मोजमाप होऊ लागेल." हे विधान तुम्हाला पटते का? गणिताच्या दृष्टीने?